Skip to main content

तपपूर्ती

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 08/06/2026 21:41 या दिवशी प्रकाशित केले.

२६ मे २०२६ या दिवशी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यास १२ वर्षे पूर्ण झाली. सलग १२ वर्षे पंतप्रधानपदावर राहणारे मोदी हे स्वतंत्र भारतातील हे केवळ दुसरे पंतप्रधान. यानिमित्ताने त्यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. 

 

या कालखंडात घडलेल्या चांगल्या गोष्टी -

 

- One rank One Pension ही सैन्यदलाची अनेक वर्षे प्रलंबित असलेली मागणी मान्य करण्यात आली.

 

- संपूर्ण देशात समान कररचना वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करून वास्तवात आणण्यात आली. परंतु या करासाठी अनेक स्तरी रचना केल्यामुळे ही रचना अतिशय क्लिष्ट स्वरूपात राबविली गेली. त्यात भर म्हणजे वसेक विवरणपत्र वारंवार भरण्याची सक्ती केल्याने वसेक भरावा लागणारे व्यावसायिक त्रस्त झाले. अलिकडेच यात थोड्या सुधारणा केल्या आहेत व स्तर कमी करण्यात आले आहेत.

 

- दळणवळण सुविधा: रस्ते, महामार्ग, आगगाड्या, द्रुतगती महामार्ग, महामार्ग रूंदीकरण, वीजनिर्मिती, मेट्रो, विमानतळ अश्या दळणवळणाच्या साधनांमध्ये वेगाने मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 

 

- डिजिटल व्यवहार  व डिजिटल कारभार मोठ्या प्रमाणात वाढल्याने सुलभता वाढली.

 

- देशांतर्गत व देशाबाहेरील पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले. २०१४ पर्यंत बहुतांशी दुर्लक्षित असलेली ईशान्य भारतीय राज्ये बऱ्याच प्रमाणात राष्ट्रीय प्रवाहात आली. तेथे दळणवळणाच्या सुविधा वाढल्या व तेथे होणारे पर्यटनही मोठ्या प्रमाणात वाढले.

 

- अवकाशसंशोधन व संरक्षणक्षेत्र या दोन विभागात घोडदौड सुरू आहे. चंद्रावर यान उतरविण्यात यश आले. अनेक देशांचे उपग्रह अवकाशात सोडण्याचे काम वेगात सुरू आहे.  हे हलके सैन्य विमान सैन्यात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र काही देशात निर्यात झाले व इतरही काही देशातून मागणी आली आहे.

 

- देशातील अनेक राज्यात पसरलेला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे.

 

- दहशतवादी हल्ले बऱ्याच प्रमाणात कमी झाले. 

 

- पाकिस्तानने कुरापत काढल्यानंतर पूर्वी केवळ तोंडी इशारे दिले जात होते. परंतु आता दहशतवादी हल्ला झाला की भारत पाकिस्तानवर थेट हल्ला करून प्रत्युत्तर देऊ लागला आहे. डोकलाम व गलवानमध्ये चीनला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले गेले जे पूर्वी स्वप्नातही शक्य वाटत नव्हते. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर हल्ला करून थांबला नाही तर काश्मिरमधून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नद्यांचे पाणी पाकिस्तानला देणारा करार भारताने एकतर्फी कचराकुंडीत टाकून पाकिस्तानला धडा शिकविण्याच्या दृष्टिने एक पाऊल पुढे टाकले. अनेक पाकिस्तानी अतिरेकी स्थानिक सुपारीबाजांकडून मारले गेले. 

 

- तोंडी घटस्फोट रद्द करण्यात आला आहे. 

 

- श्रीराम मंदिर प्रत्यक्षात आले आहे.

 

- जम्मू-काश्मीर हा देशांतर्गत देश तयार करणारे कलम ३७० रद्द करून इतर राज्यांसारखेच ते एक राज्य केले व नंतर विभाजन करून लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित राज्य निर्माण झाले.

 

- कोविड काळात देशांतर्गत लस तयार करून कोट्यवधी नागरिकांचे प्राण वाचविले आणि अनेक देशांना ही लस नि:शुल्क दिली.

 

- मंत्र्याचा भ्रष्टाचार बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.

 

या कालखंडात घडलेल्या संमिश्र गोष्टी -

 

- अर्थव्यवस्था साधारणपणे स्थिर आहे. खूप डळमळीत नाही पण खूप वृद्धी नाही अशी स्थिती आहे. काहिशी संतृप्त अवस्था आहे. परकीय चलन गंगाजळी अनेक वर्षे ७०० अब्ज डॉलर्सच्या आसपास स्थिर आहे. त्यातही संतृप्तता आलेली दिसते. महागाई स्थिर आहे. निर्यात व आयात स्थिर आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग ७ अंदाजपत्रके सादर केली. त्यात खूप क्रांतिकारी असे काही दिसले नाही. त्यांच्याकडे नवीन कल्पनांचा अभाव दिसतो. मध्यमवर्गाला जास्तीत जास्त पिळून उत्पन्न वाढविणे, कर वाढविणे यापलिकडे उत्पन्नवाढीसाठी काही योजना दिसत नाही. त्यांच्याजागी एखादा नवीन अर्थतज्ज्ञ आणणे आवश्यक आहे.

 

- परराष्ट्र संबंध सातत्याने वरखाली होत आहेत. अमेरिकेशी, कॅनडाशी चांगले संबंध कळसाला पोहोचून अचानक रसातळाला गेले आहेत. अर्थात त्यासाठी भारत कारणीभूत नाही. रशिया, फ्रान्स, इस्राएल, अरब देश, जपान या देशांशी संबंध अजूनही चांगले आहेत. संकटकाळात भारत एकटा पडतो, इतर देश मदतीला येत नाही हे पुन्हा सिद्ध झाले.

 

- अनेक दुर्लक्षित पात्र व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले. परंतु अनेक अपात्र व्यक्तींना सुद्धा हे पुरस्कार दिले. अजूनही अनेक पात्र व्यक्तींच्या कार्याकडे दुर्लक्ष सुरू आहे.

 

- डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढून आंतरजाल वापरामुळे सुलभता वाढली, परंतु त्यामुळे आंतरजाल गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली व त्यावर कोणताही प्रतिबंध लादण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. 

 

- - अर्थव्यवस्था वाढीचा दर स्थिर असला तरी त्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होत नाहीत.

 

या कालखंडात घडलेल्या वाईट गोष्टी -

 

- मंत्री व पंतप्रधान भ्रष्ट नसले तरी भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देऊन कोणतीही कारवाई होऊन दिली नाही.  गुन्हेगार, भ्रष्ट, देशद्रोही लोकप्रतिनिधी सरकारी संरक्षणामुळे मोकाट आहेत. कॉंग्रेसकाळात आरोप झालेल्या मंत्र्यांवर निदान तोंडदेखली कारवाई तरी केली जात होती व पदावरून हटविले जात होते. मागील १२ वर्षात आरोप झालेल्यांना पक्षात आणून निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देऊन पावन करून उच्चपदे देणे सुरू आहे.

 

- अनेक पक्ष फोडून भाजपत आणून भाजपचे स्वरूप कॉंग्रेसपक्षाही वाईट करून ठेवले आहे. 

 

- सर्व राज्यात हिंदी लादण्याचा अट्टाहास सुरू आहे. 

 

- राखीव जागा वाढविणे, जातीनिहाय जनगणना असे चुकीचे निर्णय घेतले आहेत.

 

- निश्चलनीकरणातून फारसे काही साध्य झाले नाही.

 

- कोविड काळात संपूर्ण देशात जेमतेम ५०० रूग्ण असताना कोणालाही न सांगता केवळ ४ तासांची मुदत देऊन संचारबंदी लागू करण्याचा अत्यंत घातक निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल केले.

 

- शाहीनबाग आंदोलन, शेतकरी आंदोलन अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळले.

 

- न्यायव्यवस्था, शिक्षणक्षेत्र, बॅंका हे अजूनच रसातळाला गेले. या क्षेत्रात कोणतीही सुधारणा झाली नाही. किंबहुना कॉंग्रेसकाळापेक्षाही या क्षेत्रात जास्त अनागोंदी माजली. या क्षेत्रातील भ्रष्टाचार व अकार्यक्षमता अधिकच वाढली. निरूपयोगी पुस्तकी शिक्षण अजूनही सुरू आहे.

 

- लोकप्रतिनिधींचे फाजिल लाड अधिकच वाढले.

 

________________________________________________________________________________

 

हे माझे आकलन आहे. मी कदाचित काही किंवा सर्व मुद्दे चुकीचे मांडले असू शकतात. 

 

 

 


वाचने 156
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

तपपूर्तीबद्दल मोदी भाजप संघ व कार्यकर्ते यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. लवकरच मोदी भारताचे सर्वाधिक काळ राहणारे पंतप्रधान होतील. 


तपपूर्तीचा आढावा चांगला वाटला पण थोडासा संक्षिप्त वाटला. प्रतिसादांतून कदाचित अजून विस्तार वाचायला आवडेल. मोदी संघ भाजप यांबद्दलची माझी मते मी वेळोवेळी मिपावर मांडत असतोच, इथेही लिहीन. तूर्तास ही पोचपावती.‌

 

या धाग्यावर मुद्दे आधारित चर्चा व्हावी ही अपेक्षा.