Skip to main content

आपली मातृभाषा मराठी जिवंत राहण्यासाठी आपण काय काय करू शकतो?

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 21/04/2025 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून महराष्ट्रात पहिलीपासून ३ भाषा सक्तीने अभ्यासक्रमात टाकलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यात हिंदीचा पूर्णपणे अनावश्यक समावेश केला आहे. आपली राष्ट्रीय राजकाराणात जाण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या मदतीसाठी, हिंदीभाषिक राज्यात व मतदारात स्वीकारार्हता वाढविण्यासाठी, पक्षश्रेष्ठींच्या मर्जीत राहण्यासाठी स्वभाषेचा, मुली-मुलांचा, महाराष्ट्राच्या हिताचा बळी दिला जात आते. हिंदी कोवळ्या वयात मुली-मुलांवर लादण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी व तितकाच संतापजनक आहे. वयाच्या सहाव्या वर्षी एकदम ३ भाषा शिकाव्या लागणे हा त्या कोवळ्या जिवांवर क्रूर अत्याचार आहे. मुळात महाराष्ट्रात हिंदी शिकण्यासाठी कोणतेही वेगळे परीश्रम करण्याची कोणतीही गरज नाही. मराठी व हिंदीची लिपी व व्याकरण समान असून बहुतांशी शब्द समान आहेत. हिंदी वर्गात बसून अजिबात न शिकताही मराठी माणसांना हिंदी व्यवस्थित समजू शकते, बोलता येते व लिहिताही येते. मग अभ्यासक्रमात हिंदी हा वेगळा विषय म्हणून अगदी पहैलीपासून सक्तीचा करून मुली-मुलांच्या डोक्यावरील भार वाढविणे व त्यांचा वेळ अक्षरशः वाया घालविणे यापेक्षा काहीही वेगळे साध्य होणार नाही. नोकरी मिळविणे, परदेशात जाणे, पदवी व पदव्युत्तर शिक्षण इ. साठी हिंदी संपूर्ण निरूपयोगी आहे. फडणवीसांनी आअली कायद्याची पदवी इंग्लिशमध्ये मिळविली की हिंदीमध्ये स्वत:च्या मुलीला हिंदी माध्यमाच्या विद्यालयात शिकविले की हिंदी माध्यमाच्या? नोकरी, उच्च शिक्षण, परदेशी जाणे यासाठी इंग्लिशला पर्याय नाही व त्यासाठी हिंदीचा शून्य उपयोग आहे. तामिळनाडूने तिसरी भाषा अभ्यासक्रमात लादण्यासाठी स्वच्छ शब्द्दत नकार दिला आहे. तामिळ व इंग्लिश या दोनच भाषा आम्ही अभ्यासक्रमात ठेवणार, हिंदी अर्यायी भाषा म्हणून सुद्धा अभ्यासक्रमात ठेवणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे, हिंदीभाषिक राज्यात हिंदी व इंग्लिश या दोनच भाषा अभ्यासक्रमात आहेत. मग महाराष्ट्रात हिंदीचा एवढा कंड का आहे? आधी नेहरू, नंतर इंदिरा गांधींनी त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रावर लादले, आजवर कोणत्याही पक्षाच्या एकाही सरकारने क्षीण विरोध सुद्धा केला नाही. केंद्र सरकारचे सर्व निर्णय निमूटपणे सर्वांनी स्वीकारले. फडणवीसांनी पुढची पायरी गाठली. हिंदी म्हणे राष्ट्रभाषा आहे व ती सर्वांना यायलाच हवी असे मराठी नेते राज्य स्थापनेपासून बरळत आहेत. राज्यभाषा प्रचार समिती हे खूळ फक्त महाराष्ट्रातच आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारतात कोणतीही भाषा ही राष्ट्रभाषा नाही. प्रत्येक राज्याची भाषा ही राज्यभाषा आहे. मग हिंदी राष्ट्रभाषा आहे हे वारंवार असत्य का सांगितले जाते व्यावहारिक लाभासाठी पहिलीपासून सर्वांना इंग्लिश व्यवस्थित यावे असे धोरण हवे. त्याबरोबरीने इंग्लिश लिपीशी साधर्म्य असणार्‍या दॉईच, फ्रेंच, स्पॅनिश, डच अश्या भाषांचा पर्याय हवा किंवा संगणक, कला, दाद्य,, गायन, नृत्य असे पर्यायी विषय हवे ज्यामुळे रोजगार मिळण्याची जास्त शक्यता आहे. अगदीच खाज असेल तर हिंदी हा ऐच्छिक विषय म्हणून असावा. हिंदीमुळे यापुढे महाराष्ट्रात मराठी कोणासाही येण्याची आवश्यकता उरलेली नाही. अश्या परिस्थितीत मराठी जगविण्यासाठी व मराठीचे व्यावहारिक महत्त्व कायम राहून वाढविण्यासाठी आपण खालील कृती करू शकतो. १) cm@maharashtra.gov.in या पत्त्यावर मी खालील ईमेल लिहिले आहे. भारतात घटनेनुसार कोणतीही भाषा राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही फालतू भाषा कधीही राष्ट्रभाषा नव्हती, नाही व नसेल. आपले अनेक मंत्री हिंदी राष्ट्रभाषा आहे असे धडधडीत असत्य सांगत आहेत. पहिलीपासून महराष्ट्रात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्या. तिसरी भाषा म्हणून इतर सर्व भाषांचे पर्याय द्या व ही तिसरी भाषा पाचवीनंतर अभ्यासक्रमात आणा. कोणत्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. आम्हाला हिंदुराष्ट्र हवे आहे, हिंदीराष्ट्र अजिबात नको. मी व माझे कुटुंब भाजपचे कट्टर समर्थक असलो तरी हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत भाजपला मत देणार नाही. २) महाराष्ट्रात समोरासमोर किंवा दूरभाष माध्यमाद्वारे मी कधीही हिंदीत बोलणार नाही, मराठीतच बोलण्यावर आग्रही राहीन. अगदीच पर्याय नसेल तर इंग्लिश. हिंदी येत नाही हे ठामपणे सांगत राहीन.असे सांगितल्यावर बहुतेक वेळा समोरील व्यक्ती मराठीत बोलण्याचा प्रयत्न करते असा माझा अनुभव आहे. ३) माझ्या फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअ‍ॅप, टाटा स्काय, गुगल इ. ची भाषा मराठी ठेवली आहे. गुगलवर शोधलेली पाने मला मराठीत भाषांतरीत होऊन दिसतात. यातून मराठी भाषेचे महत्त्व वाढते. ४) एटीएम वापरताना मी मराठीचा पर्या निवडतो. आपण जेव्हा जेव्हा मराठी हा पर्याय एटीएमवर, आंतरजालावर, संभाषणात वापरला जातो तेव्हा तेव्हा त्याची नोंद होते व मराठी अनेक जण वापरताहेत असे दिसले तर मराठीचा पर्याय जिवंत राहतो. यातून मदतकेंद्रात मराठी माणसांना काम मिळण्याची शक्यता वाढते. माझ्या ओळखीचा एक जण काही वर्षांपासून गुगलला मराठीत भाषांतर केलेली वाक्ये, शब्द इ. पुरवितो. मराठी अजिबात वापरात नसती तर गुगलला मराठी पर्याय द्यायची गरज वाटली नसती. ५) मराठी माणसांशी बोलताना सुद्धा शक्य तेथे मराठीच पापरा. नाईन एट टु टु फोर असा क्रमांक सांगण्याऐवजी नऊ आठ दोन दोन चार असा सांगता येतो. ग्रॉक, चॅटजीपीटी वगैरे कॄबु साधने वापरतानाही मराठीत प्रश्न विचारल्यास मराठीत उत्तर येते. सर्व पक्षांचे सर्व राज्यकर्ते अत्यंत नालायक आहेत. ते सत्तेसाठी आईबाप्प सुद्धा विकतील तेथे मातृभाषेला किंमत काय. मराठी वाचविण्यासाठी फक्त मराठी माणसेच प्रयत्न करू शकतात.

वाचने 16257
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by अमर विश्वास

मराठी लोकांना हिंदी येते त्यामुळे ते अमराठी लोकांशी हिंदीत बोलतात. त्यामुळे अमराठी लोकांना मराठी शिकायची, मराठीत बोलायची गरज पडत नाही. त्यामुळे सगळ्यांना येणारी कॉमन भाषा, सार्वजनिक ठिकाणी संवादाची डिफॉल्ट भाषा हे स्थान हिंदी घेत आहे. जर मराठी लोकांना हिंदी येतच नसेल (किंवाआम्ही हिंदीत संवाद साधणार नाही असे त्यांनी ठरवले) तर अमराठी लोकांना मराठी शिकावी लागून मराठीचा वापर व मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढेल. ज्याप्रमाणे मराठी न शिकून, मराठीत न बोलून अमराठी लोकांनी हिंदीचा वापर वाढवला, तसाच हिंदी न शिकून, न बोलून, मराठी लोक मराठीचा वापर वाढवू शकतील. अर्थात मराठी माणूस मराठीच्या बाबतीत अजिबात आग्रही नसतो. तो हिंदीत बोलून मोकळा होतो. पण हिंदी भाषक मात्र मराठी न बोलण्यावर जास्त ठाम असतात. त्यामुळे हे प्रत्यक्षात होणे कठिण आहे.

"त्यासाठी मातृभाषेत प्राथमिक शिक्षण दिल्यास शिक्षणाचा पाया मजबूत होतो हे सिद्ध झालेले आहे." खरे पण भारतात चित्र उलटे का दिसते? आय ए एस /आय एफ एस्/सी ई ओ/सी टी ओ ..बहुतांशी इंग्रजी माध्यमांमध्ये शि़कलेले का दिसतात्?अपवाद सांगू नका. भारतात शिकताय तर दोन भाषा पहिलीपासुन हव्यात. नाहीतर मंत्रालयापासुन बुलढाण्यापर्यंत सगळे उच्च अधिकारी उत्तरेतून आता येतात तसेच येतील. आणि आपले तरूण मग खळ्ळ खट्याक करत नाहीतर तिकीट तपासनिसाच्या नोकरीसाठी अर्ज करत बसणार.

मातृभाषेतून शिक्षण दिले म्हणजे इंग्रजीचा द्वेष केला असा उफराटा अर्थ कशासाठी काढताय? भारतात बहुतेक ठिकाणी बोलीभाषेतील शाळा काय अवस्थेत आहेत याचा विचार करा. तेथे मुळात मातृभाषेत शिकवण्यासाठी चांगले शिक्षक मिळत नाही मग इंग्रजीत उच्च विज्ञान कसं शिकवणार? यामुळेच या शाळांत हुशार विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत आणि त्यातून जे गरीब विद्यार्थी या भाषांत शिक्षण घेतात त्यांना कोचिंग क्लास परवडत नाही. यामुळे आय ए एस /आय एफ एस्/सी ई ओ/सी टी ओ असा याठिकाणी जेथे इंग्रजीचे ज्ञान जास्त आवश्यक आहे तेथे हि मुले मागे पडतात. परंतु इसरो अणुऊर्जा अशा अनेक ठिकाणी आय आय टी किंवा तत्सम संस्थांत न शिकलेली मुले उत्तम कामगिरी करताना दिसतात. बारावीच्या गुणांवर अभियांत्रिकी वैद्यकीय किंवा अशा अभ्यासक्रमांत प्रवेश द्यावा हि शिफारस यामुळेच केली जाते परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विद्ववत्तेप्रमाणे नीट आणि तत्सम परीक्षा अत्यावश्यक केल्यामुळे आता स्तहनिक भाषांतील विद्यार्थी अजूनच मागे पडताना दिसतात

इथले अनेक प्रतिसाद हे हिंदीला विरोध = मराठीवरील प्रेम या प्रकारातील आहेत .. मुळात मातृभाषा मराठी जिवंत राहण्यासाठी ती मराठी माणसांनी बोलली पाहिजे / वाचली पाहजे / लिहली पाहिजे माझं निरीक्षण असे आहे .. सध्या जे १२ ते १८ वयोगटात आहेत (नवी पिढी ) त्यातलीस ५०% लोकांना पुल थोडेसेच माहित असतात .. ऑम्लेट समोर आल्यावर ... सर्व धर्म सारखे .. ऑम्लेट ... या वाक्याचा संदर्भ त्यांना लागत नाही ... आपली पिढी या वाक्यावर का हसते हे त्यांना कळत नाही.. पुलं ची ही कथा तर वपुं च काय .. दुनियादारी चित्रपट पाहिलेला असू शकतो पण सुशी फारसे माहित नसतात बाकी जीए वगैरे खूप दूरच्या गोष्टी ... ते पाठीवर हात ठेवून नुसते लढा म्हणा .. हे WhatsApp वर फिरल्यामुळे कुसुमाग्रज माहित असतात पण नटसम्राट लिहिणारे वि वा शिरवाडकर आणि कुसुमाग्रज एकच हा अनेकांसाठी मोठा शोध असतो ... बाकी कौशल इनामदारने लाभले आम्हास भाग्य बोलवतो मराठी या कवितेला ग्लॅमर मिळवून दिल्याने सुरेश भटांचे बरे दिवस आहेत... अर्थात त्यांच्या ५ कविता सांगा पाहू असं विचारलं तर मोठं प्रश्नचिन्ह दिसेल अनेकांच्या चेहऱ्यावर उन्हाळ्यात बहावा फुलल्यावर इंदिरा बाईंचे नकळत येती ओठावरती तुला पाहता शब्द वाहवा, सोनवर्खिले झुंबर लेउन दिमाखात हा उभा बहावा हे आठवणारे किती जण आहेत .. अजून खूप लिहिता येईल ... मराठी चे वैभव जास्तीतजास्त मराठी लोकांपर्यंत पोचले तरच मराठे टिकेल / वाढेल असे वाटते.. त्या दृष्टीने वर लिहिले तसे प्रयन्त प्रत्येक मराठी प्रेमींनी करावे

In reply to by अमर विश्वास

बहावा एक सुंदर वृक्ष आहे व त्याचा फोटो सुद्धा मस्त आहे. कवयित्री प्रा.दीपाली ठाकूर अर्थात मिपाच्याच मी-दीपाली यानी खुप सुदंर याचे वर्णन केले आहे.किती सुंदर कवीता ... नकळत येती ओठावरती तुला पाहता शब्द वाहवा, सोनवर्खिले झुंबर लेउन दिमाखात हा उभा बहावा । - लोलक इवले धम्मक पिवळे दवबिंदूतुन बघ लुकलुकती, हिरवी पर्णे जणू कोंदणे साज पाचुचा तया चढवती ॥ - कधी दिसे नववधू बावरी हळद माखली तनु सावरते झुळुकीसंगे दल थरथरता डूल कानिचे जणू हालते । - युवतीच्या कमनीय कटीवर झोके घेई रम्य मेखला, की धरणीवर नक्षत्रांचा गंधर्वांनी झुला बांधला ॥ - पीतांबर नेसुनी युगंधर जणू झळकला या भूलोकी, पुन्हा एकदा पार्थासाठी गीताई तो सांगे श्लोकी । - ज्या ज्या वेळी अवघड होई ग्रीष्माचा तुज दाह सहाया, त्या त्या वेळी अवतरेन मी बहावा रुपे तुज सुखवाया ॥ - प्रा.दीपाली ठाकूर

In reply to by कर्नलतपस्वी

धन्यवाद कर्नल साहेब .. मी ही कविता इंदिरा संत यांची समजत होतो .. त्यांच्या रंगबावरी या काव्यसंग्रहात असावी बहुदा .. तुमची प्रतिक्रिया वाचल्यावर सहज गुगल सर्च केलं .. तर इंदिरा बाई आणि मिताली ताई दोघींचीही नावं आली कवयित्री म्हणून आता प्रत्यक्ष काव्यसंग्रहच पाहणे आले ...

१. मराठी कार्यक्रम बघणे. विशेषतः मराठी बाल नाटके... २. मुलांना सेमी इंग्रजी शाळेत प्रवेश मिळवून देणे... ३. मुलांना, मराठी पुस्तके आणि मासिके वाचायची सवय लावणे. ____ संस्कार टिकवायचे असतील ते पुढच्या पिढीकडे देणे, हाच उत्तम उपाय... उदा. डॉन व्हिटो कॉर्लीऑन याने, मायकेलला फॅमिली संस्कार शिकवले... ---

In reply to by मुक्त विहारि

हल्ली मासिके,वर्तमानपत्रे वाचणे हेही जवळपास बंद झाल्यात जमा आहे. हे चालवणार्यांची आर्थिक अवस्थाही नक्कीच बिकट असणार.मराठी मीडिया/चॅनेल्स चालवणार्यांवरही जबाबदारी आहे.पंतप्रधान ऐवजी प्रधानमंत्री, प्रेक्षक ऐवजी दर्शक्,कांटोकी टक्कर, अर्थमंत्री ऐवजी वित्तमंत्री.. हे चॅनेल्सवर सर्रास वापरले जातात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आधी त्या जीओ/एयरटेलवाल्यांना कोणीतरी सांगायला हवे- व्यक्ती तो नाही तर ती व्यक्ती. "आपण ज्या व्यक्तीला कॉल करत आहात तो व्यक्ती दुसर्या कॉलवर संभाषण करत आहे" हे गेले १५ वर्षे ऐकतोय आपण.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी, अगदी माई. पूर्वी मी आवर्जून चूक दाखवून द्यायचो परंतु आजकाल सर्रास आणि सर्वत्र "तो" व्यक्ती वाचायला किंवा ऐकायला मिळते त्यामुळे हॅ हॅ हॅ ... केला असेल "व्यक्ती" ने लिंग बदल असे म्हणून सोडून देतो. अवांतर : आज व्यक्तीने चक्क "माई+नाना" ह्या आयडी बरोबर सहमती दर्शवण्याची वेळ आणली.