Skip to main content

१ ली पासून हिंदीसक्ती कशासाठी? महाराष्ट्राच्या हिंदीकरणाचा डाव?

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शनिवार, 19/04/2025 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत! -महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का? - उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का? - ⁠२२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय? - ⁠हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय? - ⁠हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का? संघटनांच्या मागण्या:- १. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे. २. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल. ३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल. ४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे. ५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते. ६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे. ७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे. त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत – १. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. २. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे. ३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात. ४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात. ५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये. ६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे. ७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे. ८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.

वाचने 12197
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by सुक्या

तेव्हा माइइंचे बेअरिंग सुटत चाललय असे वाटायला लागले. पण हा प्रतिसाद पाहून माईंनी आपला आयडी आणि पासवर्ड कोणा ट्रोलरला शेअर केलाय याची खातरजमा झाली.

In reply to by अनन्त अवधुत

अरे अनंता, ज्या घरात अशा न्रुत्याचे,गाण्याचे सराव केले जात असतील त्यांना काय मराठीबद्दल जिव्हाळा असणार आहे? तो असावा अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. भारतिय नागरिकाने कोणत्या भाषेत बोलावे,कोणत्या भाषेची गाणी गावीत्,न्रूत्य करावे.. हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण लोकांसमोर हे करत आहात ते प्रतिसाद येणारच ना?केजरीवाल ह्यांची कन्या उद्या स्पॅनिशमधुन व्हिडियो बनवु लागली,सालसा नृत्य करू लागली तर आमचे अमित मालविय आणि त्यांचा कंपू ट्रोल करेलच ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई फडणवीसांच्या मुलीला मराठी येत नाही, हिंदीत बोलते, ह्यावर “तिला सांभाळणारी बाई हिंदी भाषीक आहे असे उत्तर मिळाले होते” तो व्हिडिओ युट्युबवरून गायब करण्यात आलाय.

काहीही म्हणा पण आपल्या भाषेवर आक्रमण होतं आहे. आपल्यावर अन्य भाषा लादली जात आहे , ह्या विचाराने वर लोकांचा जो जीव कळवळला आहे ते पाहून भारी वाटतंय. अगदी तसेच ... जेव्हा आपल्या धर्मावर दुसऱ्या धर्माचे आक्रमण होते, आपल्यावर अन्य धर्म , अन्य संस्कृती लादली जात आहे ह्या विचाराने सनातनी लोकांचा जीव कळवळतो. आपल्या पहिलीतील लहान मुलांच्या दप्तरात मराठी पुस्तके बाजूला सारून हिंदी पुस्तके बसवली जातात तेव्हा तुम्हाला जे दुःख होतेच अगदी तसेच जेव्हा आपली मंदिरे उध्वस्त करून तिथे बसवलेली अन्य धार्मिक स्थळे पाहून , आपल्या धर्माची पुस्तके दहन केलेली पाहून सनातनी लोकांचा जीव कळवळतो. आता वरील काही प्रतिसादात लोकांनी देवेंद्र फडणवीस ह्यांच्यावर राग व्यक्त केला आहे. हेच जर कोणी फडणवीसांना " महात्मा" ही पदवी दिली तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल की नाही !! अगदी सेम टू सेम तसेच , सनातनी लोकांचा जीवाचा जळफळाट होतो जेव्हा देव देश अन् धर्माची हानी केलेल्या लोकांना "महात्मा" ही पदवी लावली जाते. जी अस्मिता तुम्हाला भाषेबद्दल वाटत आहे तीच सनातनी लोकांना देव देश अन् धर्माबाबत बाबत वाटत आहे. I hope you can understand each other better now. H - महात्मा प्रसाद गोडबोले=))))

In reply to by प्रसाद गोडबोले

या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सरमिसळ नको. धाग्याचा विषय हिंदीची अनावश्यक सक्ती हा आहे. हिंदीचे व्यावहारिक लाभ, जागतिक पातळीवरील स्वीकारार्हता इंग्लिशच्या तुलनेत अत्यल्प आहेत. हिंदीत प्राविण्य मिळवून हिंदी राज्यात साधारण नोकरी मिळू शकेल. परंतु इंग्लिशमध्ये प्राविण्य असल्यास अनेक देशात, उच्चभ्रू स्वरूपाच्या नोकरीत संधी मिळू शकते. एकतर तीन भाषा शिकण्याची सक्तीच नको. तिसरी भाषा सक्तीने शिकवायची असेल ज्या भाषांचा ज्ञानग्रहणासाठी व व्यावहारिक उपयोग सर्वाधिक आहे त्याच भाषा शिकायला हव्या. या दोन्ही मुद्द्यांवर हिंदी निरूपयोगी आहे. अजून एक मुद्दा म्हणजे हिंदी अजिबात न शिकताही समान लिपी, समान व्याकरण, समान वाक्यरचना व अनेक समानार्थी शब्दांमुळे हिंदी समजण्यासाठी मराठी येणाऱ्यांना अत्यल्प प्रयत्न करावे लागतात. हिंदी अजिबात न शिकलेल्या वयातही हिंदी चित्रपट समजत होते. देफने स्वतःच्या मुलीला हिंदी माध्यमाच्या शाळेत न शिकवितख इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकविले होते. परदेशात गेल्यानंतर हे हिंदीत न बोलता इंग्लिशमध्ये संवाद साधतात. तरीही शहाजोगपणे विचारतात की आपल्याला देशी हिंदीपेक्षा विदेशी इंग्लिशसाठी आत्मीयता का वाटते? आपल्या राष्ट्रीय राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी हे मराठी माणसांचा बळी देताहेत. लिपी समानतेमुळे मराठी मुलांना हिंदी शिकणे सोपे जाईल हा दावा असेल तर तिसरी भाषा दॉईच, डच, फ्रेंच यापैकी शिकवा ज्यांची व इंग्लीशची लिपी समान आहे व ज्यांचा व्यावहारिक उपयोग हिंदीपेक्षा खूप जास्त आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सरमिसळ नाहीच. राममंदिर, मंदिर पुनर्संपादन आणि जीर्णोद्धार, वगैरे सर्वच बाबतीत हिंदू द्वेषी भूमिका घेणाऱ्या फुरोगामी मराठी माणसाच्या बाजूला उभे राहण्यापेक्षा सनातनी हिंदी भाषिक मला "दगडापेक्षा वीट मऊ " वाटतात. तुम्हीही मराठी मराठी म्हणून ज्यांच्या बाजूला उभे रहात आहात हे लोकं - सावरकरांना माफीवीर म्हणणारे आहेत. नाशिकच्या साहित्य संमेलनात सावरकरांचे नामोनिशाण पुसून टाकणारे लोकं आहेत हे. ज्ञानेश्वरांना धूर्त चलाख देशस्थ ज्ञानोबा म्हणणारे लोक आहेत हे. रामदासांना हे लोकं काय बोलतात हे लोकं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. लिस्ट खूप मोठ्ठी आहे. अहो , एवढं लांब चे कशाला, पंतप्रधानांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून मराठी साहित्य संमेलनासाठी मोजका वेळ काढून दिला , तर त्याचा अर्थ " मला जास्त बोलायचं नाही असा दम देण्यात आलेला आहे." असा काढणारे महाभाग आहेत हे लोकं. नुसती भाषा एक असून काय उपयोग, वृत्ती एक असली पाहिजे. कर्वे गोखले आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लढलेल्या एसएम जोशी, श्रीपाद डांगे, सीडी देशमुख, प्र के अत्रे ह्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासातून आणि सार्वजनिक इतिहासातून कशी पुसली गेली आहेत हे पहा. ह्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे . ज्यांना शिकायचे ते शिकले आहेत ! असो.

In reply to by प्रसाद गोडबोले

पुन्हा एकदा सरमिसळ झाली. ब्राह्मणद्वेष अनेक शतकांपासून आहे व पुढेही राहील. ब्राह्मणद्वेष सर्वभाषिक करतात. त्यात रामस्वामी नायकर होता, काशीराम होता, कांचा इलैय्या आहे, आव्हाड आहे, पार्थ पोळके आहे, कोकाटे आहे, खेडेकर आहे, देफ सुद्धा आहे, महाराष्ट्रातील अनेक तथाकथित समाजसुधारक होते, अनेक राज्यातील अनेक जण सापडतील. सांप्रत मुद्दा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा आहे. मराठीला ठार मारण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी करू देत वा निधर्मांध करू देत वा परप्रांतीय करू देत वा मराठी माणसे करू देत, मी विरोधच करणार. मराठीचा बळी देऊन उभारलेले हिंदुराष्ट्र मला नको.

In reply to by श्रीगुरुजी

ह्यात सरमिसळ नाहीच आहे. मी तुमची गाठभेट सावरकरांना "संडासवीर " म्हणणाऱ्या काही जाज्वल्य मराठी प्रेमी लोकांशी घालून देतो, त्यांना तुम्ही सावरकरांचे मराठी भाषेतील योगदान, सावरकरांच्या कविता, नाटके, महाकाव्ये ह्यांचे महत्व पटवून दाखवा . घेता का चॅलेंज ? लावता का 100 रुपयाची पैज ?

In reply to by प्रसाद गोडबोले

हिंदीची सक्ती केल्याने हे सावरकरांचे कौतुक करणे सुरू करतील? हिंदी महाराष्ट्रातून हद्दपार केली तर हे सावरकरांचे कौतुक करणे सुरू करतील? ज्यांनी आयुष्यभर फक्त सावरकरद्वेष केला ते कोणत्याही परिस्थितीत द्वेषच करीत राहतील. त्यामुळे तो मुद्दाच नाही येथे. मूळ मुद्दा विनाकारण पहिलीपासून हिंदी लादणे हा आहे व त्यामुळे मराठीची मृत्यूघंटा वाजली आहे आणि त्या विरोधात सर्व मराठी माणसांनी आवाज उठवायला हवा. सावरकरद्वेष, ब्राह्मणद्वेष, हिंदुराष्ट्र हे सर्वस्वी वेगळे मुद्दे आहेत व त्या मुद्द्यांची हिंदी सक्ती या मुद्द्याबरोबर सरमिसळ नको.

In reply to by श्रीगुरुजी

सरमिसळ नाहीये हो. तुम्ही मुद्दा लक्षात घेत नाहीये. जेव्हा पाकिस्तान मधून बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा त्यांचा धर्म विचारधारा एकच होती, ह्यांची बंगाली अस्मिता म्हणून आपल्या देशातील बंगाली काफिरानी त्यांना सहानुभूती दाखविली. आता बांगलादेश ला दात आलेत तर कसे लगेच काफिरांना पळता भुई थोडी केली आहे पहा =)))) हेच तुम्ही करत आहात. तुम्ही मराठी मराठी म्हणून ज्यांच्या सोबत जाऊन उभे रहात आहात ना ते लोकं एक ना एक दिवस तुम्हाला "तुमची जागा " दाखवल्या शिवाय राहणार नाहीत बघा. आम्ही निरीक्षण आणि अनुमानातून धडा घेतो , तुम्ही अनुभवातून शिका. असो. आता मी काही बोलत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मराठीची मृत्यूघंटा वाजली आहे असे गेली कित्येक दशके कानावर पडते आहे. या समस्येमागचे मूळ कारण काही वेगळेच असावे. त्रिभाषा धोरण हा काल परवाचा विषय आहे. हे धोरण रद्द केले तरी मूळ समस्या तशीच राहणार आहे. असो.

In reply to by श्रीगुरुजी

मराठीचा बळी देऊन उभारलेले हिंदुराष्ट्र मला नको> गुरुजी, ही खरी आईच्या उपकारांची जाण ठेवणं. आपल्या सहप्रवाशांमध्येही इतकी जाज्वल्य निष्ठा निर्माण व्हावी, ही प्रार्थना.

मी सातत्याने हिंदीत बोललो तर हिंदीभाषिक राज्यात माझी स्वीकारार्हता वाढेल, त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात माझा प्रवेश सुलभ होईल, महाराष्ट्रातील हिंदीभाषिक मलाच मत देतील, मोदी-शहांची माझ्यावर मर्जी राहील, भविष्यात मी पंतप्रधान होईन व मराठी माणसांना हिंदुराष्ट्राच्या स्वप्नात गुंगवून त्यांचा हिंदीविरोध मोडून काढता येईल आणि आपल्या होणाऱ्या नुकसानाची त्यांना जाणीव होणार नाही . . . ही सर्व आकडेमोड करून व गणित करून हा अत्यंत स्वार्थी, संतापजनक व महाराष्ट्रघातकी निर्णय घेतलाय.

पहिले दोन वर्षं ओडिओ कोर्स करून घ्यावा नवीन भाषेचा आणि नंतर लेखन वाचनाला सुरुवात करावी. यूट्यूबवर आहेत विडिओ. काही साइट्सवर ओडिओसुद्धा आहेत.

मुळात समान लिपी व भाषा साधर्म्यामुळे मराठी विद्यार्थिनींंना/विद्यार्थ्यांना अजिबात न शिकताही हिंदी समजू शकते. असे असताना अभ्यासक्रमात हिंदी हा एक सक्तीचा विषय करून त्यांचा वेळ व श्रम वाया जाणार आहेत. त्याऐवजी मराठी व इंग्लिश या दोधच भाषा सक्तीच्या करून संगणक, एखादी कला, एखादे वाद्य, गायन, एखादा खेळ शिकविल्यास खरा लाभ होईल. हिंदी शिकून कोणताही व्यावहारिक लाभ नाही. सर्वात वाईट म्हणजे महाराष्ट्रात आलेले कोणीही मराठी बोलणार नाहीत. आजच एका विमा प्रतिनिधीने संपर्क केला. तिने प्रारंभ हिंदीतून केला. मला हिंदी येत नाही असे सांगितल्यानंतर तिने बऱ्यापैकी मराठीत बोलून माहिती दिली. पहिलीपासून हिंदी शिकविली तर मराठीची गरजच भासणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

पहिलीपासून हिंदी शिकविली तर मराठीची गरजच भासणार नाही.
एकदम बरोबर.हिंदी ही मराठीला पर्याय म्हणून वापरली जातेय.आत्ताच थांबवा नाहीतर फक्त हि़दीतच संभाषणाची अघोषित मक्तेदारी वाढेल.

In reply to by Bhakti

हिंदीभाषिक राज्ये, तामिळनाडू या राज्यात दोनच भाषा शिकाव्या लागतात. हिंदीभाषिक राज्यात तीन भाषा का अभ्यासक्रमात सक्तीच्या नाहीत? हिंदी न शिकविताही तामिळनाडू इतर राज्यांच्या तुलनेत प्रगत आहे. हिंदी न शिकल्याने त्या राज्याच्या प्रगतीत कोणतेही अडथळे आले नाही. मग महाराष्ट्रालाच तीन भाषा (त्यातील एक हिंदी) सक्तीने लादण्याचा दुराग्रह का? सर्वानाच हिंदी आले तर मराठी बोलण्याची गरजच काय? हिंदीभाषिक राज्यात तुम्ही गेला तर तेथे मराठी येत नसल्याने व तुम्हाला हिंदी येत असल्याने संभाषण हिंदीत होणार आणि ते जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना मराठी येत नसल्याने व दोघांनाही हिंदी येत असल्याने संभाषण हिंदीतच होणार. मग मराठी शिकायचीच का? हिंदी शिकली नाही तरी राज्याच्या प्रगतीत बाधा येत नाही. उलट हिंदी राज्यभाषा असलेली राज्ये अजून बरीच मागे आहेत. विनाकारण हिंदी हा निरूपयोगी विषय शिकण्यात, परीक्षा देण्यात, अभ्यास करण्यात वेळ व्यर्थ घालविण्यापेक्षा हाच वेळ एखादी कला, कौशल्य, क्रीडाप्रकार, दॉइच/फ्रेंच/डच/जपानी अश्यासारखी व्यावहारिक लाभ असलेली भाषा शिकण्यात हा वेळ वापरायला हवा.

आगोदरच मराठीचे हिंदीकरण होतच आहे, उदाहरणादखल जसे पंतप्रधानांना "प्रधानमंत्री" म्हणणे (गेल्या काही वर्षांतले राजकारण्यांचे व्हिडीओज् पाहिल्यास लक्षात येईल). मराठी बातमीदारांचे विशेष वाईट झाले आहे : निवडणूक निकालांवेळी वेळा "चुरशीची लढत" ऐवजी "कांटे की टक्कर" ऐकायला मिळतं इतरही अनेक उदाहरणे आहेत. असो, या असल्या भिकार निर्णयामुळे आपण पायावर धोंडा मारुन घेत आहोत.

In reply to by बेन१०

घर "खाली" करायला सांगितलंय, त्यांनी असा "सवाल" केलाय हे तर सातत्याने कानावर पडतंय. महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शनिपार चौकात फलक घेऊन आंदोलन केले तेव्हा "*** तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है", "*** तुम संघर्ष करो", "सरकार हमसे डरती है" अश्या घोषणा फलकांवर होत्या.

In reply to by बेन१०

उदाहरणादखल जसे पंतप्रधानांना "प्रधानमंत्री" म्हणणे त्याच बरोबर अतिरेक्यांना आतंकवादी असे म्हणणे. दुसरा चीड आणणारा वाक्यप्रयोग म्हणजे मला त्याचा गर्व आहे हा.अभिमान च्या जागी सर्रास गर्व हा शब्द वापरला जातो. त्याला मदत कर असे योग्य वाक्य आहे आणि हिंदीकरणामुळे त्याची मदत कर असे बदलले जाते. आता तर माझाही गोंधळ उडतो कि नक्की कुठला वाक्यप्रयोग बरोबर आहे. सुमार मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये अशी भेसळ फार प्रमाणात दिसुन येते आहे. आपली पिढी प्रथम भाषा मराठी असल्याने काही प्रमाणात तरी ह्या बाबती जागरुक आहे पण नंतरच्या पिढीची मराठी ही फक्त घरापुरती बोलली जाणारी भाषा (जर पालक आंग्लाळलेले नसतील तर ) उरल्याने असेच प्रकार कालांतराने रुळले जातील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

या मुद्द्यावर महाराष्ट्रातले सर्व प्रादेशिक पक्ष, सर्व प्रादेशिक नेते भाजपइतकेच भिकारचोट आहेत. कोणीही अपवाद नाही.

आदित्य उद्धव ठाकरे Bombay Scottish School या मराठी माध्यमाच्या प्रख्यात शाळेत शिकलेले आहेत. हे वाचून उर अभिमानाने भरून आला. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे कुठल्या शाळेत शिकले आहेत कोणास ठाऊक आहे का ? कळले तर उरलेला ऊर भरून घ्यायला किंवा बडवायला मदत होईल

In reply to by मारवा

राज ठाकरे ह्यांची मुले बाँबे स्कॉटिशमधेच शिकली आहेत. आपली वस्ताद मीडिया/वर्तमानपत्रे अशी खाजगी नाहिती देत नाहीत पण ती अमराठी मीडियात येतेच. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/now-miscreants-target-t… एकदा ह्यांच्या काकांना 'मराठीचा मुद्दा का घेतलात?" असा प्रश्न विचारल्यावर "तरूणांना सतत कोणता ना कोणता मुद्दा द्यावा लागतो. त्यांना सतत भडकावत ठेवणे गरजेचे असते" असे उत्तर दिले होते. १२ कोटी लोकांना त्यांची भाषा सांभाळण्यासाठी राजकीय पुढार्याची गरज लागते हेच आधी लज्जास्पद आहे. तसेच "तू माझी मात्रुभाषा का शिकत नाहीस?" असे विचारणे म्हणजे मातृभाषेचाच अपमान आहे असे वाटते. "मला अण्णा ऐवजी अण्णासाहेब का म्हणत नाहीस?" विचारण्यासारखे आहे.

१७९५ साली मराठा साम्राज्यातील सर्व सरदारांनी मिळून खर्डा येथे निजामाचा पराभव केला. तेव्हा दिल्लीवर मराठ्यांचा जरीपटका फडकत होता. राजपुताना मराठ्यांच्या अंकित होता. गुजरातपासून ओरिसापर्यंत भारताच्या निम्म्याहून अधिक भागावर मराठ्यांची सत्ता होती. तेव्हा जर कुणी एखाद्या मराठी माणसाला सांगितले असते की केवळ पंचवीस वर्षांच्या आत तुमचे साम्राज्य लयाला जाऊन तुमच्या पेशव्याला इंग्रज महाराष्ट्राबाहेर हाकलून देतील तर तो खो खो हसला असता. परंतु अत्यंत नादान मराठी राज्यकर्त्यांमुळे हे प्रत्यक्ष घडले. आज मराठीची स्थिती मुळातच बिकट आहे. उत्तर प्रदेशातल्या खेडेगावातील माणसाला पुण्यातल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा बँकेत संपूर्णपणे त्याच्या भाषेत सेवा मिळते. तो हिंदीत बोलतो आणि त्याला कुणाला हिंदीत बोल म्हणून सांगावे लागत नाही. पण तेच देहूचा एखादा मराठी माणूस त्याच हॉस्पिटलात/बँकेत गेला तर त्याला संपूर्ण सेवा मराठीत मिळत नाही. मराठीची मागणी केल्यावर काही सेवा मिळू शकतात पण काही पदांवरचे कर्मचारी मराठी बोलू शकत नाहीत. त्यांच्याशी हिंदीतच बोलावे लागते. नुकतेच मुंबईतल्या एरटेल आणि बिग बाजार ह्या दुकानातल्या कर्मचाऱ्यांचे - "मला मराठी येत नाही. तू माझ्याशी हिंदीत बोल" असे मराठी ग्राहकांना दरडावणारे विडिओ आले होते. मुंबई रेल्वे स्टेशनवर एका उत्तर भारतीय टी सी ने मराठी जोडप्याला detain करून "मी पुन्हा कधी मराठीमध्ये सेवा मागणार नाही. असे जबरदस्तीने लिहून घेतले होते". पूर्वी सरकारी बँकांमध्ये कर्मचाऱ्यांना त्या त्या राज्यातली भाषा बोलता आली पाहिजे असा नियम होता. २०१४ साली मोदी सरकारने तो रद्द केला. मी स्वतः ठाण्यातल्या बँकेत मराठीत सेवा मागितली तर तिथल्या मराठी मॅनेजरने मला सांगीतले की त्यांना त्यांच्या स्टाफला मराठी बोलायला उद्युक्त करणे शक्य नाही. त्यांच्या परफॉर्मन्स appraisal मध्ये मराठी हा मुद्दाच नाही. पण हिंदीचा वापर आणि प्राविण्य हे मुद्दे आहेत. मराठी आलं नाही तर शहरी महाराष्ट्रात अजिबात अडत नाही. पण हिंदी आलं नाही तर पदोपदी अडतं. हे लोण आता कोकण आणि ग्रामीण महाराष्ट्रात सुद्धा पोहोचले आहे. आज कित्येक मराठी भाषक घरातल्या मुलांनासुद्धा मराठी येत नाही. मध्यन्तरी मुंबईतल्या गुणरत्न सदावर्ते ह्या मराठी पत्रकाराच्या मुलीची विडिओ क्लिप पहिली. तिला मराठी येत नव्हते पण हिंदी व्यवस्थित बोलत होती. सुप्रिया कर्णिक ह्या अभिनेत्रींच्या बहिणीच्या मुलीने एका मराठी मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी आपल्या मावशीबद्दल एका मिनिटाची क्लिप दिली - हिंदी मध्ये, कारण मुंबईत राहून सुद्धा ह्या मराठी मुलीला मराठी बोलता येत नाही. मी स्वतः ठाण्यातल्या नाट्यगृहात एका मध्यमवर्गीय मराठी जोडप्याला त्यांच्या १०-१२ वर्षांच्या मुलाला मराठी नाटक हिंदीतून समजावताना पहिले आहे, कारण शाळेत आणि बाहेर तो हिंदीत बोलतो, आई वडिलांना सुद्धा हिंदी येते, म्हणून तो घरी सुद्धा हिंदीच बोलतो. आता सार्वजनिक जीवनात बोलायची default भाषा हिंदी झालेली आहे. मराठीत बोलले तर कित्येक जण भूत पहिल्यासारखा चेहरा करतात. महाराष्ट्रात "मला मराठी येत नाही" हे विनातक्रार स्वीकारले जाते. पण "मला हिंदी येत नाही" म्हटले की भुवया चढतात. "त्याला मराठी येत नाही. त्याच्याशी हिंदीत बोल" असे आपले मराठी लोकच बोलतात. पण "त्याला हिंदी येत नाही, त्याचाशी मराठीत बोल" असे कुणी बोलत नाही. उच्चभ्रु वर्गातील मुले CBSE च्या शाळेत जातात. तिथे मुळातच मराठी नाही. परंतु हिंदी सक्तीची आहे. राज्य सरकारच्या शाळांमध्ये पाचवी पासून मराठी सक्तीची आहे, पण ती फक्त ग्रेड साठी. हिंदी मात्र सक्तीची आहे. त्यातून कित्येक शाळा एक लाखरुपयांचा दंड तोंडावर फेकून शाळेत मराठी शिकवत नाहीत. आतासुद्धा फडणवीसांनी टाकलेली गुगली जास्त लोकांच्या लक्षात आलेली नाही. मुळात पहिलीपासून तिसरी भाषा लादणे हेच चूक आहे. हिंदी सक्तीवर लक्ष विचलित करून. तिसरी भाषा गळ्यात मारली. आता हिंदी सक्तीची न करता कुठलीही भाषा घेण्याचा पर्याय देणार आहेत. म्हणजे बहुतांशी विरोध थंडावेल. पण प्रॅक्टिकली तिसरी भाषा शिकवायचीच झाली तर बहुतेक शाळांमध्ये हिंदीच शिकवली जाईल. इतर भाषा शिकवण्याची व्यवस्था करणे कठिण आहे. पालकसुद्धा म्हणतील की इतक्या लहान वयात अगदी परकी भाषा शिकवण्यापेक्षा आजुबाजुला कानावर पडणारी, आणि शिक्षकांना सुद्धा येणारी हिंदीच बरी. त्यामुळे मराठी लोकांना गंडवून हिंदीकरणाचा हा डाव यशस्वी झालेला आहे. परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रावर आदळत असताना त्यांना मराठी शिकवण्यासाठी दळभद्री राज्यकर्त्यांनी (सर्वपक्षीय) काहीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे "मराठी येत नाही" म्हटलं की त्यांचं काम झालं. "येत नाही तर ही इथे शिका", असं म्हणून त्यांच्या तोंडावर मारण्यासाठी एक सुलभ हिंदी-मराठी पुस्तिका, किंवा YouTube चॅनेल किंवा स्मार्टफोन अप्लिकेशन, किंवा दूरदर्शन कार्यक्रम शासनाने निर्माण केले नाही, की त्याचा प्रसार केला नाही. तसेच बँका, दुकाने, रेस्टॉरंट्स वगैरे मध्ये मराठीत सेवा देणे बंधनकारक करण्याचा नियम केला नाही. हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. मुळात कुठल्याच पक्षाची महाराष्ट्राचे मराठी भाषकत्व टिकवण्याची इच्छाशक्ती नाही. संघ/भाजप ह्यांची तर एक देश एक भाषा ही उघड घोषणा आहे. जर राज्यकर्तेच मराठी नष्ट करून पद्धतशीरपणे हिंदी लादत असतील तर मराठी भाषा museum मध्ये जाणे हे भागधेयच आहे. इथून पुढची पायरी म्हणजे हिंदी ही महाराष्ट्राची दुसरी अधिकृत भाषा केली जाईल. "मराठी आहेच. मराठीला धक्का लागू दिला जाणार नाही" वगैरे धूळफेक केली जाईल. त्यानंतर सर्व सरकारी आणि सार्वजनिक व्यवहार हिंदीतच होतील. तोंडदेखले सुद्धा मराठी उरणार नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात तामिळ संघ, बंगाली असोशिएशन वगैरे त्यांचे कार्यक्रम करतात, तसे मराठी लोक आपापसात मराठी कार्यक्रम करतील - तेही पुढच्या पिढीतले कमीच. कालांतराने जशी हरियाणा, राजस्थान वगैरे हिंदी भाषक राज्ये झाली तसे महाराष्ट्रसुद्धा होईल. आज जे पन्नाशीच्या आत आहेत त्यांना हे याचि देहि याचि डोळा बघण्याचे नशिबी आहे. - अजबराव (माबो वरील एक प्रतिक्रिया)