Skip to main content

युक्रेन युद्ध - आढावा

लेखक साहना यांनी मंगळवार, 12/04/2022 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी २४ ला रशियाने युक्रेन वर आक्रमण केले. ह्याआधी आपण आक्रमण करणार नाही, अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा उगाच कांगावा करत आहे इत्यादी घोषणा रशियाने केली होती. जर्मनीची भूमिका नाकबूलीची होती तर फ्रेंच यंत्रणेने आक्रमणाची शक्यता नाही असे गृहीत धरले होते. इंग्लंड आणि अमेरिका मात्र आक्रमण होणार ह्या भाकितांवर ठाम होते. शेवटी आक्रमण झालेच. आक्रमणाचा राजकीय उद्द्येश काय होता हे स्पष्ट नव्हते. पुतीन ह्यांनी आपल्या भाषणात डी नाझींफिकेशन वगैरे गुळमुळीत पण व्यापक असे धोरण सांगितले होते. यूक्रेन आणि त्यांचे नेते झेलेन्स्की ह्यांनी मात्र सर्व भाकिते फोल ठरवली. झेलेन्स्की ह्यांनी देश सोडून जाण्यास नकार तर दिलाच पण वरून रशियन आक्रमणाला आपण सामोरे जाणार असे सांगितले आणि अत्यंत प्रभावी पणे आपल्या सैन्याचे नेतृत्व सुद्धा केले. कमकुवत झालेली nato, अफगाण मधील धुळधाणीने मरगळ आलेली अमेरिकन यंत्रणा अचानक अचानक पूर्णपणे गॅल्वनाइझ झाली. युक्रेन चा पाडाव काही दिवसांत होईल अशी भाकिते वर्तवणारे लोक अचानक युक्रेन ची स्तुती सुमने गाऊ लागले. एकूण रशियन सैन्य का कागदी वाघ आहे, सैन्य अत्यंत बेशिस्त, बेजबाबरदार आणि लढण्यास अनुत्सुक आहे असे दिसून आले. इतर सर्व रशियन युद्धे आणि ह्या युद्धांत एक महत्वाचा फरक होता तो म्हणजे ह्या आक्रमणा साठी एक नेता असा नव्हता. विविध भागांतील कमांडर आपल्या पद्धतीने विविध मोर्च्यावरून आक्रमण करत होते त्यामुळे त्यांच्यात समन्वय नव्हता असे दिसून आले. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे हे आक्रमण अत्यंत गुप्त ठेवण्याची पुतीन ह्यांची धडपड. आता एप्रिल १० ला रशियाने सर्व आक्रमणासाठी एक कमांडर नियुक्त केला आहे. आक्रमणाचा प्रमुख भाग म्हणजे राजधानी कीव ताब्यात घेण्याचा हल्ला होता. आता उपलब्ध माहितीनुसार हा हल्ला नाकी कसा होणार ह्याची इत्यंभूत माहिती अमेरिकन गुप्तहेर यंत्रणेला होती आणि त्यामुळे होस्टमेल वर जेंव्हा रशियाने अत्यंत वेगाने हल्ला केला तेंव्हा त्यांना तोंड देण्यासाठी युक्रेनी सैन्य तयार होते. साधारण ८० हेलिकॉप्टर्स ह्या हल्यांत भाग घेत होती आणि त्यातील अनेक पाडली गेली. होस्टमल घेणे रशियाची कदाचित सर्वांत महत्वाची खेळी होती. पहिल्या दिवसाच्या हल्ल्यानंतर पुढील अनेक दिवस रशियाने आपले सर्वांत चांगले सैनिक हा विमानतळ घेण्यासाठी पाठविले. काही काळ हा तळ त्यांच्या ताब्यांत असला तरी तिथे मोठ्या प्रमाणावर सैन्य उतरवणे त्यांना शक्य झाले नाही. त्वरित वेगाने किंवा घेणे शक्य झाले नसले तरी कीव ला घेरणे हा त्यांचा पुढचा भाग होता. त्यामुळे आता उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रशियन सैन्याने इथे तळ ठोकण्याची जय्यत तयारी केली होती. मारिओपॉल, खारकीव इत्यादी शहरे ताब्यांत येताच. तिथून रसद पाठवून क्यिव ला संपूर्ण पणे घेरणे हा त्यांचा प्लॅन होता. पण खेरसंन, खारकीव मारिओपॉल ह्यांच्यावर १००% ताबा मिळवणे रशियन सैन्याला खूप जड झाले आणि ह्या दरम्यान रसद आणि इंधन घेऊन येणारे शेकडो ट्रक वाटेवरच अडकून पडले. त्याचमुळे क्यिव च्या युद्धात निर्विवाद पणे युक्रेनी सैन्याने रशियन सैन्याला पूर्ण मात दिली. आणि म्हणूनच रशियन सैन्याने इथून माघार घेतली. किमान ५-८ हजार सैनिक ह्या मोहिमेत मारले गेले असा कयास आहे. माघार घेताना रशियन सैन्याने अत्यंत अमानुषपणे असंख्य निर्दोष नागरिकांना ठार मारले (बुचा मधील शिरकाण). युक्रेनी सैनिकांनी सुद्धा शरण आलेल्या रशियन सैनिकांना गोळ्या घालून ठार मारले. दोन्ही बाजूनी आपल्या गुन्हेगारी सैनिकांना शिक्षा द्यावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाने केली आहे. एका रशियन सैनिकाने तर थेट एका लहानग्या मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ करून टेलिग्राम वर शेयर केला. आणि वरून ह्या प्रकारची खिल्ली उडवली. विविध लोकांनी तात्काय ह्या सैनिकाचा नाव पत्ता सर्व शोधून सार्वजनिक केला. रशियन सैन्य अश्या सैनिकाला तात्काळ शिक्षा करेल हि किमान अपेक्षा आपण ठेवू शकतो. क्यिव मधील पराभवानंतर रशियन माध्यमांनी सुद्धा ह्या विषयावर आपला सूर बदलला. पिस्कोव्ह ह्या पुतीन ह्यांच्या प्रवक्त्याने स्काय न्यूज ह्या ब्रिटिश वृत्त संस्थेला जी मुलाखत दिली त्यांत त्यांनी रशियन सैन्याचे प्रचंड नुकसान झाले आहे अशी कबुली दिली. (tragic loss, substantial casualties). रशियन टीव्ही अजून पर्यंत "स्पेशल ऑपरेशन चे यश" अश्या मथळ्याखाली सर्व बातम्या देत होत्या. ते बदलून त्या जागी आता "युक्रेन मधील स्पेशल ऑपरेशन ची सद्यस्थिती" असा मथळा बदलला आहे. पण क्यिव मधील पराभवाने रशियन सैन्याचे उद्धेश बदलले आहेत. आता कीव चा नाद सोडून रशियन सैन्य डोंबास, समुद्रतट इत्यादी भागांत लक्ष केंद्रित करत आहे. इथे त्यांना आपल्या सैन्याला रसद पुरवणे थोडे सोपे पडत आहे. पण तरी सुद्धा पाश्चात्य माध्यमांच्या माहिती प्रमाणे इथे सुद्धा रसद हि प्रमुख समस्या रशियन सैन्याला भेडसावत आहे. पुतीन ह्यांनी ह्या नामुष्की नंतर बरेच बदल केले आहेत. त्यांच्या गुप्तचर यंत्रणेचे काही प्रमुख नजरकैदेंत आहे. काही जनरल्स ना काढून टाकण्यात आले आहे तर आपल्या माजी सल्लागारांना त्यांनी कोठडीत टाकले आहे. शोइगु आणि गरसिमोव हे दोन्ही पुतीन चे जनरल बरेच चर्चेत होते. अचानक शोईगु गायब झाले आणि उलट सुलट चारचा सुरु झाल्या. त्यानंतर शोइगु ह्यांना हृदयविकाराचा झटका आला म्हणून ते गायब झाले होते असे सांगण्यात आले. आता बरेच दिवस झाले गरसिमोव गायब आहेत. FSB च्या किमान १०० अधिकाऱ्यांना पुतीन ह्यांनी आज कामावरून काढले. किमान एकाला तुरुंगात पाठवले आहे. युद्धाची पुढील फेरी : पुढील युद्ध बराच काळ लांबणार आहे. आज नाटो कमांडर्स नि हे युद्ध बराच काळ चालत राहील म्हणून आता आपली जुनी ट्रीपवायर नीती बदलून रशियन सीमेलगत जास्त सैन्य ठेवायचा निर्णय घेतला आहे. एकूण १ लक्ष अमेरिकन सैनिक आता युरोप मध्ये आहेत. युक्रेन मध्ये विविध देशांतून आलेली शस्त्रास्त्रे अक्षरशहा ओतत आहेत. मी सुद्धा खाजगी प्रमाणावर युक्रेन मध्ये शस्त्रात्रे, शरीर कवच इत्यादी पाठविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मदत केली आहे. युक्रेन ला निशस्त्र करण्याच्या ह्या युद्धाची परिणीती म्हणून आज युक्रेन जगांतील सर्वांत जास्त शस्त्रे असलेला देश बनला असू शकतो. त्याशिवाय पोलंड वगैरेंत फार कमी सैन्य असणाऱ्या नाटोने अचानक तिथे जास्त सैन्य वाढविल्याने. नाटो ची भीती रशियेसाठी आणखी वाढली आहे. फिनलॅंड आणि स्वीडन दोघांनीही आता मोक्याचा फायदा घेत नाटो साठी अर्ज केला आहे आणि ह्या वर्षीच तो मंजूर होईल अशी आशा व्यक्त केली. आता पुढील युद्धांत युक्रेन चा जास्तीत जास्त भाग पादाक्रांत करायचा आणि त्याला वापरून वाटाघाटी करून युद्ध संपवायचे अशी एंडगेम रशियाची असेल. क्यिव चा वेढा सुरु असताना रशियाने झेलेन्स्की ह्यांना वाटाघाटी नको आहेत असा आरोप केला होता. झेलेन्स्की ह्यांना वाटाघाटी नकोच होत्या कारण क्यिव चा वेढा जास्त काळ टिकणार नाही हे त्यांना पुरेपूर ठाऊक होते. आता वाटाघाटी थोड्या जास्त प्रॅक्टिकल असतील. पुढील काही आठवड्यांत युद्ध कसे संपेल हे जास्त स्पष्ट होत जाईल. रशियन सैनिकांचे बरेच नुकसान झाले आहे. रशियन सैन्य BTG च्या तुकड्यांत काम करते. Battalion tactical group म्हणजे साधारण ६००-८०० सैनिकांची एक तुकडी असते. हि तुकडी म्हणजे combined-arms पद्धतीची तुकडी असते. ह्यांत हल्ला किमान दोन आर्म्स कडून होतो. एका बाजूकडून होणाऱ्या हल्ल्याला तोंड द्यायचे असेल तर जे बचावात्मक धोरण राबवावे लागेल त्या धोरणाने दुसऱ्या आर्म्स चा हल्ल्याचा प्रभावी पणा वाढतो. म्हणजे पायदळाने हल्ला केल्यास शत्रू कदाचित आपल्या सुरक्षित स्थानात गोळा होतो, मग सर्व शत्रू घोळक्यांत एका जागी आले कि त्यांच्यावर क्षेपणास्त्र किंवा विमान हल्ला केला जाऊ शकतो. इत्यादी. BTG मध्ये विविध प्रकारचे सैनिक असतात, तोफा, पायदळ, रणगाडे, आकाशी हल्ला, अभियंते, इत्यादी इत्यादी. एखाद्या BTG मधील साधारण ३०% सैनिक आणि हत्यारे नष्ट झाली तर संपूर्ण BTG निरुपयोगी ठरते. त्यांना मग इतर BTG मध्य पाठवले जाते. रशियन सैन्याचे अधिकारी शोइगु ह्यांच्या मते रशियाकडे एकूण १८० BTG आहेत. ह्यातील साधारण १३० BTG युक्रेन वरील आक्रमणात कार्यरत होत्या/आहेत. युक्रेनी सैन्याच्या मते किमान २० BTG पूर्णतः नष्ट झाल्या असून साधारण ४० BTG ची आक्रमक क्षमता नष्ट झाली आहे. युद्धकाळांत दोन्ही बाजू अतिशयोक्ती करतात हे गृहीत धरले तरी इकॉनॉमिस्ट चे शशांक जोशी ह्यांनी गोळा केल्या माहितीवरून सध्या रशियाच्या एकूण ९० BTG कार्यरत आहेत ह्याचा तर साधारण ३०-४० BTG युद्धसज्ज नाहीत (ह्याचा अर्थ ते नष्ट झाले असा होत नाही). संपूर्ण दक्षिण युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी ह्या पुरेश्या नाहीत. त्यामुळे रशियाने विविध ठिकाणहून आणखीन सैनिक मागवले आहेत. ह्यांत मध्यपूर्वेतील त्यांचे सैनिक तसेच इतर भाडोत्री सैनिक ह्यांचा समावेश आहे. त्याशिवाय रशिया वर्षाला दोन वेळा सक्तीने काही तरुणांना सैन्यात भरती करते, त्याची पहिली लहर सुद्धा आता येणार आहे, ह्या अर्ध प्रशिक्षित सैनिकांना युद्धभूमीवर पाठवले तर मोठ्या प्रमाणावर त्यांची जीवितहानी होईल. युक्रेन ची स्तिथी सुद्धा तशीच आहे. मनुष्यबळ आणि शस्त्रे दोन्हीत युक्रेन सध्या उजवा आहे पण विमान विरोधी यंत्रणा आणि लढाऊ विमाने हे दोन महत्वाचे घटक त्यांच्याकडे कमी आहेत. रशियन विमाने आधी दिवसाला ३०-४० सॉर्टी करत होती आता ती संख्या साधारण १०० पर्यंत वाढली आहे त्यावरून रशियन वायुदल हळू हळू आपले अस्तित्व वाढवत आहे. अमेरिकन स्वीचब्लेङ द्रोण क्षेपणास्त्रे युक्रेन मध्ये पोचली आहेत पण अजून त्यांच्या वापराचे व्हिडीओ समोर नाही आले आहेत. जेव्हलीन, NLAW. स्टार्सट्रिक, स्टिंगर ह्यांचे मात्र अनेक व्हिडिओ आहेत. (भारताने देशांत बनवलेले ह्या प्रकारचे अस्त्र म्हणजे नाग). त्याशिवाय स्टुग्ना आणि टोचका ह्या सोविएत क्षेपणास्त्रांचा वापर सुद्धा दिसून आला. स्टुग्ना हे युक्रेन ने विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. रशियन बाजूने असंख्य प्रकारची क्षेपणास्त्रे दिसून आली (ब्राह्मोस नाही ). कालिबेर, इस्कंदेंर, किन्झल इत्यादी. माझ्या मते युद्धाचे निकाल अश्या प्रकारे असू शकतात. निर्विवाद रशियन विजय : झेलेन्स्की पायउतार होतात, रशियन आपल्याला वाट्टेल त्या करारावर युक्रेनी सही घेते. युक्रेन ला निशस्त्र करते. डोंबास, क्रिमिया रशियन भाग होतात. पाश्चात्य निर्बंध काढले जातात. चांगला रशियन विजय : डोंबास भाग आणि क्रिमिया रशियन भाग होतात. युक्रेन EU आणि नाटो दोन्ही चे सदस्यत्व नाकारतो. रशिया संपूर्ण युक्रेनी किनारपट्टी ताब्यांत घेऊन युक्रेन ला भूबंद प्रदेश करते. पाश्चात्य निर्बंध काढले जातात. नामुष्कीचा रशियन विजय : दोबांस भाग आणि क्रिमिया वर रशियन ताबा राहतो पण युक्रेन मान्य करत नाही. पाश्चात्य निर्बंध कमी होतात. युक्रेन नाटो आणि EU दोन्हीचे सदस्यत्व नाकारतो. काही प्रमाणात शस्त्रांवर नियंत्रण मान्य करतो. युक्रेनी किनारपट्टी १००% रशियन नियंत्रणाखाली येत नाही. नामुष्कीचा युक्रेनी विजय : युक्रेन कसलाही करार करत नाही. निर्बंध तसेच राहतात. युक्रेन किमान EU चा भाग बनते. युक्रेन भूबंद प्रदेश बनतो. चांगला युक्रेनी विजय : युक्रेन भूबंद प्रदेश बनत नाही. खेरसण आणि मारिओपॉल युक्रेनी ताब्यांत राहते. युक्रेन ला EU चे सदस्यत्व मिळते. निर्विवाद युक्रेनी विजय. सर्व परिस्थिती २०२२ च्या जानेवारी महिन्यात होती तशी बनते. आणि ह्यातील कुठलीही परिस्थिती उद्भवली तरी रशियाचे इतर नुकसान हे मात्र आता नक्की आहे. - युरोपियन प्रदेश आणखीन वेगाने रशियापासून दूर राहतील. - रशियन इंधनाची आयात खालावेल. - विविध व्यापारी क्षेत्रांत रशियन अर्थव्यवस्था मागे पडत राहील आणि चीन वर अवलंबून राहील. - भारतासारखे ग्राहक रशियावरील आपले अवलंबन कमी करतील. - फिनलॅंड आणि स्वीडन NATO च्या सदस्यत्वासाठी आता वेगाने प्रयत्न करतील. ukraine war map

वाचने 11460
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

९ मे पर्यंत वाट बघायची असे ठरवले आहे! तो पर्यंत फक्त ह्या युद्धाबद्दल जेवढे काही (तटस्थपणे) लिहिलेले वाचायला मिळेल तेवढे वाचणार .. रच्याक : उत्तर प्रदेश आणि अन्य चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होई पर्यंत सर्व भारतीय प्रसारमाध्यमांत (ऑनलाईन) ह्या युद्धाच्या लाईव्ह/ठळक बातम्या दाखवल्या जात होत्या आता शोधाव्या लागत आहेत 😀

मग युक्रेनचे नागरिकच नेत्यांना आग्रह करतील की आता माघार घ्या, हरलो मान्य करा असा रशियाचा डाव असेल. मदतीला येऊ म्हणणारे देश आतमध्ये उडी घेत नाहीत हेसुद्धा निश्चित झाले.

एक लक्षात ठेवा -- युद्ध नेहमी दुसऱ्याच्या भूमीवर केले जाते कारण युदधामुळे तुमच्या भूमीची आणि त्यावरील साधनसामग्रीची अपरिमित हानी होते. आजतागायत अमेरिकेने एकही युद्ध आपल्या भूमीवर केलेले नाही आणि तसे होण्याची शक्यता जरी दिसली तरी ते वाटेल तेवढा खर्च करतात आणि कोणत्याही टोकाला जाऊ शकतात हे क्युबाच्या क्षेपणास्त्र प्रकरणात आणि ९/११ च्या बाबतीत जगाने पाहिलेले आहे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना हि गोष्ट लक्षात येत नाहीये असेच दिसते आहे. त्यांच्या मदतीला कोणीही येत नाही किंवा येणार नाही. रशियाशी युद्ध करून आपल्याला जिंकता येणार नाही एवढी अक्कल युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना हवी होती. पाश्चात्य राष्ट्रे केवळ शस्त्रास्त्रे देऊन युद्धाच्या आगीत तेलच ओतत आहेत. पण कोणतेही राष्ट्र आपले सैन्य युक्रेनमध्ये उतरवत नाहीत. जे राष्ट्र आपले सैन्य पाठवेल त्याचे तेल आणि वायू बंद करून रशिया त्यांची नाकेबंदी करेल यात शंका नाही. अमेरिका आणि त्यांची उपग्रह राष्ट्रे उगाच त्यांचा उदो उदो करत आहेत. पण रशिया विरुद्ध युद्धात उतरण्याचा त्यांच्या पार्श्वभागात दम नाही हि वस्तुस्थिती. युक्रेनच्या आडुन रशियाला खच्ची करण्याचा डाव ते खेळत आहेत परंतु त्यात युक्रेनचा जीव जातो आहे हे झेलेन्स्की याना कळत नसेल तर ते युक्रेनियन जनतेचे दुर्दैव. यावरुन धडा घेऊन युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अक्कल घेऊन तह करायला हवा युद्धामुळे युक्रेनच्या भूमीची आणि साधनसामग्रीची अपरिमित हानी होते याचा प्रचंड भार पुढची काही दशके युक्रेनियन जनतेवर पडणार आहे. झेलेन्स्की यांनी आपण शूर, वीर, हुशार आहेत हे सिद्ध करण्यासाठी युक्रेनियन जनता अजून किती त्याग करणार आहे? उद्या रशियाने आपली चूक मान्य करून आपले सैन्य मागे घेतले तरी युद्धात झालेल्या हानीबद्दल रशियाकडून भरपाई वसूल करण्याची हिम्मत एकही पाश्चात्य राष्ट्र दाखवू शकणार नाही हि पण वस्तुस्थिती आहे

In reply to by सुबोध खरे

आपण संरक्षण क्षेत्रांत काम करून सुद्धा आपली मते बाळबोध आहेत ह्याचेच आश्चर्य वाटते ! युक्रेनियन सेनेचा पराभव ह्यातून युक्रेनी जनता आणि त्यांची राष्ट्रीय अस्मिता ह्यांचा संपूर्ण विनाश होणार आहे. कोलमडलेल्या इमारती पुन्हा बांधल्या जाऊ शकतात, संस्कृती आणि समाज नाही हे आपण पाकिस्तान, काश्मीर इत्यादी ठिकाणी पहिले आहे. त्याशिवाय लढायचे कि नाही हा त्यांचा प्रश्न आहे, निव्वळ झेलेन्स्कीचं जबरदस्तीने आपल्या लोकांना युद्धांत उतरवत आहेत असे तरी दिसत नाही (उदाहरणार्थ सद्दामची सेना किंवा सध्याची रशियन सेना) बाकी मला वाद नको त्यामुळे हि माझी शेवटची प्रतिक्रिया आहे.

In reply to by साहना

आपली मते बाळबोध आहेत माझी मते बाळबोध असतील पण ती तुमच्या हो ला हो मिळवणारी नाहीत एवढे नक्की. युक्रेनची हे युद्ध जिंकण्याची शक्यता किती? रशियाने तेथून माघार घेतली कि त्याला तुम्ही युक्रेनचा विजय म्हणणार असलात तर असोच. अफगाणिस्तानने किती हि भुभु:कार करून आम्ही रशियाला आणि नंतर अमेरिकेला हरवले म्हटले तरी तो देश मध्य युगात गेला हि वस्तुस्थिती नाकारता येईल का? मुळात रशियन सैन्य तेथे का गेले आहे? तो देश पादाक्रांत करण्यासाठी नाहीच किंवा नाटो मध्ये समाविष्ट झाले किंवा नाही याने युक्रेनच्या संस्कृतीला काय बाधा येणार होती? युक्रेनची अवस्था पाकिस्तान सारखीच होणार आहे. Pakistanis till today cry that the Americans used them like a condom and then chucked them away. बाकी चालू द्या

साहना, हे देश नाटो-मध्ये जलदगती जॉइन झाले तर रशियाची प्रतिक्रिया काय असेल असे तुम्हास वाटते. या ताज्या रशियन उत्तरावरून रशिया पुरती घायाळ झालेली आहे आणि आता rhetoric च कमी करायचा प्रयत्न करत आहे असे वाटते. की एखाद्या जखमी बुलीप्रमाणे पुतीन त्याची ५६ इंची छाती दाखवण्यासाठी आण्विक युद्धाला सुरुवात करण्याचा मूर्खपणा करेल? कृपया तुमचे निरीक्षण नोंदवा.

एका अतिशय उत्तम मित्राने, एक पुस्तक सुचवले ... इंग्रजीत RUSSIA OFF COURSE हे ७०० पानांचं पुस्तक Amazon ने Kindle साठी e-book या पद्धतीने प्रसिद्ध केलं आहे... लेखक, युक्रेन आणि रशिया, मध्ये सतत येजा करत होता, त्यामुळे माहिती खात्रीशीर असेल ...

In reply to by मुक्त विहारि

इंग्रजीत RUSSIA OFF COURSE हे ७०० पानांचं पुस्तक Amazon ने Kindle साठी e-book या पद्धतीने प्रसिद्ध केलं आहे...
पुस्तक वाचुन बघितले. बरीचशी माहीती अतिशयोक्ती केली आहे, सदर लेखन जास्तीत जास्त बखर म्हणुन बघण्यात यावी. उदा. १. साधारणतः १९७५ मध्ये भारतातुन सोव्हीयत युनियनमध्ये संगणक निर्यात होत होते. २. लेख दोन पानात गार्बाचेव्ह वरुन पुतीनवर येतात, आणि त्यांचा व्यवसायिक व्यवस्था जवळपास तशीच राहते. ३. सोव्हीयत युनियन मधील महामंडळाचा अध्यक्ष त्यांना रणगाडे विकण्याचा प्रयत्न करतो, तो पुढे युनियन बरखास्त झाल्यानंतर रस्त्यावरील आजारी भिकारी होतो. आणि शेवटी एक भारतीय दिवाळखोर व्यावसायिक त्याला मदत करतो आणि पुन्हा श्रीमंत बनतो. ४. सुरवातीला नैतिकचे व्या़ख्यान झोडणे आणि नंतर स्वत:च्या साहेबाला न विचारता बनावट कागदपत्रे तयार करणे. ५. युनियनच्या अधिकार्‍याला भष्ट्राचारवर उपदेश करणे आणि तीच्याकडुच भारतातील भ्रष्टाचाराविषयी इज्जत काढुन घेणे. बॉलिवुड स्टाईलः १. युनियनमधील ऑफिसमधील स्वागतिकेची वर्गमैत्रीण, मुंबई मधील युनियनच्या कचेरीतील अधिकार्याची बायको असते. २. ती अधिकार्‍याची बायको एका ऑस्ट्रीयन सहकार्‍याचे लग्न जुळवुन देते. ३. युनियनमधील तो विसा अधिकारी सरळ ऑफिसमध्ये त्यांना विसा देण्यासाठी येतो. ४. अर्ज केला की लगेच विसा मिळणे. असल्या विसंगती लक्षात आल्याने पुस्तक वाचायचे अर्ध्यात सोडले.

नं लढणारे नेहरू घाबरट ठरतात लढून झेलेन्स्की चुतीया ! एकंदीतच स्वतच्यां सोयीने चष्मे बदलणे चालले आहे.. मज्जा आहे. आपल्या आवडीचे चष्मे घालायला हरकत नाही , फक्त माझी लाल (दृष्टी रे दृष्टी ) असा आग्रह नसावा

भारत हा चीनचा भाग कधीही नव्हता किंवा भारतात चिनी वंशाचे लोक रहात नव्हते किंवा कोणत्याही तर्हेने भारताची चीनशी नाळ कधीही जोडलेली नव्हती किंवा तिसऱ्या देशाच्या नादाला लागून भारताने चीन विरुद्ध कोणतीही कार्यवाही केलेली नव्हती . तेंव्हा आपले उदाहरण संपूर्णपणे गैरलागू आणि असंबद्ध आहे. जरा तरी वस्तुस्थितीशी संबंध असावा.

नं लढणारे नेहरू घाबरट ठरतात लढून झेलेन्स्की चुतीया ! ह्या हिशोबाने न बोलणारे मोदी घाबरट ठरतात १५ मि. सैन्याला हाकलुन लावु म्हणणारे राहुल गांधी .....!

हे युद्ध अमेरिकेचे आहे आणि युक्रेन लढत आहे. ज्या प्रकारे दक्षिण व्हिएतनाम, अफगाणिस्तान इत्यादि. अमेरिकेचे युद्ध लढणारे त्यांच्या देशाचा सत्यानाश करतात. भारत आणि चीन हे युद्ध अमेरिकेचे नव्हते. दोन देशांतले होते. आपण लढलो नाही. आपण रशिया कडून तेल घेतले नसते तर युरोप प्रमाणे आपल्या देशात ही तेल 200 च्या वर गेले असते.

एकूण रशियन सैन्य का कागदी वाघ आहे, सैन्य अत्यंत बेशिस्त, बेजबाबरदार आणि लढण्यास अनुत्सुक आहे असे दिसून आले. हास्यास्पद विधान. रशिया हा काय आंडुपांडु देश आहे का ? एकंदर ट्विटर वरच्या फक्त रशिया विरुद्धच्या बातम्याच सत्य मानुन केलेले लिखाण वाटते. असो... चालु ध्या. जाता जाता :- साधारण १३ मार्च पर्यंत रशियाने युक्रेन मधले साडे तीन हजार च्या आसपास मिलेटरी टार्गेट्स, ऑइल डेपो, वेपन डेपो, एअर पोर्ट इ. नष्ट केले होते. पण कागदी वाघ असे कसे करु शकतो तेच मला आता समजत नाहीये ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ALMA ZARZA - TUTU - CAMILO ,PEDRO CAPO -2019 ( Cover)

In reply to by मदनबाण

एकूण रशियन सैन्य का कागदी वाघ आहे, सैन्य अत्यंत बेशिस्त, बेजबाबरदार आणि लढण्यास अनुत्सुक आहे असे दिसून आले. असे असेल तरी एकही पाश्चात्य देश आपले सैन्य प्रत्यक्ष युद्धभूमीवर का उतरवत नाही रशियाने पहिल्या फटक्यात युक्रेनच्या वायुदलाला नष्ट केलेले आहे या शिवाय रशियन विमाने बऱ्यापैकी मोकळेपणाने युक्रेनच्या हवाई हद्दीत शिरून बॉम्बवर्षाव करत आहेत. मुळात युक्रेन पादाक्रांत करणे हा रशियाचा हेतू नाहीच. युक्रेनच्या लष्करी तयारीचे खच्चीकरण करणे आणि त्यांना नाटोच्या वळचणीला जाण्यापासून रोखणे हाच हेतू आहे. तेंव्हा केवळ कीव्ह हि राजधानी जिंकली किंवा झेलेन्स्की चे सरकार पडले तर युक्रेनचे लष्करी सामर्थ्य कसे खच्ची होणार यामुळे रशियन सैन्य सर्वंकष युद्ध करतच नाहीये. युक्रेनला होणारा पाश्चात्य शस्त्रपुरवठा हा तोकडा आणि वेळेवर येतच नाहीये. कारण रशियन अणू पाणबुड्यांनि काळ्या समुद्रातून येणाऱ्या जहाजांचा मार्ग बंदच केलेला आहे त्यामुळे पोलन्ड च्या मार्गे येणाऱ्या दोन तीन महामार्गावरून शस्त्रपुरवठा किती होईल हा प्रश्नच आहे. आणि तसे काही येत असेल असा रशियाला वास जरी आला तरी ते त्या काफिल्यावर हवाई हल्ला करून त्याचा नायनाट करतीलच. बाकी अमेरिकाच हुशार म्हणणारे आणि पाश्चात्य लोकांची तळी उचलणारे पत्रकार ज्या काही माहित्या देत आहेत त्या पूर्ण एकांगी आहेत.

In reply to by सुबोध खरे

हे पुस्तक वाचल्या पासून, रशिया बद्दल उत्तम माहिती मिळाली... मला नाही वाटत की, भारतातील कुठल्या पत्रकाराने हे पुस्तक वाचले असेल. पत्रकारांचे एक सोडा कारण, ते तर एक प्रकारे पगारी नोकरच असतात, (दिगू कधीच वेडा झाला), पण वर मी दिलेल्या पुस्तक, वरवर तरी का होईना, किती मिपाकरांनी वाचले असेल? (माझ्या एका IAS बहिणीनेच, ते पुस्तक मला सुचवले होते, दुर्दैवाने, माझे इंग्रजी कच्चे असल्याने, मी ते पुस्तक वाचू शकणार नाही ...) जाऊ द्या, कुपमंडूक जनतेला, अजगरच प्रिय असतो....

In reply to by सुबोध खरे

रशियन फौजा कमजोर असत्या येत भांडवशाही असलेल्या आणि गरिबांना जगण्याचा हक्क नाही असे समजणाऱ्या अमेरिका ,ब्रिटन,पासून सर्व देशांनी क्रूर जंगली कुत्रे जसे घोळक्या नी सावज चे लचके तोडतात तसे रशिया तोडले असते.. रशिया काय आहे हे ह्या जंगली कुत्र्यांना माहीत आहे.. आम्ही नसो तर तुम्ही पण नसणार असे रशिया वागेल. मुळात युक्रेन रशिया युद्ध झाले ह्याला कारण हे जंगली भांडवल वादी देश च आहेत.

ब्रम्ह चेलानी हे एक बर्‍यापैकी तटस्थ व माहितीपूर्ण लिखाण करणारे राजकीय समीक्षक आहेत (असे मला वाटते). त्यांनी आताच ट्वीट केले आहे की, रशियाने, युक्रेनला, आपण कीववर हल्ला करतो आहोत अशी फक्त हूल दिली. कारण तसे केल्याने युक्रेनचे बरेचसे सैन्य कीवचा बचाव करण्यांत गुंतून पडेल, अशी अपेक्षा होती व तसेच घडले. मग रशियाला पूर्व व दक्षिणेच्या दिशेने जोरदार मुसंडी मारता आली. मात्र हे करतांना, रशियाची बरीच सैन्यहानी कीव्ह भागांत झाली, हे चेलानी नमूद करतात. अशा तर्‍हेने रशियाकडे आता, क्रामियांत जावयासाठी भूमार्ग उपलब्ध झाला आहे. तसेच युक्रेनचे तेलसाठे व महत्वाची बंदरे आता त्याला ताब्यांत घेता आलेली आहेत.

In reply to by प्रदीप

  • तसे असेल तर रशियाचे खुपच कमी नुकसान व्ह्यायला हवे होते, पण (वेगवेगळ्या बातम्यावर आधारीत) रशियाचे बरेच नुकसान झाले आहे असे दिसते.
  • आणि रशियाला पुर्ण सैन्य किव्हपासुन काढुन घ्यायची गरज नव्हती. हुल देण्यासाठी काही सैनिक तिथे ठेवण्याची गरज होती. युक्रेन आपले सैन्य पुन्हा दक्षिणेत पाठावु शकतो.
  • मास्कोवा नौका समुद्रतळाला जाणे हा खुप मोठा धक्का आहे. हा नक्कीच कोणालाही अपेक्षित नव्हता.
- माझ्या तर्कानुसार रशियाने आपली उध्दीष्टे बदलली आहे. सुरवातीला युक्रेन पटकन ताब्यात घेउन सत्ताबदल आपली उध्दीष्टे पुर्ण करणे असा दिसते, आता दक्षिण युक्रेन ताब्यात घेउन युक्रेनला भूवेष्टित (Landlocked ) देश बनवणे असा मनोदय दिसतो आहे. तो रशियालासुध्दा फायद्याचा आहे. ज्या गतीने पाशात्य देश शस्त्रास्त्रे पुरवण्याचे आश्वासन देत आहेत, आणि त्यांचे मुळ उद्धीष्ठ रशियाला कमकुवत करणे हे आहे. ह्या सगळ्या उद्योगात युक्रेनचा सर्वनाश नक्कीच आहे.

यूके, ईयू, व बायडेन ह्यांची अमेरिका ह्यांनी, यूक्रेनचे युद्ध सुरू झाल्यापासून, ते रशियाकडून तेल व वायू घेणार नाहीत असे जाहीर केले व भारतासारख्या इतर देशांंनाही ते डोळे वटारून तसेच करण्यास सांगू लागले. वास्तविक गेल्या दोन महिन्यांत, रशियातून तेल व वायू सर्वांत अधिक ह्यांनीच खरेदी केलेले आहेत. . केवळ इतकेच नव्हे, तर रशियावर अशा तर्‍हेने निर्बंध टाकल्याने, जगांतील तेल व वायूंच्या किंमती वाढल्या, ज्यामुळे रशियाचा महसूल वाढला ! तसेच, ह्या वाढलेल्या किंमतींमुळे जगांतील सर्वच देशांतील महागाई वाढली, व सरकारांना त्यांच्या जनतेच्या रोषास सामोरे जावयाची वेळ आली. (ह्या माहिती व विश्लेषणाचा स्त्रोत, येथे)

In reply to by प्रदीप

हा तेल नावाचा इतिहास आहे आणि एका तेलियाने, ह्या दोन पुस्तकांत, तेलाच्या आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा चांगला उहापोह केला आहे

पाश्चिमात्य राष्ट्र ,अमेरिका ह्यांनी मिळून रशिया ची कोंडी केली गेली. अजून तरी युरोप रशिया चेच वायू आणि तेल वापरत आहे .जाहीर स्टेटमेंट वेगळी आहेत. पण खरेच कोंडी केली तर. रशिया अण्वस्त्र वापरणार नाही ह्याची काही खात्री आहे का. ५००० मधील ५० जरी अण्वस्त्र रशिया नी वापरली तर जगाची अवस्था काय होईल. फक्त किरकोळ युद्ध मुळे. खनिज तेल,खाद्य तेल ह्यांचे भाव गगनाला पोचले आहेत. अण्वस्त्र वापरली तर. लोक मरतील च,वातावरण प्रचंड बदलेल. पर्यावरण चक्र बाधित होईल. संबंधित देश सोडा पूर्ण पृथ्वी वर त्याचा परिणाम होईल. किती तरी राष्ट्र भिकेला लागतील. अगदी आता जी संपन्न वाटत आहे ती राष्ट्र पण भिकेला लागतील. रशिया अर्थातच हे सर्व भोगेल च

In reply to by sunil kachure

कचरे बुवा तुम्ही जरा त्या पुतीन ना चार युक्तीच्या गोष्टी सांगून पहा. निदान जगाच्या कल्याणासाठी आपल्या सारखे सर्वगुण संपन्न सर्वज्ञ काही कृती करतील तर जग अणुयुद्धापासून दूर जायला मदत होईल

देश प्रमुख म्हणून सर्व राष्ट्रांच्या पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष ह्यांनी कातडी बचाव धोरण सोडून active होणे गरजेचे आहे. हट्ट, इर्षा सोडून युद्ध समाप्त होईल असा मध्यम मार्ग काढला पाहिजे.

In reply to by sunil kachure

हट्ट, इर्षा सोडून युद्ध समाप्त होईल असा मध्यम मार्ग काढला पाहिजे. तेच म्हणतोय मी तुम्ही का जात नाही क्रेमलिन आणि व्हाईट हाऊस ला पुतीन आणि बायडनना थोडा शहाणपण शिकवा. म्हणावं आता हा पोरखेळ बास झाला. तुमचं नक्की ऐकतील. त्यातून तेथे काही अडचण आली तर सांगा. माझ्या मित्राच्या मोलकरणीच्या दिराच्या मेहुणीची सावत्र पत्र मैत्रीण तेथे झाडू मारायला आहे. हा का ना का

दुरून डोंगर साजरे अशी म्हण आहे.डोंगर दुरूनच मनमोहक वाटत असतात.जवळ गेले की त्या वर चढाई करणे खूप कष्टाचे असते. युद्ध कथा ऐकायला रमणीय असतात.पण त्या मध्ये जे भाग घेतात ते सैनिक आणि ते देश नरक यातना bhogat असतात. तुम्ही force मध्ये होता तुम्हाला अनुभव आहेच. पूर्वी राज्य वाढवणे अशी पशू वृत्ती माणसात होती.त्या मुळे युद्ध होत.आणि राज्याचा विस्तार केला जाई. पण ह्या मूर्ख पना मुळे माणूस किती तरी वर्ष प्रगती करू शकला नाही. आता काहीच शे दोनशे वर्ष ही पशू वृत्ती माणसाने सोडली आणि माणसाने प्रचंड प्रगती केली. मी सामान्य व्यक्ती आहे पुतीन किंवा जेलेस्किकी,किंवा अमेरिकेच्या अध्यक्षांना सल्ला देण्या इतकी माझी लायकी नाही..पण रशिया ,युक्रेन युद्धाच्या झळा माझ्या सारख्या सामान्य दुसऱ्या सुरक्षित देशातील व्यक्ती ला पण बसत आहेत महागाई मुळे..मग जे दोन देश युद्धात सहभागी आहेत तेथील जनतेची काय अवस्था असेल. अशी कोणती मोठी समस्या हे लाखो लोकांच्या आयुष्याची राख रांगोळी करून सोडवत आहेत. चर्चा करून थोडे माघार घेवून युद्ध थांबले तर फायदाच होईल. तेच मी सांगत आहे.