बँक व्यवहाराबद्दलच्या शंका

विजुभाऊ काथ्याकूट
नोटाबंदी झाल्या नंतर बँकेचे व्यवहार बरेच बदलले आहेत. कोअर बँकिंग मुळे व्यवहारात ट्रान्सफरन्सी आलेली आहेत. व्यवहारात एकवाक्यता आणि सुरळीतता आलेली आहे मनी लाँडरिंग व्यवहाराला बर्‍यापैकी आळा बसलेला आहे. सरकारला बँकेच्या मार्फत होणार्‍या सगळ्या व्यवहाराची महिती सहज मिळू शकते. याच वेळेस सामान्य खातेदाराच्या काही व्यवहारांवर मर्यादाही आलेल्या आहेत. मात्र या बद्दल इंटरनेटवरही तशी कमी माहिती उपलब्ध आहे. उदा :- बँकेत तुमच्या खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम ट्रान्सफर करता येते? कॅश रक्कम खात्यात भरायला असलेली मर्यादा ते खाते सेव्हिंग आहे की करंट आहे यावर ठरते. त्या बद्दलचे नियम सुस्पष्ट आहेत. मात्र एखाद्याने त्याच्या खात्यात इतर कोणी काही मोठी रक्कम ट्रान्सफर केली तर सबळ कारण मिळेपर्यंत बँक असे खाते ब्लॉक करू शकते. ( उदा ;- एखाद्या कंपनीला त्यांच्या कस्टमरने साडे तीनशे कोटीं रुपये इन्व्हॉईस ची रक्कम म्हणून ट्रान्सफर केले तर त्या कंपनीचे खाते ब्लॉक केले जात नाही मात्र हेच जर एखाद्या सिव्हिंग खात्यात कोणी कोटभर रुपये ट्रान्सफर केले तर ते सेव्हिंग अकाउंट ब्लॉक केले जाते) मात्र ही रक्कम किती हे कोणीच सांगत नाही. आणि जर असे चुकी मुळे झाले ( म्हणजे माहीत नसलेल्या इसमाकडून तुमच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर केली गेली ) तर तुमचे खाते ब्लॉक केले जाते. तुमची चूक नसतानाही. अर्थात्च हा व्यवहार का झाला आणि कशाबद्दल आहे हे तुम्ही स्पष्ट करू शकत नाही. हे सरळच आहे. मात्र खाते ब्लॉक झाल्यामुळे तुमचे व्यवहार मात्र थाम्बतात. हे एक उदाहरण झाले. दुसरे म्हणजे तुम्ही जर काही कर्ज घेतले आणि मुदती पूर्वी फेडले तर बँक तुम्ही एकूण किती कर्ज घेतले आणि ते फेडताना बँकेने किती चार्जेस लावायचे या बाबतही संदिग्धता ठेवते. कर्ज फिटले या भावनेत तुम्ही आनंदी होता इतकेच. काही बँका तुम्ही तुमच्या खात्यात कॅश भरली म्हणूनही चार्जेस लावतात. याचे नियम काय आहेत? कोअर बँकिंगनंतरही तुमचे खाते ज्या ब्रांचमधे असेल तेथेच कॅश भरावी हा आग्रह कशासाठी ( तसाही हा नियम विचित्रच आहे. माझे सेव्हिंग खाते हे कंपनीने उघडून दिले. ती ब्रँच हैद्रबादला आहे. पैसे भरायला म्हणून हैद्रबादला जायचे कसे शक्य आहे) याची उत्तरे कोणी देऊ शकेल का. या ,तसेच अशा काही बँकिंबाबत शंका तुम्हाला असतील तर या धाग्यावर पोस्ट करूया

41 टिप्पण्या 18,977 दृश्ये

Comments

महासंग्राम नवीन

काही बँका तुम्ही तुमच्या खात्यात कॅश भरली म्हणूनही चार्जेस लावतात.
बऱ्याच बँकांचे आता CDM असल्यामुळे हे चार्जेस लागत नाही बहुदा. असतील तर ते फक्त बाबा आझम च्या जमान्यातील बॉब आणि SBI मध्येच.

कंजूस नवीन

हे सेविंग्जमध्ये महिन्याला पाचवर गेले तर पूर्वी करंट अकाऊंट काढायला लावत. आता तीन करणारेत. नवीन नाही. एटीएमला मर्यादा आहेच.

चौथा कोनाडा नवीन

In reply to by कंजूस

एटीएमला मर्यादा आहेतच, कारण ठराविक एटीएम केंद्रे सोडली तर इतर केंद्रांची अवस्था वाईट आहे !

कंजूस नवीन

यास मर्यादा ठीक पण डेबिट कार्डाने/ युपिआई/नेट बँकिंगचं खरेदीचं काय? साबण चाळीस रुपयांचा आणि शंभर पेनल्टी?

सुबोध खरे नवीन

प्रत्येक बँकेत तिथला मॅनेजर म्हणतो तो नियम असा अनागोंदी कारभार आहे. नोट बंदीच्या दुसऱ्या दिवसापासून लोकांकडे पैसे नव्हते म्हणून मी त्यांच्या कडून चेक घेणे सुरु केले आणि साधारण १५ चेक मी खात्यात भरले तर तेंव्हा एच डी एफ सी बँकेतील कारकून मला तुम्ही करंट अकाउंट उघडा म्हणून सक्ती करत होता. मी त्याला स्पष्ट शब्दात सांगितले कि माझा दुसऱ्या बँकेत करंट अकाउंट आहे तेंव्हा आता तुमच्याकडे असा अकाउंट उघडण्याची माझी अजिबात तयारी नाही. मी त्याला मॅनेजर कडे घेऊन गेलो तर ती दीड शहाणी बाई तुमचा उत्पन्न स्रोत काय आहे ते तपासावे लागेल असे मला सांगू लागली. मी तिला सांगितले कि नौदलात असताना माझे खाते पगार खाते होते. तेथून सोडल्यावर मी बँकेला तसे कळवले होते कि माझा पगार आता बंद होईल तर तुमचे खाते बंद करायचे असेल तर मी करतो त्यावर त्यांनी मला जोवर या खात्यात आपले उत्पन्नाचे पैसे जमा होत राहतात तोवर असे करण्याची गरज नाही अशी परवानगी दिली होती. आता तुमच्या मनमर्जीसाठी मी खाते अजिबात बदलणार नाही. तुम्ही तसे मला लिहून द्या मग मी पाहतो काय करायचे. त्यावर असे लिहून देण्याची तिची तयारी नव्हती. मी तिला स्वच्छ शब्दात हे ही सांगितले कि बचत खात्यात किती चेक भरता येतात/ येत नाहीत याचा नियम दाखवा. तर तिने असा नियम नाही म्हणून सांगितले. मी तिला स्पष्ट शब्दात हेही सांगितले कि मी पैसे कुठून आणतो याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे. मी प्रेफर्ड कस्टमर आहे आणि माझ्या स्लिपवर माझा पॅन क्रमांक हि आहे. तुम्हाला पाहिजे तर आयकर खात्याला कळवा कि हा व्यवहार संशयास्पद आहे. मी तुम्हाला माझा उत्पन्नाचा स्रोत अजिबात सांगणार नाही. तुम्हाला मी ग्राहक म्हणून नको असेन तर मी शांतपणे खाते बंद करून कोटक किंवा आय सी आय सी आय बँकेत जाईन किंवा तुम्हाला टिचवुन मुलुंड पश्चिम शाखेत माझे खाते आणि मुदत ठेव घेऊन जाईन. हे प्रकरण मी एच डी एफ सी बँकेच्या उपाध्यक्षांपर्यंत नेले त्यांनी मी कितीही चेक बचत खात्यात भरू शकतो आणि उत्पन्नाचा स्रोत तपासण्याची कोणताही हक्क बँकेच्या मॅनेजरला सरकारला दिलेला नाही हे मान्य केले. तुमचे अज्ञान म्हणजे त्यांना मनमानी करण्यासाठी/ गैरफायदा घेण्यासाठी दिलेला परवाना.

कानडाऊ योगेशु नवीन

In reply to by सुबोध खरे

तेंव्हा एच डी एफ सी बँकेतील कारकून मला तुम्ही करंट अकाउंट उघडा म्हणून सक्ती करत होता.
ह्यात कारकूनाचा अथवा बँकेचा काय फायदा असू शकतो? विद्यार्थीदशेत असताना स्टेट बँकेमधुन काही हजार काढले होते जे बंडल मध्ये होते आणि ते तसेच महाराष्ट्र बँकेत भरायला गेलो होतो. तेव्हा तिथली कॅशियर बाई थुंकी लावुन मस्त नोटा मोजत असताना खराब नोटा दुमडत होती. ती त्या नोटा बाजुला काढणार आणि दुसर्या नोटा मागणार हे स्पष्ट होते. तिला मी सांगितले कि एका बॅ़केचे सील्ड बंडल आहे तुम्हाला ते स्वीकारावे लागेल वगैरे.पण विद्यार्थी अस्ल्यामुळे जास्त खेचु शकलो नाही व बहुदा वेळ नव्हता म्हणुन पर्यायी नोटा दिल्या. पुढे वडलांना सांगितल्यावर त्यांनी सांगितले कि असे बंडल घेणे बँकेला बंधनकारक आहे अन्यथा सरळ फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. थोडक्या उल्लु बनवणारे सगळीकडेच असतात.

गामा पैलवान नवीन

विजुभाऊ, मला वाटतं बँकेला चड्डीत राहायला शिकवायची वेळ लवकरंच येईल. पगारी माणसावर अति निर्बंध लादले तर सरळ महिन्याचे पैसे काढून घ्यायचे पगार झाल्यावर. बँकेस बसूदे नाममात्र रक्कम सांभाळत. घरी थोडी रोकड हवीच, नाहीका? आ.न., -गा.पै.

Gk नवीन

In reply to by गामा पैलवान

ह्यात ब्यांकेपेक्षा सरकारचा संबंध आहे ते चार्जेस आहेत की टेक्स आहे ? जर चार्जेस असतील तर ते ब्यांकेला जातील , जर तो व्यवहार-कर असेल तर तो सरकारला जाईल

चौथा कोनाडा नवीन

याच कारण एनपीए अर्थात हजारो कोटींचई थकित कर्जे हे आहे, ते नुकसान सामन्य खातेदारांच्या खिसा कापून भरून काढायचे असा स्पष्ट डाव आहे.

आनन्दा नवीन

In reply to by चौथा कोनाडा

Saving खात्यातून किती लोक महिन्यातून 4 वेळा कॅश काढतात? त्याचा विडा काय? बँकांना नेमके यातून किती उत्पन्न अपेक्षित आहे याची काही ठोस माहिती? की आपलं.. ?

विजुभाऊ नवीन

या सगळ्यात मुख्य प्रश्न बाजूलाच पडला. तुमच्या खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम त्रान्सफर करू शकता. ( या मर्यादेनंतर बँक तुमचे अकाउंट ब्लॉक करते असे ऐकून आहे )

महासंग्राम नवीन

In reply to by विजुभाऊ

एका दिवशी तुम्ही किती रक्कम ट्रान्सफर करू शकता या साठी प्रत्येक बँकेचे वेगवेगळी लिमिट आहे. पण जो पर्यंत वरतून आदेश येत नाहीत तो पर्यंत ते ब्लॉक करू शकत नाही.

आनन्दा नवीन

In reply to by महासंग्राम

असे नाही,प्रत्यक्ष बँकेकडे फ्रॉड डिटेकशन सिस्टिम असते, ते फ्रॉड चा संशय आला तर ते अकाउंट ब्लॉक करू शकतात..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

बँकेचे व्यवहार बँकेत जाऊन करणे म्हणजे एक दहशतच असते. मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली, कशाकशाच्या नावाखाले साले हे बँकवाले आपल्या नावावर डीबीट मारत असतात, आपल्या अशा सर्वांच्या पैशावर बँका गब्बर झाल्या असतील असे वाटत राहते. मीही फार खोलात जात नाही, मरु दे, च्यायला जे होईन ते होईन पण ब्यांकांचं तोंड पाहणे नको. ऑनलाइन आपल्याला सगळे व्यवहार करता आले पाहिजेत. नियम-फियम तिकडेच पाहता आले पाहिजेत. अशा फॅसीलिटीचे पैसे घ्या, पण तान देऊ नका. -दिलीप बिरुटे

Gk नवीन

हजारो कोटींचे NPA असणारी बँक ऑफ बरोडा सर्वसामान्य खातेदाराने महिन्याला 3 हुन अधिक व्यवहार केल्यास प्रत्येक व्यवहाराला १ नोव्हेंबर पासून शुल्क आकारत आहे. आय सी आय सी आय बद्दलही काल अशा प्रकारची बातमी वाचनात आली होती. म्हणजे, हजारो करोडची मोठ्या थकबाकीदाररांची थकबाकी सामान्य जनतेकडून वसूल केली जात आहे. ह्यासंदर्भात विवेक वेलणकर ह्यांची पोस्ट बँक ऑफ बरोडा दात कोरून पोट भरतीये : बँक आॕफ बरोदा बड्या थकबाकीदारांच्या हजारो कोटींच्या कर्ज थकबाकी वसुलीतील अपयशाची शिक्षा सामान्य खातेदारांवर शुल्क आकारून देतीये. बँक ऑफ बरोडाने बँकेतून महिन्याकाठी तीन हून अधिक व्यवहार केल्यास खातेधारकांना पुढील प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ बरोडाचा 2019-20 चा त्यांच्या संकेतस्थळावरील वार्षिक अहवाल अभ्यासला असता असे दिसते की 31/03/2020 रोजीचे बँकेचे Gross NPA 69381 कोटी रुपयांचे आहेत . (गेल्या एका वर्षात त्यात 23115 कोटी रुपयांची वाढ झाली आहे ). मला भागधारक म्हणून बँकेने वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठ वर्षात बँकेने बड्या थकबाकीदारांचे ( 100 कोटी पेक्षा जास्त थकबाकी असणारे) 21474 कोटी रुपये write off केले आहेत ज्यापैकी फक्त 1057 कोटी रुपये बँकेला 31 मार्च 2020 पर्यंत वसूल करता आले आहेत. याचाच अर्थ थकबाकीदारांकडून कर्जाची वसुली करण्यात अपयशी ठरलेली बँक मायबाप खातेदारांना छळून दात कोरून पोट भरू पाहत आहे. करोना महामारीमुळे आलेल्या आर्थिक संकटाला तोंड देताना आधीच मेटाकुटीला आलेल्या सामान्य खातेदारांना मात्र कुणीच वाली नाही हे दुर्दैवी चित्र उभे राहत आहे. आता तरी बँकेची मालकी असलेले केंद्र सरकार आणि बँकेवर नियंत्रण असलेली रिझर्व्ह बँक सामान्य खातेदारांसाठी काही करणार का हा खरा प्रश्न आहे. विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

बाप्पू नवीन

In reply to by Gk

सहमत GK जी.. प्रत्येक ट्रान्सक्शन वर स्वच्छता कर आकारला जातोय. त्याद्वारे सरकारने किती पैसा छापला याचा काही हिशोब?? आणि इतके होऊनही स्वछते मध्ये फारसा काही फरक झालेला जाणवत सुद्धा नाहीये...

चौथा कोनाडा नवीन

In reply to by Gk

मी देखील विवेक वेलणकर यांच्या सारखंच मत मांडलंय, पण खालील प्रश्न उपस्थित झालाय.
Saving खात्यातून किती लोक महिन्यातून 4 वेळा कॅश काढतात? त्याचा विडा काय? बँकांना नेमके यातून किती उत्पन्न अपेक्षित आहे याची काही ठोस माहिती? की आपलं.. ?

चौकटराजा नवीन

खास करून राष्ट्रिक्रूत बँकेत रोखा रक्कम काढणे देणे याने मोठा ताण असतो. कारण जनधन खाती ,पेंशन खाती ई. मोठ्या प्रमाणावर स्टाफ नसणं हे एक कारण .जो आहे तो कामाचे आवड नसलेला . कोविड ची भर म्हणून रोख रक्कम काढणे वा भरणे यासाठी लोकांनी गर्दी करू नये म्हणून सध्या तरी रोख व्यवहारावर काही चार्ज लावणे चालू झाले आहे ! त्याबरोबर बँकानी आपली ए टी एम सतत योग्य तऱ्हेने काम करतील याची तजवीज करणे जरूर आहे पण ते घडले तर सवासो करोड वाला महान भारत आहे हो जगाला कसे दिसावे ?

चौथा कोनाडा नवीन

बरोबर.
कोविडची भर म्हणून रोख रक्कम काढणे वा भरणे यासाठी लोकांनी गर्दी करू नये म्हणून सध्या तरी रोख व्यवहारावर काही चार्ज लावणे चालू झाले आहे !
मग हा चार्ज कायमचा बोकांडी बसणार, वाहनाच्या पीयूसी सारखा ... कारण सवासो करोड वाला महान भारत आहे हो जगाला कसे दिसावे ?
बँकानी आपली ए टी एम सतत योग्य तऱ्हेने काम करतील याची तजवीज करणे जरूर आहे
पण ते घडले तर सवासो करोड वाला महान भारत आहे हो जगाला कसे दिसावे ? परफेक्ट ! +१

विजुभाऊ नवीन

नोटबंदीत बर्‍याच ब्यांकांनी आपले हात धुवून घेतले. पैसे बदलून देणे हे ब्यांकांच्या मदतीशिवाय शक्यच झाले नसते. मोठ्या ब्यांका सुटल्या मात्र सहकारी ब्यांका आणि पतसंस्था अडकल्या

चौथा कोनाडा नवीन

In reply to by विजुभाऊ

असल्या मोठ्या पडझडीचा फटका छोट्या लोकांनाच बसतो ! टाळेबंदी, कोविड काळात देखील काही लहानछोटे व्यावसायिक जीवनातून उठले आहेत !

विजुभाऊ नवीन

लहान लोक त्यामानाने लवकर जुळवुन घेतात. मोठ्या उद्योगांची सहन शक्ति जास्त असली तरी केटरिंग , सिनेमा , ऑर्केस्ट्रा असले उद्योग करणारे उद्योजक मात्र चांगलेच खाली बसले आहेत. बर्‍याच कलाकारांनी मासे विक्री , डबे तयार करणे असले उपक्रम चालू केले आहेत. गायक , नट , नृत्य करणारे कलाकार असे लोक इतर काहीच करु शकले नाहीत त्यांचे मात्र खरच हाल आहेत. या कलाकारांना जगण्यासाठी अक्षरशः रस्त्यावर यावे लागलेय

Cuty नवीन

मी फारसे ऑनलाईन शाॅपिंग कधी केले नाही. पण कोरोनाकाळात याची सर्वत्र गरज वाढली आहे. यात बॅकांच्या नियमामुळे नुकसान होते का? असेल तर कसे? या ऑनलाईन शाॅपिंगबाबत काही नियम आहेत का? मला याबाबत काही माहिती नाही.

असंका नवीन

अनेक प्रश्न अनुत्तरीत दिसत आहेत. "जर एखाद्या सिव्हिंग खात्यात कोणी कोटभर रुपये ट्रान्सफर केले तर ते सेव्हिंग अकाउंट ब्लॉक केले जाते" असं व्हायला नको. निदान इतक्या सरधोपट पद्धतीने तरी नक्कीच नको. बँक चौकशी करु शकते की पैसा कुठून आला- (चौकशी म्हणजे आपल्याकडेच विचारणा. परस्पर बाहेर नाही - तसं ते परवडतही नाही. ) -आणि संशयास्पद व्यवहाराची माहिती किंवा माहिती मिळत नसेल तर तशी वस्तुस्थिती, योग्य ठिकाणी पोचवू शकते. पण त्याआधीच किंवा परस्पर अकाउंट ब्लॉक करु शकणार नाही. तसे करायचे अधिकार ज्यांना आहेत ते वेगळे लोक आहेत. त्यांनी सांगितलं करा, तर मात्र बँकेला ऐकावं लागेल. ( चौकशीचे नियम आहेत. अतिरेकी किंवा इतर बेकायदेशीर घटक आपल्या कारवायांसाठी -पैसा इकडून तिकडे पोचवण्यासाठी- बँकांचा वापर करतात हे लक्षात घेतले तर मग, पैशाचा माग रहावा म्हणून केलेले असे नियम तर्कसुसंगत सुद्धा वाटतात. "https://www.rbi.org.in/Scripts/BS_ViewMasDirections.aspx?id=11566" इथे जाउन 'फाइंड' करा- "ऑन-गोइंग ड्यु डिलिजन्स". "मात्र ही रक्कम किती हे कोणीच सांगत नाही" असा सरसकट नियमच नाही- म्हणजी रीझर्व बँकेचा- त्यामुळे रकमेची मर्यादा सांगायचा प्रश्न नाही. अर्थात प्रत्येक बँक आपल्या खात्यासाठीच्या अटी ठरवायला मुक्त आहे, पण अशी अट कुणी ठेवली असेल, असं वाटत नाही. डिस्क्लेमर- वरील उत्तर जनरल माहितीसाठी. वरील उत्तराची सत्यता पडताळून बघावी. कुठलीही जबाबदारी स्विकारलेली नाही.

असंका नवीन

"दुसरे म्हणजे तुम्ही जर काही कर्ज घेतले आणि मुदती पूर्वी फेडले तर बँक तुम्ही एकूण किती कर्ज घेतले आणि ते फेडताना बँकेने किती चार्जेस लावायचे या बाबतही संदिग्धता ठेवते. कर्ज फिटले या भावनेत तुम्ही आनंदी होता इतकेच." शंका असेल त्या कर्जाचा खातेउतारा मागवा. त्यात जिथे कुठे "डेबिट" किंवा "विड्रॉवल" लिहिलंय त्याचा तपशील विचारा. उत्तर मिळत नसेल, किंवा समाधानकारक उत्तर मिळत नसेल, तर असा तपशील एक पत्र लिहून मागवा. (रच्याकने, लेखी द्या असं तोंडी सांगून कुणी लेखी देणं अवघड आहे. तशी मागणी लेखी करावी, आणि मागणी केल्याची पोच जवळ ठेवावी. उत्तर येत नाही तोवर आठवणसुद्धा लेखीच करुन द्यावी. खालचा अधिकारी दाद देत नसेल तर वरच्या अधिकार्‍याकडे या वस्तुस्थितीसकट दाद मागावी- परत एकदा- लेखी.) डिस्क्लेमर- वरील उत्तर जनरल माहितीसाठी. वरील उत्तराची सत्यता पडताळून बघावी. कुठलीही जबाबदारी स्विकारलेली नाही.

असंका नवीन

काही बँका तुम्ही तुमच्या खात्यात कॅश भरली म्हणूनही चार्जेस लावतात. याचे नियम काय आहेत? ( तसाही हा नियम विचित्रच आहे. माझे सेव्हिंग खाते हे कंपनीने उघडून दिले. ती ब्रँच हैद्रबादला आहे. पैसे भरायला म्हणून हैद्रबादला जायचे कसे शक्य आहे)
प्रत्येक बँकेचे आपले नियम आहेत या संदर्भात. बँकेचे नाव सांगितलेत तर ते नियम सांगता येतील, किंवा आपलं आपल्याला शोधायचं असेल तर - "सर्विस चार्जेस, आपल्या खात्याचा प्रकार, आपल्या बँकेचं नाव " असं शोधू शकताल.
कोअर बँकिंगनंतरही तुमचे खाते ज्या ब्रांचमधे असेल तेथेच कॅश भरावी हा आग्रह कशासाठी
असा आग्रही आग्रह नाही. तुम्ही जरूर दुसर्‍या शाखेतून रोख जमा करू शकताल. फक्त चार्जेस वेगळे लागतील. (परत एकदा- प्रत्येक बँकेचे यासंदर्भातील नियम वेगळे वेगळे आहेत.) त्या पद्धतीने बघितलंत तर आग्रह आहे म्हणा. पण बँका समाजसेवेसाठी काम करत नाहीत. नफ्यासाठी करतात. तुम्हाला एक सेवा हवी आहे, जी बँक देउ करतीये. हा व्यवहार आहे. शिवाय, कोअर बँकिंग म्हणजे बँकेचा प्लांट आणि मशिनरी आहे हे लक्षात घ्या. त्याला उभारायला आणि राखायला पण खर्च आहे.
माझे सेव्हिंग खाते हे कंपनीने उघडून दिले. ती ब्रँच हैद्रबादला आहे. पैसे भरायला म्हणून हैद्रबादला जायचे कसे शक्य आहे
वर सांगितल्याप्रमाणे माझ्या मते, तुम्ही त्यांच्या स्थानिक शाखेत रोख भरू शकताल. फक्त चार्जेस लागतील. जर फारच खर्चिक होत असेल, तर त्यासाठी एक वेगळे स्थानिक खाते उघडता येइल. डिस्क्लेमर- वरील उत्तर जनरल माहितीसाठी. वरील उत्तराची सत्यता पडताळून बघावी. कुठलीही जबाबदारी स्विकारलेली नाही.

श्रीरंग_जोशी नवीन

In reply to by असंका

असंका साहेब - तपशीलवार प्रतिसाद आवडला. आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम खात्यात भरायची गरज केवळ व्यापार्‍यांना पडायला हवी (जे चालू खाते वापरतात). बहुतेक व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट खात्यात ट्रान्स्फर सुविधेने होऊ शकतात. चेक, डिमांड ड्राफ्ट सारख्या सुविधा तर पूर्वीपासून आहेतच.

असंका नवीन

In reply to by श्रीरंग_जोशी

धन्यवाद! :) नवीन जमान्यातील बँका डेटा शिवाय बोटसुद्धा उचलत नाहीत. अनेक पद्धतीने तपासणी होउनच एखादा निर्णय घेतला जातो. म्हणजे आपण म्हणता तसे, एखाद्या निर्णयाचा व्यापारी वर्गावर काय परीणाम होइल, घरगुती ग्राहकांवर काय होइल, त्यांच्यावर जो परीणाम होइल त्याचा आपल्यावर काय परीणाम होइल इ. इ. त्यासाठी पुरेसा डेटा गोळा केला जातो, त्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो.

Nitin Palkar नवीन

वेळेची कमतरता.... आणि थोडसं अज्ञान या दोन गोष्टींचा गैरफायदा बँक कर्मचारी घेतात. पैकी सामान्य बँक ग्राहक कागदी घोडे नाचवायला कंटाळतो. त्यामुळे अनेक गोष्टी तो लेखी मागतही नाही आणि लेखी तक्रारही करत नाही. बँकेचे सर्व नियम सामान्य बँक ग्राहकांना माहित असणे शक्यही नाही आणि गरजेचंही नाही, मात्र आवश्यकता भासल्यास बँक कर्मचाऱ्यास ठणकावून ते विचारले पाहिजेत. तुमची तक्रार तुम्ही लेखी देऊन त्याची पोच तुम्ही घेतली तर बँकेला उत्तर देणे बंधनकारक असते.

असंका नवीन

In reply to by Nitin Palkar

+१ अगदी खरं आहे. (पण हे असं फक्त बँकेतच नव्हे तर सगळीकडेच लागू आहे!- एक रँडम स्मायली.) शिवाय आता ऑनलाइन च्या जमान्यात लेखी म्हणजे इमेल किंवा बँकेच्या साइटवर ग्रिवान्सेस दाखल करणे. ते इतकं किचकट राहिलेलं नाही. आणि ऑनलाइन तक्रारीला बँकवाले तत्काळ आणि गांभिर्याने सोडवायला घेतात. (पुर्वी ते एक ऑटो एस्केलेट होतं- आता आहे की नाही माहित नाही. म्हणजे तक्रार तत्काळ सोडवा नाहीतर ती आपोआप तुमच्या वरीष्ठ अधिकार्‍याकडे पाठवली जाइल. जर त्याने सोडवली नाही तर लगेच त्याच्या वरीष्ठ अधिकार्‍याकडे. असं करत करत थेट एम डी पर्यंत- ७ की काहीतरी दिवसात तक्रार पोचायची सोय होती. पण त्याबद्दल बर्‍याच दिवसात काही ऐकलेलं नाही.)