मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लॉकडाऊन: सव्वीसावा दिवस

ज्योति अळवणी · · काथ्याकूट

भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी पहिल्यांदा केवळ 22 मार्चला एक दिवस घरात बसण्याचे आवाहन केले. त्याचवेळी त्यांनी संध्याकाळी पाच वाजता घंटा, टाळ्या वाजवून करोना विषाणूशी दोन हात करणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवेकरऱ्यांचे कौतुक करण्यास सांगितले. आम्ही आणि आमच्या सोसायटी मधील सर्वांनीच अगदी उत्साहाने घंटा वाजवून ती काही मिनिटं साजरी केली. सर्वांना एकत्र आणण्याचा हा वेगळाच उपाय आणि एक वेगळाच विचार माझ्या मनाला खूप भावला.


आमच्या कुटुंबाचा घंटानाद.

त्यानंतर मोदींजींनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आणि खरं सांगायचं तर मला खूप आनंद झाला. गेली आठ वर्षं मी इतकी इतकी अडकलेले आहे माझ्या कामात की इच्छा असूनही 'माझा हक्काचा' आणि तो ही 'घरातला' वेळ मला मिळतच नव्हता. माझा असा वेळ हवा असेल तर चार-पाच दिवसांसाठी कुठेतरी बाहेर जाणे इतकंच शक्य होतं. त्यामुळे लॉकडाऊनची घोषणा झाली आणि मी त्याच रात्री जागून मला जे जे काही करायचं होतं त्याची यादी लिहून काढली. अनेक पुस्तकं वाचायची होती; छान जुनी गाणी अनेक दिवसात ऐकली नव्हती; माझं कपड्यांचं कपाट व्यवस्थित आवरायचं होतं. (साड्या एकीकडे, चांगले ड्रेस एकत्र आणि western outfits सर्वात खाली) इतके डिटेल्स लिहून ठेवले. ज्या मित्र-मैत्रिणींना एरवी फोन केला जात नाही त्यांची नावं लिहून काढली. रोज संध्याकाळी किमान एक-दोन जणांना फोन करायचा असं मनोमन ठरवलं. कधीपासून काही पदार्थ मनात  होते... वेळ नसल्याने करून बघायचे राहात होते; त्याची देखील वेगळी यादी बनवली.

तसं रोज एक तास चालणे, वीस मिनिटं सायकल आणि मग वीस मिनिटं योगासनं असा माझा अनेक वर्षांचा कार्यक्रम आहे. पण कधीतरी रात्री उशीर व्हायचा झोपायला त्यामुळे राहायचं. ते नियमित करायचं ठरवलं. केलेली यादी बघून माझी मीच खुश झाले आणि झोपले. लॉकडाऊनचा पहिला दिवस सुरू झाला तो माझ्या व्यायामाने. आदल्याच दिवशी स्वयंपाकाला येणाऱ्या ताईंना आणि घरकामात मदत करणाऱ्या जयश्रीला सुट्टी देऊन टाकली होती. एरवी ब्रेकफास्ट तयार करून मग मी स्वयंपाक घरातून बाहेर येते आणि माझ्या कामाला लागते. सकाळचा वेळ फोन वरून प्रभागाची कामं मार्गी लावणे आणि आवश्यक तिथे पहाणीसाठी जाण्याचे शेड्युल ठरवून त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी  बोलून त्यांना पहाणी करण्याच्या ठिकाणी बोलावणे; हे काम चालते. आज सगळंच करायचं होतं; उत्साहात स्वयंपाकघरात शिरले. ब्रेकफास्टची तयारी, पोळ्या, भाजी, संध्याकाळी काहीतरी खायला लागतं त्याची तयारी केली आणि मग dusting करून सगळं घर झाडून-पुसून घेतलं. घरात कामाला मदतीला कोणीही असलं तरी घरच्या बाईचा हात घरावरून फिरलाच पाहिजे हे आईचं सांगणं एकदम पटलं. सगळं आवरून अंघोळ केली आणि आम्ही सगळे जेवायला बसलो. कितीतरी दिवसांनी दुपारची झोपले मी. मग संध्याकाळी गच्चीवर गेले आणि ठरवल्याप्रमाणे फोन करून गप्पा मारत बसले. आठला खाली उतरले. मग रात्रीचं जेवण आणि मग आम्ही चौघेही मराठी नाटक 'कुसुम मनोहर लेले' बघायला बसलो. रात्री चक्क अकरा वाजता मी आडवी होते. लॉकडाऊनचा पहिला दिवस अगदी मनासारखा गेला या आनंदात मी झोपले. दुसरा दिवस देखील तसाच सुरू झाला. पण आज स्वयंपाकघरात शिरताना मी कानाला मोबाईलचे handsfree लावूनच ठेवले होते. एकीकडे आदल्या दिवशी प्रमाणेच  स्वयंपाकाचे काम चालू होते आणि दुसरीकडे माझे फोन्स चालू होते. सकाळीच व्यायाम करताना परागने (माझे आमदार पती) आणि मी सध्याच्या अवघड परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असणाऱ्या कामांची यादी तयार केली होती. त्यासंदर्भातील चर्चा प्रमुख कार्यकर्त्यांशी करणे; बदललेल्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या असलेल्या सहभागाविषयी सहाय्यक आयुक्त यांच्याशी बोलणे चालू होते. या सगळ्यात अकरा कधी वाजून गेले ते कळलेच नाही.
पोलिसांसोबत पुढील कामाची आखणी. त्याचवेळी त्यांना सॅनिटायझर्स आणि मास्क देखील दिले

लॉकडाऊन इतरांसाठी असले तरी ते महानगरपालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी ते नसल्याने आम्ही दोघेही कामाला लागलो. माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते देखील सामाजिक जवाबदरीची जाणीव ठेऊन मदतीला पुढे आले. अकरा वाजता माझ्या प्रमुख पाच कार्यकर्त्यांना मी कार्यालयात बोलावले होते. त्यामुळे पटकन आवरून मी कार्यालयात पोहोचले. माझ्या प्रभागामध्ये सिनियर सिटीझन्स खूप जास्त आहेत आणि त्यांची मुले परदेशात राहातात. या सिनियर सिटीझन्सना मदतीसाठी कामाला घरी महिला येतात. मात्र लॉकडाऊनमुळे आता या महिला येणे शक्य नव्हते. म्हणून मग अशा वृद्धांशी बोलून त्यांना समजावले की तुम्ही या महिलांशी बोलून त्यांना शक्य असेल तर तुमच्याच घरी ठेऊन घ्या. यासाठी ज्या महिला तयार झाल्या त्यांच्याकरता पोलिसांशी बोलून तीन-चार दिवसात एकदा काही वेळासाठी त्यांना घरी जाता यावे म्हणून पास तयार करून घेतले. ज्यांना ते शक्य नव्हते त्या वृद्धांशी बोलून त्यांच्यासाठी रोज जेवणाचे डबे लावून दिले. वृद्ध असल्याने त्यांचे बरेच पथ्य असते. त्यात खूप जेवण जात नाही. लॉकडाऊनमुळे ज्या महिला एरवी घरातून डबा देतात त्यांना तसेही आता काम नव्हते. मग असे सिनियर सिटीझन्स आणि अशा डबे देणाऱ्या महिला यांना परस्परांशी जोडून दिले.

सद्य परिस्थितीमध्ये संपूर्ण प्रभाग निर्जंतुकीकरण करणे ही सर्वात मोठी जवाबदारी होती. त्यासाठी लागणारे liquid आणि मशिन्स कुठे मिळतील याची आम्ही चाचपणी केली. परागने अग्निशमन दलाशी बोलणे केले. त्यामुळे त्यांनीच निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणारे liquid देण्याचे कबूल केले. आम्ही दहा मशिन्स देखील मिळवली. माझ्या प्रभागामध्ये त्रेपन्न बूथ आहेत. प्रत्येक बुथमध्ये दोन कार्यकर्ते अशी विभागणी करून त्यांना मशिन्स कशी वापरायची आणि किती liquid घालायचे ते अग्निशमन दलाच्या लोकांकडून समजावले. मग शेड्युल तयार करून संपूर्ण प्रभागतील सर्व इमारती/सोसायटीजमध्ये निर्जंतुकीकरण करण्यास सुरवात केली.
पोलीस स्टेशनचे निर्जंतुकीकरण

निर्जंतुकीकरणास सुरवात झाली आणि माझ्या प्रभागामध्ये पहिला करोना पेशंट आढळला. महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या पेशंटला लगेच हलवण्यात आले. त्यांच्या घरातील आणि मजल्यावरील इतर सदस्यांची देखील टेस्ट करण्यात आली. ही इमारत SRA असल्याने त्या मजल्यावरील सर्वच लोकांना त्या इमारतीमधून हलवण्यात आले आणि संपूर्ण इमारत महानगरपालिकेकडून निर्जंतुकीकरण करून सील करण्यात आली. मात्र असा पेशंट आढळल्याची बातमी लगेच पसरली आणि आजूबाजूच्या इमारतींमधील लोक घाबरून गेले. मला आणि परागला सतत फोन्स यायला लागले की आमच्या इमारतीमध्ये देखील निर्जंतुकीकरण करून द्या. त्यांची ही पॅनिक प्रतिक्रिया आम्ही समजू शकत होतो. त्यामुळे त्या इमारतीच्या बाजूच्या सर्वच इमारतींमध्ये निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला. सुरवातीच्या करोना संदर्भातल्या संदिग्ध वातावरणामुळे कार्यकर्ते देखील एकदम शेजारच्याच इमारतीमध्ये जाण्यास तयार होईनात. ते समजून घेऊन शेजारील इमारतीमध्ये आम्ही दोघांनीच जाण्याचे ठरवले. परागने स्वतः निर्जंतुकीकरण करतानाचा पोषाख चढवला आणि मी त्याच्या सोबत राहिले. आम्ही दोघे स्वतः हे काम करत आहोत म्हंटल्यावर कार्यकर्त्यांची हिम्मत देखील वाढली आणि आजूबाजूच्या सर्वच इमारतींचे  निर्जंतुकीकरण झाले.
पराग निर्जंतुकीकरण करताना

करोना बाधित रुग्ण एकीकडे दिसत होते आणि दुसरीकडे लॉकडाऊनचा अति बाऊ करणाऱ्या इतर नागरिकांनी अति प्रमाणात सामान घरी घेऊन जाण्यासाठी बाजारात आणि वाण्याच्या दुकानांमध्ये गर्दी करायला सुवात केली होती. त्यामुळे आमच्या इथला भाजी-फळ बाजार लॉकडाऊन असूनही गजबजलेला दिसत होता. शेवटी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त आणि आमच्या इथल्या सिनियर पोलीस इन्स्पेक्टर यांनी मला संपर्क करून म्हंटले की आपण बाजार बंद करणे आवश्यक आहे. त्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. मात्र एक गृहिणी म्हणून मला भाजी-फळ बाजार बंद होणे म्हणजे आकाश कोसळल्या सारखे वाटले. म्हणून मग महानगरपालिका आणि पोलीस खाते यांना समजावल्या नंतर त्यांनी एकत्रित निर्णय घेतला की बाजार हलवायचा. माझ्या प्रभागात आणि माझ्या शेजारच्या प्रभागात अशी दोन मैदाने आहेत. मी त्यांना म्हंटले की या दोन मैदानांमध्ये तुम्ही संपूर्ण बाजार विभागून द्या. म्हणजे परत एकाच ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता कमी होईल. मात्र त्यांनी तरीही फक्त माझ्या प्रभागातील मैदानात संपूर्ण बाजार हलवला. सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी चार ते आठ अशी वेळ पण ठरवण्यात आली. इथे भाजी-फळवाले योग्य अंतरावर बसवले होते. एका इमारतीमधून किंवा किमान एका मजल्यावरून एकाच व्यक्तीने यावे; आठवड्याची भाजी एकत्र घेऊन जावी; वृद्धांनी येऊ नये असे कितीही सांगितले तरी सुशिक्षित नागरिक गर्दी करतच होते. मग महानगरपालिकेने निर्णय घेऊन आता बाजाराची वेळ केवळ सकाळी नऊ ते बारा केली आहे. याविषयी सतत प्रत्येकाशी फोनवरून मी बोलतच असते. पण मला वाटते एका मर्यादेपलीकडे वैयक्तिक जवाबदारी नावाची गोष्ट असतेच ना! आता लॉकडाऊनमुळे हाल होणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार आणि गरजूंसाठी food packets तयार करून घ्यायला आम्ही सुरवात केली आहे. मग ही food packets वाटण्याची व्यवस्था देखील केवळ चार कार्यकर्त्यांच्या मदतीने लावून टाकली. यादरम्यान आपल्या आदरणीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी दारिद्य्ररेषेखालील नागरिकांसाठी पुढील तीन महिने मोफत धान्य देण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे ज्यांचे बँकेमध्ये जन-धन अकाउंट असेल त्यांना तीन महिन्यांपर्यंत दर महा पाचशे रुपये जमा होणार होते. या योजना घोषित होताच आम्ही कामाला लागलो. माझ्या प्रभागातील दारिद्य्ररेषेखालील नागरिक आणि जन-धन अकाउंट असणारे लोक; त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचते आहे का... त्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय केले पाहिजे त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे प्रत्येक वस्तीमधील कार्यकर्त्यांना फोन करून तिथल्या लोकांची लिस्ट बनवायला घेतली. हे काम आम्ही सुरू केले आणि तोपर्यंत लॉकडाऊनची  मुदत वाढल्याचे घोषित झाले. या घोषणेनंतर अपेक्षेप्रमाणे नागरिकांमध्ये परत एकदा काहीसे पॅनिक वातावरण निर्माण झाले. परत पुढचे दोन दिवस वाण्यांच्या दुकानांसमोर रांग लागली. त्यातच कांदे-बटाट्यांच्या व्यापाऱ्यांनी APMC बाजार बंद करण्याची घोषणा केली. मात्र त्याचवेळी त्यांनी हे सांगणे आवश्यक होते की अडते (शेतकरी ते APMC बाजार जोडणारे middle persons) कांदे-बटाट्याचे टेम्पो थेट शहरांकडे घेऊन येणार आहेत. लोकांमध्ये गैरसमज पसरायला मुळीच वेळ लागत नाही. त्यामुळे परत एकदा पुढचे दोन दिवस कांदे-बटाट्यांसाठी रांगा लागल्या. आम्ही परागच्या माध्यमातून 'शेतकरी ते थेट ग्राहक' योजनेअंतर्गत गेली चार वर्षे माझ्या प्रभागात एका ठिकाणी भाजी-फळाचा स्टॉल दर बुधवार आणि शनिवार सकाळी दहा ते एक लावत आहोत. या शेतकऱ्यांशी बोलून आम्ही आता एक दिवसा आड या भाजी-फळ स्टॉल माझ्या प्रभागात तीन वेगवेगळ्या ठिकाणी लावतो आहोत. सकाळी साधारण आठ वाजता ही भाजी-फळं येतात. यांची भाजी-फळं विकण्याची वेळ देखील नऊ ते बारा ठरली आहे. या तीन स्टॉल्सची जवाबदारी तीन कार्यकर्त्यांना दिली आहे.
भाजी-फळांचे स्टॉल

आजही निर्जंतुकीकरण करण्याचे काम चालू आहे. संपूर्ण प्रभागामधील सर्व इमारतींमध्ये दोन वेळा निर्जंतुकीकरण झाले आहे. त्यातच ज्याठिकाणी करोना बाधित रुग्ण आढळला आहे तिथे जास्त प्रमाणात निर्जंतुकीकरण करून घेतो आहोत. सिनियर सिटीझन्सना जेवणाचे डबे अजूनही पोहोचवले जात आहेत. त्यांना जरूर पडेल तसे ते फोन करतात. मग त्यांना हवी असणारी औषधे पोहोचवायचे काम देखील आम्ही करतो आहोत. केंद्राकडून येणारे धान्य योग्य लोकांपर्यत पोहोचावे यासाठी देखील काम चालू आहे. ज्यांना कुठूनही कोणतीही मदत मिळणे शक्य नाही (माथाडी/रोजंदारीवर काम करणारे मजूर/कामगार) अशा लोकांसाठी महानगरपालिका देखील धान्य देणार आहे. त्यामुळे अशा गरजूंची यादी करून घेण्याचे काम आम्ही सुरू केले आहे.

मी आणि परागने घराबाहेर पडणे वाटून घेतले आहे. तो आमदार असल्याने त्याची जवाबदारी जास्त आहे. मात्र त्यामुळे तो बाहेर पडतो तेव्हा माझ्या प्रभागातसुद्धा आवश्यक ठिकाणी जाऊन येतो. नगरसेविका म्हणून मला देखील जावेच लागते... आणि मी जाते देखील.
विरोधी पक्षनेता श्री. देवेंद्रजी फडणवीस, मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि सर्व आमदार यांचा ऑडियो कॉन्फरन्स कॉल.

परागचे कामाचे detailed planning आणि आमच्या मनीमाऊची नेहेमीप्रमाणे असलेली साथ.

...................... Mean while............ सकाळी सहाला उठून व्यायाम चालू आहे. (इथे एक खूप महत्वाचा मुद्दा नमूद करायचा आहे बरं का! आमच्याकडे ट्रेडमिल आणि इलेक्ट्रॉनिक सायकल असल्याने हे सगळे व्यायाम प्रकार घरातच होतात. सोशल डिस्टंसिंग पाळून.) नंतर साडेनऊ दहापर्यंत ब्रेकफास्ट, जेवण आणि संध्याकाळचा खास पदार्थ याची तयारी करून ठेवते आहे. घरात असेन तर लगेच आणि बाहेर पडले तर घरी आल्यावर घर झाडून पुसून घेण्याचे काम करतेच आहे. दुपारची झोप थोडी उशिराने का होईना पण होते आहे. संध्याकाळी गच्चीत जाते आहे. अधून मधून आपल्या मिपावर फेरी आहेच. शशकमध्ये भाग घेतला आहे. (योग्य वेळी ते कळेलच) दर शुक्रवारी मी माझ्या मन:स्पंदन या ब्लॉगवर कथा, लेख, कविता लिहीत असते. ते देखील चालूच आहे. मात्र अजून पुस्तकं वाचणं, कपाट लावणं, छानसे आई करते तसे आपले मराठमोळे खास पदार्थ बनवणं हे आणि असंच बरंच काही बाकी आहे. अर्थात आपल्या मानत असतं ते सगळंच घडतं असं नाहीच न! तसं घडलं तर माझा सदरा म्हणजे 'सुखी माणसाचा सदरा' होईल; आणि मग तो मला दुसऱ्याला द्यावा लागेल. एका विषाणू मुळे आपल्या देशातच नव्हे तर जगभरात पसरलेल्या भयप्रद, नैराश्यपूर्ण अशा वातावरणात आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची नवी उमेद मिळण्यात महत्वाची भूमिका बजावली ती ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता केलेल्या दीपप्रज्वलनाने! आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी अंधारातून निरंतर प्रकाशाकडे जाण्यासाठी, निराशेकडून आशेकडे जाण्यासाठी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरातील सर्व विजेचे दिवे बंद करून घराच्या दरवाज्यात किंवा बाल्कनीत उभे राहून ९ मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा,टॉर्च किंवा मोबाइलचा फ्लॅशलाइट पेटवण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला आमच्या संहित कोट्यवधी देशवासीयांनीच नव्हे तर परदेशांतील नांगरिकांनीही उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातून आपण एकाच ध्येयाने लढत आहोत ही भावना दिसून आली.
आमचे दीपप्रज्वलन

खरं सांगू का.... मी मुळीच या लॉकडाऊनला कंटाळले नाही आहे. अजूनही खूप काही करायचं बाकी आहे; आणि मला जमेल ते आणि तितकं करणारच आहे.

वाचने 18560 वाचनखूण प्रतिक्रिया 34

चौकस२१२ 19/04/2020 - 06:15
अश्या कठीण वेळी नेतृत्वाची कसोटी लागते ...त्यामुळे हे एका वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आवडलं ...

प्रचेतस 19/04/2020 - 10:42
छान लिहिलंय एकदम. समाजाच्या विभिन्न अंगांवर ह्या लॉकडाउनचा कसा आणि किती परीणाम होतोय आणि त्यावर आपापल्या परीने कसा मार्ग काढला जातोय हे वाचणे रोचक ठरतेय. निर्जंतुकीकरणासाठी चेहरा झाकण्यास हेल्मेटचा वापर असाही केलेला आवडला.

गोंधळी 19/04/2020 - 11:40
शेवटचा फोटो मस्त. ही मांजरं कायम स्वतःच्याच विश्वात असतात. बाकी हे कोरोना संकट लवकर दुर होवो हिच प्रार्थना आहे.

मदनबाण 19/04/2020 - 11:42
लेखन आवडले ! अवांतर :- शेवटी आज मी माझ्या हातानेच टकुर्‍यावर इतके दिवस सहन केलेल रान कापुन टाकले एकदाचे ! खरंतर पहिले लॉकडाउन जाहिर केले होते त्याच्या आधीच २ दिवस केशकर्तनास जाणार होतो पण काही कारणास्तव जाणे झाले नाही. शेवटी आज झिरोकट करुन मी मोकळा झालो, आता मस्त पैकी ठेवणीतील खस अत्तर अंगाला लावुन निवांत झालो आहे. लईच आनंद झाला हाय बघा. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaathikkathottam... :- Thanneer Mathan Dinangal

चौथा कोनाडा 19/04/2020 - 11:54
वाह, सुरेख लिहिलंय ! सेवेचा वेगळा प्रस्पेक्टिव्ह या निमित्ताने वाचायला मिळाला ! आपल्या कार्याला शतशः नमन _/\_ या लेखामुळं आपण मिपाकर ग्राउंड लेव्हलला जाऊन सेवा करणार्‍या कर्तबगार व्यक्तिमत्वांशी जोडलो गेलो आहे याचा खुप मोठा आनंद आहे.

आपण आणि आपल्या साहेबांनी अतिशय उत्तम काम सुरु केलं आहे, गरजू लोकांना उत्तम मदत केली आहे. उत्तम अनुभवांनी युक्त असलेले लेखन आवडले. काळजी घ्या... -दिलीप बिरुटे

मित्रहो 19/04/2020 - 23:48
लिखाण तर छान त्याहीपेक्षा कामाचा आवाका फार मोठा आहे. खूप छान काम करीत आहात

सान्वी 20/04/2020 - 00:27
खूप सुंदर... लॉकडाऊन मध्ये तुमचं काम सांभाळून वैयक्तिक आवडी पूर्ण करण्यासाठी पण वेळ काढताय हे विशेष आवडले. मलाही खरच असं वाटतंय की या अनपेक्षितपणे मिळणाऱ्या सुट्टीचा छान सदुपयोग करून घ्यावा सगळ्यांनी, एरव्ही आपण सगळेच " मानसिक" रित्या बिझी असतो पूर्णवेळ. आणि सुट्ट्या बऱ्याचश्या घरकामात नाहीतर फिरण्यात जातात. आता मात्र वेळ आहे तर मनासारखं जगून घ्यावं सगळ्यांनी . बादवे लॉकडाऊन लेख लिहिण्याचं काही schedule आहे का?म्हणजे कुणी कोणत्या दिवशी लिहायचं असं काही?

यानिमित्ताने तुमच्याकडून एक माहिती हवी आहे. सगळ्यांनाच उपयोगी पडेल म्हणून इथे विचारत आहे. जसा पुणे शहरासाठी ई-पास चे संकेतस्थळ आहे तसे मुंबई / ठाण्यासाठी एखादे संकेत स्थळ आहे काय ? जिथून ई-पास मिळवून अत्यावश्यक कार्यासाठी बाहेर पडता येईल ? तसे नसेल तर कोणत्या अधिकार्‍याच्या परवानगीने प्रवास करता येतो ?

In reply to by धर्मराजमुटके

सध्या मुंबई बाहेर किंवा आत जाण्यासाठी मुळीच परवानगी नाही. टोल नाक्यावरून परत पाठवून देतात.... तुम्ही चुकून तिथपर्यंत पोहोचलात तर!

In reply to by धर्मराजमुटके

सध्या मुंबई बाहेर किंवा आत जाण्यासाठी मुळीच परवानगी नाही. टोल नाक्यावरून परत पाठवून देतात.... तुम्ही चुकून तिथपर्यंत पोहोचलात तर!

In reply to by ज्योति अळवणी

ओके ! बर्‍याच शहरांमधे / राज्यांमधे अतितातडीच्या कामांसाठी ई-पास ची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई किंवा ठाण्यासाठी देखील ती असायला हवी होती. आता अशी सुविधा नाही म्हणजे कोणाची तरी ओळख काढून परवानगी मिळविणे हाच पर्याय नागरीकांच्या हाती उरतो.

In reply to by धर्मराजमुटके

शलभ 22/04/2020 - 02:13
ही घ्या लिंक. आजच एका मित्रासाठी ऑनलाईन फॉर्म भरला. https://covid19.mhpolice.in/?__cf_chl_jschl_tk__=5cda3d7d57d16f2623a73d86aaa49894e55f5465-1587445394-0-AdI7Rwe-8PLHrQqLkXEqO_F92g1NVTtruwR5eod98HCP6spe8DYspNSxP7ueOmfZTCViCrmnt8jxfD323EBr5fd7ldkQdlayyZccRTki7BeKHIynjD0ePxckQ_i7ZQWcVM7cnLQ4k-wOcxyXOwgSUXlzX1XebNNr52s_YCUWwl-vXEGYUDJOTMGyyf7V4S4QyzrDZofseWdkZYRKItVvVkMB8OxJtpaxgjFAFayJQ5a0wzrY3VA1fqkc5OT9alsmCIZiXKZB6psodDB3q7KvPI4

मीअपर्णा 21/04/2020 - 02:37
काही गोष्टी फार आवडल्या जसं पराग यांनी स्वतःच ते काम हाती घेणं. दॅट्स लाइक अ लीडर अ‍ॅटिट्युड, 'शेतकरी ते थेट ग्राहक' योजनेअंतर्गत एका ठिकाणी भाजी-फळाचा स्टॉल लावणे. मी मुंबईत राहत नसल्याने तिथला आँखो देखा हालही पाहायला मिळाला. तिथल्या ज्येष्ठ नातेवाईक आणि अन्यांची काळजी असतेच. असे लेख आले की आमच्यासारख्यांना माहिती मिळते. तो भाजी पाल्याचा ट्रकवाला फोटो खटकला. कुणीही सोशल डिस्टंसिंग पाळताना दिसत नाही. एक रांग आणि त्यातही ६-८ फूट अंतरावत लोकं उभी करून एका ठिकाणी एंट्री आणि दुसरीकडून एक्सिट सिस्टीम करता आली तर पाहा. अर्थात आम्ही हे लांबून सल्ले देणं सोपं आणि तिथे ते अमलात आणणं किती कठीण याची कल्पना आहेच. पण लिहिल्याशिवाय राहावत नाही. अमेरिकेतही असली लोकं पाहायला मिळतात त्यामुळे ही कमेंट फक्त तिथे हे करा असं सांगण्यासाठी नक्कीच नाही हे इथे स्पष्ट करू इच्छिते. कीप अप द गूड वर्क यॉल :)

ऋतु हिरवा 21/04/2020 - 18:56
छान लेखन आणि घर व नगरसेविका म्हणून पार पाडत असलेल्या जबाबदार्या याचे खरेच कौतुक वाटते . सर्व गोष्टी तुम्ही छान सांभाळत आहात

टर्मीनेटर 14/05/2020 - 02:27
कार्यक्षम लोकप्रतिनिधी कसे असावे ह्यचे उदाहरण आहात आपण दोघे उभयता! अशीच लोकसेवा करत रहा, जनसामान्यांचे आशीर्वाद मिळवत रहा!