नमस्कार माझ्या तमाम पिझ्झा, बर्गर, वडापाव शिवाय जिवंत असणाऱ्या मिपाकरांनो.
'लॉक डाऊनमुळे बसलोत रिकामे घरी
मिळत नाहीये साधी चाखायला पाणीपुरी
घ्यावी का थोडी रिस्क आणायला श्रीखंड
भीती वाटते उगाच सुजवतील भुखंड.'
माझ्या अश्या गुणी मित्रांना दाबेली शिवाय रहावं लागतंय त्या मूर्ख विषाणूपायी. त्याचं नाव पण घेणार नाही मी मूर्ख कुठला. इतका त्रास देतात का राव? तो चीनच्या बाहेर यायचा नाही म्हणून आमचे मित्र गाफील राहिले. सांगून तर यायचं. आम्ही पहिलेच नसतं का हातं धुवायला चालू केलं मग. चिटर कुठला. समोर दिसायला पाहिजे तो फक्त........ चौपाटीची आठवण येतंच असेल म्हणा पण काय करणार? नाही म्हंटल तरी आपल्या आवडीचं अन्न घरपोच आणून देणारे झोमॅटो, स्वीगीची तर येतच असेल. घरचं तर आपल्याला आवडतच नाही. घरच्या अन्नाला चव थोडी असते. हात धुवून स्वयंपाक केल्यास चव थोडीच येणार त्या अन्नाला. बरोबर आहे तुमचं एकदा का लॉकडाऊन संपलं की मग लागेल ते चविष्ट खायला आपण मोकळे. पण सध्या तरी नाईलाजाने घरचंच खावं लागणार. थोडक्यात काय मजबुरी का दुसरा नाम कोविड-१९.
या जगात अशी कुठलीही गोष्ट नसेल जी १००% लाभदायक किंवा हानिकारक असेल अगदी विषाणूसुद्धा (हे माझे वायफळ मत असू शकते). हल्ली ड्युटी सुरू असली तरी कामाचा ताण बराच कमी झालाय. फावला वेळ बराच मिळतोय. अश्या वेळेत माणसाची निरीक्षण शक्ती जोरदार काम करायला लागते. आता हेच बघा ना मी जो पेला पाणी प्यायला वापरतो तो पहिल्यांदा 360 अंशात निरखून पाहिला. मला खूप मादक वाटला तो. इतक्या दिवस याचं सौंदर्य आपल्यापासून लपून कसं राहील याचं आश्चर्य मला वाटलं. कॅलेंडरच पान प्रत्येक महिन्याला घरातील कोणीतरी बदलते हाही साक्षात्कार याच दरम्यानचा. नजरेसमोरील रोजच्या गोष्टींमधला हा बदल मला नवा वाटला. हाच तर फायदा करून दिलाय ना माझा या छोट्या दुश्मनाने. मला खात्री आहे तुम्हाला पण असा साक्षात्कार नक्की झाला असणार हो ना.
सकाळी ८ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत मी ड्युटीवर असतो. रविवारी आलटून पालटून. तुम्हाला मी काय बोलतोय हे नीट कळत नसेल ना. एक मिनिट. ही घडी नीट विस्कटून सांगतो. मी व्यवसायाने डॉ. असून एका प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देतोय. तेथे आम्ही २ डॉ. आहोत म्हणून रविवारी आलटून पालटून.
एके दिवशी सकाळीच बिरुटे सरांचा विनंती कमी आदेश जास्त निरोप आला धागा लिहिण्याबद्दल. आम्हाला विषाणूपेक्षा त्यांचा भीतीयुक्त आदर जास्त असल्याने तातडीने कागद आणि पेन घेणे आलेच. पण काही सुचेचना काय लिहावं तर. मिपाकरांनी सगळे विषय कोळून प्यालेले. आधीच्या धाग्यांमध्ये विरंगुळा, घरकामातील विविधता, घरून हापिस काम, भाजीचे लोणचे तर कोणी प्रतिबंधात्मक उपाय सांगितलेलेच आहेत. मग म्हंटल हे झालं घराच्या आतील. मी तुम्हाला थोडं घराच्या बाहेरील जग दाखवतो. थोडक्यात माझं दैनंदिन. चला तर मग !
मी मामांकडे राहतो. तेथून दवाखाना १०कि.मी. अंतरावर आहे. रोज येणं-जाणं करतो. लॉक डाऊनच्या सुरुवातीच्या काळात पोलीस काका अडवत. तेव्हा ओळखपत्र दाखवावं लागे. आता आमची ओळख झालीये, तर ओळखपत्राच्या ऐवजी हात दाखवतो(रामराम करतो):) बाहेर बऱ्यापैकी मार्केट बंद दिसत असलं तरी सोशल डिस्टन्स हा प्रकार सर्वांना नवीन आहे. खेड्यात यात शिथिलता बघायला मिळू शकते.
दवाखान्याचा परिसर मोठा आहे. शासकीय असल्याने तो आमच्या बापाचा आहे असा अविर्भाव येथील गावकऱ्यांचा आहे. आवारातील पडीक जागेचा वापर धूम्रपान आणि इतर व्यसनाकरिता नियमित होतो. आता लॉक डाऊनमध्ये पुरवठा कमी असल्याने जो साठा आहे तो जास्ती लोकांमध्ये शेयर केल्या जातोय. उदा.१ सिगारेट ४ लोकांमध्ये पिणे. मी डॉ.या नात्याने त्यांना काहीच बोलू शकत नाही कारण दवाखाना त्यांच्या बापाचा आहे. गमतीचा भाग बाजूला ठेवता त्यांना याआधी हटकून बघितलंय पण ते विषाणू सारखा न दिसणारा हमला करतात आणि न दिसणारा हमला परतवून लावण्यात भरपूर वेळ जाऊन मानसिक त्रास होतो तो वेगळाच.
गावच्या सरपंचांचा मुलगा माझा चांगला मित्र झालाय. पुण्यात इंजिनिअरिंगला आहे. तो सध्या गावात आल्याने दवाखान्यात नियमित चक्कर असते साहेबांची. तक्रार एकच हे गाववाले लोक बोलताना काहीच अंतर ठेवत नाहीत. स्वच्छता नाही. बाजूची आजी तर कानाजवळ येऊन बोलते. पण या सगळ्यात मी काहीच करू शकत नसल्याने विषय हलक्या स्माईलने संपतो.
दवाखान्यात बऱ्यापैकी बदल या काळात आम्ही केलेत. सर्व प्रथम कर्मचारी वर्गाला या आजाराची नीट माहिती देण्यात आली. जगभराचे थैमान घालत असलेले आकडे दाखवण्यात आले. रुग्णांची बैठक व्यवस्था बदलवण्यात आली. बाकड्यांची जागा सुरक्षित अंतरावर ठेवलेल्या खुर्च्यांनी घेतली. ज्या रुग्णांकडे मास्क वा रुमाल नाही त्यांना केबिन मध्ये पाठवताना मास्क घालून पाठविण्यात येते. प्रत्येक रुग्ण तपासल्यावर मी हात सॅनिटायझरने धुतो. यामुळे पुढच्या येणाऱ्या रुग्णाबरोबर माझं आणि माझ्या परिवाराचे देखील संरक्षण होते.
माझा रुग्णांशी संबंध येतो म्हणून मामाच्या घरी मला विचित्र वागणूक मिळत नाही. हा विषाणू आल्यापासून मला स्वतंत्र खोली देण्यात आलीये. म्हणजे मीच मागून घेतली आहे. घरी आल्यावर रोज माझे कपडे मी धुवून टाकतो. मला मामा सोबत जेवणाचा आग्रह करतात पण मीच ताट मागून घेतो. थोडक्यात मी स्वतःला अलिप्त करून घेतलंय त्या न दिसणाऱ्या मूर्खामुळे.
गावात जि.प. सभापती राहतात. त्यांच्या बायकोने दवाखान्यातील नर्सकडून मास्कचा एक मोठा बॉक्स काढून नेला. लक्षात येताच लगेच मिटिंग भरवली. बॉक्स कोणी दिला असेल याची पूर्वकल्पना होतीच. संशयीतावर नजर रोखून सर्व कर्मचाऱ्यांची निरमा टाकून धुलाई केली. गेलेला बॉक्स तर परत येणार नव्हता पण मिटिंग झाल्यावर संशयीतेने आपला गुन्हा कबूल केला हेही नसे थोडके. असे भरपूर किस्से घडलेत पण विस्तार भयास्तव येथे देत नाही. आरोग्य केंद्राशी निगडित वेगळा धागा काढून लिहेन.
बाकी मामांची लेकरं त्यांच्या आजी-आजोबा, काका-काकूंकडे शेतात पाठवून दिलेत. दवाखान्यातून घरी येताना लागणारे सामान मीच आणतो. बाकी कोणाला बाहेर पडू देत नाही. तुम्ही सुद्धा घरात जो धष्टपुष्ट आहे त्यालाच पाठवत जा. ते सुद्धा अगदी काम पडलं तरच. बाकी या आजाराची बऱ्यापैकी माहिती आपणा सर्वांना आहेच. सर्वांनी काळजी करू नका, काळजी घ्या. आता चांगल्या सवयी अंगीकारल्या असतील त्या कायम ठेवा. आपल्या दुश्मनाला मी 'पुन्हा येईन....मी पुन्हा येईन' म्हणण्याची संधी देऊ नका.
फार आवडली फर्स्ट हँड माहिती.