मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुकटात विनासायास वेटलॉस

शाम भागवत · · काथ्याकूट
वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल सापडल्यामुळे नशिबी आलेल्या गोळ्या आणि आता या आयुष्यभर घ्यावयाच्या आहेत अस डॉ. नि सांगितल्यावर मनाला बसलेला हबका. काही जणांचा वाढलेला रक्तदाब व त्यावरच्या गोळ्या , मधुमेह पूर्व स्थिती लक्षात आल्यावर उडालेली घाबरगुंडी तर मधुमेह झाल्याचे निदान झाल्यावर घरातल्या सर्वांच्या चेहऱ्यावर अवतरलेली काळजी. आणि या सगळ्यातून हे खा व हे खाऊ नका ची भली मोठी यादी. शिवाय गुडगेदुखी, ऍसिडिटी , .. , .., .. असच बरच काही यांच्यासाठी हे लिहितोय. ह्या सगळ्या त्रासातून कस मुक्त व्हायच?, एक पैसा जास्त खर्च न करता हे कस साधायच? श्रीमंत असो की गरीब दोघांनाही जमू शकेल,तसेच स्त्री पुरूषात अजिबात भेदभाव न करता दोघांनाही एकच पद्धत कशी वापरता येईल, तसेच त्यामागे विज्ञानाचा भक्कम पाठिंबा असला पाहिजे. वगैरे वगैरे ....... थोडक्यात आखूड शिंगी, बहुदुधी, गरीब, दूध काढताना लाथा न मारणाऱ्या बहुगुणी गायीबद्दल हे लिहितोय. कै. डॉ.श्रीकांत जिचकार एक अवलिया माणूस. एमबीबीएस, एमडी झाल्यावर आयपीएस त्यानंतर चक्क आयएएस. पण चारच महिन्यात नोकरीचा राजीनामा देऊन आमदार, मग मंत्री, राज्यसभेचे खासदार. या माणसाने प्रगती तरी किती वेगाने करावी? पण हे सगळं ४९ वर्षांच्या आयुष्यात साधायच म्हणजे एवढा वेग हवाच की हो! घरातल्या ग्रंथालयात बावन्न हजार पुस्तक. विद्वत्ता दाखविण्यासाठी जाहिरात म्हणून नक्कीच जमवलेली नसणार. उलट सगळी वाचलेली असण्याची शक्यता जास्त. कारण ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. २८ सुवर्णपदक मिळवलेला माणूस हा. नक्कीच पुस्तके वाचलेली असणार. तर असा हा माणूस. भरपूर परदेश वाऱ्या केलेला असूनही त्याची भारताशी जुळलेली नाळ तुटली नव्हती. साधारण अशी माणसे थोडीशी भारतीय संस्कृतीशी फटकून वागतात. पण इथेही आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. भारतीय संस्कृती व प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान व संस्कृत यात एमए केलेय. हे मी आपल वानगीदाखल सांगतोय कारण तस पाहिल तर त्यांनी १० विषयात एमए केलेय. इतकच काय मानाची डी. लिट. पदवी मिळालीय त्यांना संस्कृतामध्ये. तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल. त्यांनी सांगितल की, "शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे." स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली. मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे. ते पुढे सांगतात की, "दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका." याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका. सगळ वैज्ञानिक नियमावर आधारलेले भाषण. समोर अनेक मान्यवर बसलेले. त्यामुळे बऱ्याच वेळेस अशी भाषणे इंग्रजीत चालतात आणि जिचकार तर इंग्लिश लिटरेचर मध्येपण एमए केलेले. पण तरीही हा विचार सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे यासाठी हे भाषण त्यांनी मराठीतून दिले आहे. समोर नुसते मान्यवर नाही तर पुण्याचे मान्यवर बसणार आहेत म्हणून त्यांनी अनेक इंग्रजी संज्ञांना पूरक मराठी संज्ञा शोधून काढल्या होत्या व त्या संज्ञा पाठ करून मगच ते व्याख्यान द्यायला आले होते. (या मराठीतील संज्ञा शोधणे व पाठ करणे हे कामही त्यांना सोपेच गेलेले असणार. कारण ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मिती मंडळाचे सभासद होते!!!) एखाद्या माणसाला बेंबीच्या देठापासून कळकळ असते म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठीही हे व्याख्यान ऐकायला हरकत नाही. आपल्या या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी "नागपूर फिटनेस मुव्हमेंट" आणि "पुणे फिटनेस मुव्हमेंट" अशा दोन संस्था सुरू केल्या. पण त्या काळात फेसबुक किंवा व्हॉटऍपस वगैरे काहीच नव्हत. नाहीतर याचा प्रसार फार वेगाने झाला असता. मनोगत, मायबोली किंवा मिसळपाव सारखा एखादा संकेतस्थळ तयार करता अल्लाही असत कदाचित. पण वाचणार कोण? इंटरनेट फार महाग होत त्यावेळेस. टाटा कंपनीच्या व्हीसएनएल ला वर्षाकाठी पाच सहा हजार भरल्यावर कनेक्शन मिळायच. शिवाय घरात फोन असला पाहिजे ही पूर्वअट. आणि नेट वापराला सुरवात झाली की दर मिनिटाला एक टेलीफोनचा कॉल एवढे पैसे टेलिफोनच्या बिलात यायचे तो खर्च वेगळाच. नेट वापरणे हे सामान्यांच्या कुवती बाहेरची गोष्ट होती. अपवाद फक्त आयटी मधल्या लोकांचा! तरीपण राज्यसभेच्या सदस्याला बऱ्याच सोयी सुविधा असतात. ओळख पाळख असते. त्यामुळे प्रसाराचे काम चालू होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दोनच वर्षांनी म्हणजे १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून त्यांना तिकिट मिळाल पण फक्त ३०००+ मतांनी पडले. इतकेच नव्हे तर राज्यातले आणि त्याचबरोबर केंद्रातले काँग्रेसचे सरकार पडले. प्रसारावर फारच मर्यादा आल्या.सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे २००४ साली जेव्हा कॉग्रेसचे सरकार राज्यात व केंद्रात आले त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मला वाटते या नवीन विचारांचे फक्त बी लावायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवले होते. त्यांचा या भाषणाचा एक ऑडिओ यूट्यूबवर होता. पण दोन तास तीन मिनिटांचा ऑडिओ म्हटल्यावर बरेच जण तो उघडून सुद्धा बघत नसत. आणि यदाकदाचित कोणी उघडलाच तर बरेच जण पहिले प्रास्ताविक संपेपर्यंतही कळ काढू शकत नसत. त्यामुळे मूळ भाषण सुरू होण्याआधीच तो बंद केला जायचा. एवढा वेळ असल काही ऐकायला तो थोडाच वपू किंवा पुल चा व्हिडिओ होता की व्यायाम/प्रवास करताना ऐकायचा गाण्याचा अल्बम होता? ही राजकारणी लोक ही अशीच. समोर माइक आला की यांना वेळेच भानच राहत नाही. अशी कॉमेंटपण कोणीतरी केली असेल असा मला दाट संशय आहे. बरीच वर्षे निघून गेली. जिचकारांनी लावलेले बी रूजण्यासाठी अनुकूलतेची वाट पाहत युट्युबवर पडून होत. ही अनुकुलता लाभणे फार अवघड होत. त्याला वेळ लागणार हे त्या बियाणाला माहीत होत. आणि सहा वर्षापूर्वी ते एकाच्या हृदयात रूजल. हा माणूस एमबीबीएस, एमडी होता. पण रोग पाहून औषध देणारा नव्हता. तर रोग होऊच नये यासाठी काय करता येईल यातला तज्ञ होता. प्रामाणिक होता. पैशासाठी काम करणारा नव्हता. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असणारा असा होता. मुख्य म्हणजे माहिती वाचून चर्चा करणारा नव्हता तर त्यासाठी स्वतःवर प्रयोग करायला तयार असणारा व त्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करायला तयार असणारा होता. नियतीने अगदी अचूकरीत्या लातूरच्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड केली होती. डॉ. दीक्षित सध्या ते लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख आहेत व गेली सत्तावीस वर्षे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. "स्थूलत्व निवारण आणि मधुमेह प्रतिबंध" या विषयावर त्यांनी संशोधन केले.यात त्यांनी प्रथम स्वतःवर प्रयोग केले. नातेवाइकांवर प्रयोग केले. जवळच्या मित्रांवर प्रयोग केले. या सगळ्याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या. मग मात्र त्यांनी लातूर व औरंगाबाद येथील हजारो लोकांवर प्रयोग केले. वैज्ञानिक नियतकालिकात प्रबंध लिहिण्यासाठी या प्रयोगाचे योग्य दस्तावेजीकरण केले व अनेक प्रबंध प्रकाशीतही केलेले आहेत. पण प्रसारासाठी नुसते प्रबंध लिहून भागत नाही यासाठी त्यांनी व्याख्याने द्यायला सुरवात केली. पुण्याच्याच बालगंधर्व रंगमंदिरात कै. डॉ. श्रीकांत जिचकारांच्या स्मृतीला अभिवादन करून सुरवात झालेले त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. हेही व्याख्यान खूप मोठे आहे. पहिले प्रास्ताविक ३० मिनिटे चालते. त्यामुळे व्याख्यानासाठी आतुर झालेले बरेच जण कंटाळून पहिल्या काही मिनिटांनंतर व्याख्यान बंद करून टाकतात. हे प्रास्ताविक पाहू नये म्हणून मी हे सांगत नाहीये. तर थोडा धीर धरावा असे सुचवत आहे. या प्रास्ताविकातूनही तुम्हाला काही मुद्दे मिळू शकतात. २०० च्या वर व्हॉटऍपस ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. अनेक देशातील माणसे यात आहेत. पण हे सगळे सांभाळणे आता अवघड होत चाललेय. कार्यकर्त्या डॉक्टरांना यासाठी वेळ देणे अवघड होत चाललेय. यासाठी आता एक वेबसाईटच उघडायचे प्रयत्न चालू आहेत. तस झाल की एकाच ठिकाणी सगळी माहिती एकत्रित होईल. वेळ वाचेल. एक कोटी लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट समोर ठेवून आता काम सुरू होणार आहे. खर म्हणजे ह्या व्याख्यानाचा सारांश देण्याचा माझा विचार होता. पण मी मुद्दामहून तस करत नाहीये. कारण तस केले तर लोक मूल व्याख्यान न ऐकताच चर्चा करायला सुरवात करतात. हे व्याख्यान ऐकल्यावर फारशा शंका उरत नाहीत. शिवाय त्यांनी काही फोन नंबरही दिलेले आहेत. त्यावर तुम्ही व्हॉटऍपवर प्रश्न किंवा शंका विचारू शकता. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ ही डॉ. दीक्षित यांची फेसबुक पेजची लिंक आहे. त्यात लाभार्थींची नावे, अनुभव व मोबाईल नंबर दिले आहेत.हे तुम्ही केव्हाही पाहू शकता! https://www.facebook.com/weightlosseffortlessly/ डॉ. जिचकार यांनी याच व्याख्यानात बी पेरण्याचे काम केले. हा ऑडिओ आहे. दोन तास सलग वेळ काढता येईल अशी वेळ निवडून निवांतपणे पहा. https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4 मी स्वतः या विषयातला तज्ञ नाही. पण या संकेतस्थळावर या विषयातले बरेच तज्ञ असल्याने साधक बाधक चर्चा होऊन हा विषय आणखी स्पष्ट होईल याहेतूने हे लेखन केले आहे. एक महत्त्वाची सूचना : ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. या दोन तपासण्या म्हणजे रक्तातल्या शर्करेचे प्रमाण दाखवणाऱ्या तपासण्या नव्हेत. त्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानेच पुढील आहारयोजना सुरू करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये. -------------------------------------------------------------- (श्री. शाम भागवत यांचा खालील एक प्रतिसाद लेखात समाविष्ट केला आहे.) एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते. यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात. तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा. https://youtu.be/99iQOs-u_HU

वाचने 164367 वाचनखूण प्रतिक्रिया 313

मराठी कथालेखक 03/07/2018 - 14:22
याबद्दल नुकतेच व्हॉट्स अ‍ॅपवर वाचले. मी पण या विषयातला तज्ञ नाही आणि व्हॉट्स अ‍ॅपवर येणारे आहार वा आरोग्यविषयक सल्ले मी फारसे मनावर घेत नाही. मात्र यातला विचार मला पटला. निदान स्थुल व्यक्तींकरिता तरी हा विचार योग्य असेल असे वाटते. वाढत्या वयातले तरुण , कष्टाची कामे करणारे लोक यांच्याकरिता हे कितपत योग्य होईल याबद्दल मात्र मी साशंक आहे.

In reply to by मराठी कथालेखक

शाम भागवत 03/07/2018 - 14:57
तुमचे निरिक्षण बरोबर आहे. वाढत्या वयातल्या मुलांसाठी हा सल्ला नाहीये. दिक्षीतांच्या व्याख्यानात त्यांनी तसे स्पष्ट पणे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर हा सल्ला कोणासाठी आहे कोणासाठी नाही हे सगळं जास्त विस्ताराने समजावून सांगितले आहे. खरे तर दिक्षीतांचे व्याख्यान ऐकल्यावर फारसे प्रश्न पडतच नाहीत. बर्‍याच शंका विरून जातात. पण त्यासाठी त्यांचे ते भाषण ऐकणे हा एकमेव पर्याय आहे.

In reply to by शाम भागवत

मराठी कथालेखक 03/07/2018 - 15:49
भाषण अजून मी ऐकलेले नाही. पण मला आलेल्या अग्रेषित संदेशात महत्वाचे मुद्दे , आहार पद्धत लिहिले होते (जसे दोन वेळा जेवणे ई) आणि माझ्या जीवनशैलीला (बैठे काम, वाढलेले वजन) ही आहारशैली योग्य ठरु शकेल असे वाटतेय. दीक्षितांचे भाषण पण मराठीत आहे का ?

आनन्दा 03/07/2018 - 15:58
मी सध्या follow करतोय.. 8च दिवस झालेत. ऍसिडिटी गेली, अपचन गेले, वजन कमी होऊ लागले उत्साह वाढतोय. यापूर्वी मी 4 वेळा डाएट प्रोग्रॅम अर्ध्यात सोडून दिला आहे. यावेळेस पहिल्यांदा 8 दिवस सलग काहीतरी पाळतोय. सविस्तर रिझल्ट 1 महिन्याने देतो. एनर्जी लेवल खूप वाढली आहे हे मात्र खरे.

In reply to by आनन्दा

आनन्दा 03/07/2018 - 16:00
महत्वाची गोष्ट, मी खूप छिद्रानवेशी आहे. या संपूर्ण भाषणात डॉ दिक्षितांनी कोणतेही अवास्तव दवे केलेले नाहीत, 1 महिन्यात 15 किलो वगैरे. फक्त तुम्ही फिट व्हा इतकेच.

In reply to by आनन्दा

शाम भागवत 03/07/2018 - 16:07
झकास. एनर्जी लेवल वाढणे हेच तर पहिले लक्षण आहे. आपन योग्य मार्गावर असल्याचा पहिला मैलाचा दगड आहे हा. जर तुम्ही टेबल टेनिस सारखा पटापटा हालचाली करणारा एखादा खेळ खेळत असाल तर तुम्हाला तुमच्या खेळात एकदम प्रगती झाल्याचे वाटू लागेल. सकारात्मक प्रतिसाद आल्यामुळे खूप छान वाटल. तुम्हाला या अभियानात मनापासून शुभेच्छा.

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 03/07/2018 - 18:29
आनंदराव हा प्रयोग एक महिना नव्हे तर सलग सहा महिने करा तरच शाश्वत परिणाम (sustainable results ) मिळतील. आपल्या चरबी बरोबर बरेच पाणी पण साठवलेले असते आणि आहार (आणि व्यायाम) सुरु करता तेंव्हा पहिल्या एक महिन्यात हे सर्व पाणी कमी होते. त्यामुळे सुरुवातीचे ५ ते १० टक्के वजन फार पटकन कमी होते परंतु हे चरबी कमी झाल्याचे नव्हे तर पाणी कमी झाल्याचे लक्षण असते. अर्थात जेंव्हा तुम्ही मिताहार सोडून देता तेंव्हा ती चरबी पाणी परत जमवून घेते आणि पुढच्या एक दोन महिन्यात आपले वजन मूळपदावर येते. तळवलकर, VLCC किंवा अंजली मुखर्जी यांच्या यशस्वी धंद्याचे हेच तर खरे रहस्य आहे. (हे मी माझ्या वजनाचा काटा मालिकेत कुठे तरी लिहिलेले आहे.)

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 03/07/2018 - 19:20
मला वाटते ही आयुष्यभराची जीवनशैली आहे. १०० किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे निरामय आरोग्यासहीत जगायची गुरूकिल्ली म्हटलत तरी चालेल. म्हणजे डॉ. जिचकार तरी असे म्हणतात बॉ. मला वाटते दोन्ही व्हिडिओ पाहून मग काय करायचे ते ठरवलेले चांगले.

In reply to by नाखु

शाम भागवत 03/07/2018 - 22:48
तरी पण दोन्ही भाषण नीट ऐका. संपूर्ण आयुष्य चांगले जाण्यासाठी फक्त ४ तासाचीच तर गुंतवणूक करायचीय. दोन्ही भाषणे मराठीत आहेत. आणखी आपल्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे होते?

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 04/07/2018 - 13:59
हे करायचे अहे तर आयुष्यभर, एक कोणतेही डाएट जीवनशैली म्हणून हे स्वीकरले तरच रिझल्ट मिळतील हे आता चांगले समजले आहे. फक्त अन्य कोणत्याही डाएट्पेक्षा हे बरेच सोपे पडतेय. बघू, सहा महिन्यात १० किलो जरी कमी झालं तरी मला चालेल.
अहाहा भागवत साहेब , जब्बरदस्त धागा .. बोले तो सोने पे सुहागा ... येत्या आषाढीपासून एकदम म्या पन जोर्रात सुटणार बघा .. फक्त दोन टाइम खाणार आणि दहा टाइम पिणार .. लेव्हल वाढली कि कळवतो .. पण सुरु मात्र नक्की करणार .. आणि हो धन्यवाद,, आम्हा ढेरपोट्या मंडळींबद्दल काहीतरी शोधून काढले आणि इथवर पोहोचवले म्हणून .. तसं बघायला गेलं तर आपण बी एकदम सलमान होतो बघा एकेकाळी , पण आता ते सिक्स packs जाऊन तिथे सहा बनपाव आलेले आहेत आणि वजन पार नव्वदीपार ,, असं म्हणा ना कि शतकी खेळीकडे वाटचाल सुरु आहे .. सिद्धेश्वर विलास पाटणकर
आपल्या समाजात अंगमेहनतीने काम करणे उपहासाने बघितले जाते. प्रत्येकजण आराम करायला बघतो. तेच प्रतिष्ठेचे लक्शण आहे. पुन्हा मला काय झाले मग किती तपासण्या केल्या किती महागडीसेवा उपचार घेतले इत्यादी सांगण्यात धन्यता. जाऊ दे. चर्चेत अडथळा नको.

पिलीयन रायडर 03/07/2018 - 20:01
माझ्या आईने ही भाषणं बघितली आहेत आणि ती नुकतीच त्या बद्दल सांगत होती. पण मी स्वतः ते पाहिलेलं नाही त्यामुके वरकरणी मला दोनदाच खा हा सल्ला पटत नाहीये. ऋजुता दिवेकर अगदी उलट सांगतेय की दर 2 तासाला खा. म्हणजे रक्तात साखरेचा पूर आल्यासारखं होत नाही. जे मला पटलं होतं. पण अर्थात संपूर्ण भाषण न ऐकताच मत बनवणार नाही. नक्कीच ऐकेन आणि कळवेन. मला फारसा शास्त्रीय विचार न करता असं वाटतं की जे काही आपण पिढ्यान पिढ्या करत आणि खात आलेलो आहोत ते करावं. माझ्या जन्मापासून माझी आई,आजी साधारण जसे खात पित होते, तसंच मी फॉलो करावं. म्हणजे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी थोडंस खाणं आणि रात्री लवकर जेवण. हे सगळं घरीच बनवलेलं असायचं. आणि क्वचित बाहेरच. हे करून , आवश्यक तेवढी हालचाल होत असेल तर अगदी जबरदस्त फिटनेस नाही, पण आरोग्य उत्तम रहायला हवं. ह्यात व्यायाम सुद्धा केला तर फिटनेस वाढेलच. पण मला ते करतानाही हाय प्रोटीन, लो carb असा विचार करता येत नाही. भाजी, पोळी, वरण भात कोशिंबीर वगैरे मला ओके वाटतं. त्याहून वेगळा काही फॉर्म्युला असू शकतो हे माझ्या मनाला पटत नाही. कारण जे मी आयुष्यभर करू शकत नाही ते डाएट म्हणून करण्यात मला हशील वाटत नाही. मला दोनच वेळा पोटभर खाण्याची सवयच नाहीये, मी एका वेळेला खूप खाऊ शकत नाही. पण हेच माझा नवरा चारदा खायला नको म्हणतो. एक बसणी काय ते जेवण. त्याच्या घरी तशीच पद्धत आहे म्हणून. तेच फॉलो करणं त्याला हितकारक आहे.

In reply to by पिलीयन रायडर

शाम भागवत 03/07/2018 - 20:24
ऋजुता दिवेकर यांचे ऐकल्यामुळे तुमचे वजन उंचीप्रमाणे असेल. ४५ मिनीटे भरभर चालू शकत असाल. स्थूलता हा तुमचा प्रश्न नसेल. डॉक्टरांची पायरी चढायला लागत नसेल तर आहे तेच चालू ठेवा. शेवटी फिटनेस महत्वाचा. तुमच्या पिढ्यान पिढ्या जे करत आणि खात आलेले आहेत. त्यामुळे ते कायम निरामय जिवन जगले असतील तर तुम्ही तीच पध्दत चालू ठेवणे योग्य होईल असे वाटते. तुम्ही साखरेचा चहा किंवा दूध घेत नाही असे दिसतेय. म्हणजे एकूण चारच वेळाच खाण्यासाठी तोंड उघडत असाल तर ती एक चांगली गोष्ट आहे. तरीही असे वाटते की दोन्ही भाषणे ऐकल्याने तुमचे नुकसान नक्कीच होणार नाही. __/\__

In reply to by शाम भागवत

सोमनाथ खांदवे 03/07/2018 - 22:48
भागवत साहेब, इथंच मिपावर सायकल वीरांचे पराक्रम वाचून आलेल्या स्फूर्ती मुळे गेले 6 / 7 महिने मी रोज किमान 1 तास सायकल चालवतो .आता तुमच्या दीक्षित सरां वरील लेखा मध्ये 45 मिनिटं भरभर चालण्याचा उल्लेख आहे , तर नक्की फायदेशीर काय असू शकतं ?

In reply to by सोमनाथ खांदवे

शाम भागवत 03/07/2018 - 22:52
चालण्याला सायकल हा पर्याय असू शकतो. तसे स्पष्टपणे सांगितलेले आहे. तुमच्या सर्व शंका फिटतील. पण त्यासाठी दोन्ही भाषणे ऐकण्यासाठी किमान ४ तासांची गुंतवणूक केली पाहिजे.

In reply to by पिलीयन रायडर

अनिरुद्ध.वैद्य 04/07/2018 - 07:52
ऋजुता दिवेकर ही ग्लायकोमीक इंडेक्सवर आधारित पद्धतीत मिताहार घ्यायला सांगते. त्यात २ तासाला थोडे थोडे खा असं सांगतात. पण त्यांचा ग्लायकोमिक इंडेक्स कमी असावा. आता ग्लायकोमीक इंडेक्स कमी असेल तर मुळातच त्या पदार्थांमधुन साखर कमी शोषली जाते, तात्पर्याने, शरीरात साठलेली चरबी वापरायला सुरुवात व्हायला लागते. पण ऋजुता दिवेकरचा मिताहारासोबतच व्यायामावर (स्ट्रेंग्थ ट्रेनिंग) वर प्रचंड भर आहे. ज्यात स्नायु अधीक बळकट होऊन त्यांना अधीक उर्जा लागते अन त्यामुळे इंशुलीन रेझिस्टंस कमी होतो. अन हळु हळु साखरेतील पातळी नियंत्रित व्हायला लागते. त्या मानाने डॉ. दिक्षीतांच्या पद्धतीत इंशुलीनचा विचार प्राधान्याने केलेला आहे. त्यांमते, आपण खाल्ले की सरळ काही युनिट्स इतके इंशुलीन तयार होते. त्यामुळे जर अधीक खाल्ले गेले असेल, तर इंशुलीन लागलीच रक्तातील साखर चरबीत रुपांतर करा अस सांगत (अर्थात हा इंशुलीनचा दुसरा उद्देश्य आहे, त्याचा प्रार्थमीक उद्देश म्हणजे पेशींचे दरवाजे साखरेसाठी उघडणे, त्यामुळं बिचार्‍याला दुष्ट ठरवु नये लगेच :) ) . त्यामुळे चरबी वाढत जाते. स्नायु वाढत नाहीत. अन खाण्याच प्रमाण कमी न झाल्याने, सतत साखर अन इंशुलीनचा मारा होत राहतो. शेवटी पेशी इंशुलीनच्या तयार होणार्‍या मात्रेला जुमानत नाहीत अन अधिकाधिक इंशुलीन तयार कराव लागत. अन्यथा पेशींना साखर मिळणार नाही अन त्यांची उपासमार होइल. हे चक्र शरिराला मधुमेहाकडे नेते. (अर्थात रक्तात एक ठराविक पातळीत इंशुलीन असतेच, जे पेशींना सतत कार्यरत ठेवत असते अन खाणे झाले की पॅनक्रियास / स्वादुपींड परत इंशुलीन जास्तीचे करत असते ) डॉक्टर दिक्षीत सांगतात, की क्ष युनिट्स तयार झालेल इंशुलीन ५५ मिनिटे तयार होत नाही. तेव्हा आपण जर ५५ मिनिटांमध्ये जेवलो, तर जास्तीचं इंशुलीन एकदाच तयार होईल. थोड्यावेळाने इंशुलीनची मात्रा कमीझाली की स्वादुपींड त्याच्या भावाला म्ह्णजे ग्ल्युकॅगॉन (की जॉन Glucagon) ला कामाला लावते. ह्यांच काम म्हणजे, शरिरात साठलेल्या चरबीचा उप्योग करुन उर्जा उपलब्ध करुन देणे. पण हे महाशय सतत कार्यरत नसतात, तर फक्त इंशुलीनची मात्रा कमी झालीकीच ते जागतात. अन फॅट्सचा फडशा पाडतात. त्याचा परीणाम, वजन (चरबी) कमी होण्यात होतो. अन शेवटी, मी डॉक्टर किंवा न्युट्रिशनीस्ट नाही, फक्त हौशी अभ्यासक आहे, सो मला जेवढ आकलन झाले, तेव्ह्ढ मी सांगायचा प्रयत्न केला. दोन्ही प्रकारांत फॅट लॉस झालेला आहेच. अन म्हणुनच प्रश्न असा उरतोच की दिवेकरांच्या पद्धतीत सतत इंशुलीन तयार होत असेल का? झालं तर ते शरीरास कितपत हानीकारक आहे? शिवाय जर कमी जीआय असलेल खाल्ल तरीही दीक्षीत म्हणतात तस तेवढंच इंशुलीन तयार होत , हे देखील मनास पटत नाही, कारण आपलं शरीर इतकं डंब नसाव अशी अपेक्षा आहे :) आदी गोष्टींच्या उत्तरात मी स्वतः देखील आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

आनन्दा 04/07/2018 - 14:11
मला वाटते इन्शुलिन तयार करणे थोडेसे अन्नुभवावर आधारित असते. म्हणजे जर तुमचे जेवण जर रक्तातील साखरेची पातळी १७० पर्यंत नेत असेल तर प्रत्येक वेळी शरीर तितके इन्शुलिन तयार करते. तुमचे मूळ खाणेच जर तितकी शुगर निर्माण करत नसेल तर मग प्रश्न मिटला. (ही थिअरी दिवेकर बाईची आहे) पण आपण पडलो खाण्याचे लोभी, त्यामुळे जिलब्या म्हटले ८-१० खाल्ल्याशिवाय आपले भागत नाही, म्हणजे शुगर केव्हल आपण २०० वर नेउन मग २ तसानी चहा जरी प्याला तरी शरीराला वाटते की आल्या ५०० कॅलरी, मग शरीर तितके इन्सुलिन रक्तात सोडते. दिक्षितांच्या पद्धतीमध्ये देखील शरीराला ट्रेन करणेच अहे, पण वेगळ्या प्रकारे.. मी १००० कॅलरी खाइन, पण दिवसातुन २दाच. मग शरीर तित्के इन्शुलिन २दा तयार करेल, साखर पचवेल, विषय,सम्पला. दोन्ही पद्धती योग्यच आहेत, पण दिवेकरांच्या पद्धतीत जिभेवर खूप ताबा आणि तित्काच व्यायाम लागतो, इथे तसे काही नाही.. काहीही खा, पण २ वेळाच खा ते तुलनेने करायला खूप सोपे आहे (अन्य डाएट्च्या तुलनेत) असे माझे देखील मत झाले आहे.

In reply to by आनन्दा

शाम भागवत 04/07/2018 - 16:34
याबाबत डॉ. जिचकारांनी प्रथम जो क्रांतिकारक विचार मांडला तो असा की, आपण जेव्हा काही खातो ते पचविण्यासाठी खालेल्या पदार्थाच्या प्रमाणात शरीरात पाचक द्रव तयार होतात. मात्र इन्शूलीन त्याला अपवाद आहे. पदार्थाचे प्रमाणात स्वादुपिंड इन्शुलीन तयार करत नाही. तर जेव्हा जेव्हा आपण खातो तेव्हा तेव्हा एका ठरावीक प्रमाणातच नेहमी इन्शूलीन तयार केले जाते. जितक्या वेळा खातो तितक्या वेळा इन्शूलीन तयार केले जाते. जेव्हा आपण जास्त वेळा खातो (जास्त खाल्ले का कमी खाल्ले हे महत्वाचे नाही.) तेव्हा अर्थातच जास्त इन्शूलीन तयार केले जाते. दोन वेळेला जेवणामुळे जेवढे इन्शूलीन तयार होते ते प्रमाण योग्य आहे. मात्र वारंवार खाल्याने जे अतिरिक्त इन्शूलीन तयार होते ते सर्व रोगांचे कारण आहे. या अतिरिक्त इन्शूलीनची सवय शरीरातील पेशींना नसते. त्यामुळे त्या इन्शूलिनला विरोध करायला लागतात. त्यावर उपाय म्हणून स्वादुपींड काही खाल्यावर किती इन्शूलीन तयार करायचे याचे ठरलेले प्रमाण वाढवते. त्यामुळे अतिरिक्त इन्शूलीनचे प्रमाण वाढतच जाते. हे दुष्टचक्र सुरू झाले की त्यातून माणसाचा स्थूलत्व, मधुमेह, कोलेस्टेरॉल, रक्तदाब, अंजोग्राफी, अंजोप्लास्टी,बायपास असा प्रवास सुरू होतो. वारंवार खाल्याने अतिरिक्त इन्शूलीन कसे तयार होते हा विचार मांडून मधुमेह रक्तदाब वगैरे साठी अतिरिक्त इन्शूलीन कारणीभूत आहे हे प्रभावीपणे जिचकारांनी सांगितले एक वेगळाच दृष्टिकोन १९९७ साली दिला हेच जिचकारांचे मोलाचे योगदान आहे. डॉ. दिक्षीतांनी ह्या विचारावर स्वतःवर अनेक प्रयोग करून तसेच अस्तित्वात असलेल्या अनेक आहारयोजना स्वतः वापरून त्यातला फोलपणाचा अनुभव घेऊन डॉ. जितकारांचा हाच विचार जास्ती स्पष्ट करून सांगितला आहे. पुढे नेला आहे. ते सांगतात की, स्वादुपिडाची इन्शूलीन तयार करण्याचे चक्र पच्चावन्न मिनिटांचे आहे. म्हणजे एकदा इन्शूलीन शरीरात सोडले की त्यानंतर पुढची पंच्चावन्न मिनिटे स्वादुपिंड शरीरात नव्याने इन्शूलीन सोडत नाही. तसेच प्रत्येक माणसामधे एकावेळी किती इन्शूलीन तयार करायचे हे ठरलेले असते. हे प्रमाण प्रत्येक माणसामधे वेगळे वेगळे जरूर असेल पण त्या माणसाचा विचार केल्यास हे प्रमाण कधीही बदलत नाही. थोडक्यात या पच्चावन्न मिनिटात तुम्ही एकदा खा किंवा दहा वेळा खा. कमी खा किंवा जास्त खा. त्याचा काहीही संबंध इन्शूलीन च्या प्रमाणावर होत नाही. असे समजू की काही खाल्यावर स्वादुपींड प्रत्येक वेळेस पाच युनीट इन्शूलीन तयार करते. (हा पाच आकडा उदाहरणासाठी घेतला आहे. तोही विषय समजावा म्हणून) जर एखाद्याने पंच्चावन्न मिनिटात दोन बिस्किटे खाल्ली किंवा दहा बिस्किटे खाल्ली तरी पाच युनीटच इन्शूलीन तयार होइल. इतकेच नव्हे तर दर पाच मिनिटाला एक बिस्कीट या वेगाने दहा बिस्किटे खाल्ली तरीही पाचच युनिट इन्शूलीन स्वादुपींड सोडेल. मात्र त्याने दर तासाला दोन बिस्किटे याप्रकारे दहा बिस्किटे खाल्ली. तर मात्र स्वादुपिंड पाचपट म्हणजे पंचवीस युनीट इन्शूलीन तयार करील. कारण स्वादुपिडाची इन्शूलीन तयार करण्याचे चक्र पच्चावन्न मिनिटांचे आहे. म्हणजेच स्वादुपींड ५ युनीटचे इन्शुलीनचे माप पाच वेळेस टाकेल. जे दोन वेळच्या जेवणाच्या १० युनिटपेक्षा अतिरिक्त असेल. आणि हे अतिरिक्त इन्शूलीन डॉ. जिचकारांनी सांगितल्याप्रमाणे शरीरात रोग तयार करते. (दोन वेळच्या जेवणाचे १० युनीट हे उदाहरण म्हणून घेतले आहे.) माझ्या आकलनाप्रमाणे व कुवतीप्रमाणे भर घालायचा प्रयत्न केला आहे. जर मीपावर कुणी या क्षेत्रातला जाणकार असेल आणी त्याने ही भाषणे ऐकली असतील तर त्यानी माझ्या या प्रतिसादातील त्रुटी लवकरात लवकर दाखवून द्याव्यात ही विनंती. कारण मी यातला तज्ञ नसल्याने भिक नको कुत्रा आवर म्हणायची वेळ मिपाकरांवर यायची. __/\__

In reply to by शाम भागवत

मराठी_माणूस 05/07/2018 - 12:39
मधुमेह रक्तदाब वगैरे साठी अतिरिक्त इन्शूलीन कारणीभूत आहे
हे कसे ते समजले नाही. आता पर्यंत इन्शूलीन च्या अभावामुळे/कमतरतेमुळे मधुमेह होतो अशी समजुत होती. काही मधुमेहींना रोज इन्शूलीन टोचुन घ्यावे लागते ते का ?

In reply to by मराठी_माणूस

शाम भागवत 06/07/2018 - 13:13
मधुमेह दोन प्रकारचा असतो. पहिल्या प्रकारात शरीरातील इन्शूलीन तयार करण्यामधेच कमतरता असते. त्यामुळे हा लहानपणातच उद्भवतो. इथे मात्र इन्शूलिनच्या अभावामुळे बाहेरून इन्शूलीन द्यावे लागते. या बाबतीत आपली समजूत बरोबर आहे. मात्र. . . दुसर्‍या प्रकारातला मधुमेह आपण स्वतःहून ओढवून घेतलेला असतो. डॉ. दिक्षीतांच्या सिध्दांन्तानुसार ( जो जिचकारांच्या विचारावर आधारलेला आहे) अतिरिक्त इन्शूलीनमुळे हा रोग होतो. हे अतिरिक्त इन्शूलीन भरपूर खाल्यामुळे तयार होत नाही तर पंच्चावन्न मिनिटांपेक्षा जास्त अंतर ठेऊन वारंवार खाण्यामुळे अतिरिक्त इन्शूलीन तयार होते. या जास्तीच्या इन्शूलीनमुळे शरीरातील पेशींच्या कामात अडथळे यायला लागतात. त्यांना त्यांचे काम सुरळीत करता येत नाही. यावर उपाय म्हणून त्या पेशी इन्शूलीनला विरोध करायला लागतात. त्यामुळे इन्शूलीनच्या कामात अडथळे यायला लागतात. म्हणजेच शरीरातील दोन यंत्रंणांमधेच युध्द सुरू होते. एकदाका हे युध्द सुरू झाले की, प्रत्येक बाजू आपापले बळ वाढवायला झटायला लागतात. स्वादुपींद पेशींचा विरोध मोडून काढण्यासाठी आणखी इन्शूलीन रक्तात सोडते. त्यावर मात करण्यासाठी पेशी आपला विरोध आणखी वाढवतात. म्हणजेच नेहमीच्या कामाऐवजी या लढण्यातच शक्ति बर्‍यापैकी खर्च व्हायला लागते. हा सगळाच प्रकार अनागोंदीकडे जायला लागतो. शेवटी कधीतरी स्वादुपिंड हरते. पेशी जिंकतात. मग मात्र पेशींचा हा विरोध मोडून काढण्यासाठी किंवा स्वादुपींडाच्या इन्शूलीन तयार करण्याच्या कामात मदत म्हणून बाहेरून इन्शूलीन दिले जाते. मी माझ्या कुवतीनुसार व आकलनानुसार प्रतिसाद दिला आहे. शक्यतो माझ्यासारख्या सामान्य माणसाकडून उत्तरे मिळविण्याऐवजी वरची दोन व्याख्याने ऐकून तज्ञ व्यक्तिंकडून विषय समजावून घ्यावा ही विनंती.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 07/07/2018 - 22:13
मी वरती शरीर हा शब्द वापरला आहे. पण त्यात मेंदू येत नाही. हे स्पष्ट करायचे राहिले. मेंदूमधे अनागोंदी माजली तर सगळच संपल. मेंदूच्या पेशींना ग्लुकोज थेट रक्तातून मिळवता येते. त्यासाठी त्यांना इन्शूलीनची आवश्यकता नसते. हेही ज्ञान मला दिक्षीतांच्या व्याख्यानातूनच झाले आहे. हे असे होत बघा. म्हणून म्हणतो तज्ञ माणसांकडूनच ऐका. आत्ता एकदम चूक लक्षात आली आणि म्हणून लागलीच दुरूस्त केली. उद्या कोणीतरी वेड्यासारख बरळायला लागला तर ते सुध्दा अतिरिक्त इन्शूलीनमुळे अस कोणाला तरी वाटायच. :))

In reply to by शाम भागवत

मराठी_माणूस 11/07/2018 - 14:38
दोन्ही व्याख्याने पुर्ण ऐकली. बरेच नवीन ज्ञान मिळाले. ही माहीती आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल धन्यवाद.

In reply to by पिलीयन रायडर

अनुप ढेरे 04/07/2018 - 10:33
भाजी, पोळी, वरण भात कोशिंबीर
माझे आणि अनेक लोकांचे आजी आजोबा अनेक वर्ष पोळी नाही, भाकरी खात असं वाटतं.

In reply to by अनुप ढेरे

पिलीयन रायडर 04/07/2018 - 15:13
अगदी बरोबर. माझे आई बाबा भाकरी खातात (डब्यात पोळी नेतात). मी सुदधा उपलब्ध असेल तर भाकरी खाते. पण मला स्वतःला चांगली भाकरी अजून येत नाही. अगदी आजी आजोबांच्या काळात वावरणं अवघड आहे. मला विविध कुझिन्स खाऊन पहायला फार फार आवडतं. ते मी कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाहीये!

In reply to by पिलीयन रायडर

शाम भागवत 05/08/2018 - 07:49
मलाही केक वगैरे आवडतात. घरात वाढदिवसाचा केक आणला असेल तर तो मी ते जेवण झाल्यावर ५५ मिनिटांच्या मर्यादेत खातो. बर्‍याच वेळेस साखर घालून चहा प्यावासा वाटतो. मग मी कधीतरी मी साखर घातलेला चहा जेवण झाल्यावर घेतो.

In reply to by अनुप ढेरे

शाम भागवत 05/08/2018 - 07:44
या बाबतीत मला माझा अनुभव सांगायचा होता. पण तरीही अजून एक महिना थांबण्याचे ठरवले होते. मला लहानपणापासून भाकरी आवडत नाही. आई बर्‍याच वेळेस रात्री भाकरी करायची. पण मी नेहमी टाळायचो. आई मला भाकरी आवडत नाही म्हणून सकाळची शिल्लक राहिलेली पोळी वाढत असे. मात्र आमच्या सौ आईची पध्दत पुढे चालू ठेवताना सक्तीने चतकोर तरी भाकरी खायला लावायच्या. मी पण आलीय भोगासी म्हणून खात असे. हे सर्व डॉ. दिक्षीतांचा व्हिडीओ पहाण्या अगोदरच्या गोष्टी आहेत पण एक दिवस सकाळचे जेवण झाल्यावर मी दुपारी वेळ होता म्हणून मी डॉ. दिक्षीतांचा व्हीडीओ युट्युबवर पाहिला आणि त्याचक्षणी हे आपल्याला जमू शकेल असे लक्षात आल्याने मी त्या क्षणापासून तो सुरू केला. त्याच दिवशी रात्री भाकरी खाताना माझी नापसंती गायब झाल्यासारखे वाटू लागले. मलापण जरा आश्चर्यच वाटले. पण हे सगळे मानसिक असेल असेच वाटत होते. जेवताना पहिला भात संपल्यावर आता बायको विचारायला लागली की काय वाढू? मी पण काहीही वाढ (म्हणजे पोळी चालेल किंवा भाकरीही चालेल या अर्थाने) म्हणायला लागलो. मी रोज स्वतःवर लक्ष ठेवत होतो की, "काहीही वाढ" असे म्हणताना मनाच्या कोपर्‍यात कुढेतरी बायकोने पोळी वाढावी अस वाटतय का? आज बरेच दिवसानंतर मी असे म्हणू शकतोय की, मला भाकरी आवडायला लागलीय असे म्हणवत नाही पण भाकरीबद्दलची नावड नक्की गेली आहे. आता बायकोने भाकरी वाढली काय किंवा पोळी, त्यामुळे माझ्या जेवणावर परिणाम होत नाही. पूर्वी मी थोडी भूक असूनही आणखी भाकरी खायला लागू नये म्हणून जेवण आवरते घेत असे. आता मात्र हे सर्व माझ्या मनाचे खेळ आहेत असे वाटत नाही. :) जिभेसाठी खाण्याकडून भुकेसाठी खाण्याकडे जाण्याचा हा प्रवास आहे असे मी या अगोदर कुढेतरी म्हटले होते. तसे म्हणण्यामागे माझा हाच अनुभव कारणीभूत आहे. तसेच आणखी एका अनुभवाने याला पुष्टी दिली आहे. त्याबाबत मी अजून थोडे थांबल्यानंतर लिहिणार आहेच.

In reply to by शाम भागवत

एकाच जेवणात भात, पोळी, आमटी भाजी, कोशिंबीर असे सर्व प्रकार करणं शहरी आयुष्यात तरी अनेक घरांतून मागे पडलं आहे असं वाटतं, आणि ते साहजिक आहे. शिवाय काहींना भाकरी आणि काहींसाठी पोळीसुद्धा असे दोन्ही उपप्रकार दर जेवणात तयार असणं किंवा भात संपता संपता ऐनवेळी दोन्ही ऑप्शन्स बनवण्याची पूर्वतयारी असणं ही आणखीनच दुर्मिळ गोष्ट आहे. तेचि पुरुष भाग्याचे. ;-)

In reply to by गवि

शाम भागवत 05/08/2018 - 09:59
:) मी भाग्यवान आहे असे माझ्या बर्‍याच नातेवाईकांना वाटते. माझी बायको नोकरी करत नसल्याने तिला सगळ जमू शकते. कोकणस्थ असल्याने भात वरण तूप यानेच जेवणाला सुरवात होते. शेवटही भातानेच होतो. दोन भातांच्या मधे सकाळी फक्त पोळ्या असतात. त्या नेहमीच जास्त केल्या जातात. कारण एकच. ऑफिसमधे न्यायला पोळ्याच ठीक वाटतात. तर रात्री मात्र सकाळच्या उरलेल्या पोळ्यांचा अंदाज घेऊन ( येथे भाकरी ऐनवेळी पटकन तयार करता येते हा मुद्दा महत्वाचा) भाकरी केली जाते. एकवेळ भाजी नसली तरी चालेल (असे सहसा होत नाही) पण आमटी ही पाहिजेच. मुलाला कोशिंबीर आवडत असल्याने तीही होतच असते. गरमागरम ताजे खाणे हे बायकोला आवडते. त्यामुळे मी भाग्यवान ठरलो आहे हे निश्चित. स्त्रियांनी पूर्णवेळ नोकरी करू नये असे माझे मत आहे. संसार व नोकरी ह्या दोन्हींचा व्याप सांभाळताना त्यांचे खूप हाल होतात असे मला वाटते. पण त्याचबरोबर स्त्रियांनी घरातच बसणे मला योग्य वाटत नाही. कारण तसे केले तर त्यांचा जगाशी संबंध तुटतो. यासाठी दिवसाकाठी ३-४ तास तरी नोकरी किंवा समाजकार्याच्या निमित्ताने त्यांनी घराबाहेर राहिले पाहिजे असा माझा आग्रह असतो. त्यामधे पैसे मिळवणे हा हेतू नसला तर फारच उत्तम. तिलाही ते पटलेले असल्यामुळे ती सामाजीक कार्यासाठी (क्लब वगैरे नव्हे) ३-४ तास तरी घराबाहेर रहाते. जगरहाटी कळत रहाते. व्यवहार कळत रहातो. तसेच यात फार दमणूक न झाल्याने ती संसाराकडे पण लक्ष देऊ शकते. मी तिच्या खात्यात ४-५ महिने पुरतील इतके पैसे शिल्लक ठेवत असल्याने व ते पैसे कसे खर्च केले हे विचारत नसल्याने स्वकमाईच्या पैशाइतके स्वातंत्र्य तिला मिळत रहाते. पण तीही काही वेगळा मोठा खर्च करायचा असल्यास तसे अगोदर आपणहून सांगते. थोडक्यात सांगायचे झाल्यास डॉ. दिक्षीतांची आहार पध्दत अंमलात आणण्याच्या दृष्टीने घरातील वातावरण अनुकूल आहे. असो. अवांतर व्हायला लागले. थांबतो. नाहीतर अवांतर मधील मुद्यांवर चर्चा सुरू व्हायची व मूळ विषय बाजूला पडायचा.

In reply to by शाम भागवत

पिलीयन रायडर 05/08/2018 - 10:33
ताजे खाणे मिळायला बायकांनीच घरी बसावं असं काहीही नाहीये. पुरुषांनी सुदधा स्वयंपाक शिकावा. किंवा स्वयंपाकाला कुक ठेवावा. मुळात आपण दोन वेळच्या जेवणासाठी दुसऱ्या वर अवलंबून असूच नये. आणि तासाभराच्या कामासाठी कुणी आपल्यावर अवलंबून आहे म्हणून कुणाला कायमचं घरी बसावं लागू नये (काय करायचं ते त्या माणसाला ठरवता यावं, दुसऱ्या कुणी त्याच्यासाठी ते ठरवूच नये) ह्या मताची मी आहे. सर्वांना स्वयंपाक यावा आणि सर्वांनी तो नियमितपणे करावा. निरोगी आयुष्यसाठी हे सुद्धा महत्वाचे आहे. कारण आपले आरोग्य की आपली जबाबदारी आहे, घरातल्या बाईंची नाही. अवांतर मलाही करायचं नाहीये. पण 2018 साली सुशिक्षित लोकांच्या फोरमवर अशी वाक्य वाचवत नाहीत.

In reply to by पिलीयन रायडर

शाम भागवत 05/08/2018 - 11:58
बायकोलाच स्वयंपाक करायला आवडतो. कुवत असूनही तिला कुक ठेवणे पटणार नाही. प्रेमाने बनविलेल्या साध्या जेवणाची चवच वेगळी. ती चव व त्याचे महत्व मला शब्दात नाही मांडता येणार. कारण मी अशिक्षीत आहे. :)) असो. तर सांगायचा मुद्दा असा की, मी शक्यतो हाॅटेल, पार्ट्या, लग्नाच्या जेवणावळी टाळतो. अर्धवेळ विनावेतन नोकरीचा मुद्दा मी मांडला. तिला तो पटला कारण ती पण अशिक्षीतच आहे. ती एका शाळेची ट्रस्टी आहे. त्या शाळेच्या १५० मुले असलेली बालवाडी विभागाची ती मुख्य संचालिका आहे. तिला हे सगळ मिळाल पण त्यात तिचा पूर्ण दिवस जात नाही. तिला नवर्याने सांगितलेले पटले व तीने ते ऐकून ती यशस्वी झाली हे कुणाला झेपणार नाही ह्याबाबत मी सहमत आहे. थोडक्यात २०१८ नंतरची बरीच वर्षे म्हणजे मरेपर्यंत मी अशिक्षीतच असणार आहे. आणि बायको मागासलेली असल्याने माझ विचारांवर आधारीत असलेले म्हणणे पटून ती पुढेही ऐकत रहाणार आहे. _/\_

In reply to by शाम भागवत

पिलीयन रायडर 05/08/2018 - 13:58
प्रश्न तुमच्या बायकोचा एकटीचा नाहीये. इन जनरल उत्तम जेवण मिळावे (किंवा संसार सुरळीत चालावा) म्हणून बायकांनी नोकरी करू नये ह्या मताचा आहे. (संदर्भ :- स्त्रियांनी पूर्णवेळ नोकरी करू नये असे माझे मत आहे. संसार व नोकरी ह्या दोन्हींचा व्याप सांभाळताना त्यांचे खूप हाल होतात असे मला वाटते.) तुमच्या बायकोला एक बाकी काही तरी करायची चांगली संधी मिळाली म्हणून हे मत सर्वांसाठीच योग्य आहे असं नाही ना? आणि शिवाय संसार ही स्त्री नेच यशस्वी करायची गोष्ट आहे असाही अर्थ त्यातून निघतो. ( तुम्ही इन जनरल स्त्रियांनी काय करावे आणि काय करू नये ह्यावर बोलत आहात म्हणून उत्तर द्यावे लागले. तुमच्या घरात तुम्ही नवरा बायको काहीही ठरवा, त्याच्याशी कुणाला प्रॉब्लेम नाही.) तुम्ही अशिक्षित असलात तरी इतका मुद्दा समजण्याइतके सुज्ञ तरी नक्कीच असाल. (होप्फुली...) खरं तर केवळ मुद्दा रेटायला स्वतःला आणि बालवाडी चालवणाऱ्या आपल्या बायकोला अशिक्षित म्हणून घेणारे वाटला नव्हतात, पण असो.. संसार, जेवण आणि अजून सहजीवनात जे जे काही अपेक्षित आहे ते सगळं स्त्री आणि पुरुष दोघांचीही जबाबदारी आहे. ह्यात आर्थिक बाजूही आल्या आणि घर संसारही आला. इतकंच माझं म्हणणं आहे. बाकी आपली मतं बदलण्याचा हेतू अजिबात नाही. पण शेकडो लोकं जिथे वाचत असतात अशा संस्थळावर आवश्यक तिथे विरोध नोंदवणे मला व्यक्तिशः आवश्यक वाटतं. ते केलं. धन्यवाद!

In reply to by पिलीयन रायडर

शाम भागवत 05/08/2018 - 15:14
:) खर म्हणजे माझा प्रतिसाद इथेच संपला आहे. ---------------------------------------------- मागा मोड ऑन
एकाच जेवणात भात, पोळी, आमटी भाजी, कोशिंबीर असे सर्व प्रकार करणं शहरी आयुष्यात तरी अनेक घरांतून मागे पडलं आहे असं वाटतं, आणि ते साहजिक आहे. शिवाय काहींना भाकरी आणि काहींसाठी पोळीसुद्धा असे दोन्ही उपप्रकार दर जेवणात तयार असणं किंवा भात संपता संपता ऐनवेळी दोन्ही ऑप्शन्स बनवण्याची पूर्वतयारी असणं ही आणखीनच दुर्मिळ गोष्ट आहे. तेचि पुरुष भाग्याचे. ;-)
गवींनी हे लिहिले होते व नंतर डोळा मिचकावला होता. त्यावर मी भाग्यवान असल्याच :) आणि मला डॉ. दिक्षीतांनी सुचवलेली जिवनशैली अंमलात आणण्यासाठी आवश्यक अनुकूलता कशी आहे ते सांगितले होते. बाकी माझा कोणताही उद्देश नव्हता आणि नाही. अर्धवेळ नोकरी करणार्‍या स्त्रियांची मुले व पूर्णवेळ नोकरी करणार्‍या स्त्रियांची मुले यात तुलना केली असता, अर्धवेळ नोकरी करणार्‍या स्त्रियांची मुले जास्त यशस्वी असतात अशा प्रकारचा शोध निबंध १९९० च्या सुमारास प्रसिध्द झाला होता. त्यावर आधारीत आम्ही दोघांनी घेतलेला तो निर्णय होता. असो. (कृपया १९९० चा दुवा मागू नये. त्यापेक्षा मी काहीतरी फेकतो आहे असा आरोप माझ्यावर करून हा विषय संपवावा व हा धागा उजवी कडे जाण्यापासून वाचवावा ही विनंती. मी कसा खरा आहे याबाबत मी एक ही वाक्य लिहिणार नाही. कारण हा घागा काढण्यामागे कोणाला काही शिकवावे हा माझा उद्देशच नाहीये.) तरीपण आपली पोस्ट वाचून खूप बर वाटल. धन्यवाद.
तुमच्या घरात तुम्ही नवरा बायको काहीही ठरवा, त्याच्याशी कुणाला प्रॉब्लेम नाही.
मला माझ्या घरात स्वातंत्र्य आहे व माझ्या ह्या घरातील स्वातंत्र्यामुळे तुम्हाला त्रास होत नाहीये हे ऐकून बरे वाटले त्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही अशिक्षित असलात तरी इतका मुद्दा समजण्याइतके सुज्ञ तरी नक्कीच असाल.
सुज्ञ असण्याची शक्यता व्यक्त केल्याबद्दल. धन्यवाद.
पण शेकडो लोकं जिथे वाचत असतात अशा संस्थळावर आवश्यक तिथे विरोध नोंदवणे मला व्यक्तिशः आवश्यक वाटतं. ते केलं. धन्यवाद!
पण शेकडो लोकं जिथे वाचत असतात अशा संस्थळावर माझ्यात काहीतरी चांगले असण्याची शक्यता कोणीतरी व्यक्त केल्यास त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मला व्यक्तिशः आवश्यक वाटत. ते मी करत आहे. धन्यवाद. मला वाटते आपण दोघांनीही आपल्याला जे योग्य वाटते ते केलेले असल्याने हा धागा आता मूळ विषयावर यायला काही हरकत नसावी. _/\_ मागांचे धागे वाचून त्यांच्यासारखे भले मोठे प्रतिसाद मला देता येतील किंवा नाही हे तपासून पहावयाची बर्‍याच दिवसापासून इच्छा होती. ती तुमच्यामुळे पूर्ण झाल्याबद्द्ल धन्यवाद. अरेच्या एक राहीलेच. मनमोकळ्या प्रतीसादाबद्द्ल धन्यवाद. मागा मोड ऑफ. :)

In reply to by शाम भागवत

चामुंडराय 05/08/2018 - 23:02
भागवत साहेब, ज्या निष्ठेने तुम्ही डॉ. दिक्षितांचा डायट प्लॅन पाळत आहात आणि ज्या कळकळीने तुम्ही हा विषय मिपावर मांडत आहात ते खरेच कौतुकास्पद आहे. तुम्ही बऱ्याच मिपाकरांना या धाग्यामुळे विचारप्रवृत्त केले असणार यांत शंकाच नाही. केवळ दोन वेळेस खायचे असल्याने दोन्ही वेळेला चौरस आहार घेणे गरजेचे आहे असे वाटते. तुम्ही जर दुपारच्या जेवणासाठी डबा नेत असाल तर चौरस आहाराचे कसे जमवता? डब्यात शक्यतो पोळी-भाजी नेली जाते म्हणून हा प्रश्न. तसेच पोळी ऐवजी भाकरी खाणे गरजेचे आहे का? मध्यंतरी गहू खाऊ नये आणि मराठी माणसाने ज्वारी खाणे आवश्यक आहे असे कायप्पा फॉर्वर्डस वाचण्यात आले होते. हे त्या संदर्भात आहे का? बाकी या डायट प्लॅन साठी तुम्हाला घरातून संपूर्ण पाठिंबा आहे हि गोष्ट खरंच भाग्याची आहे. तुमच्या बाबतीत "तेचि पुरुष दैवाचे, थोर भाग्य तयांचे" हे अगदी खरे आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्ही १ महिन्यापेक्षा जास्त वेळापासून हि आहार शैली अंगिकारली आहे. त्याचे आतापर्यंतचे परिणाम कसे आहेत?

In reply to by चामुंडराय

शाम भागवत 06/08/2018 - 00:09
मी निवृत्त जिवन जगत आहे. त्यामुळे जेवायच्या दोन्ही वेळेस मी घरीच असतो. खर तर मला या आहार शैलीची गरज नाही. पण माझ्यावर बर्‍याच जणांचा विश्वास असल्याने मला कोणाला काही सांगायचे असल्यास खूप काळजी घ्यावी लागते. मला माझ्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना ह्या जिवनशैलीचा स्विकार करण्याबद्द्ल सांगायचे होते. पण आधी केले मग सांगितले हा मार्ग बरोबर असल्याने मी ही जिवनशैलीचा अनुभव घेऊन पहात आहे. माझ्यामुळे माझी बायको, मुलगा, भाचा भाची एक पुतणी यांनी हा प्रकार सुरू केला आहे. एक मित्र याबाबत विचार करत आहे. एका मित्राच्या मुलाला त्याच्या नकळत फायदा झालेला आहे. भाकरीच्या नावडीबद्दल मी वर लिहीले आहेच. तसेच आणखीही लिहावयाचे होते पण अवांतरातच आज बराच वेळ गेला. :) पण उद्या मात्र अजून दोन अनुभव लिहीन. या डाएट प्लॅन बद्दल एक गोष्ट नक्की की घरच्या गृहिणीला याचा वेगळा त्रास होत नाही. इतर आहार पध्दतीत मात्र नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करायचे असल्याने घरच्या लक्ष्मीला फार त्रास होऊ शकतो. तसेच वेगळा जास्तीचा खर्च करायला लागत नाही. आपले नेहमीचे रोजचे जेवण जेवायचे आहे. डॉ. दिक्षीतांनी चौरस आहाराचे मार्गदर्शन व्हीडीओ मधे केलेले आहेच. मी आणखी वेगळे काय सांगणार. मी शाकाहारी असल्याने माझ्या जेवणात पिष्टमय पदार्थांची खूप रेलचेल असते. यासाठी मी थोडे दाणे व हरबर्‍याची डाळ ८ तास भिजत टाकतो व जेवताना खातो. प्रोटीन्ससाठी एवढाच बदल मी रोजच्या जेवणामधे सध्यातरी केला आहे.

In reply to by गवि

शाम भागवत 05/08/2018 - 15:26
गवि साहेब, डोळे मारू नका हो. मला सुध्दा बिथरल्यासारख झालं. अवांतर होतय हे कळूनही वळल नाही बघा. आणि धागा लै जोरात उजवीकडे पळायला लागला. :)
मि दोन दिवसापुर्विच माझे रिपोर्ट त्या ग्रुप वर पाठ्वलेत, पण माझि जिटिटि साखर १३२, २४३,२४१ अशि आल्याने माझे डाक्टर म्हण्तात तुम्हि डायबेटीशआनचा सल्ला विचारा. मला वाट्त साखर नारमल आल्यावर दिक्शितांचा प्रोग्राम पाळावा.

In reply to by palambar

शाम भागवत 03/07/2018 - 22:57
मधुमेह सल्लागाराना विचारून तर बघा. पण काही झाले तरी ते सांगतील त्याप्रमाणेच वागा. साखर नॉर्मल झाली तरीही मधुमेह सल्लागारांना सांगूनच जे करायचे ते करा.

एकुलता एक डॉन 04/07/2018 - 02:52
तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेत मा. शशिकांत सुतार नावाच एक मोठ्ठ प्रस्थ होत. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. त्यासाठी सगळी व्यवस्था जातीने केली. आपोआपच बरेच मान्यवरांनी रंगमंदिर भरून गेल. he 2001 la hote ,mi swatha attend kele hote

In reply to by एकुलता एक डॉन

शाम भागवत 04/07/2018 - 19:15
खूप खूप धन्यवाद. १९९७ नंतर कधीतरी एवढेच लक्षात होते. शशिकांत सुतार त्यावेळेस फॉर्मॉत होते. कदाचित पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अस काहीस आठवत होत. त्यामुळे पुण्यातला कार्यक्रम केव्हा झाला ते शोधून काढून मग एक वाक्य मधे घुसडायचेही ठरवले होते. पण ते सगळ राहूनच गेले. त्यामुळे जिचकारांचा कार्यक्रम १९९७ साली तो कार्यक्रम झाला असा अर्थ निघतोय खरा. प्रत्यक्षात १९९७ साली प्रथम नागपूरला याची सुरवात झाली. तर सांगायच म्हणजे अशा माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पण हा विचार पुण्यात पोहोचायला ४ वर्षे लागली. अस ते वाक्य पाहिजे होते. असो. त्रुटी लक्षात आणून दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. __/\__

सुबोध खरे 04/07/2018 - 13:34
हा उपाय केल्याने १५ किलोने कुणाचे वजन कमी झाले तर त्यांनी आपले अनुभव जरूर येथे लिहा. ( बहुसंख्य लोक हे दुसऱ्याची उदाहरणे देताना आढळतात स्वानुभव फार कमी) वैयक्तित रित्या मुळात मी न्याहारी केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. त्यामुळे केवळ दोनच जेवणे घेणे हे मला स्वतःला जमण्यासारखे नाही. मला दोन जेवणांच्या मध्ये काहीच न खाणे अजिबात जमणार नाही. मला सतत काहीतरी खात राहायला अतिशय आवडते. त्यामुळे याचा स्वानुभव असणारे( दोन वेळा जेवणारे नव्हे तर १५ किलो किंवा अधिक वजन कमी केलेले) कुणी असेल तर त्याचा अभ्यास, निरीक्षण आणि विश्लेषण करायला मला आवडेल.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 04/07/2018 - 14:06
खर आहे तुमचे म्हणणे. तुम्ही प्रामाणिक चिकित्सक आहात. त्या अर्थाने पण तुम्ही तुमच्या आडनावाला जागत असता. त्यातून वैद्यकीय क्षेत्रातले असल्यामुळे तुम्हाला असा माणूस भेटावा अशी माझी मनापासून खूप इच्छा आहे. तुम्हाला जर डॉ. दिक्षीतांचे विचार पटल्याचे कळले तर मिसळपाववरील लोकांना खूपच हायस वाटेल हे नक्की. तुमच्यावर खूप जणांचा विश्वास आहे. माझा सुध्दा. त्यांच्या फेसबुक पेजवर बरीच उदाहरणे सापडतात. फोन नंबरही दिलेले असतात. यांच्यापैकी कोणी मिसळपावर आल तर किती बहार येईल. __/\__

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 04/07/2018 - 14:19
माझ्या बायकोच्या एका चेपु ग्रुप वर आहेत टेस्टिमोनिअल्स डायबेटिस गेल्याचे. ( HbA1c) माझ्या शेजारी एकाचे १० किलो कमी झाले आहे २ महिन्यात. त्याच्या बायकोची थायरोईड १६ चि ६ झाली. माझे झाले की सांगतो. आधी ३ महिने जाऊ देत. वाखु साठवत आहे.
अनेकदा उद्देश चांगला असूनही कोणत्याही लहान सहान शंकेवरसुद्धा एकवाक्यी खुलासाही न देता किंवा पूर्ण स्पष्टीकरण न देता फक्त टीजर देऊन त्याऐवजी सगळा रोख केवळ "ते भाषण एकदा ऐका, ते भाषण पूर्ण ऐका", "अमुक इतकेच तास /मिनीटं तर द्यायची आहेत चांगल्या आरोग्यासाठी"..... असा सर्वांना एका टारगेटकडे रिडायरेकट् करण्याचा दिसला की प्रचारकी भास व्हायला लागतात. इतर काही उदाहरणं: "एकदा आमचे शिबिर अटेंड करा" "एकदा आमच्या सेमिनारला या" "एकदा त्यांची सीडी / डीव्हीडी पहा" "सत्संगाला उपस्थित राहा" त्याशिवाय (म्हणजे दोन तास किंवा चार तास वेळ काढून ते एकदाचं पूर्ण ऐकेपर्यंत, किंवा सेमिनार, शिबीर इत्यादी यात आधी वेळ गुंतवल्याखेरीज) फार काही प्रश्न चर्चा नको. उत्तर एकच, "एकदा ते पूर्णपणे करा / अटेंड करा/ ऐका / उपस्थित राहा" तिथेच सगळी उत्तरं मिळतील, काहीच शंका उरणार नाही. निरामय दीर्घआयुष्याची गुरुकिल्ली. हा अप्रोच टाळला तर नवा विचार प्रसृत करण्याचा उद्देश आणखी जास्त चांगला परिणामकारक होऊ शकतो.

In reply to by गवि

आनन्दा 04/07/2018 - 14:15
ह्म्म.. असा समज होऊ शकतो खरा. पण मूळ भाषण प्रचारकी नाहीये. म्हणजे मूळ भाषणात अभिनिवेशच नाहीये. मी मोठा मी मोठा वगैरे पण नाहीये. (माझ्या अस्ले लोक जाम डोक्यात जातात, पण मी हे भाषण शेवटपर्यंत आवडीने ऐकलय) खरच छान व्याख्यान आहे ते. जरूर ऐका. बाकी भक्त वात आणतात यात नवल ते काय?

In reply to by आनन्दा

म्हणूनच तर अशी शंका येऊ देऊ नये. उलट अनेक लोक इतका वेळ सलग ऐकण्याचा कंटाळा करताहेत असं निरीक्षण (किंवा कंटाळा करू शकतील अशी अटकळ) असेल, पण विचार प्रसृत व्हावा अशी इच्छा असेल तर त्यातले मुद्दे लेखरूपात / संक्षिप्त करून / प्रश्नोत्तरे रुपात असे रूपांतरित करून दाखवण्याने लोक अधिक आकर्षित होतील. मग खरंच अनेकजण मूळ सोर्स आपणहून ऐकतीलही.

In reply to by गवि

शाम भागवत 04/07/2018 - 14:50
तुमचे म्हणणे बरोबर आहे. या पध्दतीने जाळ्यात ओढण्याच्या आणि पैसे कमावण्याचे प्रयोग फार चालतात हे मान्य. त्यामुळे कोणी असे करू लागला की शंका येणे अजिबात चुकीचे वाटत नाही. मुळात माझे वजन योग्य असून पोट वगैरे अजिबात सुटलेले नाही. रक्तदाब किंवा मधुमेह वगैरे काही नाही. त्यामुळे या कुढल्या हेतूने मी याची सुरवात केलेली नाही. मला डॉ. दिक्षीतांचे विचार कळले आहेत. पटले आहेत. म्हणून मी जिवनशैली म्हणून याचा स्विकार केलेला आहे. तरीपण मी या क्षेत्रातला तज्ञ नाही याचे मला भान आहे. अन्यथा मीच इथे सविस्तर लेखन केले असते. डॉ. दिक्षित व डॉ. जिचकार यांचे व्याख्यानाबद्दल उत्सुकता वाटावी ह्या मूळ हेतूनेच मी हा लेख लिहिला आहे. मला असे सारखे वाटते की, माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या तोंडून काहीतरी ऐकण्यापेक्षा त्या क्षेत्रातल्या तज्ञ माणसाच्या मुखातून लोकांनी सगळे ऐकावे. यासाठी ही धडपड मी करत आहे. यात माझा कोणताही स्वार्थ नाही. मात्र एक मिपा कुटुंबातला सदस्य या नात्याने मी एक खात्री नक्की देतो. या मधे डॉ. दिक्षीतांचा एक नया पैशाचाही फायदा नाही. उलट डॉ. दिक्षीत व्याख्यानातच हे स्पष्ट करतात की मी तुम्हाला सगळ सांगितलेले आहे. आता मला पुन्हा भेटू नका. माझा कुठेही दवाखाना नाही. मी प्रॅक्टिस करत नाही. मी अध्यापक व प्रामाणिक संशोधक वृत्तीचा माणूस आहे. मला तुमच्या कडून एक पैसाही नको. तरीपण एखादी शंका आली तर त्याचे निराकरण कसे करायचे हा प्रश्न उरतोच. यासाठी ते सांगतात की, काही अडचण असेल तर तुम्हाला काही डॉक्टरांचे फोन नंबर देतो. पण त्यांना फोन करू नका. त्यांना व्हॉटअ‍ॅपवर कळवा. ते तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतील. पण हे लक्षात ठेवा की हे डॉक्टर त्यांचा व्यवसाय सांभाळून या अभियानात विनामुल्य सेवा देत आहेत. त्यामुळे ते त्यांच्या सवडीने उत्तर देतील. लागलीच उत्तराची अपेक्षा करू नका. तरीही २४ तासांच्या आत तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. तुमच्या शंकेला जेवढे खुलासेवार उत्तर देता येईल तेवढे दिले आहे. याउप्पर ती भाषणे ऐकायची की नाही याबाबत निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहात. माझ्या या उत्तरामुळे तुमची शंका फिटली नसेल तर त्याबद्दल क्षमा मागतो. कारण आता याबाबत सांगण्यासारखे माझ्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही. असो. __/\__

मराठी कथालेखक 04/07/2018 - 15:37
दीक्षीतांचे भाषण मी अजून ऐकलेले नाही (लवकरच ऐकण्याचा प्रयत्न करेन) तसेच मी या विषयातला तज्ञ नाही, पण वर पिरा , आनन्दा यांचे प्रतिसाद वाचत असताना मला माझ्या तर्काच्या आधारावर सुचलेले लिहावेसे वाटत आहे. मला वाटते की ज्या व्यक्तीचे वजन जवळपास योग्य प्रमाणात आहे , रोजच्या आहारातून मिळणारे उष्मांक आणि व्यय होणारे उष्मांक यांत समतोल आहे त्यांच्याकरिता दिवेकरांची आहारशैली जास्त योग्य ठरेल. तर ज्यांच्याकडे चरबीचा अतिरिक्त साठा आहे त्यांच्याकरिता दीक्षीतांची आहारशैली आणि जीवनशैली उपयोगी पडेल. कारण चार पाच वेळा खायचं म्हंटलं तरी प्रत्येक वेळा माणसाचा कल त्यावेळची भूक पुर्णतः भागवण्याकडे असेल. आता शरीराला सवयच लागली की आपल्याला (रक्ताला) साखर हवी असेल वा शरीराला उष्मांक हवे असतील तर 'भूक लागली' मागणी नोंदवायची आणि अशी मागणी नोंदवली की लवकरच ती पुर्ण केली जाते आणि हवी तितकी साखर/उष्मांक (खरे तर जास्तच) सहज मिळतात तर शरीर चरबीतून साखर/उष्मांक विरघळत बसण्याचे कष्ट घेणार नाही. इथे मला ऑपरेशन्स मॅनेजमेंट मधली जस्ट इन टाईम या संकल्पनेशी तुलना करायला आवडेल. जस्ट इन टाईम संकल्पनेत कोणताही साठा (इंन्वेंटरी) हि जवळपास शून्य असते , सध्या फक्त कच्च्या मालाच्या साठ्याचा विचार करु. तर या कच्या मालाचा पुरवठादार (वेंडर) कारखान्याच्या जवळपासच असतो आणि तो दिवसातून अनेक वेळा कच्च्या मालाचा लागेल तसा पुरवठा करतो. त्याच्याकडे ही मागणी दिवसातून अनेकदा नोंदवली जाते. साधारणपणे एका दिवसाची वा पाळीची निकड आणि झालेला पुरवठा शक्यतो समानच असतो. पण आधीच कच्च्या मालाचा प्रचंड साठा असलेल्या कारखान्याने जस्ट इन टाईम राबवले तर आधीचा साठा तसाच पडून राहील आणि कारखान्यातील शॉप , स्टोअर ई मधील लोकांची मानसिकता /कामाची पद्धत बदलली नसेल तर कदाचित हा साठा अजूनच वाढत जाईल म्हणजे असे की "काल अमूकतमूक भाग ११०० लागलेत पण आपण पुरवठादाराकडून फक्त १००० च मागवले होते... एक काम करु ... थोडे जास्त मागवत जावू नाही तर ऐनवेळी पंचाईत होईल" मग या मानसिकतेतून दिवसाची/पाळीची जितकी निकड आहे त्यापेक्षा जास्त भाग मागवण्याची सवय पडते आणि आधीचा साठा (इंन्वेटरी) वाढतच राहते.

In reply to by मराठी कथालेखक

आनन्दा 04/07/2018 - 16:24
मस्त सांगितलेत.. दीक्षितांच्या पद्धतीमध्ये वजन कमी होत जाइल तसेतसे हळूहळू तुम्हाला लागणारे उष्मांक आणि जेवणातून मिळणारे उष्मांक समान होत असावेत. तसेही आपले सामान्य जेवण १००० उष्मांकांच्या वर जात नसावे, त्यामुळे २ वेळा म्हणजे अगदी २०००, तेव्हढे सामान्य माणसाला लागतातच. असो. मी तज्ज्ञ नाही यातला.

In reply to by आनन्दा

मराठी कथालेखक 04/07/2018 - 18:27
दीक्षितांच्या पद्धतीमध्ये वजन कमी होत जाइल तसेतसे हळूहळू तुम्हाला लागणारे उष्मांक आणि जेवणातून मिळणारे उष्मांक समान होत असावेत.
जेवणातून मिळणार्‍या उष्मांकापेक्षा खर्च होणारे उष्मांक काहीसे जास्त असावेत (जेणेकरुन चरबी जळावी) याकरिता तो ४५ मिनटांचा व्यायाम सांगितला असेल.
युट्युब वर ज्या लोकांनि वजन कमि केले त्यांच्या गोष्टि आहेत. मि त्यांना मा़झे अहवाल( साखरेचे ) पाठ्वले , त्यांनि मला त्यांच्या गटात अ‍ॅड केले, त्यावर अनेक श्ंका विचारता येतात, ज्यांना फायदा झाला ते डिटेल्स् टाकतात.

सुबोध खरे 04/07/2018 - 19:39
डॉ दीक्षितांचे भाषण मी संपूर्ण ऐकले होते. त्यांचे काही विचार मला पटले नाहीत पण तो वैद्यकीय शास्त्राचा भाग आहे. उदा. इन्स्युलिन सायकल ५५ मिनिटांचें आहे. आम्ही शिकलेल्या पुस्तकात याचा कुठे उल्लेख आलेला नाही . हे बहुधा अद्ययावत ज्ञान असावे.( कारण मी वाचलेले नाही आणि मी मधुमेह तज्ज्ञ किंवा लठ्ठपणावर उपचार करणारा डॉक्टर नाही) याबद्दल माझे वाचन चालू आहे. याच्या बाजूने किंवा विरुद्ध काही आढळले तर त्यावर अधिक वाचन केल्याशिवाय काही टिप्पणी करणे चूक ठरेल. डॉक्टर दीक्षित म्हणतात त्याप्रमाणे दोन वेळेस खाणे आणि ४५ मिनिटे व्यायाम करणे हि गोष्ट आरोग्यकारक आहे याबद्दल मला अजिबात शंका नाही. परंतु एका वेळेस घरचे जेवण असेल तर लोक २००० कॅलरी खातात पण तेच पार्टी असेल तर एका बैठकीत ५००० कॅलरीज खातात. उदा. रमजानच्या रोजा नंतर बरेच लोक चार ते साडे चार हजार कॅलरीज खाताना आढळले. ऋजुता दिवेकर बाईंबद्दल मला काहीच म्हणायचे नाही कारण काही वर्षांपूर्वी त्यांनी पुस्तकात जे लिहिले आहे त्याच्या आज बरोबर उलटे त्या सांगत असतात. शेवटी एक गोष्ट वस्तुस्थिती आहे कि E =MC वर्ग. यात ऊर्जा आणि वस्तुमान हे सम प्रमाणात आहेत म्हणजेच एक ग्रॅम चरबी म्हणजे ९ (किलो) कॅलरी तुम्ही ४५० कॅलरी जाळल्या तर ५० ग्राम ने वजन कमी होईल आणि ४५० कॅलरी जास्त खाल्ल्या तर वजन ५० ग्राम ने वाढेल असा हिशेब आहे. ज्यांना दोनच वेळेस जेवणे आणि मध्ये काही न खाणे अधिक ४५ मिनिटे व्यायाम करणे शक्य आहे त्यांचे वजन कमी नक्कीच होईल. (मला हे शक्य नाही त्यामुळे मी मधून मधून खात राहतो परंतु माझे खाणे प्रमाणाच्या बाहेर जाणार नाही एवढी काळजी मी घेत आलो आहे. पण दोन वेळ च्या जेवणात तुम्ही सम्राटची/ राजधानीची थाळी पोट फुटेस्तोवर खाल्लीत तर डॉ दीक्षितांना खोटे पाडाल यातही शंका नाही. असे खाणे मी १९९० मध्ये केल्याने ८ महिन्यात माझे वजन ९ किलोने वाढले होते ५६ किलोचे ६५ किलो झाले यानंतर मी थांबलो त्यामुळे गेल्या २८ वर्षात माझे वजन ३ किलोने वाढले आहे. आता ६८ किलो आहे. उंची ५ फूट १० इंच.

In reply to by सुबोध खरे

पिलीयन रायडर 04/07/2018 - 19:49
ऋजुता दिवेकर बाईंबद्दल मला काहीच म्हणायचे नाही कारण काही वर्षांपूर्वी त्यांनी पुस्तकात जे लिहिले आहे त्याच्या आज बरोबर उलटे त्या सांगत असतात. ह्याबद्दल अजून लिहाल का? कारण मी जितकी पुस्तकं वाचली आहेत तिची त्यात मला असं काही वाटलं नाही. पण अर्थात तुमच्या एवढा खोलात विचार केला नसेल. मी तिची बरीच मोठी फॅन आहे, म्हणून उत्सुकता वाटली.

In reply to by पिलीयन रायडर

सुबोध खरे 04/07/2018 - 20:37
एके काळी त्यांनी लिहिले होते तूप खाऊन नका आता म्हणतात रोज भरपूर तूप खा. बाकी आता फारसं काही आठवत नाही आणि त्यांचं पुस्तक परत वाचण्याची सध्या तरी इच्छा नाही.

In reply to by सुबोध खरे

पिलीयन रायडर 04/07/2018 - 21:23
तूप खाऊ नका असं लिहिलेलं आठवत नाही. तिची सगळी पुस्तकं आहेत माझ्याकडे. पहिल्या पासून ती तूप खा असंच म्हणतेय. असो... सध्या खा म्हणतेय. आणि त्याहून मोठा काही आक्षेप नाही ना.. मग ओके!

In reply to by पिलीयन रायडर

सुबोध खरे 05/07/2018 - 09:44
पहिल्याच पुस्तकात( जे माझ्या बायकोने भक्तिभावाने विकत आणले होते) त्यांनी इतके अतिशयोक्त आणि अशास्त्रीय दावे केले होते कि पुढची पुस्तके वाचण्याची इच्छाच राहिली नाही आणि आता त्यात काय दावे केले आहेत ते आठवत नाहीत आणि ते खोडून काढण्यासाठी परत वाचावे अशी फारशी इच्छा होत नाहीये. त्यामुळे त्यावर माझा पास.

In reply to by सुबोध खरे

अनिरुद्ध.वैद्य 07/07/2018 - 01:01
किंवा इन जनरल भारतीय आहार संस्कृतीत बसणाऱ्या प्रत्येक गोष्टींबाबत दिवेकर बाई नेहमीच पॉझिटीव्ह राहिल्यात असेच त्यान्च्या ब्लॉग अन पुस्तकांमधुन आढळले आहे. अर्थात त्याविषयी त्यांनी काही लिहीलंय तर मला ठाउक नाही.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 04/07/2018 - 21:10
"पण दोन वेळ च्या जेवणात तुम्ही सम्राटची/ राजधानीची थाळी पोट फुटेस्तोवर खाल्लीत तर डॉ दीक्षितांना खोटे पाडाल यातही शंका नाही" हे एकदम पटले.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 04/07/2018 - 22:57
बाकी ठीक आहे, एक अनुभवाचा भाग सांगतो.. 12तास उपास झाला की 4 पोळ्या पण जात नाहीत. मी 2 नाश्ता 2 जेवणे आणि बरेच चहा यावरून 2 जेवणे यावर आल्यावर मला हे जाणवले की पूर्वी मी 4 पोळ्या आणि थोडासा भात सहज खायचो, आता मला 3 प्लॉय खाल्या की पॉट भरते.. अर्थात हा सार्वत्रिक अनुभव आहे, उपाशी पोटी तितके जेवण जात नाही, त्यासाठी तुम्ही पट्टीचे जेवणार असायला हवेत.

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 05/07/2018 - 09:42
याचे कारण आपण वजन कमी करायचं आहे हा तुमच्या अंतर्मनाने निश्चय केला आहे म्हणून. हा निश्चय "सर्वात महत्त्वाचा" आहे अन्यथा बहुसंख्य लोक कोणताही आहार / उपचार घेताना "करून तर बघू" अशा साशंक मनाने करतात. शिवाय सहा दिवस मी "डाएट" करतोय आता एक दिवस मला मनसोक्त खाऊ दे या विचाराने तेन्व्हा दाबून खातात म्हणून वजन कमी होत नाही.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 05/07/2018 - 14:40
तुम्ही अंतर्मना मनाबद्दल बोलताय म्हणून हे लिहितोय. अन्यथा याला पूरक असे कोणतेही विज्ञान मला माहित नाही. आणि म्हणून मी कदाचीत याबाबत काही लिहिलेही नसते. पण याच बरोबर हेही स्पष्ट करतो की, याचा अर्थ मी मानसशास्त्रातला तज्ञ आहे असा नसून माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारीत हे लिहित आहे असा घ्यावा. या बाबतीत माझे मत थोडेसे वेगळे आहे. पोट भरल्याची संवेदना नेहमीच येते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व नंतर नंतर ती संवेदना बोथट होऊन जाते. यालाच जिभेसाठी खाणे असे म्हणतात. जेव्हा फक्त दोनदाच जेवायला सुरवात होते तेव्हा संपूर्ण पचनसंस्थेलाच विश्रांती मिळायला लागते आणि उर्जा वाचायला लागते. माझ्या मते या विश्रांतीच्या काळात झीज भरून काढणे या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त, जे काही चुकताय ते दुरूस्त करणे, एकूणच पचनसंस्थेतील त्रुटी भरून काढणे यासाठी वाचलेली उर्जा वापरली जाते. यातच पोट भरल्याची संवेदनापण खूप तिव्र होते. दोन जेवणाच्या मधे काही न खाणे हे जिभेवर नियंत्रण ठेवण्याचीच सुरवात आहे. म्हणजेच हा प्रवास जिभेसाठी खाण्याकडून, पोटासाठी किंवा भूकेसाठी खाण्याकडे होत असतो. त्यामुळे ही तिव्र संवेदना आणखीनच जास्त जाणवायला लागते. एक दोन वर्षाचे मूल जसे पोट भरल्यावर एक घास सुध्दा खायला नकार देते त्या स्थितीला आपण हळू हळू येत जातो असे मला वाटते. अपवाद फक्त एकाच गोष्टीचा. ज्यावेळेस जेवणात आपल्याला आवडता पदार्थ केला असेल तर थोडेसे जास्त खाल्ले जाते पण पोटाला तडस लागेल इतके नक्कीच खाल्ले जात नाही. आता मात्र बास बॉ असे काहीतरी वाटून आपण थांबतो. यालाच भूक भागण्यासाठी खाणे, किंवा थोडी भूक शिल्लक ठेऊन खाणे असेही म्हणता येईल. किंवा डॉ. दिक्षीत यांच्या शब्दात अर्धा भाग अन्न, पाव भाग पाणी व पाव भाग हवा. मी अगोदरच हे स्पष्ट केले आहे की वजन कमी करण्यासाठी मी ही जिवनशैली स्विकारलेली नाही. डॉ. दिक्षितांच्या पध्दतीनुसार माझ्या उंचीप्रमाणे माझे वजन सत्तर किलो पेक्षा जास्त नसले पाहिजे. आणी माझे वजन हे एकसष्ठ ते बासष्ठ या दरमान असते तरीही श्री. आनन्दा यांच्यासारखाच अनुभव मलाही येतो आहे. त्यामुळे वजन कमी करायचा अंतर्मनाचा निश्चय एवढे एकच कारण असेल काय? याबाबत शंका वाटते.

In reply to by शाम भागवत

सुबोध खरे 05/07/2018 - 20:00
पोट भरल्याची संवेदना नेहमीच येते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व नंतर नंतर ती संवेदना बोथट होऊन जाते. यालाच जिभेसाठी खाणे असे म्हणतात. १०० % बरोबर डॉ अभय बंग यांनी हेच लिहिले आहे. आपले शरीर आपल्याला सूचना देत असते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करायला "शिकतो" दोन जेवणाच्या मधे काही न खाणे हे जिभेवर नियंत्रण ठेवण्याचीच सुरवात आहे. अगदी बरोबर. यालाच भूक भागण्यासाठी खाणे, किंवा थोडी भूक शिल्लक ठेऊन खाणे असेही म्हणता येईल. किंवा डॉ. दिक्षीत यांच्या शब्दात अर्धा भाग अन्न, पाव भाग पाणी व पाव भाग हवा. अगदी बरोबर. आयुर्वेदात आपल्या भुकेच्या तीन चतुर्थांश खा म्हणून लिहिलेले आहे. आपण मात्र चार तृतीयांश खातो. त्यामुळे वजन कमी करायचा अंतर्मनाचा निश्चय एवढे एकच कारण असेल काय. माझे बाकी सर्व उत्तम आहे पण दोन जेवणाच्या मध्ये काहीच खायचे नाही हेच तर मला जमत नाहीये म्हणूनच म्हणतोय. मला मधुमेह नाही माझे वजन आदर्श वजनाच्या पेक्षा आयुष्यभर कमीच राहिले आहे. पचनाची किंवा कोणत्याही अवयवाची हृदयाची रक्तदाबाची तक्रार नाही. पण मनोनिग्रह होत नाहीये. म्हणून तर तुमच्या सारख्या लोकांना सलाम आहे. --/\--

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 05/07/2018 - 20:10
तुम्ही जिचकारांचा ऑडिओ ऐकला आहे का? पेशींचे विभाजन व त्यावर किती वर्षे आपण जगू याच संबंध. आणि त्याचा संबंध त्यांनी आपण किती वेळा खातो त्याच्याशी जोडलाय. जो कमी वेळा खातो तो जास्त जगतो असे काहीसे लॉजिक आहेत ते.

In reply to by शाम भागवत

सुबोध खरे 05/07/2018 - 20:43
नाही पण मिताहार घेतल्याने आयुर्मर्यादा वाढते असे बरेच संशोधन लेख आहेत. सर्वात ताजा खालील प्रमाणे https://www.newscientist.com/article/2164602-calorie-restriction-may-extend-lifespan-by-changing-your-sleep/

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 05/07/2018 - 21:26
मग मात्र मिताहारवाले तज्ञ श्रेष्ठ का डॉ. जिचकार/डॉ. दिक्षीत, हे ठरविण्यासाठी तुम्हाला डॉ. दिक्षीतांची पंच्चावन्न मिनिटांची इन्शूलिनची सायकल बाबत नक्की मत बनवायला लागेल. जर ती सायकल खरी असेल तर चार पाच वेळा मिताहार ही थिअरी धोक्याची वाटते. जर ती सायकलची कल्पना बरोबर नसेल तर दिक्षितांचे सगळ व्याक्यानच बाद करायला लागेल. मग प्रश्न उरेल की दोन वेळा भूक भागेस्तोवर काहीही खाल्ल तरी यश कशामुळे मिळतेय. थोडक्यात पंच्चावन्न मिनिटांची सायकल हा कळीचा मुद्दा आहे. असो.

In reply to by सुबोध खरे

मराठी कथालेखक 05/07/2018 - 12:06
बाकी सगळं ठीक आहे पण E =MC वर्ग चा संदर्भ अप्रस्तुत वाटतो. आपले शरीर वस्तूमानाला उर्जेत रुपांतरीत करीत नाही (थोडक्यात अण्विक उर्जेवर) चालत नाही. पण तरीही
ऊर्जा आणि वस्तुमान हे सम प्रमाणात आहेत
हे मान्य. पण काय जळते त्यावर किती उर्जा निर्माण होणार हे ठरते. उर्जा = वस्तूमान x विशिष्ट उष्मा (की उष्मांक) पण प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उष्मा भिन्न असल्याने १०० ग्रॅम कोळसा जळून मिळणारी उर्जा व १०० ग्रॅम पेट्रोल जळून निर्माण होणारी उर्जा यात तफावत असते.

In reply to by मराठी कथालेखक

गवि 05/07/2018 - 12:21
E =MC वर्ग चा संदर्भ
होय. हे सूत्र वस्तुमान खरोखरच "नष्ट" होणाऱ्या प्रक्रियांना लागू आहे. या प्रक्रिया सबअटॉमीक लेव्हलवरच्या आहेत आणि यात ऊर्जा फारच मोठया प्रमाणात निर्माण होते. इथे वस्तुमान नष्ट होऊन ऊर्जा निर्माण होते. तेव्हा हे गुणोत्तर उलट बाजूने लावल्यास सात जन्म सतत पळत राहून जेवढी ऊर्जा निर्माण होईल तितक्याने शरीरातले काही अणुसुद्धा कमी होणार नाहीत. तेव्हा त्या अर्थाने e = mc वर्ग हे अप्रस्तुत, पण.. डॉक्टरांचा मुद्दा पूर्ण योग्य. फक्त फॉर्म्युला बदलला की झालं. आणि मुख्य मुद्दा फॉर्म्युला नसून ठराविक ऊर्जा निर्माण केली (आपण जाळली म्हणतो) की ठराविक ग्राम चरबी वापरली जाऊन शरीरातून बाहेर पडणार हा आहे,

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 05/07/2018 - 12:58
E = MC वर्ग हे सामान्य लोकांना सहज लक्षात राहणारे सूत्र आहे म्हणून दिले आहे. म्हणजे आपण कोणताही चरबी युक्त पदार्थ खाल्ला तर आपले वजन सम प्रमाणात वाढणार. मग ते गाईचे तूप आहे किंवा एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल म्हणून वजन वाढणार नाही असे नाही. ऊष्मागतिकीचा पहिला सिद्धांत(FIRST LAW OF THERMODYNAMICS) याला खरा तर लागू होईल पण तो जास्त गुंतागुंतीचा आहे पण कोळसा आणि पेट्रोल यांचं तुलना बरोबर नाही. कारण १ ग्रॅम चरबी जाळल्यावर ९ कॅलरी निर्माण होतात मग ती तुम्ही तूप खा तेल खा किंवा मलई खा तसेच १ ग्राम कर्बोदके म्हणजे ४ कॅलरी मग तुम्ही पोळी खा भात खा नाही तर ओट्स खा. वजनाच्या दृष्टीने सर्व सारखेच. ( मधुमेहाच्या दृष्टीने नाही हा फरक लक्षात घ्या). किंवा ४५० कॅलरी जाळल्या तर आपल्या शरीरातील चरबी ५० ग्राम ने कमी होईल. यासाठी एका ९० किलोच्या माणसाला ४० मिनिटात ५ किमी धावावे लागते. You burned 466 calories on your 5-kilometer run. At that pace, your calorie burn rate is 93 calories per kilometer and 699 calories per hour. https://www.runnersworld.com/training/a20801301/calories-burned-running-calculator/

In reply to by सुबोध खरे

मराठी कथालेखक 05/07/2018 - 14:51
E = MC वर्ग हे सामान्य लोकांना सहज लक्षात राहणारे सूत्र आहे म्हणून दिले आहे.
तुमचा उद्देश जरी योग्य असला तरी हे सूत्र संभ्रम निर्माण करणारे होईल म्हणून मी ते निदर्शनास आणून दिले , गैरसमज नसावा. झालंच तर १ ग्रॅ वस्तुमानापासून या सुत्राने निर्माण होणारी उर्जा ही 21,510,540,000 किलो कॅलरीज इतकी प्रचंड असेल (काही गल्लत आढळल्यास कृपया सुधारणा सुचवावी), त्यामुळेही गैरसमज टाळणे योग्य असे मला वाटते.
कारण १ ग्रॅम चरबी जाळल्यावर ९ कॅलरी निर्माण होतात मग ती तुम्ही तूप खा तेल खा किंवा मलई खा
बरोबर आहे कारण आपण जे खाल्ले त्यातून आपले शरीर एकाच प्रकारची चरबी बनवत असेल. पण कोणत्या पदार्थातुन किती चरबी बनेल यात फरक असणार. पण तरी "१ ग्रॅ चरबी जळून ९ कॅलरी" हे सूत्र मला ढोबळ सरासरी असेल वाटते. एकाच व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या भागात असलेली चरबी (जसे पोट, मांड्या, कंबर ई) अचूकपणे सारख्याच उष्मांकाची असेल का याबद्दल साशंक आहे. त्याच प्रमाणे दोन माणसांच्या शरीरातील चरबीचा विशिष्ट उष्मांक अचूकपणे सारखाच असेल काय ? टीप : दहावीनंतर माझ्या शिक्षणाचा जीवशास्त्राशी संबंध नाही.. वरील मुद्दा मी केवळ तर्काच्या आधाराने लिहीला आहे.

लई भारी 04/07/2018 - 22:04
या विषयाबद्दल एका सहकाऱ्याकडून ऐकलं होत त्यामुळे उत्सुकता होतीच. माहितीपूर्ण चर्चा व्हावी ही अपेक्षा या धाग्यामुळे पूर्ण होईल.
युट्युबवर दिलेल्या लिंकमध्ये सवा दोन तासांचा कार्यक्रम आहे शिवाय आणखी एक - एक तासाची भाषणाची क्लिपसुद्धा आहे. त्याची फक्त ओडिओ क्लिप - भाषणाचा ओडिओ ( एक तास, 21 MB)

In reply to by कंजूस

शाम भागवत 05/07/2018 - 13:52
जरा आणखी शोधा. डॉ. दिक्षीतांचा एक व्हि डिओ व तो सुध्दा फक्त ६ मिनिटांचा मिळून जाईल. पण मी तो मुद्दामहून सुचवलेला नाही. कारण चिकित्सक माणसाच्या शंका त्यातून फिटणार नाहीत आणि त्यामुळे हा माणूस काहीही फेकतो आहे असे वाटले तर काय घ्या. दुसरे असे की, असा सहा मिनिटांचा व्हिडीओ पाहून तो माणूस धाग्यावर प्रश्न विचारून माझ्या कडून उत्तराची अपेक्षा करणार. खरच सांगतो या विषयाचा मी तज्ञ नसल्याने माझ्याकडून चुकीचे सांगितले जाऊ नये असे मनापासून वाटते. म्हणून योग्य व्यक्तिकडून समजावून घ्या अस मी म्हणतो आहे. उदा. श्री. अनिरूध्द वैद्य व आनन्दराव यांच्यात चाललेल्या चर्चेत भाग घेऊन डॉ. दिक्षीत याबाबत काय सांगतात हे सांगितले. त्यावर लागलीच ममां नी प्रश्न विचारला. आता याला उत्तर द्यावे की नाही या संभ्रमात पडलोय. शेवटी मला विषय समजला आहे असे वाटतेय. पण ते तरी खरे कशावरून? :) असो. ज्याची त्याची इच्छा.

पाषाणभेद 06/07/2018 - 04:50
मी डॉ. जिचकारांचा आणि डॉ. दीक्षितांचा विडीओ दोन वेळा ऐकला. त्यांच्या भाषणाचा विषय सोडून इतर गोष्टीत मला काय वाटले ते मी व्यक्त करतो. या दोन डॉक्टरांच्या अभ्यासाविषयी कुठलीही शंका नाही. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आपली मते व्यक्त केलेली आहेत. हि दोन्ही डॉक्टरांची भाषणे वजन कमी करणे, मधूमेह आदी विषयांवरील जरी नसती किंवा इतर कोणत्याही विषयांवर असती तरी ती केवळ ऐकायला आनंद मिळाला असता इतकी त्या विषयांना धरून असणारी आहे. डॉ. जिचकार तर सर्वज्ञ होते. कदाचित देवांनाही हा असा तज्ञ, अभ्यासू, विवेकशील, सच्छील माणूस पृथ्वीवर का ठेवावा असा हेवा वाटला असावा म्हणून ते अकाली आपल्यातून गेले. डॉ. जिचकारांचा आणि डॉ. दीक्षित हे मराठी भाषाप्रेमी आहेत. त्यांच्या भाषणातून ते सिद्ध होतेच. आरोग्यविषयक संज्ञांसाठी इंग्रजीची भरमार केलेली त्यांच्या भाषणात दिसत नाही. डॉ. जिचकारांच्या तोंडून तर वेगळा विदर्भ मागणार्‍यांचा विनोदाने उल्लेख येतो, त्याचप्रमाणे सदरहू भाषण चालू असतांनाच त्यांचे लक्ष अखंड महाराष्ट्रवादी जनता परिषदेच्या चर्चेला जाण्याकडेदेखील असते. घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी अशी वृत्ती. एकाच वेळी डॉ. जिचकार एका डॉक्टराच्या, समाजसेवीच्या आणि राजकारणी व्यक्तीच्या भुमीकेत उभे राहून भाषण देत होते. दोन्ही डॉक्टरांना भाषणाची कला चांगलीच अवगत आहे. भाषेचे, विषयाचे सखोल ज्ञान, अभ्यासामुळे आलेले पोक्तपण, आवाजातील चढउतार, मधून मधून विनोदाची पेरणी, सभाधीटपणा, प्रसंगावधान आदी गूण त्यांच्या भाषणात ठाई ठाई दिसतात. डॉक्टर जिचकारांचा विडीओ हा विडीओ नसून ऑडीओ रेकॉर्डींग आहे. कदाचीत त्या काळी विडीओ निट न आल्याने केवळ ऑडीओच्या स्वरूपात डॉक्टर ऐकायला भेटतात आणि भाषणभर डॉक्टरांचा आश्वासक हसरा चेहेरा दिसत असतो. भाषणात त्यांना मध्येच पाण्याची तहान लागते तेव्हा अगदी घरगूती आवाजात पाणी मागणे, बसायला जागा न भेटणार्‍यांना सुचना करणे, पुण्याच्या पुणेरीपणावर आणि नागपुरच्या नागपुरीपणावर टिका करणे, वेळोवेळी तक्ते लावण्याच्या सुचना करणे आदी कृती डॉक्टर जिचकार मधून मधून करत असतात. वर डॉक्टर जिचकारांच्या भाषणाबाबत जे जे काही आहे ते ते डॉक्टर दीक्षितांच्या बाबतीत लागू होते. डॉ. दीक्षितांनी आपल्या भाषणाच्यावेळी आधूनिकतेचा समावेश केलेला आहे. वेळोवेळी योग्य त्या ठिकाणी स्लाईडस पडद्यावर दाखवणे, मधूनच एखादे व्यंगचित्र दाखवून श्रोत्यांना तांत्रीक भाषणातून विरंगुळा देणे आदी पद्धतींचा यथोचित वापर त्यांनी केलेला आढळतो. आणि हे सर्व करतांना या कृती कृत्रीम नाही तर अगदी नैसर्गीक पद्धतीने केल्याचे जाणवते. ओघवती संभाषणशैली, श्रोत्यांना मुळ मुद्याकडे पुन्हा ओढून आणणे हे त्यांना अगदी सहजपणे जमलेले आहे. आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे त्यातून व्यापारी नफा कमावण्याचा त्यांचा हेतू नाहीच. जे जे आपल्याला ठावे, शहाणे करावे सकळ जन या वृत्तीने ते आपले ज्ञान इतरांना वाटत आहे. डॉक्टर जिचकार आज हयात नाहीत. डॉक्टर दीक्षित आपल्या मार्गदर्शकाच्या रुपात डॉक्टर जिचकारांना ठेवतात. आपल्या संशोधनाचे श्रेयदेखील ते डॉ. जिचकारांना देतात. आपल्या देशाला मधूमेह, लठ्ठपणा आदींपासून मुक्ती मिळाली पाहीजे असा आशावाद ते भाषणाच्या अंती जागवतात. डॉ. जिचकार आणि डॉ. दीक्षित यांच्या भाषणातून हे दोन देवदूतच आपल्याला भेटतात. एक आदर्श भाषण कसे असावे याचा वास्तूपाठ म्हणजे हि दोन भाषणे आहेत असे मला वाटते. सर्वसामान्यांविषयी कळकळ कशी प्रामाणीक असते आणि ती बाहेर कशी जाणवते ते दोन्ही डॉक्टरांनी सप्रमाणात व्यक्त केले आहे. मला जे वाटते ते मी लिहीले. या लेखनाच्या निमीत्ताने डॉक्टर जिचकारांच्या स्मृती जागवील्या गेल्या. त्यांना भावपुर्ण आदरांजली. डॉक्टर दीक्षितांना या विषयावर तसेच त्यांच्या आवडीच्या विषयांवर आणखीपुढे संशोधन करण्यास वेळ मिळो आणि समाजाची सेवा करण्यास दिर्घायू लाभो या सदिच्छा! ज्यांनी ज्यांनी हि दोन्ही भाषणे अजून ऐकली नाहीत किंवा मोठी भाषणे असल्याने दुर्लक्ष केले आहे त्यांना त्यांना माझी विनंती आहे की भाषण ऐकण्याचा हा अनमोल ठेवा आपण गमावू नका. हि काही राजकीय भाषणे नाहीत. एका राजकीय-संशोधक व्यक्तीमत्वाकडून आणि एका संशोधक व्यक्तिमत्वाकडून दिली गेलेली भाषणे आपण वेळ काढून जरूर ऐका आणि श्रवणानंद घ्या. जय हिंद! जय महाराष्ट्र!

शाम भागवत 06/07/2018 - 16:23
मी हा लेख मायबोलीवरपण प्रसिध्द केला आहे. एका प्रतिसादात पूनम यांनी लिहिले आहे की, "डॉ. जगन्नाथ दिक्षित यांचे याच विषयावर व्याख्यान आहे- ८ जुलै, सकाळी १० वाजता, टिळक स्मारक मंदिर, पुणे इथे. प्रवेश विनामूल्य आहे, पण प्रवेशिका आवश्यक आहेत. त्या अक्षरधारा बुक गॅलरी, बाजीराव रस्ता इथे मिळणार आहेत. ही जाहिरात आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आलेली आहे. इथे माहितीकरता दिली. पुण्यातले इच्छुक लोक जाऊ शकतील, म्हणून. माझ्याकडे महाराष्ट्र टाइम्स येत नसल्याने कुणीतरी खात्री करावी. बातमी खरी असेल तर पूनम यांना धन्यवाद द्यायचे आहेत.

कंजूस 06/07/2018 - 17:51
डॅाक्टर दीक्षित पाच मिनिट भाषणाचा ओडिओ mp3, size 2 MB. डॅाक्टर जिचकर दोन तास कार्यक्रमाचा ओडिओ mp3, size 42 MB. हे mp3 ओडिओ युसी ब्राउजरमधून ओफलाईन save करून कधीही ऐकता येतात. ( युसी >>डाउनलोड>>बॅकग्राउंड डाउनलोड.)

शलभ 09/07/2018 - 15:40
उत्तम लेख लिहिलाय. मी हे videos आधी बघितले होते आणि पटले पण होते. पण अंगभूत आळशी पणा मुळे आणि खादाडीची सवय असल्याने कधी जमले नाही. पण करायची इच्छा आहे. नाखू काकांनी लिहिलंय त्याला तंतोतंत सहमत. आधी विडिओ ऐका. सगळ्या शंका फिटतील.

शाम भागवत 10/07/2018 - 22:12
मिपा उघडल की प्रथम शिफारस हा भाग येतो. त्यानंतर सगळे ग्रुप दिसायला लागून प्रत्येक ग्रुपमधील पहिले पाच लेख दिसतात. त्याच्या शेवटी आणखी पहावर टिचकी मारली की, सगळे लेख दिसायला लागतात. यामधे प्रत्येक लेखाचे नाव व लेखाच्या पहिल्या काही ओळी वगैरे दिसायला लागतात. त्याच्या खाली जी पट्टी असते त्या पट्टीवर उजवीकडे प्रतिसादांची संख्या दिसते. पण त्याच पट्टीवर डाव्या बाजूला एक डोळ्याचे चिन्ह व एक आक्डा दिसतो. व त्यापुढे आणखी एक चिन्ह व एक आकडा दिसतो. त्याचा अर्थ काय हे कुणी सांगेल काय? माझा हा पहिलाच धागा असल्यामुळे मला याबाबत काहीच माहित नाही.

सोमनाथ खांदवे 11/07/2018 - 13:01
भागवत साहेब , पुन्हा एकदा शेअर मार्केट बद्दल लेख सुरू करा ना , माझी विनंती आहे . मिपावर कृषी,भटकंती, कला सगळे विभाग आहेत पण अर्थविषयक विभाग नाही .ती कसर तुमच्या सारखा जाणकार पूर्ण करू शकतो . ज्याला महत्वाचे वाटतयं तो वाचेल बाकीचे मरतील फाट्यावर .

पिलीयन रायडर 15/07/2018 - 20:52
माझ्या आईने गेले एक आठवडा हा प्रयोग सुरू केला आहे. ती सकाळी आणि संध्याकाळी जेवतेय. काय जे खावं वाटतंय ते सगळं एकाच वेळी. मग दिवस भर फक्त ताक पिते. ते ही मीठ साखरेशिवाय. मी तिला आज एक आठवड्यानम्तर भेटले. ती खरंच बारीक दिसतेय. मध्यंतरी तिचं पोट वाढलं होतं आणि पोटाचे काही न काही बारीक आजार. पाय खूप दुखत होते. तिचं म्हणणं आहे की तिला हलकं हलकं वाटतंय, पोट साफ होतंय आणि पाय दुखणं कमी झालं आहे. तिला बाकी मधुमेह, बीपी वगैरे काहीही नाही. झेपत असेल तर करून बघायला हरकत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

सुबोध खरे 16/07/2018 - 09:25
हा प्रयोग एक महिना नव्हे तर सलग सहा महिने करा तरच शाश्वत परिणाम (sustainable results ) मिळतील. आपल्या चरबी बरोबर बरेच पाणी पण साठवलेले असते आणि आहार (आणि व्यायाम) सुरु करता तेंव्हा पहिल्या एक महिन्यात हे सर्व पाणी कमी होते. त्यामुळे सुरुवातीचे ५ ते १० टक्के वजन फार पटकन कमी होते परंतु हे चरबी कमी झाल्याचे नव्हे तर पाणी कमी झाल्याचे लक्षण असते. अर्थात जेंव्हा तुम्ही मिताहार सोडून देता तेंव्हा ती चरबी पाणी परत जमवून घेते आणि पुढच्या एक दोन महिन्यात आपले वजन मूळपदावर येते. हे मी वरच लिहिले आहे. आजकाल सार्वजनिक न्यासांवर रेडिओ टीव्ही यावर इतक्या तर्हेचे प्रदूषण, बैठी जीवन पद्धती, व्यायामाचा अभाव, संकरित आणि जनुकीय बदल केलेले अन्न आणि या सर्वांचा परिणाम म्हणून किडलेली प्रजा, जुन्या जमान्यातील ऋषी मुनी आणि त्यांची शतायूषी जीवन पद्धती इ इ यावर इतके काही ऐकू येते किंवा लिहिलेले असते कि प्रत्येक माणसाला आपली जीवन पद्धती हि साफ चूक आहे असेच वाटत असते. त्यामुळे असे काहि नवीन ऐकले आणि वाचले कि ते करून पाहावे अशी प्रबळ आंतरिक उर्मी दाटून येते आणि लोक ते करून पाहतात. सुरुवातीला माणसाचा उत्साहच इतका असतो कि लगेच १० १५ दिवसात त्याला छान वाटायला लागते. (व्यायाम करण्यासाठी जिम जॉईन करणार्यांनी आपले अनुभव आठवायचा प्रयत्न करा) एखादा महिना उलटला कि माणसाला ती पद्धत कंटाळवाणी किंवा अवडंबर वाटू लागते आणि मग माणूस हळू हळू त्यातून मध्यम मार्ग काढायला लागतो आणि तीन एक महिन्यात गाडी मूळपदावर येते. यात कुणावरच टीका करणे हा उद्देश नाही पण आपण सर्वच आरंभशूर असतो. म्हणून मी सुरुवातीलाच लिहिले आहे कि हि जीवन पद्धती( फक्त दोन वेळेलाच खाणे आणि ४५ मिनिटे नियमाने व्यायाम करणे) किमान सहा महिने किती लोकांना जमणार आहे याबद्दल मला शंका वाटते. अन असे कोणी सतत किमान सहा महिने केले असतील तर त्यांच्या पडलेला फरक याचा अभ्यास करायला मला आवडेल.

In reply to by सुबोध खरे

पिलीयन रायडर 18/07/2018 - 19:56
अगदी अगदी! ती हे किती दिवस करते हे मलाही बघायचं आहे. समजा तिने हे 6 महिने केलंच तर मी नक्की लिहीन इथे. बाकी सध्या पाणी कमी झाल्यामुळे ती बारीक दिसतेय असं मलाही वाटलं. बघू काय होतंय पुढे.

In reply to by सुबोध खरे

माझीही शॅम्पेन 07/08/2018 - 19:42
हा प्रयोग एक महिना नव्हे तर सलग सहा महिने करा तरच शाश्वत परिणाम (sustainable results ) मिळतील. आपल्या चरबी बरोबर बरेच पाणी पण साठवलेले असते आणि आहार (आणि व्यायाम) सुरु करता तेंव्हा पहिल्या एक महिन्यात हे सर्व पाणी कमी होते. त्यामुळे सुरुवातीचे ५ ते १० टक्के वजन फार पटकन कमी होते परंतु हे चरबी कमी झाल्याचे नव्हे तर पाणी कमी झाल्याचे लक्षण असते. अर्थात जेंव्हा तुम्ही मिताहार सोडून देता तेंव्हा ती चरबी पाणी परत जमवून घेते आणि पुढच्या एक दोन महिन्यात आपले वजन मूळपदावर येते. हे मी वरच लिहिले आहे.
नेहमी बरोबर असता तुम्ही , पण डॉक्टर साहेब ह्या वेळेस चुकत आहांत !! सहा महिने सोडाच , दीड वर्ष हे डाएट करून माझ्या एका मित्राचे वजन जवळ १६ किलो कमी झाले आहे , ६ महिन्यात ५-१० kg कमी झालेले सुद्धा मित्र-मैत्रिणी आहेत , तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर सांगा तुमची भेट घडवून देतो घडवून देतो , हि ऐकीव माहिती नाही याची देही याची डोळा पाहिलेला आहे , तेव्हा काय अप्पा करा मला रच्याकने मी तुम्हाला ह्या डाएट विषयी थेट विचारले असता तुम्ही मौन धारण केलं होत , जो अर्थात तुमचा स्टॅन्ड आहे , मी त्याचा आदर करतो

In reply to by माझीही शॅम्पेन

सुबोध खरे 07/08/2018 - 20:13
माझा पहिलंच वाक्य हे आहे. लोकांचे वजन कधीच कमी होत नाही असे मी कधीही म्हटलेले नाही. आरंभशूर माणसांना अशा आहाराचा फायदा होत नाही. जे लोक चिकाटीने असे आहार पाळतात त्यांचे वजन नक्की कमी होते हे मी पाहिलेले आहे/ पाहतो आहे. पण हि संख्या एकंदर डाएट करणाऱ्या लोकांच्या १० % आहे. आणि या ९० % लोकांच्या जीवावर तर तळवलकर, VLCC, अंजली मुखर्जी इ. लोकांनी इमले उभारले आहेत. बाकी डाएट तयार करणे हा माझा विषय नाही किंवा व्यवसायही नाही. त्यामुळे एखाद्या माणसाला विस्तृतपणे असा आहार लिहून किंवा बनवून देणे याला फार काळ लागला असता. सबब मी त्या फंदात पडत नाही. आपण कोणत्याही चांगल्या आहार तज्ज्ञाला दाखवून योग्य सल्ला घेणे हि विनंती.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 07/08/2018 - 22:49
खरे साहेब तुमचे म्हणणे खरे आहे. पण माझ्या अनुभवानुसार माशॅ ही चुकीचे बोलत नाही आहेत. तळवलकर, VLCC, अंजली मुखर्जी वगैरे लोकांचे प्लॅन वर्षानुवर्षे करत रहाणे किंवा जिवनशैली म्हणून स्विकारणे अवघड जाते. प्रत्येक वेळेस मोजून मापून व कॅलरीची गणिते करत खात रहाणे व त्यासाठी पैसे मोजत रहाणे हे काही काळाने तापदायक होते. विशेषकरून घरच्या गृहिणीला ते कष्टप्रद होत जाते. सुरवातीला जरी हे आपल्याला जमू शकेल असे वाटले तरी पुढे पुढे ते अवघड वाटायला लागते. या सगळ्याला एक ग्लॅमर असते व आपण काहीतरी लै भारी करतोय अशी आपली व आपल्याला जवळच्यांची समजूत झालेली असते. २००९ साली मी हे उद्योग केले आहेत. तीन महिन्यातच हा प्रयोग मी बंद केला होता. हा सगळा प्रकारच उच्च मध्यमवर्गीयांना साजेसा असाच आहे. तुमच्यासमोर अशा सगळ्या गोष्टी असल्याने सहा महिने टिकणे अवघड आहे असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक वाटते. या उलट दोन वेळा खाण्याची आहारपध्दती सुरवातीलाच खूप अवघड वाटते. पण जसजसे दिवस जातात तसतसे हे फारस अवघड नाहीये हे लक्षात यायला लागते. हाच मोठा फरक दोन्ही पध्दतींमधे आहे. पण हा फरक पटकन लक्षात येत नाही. जेव्हा मी या प्लॅनबद्दल मित्रमंडळी व नातेवाईकांशी बोललो तेव्हाच याची मला कल्पना यायला लागली. याला कोणतेही ग्लॅमर नाही. कोणतीही जिम नाही. कोणतेही वेगळे खास पैसे द्यायला लागत नाहीत. कोणत्याही महागाईच्या पावडरी नाहीत किंवा कोणत्याही जाहीराती नाहीत. इतकी ही पध्दत सामान्य असल्याने, या पध्दतीबद्दल पटकन विश्वासच बसत नाही. माझ्या बायकोला सुध्दा मी काहीतरी वेडेपणा आहे असेच वाटत होते. (पण त्यात तिला कोणताही त्रास नसल्याने किंवा नेहमीपेक्षा जास्त वेळ खर्चायला लागणार नसल्याने तिला कोणत्याही प्रकारे त्यात मोडता घालणेही जमले नाही.) इतकेच नव्हे तर ती पण आज या आहारशैलीत सहजपणे सामील झाली आहे. हा सगळा विचार करता. माशॅ पण बरोबर आहेत असे मला म्हणावेसे वाटते आहे.

In reply to by शाम भागवत

सुबोध खरे 08/08/2018 - 09:50
सहा महिने टिकणे अवघड आहे असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक वाटते. मी "नकार घंटा" वाजवली आहे असा बऱ्याच लोकांचा समज झाला आहे. स्थिती खरं तर उलट आहे. व्यवस्थित योगसाधना न करणारी माणसे योगाभ्यासाला बदनाम करत असतात. तसेच दीड दोन महिना डॉ दीक्षितांची पद्धती "वापरुन पाहू" म्हणणाऱ्या लोकांमुळे त्यांची पद्धती बदनाम होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी सर्व लोकांना सुरुवातीलाच सावधान करणे आवश्यक आहे म्हणून मी असे लिहिलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 08/08/2018 - 19:14
खरे साहेब तुमच्या व माशॅ यांच्यातील चर्चेमुळे तळवलकर, VLCC, अंजली मुखर्जी यांच्या पध्दती व डॉ. दिक्षीत यांच्या पध्दतीतला फरक मला नोंदवता आला. किंवा मला आलेला अनुभव शब्दबध्द करता आला. तुमची टिपण्णी नकारात्मक आहे किंवा नाही यापेक्षाही, तुम्हा दोघांमुळे मला या जिवनशैलीच्या आणखी एका पैलूवर विचार मांडता आला याचेच जास्त महत्व वाटत आहे. तुम्हा दोघांना धन्यवाद. _/\_

In reply to by शाम भागवत

आनन्दा 10/08/2018 - 10:22
माझे सध्या दीड महिन्यात ५ किलो वजन कमी झाले आहे. बाकी सविस्तर लेख गणपतीनंतर लिहेन. तोपर्यंत वाट बघ्तोय,

In reply to by पिलीयन रायडर

शाम भागवत 16/07/2018 - 15:17
खरय. एनर्जी लेव्हल वाढल्यासारखी वाटते. पुढे पुढे आपोआप ताक पिण्याचे प्रमाणपण कमी होत जाईल. त्याची जरूरी भासेनाशी होते. फक्त इतके वाजले मग ताक प्यायचेच, अशी मानसिकता नको. जरूर वाटली तरच ताक प्यायचे हे भान ठेवणे आवश्यक. "काय जे खावं वाटतंय ते सगळं एकाच वेळी" मु़ख्य म्हणजे इतर प्रकारात सतत आपण उपाशी राहिल्यासारखे वाटते. आपण मनावर ताबा ठेवतोय, काहीतरी आपण गमावतोय असे वाटत रहाते. आपल्याला हे खायचे नाही ते खायचे नाही याचे दडपण वाटत रहाते. जिवनातला खाण्याचा आनंद आपण गमावतोय असे वाटायला लागते. थोडक्यात यामुळे इतर प्रकारात सातत्य ठेवणे जमत नाही. मात्र डॉ. दिक्षीतांच्या प्रकारात जेवणाचा आनंद मिळतो. जेवण झाल्यानंतर एक प्रकारची तृप्ति जाणवते. आपण कोणता तरी पदार्थ खाण्याचा आनंद गमावतोय असे बिलकुल वाटत नाही. त्यामुळे या प्रकारात सातत्य टिकवणे सोपे जाते. "मध्यंतरी तिचं पोट वाढलं होतं आणि पोटाचे काही न काही बारीक आजार. पाय खूप दुखत होते. तिचं म्हणणं आहे की तिला हलकं हलकं वाटतंय, पोट साफ होतंय आणि पाय दुखणं कमी झालं आहे." पुण्याजवळ उरळीकांचन येथे निसर्गोपचार केंद्र आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पचनसंस्थेला सर्वात जास्त उर्जा लागते. त्यासाठी ते उपास करायला सुचवतात. त्यांचे म्हणणे असे की, त्यामुळे एकीकडे पचनसंस्थेला विश्रांती मिळते तसेच त्यामुळे वाचलेली उर्जा शरीर शुध्दतेसाठी वापरली जाऊन शरीरातील दोष कमी व्हायला लागतात. येथेही असेच होते असे माझे मत आहे. दोनदाच खाल्याने अतिरिक्त इन्शूलीनमुळे नविन दोष निर्माण होत नाहीत. तर पचनसंस्थेला विश्रांती मिळायला तर लागतेच पण त्यामुळे वाचलेली उर्जा शरीरातील दोष कमी करण्यासाठी वापरली जायला लागते. माणूस निरोगी व्ह्यायला लागतो. वरील सर्व थोडे अनुभवावर व थोडे तर्कावर आधारीत आहे.
डॉ. जिचकर आणि डॉ. दीक्षितांचे दोन्हीही व्हिडीओ संपूर्ण बघितले. दिवसातून फक्त दोन वेळा खायचे / जेवायचे हे गृहीतक मुख्यतः दोन गोष्टींवर आधारित आहे असे दिसते. १/ इन्सुलिन हे फक्त खाल्ल्यावरच स्त्रवते आणि २/ इन्सुलिन हे ५५ मिनिटांच्या वारंवारतेने स्त्रवते या दोन गोष्टी खऱ्या आहेत का या बद्दल मिपा वरील डॉ. मंडळींनी मार्गदर्शन करावे. वरती एका प्रतिसादामध्ये डॉ. खरे यांनी वरील गोष्टींबद्दल शंका व्यक्त केली आहे. म्हणजे या बाबतीत डॉ. मंडळींमध्ये एकवाक्यता नाही असे दिसते आहे. हि फक्त दोन वेळा जेवायची पद्धत अंगिकारायची असेल तर वरील गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे असे वाटते. विशेषतः सध्याच्या प्रचलित थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे दिवसभर खात रहा या पद्धतीच्या अगदी विरुद्ध हि दोन वेळाच जेवायची पद्धत असल्याने हे कळणे गरजेचे आहे. तसेच फक्त दोन वेळा जेवायचे काही नकारात्मक साईड इफेक्ट्स होऊ शकतात का याबद्दल माहिती असणे देखील आवश्यक आहे. म्हणजे सारासार विचार करून या बद्दल निर्णय घेता येईल. गोगल देवाला साकडे घालून बघितले परंतु या बद्दल काहीच ज्ञान नसल्याने फक्त कन्फ्युजन पदरात पडले ! कृपया मिपा वरील डॉ. मंडळी या बाबत मार्गदर्शन करतील काय?

In reply to by चामुंडराय

शाम भागवत 16/07/2018 - 16:37
डॉ. जिचकर आणि डॉ. दीक्षितांचे दोन्हीही व्हिडीओ संपूर्ण बघितले. दिवसातून फक्त दोन वेळा खायचे / जेवायचे हे गृहीतक मुख्यतः दोन गोष्टींवर आधारित आहे असे दिसते. १/ इन्सुलिन हे फक्त खाल्ल्यावरच स्त्रवते आणि २/ इन्सुलिन हे ५५ मिनिटांच्या वारंवारतेने स्त्रवते.. इन्शुलीन हे फक्त खाल्यावरच स्त्रवते. हे सर्वांनाच मान्य आहे. याबाबत कोणत्याही आहारतज्ञांमधे मतभेद नसावेत. मुद्दा हा आहे की, इतर आहारतज्ञ खालेल्या पदार्थाच्या प्रमाणात इन्शूलीन स्त्रवते असे समजतात. उलट डॉ. दिक्षीतांच्या मते प्रत्येक माणसामधे एका ठराविक प्रमाणातच इन्शूलीन स्त्रवते, खालेल्या पदार्थाच्या प्रमाणात नव्हे. आणि इथेच डॉ. दिक्षीतांचे व डॉ. जिचकारांचे वेगळेपण आहे हे कोणी लक्षात घेत नाही. हा विचार मी मायबोलीवर मांडला होता. पण त्यावर चर्चा करायचे सोडून "भागवतसाहेब अभ्यास वाढवा" असे उत्तर आल्याने मी विषय तेथे जास्त वाढवला नाही. :) इन्शूलीन हे ५५ मिनिटांच्या वारंवारतेने स्त्रवते असे म्हणण्याऐवजी, इन्शूलीन ५५ मिनिटात फक्त एकदाच एका ठराविक मात्रेत स्त्रवते असे म्हणणे जास्त योग्य होईल. गोगल देवाला साकडे घालून बघितले परंतु या बद्दल काहीच ज्ञान नसल्याने फक्त कन्फ्युजन पदरात पडले ! डॉ. जिचकारांनी स्वतःवर प्रयोग करून हे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी इन्शूलीन लेव्हल वारंवार तपासली आहे. त्यांच्यामते ही सायकल ५५ मिनिटा॑पेक्षा जास्त आहे. पण डॉ. दिक्षीतांनी हेच प्रयोग स्वतःवर मोठ्या प्रमाणावर करून तसेच जवळच्या नातलगांवर करून ५५ मिनिटांची सायकल नक्की केली आहे तसेच खालेल्या पदार्थाच्या प्रमाणात इन्शूलीन स्त्रवत नाही हे दाखवून दिले आहे. या सर्व प्रयत्नांचे त्यांनी योग्य ते दस्ताऐवजीकरणही केलेले आहे. आता याबाबत शंका निरसनाबद्दल मिपाकरांना या तीन पध्दती अवलंबवता येतील असे वाटते. १. स्वतःवर प्रत्यक्ष प्रयोग करून डॉ. दिक्षीतांची मते योग्य किंवा अयोग्य हे ठरवणे. म्हणजे प्रत्यक्ष प्रयोगशाळेत वेगवेगळ्या स्थितीतील इन्शूलीनचे प्रमाण पडताळून पहाणे व डॉ. दिक्षीत बरोबर आहेत का चूक आहेत ते ठरवणे. २. मिपावरील तज्ञ लोकांनी डॉ. दिक्षीतांनी जे प्रबंध लिहिले आहेत त्याद्वारे माहिती मिळवणे. किंव प्रत्यक्ष भेटून शंका निरसन करून घेणे. (मला वाटते डॉ. श्रीहास हे काम उत्तम रितीने करू शकतील. कारण डॉ. दिक्षीतांचे बरेच कार्य हे औरंगाबादला झालेले असल्याने ते स्वतः त्यांना ओळखतही असतील.) ३. माझ्या सारख्या सामान्य लोकांनी डॉ. दिक्षीत योग्य तेच सांगत आहेत असे समजून त्याप्रमाणे वागून प्रत्यक्ष अनुभव घेणे. व ते अनुभव येथे मांडून चर्चेद्वारे मत बनवणे. मी हा लेख ऐसी अक्षरेवर पण लिहिला होता. पण तेथील प्रतिसाद चर्चेसाठी योग्य न वाटल्याने तेथील सहभाग थांबवला. पण त्यात मला एक विरोधी मुद्दा मिळाला तो येथे नमूद करतो. "वरील प्रकार, एकदा करुन पाहिला होता. पण त्यातून, दीर्घवेळ काही न खाल्ल्यामुळे मला ॲसिडीटीचा त्रास झाला. त्यानंतर, पुन्हा चार वेळा खायला सुरवात केल्यावर, पुन्हा तंदुरुस्त झालो. खवैय्या असल्यामुळे माझे वजन कमी होत नाही. पण रोजच्या व्यायामामुळे , स्थिर तरी रहाते, आणि मी त्यावरच खूष आहे." मला वाटते डॉ. दिक्षीतांचे व्याख्यान काळजीपूर्वक न ऐकल्याचा हा परिणाम असावा. याबाबतीत डॉ. दिक्षीतांच्या व्याख्यानात अ‍ॅसिडिटी कशी होते हे समजावून सांगितले आहे. तिकडे लक्ष वेधू इच्छितो. जर आपल्याला दोन वेळच्या जेवणाव्यतिरिक्त आणखी काही खाण्याच्या वेळा असतील व त्यात बरीच वर्षे सातत्य असेल तर त्या वेळेस पाचक द्रव तयार केले जातात. अशा वेळेस काहीच खाल्ले नाही तर ते द्रव अतिरिक्त ठरून अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. यावर त्यांनी सुचवलेला मार्ग असा की, जेवणाच्या दोन वेळा व्यतिरिक्त जेव्हा तुम्हाला भूक लागल्यासारखे वाटेल तेव्हा पाणि प्या. बर्‍याच वेळेस तहान लागलेली असते पण आपल्याला वाटते भूक लागलीय. पाणी पिऊनही समधान न मिळाल्यास दोन चमचे दह्यापासून बनवलेले ग्लासभर ताक प्या. नारळाचे पाणी प्या. म्हणजे अ‍ॅसिडिटीच्या त्रासातून तुम्ही वाचाल. (शरीराला जेवणाव्यतिरिक्त इतर वेळी खायची लागलेली सवय मोडेपर्यंत काही दिवस हे करावे लागेल. अस त्यांना यातून सुचवायचे असावे असा माझा तर्क आहे.) माझ्या आकलनानुसार मी मुद्दे मांडले आहेत.

In reply to by चामुंडराय

शाम भागवत 16/07/2018 - 16:43
वरती एका प्रतिसादामध्ये डॉ. खरे यांनी वरील गोष्टींबद्दल शंका व्यक्त केली आहे. पण त्याचबरोबर हेही लिहिले आहे की, याबद्दल माझे वाचन चालू आहे. याच्या बाजूने किंवा विरुद्ध काही आढळले तर त्यावर अधिक वाचन केल्याशिवाय काही टिप्पणी करणे चूक ठरेल.

सोमनाथ खांदवे 16/07/2018 - 21:48
वरील प्रकार, एकदा करुन पाहिला होता. पण त्यातून, दीर्घवेळ काही न खाल्ल्यामुळे मला ॲसिडीटीचा त्रास झाला. त्यानंतर, पुन्हा चार वेळा खायला सुरवात केल्यावर, पुन्हा तंदुरुस्त झालो. खवैय्या असल्यामुळे माझे वजन कमी होत नाही. पण रोजच्या व्यायामामुळे , स्थिर तरी रहाते, आणि मी त्यावरच खूष आहे." अस बोलणारा नक्कीच पुणेकर असणार ! स्वयंभू असतात ते !!! " भागवत साहेब , अभ्यास वाढवा " अशा प्रकारचे फतवे काढणारे मिपावर खूप वाढलेत हे मात्र नक्की .

मराठी कथालेखक 17/07/2018 - 17:31
मी आता दोन नाही पण तीन वेळा खाण्यास सुरवात केली आहे. सकाळचा नाष्टा बंद केला नाही , त्याचवेळी दूध व दूधाचा चहा ई सुद्धा घेतो. असे सुरु केल्यावर तिसर्‍या -चौथ्या दिवशी मधल्या वेळेत बरीच भूक जाणवत होती, जेवण थोडेसे जास्तच घ्यावे याकडे कल होता पण नंतर अशी सतत जाणवत राहणारी भूक नाहीशी झाली. संध्याकाळी बिनासाखरेचा काळा चहा घेतो. आता सुमारे १०-१२ दिवसानंतर छान वाटते आहे. वजनात अजून फारसा फरक नाही. आणखी थोडे दिवसांनी आणखि काय परिणाम होतात ते लिहीन

पिवळा डांबिस 17/07/2018 - 22:56
हा माहितीपूर्ण धागा काढल्याबद्दल श्री. भागवत यांना धन्यवाद. मी त्यांच्या सल्ल्यानुसार डॉ. जिचकार आणि डॉ. दिक्षीत ह्या दोघांचीही व्याख्याने यू-ट्यूबवर पाहिली/ ऐकली. डॉ. जिचकारांना माझ्या लहानपणी व्याख्यानात व ते मंत्री असतांना टीव्हीवर पाहिलं होतं. हे एक निरलस आणि निस्पृह काम आहे यात शंका वाटत नाही. एक शंका उपस्थीत झाली ज्याचे निरसन भागवत कदाचित करू शकतील म्हणून हा लेखनप्रपंच. १. दोघेही डॉ. २४ तासांत दोन वेळा जेवण घ्या असं सांगतात. परंतु जिचकारांच्या भाषणात अधेमध्ये लागल्यास लो कॅलरी फूड (टरबूज/ खरबूज, काकडी इत्यादि) खा असा सल्ला देतात (असा माझा समज झालाय). ह्याउलट डॉ. दिक्षीत त्यांच्या भाषणात ह्या मुद्द्याचा उल्लेखही करीत नाहीत. नक्की सल्ला काय? अ‍ॅम आय मिसिंग समथिंग? २. कुठलाही कार्बोहायड्रेट असलेला पदार्थ खाल्ला (मग तो कितीही कमी प्रमाणात असो) की ठराविक इन्शुलिन सीक्रीट होतं हे समजलं. पण व्हॉट अबाऊट शुगर सबस्टीट्यूट? त्यानेही इन्शुलिन सीक्रीट होत का? आणि असल्यास त्यामागे काय लॉजिक आहे? जर माहिती मिळू शकली तर आभार.

In reply to by पिवळा डांबिस

शाम भागवत 18/07/2018 - 20:34
१. दोघेही डॉ. २४ तासांत दोन वेळा जेवण घ्या असं सांगतात. परंतु जिचकारांच्या भाषणात अधेमध्ये लागल्यास लो कॅलरी फूड (टरबूज/ खरबूज, काकडी इत्यादि) खा असा सल्ला देतात (असा माझा समज झालाय). ह्याउलट डॉ. दिक्षीत त्यांच्या भाषणात ह्या मुद्द्याचा उल्लेखही करीत नाहीत. नक्की सल्ला काय? अ‍ॅम आय मिसिंग समथिंग? जर दोन जेवणाच्या व्यतिरिक्त एखाद्या विशिष्ट वेळी काहीतरी खाण्याची वर्षानुवर्षांची सवय असेल तर त्यावेळेस शरीर पाचक रस तयार करते आणि त्यावेळेस जर काहीच खाल्ले नाही तर ती पाचक द्रव्ये अतिरिक्त ठरून अ‍ॅसिडिटीचा त्रास होणे शक्य असते. अशावेळेस तो त्रास होऊ नये यासाठी डॉ. जिचकारांनी व डॉ. दिक्षीतांनी काही पदार्थ नाईलाजाने सुचवले आहेत, हा मुद्दा प्रथम लक्षात घेऊन मग पुढे जाऊ. थोडक्यात हे पदार्थ खाऊन तात्पुरती वेळ मारून न्या. तसेच हे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी कमी करत जाऊन, शरीराला लागलेली सवय हळूहळू मोडून काढून दिवसातून फक्त दोनदाच जेवायचे इथपर्यंत कसे पोहोचायचे आहे, याबद्दल केलेले ते मार्गदर्शन आहे असे मला वाटते. डॉ. जिचकारांनी जेव्हा विचार मांडला तेव्हा वजन कमी करण्यासाठी पिष्टमय पदार्थामुळे वजन वाढते हे लक्षात आले होते. दोन वेळा जेवणाच्या मधे भूक सहन झाली नाही अगदी नाईलाज झाला तर काय करायचे? या प्रश्नाला त्यांनी त्यावेळी त्यांना माहित असलेली कमी कर्बोदके असलेले पदार्थ सुचवले. जेणे करून कमीत कमी ग्लुकोज तयार होईल. पण हळूहळू दोन जेवणाच्या मधे काही न खाण्यापर्यंत पोहोचा असे त्यांना सांगायचे आहे. कारण कमी कर्बोदके असली तरी पण त्यामुळे इन्शूलीन स्त्रवते व ते अतिरिक्त असते हे त्यांना माहित होते. थोडक्यात टरबूज/ खरबूज, काकडी इत्यादि पदार्थ त्यांनी नाइलाजाने सुचवले होते. हा विचार पुढे नेण्यासाठी डॉ. दिक्षीतांनी स्वतःवर प्रयोग केले व कोणते पदार्थ खाल्याने इन्शूलीन स्त्रवत नाही हे शोधून काढले. आणि नाइलाज झाला तर काय करा? ह्या प्रश्नावरील जिचकारांचे उत्तर आणखी शास्त्रशुध्द केले. हे प्रयोग त्यांनी कसे केले हेही त्यांनी सांगितले आहे. प्रथम रक्तातील इन्शूलीन तपासायचे. मग पदार्थ खायचा व त्यानंतर ५५ मिनिटांनी परत इन्शूलीन तपासायचे. ह्या पध्दतीने कोणालाही नवीन पदार्थ तपासता येऊ शकतो. थोडक्यात टरबूज/ खरबूज, काकडी या पदार्थांमूळे इन्शूलीन स्त्रवत असल्यामुळे डॉ. दिक्षीतांनी हे पदार्थ बाद केले आहेत. डॉ. दिक्षीतांनी सुचवलेले पदार्थ हेही नाईलाज झाला तरच खायचे आहेत. त्याबत ते म्हणतात. भूक लागल्यासारखे वाटले तर प्रथम पाणी पिऊन बघा. तेवढ्याने भागले तर उत्तमच. नाहीतर मग सुचवलेले पदार्थ खा. माझ्या मते डॉ. दिक्षीतांनी हे पदार्थ शोधून डॉ. जिचकारांचा विचार आणखी पुढे नेला असला तरी हे पदार्थ खाल्यामुळे ते पचवण्याचे काम पचनसंस्थेला करायलाच लागते. त्यात उर्जाही खर्च होते व तिला मिळणारी विश्रांतीही कमी होते. डॉ. दिक्षीतांनी जे प्रयोग केले ते डॉ. जिचकारही करू शकले असते. तेवढी बुध्दीमत्ता त्यांना नक्कीच होती. पण देवाने त्यांना लवकर बोलावले म्हणून ते काही करू शकले नाहीत. यासाठीच मी लेखात असे म्हणले आहे की, नियतीने बी लावायचे काम त्यांच्यावर सोपवले होते. डॉ. दिक्षीतांनी जरी प्रयोग केले असले तरीही ते सर्व श्रेय डॉ. जिचकारांना देतात. कृतज्ञता व्यक्त करतात. अध्यात्मामधे कृतज्ञता हा शब्द अहंकाराच्या विरोधार्थी शब्द मानला जातो. त्यामुळेच डॉ. दिक्षीतांची भाषा अभिनिवेशशून्य आहे. त्यातून समाजाचे भले होण्याची कळकळ जाणवते. असो. विषयांतर व्हायला लागले. थांबतो. :) २. कुठलाही कार्बोहायड्रेट असलेला पदार्थ खाल्ला (मग तो कितीही कमी प्रमाणात असो) की ठराविक इन्शुलिन सीक्रीट होतं हे समजलं. पण व्हॉट अबाऊट शुगर सबस्टीट्यूट? शुगर सबस्टीट्यूट पदार्थ असला तरी त्यामुळे इन्शूलीन स्त्रवते किंवा नाही हे महत्वाचे. त्यामुळे निव्वळ याच पध्दतीने केलेले वर्गीकरण आपल्या उपयोगाचे आहे. बाकी कोणत्याही इतर निकषांच्या आधारे केलेले वर्गीकरण आपल्या उपयोगाचे नाही.

In reply to by शाम भागवत

पिवळा डांबिस 19/07/2018 - 04:10
जर दोन जेवणाच्या व्यतिरिक्त एखाद्या विशिष्ट वेळी काहीतरी खाण्याची वर्षानुवर्षांची सवय असेल तर त्यावेळेस शरीर पाचक रस तयार करते आणि त्यावेळेस जर काहीच खाल्ले नाही तर ती पाचक द्रव्ये अतिरिक्त ठरून अ‍ॅसिडिटीचा त्रास होणे शक्य असते. अशावेळेस तो त्रास होऊ नये यासाठी डॉ. जिचकारांनी व डॉ. दिक्षीतांनी काही पदार्थ नाईलाजाने सुचवले आहेत, हा मुद्दा प्रथम लक्षात घेऊन मग पुढे जाऊ. थोडक्यात हे पदार्थ खाऊन तात्पुरती वेळ मारून न्या. तसेच हे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी कमी करत जाऊन, शरीराला लागलेली सवय हळूहळू मोडून काढून दिवसातून फक्त दोनदाच जेवायचे इथपर्यंत कसे पोहोचायचे आहे, याबद्दल केलेले ते मार्गदर्शन आहे असे मला वाटते.
आय सी.
डॉ. दिक्षीतांनी जे प्रयोग केले ते डॉ. जिचकारही करू शकले असते. तेवढी बुध्दीमत्ता त्यांना नक्कीच होती........ डॉ. दिक्षीतांनी जरी प्रयोग केले असले तरीही ते सर्व श्रेय डॉ. जिचकारांना देतात. कृतज्ञता व्यक्त करतात. अध्यात्मामधे कृतज्ञता हा शब्द अहंकाराच्या विरोधार्थी शब्द मानला जातो. त्यामुळेच डॉ. दिक्षीतांची भाषा अभिनिवेशशून्य आहे. त्यातून समाजाचे भले होण्याची कळकळ जाणवते.
संपूर्ण परिच्छेदाशी सहमत आहे.
डॉ. दिक्षीतांनी सुचवलेले पदार्थ हेही नाईलाज झाला तरच खायचे आहेत. त्याबत ते म्हणतात. भूक लागल्यासारखे वाटले तर प्रथम पाणी पिऊन बघा. तेवढ्याने भागले तर उत्तमच. नाहीतर मग सुचवलेले पदार्थ खा.
हे डॉ. दीक्षीतांनी सुचवलेले पदार्थ कोणते? ते त्यांच्या भाषणात पाणी आणि दोन चमचे दह्यापासून केलेले ताक ह्याविषयी बोलतात. अन्य काही पदार्थ त्यानी सुचवलेले तुमच्या वाचनात/ऐकण्यात आलेले आहेत का? (कारण मला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची अ‍ॅलर्जी असल्यामुळे विचारतोय)
शुगर सबस्टीट्यूट पदार्थ असला तरी त्यामुळे इन्शूलीन स्त्रवते किंवा नाही हे महत्वाचे. त्यामुळे निव्वळ याच पध्दतीने केलेले वर्गीकरण आपल्या उपयोगाचे आहे.
मान्य. माझ्या प्रश्नाचा रोख असा होता की त्यांनी शुगर सब्स्टीट्यूट टेस्ट केले असणारच, मग त्यामुळे इन्शुलीन स्त्रवते असं त्यांना आढळून आलं का? खरोखर मनापासून विचारतोय. तुम्ही वेळात वेळ काढून आमचं शंकानिरसन करताय याबद्दल अनेक धन्यवाद.

In reply to by पिवळा डांबिस

मराठी कथालेखक 19/07/2018 - 12:52
जिचकरांच्या भाषणात शुगस सबस्टिट्युट पण नको , त्यानेही इन्शुलिन स्त्रवते असा उल्लेख आहे बहूधा.. जमल्यास पुन्हा ऐकून बघा.

In reply to by मराठी कथालेखक

पिवळा डांबिस 24/07/2018 - 01:07
जिचकरांच्या भाषणात शुगस सबस्टिट्युट पण नको , त्यानेही इन्शुलिन स्त्रवते असा उल्लेख आहे बहूधा.. जमल्यास पुन्हा ऐकून बघा.
हम्म, माझ्या ऐकण्यातून निसट्लं असावं बहुतेक. कन्फार्मेशनसाठी धन्यवाद.

In reply to by पिवळा डांबिस

शाम भागवत 19/07/2018 - 13:28
माझ्या प्रश्नाचा रोख असा होता की त्यांनी शुगर सब्स्टीट्यूट टेस्ट केले असणारच, मग त्यामुळे इन्शुलीन स्त्रवते असं त्यांना आढळून आलं का? शुगर सब्स्टीट्यूट आणि शुगर फ्री यात काय फरक आहे ते मला माहित नाही. पण शुगर फ्री सुध्दा नको. त्यानेही इन्सुलीन स्त्रवते हे त्यांनी स्पष्टपणे चहाच्या संदर्भात सांगितले आहे. त्यांनी शुगर सब्स्टीट्यूट हा शब्द मात्र कुठेच वापरलेला नाही. जिचकारांनी तो शब्द वापरला आहे. शुगर सब्स्टीट्यूट वगैरे अस काही नसत असेही ते म्हणाले आहेत. मात्र हे वाक्य इन्शूलीन स्त्रवण्याच्या संदर्भात आहे. बाकी कोणत्या निकषाच्या बाबतीत ते म्हणालेले नसावेत. हे डॉ. दीक्षीतांनी सुचवलेले पदार्थ कोणते? ते त्यांच्या भाषणात पाणी आणि दोन चमचे दह्यापासून केलेले ताक ह्याविषयी बोलतात. अन्य काही पदार्थ त्यानी सुचवलेले तुमच्या वाचनात/ऐकण्यात आलेले आहेत का? (कारण मला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची अ‍ॅलर्जी असल्यामुळे विचारतोय) याबाबतीत त्यांनी दिलेला अग्रकम असा आहे. दोन जेवणाच्या मधे काहीही न खाणे हे सर्वोत्तम. त्याला पर्याय मम्हणजे १."पाणी" ह्याला प्रथम प्राधान्य. किंबहुना पाणी भरपूर प्या. २. ताक चालेल. पण ते सुध्दा २ चमचे दह्यापासून ग्लासभर बनवलेले पातळ ताक पाहिजे. बाजारच्या ताक दह्यात प्रिझर्व्हेटीव्ह्ज असल्याने ते चालणार नाही. दही शक्यतोवर घरीच बनवा. ३.ग्रीनटी आवडत असेल तर तो घ्या. ब्लॅक टी चालेल. पण दूध न घालता केलेला चहा आवडत नसेल तर २५% दूध व ७५%पाणी असा चहा तोही बिनसाखरेचा चालेल. यातही शुगर फ्री नको. ४. नारळाचे पाणी चालेल. पण त्यातील गर चालणार नाही. तो आवडत असेल तर तो काढून घ्या व जेवताना खा. ५. टोमॅटोच्या एक दोन फोडी चालतील मात्र दिवसभरात एक टोमॅटो ही मर्यादा आहे. डॉ. दिक्षीतानी स्वतःच्या खिशातून पंचेचाळीस हजार खर्च करून एकूण १८ पदार्थ तपासले. लोकांवर प्रयोग केले. त्यातून इन्सूलीन स्त्रवणारे पदार्थ वगळून ही लिस्ट बनली आहे. जर कोणाला एखादा पदार्थ खाल्यामुळे इन्सुलीन स्त्रवते किंवा नाही हे तपासायचे असेल तर त्याची पध्दत पुढील प्रमाणे आहे. शून्य मिनिटाला इन्सूलीन तपासण्यासाठी रक्ताचा नमुना घ्या. पदार्थ खा. दहाव्या मिनिटाला दुसरा रक्ताचा नमुना घ्या. साठाव्या मिनिटाला तिसरा नमुना घ्या. पॅथेलॉजीस्टकडून इन्सूलीन मात्रा तपासून घ्या. इन्सूलीन चे प्रमाण वाढले नसेल तर तो पदार्थ खायला हरकत नाही. ही प्रयोगाची पध्दत अशीच का याबाबत मला काहीच माहित नाही. एकावेळचे रक्त तपासणीचा खर्च त्यावेळेस १२०० रूपये होता. त्यामुळे एक पदार्थ तपासायला ३६०० रूपये लागत असत. आता तो बर्‍याच ठिकाणी एकावेळेस ६०० रूपये झाला आहे. म्हणजे एका पदार्थाला १८०० रूपये खर्च येऊ शकतो. यातील १० व्या मिनिटांची तपासणी मला नीट समजलेली नाही. या अगोदर या तपासणीच्या बाबतीत लिहायला थोडी चूक झाली होती ती इथे दूरूस्त करत आहे.

In reply to by पिवळा डांबिस

शाम भागवत 25/07/2018 - 00:07
एकदाच ऐकून भाषणातले सगळे मुद्दे लक्षात राहणे शक्य नसते. परत दोन तास देणे कंटाळवाणे होऊ शकते किंवा नंतर बघू अस म्हणत लांबणीवर पडते. यासाठी एक लिंक देत आहे. तो VDO आहे. डॉ. दिक्षीतांनीच सारांश रुपात सगळे सांगितले आहे. नुसते ऐकूनही उजळणी करता येऊ शकेल. तसेच डॉक्टरांनी बरेच तक्ते बनवलेले असून त्यातले दोन महत्वाचे दाखवले जातात. त्यांचे screenshot घेऊन ठेवल्यास सर्व संदर्भ अगदी हाताशी राहू शकतील. कोणालाही थोडक्यात सांगायचे असल्यास खूप उपयोगाला येतात. तुम्हाला आलेल्या अडचणीमुळे मला हे सुचले म्हणून तुम्हालाच धन्यवाद व शुभेच्छा. https://youtu.be/99iQOs-u_HU

In reply to by पिवळा डांबिस

सुबोध खरे 20/07/2018 - 09:51
पिडां साहेब Effects of stevia, aspartame, and sucrose on food intake, satiety, and postprandial glucose and insulin levels https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2900484/ This is the first study to directly test the effects of the natural sweetener, stevia, on food intake, satiety, and postprandial glucose and insulin levels in humans. The key finding was that participants did not compensate by eating more at either their lunch or dinner meal when they consumed lower calorie preloads containing stevia or aspartame compared to when they consumed higher calorie preloads containing sucrose. In other words, even after a lower calorie preload, food intake at subsequent lunch and dinner meals was not increased and discretionary food intake did not differ between the conditions. Thus, participants’ total caloric intake was lower in the stevia and aspartame conditions, compared to the sucrose condition, solely due to the difference in caloric amounts of the preloads used in this study. Our findings are consistent with previous studies, which have found that changing the energy density of a food does not result in an accurate compensation in energy intake at subsequent meals (Levitsy, 2001; Rolls, Hetherington, & Laster, 1988; Rolls, Laster, & Summerfelt, 1989). Other studies have also found that consumption of preloads an hour and a half before testing did not influence the amount consumed in the following meal (Rolls et al., 1991). Findings such as these suggest that the eating behavior of humans may not be strongly related to previous caloric intake, at least in the short-term. Other studies suggest that compensation may not occur even over relatively long time periods. For example, sucrose-sweetened food and beverages resulted in a 1.6 kg weight gain in overweight individuals whereas artificially sweetened foods and beverages resulted in a 1.0 kg weight loss over a 10 week period (Raben, Vasilaras, Moller, & Astrup, 2002). Consumption of stevia in preloads significantly lowered postprandial insulin levels compared to both aspartame and sucrose, as well as postprandial glucose levels compared to sucrose. Consumption of aspartame in preloads also reduced postprandial glucose compared to sucrose at twenty minutes following consumption of the preload. These effects on postprandial glucose levels are likely due in large part to the lower caloric and carbohydrate intake in the aspartame and stevia preloads compared to the sucrose preloads. However, these effects do not appear to be solely due to the lower calorie preloads in the stevia condition, as participants consumed identical calorie amounts in the preloads used in both the stevia and aspartame conditions. If future studies confirm these findings, then stevia may be helpful in managing postprandial hyperglycemia, which recent studies indicate is an important contributor to the development of insulin resistance and Type 2 diabetes

In reply to by सुबोध खरे

पिवळा डांबिस 24/07/2018 - 01:30
थॅन्क यू फॉर द लिंक, डॉक. आर्टिकल वाचून जर काही शंका शिल्लक राहिल्यास विचारीन. मला हा मुद्दा समजायला अडचण येतेय की एकदा मॉलीक्युलर बायालॉजीचं शास्त्र वापरून (इन्शुलिन,रिसेप्टर वगैरे) विचार करायचा म्हंटल्यावर ताक वगैरे मधले शुगर मॉलिक्यूल्स बॉडीला रेकॉगनाईझ होत नाहीत आणि इन्शुलिन स्त्राव होत नाही पण स्ट्रक्चरली संपूर्णपणे वेगळे असलेले शुगर सबस्टिट्यूट मॉलीक्यूल्स बॉडी रेकग्नाईझ करून इन्शुलिन स्त्रवते हे कसं काय? अर्थात डॉ. दिक्षीतांनी स्वतःवर प्रयोग केले म्हणतात त्यामुळे त्यावर शंका घ्यायचा हेतू नाही, पण कन्सेप्च्युअली समजायला मला जरा अवघड जातंय इतकंच. युवर थॉटस आर वेलकम...

In reply to by पिवळा डांबिस

सुबोध खरे 24/07/2018 - 11:21
दुधात लॅक्टोज हि दुग्ध शर्करा असते. त्याचे विघटन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये होते आणि यातील ग्लुकोजमुळे इन्स्युलिनचा स्त्राव होतो. पण गॅलॅक्टोज मुळे होणारा स्त्राव हा ग्लुकोजपेक्षा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे एकंदर लॅक्टोज मुळे इन्स्युलिनचा स्त्राव ग्लुकोजपेक्षा कमी होतो. दुधाचे जेंव्हा ताक होते तेंव्हा त्यातील लॅक्टोज चे लॅक्टिक ऍसिड (बारा कार्बन रेणूचे तीन कार्बन रेणूत) मध्ये रूपांतर होते. यामुळे मुळात त्यातील शर्करेचे प्रमाण कमी होते. शिवाय लॅक्टिक ऍसिड मुळे जठरातील अन्नपदार्थ लहान आतड्यात जाण्यास जात वेळ लागतो (Delayed gastric emptying). त्यामुळे रक्तातील साखरेचे आणि पर्यायाने इन्स्युलिनच्या स्रावाचे प्रमाण कमी होते. मूळ ग्लुकोजचे रेणू जसे असतात त्याचे आणि इतर साखरेचे रेणू यात साधर्म्य असल्याने त्यांचा स्वादुपिंडातील संवेदकावर (रिसेप्टर) ग्लुकोज इतका नाही पण थोडा कमी परिणाम होतोच. याच कारणाने काही अमिनो आम्ले यांचा पण स्वादुपिंडातील रिसेप्टर वर परिणाम होऊन इन्स्युलिनचा स्त्राव तयार होतो. उदा ग्लुटामिक आम्ल यातील अमाईन हा रेणुगट काढला तर त्याचे ग्लुटारिक आम्लात रूपांतर होते. हे पाच कार्बन असणारे संयुग ग्लुकोजशी साधर्म्य असणारे आहे ज्यामुळे इन्स्युलिनचा स्त्राव तयार होतो.

In reply to by सुबोध खरे

पिवळा डांबिस 27/07/2018 - 02:11
तुमच्या प्रतिसादातून मला हे समजलं की कार्बोहायड्रेट्चे स्वरूप आणि कंझ्यूम केलेली क्वांटिटी यावर इन्शुलिनचा स्त्राव अवलंबून असावा असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ह्या मताशी मी सहमत आहे. पण मूळ लेख/उपचारपद्धतीमध्ये ह्याउलट इन्शुलिन स्त्राव हा नेचर ऑफ कार्ब इन्डिपेन्डंट आणि फिक्सड अमाउंट असतो असं प्रतिपादन केलं आहे. माझं क्न्फ्यूजन तिथे होतं. एनिवे, जर लोकांना ह्यातून टिकाऊ फायदा होत असेल तर मला ह्या उपचारपद्धतीला उगाच अपशकून करायची इच्छा नाही. कुठूनही समाजाला लाभ झाल्याशी कारण मग त्यामागचं विज्ञान काही का असेना... माझ्या शंकांची पेशंटली उत्तरे दिल्याबद्दल तुमचे, श्री भागवत, आणि मराठी कथालेखक यांचे आभार.

सुचिता१ 18/07/2018 - 15:04
डॉ. जिचकारांचा विडियो बघीतला. सगळच खूप छान समजावून सांगीतले आहे. तुम्ही लींक दिलीत , हा धागा काढला , बरयाच वाचकांना याचा निश्चीतच लाभ होइल. मी तुमची अत्यंत आभारी आहे.

In reply to by सुचिता१

शाम भागवत 18/07/2018 - 19:12
तरीपण माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही डॉ. दिक्षीतांचा व्हीडीओ पण पहा. डॉ. जिचकारांचा विचारांच्या आधारे आणखी प्रयोग करून डॉ. दिक्षीतांनी तो विचार आणखी पुढे नेलाय. जास्त सोपा केलाय. त्या विचारात आणखी खोल जाऊन डॉ. जिचकारांच्या पध्दतीपेक्षा जास्त प्रभावी पध्दत मांडली आहे.

अमर विश्वास 19/07/2018 - 19:11
सध्या आमच्या घरातही डॉक्टर दीक्षितांच्या डाएटचे प्रयोग चालू आहेत . मी स्वत: यापूर्वी (७-८ वर्षांपूर्वी) क्लीन डाएट + व्यायाम या मार्गाने १० किलो वजन कमी केले होते .. आता पुन्हा सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबर पर्यंत ८ किलो वजन कमी करायचे टार्गेट आहे .. बघूया डॉ. दीक्षितांच्या प्रयोगाला यश मिळते कि माझ्या क्लीन डाएट + व्यायाम या मार्गाला

In reply to by अमर विश्वास

शाम भागवत 19/07/2018 - 22:00
डॉ. दीक्षितांच्या प्रयोगाला तसेच तुमच्या क्लीन डाएट + व्यायाम या दोन्ही मार्गांना यश मिळो. फिटनेस महत्वाचा. त्याचबरोबर निवडलेल्या मार्गावर कोण जास्त काळ टिकून राहते आहे ते पण नोंदवा. जी पध्दत सोपी असते ती सहजपणे जास्त काळ टिकण्याची शक्यता असते. त्यादृष्टीनेही काही नवीन माहिती मिळू शकेल. तुमचे अनुभव जरूर मांडत रहा. तसेच तुम्ही राबवत असलेल्या क्लीन डाएट + व्यायाम मार्गाबद्दलपण येथे माहिती दिली तर फार बरे होईल. तेवढीच ज्ञानात भर.

In reply to by शाम भागवत

अमर विश्वास 19/07/2018 - 23:09
क्लीन डाएट ... हा शब्द खूप नंतर वाचनात आला ... पूर्वी याचाच स्वरूप जंक फूड नको असं होत ... मी स्वतः खाद्य प्रेमी असल्याने बाहेरचे खाणे भरपूर व्हायचे ... त्यामुळे सध्या खालील गोष्टी पूर्णपणे बंद आहे १. बिस्किटे २. भेळ / मिसळ / वडे ३. पंजाबी डिशेस ४. रोटी ५ हॉटेलचे खाणे ६ सॉफ्ट ड्रिंक्स सध्याचे डाएट साधारणतः असे आहे सकाळी उठल्यावर १ ग्लास दूध (बोर्नव्हिटा सह) १ तास व्यायाम नाश्ता : दूध व सिरल्स + एक फळ (केळे / पेरू / सफरचंद ) किंवा १ अंडे + १ पोळी दुपारी १ वाजता : २/३ पोळ्या + भाजी + कोशिंबीर (घरून डबा नेतो) ५ वाजता : एक अंडे किंवा सुकामेवा + एक फळ रात्री जेवण : भाकरी + भाजी + सलाड आठवड्यातून किमान दोनदा तरी वरण भात तूप पोळीवर तूप आवर्जून घेतो ... लोणी टाळतो . पाणी भरपूर पितो व्यायाम : आठवड्यातील ३ दिवस स्पिननिंग + स्ट्रेचिंग + ऍब्स ३ दिवस : स्ट्रेंथ ट्रेंनिंग सध्या असे शेड्युल आहे. यात सर्वात अवघड जिभेवर ताबा ठेवणे व आग्रहाला बळी न पडणे . एकदा हे जमले कि बाकी काही प्रॉब्लेम नाही महिन्यातून एक पार्टी करण्याची परवानगी (स्वतःच स्वतःला दिलेली)