Skip to main content

पाणी

पाणी

Published on 11/06/2018 - 14:00 प्रकाशित
सावर्डे - नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . . पुर्णत: जंगलात. तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजुनही बारमाही रस्ता नाही. म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेवुन या गावात जाता येणार नाही. आम्ही पोहोचल्यावर गावकर्‍यांनी पहिली सुचना हीच दिली की दुपारी पाऊस सुरु झाला तर गाडी वर चढवता येणार नाही. शेजारचं गाव डोंगर चढुन पाच किलोमीटर अंतरावर. . . गावापासुन जवळच अजुन खाली (पायी चालत + डोंगर उतरुन १किलोमीटर) पाणी आहे. . हे पाणी म्हणजे खरं तर वैतरणा नदी. पण आता वरच्या बाजुला मध्य वैतरणा धरण आणि खाली मोडक सागर असा विकास झाल्याने , मोडक सागरमध्ये जेव्हा पाणि सोडायचं असेल तेव्हा या नदीला (पाटाला) पाणी येत. नदीच्या काठाला ग्रामपंचायतची विहीर आहे. पाटाला पाणी सोडल की झिरपुन विहीरीत येतं मग तेव्हाच ते मोटरनं ऊचलुन गावाजवळच्या टाकीत आणता येतं. पण जेव्हा हे मिडल वैतरणा टु मोडक सागर असं ट्रान्झॅक्शन सुरु असतं तेव्हा बर्‍याचदा वीजप्रवाह खंडीत असतो. नदीतलं पाणी डायरेक्ट उचलायची परवानगी नाही , कारण ते मुंबईसाठी राखिव आहे ना. . . . मग पर्याय काय , नदीवरुन हंड्याने पाणी भरणे. सरासरी एका कुटुंबाला दिवसाकाठी पिण्यासाठी आणि वापरासाठी मिळुन १० हंडे पाणि लागतं. लांबुन , दरीतुन एकावेळी दोन हंडे डोक्यावर घेवुन , चढुन पाणी भरायचं. . दिवासाचे चार तास घरटी दोन सदस्य केवळ पाणी भरायला जुंपलेले. थोडी ऐपत असलेल्या मंडळीनी बैलगाडीवर दोनशे लीटरचे ड्रम बसवुन घेतलेत. तीन किलोमीटर लांबचा फेरा करुन कच्या रस्त्याने बैलगाडी नदीपर्यंत उतरवता येते. . . डोळ्यासमोर अथांग जलसाठा असुनही हे रोजचे कष्ट. . . महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य वैग्रे कोसो वर कुठेतरी आहे अजुन. . .

याद्या 4027
प्रतिक्रिया 9

डोळ्यासमोर अथांग जलसाठा असुनही हे रोजचे कष्ट. . . रोजचे कष्ट आहेतच, पण प्रयत्न केला तर त्यावर मात करता येईल, हा प्रयत्न मात्र गाव कर्यांनीच करायचा आहे. पैश्याची मदत कशीही आणता येईल. १. नदीच्या काठाला ग्रामपंचायतची विहीर आहे. ह्या विहीरीची खोली वाढवली तर पाण्याचा स्त्रोत वाढु शकेल. २. विहीरीवर पंप बसवला तर कोणाला त्यावर अक्षेप घेण्याच कारण नाही. तरी सुद्धा रीतसर परवानगी (सरकारची, महानगर पालिकेची) घेतली तर उत्तम !! ३. विहीरीवरचा पंप चालवण्यासाठी सध्या सोलार सिस्टिम मिळते, किंबहुना सोलार पॉवरवर चालणारा ३ फेजचा पंप मिळतो ज्याला बॅटरीची गरज नसते. हा पंप दिवसा चालवता येईल, ह्या पंप चालवण्यासाठी, पं प च्या जवळ असण्याची गरज नाही. ममोबाईलच्या उपयोगाने पंप रिमोट सुरु करण्याची फॅसिलिटी सुद्धा देता येईल . ४. पंपा पासुन गावा पर्यंत पाईप लाईन आणावी लागेल. त्यासाठी पाईप जमिनीच्या लगत किंवा जमिनीच्या आतुन गावा पर्यंत नेता येईल. मोडक सागर व वैतरणा धरण महानगर पालिकेल्या हॅड्रॉलिक ईंजीनियरच्या कस्टडी खाली असतात. मुंबई म॑हानगर पालिकेचे एक ऑफिस कापुरबावडी ठाणे ईथे आहे. तिथल्या एक्झेक्युटिव्ह ईंजीनियरला भेटुन पाण्या संबंधी निवेदन देता येईल. एक्झेक्युटिव्ह ईंजीनियर संबंधीत विभागाकडुन परवानगी घेण्याची प्रक्रिया पुर्ण करु शकतील. मोड्क सागर व वैतरणा धरणाचे पाणी मुंबईला पाईप लाईन ने दिले जाते. तेच पाणि पाईपलाईनच्या जवळच्या झोपडपट्टीला कोणतेही पाणी पट्टी न लावता दिल जात. तेंव्हा ह्या धरणातल्या पाण्यावर ह्या गावाचा हक्क ह्या लोकांपेक्षा जास्त आहे.

In reply to by डँबिस००७

उत्तम सकारात्मक प्रतिसाद ! यातल्या आणि इतर कोणत्या मुद्द्यांनी गावाला मदत होऊ त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटावा अशी शुभेच्छा !

सुचवलेल्या क्रमानेच प्लान आखलाय. . . पैश्याचीही व्यवस्था झालीय. . पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होइल. पाचव्याची मात्र अजिबात शाश्वती नाही

In reply to by vcdatrange

तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी शुभेच्छा ! पाचव्या मुद्द्याची शाश्वती नसल्याचा अंदाज असला तरी, अर्ज, अधिकार्‍याची भेट, इत्यादी कारवाई चालू ठेवावी असे वाटते... कधी कुठून काम होईल हे सांगता येत नाही. अर्थात, जमिनीवरची परिस्थिती तुम्हालाच माहीत असल्यामुळे योग्य तो निर्णय तुम्ही घ्याल याची खात्री आहेच.

vcdatrange : कामाला शुभेच्छा !! कोणतीही मदत लागल्यास जरुर कळवा अस म्हंटल असत पण मी भारतात रहात नाही , तरी सुद्धा काही टेक्निकल मदत लागली तर कळवा , होईल तशी मदत करता येईल !

गावात पडणारे पाऊसाचे पाणी गावातच साठवुन गाव पाण्यासाठी स्वयंनिर्भर कसे करता येईल या संबंधी माहिती माझ्या या पुस्तकात दिली आहे. हे पुस्तक मिळाल्यास पहावे. त्या शिवाय माझ्याशी खरडवहीवर सम्पर्क करूनही या सम्बन्धी चर्चा करता येईल. https://www.amazon.com/Harvesting-Sustainable-Supply-Environment-Development/dp/8170337526

तुम्हाला कमला शुभेच्छा, लवकरात लवकर भरपूर पाणी उपलब्ध होवो. लहानपणी हडपसरला राहत असताना रस्त्यापलीकडून (पुणे सोलापूर हायवे) सरकारी नळावरून पाणी भरल्यामुळे, परिस्तिथी ची १००% नसली तरी बऱ्यापैकी कल्पना आहे. मध्ये एकदा यूट्यूब वर एक शॉर्ट फिल्म बघितली, पाणी भरायला कोणीतरी पाहिजे म्हणून ५० वर्षाच्या माणसाचं ३र लग्न २० वर्षाच्या मुली बरोबर होत. पहिली बायको त्याच्यापेक्षा ४-५ वर्षांनी लहान, तिला पाणी भरण जमेनासे झाल्यावर २री, ती १०-१५ वर्षांनी लहान, ती दुसर्यांदा प्रेग्नंट असल्यामुळे ३र लग्न (ती जवळपास १ लीच्या मुलाच्या वयाची ), ती २०-२५+ वर्षांनी लहान. कठीण आहे सगळं :(.