वर्तमान "रामराज्या"तील 'मिरवलेले' स्रीस्वातंत्र्य!
आमच्या "रामराज्या"त सगळं कसं छान चाललंय. स्वदेशी आणि परदेशी सगळेच कसे गुण्यागोविंदाने नांदताहेत. सगळ्यांना याच "रामराज्या"त राहण्याची इच्छा होते आहे. कोणास "रामराज्य" सोडून जाण्याची वेळ आलीच तर जीव भयाने कापरा होतोय.
इथे जन्माला आलेले सर्व राम आणि रामेतर सर्व रहीम हे गळ्यात गळे घालून फिरत आहेत. इतके मैत्रीने की, यापूर्वी असा मिलाफ गेल्या हजार वर्षांत घडला नाही. (हजार वर्षांचे तुलनात्मक विशेषण व्याकरणात दिल्याबद्दल केशवकुमारांचे जाहीर आभार.)
राजकीय आर्थिक आणि सामाजिक सर्वच आघाड्यांवर "रामराज्या"चे अशवमेध यज्ञांचे रथ चौखूर उधळत धावतांना पाहून जनतेचे डोळे अत्यानंदाने भरून वाहत आहेत. तो रथ अडविण्याचे कोणाच्या मनातही येत नाहीय. या रथाचे वारू आसेतूहिमाचल आणि कच्छापिअरुणाचलम असे बिनघोर फिरत आहेत. अहाहा, काय वर्णावे ते निर्भेळ यश आणि यशोपरांत "रामराज्य" हाकणाऱ्यांचे निःगर्विष्ठ वागणे!
वर्तमानाचे सत्य सांगणाऱ्या सर्वच वर्तमानपत्रातील "सत्य" बातम्या हेच वर्तवतात. आणि दूरचित्रवाणी संच (जे अगदी खऱ्या रामराज्यातही अस्तित्वात होते, ज्याचे पुरावे देखील आहेत पुराणांत) यांवर तर सत्याची धोधो बरसात होते आहे. माहिती जालाचे तर विचारूच नका, भलेही हे एक वैश्विक परिमाण असेल, परंतु त्याचेवर केवळ "रामराज्या"चे कौतुक सोहळे पाहता येत आहेत. वाहवा, भले बहाद्दर पठ्ठे हो! (माहिती जालाचेही अस्तित्वाचे पुरावे पुराणांत आहेत याची कृपया पुनःश्च नोंद ठेवा.)
आमचे "रामराज्या"तील स्त्रियांचे बद्दल स्वर्गातही चर्चा सुरू असल्याची कुणकुण आम्हास लागली आहे. या "रामराज्या"त त्यांना मिळालेले स्वातंत्र्य असीम आनंदाची पूर्ती करणारे आहे. निर्भयपणे जगणे काय याचा सार्वत्रिक परिपाठ त्यांना घालून दिला आहे. कोणतीही बंधने त्यांच्यावर नाहीत. शारीरिक आणि मानसिक रित्या त्यांना खंबीर होणेबद्दल राजरोस प्रयत्न सुरू आहेत
अर्थात रामराज्यांतही मंथरा होतीच तद्वत तिची काही अपत्ये या "रामराज्या"तही आहेतच. या जल्पकांस कोठेही चुकाच सापडतात. (माहिती जालावर यांना ट्रोलर ही संज्ञा सापडते.) या जल्पकांचा पुरता बंदोबस्त करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. झुरळ नामक उपद्रवी प्राण्यास वहाणेने ठेचणे याप्रमाणे "दिसला जल्पक की कर त्याचा पाणउतारा" ऐसे सर्वत्र सुरू आहे. त्याचे कौतुक पुन्हा कधीतरी करुत. परंतु सध्याच्या स्त्रीदक्षिण्य आणि स्रीस्वातंत्र्य बद्दलची या जल्पकांची (विनाकारण महत्व देण्यात आलेली) मते पाहू नये अशीच आहेत.
घडल्या चुकीबद्दल जाब विचारवाच, कारण चूक ही चूक असते, तद्वत "रामराज्या"त सुरक्षित वाटून मध्यरात्री कोठेही फिरणे हा अक्षम्य अपराध आहे. स्त्रियांनी दिवेलागणीच्या आत घरात यावे ही "रामराज्या"ची लक्ष्मणरेषा. हे या स्त्रिया कसे काय विसरू शकतात? अशा चूका अक्षम्यच आहेत.
स्त्रियांनी दिवेलागणीच्या आत घरात यावे. घरभर पवित्र आणि प्रसन्न वातावरण करावे, अगरबत्त्या धूप लावून दिवे प्रकाशित करावेत. सर्वांच्या वाट्याचे जेवण बनवावे, त्यांचे जेवण होईस्तोवर थांबून शिल्लक पडेल ते खावे, सकाळी लवकर उठून आन्हिके उरकून पुनः जेवण बनवावे, कपडे धुवावेत, भांडी घासावीत, मरेस्तोवर राबावे ही मानसिकता "रामराज्या"त बनत आहे यात गैर ते काय हेच समजत नाहीय.
कोणत्याही परिस्थितीत पुरुषांना त्रास होईल ऐसे वर्तन करू नये, त्यांच्या लैंगिक वासना, भावना उत्तेजित होतील असे कपडे परिधान करू नयेत. सुरक्षित वाटते म्हणून मध्यरात्रीपर्यंत घराबाहेर भटकू नये. मैत्रिणींबरोबर सारीपाट खेळावेत, मित्र बनवू नयेत. सर्व पुरुष जन्मतःच कर्ते असल्याने स्त्रियांनी बाहेर कामावर जाऊ नये. वगैरे ही "रामराज्या"तील नियमावली अंगिकारल्यावर त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची ग्वाही "रामराज्य" देतच आहे. ही सर्व नियमावली त्यांच्या सुरक्षिततेकरिताच आहे आणि या नियमावलीचा भंग केल्यानेच त्यांना दंड देण्याची पुरुषांना पूर्ण मुभा मिळते आहे. या नियमांचे पुरेपूर पालन करून जे मिळेल ते स्वातंत्र्य मुकाट उपभोगता येत नाही या स्त्रियांना आणि वर त्याचे खापर "रामराज्या"वर आणि ते हाकणाऱ्या राज्यकर्त्यांवर फोडण्याची त्यांनी हिम्मत करावी हे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही.
स्त्रियांनी मोडलेल्या नियमांबद्दल जाब विचारणे चूक नाहीच. या जल्पकांनी काही समाजकंटकांना फितूर केलेय. सर्व काही सुरळीत सुरू आहे, पण जाब विचारणाऱ्यांना जाब विचारणे सुरू झाले ते केवळ या जल्पकांमुळे. बरे जाबही काही चुकीचे विचारले असे नाही.
•तू इतक्या रात्री तिथे काय करीत होतीस?
•तू असे कपडे घालणे शोभते काय?
•तू तुझ्या मित्राबरोबर का फिरतेस?
•तुला शिक्षणास मुभा दिली म्हणजे सर्व करायला मोकळीक असे समजलीस काय?
असे एक ना अनेक जाब विचारणे असंयुक्तिक कसे ठरेल बरे? "रामराज्या"तील स्त्रियांनी पुरुषांना आणि पुरुषी मानसिकतेला आव्हान देणे यासारखी चूक का घडावी हे कळणे अवघड आहे.
"लडके है, हो जाती है लडको से गलती..!" हे उत्तर बलात्कारित स्त्रीच्या विटाळलेल्या अब्रुवर केवळ मलमच लावीत नाही तर तिला पुढे जगण्याची मुभा दिल्याबद्दलची प्रेमाची फुंकरही घालते, हे या जल्पकांस कधी कळावे?
स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे आणि तिच्या शरीरावर कोण्याही पुरुषाचा अनभिषिक्त अधिकार आहे. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणे हा तिला दिलेला सन्मान आहे. तिने ती मुकाट मान्य केलीच पाहिजे, आणि का करू नये? पुरुषांस सुखी ठेवणे हे तिचे आद्य कर्तव्यच ठरते. त्यातही जर ती एकाहून अधिक पुरुषास सुखी ठेवू शकली तर तिच्या कर्तव्याची परिसीमा होते ही आजच्या काळाची नवी व्याख्या तिने समजून घ्यावयास हवी.
तिच्या मनाविरुद्ध तिला स्पर्शही करावयाचा नाही, तर मग स्त्री असते कशासाठी? असा जाब "त्या" पुरुषांनी खरे तर जल्पकांस विचारावयांसच हवा. तिला स्पर्श करावयाचा नाही, तिच्याकडे त्या नजरेने पहावयाचे नाही तर मग स्त्री तयारच कशाला केली हा भाबडा प्रश्न या मूर्ख जल्पकांस का पडत नाही कुणास ठाऊक?
सध्या या "रामराज्या"त स्त्रियांना मिळणारे स्वातंत्र्य त्यांना पचत नाहीय त्यामुळेच ज्या स्त्रिया नियमावली मोडून मुजोर वागत आहेत त्यांना(च) शिक्षा मिळत आहे. आता त्या आठ वर्षांच्या अजाण(?) बालिकेचेच पहा, तिला जंगलात फिरण्याची काय गरज होती? जंगलातील हिंस्त्र श्वापदांपासून तिचे संरक्षण करण्याकरिताच तिला मंदिरात "सुरक्षित" ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला. पण तत् पश्चात म्हणे तिच्यावर शारीरिक जबरदस्ती करून तिची हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेला पुढे राजकीय रंगरंगोटी करण्यात आली. धार्मिक रंगांची धुळवड उडवून या जल्पकांनी वातावरण गढूळ करून टाकले इतके, की त्या मागचे सत्यकारणही जनासामान्यांस समजू नये. "रामराज्या"त ऐसे होणे सर्वथा अशक्य आहे हे का कोणास उमगू नये या विचारानेच मन विषण्ण झाले आहे.
हाती उभा राजदंड तोवर महापौर या उक्तीप्रमाणे राजकारभार चालवणाऱ्या राजास मान द्यावा हे कोठे वेगळे का सांगावे लागते? राजा किंवा राजाचा अधिकारी यांचे अधिकार निर्विवाद असतात, तद्वतच त्यांनी केलेली कृत्ये ही कायद्याच्या अधीन असतात. अशाच एका (उत्तर)प्रदेशीय राज्यकर्त्याने एका मुलीकडे शरीर सुखाची मागणी केली नव्हे शरीराचा उपभोग घेतला. यात कायद्याची गोष्ट उपटसुंभासारखी का उभी केली गेली ते जल्पकच जाणोत. त्या मुलीने मुळात तक्रारीचा सूर लावणे हेच चूक नाही काय? तिने चूक केली आणि तिच्या पित्याने तिची बाजू लावून धरली ही तर घोडचूकच. ज्याचे प्रायश्चित त्याला प्राण गमावून करावे लागले. यातून खरेतर इतर जनांनी बोध घ्यावा. बरे तक्रार नोंदवली जात नाही म्हणून कोणी वर्षभर पाठपुरावा करते काय? आत्मदहनाचा इशारा देते काय? छे छे, हे असे "रामराज्या"त कसे चालेल?
"रामराज्य" येणे हे आपल्या सर्वांच्या व सर्व पूर्वजांच्या पुण्यकर्माचे आणि पुण्यकमाईचे फलित आहे. सामिष अन्न सेवन करणाऱ्या परकीयांच्या सत्तेचा सूर्य मावळल्या नंतरच्या स्वातंत्र्याची सत्तराहून अधिक वर्षे होऊन आपण "जन" जे मिष्ठांन्न वर्षानुवर्षे खाऊ शकलोत त्या सकल वर्षांच्या फलितोत्तर आलेले सध्याचे "रामराज्य" आहे. पुराणांत लिहिलेले रामराज्य हे केवळ एका राजाचे होते, आणि आदर्श होते. सध्या आपल्याकडे एकाधिकारशाही संपून लोकांचे "रामराज्य" आले आहे आणि या रामराज्याची मुळे पाषाणयुगातील नसून तथाकथित स्वातंत्रयोपरांत आहेत. सध्याचे रामराज्य हे त्याच्या आधीच्या स्वातंत्रयोपरांत आलेल्या रामराज्यांच्या पतित पावन राज्यप्रवाहाचाच पुढचा प्रवाह आहे. (पतित चा अर्थ पावन असा होतो, पातकीच्या जवळ जाणारा अर्थ काढू नये).
चर्चे अंती चर्चेचा मुख्य मुद्दा स्त्री स्वातंत्र्याचा, तर वर्तमानात स्त्रियांनाही जल्पकांना अपेक्षित स्वातंत्र्य नकोच आहे. (ज्यांस इतरजन सुधारकी विचार म्हणतात). पहा, दूरचित्रवाणीवर 'घुंघट' घेऊन येणाऱ्या सुनांच्या आणि त्यांच्यावर सत्ता गाजविणाऱ्या सासवादी सासरलोकांच्या मालिकांच्या मालिका निघत आहेत. पतीचरणी स्वर्ग असतो असे त्यातून पुनःपुनः बिंबवले जात आहे. स्त्रियांना स्त्रियांनी लादलेली बंधने मुकाट मान्य आहेत. त्यांना जोखडातून बाहेर येणे मान्य नाही. बुरखापद्धत आणि त्रिवारतलाकविरोधी कायद्यास विरोध करणारे स्त्रियांचे मोर्चे हे याचे पुरावे. ही अंधारयुगाची आस आहे.
कोणत्याही स्त्रीला पहिला मान तिच्या घरातच मिळावयास हवा व याची जाणीव त्या घरातील दुसऱ्या स्त्रीस व्हावयास हवी.जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा मान ठेवणार नाही वा योग्य जाब विचारणाऱ्या स्त्रीची मुस्कटदाबी करणार नाही तोवर स्त्रियांचे स्वातंत्र्य हे शून्य बरोबर आहे. स्त्रीला स्त्रीने पाठिंबा दिला आणि सर्व स्त्रिया उठून पेटून उभ्या राहिल्या तर तरच त्यांना इतर पुरुषांनीही दिलेल्या आधारास बळकटी येईल, पुरुषसत्ताक एकाधिकारशाही संपुष्टात येईल आणि समानतेचा सूर्योदय होईल. तोवर हा अंधःकार आणि या काळोख्यातील घटना, विजांच्या कडकडाटात जसा भासमान प्रकाश पडून पुनः तिमिर पसरतो तद्वत नाहीशा होत राहतील, असेच "रामराज्य" बिनघोर हाकले जाईल. आणि वर्तमान "रामराज्या"तील स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे धडे हे (जल्पकांच्या मते स्त्रीयांसाठी स्वातंत्र्याचे नंदनवन असणाऱ्या) युरोप अमेरिकादी देशांत "मिरवले" जाईल याची शंका कशाला?
इति.......एका जल्पकाचे मत
स.शा.
वाचने
4242
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
परंतु याहून कमी लिहिणे शक्यच नव्हते. तरी वाचून झाल्यावर प्रतिसाद अपेक्षित आहेत...
रामाला उगीच यात ओढताय ! दुर्दैवाने यामुळे यावरची चर्चा लौकर भरकटेल .
लेखाच्या भावना पोचल्या.
"रामराज्य"...??? हम्मम्म, मंग बरुबरंय...!!
Brothers and sisters, when we hear about the incidents of rape, we hang our heads in shame. People come out with different arguments, someone indulges in psycho analysis, but brothers and sisters, today from this platform, I want to ask those parents, I want to ask every parent that you have a daughter of 10 or 12 years age, you are always on the alert, every now and then you keep on asking where are you going, when would you come back, inform immediately after you reach. Parents ask their daughters hundreds of questions, but have any parents ever dared to ask their son as to where he is going, why he is going out, who his friends are. After all, a rapist is also somebody`s son. He also has parents. As parents, have we ever asked our son as to what he is doing and where he is going. If every parent decides to impose as many restrictions on the sons as have been imposed on our daughters, try to do this with your sons, try to ask such questions of them. -१५ ऑगस्ट २०१४ कोण बोलले ?
तुमचा भयगंड कळला.
एक स्त्री असून मला वर उल्लेखलेले काहीही अनुभवाला येत नाहीये. म्हणजे अत्ताच्या रामराज्य ऐवजी पुर्वी जे राज्य होते तेव्हा जितपत भीती आणि काळजी वाटायची तशीच वाटते आहे.
तुमचे वर्णन हे wishful थिन्किन्ग वाट्ते. म्हणजे मोदी सत्तेवर आले की असे वाईट होणार असे ईतके पढवले आहे की त्यापैकी काही घडले नाही तरी घडतंय अस तुम्हास वाट्त राहातं.
मला तर 2019 मध्ये थोड्याश्या बहुमताने भाजपा निवडून यावे व आवश्यक तेवढा विरोधकांचा अंकुश राहावा असे वाट्ते आहे.
अरे भाई
कहना क्या चाहते हो?
In reply to अरे भाई कहना क्या चाहते हो? by सुबोध खरे
मोदी हलकट व नालायक असून लोकांच्या भावनांवर स्वार झालेला आहे. त्याला खाली ओढून जमिनीवर आदळणे हेच सर्वांचे जीवितकार्य असले पाहिजे.
-गा.पै.
In reply to मी सांगतो .... by गामा पैलवान
लोल =))))
इथं एकदम वीमन एम्पावरमेन्ट फेम जनेऊधारी पंडीत रागा ह्यांची विधाने आठवली ,
इश देश को अगर किसीने खडा किया है , इस देश को दुध दिया है , अमुल दिला है , तो इस तरफ देखिये इन महिलाओं ने दिया है , गुजरात की महिलाओं ने दिया है =))))
आप किसीभी महिला कांग्रेस कार्यकर्ता से पुछीये , तो वो यहीं कहेंगी के मजा आया , और ये मजा है जो मे हिंदुस्तान के हर व्यक्ती को देना चाहता हौं =))))
देशाला हे असले नेतृत्व हवे आहे म्हणजे मिरवण्यालायक स्त्रीस्वातंत्र्य येईल !
अवांतर : मी भाजपाचा ट्रोल नाही , रादर आमचे मत राष्ट्रवादी काँग्रेसला आहे हे ही जाहीर आहे , पण तरीही लोकांना जी मोदी द्वेषाची कावीळ झाली आहे ती पाहुन फार मजा येते ! ह्या मोदी द्वेषापायी लोकं चांगल्या , महत्वाच्या आणि गंभीर विषयांचंही मातेरं करत आहेत . सध्या , रामराज्य ह्या असल्या सुचक शब्दांचे संदर्भ टाळता अले असते तर कदाचित लेख जास्त बॅलन्स्ड झाला असता , पण ह्या लेखात "सध्या रामराज्य आले म्हणुन हे सारे सुरु झाले अर्थात आधी सारे आलबेल होते आणि हे सरकार पडले तर परत आलबेल होईल" हा जो काही भाव आहे तो मात्र फारर्च विनोदी आहे !! =))))
In reply to लोल by प्रसाद गोडबोले
या रामराज्याची मुळे पाषाणयुगातील नसून तथाकथित स्वातंत्रयोपरांत आहेत. सध्याचे रामराज्य हे त्याच्या आधीच्या स्वातंत्रयोपरांत आलेल्या रामराज्यांच्या पतित पावन राज्यप्रवाहाचाच पुढचा प्रवाह आहे.
मोदी सरकार किंवा संघविरोधी सूर पकडू नका,
मुळात रोष हा व्यवस्थेवर आहे, त्यात सध्याची नेते मंडळी रामराज्याशी तुलना करताय म्हणून संदर्भ रामराज्य शब्दाचा.
अर्थाअर्थी रामराज्य हे उपहासात्मक वापरले आहे हे कोणासही सहज कळेल पण त्याकरिता तशा विचाराने वाचावे लागेल.
शिवाय लेखातील महिला विरोधी संवाद, जे राजकीय नेते म्हणून गेलेत ते मोदी साहेब येण्यापूर्वीचेही आहेत हेही पहा.
मोदींचे सरकार आल्यानेच परिस्थिती अशी आहे हे मुळात ग्राह्य धरणे चुकीचे, कचरा साठत गेला आणि त्यामुळे दुर्गंधी पसरतेय, तो कचरा कोणि पूर्ण पणे हटविला नाही म्हणून सद्य स्थिती आहे. आणि सर्वसामान्यांना कसे परावृत्त करायचे ते नेते जाणतातच
In reply to लेख वरचेवर वाचू नका by ss_sameer
...त्यात सध्याची नेते मंडळी रामराज्याशी तुलना करताय म्हणून संदर्भ रामराज्य शब्दाचा....या हिशेबाने करानट्कातील सिद्धरामयाम्च्या सरकारला टिपूसुल्तानाचे राज्य म्हणावे लागेल :) रामराज्य म्हणजेच आदर्श राज्य का -आणि स्त्रीयांना किती उपयूक्त होती- हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा असू शकेल. पण रामराज्य हि संकल्पना म. गांधींनी वापरली, -नेहरु सजग होते- तरीही नंतरही एका गांधींनी घोळ घातला आणि त्यांच्या टिकाकार पत्नि रावण दहनाच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावून बाण मारल्याची छायाचित्रे पाहिल्याचे आठवते ( बहुधा फोटोशॉप नसावीत चुभूदेघे) राजकारणात अमुक तमुकचे नाव जेव्हा जे सोईचे असते तेव्हा ते वापरले जाते . असो.
In reply to ...त्यात सध्याची नेते मंडळी by माहितगार
In reply to लेख वरचेवर वाचू नका by ss_sameer
एसेस_समीर,
मुळात तुमचा रोष हा व्यवस्थेवर आहे, हे स्पष्टं केलंत ते बरं झालं. आज रामराज्यात आठाठ वर्षांच्या कोवळ्या बालिकांवर अत्याचार होताहेत ते १९४७ नंतर ज्यांनी व्यवस्था उपभोगली त्यांच्यामुळेच. आता मी काँग्रेसच्या नावाने ऊर बडवायला मोकळा झालो. मला मोकळं केल्याबद्दल धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.
लेख थोडा मोठा झाला