Skip to main content

माघी गणपती

माघी गणपती

Published on 22/01/2018 - 13:33 प्रकाशित
माघ महिन्यात गणपतीची स्थापना करण्याच प्रमाण खूप वाढलंय.काही वर्षांपूर्वी आमच्या गावात तरी कुणाकडेच माघी गणपतीची स्थापना केली जात नव्हती.आज दर ५ व्या घरी गणपती मांडलेला दिसतोय.एकीकडे तंत्रज्ञानाची प्रगती जशी झपाट्याने होते आहे तसं मानवी जीवनात आध्यात्माच महत्त्व वाढत आहे.केवळ हिंदू धर्मात नाही तर सगळ्याच धर्मात अध्यात्मिक बाबींकडे लोकांचा ओढा दिसतोय किंवा सध्याच्या समाजाची ती गरज झालेली आहे.नुकतीच सोफिया नामक रोबोटची मुलाखत पहिली.भविष्यात रोबोटिक गणपती वगैरे निर्माण झाले तर लोकांच्या श्रद्धांना खतपाणी मिळेल.विज्ञान आणि धर्माची सांगड घातली जाऊ शकेल.

याद्या 5273
प्रतिक्रिया 19
काही वर्षांपूर्वी कैलास पर्वताच्या पायथ्याला बर्फात इसपू 5200 वर्षांपूर्वीचा गणेश जन्माच्या तारखेचा शिलालेख सापडल्यापासून हे फॅड खूप वाढलंय. आता प्रत्यक्ष लिखित पुरावाच म्हटल्यावर लोक गणेशजन्म साजरा करणारच ना.

In reply to by प्रचेतस

७२०० वर्षा पूर्वीचा शिलालेख, तोही कैलाश पर्वताच्या पायथ्याशी, असे वाचल्यावर मनात पाल चुकचुकली होती. पण आपण जुन्या मंदिरावर आणि त्यांच्या शिल्पावर लिहिणारे म्हणून लौकिक असल्याने सम्भ्रमात होतो. आपणहुन खुलासा केला हे बरे झाले.

पण अलिकडे त्याचे धार्मिक स्वरुप जाउन बाजारुपणा जास्त आलाय. काही उदाहरणे म्हणजे दोन दोन दिवस पुर्ण मांडव घालुन जायचे रस्ते अडवणे, मोठमोठ्याने ध्वनीवर्धक लावणे , रस्त्यातच विटा रचुन याग वगैरे करणे. कहर म्हणजे पहिले टपरी टाकुन पान बिडीचे दुकान टाकायचे, मग त्याच्यापुढे एक गणपती किवा स्वामी समर्थ किवा दत्तगुरुंचे ठाण मांडायचे , मग हळुहळु ती टपरी आणि ते मंदीर हातपाय पसरत जाते. पहिले पत्रे, मग विटा ,मग ग्रॅनाईट ,मग माघी आणि भाद्रपद उत्सव आणि आजुबाजुच्या लोकांना वाढ्ता त्रास. थोडक्यात पद्धतशीरपणे मोकळ्या जागा हडपायचे षडयंत्रच!!

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सर्व धर्माच्या जातीच्या उत्सवांची यादी करून सरकार दरबारी ठेवणे आवश्यक आहे आणि या यादीत आता कोणीही वाढ करू लागल्यास त्याला ताबडतोब प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. कोणत्याही सार्वजनिक जागेचा धार्मिक, सामाजिक अथवा राजकीय वापरासाठी कडक बंदी घालणे आवश्यक झाले आहे. ज्यांना एवढे भाविक व्हायचे आहे त्यांनी खाजगी जागा विकत घेऊन तेथे मंदिर, मशीद, बुद्ध विहार किंवा चर्च बांधावे. रस्त्यावर धर्माच्या नावाने अतिक्रमण करणे आणि कोणत्याही सणासाठी बोम्बल्या( लाऊड स्पीकर) लावून सार्वजनिक शांततेचा भंग करणे हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा करणे आवश्यक झाले आहे. धर्म हा घरातच असला पाहिजे असा कडक कायदा करणे सामान्य माणसाच्या शांततापूर्ण जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकाराच्या दृष्टीने आवश्यक झाले आहे.

In reply to by सुबोध खरे

टोटल्ली स्पीकर, कर्णे, बॉक्स, डोल्ब्या ह्या आयटम्सवरच बंदी आणायला पाहिजे. असं काय विधायक आणि लोकोपयोगी करतात ह्या गोष्टी वापरुन? काय सभा बिभा असतील तर इन्डोअर घ्याव्या. तसल्या साउंड सिस्टिम तेथे कायमच्या बसवाव्यात. रस्त्यावर आवाजच नै पैजे (हॉर्न वर पण कंट्रोल पैजे) . . असे माझे वैय्क्तिक मत आहे, जो कोणी नेता हे करेल त्याच्या फ्लेक्साचे डिझाईन माझ्याकडून फुकट. (फक्त डिझाईन करणार, फ्लेक्स प्रिंटिगवर पण बंदी घालावी असे माझे मत आहे)

In reply to by सुबोध खरे

माघी गणेशोत्सव नवीन प्रकार नाही. किमान कोकणात बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक माघी गणेशोत्सव असतो. माझ्या गावी किमान ७० वर्षे सुरु आहे. मी पाहिलेल्या आमच्या गावातील व आजूबाजूच्या गावात देखील, माघी गणपती हा देवळातच साजरा होतो - मूर्ती-विसर्जन हा प्रकार नाही. शहरात फॅड हल्ली आलं असेल.

भाद्रपदातील गणेशोत्सव पावसाळा असल्याने खुल्या जागी साजरा करताना आणि मिरवणुकीने मूर्ति आणण्यात व विसर्जन करण्यात गैरसोय होते. तरी भाद्रपदा ऐवजी माघातच एकदा सार्वजनिक गणेशोत्सव करण्याची प्रथा स्वीकारणे योग्य ठरेल.

तुम्ही ज्याला अध्यात्मिक म्हणत आहात ती धार्मिक कृती किंवा कर्मकांड आहे; अध्यात्म नव्हे. बाकी लाऊडस्पीकर कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याशिवाय पुजेची फलश्रुती लाभत नसावी असे वाटते.

माझ्या महितीप्रमाणे माघी गणेशोत्सव फक्त देवळातच साजरा होत असे. गणेशयाग करत असत. मातीची मुर्ती आणून स्थापना करणे असे काही प्रस्थ नव्हते. आता लोक घरात गणपती आणून स्थापना करतात. गेले काही वर्ष भाद्रपद संकष्टी\साखरचतुर्थीला पण खुप मोठ्या प्रमाणात गणपती स्थापना केली जात आहे. लोकांचा एकंदर उत्साह, देवाच्या नावावर मौजमजा करायची प्रवृत्ती पाहता येत्या काही वर्षात दर संकष्टीला लोक गणपती आणू लागले तर त्यात नवल नाही!