Skip to main content

भिमा कोरेगाव- स्वतःकडे बघा

लेखक अंतरा आनंद यांनी शनिवार, 06/01/2018 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"या जय भीमवाल्यांचं काहितरी आहे", "उगाच दंगे करतात, काम करा म्हणावं त्यापेक्षा", " काहि नाही, फडणविसाची खुर्ची यांच्या डोळ्यात खुपतेय" अश्याच सुरातल्या पण संभावित प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा विचार फक्त आपल्या जागेवरूनच करायचा आहे हे खास आहे. (१) भिमा कोरेगाव हा अभिमानाचा विषयच नाही. : मुळात चारपाच वर्षांपूर्वी हे स्मारक आणि त्याबद्द्ल कोणालाही जास्त महित नव्हते परंतू महार रेजिमेंट याला आपल्या अभिमानाचा विषय मानत होती. कोणत्याही समूहाला मग तो रेजिमेंट सारखा ऑफिशियल लढवय्या समूह असो वा जात, सार्वजनिक अभिमानाचा विषय शोधणं हे आपल्या सु-संस्कृतीचा भाग आहे, नाही का? तसंही भावनिक कढ काढण्याखेरीज काही करावं हे आपल्या सुसंस्कृत मनांना नको वाटतं. गेल्या काही वर्षात प्रत्येक समूहाने आपलं असं सार्वजनिक अभिमानस्थळ शोधून त्याचा उदो उदो करणं हे सुरू केलेलं आहे. आधुनिक विचारसरणीशी तुलना करायला गेल्यास प्रत्येक अभिमान स्थळावर प्रश्नचिन्ह उठवता येतील, पण तसं कोणी करत नाही कारण प्रत्येकामागे आंधळी झुंड असते. त्यामुळे प्रत्येक समूह, जातीगट आपल्या अभिमानस्थळाला जास्तीत जास्त ’टीआरपी" मिळ्वण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातूनच मग त्या त्या गटाचं नेतृत्व उदयाला येतं. आपण एकंदरीतच समाज म्हणून विवेकी असण्यापेक्षा भावनेच्या लाटेवर हेलकावे खाणं स्वाकारतो. (१ अ) मुळात भिमा कोरेगावचं युद्ध इंग्रजांनी जिंकलंच नव्हतं: नसेलही. पण महारांना ते आपल्या पूर्वजांच्या लढवय्येपणाचचं प्रतिक वाटतंय तर वाटू द्या नं. तिथे ते शांतपणे इतके वर्षं जातायत तर काय बिघडलं? या संदर्भात तिथे जमलेल्या लोकांना विरोध म्हणून दुकानं बंद केली गेली, त्यांच्यावर दगडफेक झाली अश्या प्रकारच्या बातम्या आहेत, त्याचं काय? जमलेले लोकं काही आता जाऊन इंग्रजांना आवताण देणार नव्हते. मग अश्या प्रकारे त्यांच्या विरूद्ध जनमत तयार करणं कोणत्या संस्कृतीत बसतं? ब्राम्हण-मराठा सारख्या प्रस्थापित आणि गावपातळीवर मान असणार्‍या जातींना आपापली प्रतिकं लख्ख कराविशी वाटतात, तिथे झुंडीनं जावं वाटतं तर अजूनही मागास असलेल्या गावकुसाबाहेरच्या लोकांनी एवढा विचार करावा ही सक्ती का? (२) राजकिय अपरिहार्यता: प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांना दोष देणं ही फॅशन बनली आहे. कारण ते सोप्पय. आपणही आपल्या व्यक्तीगत पातळीवर हे राजकारण पुरेपूर खेळत असतो. अश्या जाती विभागणीला, उतरंडीला समाजात मान्यता असते, प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती उतरंड जागी असते म्हणूनच त्याचा फायदा राजकारणी उठवू शकतात. प्रत्येकाने व्यक्ती म्हणून आपण ही उतरंड पाळतो की नाही (मानतो की नाही असं मी म्हटलेलं नाही. कारण ’मी मानत नाही पण नाती तोडून चालत नाहीत, सवय ’, वैगेरे सुटकेचे मार्ग असतात ) हे मनाला विचारावं. खालच्याला वर येण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण किती आधार दिलाय हे शोधून पहावं. तसं होत नाही. मागासांच्या वागण्यातल्या विसंगती शोधून, त्यांची आधुनिकता किती बेगडी आहे ह्याकडे बोट दाखवणारे आणि त्यांना वेगळे पाडणारेच मोठ्या संख्येने असतात. (इथे या विषयावर ज्या हिरीरीने लिहीलं गेलंय त्यावरून सिद्धच होत.) "जातीने महापुरुष वाटून घेतले आहेत", असं तोंडाने म्हणायचं आणि फक्त आपल्याच जातीतल्या महापुरुषाचा उदो उदो करायचा ही दांभिकता बहुसंख्यांमध्ये असते, म्हणून तर असे अभिमानी गट तयार होतात आणि राजकारण्यांना आयतं खाद्य मिळतं. जातींनी महापुरुष वाटून घेतलेत म्हणणार्‍यांपैकी किती जणं आंबेडकर जयंती साजरी करतात? नाहीपेक्षा ती आपल्या सोसायटीत साजरी व्हावी असं किती जणांना वाटतं? उलटपक्षी कोणी करत असेल तर "ते जय भीम वाले" म्हणत आपण त्यातले नाही हे प्रकर्षाने दाखवलं जातं. मग वरील तक्रार करताना आपण दांभिकपणे वागत नाही का? किती जणांनी मुलांना राम-कृष्णासोबत बुद्धाच्या गोष्टी सांगीतल्या? किमान स्वत:तरी जाणून घेतल्या? "ही कसली मिरवणूक आहे?" असं विचारणार्‍या पहिलीतल्या मुलाला आंबेडकर- जयंतीच्या मिरवणुकीबद्द्ल "ज्यांच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाहीय ना त्यांची मिरवणूक आहे" असं उत्तर माझ्या एका कलीगनं दिलं होतं. अर्धवट माहिती देऊन पुढील पिढीच्या मनात अशी विषाची पेरणी केली जाते. (३) पेशवाईत महारांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधून वावरावं लागत होतं हे खरं नाही तसा कागदोपत्री पुरावा नाही:- पलीकडल्या संस्थळावरच्या विद्वान (हे उपहासाने म्हटलेलं नाही, आदर खरा आहे) इतिहाससंशोधकांनी तिथे "याला कागदोपत्री पुरावा कुठेय?" असं विचारलं आणि अर्धवट शहाणे पैलवान इथेही ते विचारत सुटलेत. महार इतके महत्वाचे होते का की त्यासाठी एक कागदी फर्मान सुटेल? कोतवालाला तोंडी आदेश दिले असणं ही शक्य आहे ना? हे ही शक्य आहे की सैन्यात मानाच्या ठिकाणी असलेल्यांना यातून सूट असेल पण सर्वसामान्य महारांना हे लागू असेल. मग ते फक्त सामान्य महारांना लागू होतं म्हणत त्याचं समर्थन करता का? झाडू-गाडगं नसेलही पण "बाजू हो शिवशील, सावली पडली तर विटाळ होईल" हे उद्गार तरी महारांसाठी निघत होतेच ना? मग त्याचं समर्थन करताय का? किती वर्षं हे ऐकावं लागत होतं? अजूनही कुठेतरी लागत असेल. कोपर्‍यातल्या कपात वरून पडलेला चा पिणारी म्हारीण तर आता आतापर्यंत साहित्याचा भाग होतीच ना. ती काय सर्वस्वी काल्पनिक होती? बरं धरून चालू की हे झाडू-गाडगं प्रकरण खोटं होतं. पण महारांना किती गावात मानाचं स्थान होतं? इथे आपण किती गावच्या मातीतले आहोत हे दाखवण्याची होड लागलेली असते, त्यांना हे गावाचं वास्तव माहित नाही का? आताही त्यांना दिला जाणारा मान किती मनापासून येतो? वेळ येताच "गेले आपल्या जातीवर", "हे असंच अन्कल्चर्ड वागणार", "माजलेत" अशी मुक्ताफळं उधळली जात नाहीत का? आणि "माजलेत, पायरी सोडताय" म्हणत हत्याही घडवल्या जातातच ना? (४) आरक्षण म्हणजे फुकटचंबूपणा : आरक्षण लागू केल्यावर द्णादण सगळ्या महारांनी आरक्षणाचा लाभ घ्यावा एवढं शिक्षण त्यांच्याकडे होतं का? आरक्षण घेतलेली पहिली पिढी आता कुठे रिटायर होतेय. पिढ्यापिढ्या शिक्षण, मानाचं जगणं नाकारलं गेलेली, स्वत:ची जमीन नसलेली अशी जमात आता कुठे प्रवाहात येऊ लागलीय तर फुकटचंबूपणा दिसतो. मग ब्राम्हणांनाही आरक्षण हवं म्हणत ब्राम्हण मेळावे का भरवता? आमचे पूर्वज कसे वेदशास्त्रसंपन्न होते म्हणत अभिमान मिरवता त्याच पूर्वजांचा (त्यावेळची जनरीत म्हणून का होईना) काहीजणांना जन्मावर आधारीत उपेक्षेची वागणूक देण्यात सहभाग होताच म्हणून लाजही वाटून घ्यावी का वाटत नाही? यालाच दांभिकपणा म्हणतात. (५) दलितांच्या आंदोलनात नासधूस जाळपोळ होतेच:- इतर आंदोलनात होत नाही का?. स्वघोषित सैनिक काय पुष्पवृष्टी करत आंदोलनं करतात का? जाळपोळीचं समर्थन नाही पण ठराविक समाजाला दोष का देता? रिकामटेकडे आणि समाजकंटक ही नासधूस करतात आणि प्रत्येक आंदोलनात थोडफार होतंच. ते होऊ नये तर ठाम कायद्याचं राज्य हवं (मग त्या राज्यात झुंडीने प्रार्थनास्थळ पाडता येईल का हो? ती सूट द्यायला हवी नाही का? किमान गोमाताचोरांना देहदंड देण्याची गोमातेच्या सुपुत्रांची गुंडगिरी क्षम्य मानायला हवी नाही का? ) (६) प्रकाश आंबेडकरांनी याचा राजकीय लाभ उठवला / त्यांनी चिघळवलं: इथे एवढ्या लिंका फेकल्या गेल्या आहेत. त्यात ही एक ही वाचून पहावी. प्रकाश आंबेडकरांचा ३१ डिसेंबरला प्रकाशित झालेला लेख आहे. त्यात त्यांनी ह्या विजयस्तंभाबद्द्लची मांडणी भावनिक आहे असं म्हटलय. त्यांची मांडणी पोलोटिकली करेक्ट असण्यापेक्शा लॉजिकली करेक्ट असते म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणात त्यांना स्थान निर्माण करता येत नाही. प्रकाश आंबेडकरांची राजकीय ताकद ती काय आणि अशी आंदोलनं ते करतातच कशी काय? असा एक सुज्ञ प्रश्न आहे. म्हणजे? जे निवडून येऊ शकतात त्यांना अशी हिंसक आंदोलनं करण्याचा फुकट परवाना मिळतो? जे निवडून येत नाहीत त्यांची अशी काही बाजू नसतेच? आंबेडकरांनी हिंसक आंदोलन करा असं म्हटलं होतं का? कोणाला जमवलेल्या जमावावर नियंत्रण ठेवता येतं? (ठेवता आलं असतं तर बाबरी मशीद पाडली गेली नसती. का ती नियंत्रणाखाली जाणून बुजून घडवलेली घटना होती?) (७) दरवर्षी एवढे लोक येत नाहीत यावेळेला मुदाम जमवून दंगल माजवली : एवढी माणसं काय एकदम आकाशातून अवतरली का? ही माणसं एवढ्या मोठ्या संख्येनं येणार याची गृहखात्याला खबर लागत नाही का? [२०० वर्षापूर्वीच्या लढाई बद्द्ल : (१) पेशवे हरले नाहीत त्यांनी गनिमी कावा वापरला (२) इंग्रज हरले पण त्यांनी स्तंभ उभारला (३) इंग्रज जिंकले पण त्यांचं खूप नुकसान झालं इतके किमान पर्याय संभवतात तेवढ्याच जुन्या झाडू गाडगं प्रथेबद्द्ल (१) ती होती (२) नव्ह्ती इतके किमान पर्याय संभवतात मात्र राम होताच आणि तो अयोध्येत विवक्षित ठिकाणीच जन्मला हे ठामपणे सांगीतलं जातं, जणू रामजन्मानंतर घुगर्‍या वाटायचं काम कौसल्यामातेनं यांच्याकडेच सोपवलेलं होतं. ] एखादं उभ असलेलं स्ट्र्क्चर झुंडशाहीने पाडून आर्थिक विकासाकडे वाटचाल करणार्‍या भारतीय समाजाला थेट पुराणकाळात नेऊन दोन दंगलखोर बनविणार्‍या, "खतरेमें" ची हूल देत हिंदू समाजाला गेल्या दशकांपर्यंत आणि अजूनही वेठीला धरणार्‍यांबद्द्ल प्रेम असणार्‍यांनी दोन दिवसातल्या आर्थिक नुकसानीबद्द्ल गळे काढावे हा शुद्ध दांभिकपणा नाही का? हे सर्व या संस्थळावर आलेल्या प्रतिक्रियांबद्द्ल आहे. त्या प्रतिक्रिया बघताना एक लक्षात आलं की मुळात एखाद्या ठिकाणी जमाव मोठ्या संख्येनं येतो त्यावर दगडफेक होते, दुकानं बंद ठेवली जातात, त्यांच्याविरोधात वातावरण तयार केलं जातं, या मूळ मुद्द्यावर कोणीही बोलत नाहीय. जणू काही ते चुकीचं स्मारक पुजताहेत म्हणोन त्यांनी दगड खायलाच हवेत. खरंतर "याच लोकांनी दगड आणून आजूबाजूच्या घरातून साठवून ठेवले असतील आम्हाला मारा म्ह्णून", एवढंच सरळसोट म्हणायचं बाकी राहिलं आहे. हे असतं आपल्याला हवं तेच बघण्याचं आणि सांगण्याचं टेक्निक. पिढ्यानपिढ्याच्या सुसंस्कृतपणाचा अभिमान आणि नव्या युगाचं शिक्षण हे यासाठी छानपैकी वापरता येतं. ’बाबासाहेबांना आम्ही मानतो पण हे आहेत का कोणी तसे?" असं सर्रास म्हणणार्‍या किती जणांमध्ये त्यांच्या त्यांच्या जातीच्या महापुरुषाचे गुण १०% तरी आहेत? अरे ही गावकुसाबाहेर ठेवलेली माणसं आता प्रवाहात येतायत. आता जगणं शिकलेली ही नवीन पिढी ही आधीच्या पिढीचा अशिक्षित वा अर्धशिक्षितपणा, एकंदरीत जगण्यात वाढलेली स्पर्धा, स्त्री-पुरूष समानता, गावाकड्ची आपली माणसं आणि नवीन सुशिक्षित समाजात वावरताना आजूबाजूला गोळा केलेली माणसं यांच्यात वावरण्याचा तोल सावरणे, आपल्या पूर्वज-काळात फारसं अभिमानास्पद काही नाही किंवा जे आहे असं आपण मानतो त्याला समाज मान देत नाही अश्या अनेक पातळ्यांवर लढत असते. संपन्नतेची सुखं उपभोगतानाही स्वप्निल सोनावणे, नितीन आगे सारखी प्रकरण त्यांना आपण आजूनही गावकुसाबाहेरच आहोत याचं वेदनादायक भान आणून देतात, सैरभैर करून सोडतात. व्यक्तिगत पातळीवर छोटे मोठे संभावित अपमान आणि "तुम्ही ते काय!" च्या नजरा असतातच. मास्लोच्या पहिल्या पायरीवरून आताच वर चढलेल्या या लोकांनी थेट चौथ्यापातळीवरचा विचार करावा अशी अपेक्षा बाळगत समाज यांच्याकडे (१) आरक्षणाच्या कुबड्या घेतलेले हे लोक (२) संस्कार आहेत का यांच्याकडे (३) मी म्हटलं बाकी कोणीही आण नवरा/नवरी म्हणून पण जय भीमवाला/वाली नको बाई (४) अच्छा तू *** आहेस? वाटत नाही हे असे अनेक खडे येता जाता फेकत असतो आणि त्यांचेच दगड होऊन अश्या आंदोलनातून समाजाकडे भिरकावले जातात. तेव्हा हे असे खडे आपल्याकडून भिरकावले जाणार नाही याची प्रत्येकाने वैयक्तिकरित्या दक्षता घेतली तरी हे असे भडके उडण्याला थोडाबहुत आळा बसेल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांनी या स्मारकाला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेसाठी बैठक घेतली एवढंच फेबुवर पोस्ट केलं. त्या पोस्टवर एवढ्या विखारी प्रतिक्रिया आल्यात की हेच का ते सामान्य मध्यमवर्गीय आणि हाच काय तो ब्राम्हणी सुसंकृतपणा, अशी शंका येते. ( कुंभमेळ्यासाठी दुष्काळातही गोदावरीत पाणी ओतलं तेव्हा ते नाही खटकलं या लोकांना.) हाच मानभावी सुसंस्कृतपणा या मागासवर्गीय शहरी लोकांना पदोपदी भेटत असतो (गावच्यांचे प्रश्न आजून वेगळे.) आणि त्या घाणीत पाय बरबटू न देता त्यांना स्वतःचं जगणं अजून चांगलं करायचं असतं. इथे दणादण प्रतिक्रिया देण्याएवढं सोपे नसतं ते एवढ भान तरी ठेवावं. आपल्याला समाजात मान आहे, आपलया प्रतिकांना ही अखील समाजाची प्रतिकं म्हणून मान मिळतो पर्यायाने आपल्याला मान मिळतो तरिही लहानपणी आपल्याला "बामण भट कढी आंबट" म्हणून चिडवत होते हे शल्य जाणवतं तर आपल्याला मानच नाही आपले आई वडील केवळ जन्माने वरच्या जातीतला म्हणून छोट्या वयाच्या व्यक्तीलाही मान देतात, हात जोडतात (हे आता आता पर्यंत उत्तर, मध्यप्रदेशात होतं की नाही? अजूनही असेल) हे बघताना त्या जातीच्या मुलांना वेदना होत नसतील का? जिथे तिथे आपली लायकी काढली जाते आपल्याला कमी लेखलं जातं हे स्वीकारून आत्मसन्मान कसा जपत असतील ते? पूर्वंजांच्या चार कथा उचलून निरूपणं करत बसण्याएवढं साधं नाही ते. सफाईकामात अजूनही ठराविक जातीला अघोषित आरक्षण आहे, जाता का हिरीरीने तिथे आरक्षण नको म्हणत? सवर्णांना चांगलं बोलण, वाचणं बाळकडू घरात मिळालेलं असतं. ५० च्या दशकातल्या बहुसंख्य आरक्षितांना ते मिळालं होतं का? पण उच्चारावरून लिहीण्यावरून , वागण्या बोलण्यातल्या रांगडेपणावरून त्यांना खुसूखुसू हसताना ते हे कुठून शिकतील हे भान असतं का? कुणी उच्च्पदस्थ वा परदेशस्थ नातेवाईक, उच्चविद्याविभुषित परिचितांचं मार्ग दर्शन, आईवडिलांनी साठवलेला पैसा, मिळवलेलं ज्ञान या कुठल्याच कुबड्या आपण नाही वापरल्या का? मग ज्यांच्या अगदी एखादया पिढीपलीकडल्या पूर्वजांनी भिका मागत पोटं भरली (ज्याला जोदार असं गोंडस नाव दिलं गेलं होतं.) त्यांनी एखादी कुबडी वापरली तर त्यांना चोर म्हणावं वाटतं? त्या कुबड्याच आहेत हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला माहित असतं पण "ते जय-भीमवाले " असं म्हणत त्यांना आपण "घेट्टोत" ढकलतो. त्या कुबड्या पुढच्या पिढीला वापराव्याश्या वाटू नयेत असं समाज म्हणून आपण काय करतो? आरक्षणाविरूद्ध इथे गळे काढले जातात मग मेडिकलच्या सीटस जातीची खोटी प्रमाणपत्र देऊन मिळवल्याचं प्रकरण उघडकीला आलं होतं त्याचा निषेध किती जणांनी केला या संस्थळावर? मनोमन तरी किती जणांना वाटलं हे चुकीचं झालं म्हणून? एखादा मागासवर्गीय जनरल जागेसाठी अर्ज करू लागला की "आले हे. स्वत:च्या राखीव जागेतूनच करायचा ना अर्ज, इथेपण यांना हवं" अशी बरोबर उलटी भुमिका घेतली जात नाही का? अश्यावेळी तो माणूस स्वत:ला आजमावण्याचं धाडस कसं करेल याचा विचार अश्या पिंका टाकताना केला जातो का? समाज म्हणून ते नाही तर सवर्ण किती मागासलेले आहेत हेच यातून दिसतंय. आता खरंतर भिमा-कोरेगाव प्रकरणीत ग्रामस्थांनी परस्पर सहकार्याची भुमिका घेतल्याच्या बातम्या आहेत. चूक कोणाचीही असो असं पुन्हा होणार नाही अशी भाषा दोन्ही बाजूकडून झाली आणि ते ही कोणत्याही प्रस्थापित राजकारण्यांच्या नाक खुपसण्याला वाव न देता. ही खूप आशेची गोष्ट आहे. कदाचित इथल्या मंडळीसारखी जानवं या खांद्यावरून त्या खांद्यावर करत सव्यापसव्याला कसरत म्हणण्याची कला त्यांना अवगत नसावी. दोन गटात फूट पडणे हे आपल्या जगणं कठीण होण्याशी थेट निगडीत आहे, याचं गावकर्‍यांना लवकर भान आलं असावं. पण ते झालं हे खरच चांगलं, समुद्रमंथनातून विषाबरोबर अमृतही निघतं हा दिलासा देणारं आहे. या संस्थळावर मात्र शहाण्यांनी विषाचा प्यालाच दाखवत जो काही एकांगी हैदोस घातलाय तो बघता या समाजातलं असल्याची लाज वाटावी. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एवढे विष ओकू शकता तर खाजगीत किती विषमय असाल? असो, अश्या बाबतीत यापुढे तरी विवेकाने विचार मांडावा (जमल्यास करावा) एवढीच अपेक्षा. राजकारणी, ब्रिटीश, संघटना या कोणालाही नावं ठेवण्याआधी प्रत्येकाने माझ्याकडून जे मांडलं जातय त्यात तथ्य किती आणि कांगावा किती याचा डोकं स्थिर ठेवून विचार केला तरी अश्या घटना टळायला मदतच होईल. शेवटी समाज म्हणून सगळ्यांनाच पुढे जायचय.

वाचने 123661
प्रतिक्रिया 327

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

काय संबंध? पगो दुसर्‍या लोकांचे कोट देत आहेत. कोट ज्यांनी दिले त्यांच्यावर टिका करा. --------------- मला वाटतं आंबेडकरांनी ओवरड्राइव मधे अशा अनेक रिअ‍ॅक्शन दिलेल्या असणार. मंजे तत्कालीन समाजाला धक्का द्यायला.

In reply to by पगला गजोधर

कदाचित हे कदाचिता एवढेच मर्यादीतही असावे. कुणा राजाला सिद्धार्थ गौतम जन्मू शकतो, सम्राट अकबर बदलू शकतो तर कदाचित होय डॉ. आंबेडकर म्हणतात तसे झाले असते आणि कदाचित एखाद्या पेशव्याला उपरतीही झाली असती. पुरोगामी लोकांना नेहमीच सद्य काळा विरुद्ध लढावे लागते, सॉक्रेटीस ते संत मीरा बाई वीषाचे प्याले पचवावेही लागतात एवढया सगळ्यातून संत चोखा मेळ्याचे साहित्यही तगत असते. असो.

In reply to by माहितगार

जयंत कुलकर्णी यांनी दिलेली लिंक वाचलीत का? त्यात अनेक उदाहरणे आहेत माधवराव पेशवे यांच्या बद्दल आणि महार ब्राह्मण वादात पेशव्यांनी महारांची बाजू कशी घेतली होती वगैरे. पण सध्या इतिहास मोडून तोडून वापरायची फॅशन आहे. सध्या ममता दीदी जानवे घालणाऱ्यांना गायी आणि गीतेची पुस्तके भेट देत आहेत. कधीतरी महाराष्ट्रात तो दिवस आला तर इतिहास काय होता हे शोधायचे कष्ट कोणी घेतील. तोपर्यंत जे जे होईल ते ते पहावे. जगात गाढवाची कमी नाही. शक्य असल्यास कुंभार व्हावे नाहीतर गाढवांच्या लाथा कशा चुकवता येतील एवढेच बघावे.

In reply to by पैसा

ज्याचे माप त्याच्या पदरात घालण्यास हरकत नाही. छ. शिवजी महाराजांनी पर मुलखातही सामान्य माणूस लुटला जाणार नाही आणि रयत केंद्रीभूत राहील हे पाहीले. असा ध्यास कमीच राज्यकर्यांना जमला असावा आणि त्या दृष्टीने पेशवे जिथे चुकले तिथे त्यांचे माप त्यांच्या पदरात जरुर घालावे. काही योग्य केले असल्यास क्रेडीटही द्यावे. ईष्टापत्ती आणि परिस्थितीचा सुयोग्य उपयोग अर्ग्युमेंटही समजता येते. पण ब्रिटीशांचे मापही त्यांच्या पदरात टाकावयास हवे. त्याच वेळी काही भारतीय शेड्ञुल्ड ट्राईब्सवर ब्रिटीश अन्याय ते आफ्रीकन आणि नेटीव्ह आमेरीकनांसोबतचा वंशवादही माणूसकीला काळीमा फासणाराच होता. ब्रिटीश त्यांच्यासाठी आपत्ती होते हे विस्मरणात जाऊ नये. परिस्थितीनुसार काही जात्यात, काही सुपात होते. ब्रिटीशांवर कुणी राज्य केले नाही म्हणून ब्रिटन मध्ये सामाजिक सुधारणा झाल्या नाहीत असे नसावे. महायुद्धे तेथेही इष्टापत्ती ठरली असतील कदाचित पण म्हणुन महायुद्धांचे समर्थन मर्यादीत प्रमाणातच करता येते. महायुद्धे झाली नाहीत म्हणुन सामाजिक सुधारणा झाल्या नाहीत सुधारक जन्मले नाही असे होत नसावे हेही लक्षात घेतले पाहीजे. देशहीताचे वहन करणारी राष्ट्र आणि राष्ट्रप्रेम ही संकल्पना आपल्या ठिकाणी महत्वाची आहे आणि राष्ट्रप्रेमाशी तडजोड न करता सुधारणावादी भूमिका घेता येऊ शकतात. असो.

In reply to by माहितगार

"कदाचित" तुम्ही म्हणता तसं एखादया पेशव्याचे मन परिवर्तन झालंही असतं, अगदी शक्य आहे, ज्याप्रमाणे राजकुमार गौतम बुद्ध यांचं झालं.. उदा. थोरल्या बाजीरावाने धर्म/जात पलीकडे जाऊन, प्रेम व पुढे विवाह केला, काय झालं बिचाऱ्याचे ...किती हाल अपेष्टा उभय जोड्याच्या नशिबी ??? त्यामुळे एखादा रण धुरंधर पेशव्याचे मनपरिवर्तन झालेही असते (तुम्ही कल्पिता तसे) तरी आजूबाजूची सिस्टिम ने त्याचा काटा काढला असता, त्यामुळें ब्रिटिश आगमनामुळे संपूर्ण सिस्टीम उलथून पडली व दलितांना शिक्षण गरिमा नोकरी ची द्वारे किंचितशी किलकिली झाली....

In reply to by पगला गजोधर

हम्म, पेशव्यांचे प्रत्यक्ष निर्णय पश्चिम महाराष्ट्र कोकणात नक्कीच प्रत्यक्षपणे लागू पडले असतील पण मराठवाडा आणि विदर्भात पेशव्यांचा प्रभाव अप्रत्यक्ष स्वरुपाचा होता, अर्थात पेशव्यांनी रमण्यातून वाटलेल्या दक्षिणा घेतलेल्यांकडून त्यांचा प्रभाव बाहेर किती गेला असेल हा वेगळ्या अभ्यासाचा विषय नक्कीच असेल दुसर्‍या बाजीराव पेशव्याच्या मापात या विषयावर बरेच पाप जमा असेल अए दिसते तरीही दोन स्त्री विषयक बाबीत त्याला क्रेडीटही पोहोचते किमान एका बाबतीत ब्राह्मणांनी त्यांच्या मुलींना पैसे घेऊन विकु / देऊ नेये अशा स्वरुपाचा एक निर्णय वाचनात आला होता. दुसरे त्याच्या एका पत्नीस संस्कृत शिक्षणाची परवानगी मिळालेली होती त्यावरून अप्रत्यक्ष प्रेरणा घेऊन अनंतशास्त्री डोंगरे या पंडिता ने स्त्रीयांच्या संस्कृत आणि वेद शिक्षणासाठी थेट शंकराचार्यांशी शास्त्रार्थ केला वरून आपल्या मुलीस संस्कृतात्त पारंगत केले. अनंतशास्त्री डोंगर्‍यांची ती मुलगी पुढे पंडिता रमाबाई म्हणून सुपरिचीत झाली. तिने समाज विरोध पत्करून परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्य केले . तत्पुर्वी पंडिता रमाबाईने ब्राह्मणेतर विवाह करण्याचे धाडसही केले ह्याची नोंदही घेण्याची गरज असावी तेही संस्कृतातील पंडिता असून चुकीच्या रुढींना विरोध केला.

In reply to by पगला गजोधर

ज्ञानोबा, तुकाराम, नामदेव इ. संतांनी कर्मकांडाचा निषेध करत भक्ती मार्ग सांगितला. आणि बहुतांश महाराष्ट्र त्या मार्गे जातो. ही धर्म सुधारणाच होती ना? ती इंग्रजांच्या काळात झाली का?

In reply to by पगला गजोधर

स्कोप मिळाला ? होय indeed... पण ब्रिटिशांना स्वतःस झेपेल आणि रुचेल तेवढाच ना ? डॉ. आंबेडकर असोत वा पंडिता रमाबाई मर्यादे बाहेर विमुक्त जमातींच्या प्रश्नात नाक खुपसले असते अथवा गोर्‍या वंशवादा विरुद्ध कृष्णवर्णीय क्रांतीकार्‍यांना प्रोत्साहन संरक्षण दिले असते तर ब्रिटीशांनी स्विकारले असते का ? स्कोप उपलब्ध झाला असता का ?

In reply to by माहितगार

पण ब्रिटिशांना स्वतःस झेपेल आणि रुचेल तेवढाच ना ?
कितीही अत्यल्प चान्स का असेना, त्यामागे ब्रिटिशांचे काहीही मोटिवेशन का असेना... पण तत्कालीन दलित समाजाला, जिथं माणूसपण नाकारलं जात होतं, तिथं ही अत्यल्प सामाजिक संधी, जणु काही, ज्यावर वॉटरबोर्डिंग होत असेल (ज्याचे हातपाय बांधून , मुंडी पाण्याखाली बळजबरीने 2 मिनिटे धरणारे हात, एका क्षणासाठी थोडं ढिले व्हावें, व पाण्यातून आपली मुंडी बाहेर काढण्यासाठी अत्यल्प चान्स मिळून पहिला श्वास घ्यायला मिळावा) त्याच्या पहिल्या श्वासासारखी, ही अत्यल्प संधी होती. . असो पेशवाईतल्या स्त्रिया वाचूलिहूशकत होत्या नं ? त्या शिवाय का, ध चा मा झाला ? . अश्यात दुसऱ्या बाजीरावाने आपल्या स्त्रीला शिक्षणाची संधी देऊन काय मोठे ते तिर मारले ? Too Late Too Less, आणि हे सुद्धा त्याने नक्कीच स्वतःच्या सोईने, स्वतः झेपेल रुचेल असेंच असावे असं कोणी म्हटलं तर त्यात काय वावगे ? त्यासाठी काय त्याला बळच समाज सुधारकांच्या पंक्तीत घुसवण्याचा घाट घातलाय ?? ब्रिटिशांनी जगभरात काय काशी केली, करून ठेवली, याचा इथल्या दलितांना देशद्रोही म्हणून बघण्यामागे काय संबंध ? . इथं दलित लोकांना आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा चान्स मिळाला, तुटपुंज्या पगाराची का होईना पण सैन्यात नोकरी पेन्शन मिळाले, आणि हे त्यांना डोंगरएव्हढे मोठे वाटावे, यातच त्यांची पेशवाईत व त्या आधी होणारी विटंबना अवहेलना गळचेपी आजच्या लोकांना लक्षात यावी. बाय द वे, "तुझी सावलीही आमच्यावर पडू देऊ नको", (सावली पडू न देणे)अशाप्रकारचा शब्दसंमुच्चय मराठीत कधी पासून रूढ झाला हो ? मागच्या शतकातील महाराष्ट्रातील एक दलित शाहीर (ते इंग्रज अधिकाऱ्याकडे नोकर होते)काय म्हणतात ? इंग्रज सायेब बरा. का ? तर ..इथले लोक आमच्या सावलीपासून विटाळ मानतात, पण साहेब आमच्याशी हँडशेक करतो, त्याच्या बरोबर चहा पाजतो... . आय अँम शुअर, तुम्ही म्हणाल इंग्रज धूर्त (एच आर मॅनेमेंट, स्वतःची सोय स्वार्थ ब्लाह ब्लाह....) . पण लक्षात घ्या, ज्या समाजातील लोकांना एक हँडशेक अर्धा कप चहा, सुद्धा तो माणुस आहे याचे कन्फेर्मेशन द्यायला पुरेसा ठरतो, तिथे आधी त्यांना किती हीन नीच ट्रीटमेंट किती हजारो वर्षे मिळाली असेल ???

In reply to by पगला गजोधर

चर्चेत काही गोष्टी स्पष्ट करावयाच्या राहून जाऊ नयेत म्हणून ; पहिली गोष्ट धागा चर्चा ज्या कारणाने चर्चा चालू झाल्या त्याची स्थिती आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी या म्हणी प्रमाणे झाली आहे. वढू बुद्रूक बाजूस राहून चर्चा हकनाक कोरेगाव भीमावर घसरल्या. पैसा ताईंनी म्हटल्या प्रमाणे दंगलींचा भाग भाडोत्री दंगल खोरांना वापरून झाल्याची शक्यतेचा भाग मोठा असावा आणि सामाजिक राजकीय आणि दंगल खोरीय भूमिका सरळ करण्यात का आणि कुठे अपयश आले हा स्वतंत्र अभ्यासाचा महत्वाचा मुद्दा असावा. कोरेगाव भीमा वर चर्चा आलीच आहे तर स्मारकावर जाऊन एवढी शतके अन्याय करणार्‍यांवरच्या अन्यायाचे उट्टे काढण्याचे समाधान प्राप्त करुन घेण्यात -स्वतः दुसर्‍या बाजीरावाने ब्रिटीशांशी तडजोड केली म्हटल्यावर अन्यायग्रस्त समुहानेही त्यांच्याशी तडजोड केली त्तर - फार नुकसानकारकही काही नसावे. मला वाटते स्वा. सावरकरांनीही अशी काहीशी भूमिका घेतल्याचा संदर्भ मागे विकिपीडियावर वाचल्याचे आठवते. (चुभूदेघे) पण इथे नाजूक तर्कांच्या आधारांवर अधिक बळ दिल्यास आधार कोसळण्यासारखी स्थिती होते किंवा काय अशी साशंकता वाटते. अधिक अभ्यास आणि संशोधनाची गरज स्वतः प्रकाश आंबेडकरांच्या अलिकडील लेखातून व्यक्त झाल्याचे दिसून येते. अशीच बाब दुसर्‍या बाजीरावाच्या सामाजिक दृष्टीकोण आणि निर्णयांवर अधिक संशोधन आणि अभ्यासाची गरज असावी आणि सर्वच महाराष्ट्रीय इतिहासाची प्रॉपर प्रमाण ऐतिहासिक साधने आंतरजालावर विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध व्हावयास हवीत.

In reply to by माहितगार

सहमत, कोरेगावास भेट देणारे दलित बांधव, वढुस भेट देणारे मराठा बांधव, व या महाराष्ट्रात राहणारे तमाम ब्राम्हण, मराठा, ओ बी सी सर्व लोक हे शांतिप्रिय व आधुनिक विचारसरणी असलेले आहे, त्यात वाद नाही. धागा कोरेगाव भीमाशीच संबंधित आहे अगदी टायटलपासून, वढूशी नाही. कोरेगाव भीमा दंगल ही भाडोत्री गुंडांकडूनच घडली आहे याबाबतही दुमत नाही, . फक्त ते भाडोत्री गुंड फॅसिस्ट अतिउजव्या अतिवादी शक्तीकडून कडून सुपारी घेऊन आले होते का नव्हते, जर नव्हतें तर नक्की कोण मागे आहे, याचीच सखोल निष्पक्ष चौकशी व्हावी...

In reply to by पगला गजोधर

प.ग. अमेरीकनांना तथाकथित न्युट्रल इंग्रजी विकिपीडियावर त्यांच्या फर्स्ट नेशन्सना सामावून घेण्यासाठी केलेली माझी टिका रुचत नाही. तिथला एकही पुरोगामी भारतीय पुढे सरसावत नाही. सांस्कृतीक दमन त्याचे इंग्रजी भाषांतर जे असेल ते त्या लेखाच्या चर्चा पानावर मी नुसता डोकावलो तरी ते लेख पान मी विकसीत करेन या भितीने इंग्रजी विकिपीडियातून वगळले जाते. ते एकविसाव्या शतकातील मागच्या वर्ष दिडवर्षातील गोष्ट - अनुभव आणि पुराव्यांसहीतच बोलतोय - या पुर्वीचे युरोमेरीकन अधिक उदार होते असे म्हणावयाचे आहे का ?

In reply to by पगला गजोधर

अगेन आपण दुसर्‍या बाजीरावास गृहीत का धरतोय ? -त्याची पापे जी असतील ती आहेतच पण तरीही - त्याच्या बायकोचे संस्कृत शिक्षण चालु होते तर त्याने इतर स्त्रीयांच्या शिक्षणास विरोध करण्याची शक्यता कमी होत नाही का ? झाशीच्या राणीचे सैनिकी शिक्षण नेमके कुठे झाले - नेमके माहित नाही पण दुसर्‍या बाजीरावाच्या आशिर्वाद या मागे होता की नाही हा अभ्यासाचा विषय असावा . इतर सामाजिक सुधारणांना विरोध झाला असता कदाचित तसा तो ब्रिटिश कालावधीतही झालाच. आणि सर्व काळात समाज सुधारकां समोर हे आवाहन असतेच

In reply to by पगला गजोधर

Criminal Tribes Act 1871 ब्रिटिशांनीच आणला ना? त्यांचेच नंतर विमुक्त जाती असे नामकरण झाले ना? उलट ब्रिटिशांनी इथली कास्ट सिस्टीम डॉक्युमेंट केली. त्यावर आधारित कायदे-सोई केल्या. आणि जातीच्या भिंती बळकट केल्या. https://en.m.wikipedia.org/wiki/Census_of_India_prior_to_independence पूर्वी (म्हणजे मध्ययुगात) जाती व त्याचे व्यवसाय बदलत होते ना?(उदा कुणबी->मराठा शेतमजूर ते शासक). ब्रिटिशांनी कागदोपत्री नोंद करायच्या सिस्टीम मूळे विसरायची सोय संपली. भारतात ज्या सुधारणा झाल्या त्या इथल्या समाजसुधारकांमुळे, जर ब्रिटिश नसून अन्य कोणाचं राज्य असत तर सुधारणेचा वेगळा मार्ग त्यांना घ्यावा लागला असता एवढंच. बाकी स्वतःच्या सोयीसाठी इंग्रजांनी बऱ्याच ठिकाणी बरीच वाट लावली. मध्यपूर्वेत तर कायच्या काय वाट लावून ठेवलीय - ती अजून खराब होत चाललीये.

In reply to by माहितगार

देशहीताचे वहन करणारी राष्ट्र आणि राष्ट्रप्रेम ही संकल्पना आपल्या ठिकाणी महत्वाची आहे आणि राष्ट्रप्रेमाशी तडजोड न करता सुधारणावादी भूमिका घेता येऊ शकतात. असो.
फार छान वाक्य लिहिले आहे हे तुम्ही.आवडले.

In reply to by पगला गजोधर

http://www.tribuneindia.com/news/punjab/community/ambedkar-s-1931-edito… भगत सिंगाने स्वातंत्र्यासाठी जे प्राणदान दिले त्याच्या उचिततेबद्दल कौतुक असोच, पण उचित/अनुचित बाबतीत शांत राहून ब्रिटिशांना हे केवळ घरच्या दबावाने करायला लागले म्हणणे म्हणजे ब्रिटिश सरकार छान, ब्रिटिश जनता चिडलेली असं म्हटल्यासारखं आहे. ================= ब्रिटिश काळे गोरे हा भेदभाव करत त्याच्या कितीतरी स्टोर्‍या वाचलेल्या आहेत. ते ब्राह्मणी अस्पृश्यतेपेक्षा आंबेडकरांना कसं समर्थनीय वाटलं देव जाणो.

अंतरा आनंद,
आणि बाबरी पाडल्यावर कित्येक वर्षे देश धुमसत राहिला ते कृत्य करणारे लोकशाही विरोधी नव्हते का?
बाबरी नावाची कोणतीही मशीद तिथे नव्हती. जे होतं ते जुनं राममंदिर होतं. हिंदूंनी हिंदूंचं देऊळ पाडलं तर कोणालाही आक्षेप घ्यायचं कारण नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गामाजी, अंतरा आनंद सारखे पुरोगामी, काँग्रेसी, डावे ही एक भित्री जमात आहे. अन्यायाच्या छत्राखाली शांतता त्यांना अत्यंत प्रिय आहे. बाबरी मशीद आहे का राम मंदिर आहे नि त्याबद्दल समाजभावना काय आहे, सत्य काय आहे, न्याय्य काय आहे याच्याशी त्यांना मतलब नाही. त्यांना हवी शांतता. मला ती बाबरी मस्जिद आहे असं प्रामाणिकपणे म्हणणारे लोक तो मुद्दा महत्त्वाचा नाही म्हणणारांपेक्षा पूजनीय वाटायला लागलेत. ------------- १९९२ मधे या पुरोगाम्यांनी मुस्लिमांना भडकावले नसते तर देश अजिबात धुमसला नसता. २०१० मधे कि आसपास जेव्हा अलाहाबाद हाय कोर्टानं १/३ मुस्लिम २/३ हिंदू असला निकाल दिला त्यादिवशी ... तसं नीट पाहीलं तर ... कट्टर मुस्लिमाच्या नजरेत २/३ बाबरी हिंदूंना मिळाली. या निकालाच्या दिवशी सरकार जाम टेन्स होतं. पण देशात एक मच्छर मेला नाही. ------------------- आणि ही भित्रट मंडळी जेव्हा "धुमसणे" शब्द वापरतात तेव्हा त्यांना मुस्लिमांच्या दंगलखोर वृत्तीचं निर्ल्लज्ज समर्थन करायचं असतं. समजा हिंदू मूर्खासारखे वागले तरी अन्य कोणीही शेवटपर्यंत घटनेच्या व्यवस्थेच्या चौकटीतच वागावे हे दटावायला यांची जीभ रेटत नाही. यांची मानसिकताच अशी आहे कि मुस्लिमांवर हिंदूंकडून अन्याय झाला तर त्यांना देश धुमसावत ठेवायचा अधिकार आहे. ------------------- शिवाय पुरोगाम्यांच्या आरंभबिंदूचं चयन म्हणजे एक जोक असतो. तसं ओरिजनल धुमसावायला उचकावलं बाबरानं आणि त्यानंतर अनेक तिथे पाडापाडी करणार्‍या राजांनी, लोकांनी. पण पुरोविनोदबुद्धीप्रमाणे, १९४७ ला देशाचे सगळे वाद मिटले म्हणून १९४७ नंतर काडी करणारा तो दोषी!!!!!!!!!!!! अरे काय लॉजिक आहे?????? स्वातंत्र्याचा आणि स्वातंत्र्याशी संबंध नसलेल्या भांडणांचा संबंध काय? ----------------------- मी खालील विधाने समत्वबुद्धीने लिहित नाहीय, पण १. जे लोक समत्वबुद्धीने तत्त्वे ठरवून मग चर्चा करतात ते मागास, धार्मिक. २. आम्ही जे म्हणतो तेच खरे, त्यातून निघेल ते तत्त्व तेच खरे असं म्हणणारे पुरोगामी.

प.ग.,
आपले भारत हे राष्ट्र आसेतुहिमाचल असे कधी नव्हतेच किंबहुना ते तसे होते ही पुराणातली वानगी आहेत हे लगेच लक्षात येऊ शकते.
राष्ट्र म्हणजे काय याची सुस्पष्ट व्याख्या नाही. एका राज्यात अनेक राष्ट्रिके नांदू शकतात. याउलट एकाच राष्ट्रात अनेक राज्येही असू शकतात. स्वित्झर्लंड नामे चिमुकल्या राज्यात डॉईश, फ्रांका व इतालियानो ( = जर्मन, फ्रेंच व इटालियन ) अशी तीन राष्ट्रिके सुखेनैव नांदू शकतात तर भारत नामे खंडप्राय राष्ट्रात अनेक राज्ये असणे अत्यंत स्वाभाविक आहे. आ.न., -गा.पै.

सर्व धागे आणि सर्व प्रतिसाद वाचले. आता एकच प्रश्न पडला आहे. इथून पुढे, आपण आपापसातील मतभेद व भांडणे विसरून एकत्र येऊ अशी परिस्थिती निर्माण व्हायला सर्वांनीच काय प्रयत्न केले पाहिजेत? अत्यंत कळकळीने विचारतो आहे. पुढे काय?

In reply to by एस

इथून पुढे, आपण आपापसातील मतभेद व भांडणे विसरून एकत्र येऊ अशी परिस्थिती निर्माण व्हायला सर्वांनीच काय प्रयत्न केले पाहिजेत? अत्यंत कळकळीने विचारतो आहे. पुढे काय?
तसा ब्राह्मण/संघ/भाजप्/सवर्ण/हिंदू इ इ प्रणित शक्तींपासून देशाला, लोकशाहिला वा कोणत्याही अन्य समाजाला, धर्माला इ इ व्यवस्थेला अजिबात धोका नाही. पण असा धोका असल्याचं भय काही प्रामाणिक* आत्म्यांना इतकं घेरून राहिलं आहे, आणि आपल्या परीनं आपण काहीतरी करावं म्हणून ते इतकी तडफड करत आहेत कि त्या तडफडितूनच एक भयप्रद सामाजिक फट निर्माण झाली आहे. हे सगळं सुरळीत व्हायला २०१९ मधे मोदीचं सरकार हरवणं आवश्यक आहे. ---------------------------------------- * अप्रामाणिक आत्मे चार दिवसात उघडे पडतात. त्यांच्या नाटकांचा, घातपाती कारवायांचा इतका काही धोका नाही.

चला. अजो आखाड्यात उतरले. वॉशिंग्टनची कुऱ्हाडच ती. सपासप हाणामारी करता करता कोवळ्या पालवीचा अंशसुद्धा उरणार नाही इतका आवेश. असो. नाहीतरी जीव जायचा पुरोगामीपणानिशी आणि जीव घेणारा म्हणणार भित्रे!

In reply to by राही

नाहीतरी जीव जायचा पुरोगामीपणानिशी आणि जीव घेणारा म्हणणार भित्रे!
पुरोगाम्यांचा माज मोदी सरकार आल्यापासून उच्चतम बिंदूला पोहोचला आहे. त्यांच्या अस्तित्वाला (त्यांच्या मते) खरा अर्थ लाभला आहे. ही वेळ त्यांना सर्वस्व वाहून प्राणांतिक विरोध करायची नि आपल्या जन्माचं सार्थक करायची असं वाटत आहे. अर्थात अशावेळी आपला जीव ऑफर करणे त्यांना आपल्या कम्यूनिटीमधे गौरव प्राप्त करून देणार आहे. --------------- ज्या पुरोगाम्यांना डाव्या लोकांचं फंडींग आहे, त्यांचं मी समजू शकतो. पण जे लोक असे कोणते लाभार्थी नाहीत त्यांची कीव वाटते. घटनेच्या चौकटीत राजकीय विरोध करायचं सोडून ही मंडळी असा विखार पसरावत आहेत कि त्यांना आपण राष्ट्राचे नुकसान करत आहोत हे समजत नाहीय. चांगल्या, वैचारिक, तात्विक, नि:स्वार्थी लोकांकडून भावनेच्या भरात देशाचं नुकसान होत असलेलं पाहून वाईट वाटतं. विषवल्लीशी कशी दोन हात करायचे याचं कौशल्य अनेकांना आहे नि कट्टर लोक पटकन बुंधा, खोड, फांद्या, मूळं यांच्यावर घाव घालतात. माझं स्पेशालायझेशन कोवळ्या पानांमधेच आहे. ----------------- ज्या सत्तेचा आपण पराजय केला, ज्यांना आपण दुष्ट मानलं, ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा राजकीय युद्धातला विजय स्वातंत्र्यानंतर का सामाजिक स्तरावर का साजरा व्हावा हे विचारायची सोय राहिलेली नाही. या परकीयांनी जगातले किती मानववंश नष्ट करून टाकले हे क्षणभर विसरलं नि त्यांच्या आपल्या संस्कृतीला झालेल्या स्पर्शाला आपल्या बर्‍याच समाज सुधारणांचं श्रेय देणे योग्य मानलं तरी राजकीय युद्धातला विजय का साजरा करायचा हा प्रश्न उरतोच. उदा. पोर्तुगिजांनी भारतात पाव आणला नि भारतीय आहार समृद्ध केला असलं काहीतरी श्रेय त्यांना द्यायचं मान्य केलं तरी त्यांच्याशी झालेल्या युद्धात भारताच्या पराभवाचा उत्सव बनवणे कितपत योग्य आहे? हा प्रश्न दलितद्वेष्टाच विचारू शकतो असं गृहित लगेच हाणामार्‍या करणारा हा लेख आहे. हा प्रश्न कोणीही विचारू शकतं. सामाजिक न्याय मिळवायच्या लढ्याला परकियांच्या जयाची झालर कशाला? मग स्वातंत्र्य मिळाल्यामुळे नि हा सामाजिक न्याय प्राप्त करून देणारे परकीय गेल्याने आत्ता सामाजिक अन्याय पुन्हा उद्भवला आहे नि तो घालवायला पुन्हा चांगले परकीय लागतील असं ऑटोमॅटिकली अभिप्रेत होत नाही का? आणि १८१८ मधे जे काही झालं त्याला सामाजिक सुधाराचा किनारा देणं म्हणजे सामाजिक सुधारासाठी न सुधारणार्‍या जातीच्या लोकांना मारून टाकणं हा एक उपाय आहे असं काहीतरी विचित्र आणि अघोरी अर्थ यातून निघतो. त्यामुळं एक प्रथा म्हणून काही अधिकार्‍यांनी आपल्या रेजिमेटच्या पूर्वजांची स्म्रुती करणं हे समजलं जाऊ शकतं पण पुरोगाम्यांनी याचा देशव्यापी स्तरावरच्चा जो बाऊ करून ठेवला आहे तो कळत नाही. ------------------- धाग्यावर ज्यांनी कोणी जे काय विचार मांडलेत त्याच्या प्रामाणिकपणावर बेभरोसा दाखवून टिवल्या बावल्या करण्यात मला रस नाही. मला फार नीट मांडता आला नाही तरी एक प्रश्न मांडायचा आहे. लेखिकेनं जे काही स्वतःकडे बघायला सांगीतलं ते मी नीट बघून घेतलं. मला काही माझ्या प्रश्नात खोट आहे वा माझ्या नियतीत खोट आहे असं आढळलं नाही. आणि दलित, डॉ. आंबेडकर (समर्थक) यांना मी हक्कानं प्रश्न विचारू शकतो कोणत्याही भूमिकेबाबत. नको रे बाबा "त्यांना" विचारायला, मॅटर संवेदनशील आहे, असला दुरावा अजून तरी मनात नाही. पण प्रत्येक प्रश्नाच्या वेळी उत्तर न देता फक्त दलितद्वेषाचा आरोप झाला तर भविष्यात दुरावा होणं संभव आहे.

In reply to by arunjoshi123

परखड आणि निर्भीड विवेचन ज्या सत्तेचा आपण पराजय केला, ज्यांना आपण दुष्ट मानलं, ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा राजकीय युद्धातला विजय स्वातंत्र्यानंतर का सामाजिक स्तरावर का साजरा व्हावा हे विचारायची सोय राहिलेली नाही. सामाजिक न्याय मिळवायच्या लढ्याला परकियांच्या जयाची झालर कशाला? त्यामुळं एक प्रथा म्हणून काही अधिकार्‍यांनी आपल्या रेजिमेटच्या पूर्वजांची स्म्रुती करणं हे समजलं जाऊ शकतं पण पुरोगाम्यांनी याचा देशव्यापी स्तरावरच्चा जो बाऊ करून ठेवला आहे तो कळत नाही. एक लष्करी अधिकारी म्हणून काही रेजिमेंटच्या शौर्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या महायुध्दातील गाथा साजऱ्या केल्या जातात ते एका मर्यादेपर्यंतच पटत असे/ पटते. कारण हे युद्ध "परकीय सत्तेच्या विजयासाठी" केलेले होते. मग ते शौर्य अतुलनीय असले तरीही. यावर लष्करात माझे मतभेदही होत असत. प्रत्येक लष्करी परंपरा "तशीच्या तशी" साजरी केली पाहिजे हेच चूक आहे. पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्याच्या खांद्यावरील बिल्ल्यातील राजमुकुट जाऊन अशोक चिन्ह आले तसेच. स्वातंत्र्यानंतरच्या सर्व युद्धातील पराक्रमाच्या गाथांबद्दल अभिमानच वाटतो. कारण हे युद्ध स्वराष्ट्रासाठी केलेले होते. महार रेजिमेंटच्या सैनिकांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली तर समजू शकतो पण सर्वसामान्य लोकांनी तेथे जाऊन उत्सव साजरा करणे पटत नाही. मग अगदी डॉ बाबासाहेबानी तेथे श्रद्धांजली वाहिली असली तरीही. मी त्यांना "महामानव" मानतो, "देव" नाही. उद्या राजपूत लोकांनी शिवाजी महाराजांवर मिर्झा राजे जयसिंह यांनी मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा केला तर तो आपल्याला पटेल का? निदान मला तरी पटणार नाही.

In reply to by arunjoshi123

अजो , हा प्रतिसाद अतिशय समर्पक आहे. अगदी योग्य विचार तुम्ही मांडले आहेत ह्यात.

" ज्या पुरोगाम्यांना डाव्या लोकांचं फंडींग आहे, त्यांचं मी समजू शकतो. पण जे लोक असे कोणते लाभार्थी नाहीत त्यांची कीव वाटते. " कीव करणे म्हणजे स्वतःकडे ज्ञातेपणा घेऊन एका पेडेस्टलवर उभे राहून 'अरेरे काय हे जग, यांना समजतच नाही', अशी उच्च भूमिका घेणे. बौद्धांमध्ये अवलोकितेश्वर या नावाची देवता असते ती या मर्त्य जगताच्या लीलांकडे खाली पाहात असते. पण एक फरक आहे. अवलोकितेश्वराच्या डोळ्यांत करुणा असते. सहकंप असतो. आणि केवळ पैशातून किंवा कोणत्याही स्वलाभाच्या इच्छेतूनच केवळ पुरोगामी विचार जन्माला येतात हा फार मोठा भ्रम आहे. फंडिंग नसतानाही, किंबहुना बरेच वेळा ते नसतेच;अनेकांनी आपली आयुष्ये पणाला लावलेली आहेत, संपूर्ण आयुष्य (कोणत्याही लाभाविना) वेचलेले आहे. कीव करणे सोपे. पण या प्रयत्नांची, माणसांची माहितीही नसणे, केवळ समानधर्मी विचारांच्या माणसांनी केलेला तोच आणि तेव्हढाच त्याग अशी भूमिका असणे, शिवाय त्यांची कीव करणे या कोतेपणाला काय म्हणावे?

In reply to by राही

+1

In reply to by विशुमित

काय +१? काय बुड शेंडा हाय का त्या उत्तराला? मी कुठं म्हणलं कि पुरोगामीपणी प्रेरणा केवळ स्वार्थ असते? मी कुठं त्यांनी चार चांगल्या गोष्टी केल्या नाहीत? किंवा फक्त उजवेच निक्के निक्के नि बरोबर असतात? असं काही न वाचताच सह्या करत असता का ऑफिसात?

In reply to by arunjoshi123

तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे याची टोटल मला तरी काय लागली नाही. नाहीतर तुमच्या प्रतिसादाखाली सही केली असती. पुरोगामीच्या तुमच्या खतरनाक व्याख्या वाचुन मौज वाटली. आता सही मी केली म्हणजे जबाबदारी माझी आहे. सह्या का केल्या हे विचारायला एकतर तुम्ही माझे बाॅस असले पाहिजे किंवा आॅडिटर...!

In reply to by विशुमित

तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे याची टोटल मला तरी काय लागली नाही.
अहो म्हणूनच विचारलं "+१ काय?" माझा प्रश्न तुम्हाला कळला नाही, तरी तुम्ही त्याच्या उत्तराला +१ लिहावं हे विचित्र आहे. =============================================
सह्या का केल्या हे विचारायला एकतर तुम्ही माझे बाॅस असले पाहिजे किंवा आॅडिटर...!
का म्हणे? मी तुमचा दोस्त आहे (असू शकतो ही वाक्यरच्चना टाळली आहे). फक्त कायदेशीर अधिकार गाजवायचे का? समाजात इतरही महत्त्वाची नाती असतात.

In reply to by राही

हे सगळे स्वतःच्या पैशातून सो कोल्ड प्रतिगामी देखील करतातच, पण एखादी चळवळ चालवायला, वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करायला पैसे लागतात, आणि ते फंडिंगशिवाय शक्य नाही यात दुमत नसावे. आणि फंडिंग काही फुकट दानधर्म म्हणून येत नाही हे पण लक्ष्यात असू द्यावे म्हणजे झाले.

चला तर मग ठरल आता मोदींच सरकार घालवलं की वरचे सगळे उल्लेखलेले संकट नाहीसे होतील. २०१९ की आंधी.....हर बार हमेशा राहुलजी गांधी.

अंतरा आनंद, तुम्ही स्वत:कडे बघायला सांगताय हे ठीक आहे. मात्र यात महारांचा स्वाभाविक उद्रेक तुम्ही गृहीत धरलेला आहे. मात्र वस्तुस्थिती पार वेगळी आहे. इथे संशय व्यक्त केल्याप्रमाणे नक्षल्यांनी दंगल पेटवल्याची माहिती अवगत होते आहे. त्यामुळे स्वत:कडे बघायची गरज खरंच आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. मी तरी स्वत:कडे न बघता नक्षल्यांकडे बघा म्हणून सुचवेन. कोरेगाव भीमा इथल्या व उर्वरित महाराष्ट्रातल्या दंगलींचा महारांशी व नवबौद्धांशी काडीमात्र संबंध नाही. नक्षल्यांशी मात्र घनिष्ट संबंध आहे. अधिक माहिती : मुंबई - कल्याण पट्ट्यातून नक्षल्यांना अटक आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अरे वा, एवढं तुम्हाला कळतय तर "दलित समाजाला जाळण्यासाठी खास गाड्या उपलब्ध करून द्या" अश्या विधानाचा निषेध करायला हवा होता तुम्ही. त्या, या धाग्यावर पानपान भर प्रतिक्रिया लिहील्यात त्यात "हे कारस्थान नक्षल्यांच आहे तेव्हा दलित समाजाला नावं ठेवू नका" असं कुठे लिहीलं नाहीत ते.

In reply to by अंतरा आनंद

हात्तिच्या, एव्हढंच ना, मग गाड्या जाळायच्या वाक्यात दलिताचं नाव काढून नक्षल्यांचं नाव टाका. हाय काय नाय काय! -गा.पै.

In reply to by अंतरा आनंद

प्रत्येक वेळी प्रत्येकाला चिखलात उतरावं असे वाटलंच असे नाही ना.. शक्यतो वादापासून लांब राहायचा प्रयत्न असतो. आता तुम्ही आख्खी चिखलाची बालदीच डोक्यावर उपडी केली म्हटल्यावर यावं लागलं इतकंच.. एक लक्षात ठेवा, एका सरसकटीकरणाचे उत्तर दुसरे सरसकटीकरण असू शकत नाही. तुम्ही प्रामाणिक विचार करताय असं समजून बोलतोय. अजेंडा असेल तर मग काय प्रश्नच नाही.

ज्या प्रतिक्रियांमुळे मला लिहावसं वाटलं त्या मी प्रतिसादात पुन्हा उद्धृत केल्या. त्या कोणाच्याही असल्या तरी चुकीच्या होत्या, असं म्हणण्याची हिंमत इथे कोणीही दाखवलेली नाही अणि नाही नाही ते मुद्दे काढून चर्चा भरकटवण्यात मात्र एकापेक्षा एक पुढे येत आहेत. माझा मुद्दा अजूनही तोच आहे. दलित समाजाने काय करावे हे सांगणं सोपं आहे. एकदा जा दलित वस्तीत. त्या अजूनही आहेत अगदी शहरांमध्येही. ते किती गैरसोयीत जगत असतात ते बघा. तिथे सामान्यत: तुमच्याविषयी तिरस्कार नसतो तर कौतुक असतं. तुम्हाला आवर्जून चांगल्या कपातून चांगला चहा दिला जातो, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर "आज ***वार आहे, तिखट आहे, चालेल ना?" अशी काळजी घेतली जाते. तुम्हाला तिखट सहन न होऊन पाण्याची धार लागली तर हसतात पण ताटात वाढ्लेला गूळ दाखवतात. हे इथल्या प्रतिक्रियावाद्यांनी अनुभवलेलं नसेल. त्यांची मागणी जास्त नस्ते हो. आम्हालापण मान द्या एवढीच. आरक्षण हा आपल्याला पुढे जाण्यासाठी दिलेला हात आहे याची जाण त्यांनाही असते. ’दलित असेच वागतात’ असं म्हणून आपण ह्या आपलेपणाला, आपल्याला दिल्या जाणार्‍या मानाला नख लावत असतो. इतर समाजाप्रमाणेच दलित समाजही विद्ध्वंसक नसतो तर चार माणसं असतात. त्या चार माणसांची चारशे होऊ नयेत असं वाटत असेल तर चारांच्या चुकीच्या वागण्यासाठी समाजाबद्दल अनुद्गार काढणं थांबलं पाहिजे. आणि हे सरसकट काढले जातात. आपल्याला सवर्ण समाजाने स्वीकारलं आहे असं त्यांना वाटावं एवढा बंधूभाव आपण दाखवतो आहोत का हे तपासावं. उलट आपण त्यांच्यातल्या कुसळाला मुसळ म्हणून दाखवत बसतो. आपण अश्याप्रकारे बोलत-लिहीत असताना या गोष्टीची एकच बाजू समोर रहाते आणि तीच बरोबर आहे असं फारसा विचार न करणार्‍यांना वाटत रहातं तेव्हा त्याची दुसरी प्रामाणिक बाजू असेल तर ती मांडली जायला हवीच या भूमिकेतून मी हे लिहीलं. त्यात कोणत्याही समाजाला दोष द्यायचा नव्हता पण चर्चेचा मूळ मुद्दाच गैरसोयीचा असल्यानं तो मी तीनतीनदा लिहूनही दृष्टीआड केला गेला. प्रत्येकाचा नीरक्षीरविवेक यातून दिसलाच. आंदोलन, त्यातलं नुकसान मी कुठेही जस्टीफाय केलेलं नाही पण अशी आंदोलनं यशस्वी होत असतील, आंदोलन पुकारणार्‍याची राजकीय ताकद नसतानाही ती यशस्वी होत असतील तर एकूणच समाजाबद्द्ल त्यांची तक्रार आहे हे समजून घ्यावं. आपल्या पातळीवर तरी सरसकट एका समाजाला नाव ठेवणं टाळावं. आरक्षणासारखे राजकीय व्यवस्थेने दिलेले हक्क जरूर असतील पण आपल्या नातीगोती, कुटूंब, जात आधी मानणार्‍या समाजात या राजकीय व्यवस्थेला समांतर अशी व्यवस्था अस्तित्वात असते. आणि ती प्रस्थापितांच्याच (केवळ सवर्णांच्या नाही, मह्णून प्रत्येकाला प्रस्थापित गटाचा भाग व्हायची आस असते) बाजूने असते याचं भान ठेवून मग आरक्षणाबद्दल बोललं जावं. अशी समांतर व्यवस्था असू नये यासाठी आपण आग्रही नसू, काही करत नसू तर जिथे तिथे आरक्षणाकडे बोट दाखवण्याचा अधिकार नाही. विश्वरागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी, हे आपल्यातल्याच संतांने म्हटलय पण अर्थातच ती "भित्री पुरोगामी" असणार. त्यामुळे आपण आपल्या तलवारी उपसून राहूया. आपल्या एका डोळ्यासाठी दुसर्‍याचे दोन डोळे काढूया आणि मग झालेल्या अंधारात चाचपडत राहूया. असो, बाकी आपल्या मुद्द्यांवर न बोलता आपल्या बोलण्याला गाढवांच्या लाथा वैगेरे म्हटलं जात असेल तर आपण मनुष्यराज्यात नाही हे उमगायला हवंच. त्यामुळे आपल्या राज्यात परतावं हे उत्तम. समाज एक असावा असं वाटणारे लोकं भित्रे असतील तर शूरवीरांमुळे जे होतय ते दिसतं आहेच. सो चालू द्या. मी बाहेर पडते. जिस समय काँप रही है यह पृथ्वी मनुष्यो की संख्या के भार से गायब हो रहे हैं मनुष्यता के मोर्चे पर लड़ते हुए लोग । -राजेन्द्र राजन

In reply to by अंतरा आनंद

गाढवांच्या लाथा
होय, हे मीच लिहिलंय. या धाग्यावर मी मोजून दोन प्रतिसाद लिहिलेत. ते जर का तुम्ही थंडपणे वाचले असतेत तर त्याचा संदर्भ आणी अर्थ कळायला त्रास झाला नसता. पु. ल देशपाण्डे नावाचे एक "ब्राह्मण" लेखक होउन गेले. त्यांच्या लिखाणाचा संदर्भ तुम्हाला माहित असावा अशी आशा बाळगते. मी राजकारणी लोक समाजाला कसे गाढव बनवतात याबद्दल लिहिले आणि पुढे असे गाढव होउ नये असे लिहिले. हे इतके उलगडून सांगावे लागेल असे डॉक्यातच आले नाही बघा! तुम्ही प्रत्येक गोष्ट विनाकारण स्वतःवर ओढवून घेत आहात. फारएंड यांचा आणि प्रचेतस, आनंदयात्री यांचे प्रतिसाद आणि त्यावर तुमची टिप्पणी वाचताना मूळ लेखापेक्षाही आक्रस्ताळे प्रतिसाद लिहिता आहात असे वाटून गेले. लेख अत्यंत चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे असे वाटल्याने त्यावर काही प्रतिक्रिया देणे बराच वेळ मी टाळले होते. कारण ज्यातून काही निष्पन्न होणारे नाही असे वाद घालत बसायला आणि लोकांना त्यांच्या चुका दाखवत बसायला माझ्याकडे सध्या वेळ नाही. पण लेख खटकला त्याहून जास्त तुमची ही प्रतिक्रिया खटकली आहे. का ते सांगू? पुन्हा वाकडा अर्थ घेउ नका पण माझ्यासाठी "बौद्धवाडी" हा माझ्या एका मैत्रिणीचा फक्त पोस्टल पत्ता असतो. मी तिच्याकडे दयेने बघायची काही गरज नसते कारण ती माझ्यालेखी माझ्यासारखीच असते. तिच्याबाबत 'ते' 'त्यांची वस्ती' असा विचार कोणी करत असेल तर ते मला प्रचंड विचित्र वाटते. तुम्ही कोण आहात, तुमची जात काय हे मला माहीत नाही. पण जर कायद्याने व्याख्या केलेल्या मागसवर्गीयांपैकी असलात तर 'आम्ही', 'आमच्या वस्त्या' असे उल्लेख केले असतेत. त्या परिस्थितीत माझ्या एका मैत्रिणीला असे का वाटावे? म्हणून मी काही संवाद साधायचा प्रयत्न कदाचित केला असता. सांगायची गोष्ट म्हणजे मी शंभरात एक नाही तर शंभरापैकीच एक आहे. पण तुम्ही जर उच्च वर्णीय असून 'ते' 'त्यांच्या वस्त्या' असे लिहीत असाल तर तुम्हाला स्वतःकडे बघायची अत्यंत जरूर आहे असे मी म्हणेन.

In reply to by पैसा

तीळगूळ घ्या आणि गोड बोला. तुम्ही लिहिलं म्हणून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. चलता है.

In reply to by अंतरा आनंद

तिथे सामान्यत: तुमच्याविषयी तिरस्कार नसतो तर कौतुक असतं. तुम्हाला आवर्जून चांगल्या कपातून चांगला चहा दिला जातो, तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर "आज ***वार आहे, तिखट आहे, चालेल ना?" अशी काळजी घेतली जाते. तुम्हाला तिखट सहन न होऊन पाण्याची धार लागली तर हसतात पण ताटात वाढ्लेला गूळ दाखवतात. हे इथल्या प्रतिक्रियावाद्यांनी अनुभवलेलं नसेल.
तसा याचा नि विषयाचा काय संबंध आहे देव जाणो, पण इथले प्रतिक्रियावादी स्वतः दलित नाहीत, दलितांपैकी कोणाचा या उत्सवाला विरोध नसूच शकतो, प्रतिक्रियावाद्यांना दलितांचे विश्व माहित नाही इ इ गृहितके उगाच बनवत आहात. (तसा माझ्याकडेपण डेटा नाही, पण विचारून घेतलेलं बरं.). मी तुमच्या दलितवस्तीतील पुरोगामी फेरफटक्याला कमी लेखू इच्छित नाही, पण एक गोष्ट... मी लहानपणी कैकाडी, लमाणी, पारधी, महार, मांग यांच्या घरी राहिलो आहे. प्रतिक्रियावाद्यांनी कदाचित दलित साहित्यात जी भयानक बाजू पाहिली आहे त्याची एक दुसरी अत्यंत सुंदर बाजू मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. मी ३० वर्षाचा होईपर्यंत माझी आई माझ्या बर्‍याच वागण्या बोलण्याला "महार मांगी लक्षणं" म्हणे इतकी माझ्यावर या पार्श्वभूमीची छाप होती. आता याचा देखील विषयाशी संबंध नाही. पण या उत्सवाला विरोध म्हणजे दलितांना विरोध या मानसिकतेतून तुम्ही बाहेर येत नाहियेत. त्यासाठी तुम्हाला मदत करायची आहे. ------------------- फाटे न फोडता बघा सांगता येतं का कि ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं (आणि ते ज्या माणसाच्या मार्गदर्शनानुसार वापरलं) त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय हा (त्या मार्गदर्शकाचेच नाव पुढे रेटून) सामाजिक उत्सव म्हणून साजरा त्या राष्ट्राचा द्रोह नाही का?

In reply to by arunjoshi123

ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं (आणि ते ज्या माणसाच्या मार्गदर्शनानुसार वापरलं) त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय हा (त्या मार्गदर्शकाचेच नाव पुढे रेटून) सामाजिक उत्सव म्हणून साजरा त्या राष्ट्राचा द्रोह नाही का? >> भीमा-कोरेगावला 'त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय' झाला हे तुम्हाला मान्य आहे का?

In reply to by एमी

अर्थातच. तिथे जाऊन विजयस्तंभाला नमन करतात लोक. --------------------------- आणि प्रत्यक्ष कोरेगावला काय झालं हे महत्त्वाचं नाही. तिथे इंग्रजांनी मार खाल्लेला असू शकतो वा दिलेला असू शकतो. दुसर्‍या जागतिक महायुद्धात कोण्या विशिष्ट जागी इंग्रजांनी पराभव झेललेला असू शकतो. पण ओव्हरऑल विजय झाला. १८१८ मधे पेशवाई संपली हे सत्य आहे. ------------------------------ त्या स्तंभाला व्हिक्टरी ओबेलिस्क का म्हणतात? बाकी काही असलं तरी (असल्यास) मानणारे लोक तिथे पराजयची स्मृती करायला नक्कीच जात नाहीत.

In reply to by arunjoshi123

आणि प्रत्यक्ष कोरेगावला काय झालं हे महत्त्वाचं नाही. तिथे इंग्रजांनी मार खाल्लेला असू शकतो वा दिलेला असू शकतो. दुसर्या जागतिक महायुद्धात कोण्या विशिष्ट जागी इंग्रजांनी पराभव झेललेला असू शकतो. पण ओव्हरऑल विजय झाला. १८१८ मधे पेशवाई संपली हे सत्य आहे. >> अगदी बरोबर! === त्या स्तंभाला व्हिक्टरी ओबेलिस्क का म्हणतात? >> नक्की का? कारण मी जेवढं वाचलय त्याततरी त्याला स्मृतिस्तंभ म्हणत होते, विजयस्तंभ नाही. बाकी काही असलं तरी (असल्यास) मानणारे लोक तिथे पराजयची स्मृती करायला नक्कीच जात नाहीत. >> बरोबर. पराजयची स्मृती म्हणून कोणी २०० वर्षांपूर्वी ३५०००₹ खर्च करणार नाही आणि १०० वर्षांपासून लोक तिथे दरवर्षी जाणारपण नाहीत. पण मला वाटतं 'आपले पूर्वज शूर, लढवय्ये होते' याची स्मृती म्हणून लोक तिथे जातात; कोणाचाही जय/पराजय साजरा करायला नाही. === आता परत तुमच्या मूळ प्रश्नाकडे: ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवलं (आणि ते ज्या माणसाच्या मार्गदर्शनानुसार वापरलं) त्यांचा आपल्याविरुद्धचा युद्धातला राजकिय विजय हा (त्या मार्गदर्शकाचेच नाव पुढे रेटून) सामाजिक उत्सव म्हणून साजरा त्या राष्ट्राचा द्रोह नाही का? >> इथे तुम्ही ब्रिटिश = परके आणि पेशवे = आपले म्हणताय. जर प्रत्यक्ष लढणारे महार आणि अरब पाहिले तर कोणाला आपले आणि कोणाला परके म्हणणार? किंवा केवळ दोन लढणारे गट असा विचार केला तर कोण शूर, लढवय्ये वाटतंय?

मी माझ्या आयुष्यातली साधारण 2 वर्षे संघाच्या अगदी जवळ काढली. 2 वर्षात मला एकदाही संघाच्या माणसामध्ये दलित द्वेष दिसला नाही, किंबहुना आमच्या पंगतीला सर्व जातींचे लोक कायमच होते.. सगळ्याच उजव्या संघटना बऱ्यापैकी मुस्लिम द्वेष्ट्या आहेत, तात्विक लेव्हलला नसल्या तरी कार्यकारी लेव्हलला आहेत हे मान्य करायला हरकत नसावी. पण एकही उजव्या संघटनेतील माणूस मला आजपर्यंत दलित, वनवासी किंवा अन्य एखाद्या जातीचा द्वेष करताना दिसलेला नाही

In reply to by आनन्दा

आनन्दा,
पण एकही उजव्या संघटनेतील माणूस मला आजपर्यंत दलित, वनवासी किंवा अन्य एखाद्या जातीचा द्वेष करताना दिसलेला नाही
हेच तर खरं दुखणं आहे तथाकथित दलित पुढाऱ्यांचं. आ.न., -गा.पै.

In reply to by आनन्दा

पण एकही उजव्या संघटनेतील माणूस मला आजपर्यंत दलित, वनवासी किंवा अन्य एखाद्या जातीचा द्वेष करताना दिसलेला नाही >> उजव्या संघटनेचं माहित नाही पण 'इथे' बरीच उजवी लोकं सतत आरक्षण, RTE, त्याचा उपयोग करून घेणारे यांच्याबद्दल द्वेषाने बोलत असतात. इतर काहीना सतत जिथेतिथे ब्रिगेडीच दिसत असतात....

In reply to by एमी

इथे काही लोकांकडून सततच उजवे, दलित आणि पुरोगामी यांच्या विरोधात द्वेषाने, त्वेषाने आणि आवेशाने तलवारी उपसल्या जात असतात असे दिसते. धार थोडी बोथट असती तरी चालण्याजोगे होते.

In reply to by राही

काहीसा असहमत. उलट इथल्या काही लोकांना ब्राह्मणांबद्दल अंमळ अधिकच द्वेष दिसतोय असे वाटते, सतत पेशवाईचे उल्लेख निघतात, अरे बाबांनो, तुम्ही ह्यावर काही वाचलंत काय? उगाच ब्रिगेडी लेखन वाचून हवेत गोळ्या माराव्यात. मी असल्या चर्चांत कधीच भाग घेत नाही पण हल्ली हे खूपच जाणवते म्हणून लिहावेसे वाटले.

In reply to by प्रचेतस

उलट इथल्या काही लोकांना ब्राह्मणांबद्दल अंमळ अधिकच द्वेष दिसतोय असे वाटते >> ब्राह्मणेतर आहेतच कितीजण येथे? आणि त्यातले ब्राह्मणांबद्दल अधिक द्वेष उघडपणे+सतत व्यक्त करणारे किती? फारच नगण्य. त्याकडे दुर्लक्ष करता येणे फार अवघड नसावे.

In reply to by राही

ऐतिहासिक काळात पेडस्टलाचा १००% एरीया व्यापायची असल्याने पुरोगाम्यांना आता सगळीकडेच त्वेष नि आवेश दिसतो. अन्य विचारसरणींसाठी तुम्ही लोकांनी जी टोमणेखोरगीरी केली नि जितक्या निर्लज्जपणे केली ती उलट ऐकून घ्ययची सवय मात्र नव्हती. अचानक ऐकूनही घ्यावं लागत आहे इतकाच फरक आहे. त्यात फार त्वेष इ नाही. तशास तशी भाषा आहे.

In reply to by एमी

आरक्षणवाला एकही सरसकट सगळ्या जातींना क्रिमी लेयर लावा म्हणताना आढळत नाही. इतकेच नव्हे तर माझ्यासारखे जे आरक्षण असावे पण ते खरोखर गरजवंत ( मागासवर्गातिलच ) यानाच असावे असे म्हणतात त्यांनाही दुजोरा देताना आढळत नाहीत. (म्हणजे जर १० जागा मागासवर्गाला असतील तर त्यातील क्रिमी लेयरला वगळले तर मागासवर्गातीलच खऱ्या १० गरजवंतांना त्या जागा मिळून त्यांचा अंत्योदय होईल) आम्ही आता वर आलो आणि सरकारी जावई झालो तरी आम्हाला फायदे मिळालेच पाहिजेत मग आमच्या (मागास) वर्गातील खरे मागास लोक मागे राहिले तरी चालतील. हा शुद्ध दांभिकपणा मी गेली काही वर्षे इथल्या पुरोगामी किंवा तत्सम लोकांमध्ये पाहतो आहे. वाममार्गी लोकांना देश हि संकल्पनाच मान्य नाही त्यामुळे अशा लोकांच्या बद्दल बोलायची गरजच नाही.

In reply to by सुबोध खरे

सर, माझ्यामते सामाजिक मागासलेपणा साठी देण्यात येणारे आरक्षण व उत्पन्न आधारित क्रिमी लेयर याचा काही संबंध नाही. तुमच्या मताचा आदर आहे, पण मला मान्य नाही. मी तर तर म्हणतोय व बी सी साठी असणारी क्रिमी लेयर ची अट तर अनाकलनीय आहे. व ती तात्काळ रद्द व्हावी.

In reply to by पगला गजोधर

म्हणजे डॉ देवयानी खोब्रागडे ज्यांचे वडील आय ए एस अधिकारी आहेत (आणि त्यांनी बेस्ट मध्ये भरपूर माया केली अशी वदंता आहे) याना एम बी बी एस साठी आरक्षित सीट मिळाली आणि नंतर आय एफ एस साठी सुद्धा आरक्षण मिळाले हे तुम्हाला मान्य आहे म्हणा कि. जिचे वडील आय ए एस अधिकारी आहेत ती मागासलेली कशी? बरं मी असा अजिबात म्हणत नाही कि ती सीट खुली करा ती सीट मागासवर्गीयालाच द्या म्हणजे त्याच वर्गातील जो उमेदवार खरंच पीडित आहे त्याचा अंत्योदय होईल. मी जो दांभिकपणा म्हणतो तो हाच आहे. आता आम्ही सगळ्या सोयी घेऊन सरकारी जावई झालो तरी आमच्याच मुलाबाळांना आरक्षण उपलब्ध झालेच पाहिजे मग आमच्याच जातीतील खितपत पडलेले लोक खड्यात गेले तरी चालतील. मुखवटे काढले कि आतले खरे रूप बाहेर पडते ते असे.

In reply to by सुबोध खरे

जाता जाता -- क्रिमी लेयर फक्त इतर मागासवर्गीयांना आहे. (OBC) मागासवर्गीय (BC) ना नाही. तो सुद्धा ८ लाखापॆक्षा जास्त उत्पन्न असेल तर म्हणजेच महिना फक्त ६६ हजार म्हणजे फारच गरीब

In reply to by सुबोध खरे

"सामाजिक मागासलेपणासाठी देण्यात येणारे आरक्षण" व "अर्थउत्पन्न आधारित क्रिमीलेयर" याचा काही संबंध नाही.
व बी सी साठी असणारी क्रिमी लेयर ची अट तर अनाकलनीय आहे. व ती तात्काळ रद्द व्हावी.
टंकनचुक झाली, obc असेच म्हणायचे होते मला..

In reply to by पगला गजोधर

मग या खोब्रागडे ताई ना आरक्षण सामाजिक मागासलेपणासाठी दिलं होतं की कशासाठी? एक सोडून तीन वेळेस-- MBBS MD &IFS. बाकी त्यांनी आपल्या जातीच्याच एका लायक उमेदवार डॉक्टरला नेत्रतज्ञ होण्यापासून वंचित केलं याबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे प्रवेश तर घेतला आणि मध्येच सोडून विदेश सेवेत गेल्या आणि जागा फुकट गेली. वा रे सामाजिक मागासलेपण? नीच स्वार्थीपणा आणि दांभिकपणा आहे

In reply to by सुबोध खरे

सरसकट सगळ्या जातींना क्रिमी लेयर लावा म्हणताना आढळत नाही. >> हे मला मान्य आहे. पण सरसकट म्हणजे सरसकटच ie ओपन/खुल्या गटालापण क्रिमी लेयर हवी === मी माबोवर एक पर्याय सुचवला होता: • सगळ्यात आधी लिंग आधारित वाटा करा (स्त्रीयाना ५० आणि पुरुषांना ५०%), मग जात आधारित (ज्याची जेवढी लोकसंख्या असेल तेवढे) आणि मग त्यात परत आर्थिकवर्गानुसार वाटे करा ( ५ लाखपेक्षा कमी उत्पन्न असेलतर ५० आणि त्यापेक्षा जास्त असेलतर ५०%). • याखेरीज प्रत्येक जाती, धर्माला केवळ आपल्या समाजासाठी पूर्णपणे खाजगी शाळा कॉलेज काढू द्यावीत. ह्या खाजगीपणाची किंमत म्हणून सरकारने त्यांच्याकडून दरवर्षी ठराविक रक्कम घ्यावी आणि त्या पैशातून केवळ दलितसाठी शाळा कॉलेज काढाव्यात. === हा शुद्ध दांभिकपणा मी गेली काही वर्षे इथल्या पुरोगामी किंवा तत्सम लोकांमध्ये पाहतो आहे. वाममार्गी लोकांना देश हि संकल्पनाच मान्य नाही त्यामुळे अशा लोकांच्या बद्दल बोलायची गरजच नाही. >> इथे नक्की कोणकोण पुरोगामी, वाममार्गी वगैरे आहे याची यादी कुठे मिळेल का? मलातर एकही दिसत नाही :-P

In reply to by एमी

आपल्याला क्रिमी लेयरची संकल्पनाच समजलेली नाही आणि आपल्याला समानतेचीही संकल्पना समजलेली नाही. क्रिमी लेयर म्हणजे ज्यांना पगार ६६६६६/- रुपये महिना मिळतो अशा लोकांना मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या सवलती मिळणार नाहीत. याचा अर्थ असा नव्हे कि त्यांना खुल्या वर्गात प्रवेश घेता येणार नाही. खुल्या वर्गाला क्रिमी लेयर लावायचा म्हणजे काय करायचं? सगळ्यात आधी लिंग आधारित वाटा करा (स्त्रीयाना ५० आणि पुरुषांना ५०%) बाकी मुंबईच्या लोकल मध्ये महिलांना ६ डबे आणि पुरुषांना ६ डबे द्यायचे का? मग जर ४८ लाख पुरुष प्रवास करतात आणि १२ लाख महिला तर आपले हे "आरक्षण" मूर्खपणाचे आहेत एवढेच मी सांगू इच्छितो. या १२ लाख स्त्रियांना पुरुषांच्या डब्यात प्रवास करण्याची मुभा आहे शिवाय लेडीज स्पेशल गाड्या चालवतात. उद्या तुम्ही असेही म्हणाल कि आहे त्या पुरुषांना राजीनामा द्यायला लावा आणि त्यांच्या जागास्त्रीयानी भराव्या मग जात आधारित (ज्याची जेवढी लोकसंख्या असेल तेवढे) आणि मग त्यात परत आर्थिकवर्गानुसार वाटे करा ( ५ लाखपेक्षा कमी उत्पन्न असेलतर ५० आणि त्यापेक्षा जास्त असेलतर ५०%). • याखेरीज प्रत्येक जाती, धर्माला केवळ आपल्या समाजासाठी पूर्णपणे खाजगी शाळा कॉलेज काढू द्यावीत. ह्या खाजगीपणाची किंमत म्हणून सरकारने त्यांच्याकडून दरवर्षी ठराविक रक्कम घ्यावी आणि त्या पैशातून केवळ दलितसाठी शाळा कॉलेज काढाव्यात हे म्हणणारे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या मूलभूत विचाराच्या विरुद्ध असून सर्व जाती धर्मात भारत विभागून तुकडे करणाऱ्या "भारत तेरे टूकडे हो" वाल्यांची विचारसरणी दिसत आहे. आपल्या भंपक विचारसरणी बद्दल आपल्याला कोपरापासून नमस्कार.

In reply to by सुबोध खरे

क्रिमी लेअरची कन्सेप्ट लोकांना समजावून सांगण्याआधी , घटनेतील आरक्षणामागची कन्सेप्ट जाणून घेण्याची तसदी घ्या. आरक्षण व आर्थिक -उत्पन्न याचा संबंध लावणे, उचित नाही. या दोन भिन्न बाबी आहेत. जात, धर्म आणि लिंग हेच आरक्षणाचे निकष आहे. नरसिंहा राव सरकारने आर्थिक दुर्बलगटासाठी १० % आरक्षण ठेवण्याचा प्रयत्न केलेला पण न्यायालयाने, आर्थिक सद्य स्थितीवर दिलेले आरक्षण हे घटना विरोधी ठरवून रिजेक्ट केला.

In reply to by पगला गजोधर

आरक्षण व आर्थिक -उत्पन्न याचा संबंध लावणे, उचित नाही. वड्याचा तेल वांग्यावर काढू नका आर्थिक दुर्बलांना आरक्षण द्यायचे मी अजिबात म्हणत नाहीये. मागासवर्गीयातीलच मलाई खाणाऱ्या सरकारी जावयांना आरक्षणातून वगळून मागास्वर्गीयातीलच खऱ्या पददलितांना न्याय द्यायचं म्हणतोय मी . बाकी आपल्याही विचारसरणीतील "दांभिक"पणा "तरंगून वर" आलेला स्पष्ट दिसतोय

In reply to by सुबोध खरे

मागासवर्गीयातीलच मलाई खाणाऱ्या सरकारी जावयांना आरक्षणातून वगळून मागास्वर्गीयातीलच खऱ्या पददलितांना न्याय द्यायचं म्हणतोय मी .
And do you propose to measure "मलई खाणे" ? What is the basis to identify "खरे पददलित" ?

In reply to by पगला गजोधर

मलई खाणे वैगेरे म्हणणे चूक आहे. पण पददलित खालील पैकी सर्व अटी पूर्ण करत असावा. १. तो लिस्ट केलेल्या जाती नि उपजातीचाच असावा. २. तो ग्रामीण वा वनवासी असावा. (आरक्षणामुळे वा बिना आरक्षण शहरी क्षेत्रात गेलेल्या लोकांना आरक्षण देऊ नये.) ३. त्याकडे दरडोई क्ष हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसावे. (जमीनीचे मूल्य, उपजाउता आणि सध्या लागत करून असलेली उपजाऊता यांचे नियम लिहायला लागतील.) ४. त्याचे कोणत्याही साधनाने य प्रति वर्ष पेक्षा जास्त उत्पन्न नसावे. ५. त्याचे कोणतेही एक पालक क्लास १ वा क्लास २ अधिकारी नसावेत. ६. त्याची एकूण नेटवर्थ झ पेक्षा जास्त नसावी. ७. कोणतेही पालक विदेशात शिकलेले वा डॉक्टरेट नसावेत. ====================== याला खूप इलॅबोरेट करावं लागेल. बरेच उपनियम इ करावे लागतील. पण सर्वसाधारण पणे इतकं पुरेसं आहे. व्यक्तिगत नि कौटुंबिक स्तरावर कोणते किकष मोजायचे हे ठरवायला हवं.

In reply to by arunjoshi123

मला वाटलंच असा प्रतिसाद येईल, म्हणूनच मी वर लिहिलंय , पण परत एकदा देतो "आरक्षण" व "आर्थिक -उत्पन्न" याचा संबंध लावणे, उचित नाही. कारण या दोन भिन्न बाबी आहेत. घटनेनुसार जात, धर्म आणि लिंग हेच आरक्षणाचे निकष आहे. नरसिंहा राव सरकारने "आर्थिक" दुर्बलगटासाठी १० % आरक्षण ठेवण्याचा प्रयत्न केलेला, पण सर्वोच्च न्यायालयाने, "आर्थिक स्थितीवर" बेतलेले आरक्षण, हे घटना विरोधी ठरवून रिजेक्ट केला.
३. त्याकडे दरडोई क्ष हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसावे. (जमीनीचे मूल्य, उपजाउता आणि सध्या लागत करून असलेली उपजाऊता यांचे नियम लिहायला लागतील.) ४. त्याचे कोणत्याही साधनाने य प्रति वर्ष पेक्षा जास्त उत्पन्न नसावे. ५. त्याचे कोणतेही एक पालक क्लास १ वा क्लास २ अधिकारी नसावेत. ६. त्याची एकूण नेटवर्थ झ पेक्षा जास्त नसावी. ७. कोणतेही पालक विदेशात शिकलेले वा डॉक्टरेट नसावेत.
या मुद्द्यांचा व "सामाजिक मागासलेलेपणाचा: (सोशली बॅकवर्डपणा) काय संबंध आहे ? सामाजिक मागासलेलेपणा या पॅरामीटरवर मोजत नाही.