Skip to main content

कर्मा

कर्मा

Published on 23/12/2017 - 03:36 प्रकाशित
भारताबाहेर योगा नंतर कर्मा हा जास्तीत जास्त बोललेला, ऐकलेला आणि लिहिलेला शब्द असावा. कर्म ही संकल्पना आधुनिक विज्ञानाच्या कारण परिणाम (cause & effect) याच्याशी मिळती जुळती असल्याने एकंदरीतच बऱ्याच प्रमाणात कर्मा बद्दल भारताबाहेर स्वीकृती आणि औत्सुक्य आढळते. कुठलीही गोष्ट अथवा घटनेच्या मागे काहीतरी कारण असते म्हणजे आपोआप, अहेतुक कुठलीही गोष्ट घडत नाही असे हा सिद्धांत सांगतो. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये या सिद्धांताची प्रचिती येत असल्याने अभारतीयांना देखील हा कर्माचा सिद्धांत पटतो असे दिसते. लांबचे कशाला, मिपाकरांना हे पक्के माहिती आहे की जास्त गडबड केली की आयडी उडतो. कारण परिणामांचे आणखी समर्पक उदाहरण ते कुठले ! मराठी मध्ये करावे तसे भरावे किंवा पेराल ते उगवेल अश्या अर्थाच्या ज्या म्हणी आहेत त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या म्हणी भारता बाहेरील भाषेत देखील आढळतात. कर्मा बद्दल मला मुख्यत्वे दोन प्रश्न आहेत परंतु तत्पूर्वी कर्म म्हणजे काय ते बघू. कर्म म्हणजे प्रत्यक्ष केलेली कृती. हि कृती करायचं कारण काय? काहीतरी इच्छा मनी असते म्हणून. याचा अर्थ त्या कृतीसाठी त्यामागची इच्छा, भावना महत्वाची. या कर्माच्या विषयावर सर्वव्यापी यांचा धागा आहे. जिज्ञासूंनी तो जरूर पाहावा. कर्माचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत. प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण कर्म. प्रारब्ध हे गत जन्मीच्या कर्माप्रमाणे ठरते आणि या जन्मामध्ये त्याचे फळ अगोदरच मिळालेले असते, जे बदलता येत नाही. उदाहरणार्थ तुम्ही कोणत्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आहे, तुमचे लिंग काय आहे, तुमचे आई वडील, भावंडे कोण आहेत, तुम्ही भारतामध्ये, आफ्रिकेत कि मंगोलिया मध्ये जन्म घेतला आहे, तुमचे रंग-रूप, शारीरिक ठेवण अश्या अनेक गोष्टी. प्रारब्धामुळे मिळालेले फळ बदलता येत नाही, ते भोगूनच संपवावे लागते. संचित हे तुमचे जन्मोजन्मीचे साठलेले कर्म, सेव्हिंग बँक अकाउंट सारखे, परंतु ज्याचे अजून पूर्णतः फळ मिळालेले नाही असे. म्हणजे तुमच्या पूर्व कर्माप्रमाणे तुम्हाला मिळालेले गुण, दोष, प्रवृत्ती, कल, कौशल्य इत्यादी. संचित हे प्रयत्न आणि अभ्यासाने बदलता येते. आपल्या दोषांवर मात करता येते. त्यातील नकारात्मकता ही योग्य प्रशिक्षणातून बदलता येते किंवा एखादे कौशल्य सततच्या सरावाने मिळवता येते. म्हणजे संचित हे सॉफ्ट स्किल्स सारखे आहे. क्रियमाण कर्म म्हणजे तुम्ही आत्ता करत असलेले कर्म ज्याचे फळ तुम्हाला कालांतराने याच किंवा पुढच्या जन्मात मिळणार आहे. हे पूर्णतः तुमच्या हातात आहे. आत्ता चांगले कर्म करा म्हणजे त्याचे चांगले फळ मिळेल असे कर्माचा सिद्धांत सांगतो. क्रियमाण कर्माचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे इन्स्टंट कर्मा या नावाने असलेले यू ट्यूब वरचे असंख्य व्हीडिओज. कुठल्याही कृतीचा तात्काळ मिळणारा परिणाम म्हणजे इन्स्टंट कर्मा. याचा अर्थ कर्माच्या सिद्धांतातील फक्त एक त्रितीयांश भाग हा पूर्वनियोजित आणि अपरिवर्तनीय आहे मात्र उरलेला दोन त्रितीयांश भाग नक्कीच बदलता येतो आणि ते आपल्या हातात आहे. त्यामुळे "मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार" हे खरे आहे. तसेच वाल्याचे वाल्मिकी मध्ये झालेले रूपांतर तर प्रसिद्धच आहे. असे म्हणतात की कर्माचे पात्र हे खाली निमुळते होत जाणारे आणि तळाला छोटे छिद्र असणारे असते. वरून तुम्ही जे काही चांगले, वाईट कर्म त्या पात्रात भरता ते तळातील छिद्रामधून यथावकाश चांगल्या किंवा वाईट फळाच्या रुपात बाहेर पडते. म्हणूनच इन्स्टंट कर्मा वगळता इतर कर्माची फळे मिळायला उशीर होतो. हा कर्मवीपाकि सिद्धांत खरा मानला तर मला पडलेले दोन प्रश्न म्हणजे १) तुमच्या कर्मांचा रेकॉर्ड कोण ठेवतो? आणि २) त्या कर्माचे काय फळ द्यायचे हे कसे ठरते? अधिक विचार करता असे दिसते की हा सिद्धांत डेटा सेन्ट्रीक असावा. म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा डेटा गोळा केला जातो, त्याचे परीक्षण केले जाते आणि कुठल्याश्या अज्ञात नियमांप्रमाणे फळ काय मिळावे हे ठरते आणि पुढील काळात योग्य वेळी बरे वाईट फळ त्या कर्म करणाऱ्याला मिळते. आता जगातील सात अब्ज लोकांचा प्रत्येक क्षणाचा डेटा गोळा करायचा म्हणजे मोठे जगडव्याळ काम. या सर्वांवर कोण लक्ष ठेवणार. आणि प्रत्यक्ष कृती एक वेळ बघता येईल परंतु विचाराचे काय? तो तर दिसतही नाही. कोणाबद्दलही वाईट विचार देखील करू नका असे म्हणतात कारण कर्मवीपाकि सिद्धांताप्रमाणे विचारांचे देखील फळ मिळते. म्हणजे मामला आता जास्तच अवघड होतं चालला आहे. आणि त्यात आणखी भर म्हणजे हा सिद्धांत सांगतो प्रत्यक्ष फक्त कर्मच महत्वाचे आहे असे नाही तर त्या मागची भावना, उद्देश तितकाच किंबहुना जास्तच महत्वाचा. म्हणजे असे की एखाद्या अतिरेक्याला सर्वसामान्यांच्या सुरक्षतेसाठी पोलिसाने गोळी घातली आणि एखाद्या धनाढ्याला चोरीच्या उद्देशाने चोराने गोळी घातली तर दोघांची कृती एकाच प्रकारची मात्र उद्देश वेगवेगळे. म्हणजे एखादया कृती मागचा विचार देखील लक्षात घ्यायला हवा आणि मग त्याचे फळ ठरवायला हवे. हा सगळा क्षणाक्षणाचा डेटा जो गोळा केला जातो तो समजा त्या कर्म करणाऱ्यानेच केला आणि त्याच्याकडेच साठवला तर हे माहिती गोळा करायचे काम विभागले जाऊन थोडे सोप्पे होईल नाही का? असा एक प्रवाद आहे कि सर्व सामान्य माणूस मेंदूच्या एकूण क्षमतेपैकी फार तर फक्त १०% च वापर करतो (अर्थात या वर बरीच भवती न भवती आहे. अजून मेंदूचे पूर्ण स्वरूप आपल्याला कोठे कळले आहे?). असे असेल तर निसर्गाने मानवाला इतकी अतिरिक्त क्षमता का दिली आहे? निसर्गामध्ये खरेतर कार्यक्षमता (efficiency) आणि काँसर्व्हेशन ऑफ एनर्जीला अत्युच्य महत्व आहे. एकदा उपयुक्तता संपली की झाड देखील पानाला पोसत नाही, तात्काळ त्याग करते. त्यातच मेंदू हा शरीरातील सर्वात जास्त ऊर्जा खाणारा अवयव आहे. तेव्हा इतकी अतिरिक्त क्षमता देऊन त्याच्या साठी इतकी ऊर्जा खर्च करायचं कारण काय असावे बरे? आणि जर या ९०% भागाचा वापरच नसेल तर उत्क्रांतीमध्ये टिकून कसा राहिला? माणसाने ज्या प्रमाणे माकडापासून उत्क्रांत होताना शेपटीचा त्याग केला (अर्थात काही जणांच्या शेपट्या अजूनही गळून पडलेल्या नाहीत हा भाग अलाहिदा) त्याप्रमाणे मेंदूचा अतिरिक्त भाग कमी का नाही झाला? मेंदूला इतकी अतिरिक्त क्षमता देण्यामागे निसर्गाची काय योजना असेल? की हे टेन परसेन्ट मिथ आहे? या मुंडेन, सांसारिक जगात जगण्यासाठी लागणाऱ्या क्षमतेनंतरची मेंदूची उर्वरित क्षमता अध्यात्मिक उन्नती साठी राखीव असेल काय? किंवा काही शास्त्रांज्ञांच्या विचारधारेनुसार कर्माच्या सिद्धन्ताप्रमाणे कर्मफल ठरवण्यासाठी प्रत्येक क्षणाचा डेटा पंचेंद्रियांमार्फत आपला मेंदू गोळा करत असेल काय? म्हणजे जन्मल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत हा मेंदू हाय डेफिनेशन व्हिडीओ शूट करत असतो का? आपण ज्या गोष्टी बघतो, अनुभवतो, ज्या गोष्टीकडे आपले लक्ष्य असते, आपण जे बोलतो, ऐकतो, करतो त्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडीओ मध्ये रेकॉर्ड होतात का? फक्त एव्हढेच नाही तर त्या वेळेची तुमची भावना, आनंद, द्वेष, राग इत्यादी, तसेच स्पर्श, स्वाद, वास (पंचेंद्रियांकडून मिळालेले सगळे स्टीम्युलस) देखील रेकॉर्ड होतात, म्हणजे हा केवळ हाय डेफिनेशन व्हिडीओ नाही तर मल्टाय डायमेंशनल व्हिडीओ आहे? आणि मेंदूकडे ३०० वर्षांची माहिती साठवायची क्षमता आहे असा प्रवाद आहे. या उप्पर हि माहिती मेंदूला झिप (कॉम्प्रेस) करता येत असेल का? अन्यथा चांगदेव हार्ड डिस्क कपॅसिटी फुल एरर येऊन १४०० वर्षे न जगते. हा डेटा क्षणाक्षणाला गोळा केला जातो त्याची साठवण आणि त्याचा प्रोसेसर हा उरलेल्या ९०% मध्ये दडलेला असेल काय? तो या गोळा केलेल्या माहितीची छाननी करून त्या प्रमाणे फळ देत असेल काय? हे जर खरे असेल आणि पुढे हा डेटा ऍक्सेस करायचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले तर भूतकाळात डोकावणे सहज शक्य होईल का? तसेही या जगातील फक्त चार टक्केच गोष्टी इंद्रिय गोचर आहेत. आणि या चार टक्क्यांपैकी आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी कदाचित पृथ्वीवरच्या सगळ्या पाण्यांपैकी एका थेंबा एव्हढ्या असाव्यात. मग एव्हढा हा अज्ञानी मानव, मी म्हणतो तेच खरे असे यंव आणि त्यंव बाता का करतो? मनुष्याच्या मृत्यू समयी त्याला त्याच्या सर्व कर्माचे फळ मिळणे तर शक्य नाही मग या उरलेल्या कर्माचे काय होते? असे म्हणतात की मृत्यू समयी, त्या क्षणी, माणसाला त्याचे संपूर्ण आयुष्य पुन्हा दिसते म्हणजे हा जो आयुष्यभर रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओचा डेटा आहे तो त्या क्षणी मेंदूमधून कुठेतरी दुसरीकडे ट्रान्स्फर होतो? हा जो कोणी दुसरीकडे आहे तो या सर्व डेटाच ऍनालिसिस करून ज्या कर्माचे अजून फळ मिळालेले नाही अश्या उरलेल्या कर्माच्या फळा प्रमाणे तुमचे प्रारब्ध ठरवतो? म्हणजे तुम्ही तुमच्या कर्माप्रमाणे आई वडील शोधून काढता व पुन्हा जन्म घेता (हे म्हणजे जेनेटिक्सच्या विरुद्ध झाले). आणि मी परत एकदा या जगात आलो म्हणून जन्म झाल्यावर रडता. हा भाग मिपाकरांच्या परिचयाचा असावा. म्हणजे एखादा आयडी उडाला तर पुनरपि नवीन आयडी शोधनम सारखेच झाले की! डू आयडी घेऊन येणारे कितीही प्रयत्न केला तरी आधीच्या आभासी जगातले ट्रेटस घेऊन येतातच. हा कदाचित त्यांच्या आंतरजालीय प्रारब्ध कर्माचा भाग असावा. इतरत्र तुम्ही मला शरण आलात किंवा कन्फेशन दिले की तुम्हाला सर्व गुन्हे माफ अशा सोप्प्या मार्गाचे आमिष असते, इथे मात्र कर्म फल भोगल्याशिवाय सुटका नाही. सर्व भोग हे भोगूनच संपवायचे त्याला पर्याय नाही असे संकेत आहेत. कुठलाही मसीहा, प्रॉफेट, देवाचा पुत्रादि तुमच्या मदतीला येणार नाहीत, तू केलेस त्याचे फळ तूच भोगायचे आहे. आणि जर हे या जन्मात शक्य नसेल तर पुन्हा इथे येऊनच भोगायचे किंवा फेडायचे आहे, नो इझी राईड टू एनिबडी. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फळाची अपेक्षा न करता तुम्ही फक्त कर्म करा अशी शिकवण. म्हणजे तुमच्या कर्माचे फळ जरी मिळणार असले तरी तुम्हाला अपेक्षित आहे तसे मिळेलच याची खात्री नाही आणि केव्हा, कश्या रुपात मिळेल याचीही कल्पना नाही. कर्म करणेच फक्त तुझ्या हातात आहे. ते तू निर्हेतुक करत रहा असा संदेश कश्यासाठी? कर्मविपाकी सिद्धांताचा एकंदरीत असा गडबडगुंडा आहे. मिपातील या विषयाचे जाणकार या लेखातील असंख्य प्रश्नांवर वर मतप्रदर्शन / मार्गदर्शन करतील काय? मागे एकदा एका जेष्ठ मिपा सदस्याने मिपावर तरायंचं असेल तर छद्मीपणा करता यायला हवा असा सल्ला दिला होता तदनुसार मी एका प्रतिसादामध्ये या विषयावर मिपा मधले दीडग्ज सॉरी दिग्गज तज्ञ पिंकतीलच असा उल्लेख केला होता. परंतु तेव्हा दुसऱ्या एका जेष्ठ सदस्याने असा छद्मी प्रतिसाद दिल्या बद्दल सात्विक संताप व्यक्त केला होता (इन्स्टंट कर्माचे उदाहरण =)) म्हणून मत प्रदर्शनांची अपेक्षा. या लेखाच्या क्रियमाण कर्माचे इन्स्टंट कर्माप्रमाणे तात्काळ फळ मिळेल कि ते संचित कर्मात जमा होईल? हि जिलबी पाडल्या बद्दल "हाय रे माझ्या कर्मा" म्हणायची वेळ येऊ नये हीच मिपा चरणी प्रार्थना.

याद्या 10790
प्रतिक्रिया 37
अर्रर्र, दोन जिलब्या पडल्या वाटते. इन्स्टंट कर्माचे उदाहरण, दुसरे काय. संपादक महोदय, कृपया एक धागा उडवा.

अत्यंत मस्त लेख आहे . सगळे मुद्दे अगदी बरोबर . फक्त शेवटी एक बदल सुचवावासा वाटतो . तो असा कि कर्म भोगुनच संपवायची असे काही नाही . पूर्वपापाचा अत्यंत मनापासून पश्चात्ताप झाला तर ईश्वर कृपेने , गुरु कृपेने कर्मभोग जाळून नष्ट करता येतात . म्हणजे असं बघा कि वाल्याने जी महाभयंकर पापं केली होती त्याची अत्यंत भयंकर फळे त्याला भोगावी लागली असती . पण सत्याची जाणीव झाल्यानंतर त्याला अत्यंत पश्चात्ताप झाला आणि राम नाम साधनेने त्याने आपली कर्मे जाळून टाकली .

In reply to by तुडतुडी

>>> पूर्वपापाचा अत्यंत मनापासून पश्चात्ताप झाला तर ईश्वर कृपेने , गुरु कृपेने कर्मभोग जाळून नष्ट करता येतात तुडतुडी जी, म्हणजे कर्मभोग जाळून नष्ट करण्याची एखादी एक्सेलरेटेड, फास्ट ट्रॅक प्रोसेस असावी असे वाटते. आपल्या तुकाराम बोवांनी निसंदिग्ध शब्दात सांगून ठेवलेय या तुकारामाला पुनर्जन्म नाही. भक्ती मार्ग हा संचित कर्म शून्य करण्याचा सर्व सामान्यांसाठी उपलब्ध असलेला एक फास्ट ट्रॅक असावा काय? अन्यथा कर्म फलापासून सुटका नाहीच.

माहितीपूर्ण लेख! कर्मामुळे बरे वाईट फळ मिळत नाही, कर्मामागील हेतूमुळे फळ मिळते. प्रत्येक कर्माचे (हेतूचे) फळ भविष्यात मिळतेच.

In reply to by श्रीगुरुजी

कर्मामुळे बरे वाईट फळ मिळत नाही, कर्मामागील हेतूमुळे फळ मिळते.
हे समजले नाही. इतिहासातील अनेक क्रूरकर्म्यांनी जी कृत्ये केली त्यामागे 'आपला हेतू चांगलाच आहे' असे कन्व्हिक्शन त्यांच्याकडे होतेच. हिटलरने लाखो लोकांना मारले त्यामागेही आपला हेतू चांगलाच आहे असेच त्याला वाटत होते. त्याचप्रमाणे भारतीय घराघरात असलेले हिटलर (हुकुमशाही वृत्तीचे पालक) त्यांच्या पाल्यांच्या आत्मविश्वासाची वाट लावतात त्यामागेही 'आपल्या पाल्याचे चांगले व्हावे' असाच हेतू आपला आहे याची त्यांची अगदी १००% नाही १०००% खात्री असते. तरी अशा घरातल्या हिटलरांमुळे अनेक पाल्यांच्या आयुष्याचे नुकसान व्हायचे ते होतेच. मग अशा मोठ्या आणि लहान हिटलरांना चांगलेच फळ मिळायला हवे.

In reply to by गॅरी ट्रुमन

इतिहासातील अनेक क्रूरकर्म्यांनी जी कृत्ये केली त्यामागे 'आपला हेतू चांगलाच आहे' असे कन्व्हिक्शन त्यांच्याकडे होतेच. हिटलरने लाखो लोकांना मारले त्यामागेही आपला हेतू चांगलाच आहे असेच त्याला वाटत होते. हे जगाला सांगण्याचे कन्व्हिक्शन असू शकते. अंतर्गत हेतू प्रत्यक्षात वेगळाच असू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या विद्यापीठाचे मूळ नाव बदलून नवीन नाव देताना जगाला सांगायला "दुर्बल घटकांना न्याय, विद्वत्तेचा सन्मान, समाजसेवेबद्दलची कृतज्ञता" इ. हेतू सांगता येतात, परंतु अंतर्गत हेतू हा आपल्याला त्या विशिष्ट जमातीची मते मिळावीत हा असू शकतो किंवा देवासमोर कोंबडे, बकरे कापताना देवाला नैवेद्य, कुर्बानी इ. जाहीर हेतू सांगितले गेले तरी प्रत्यक्षात आपल्याला मांस खायला मिळावे हाच हेतू असू शकतो. मनातील हेतू व दाखवण्यात येत असलेला हेतू हे कायम समान असतीलच असे नाही. त्याचप्रमाणे भारतीय घराघरात असलेले हिटलर (हुकुमशाही वृत्तीचे पालक) त्यांच्या पाल्यांच्या आत्मविश्वासाची वाट लावतात त्यामागेही 'आपल्या पाल्याचे चांगले व्हावे' असाच हेतू आपला आहे याची त्यांची अगदी १००% नाही १०००% खात्री असते. तरी अशा घरातल्या हिटलरांमुळे अनेक पाल्यांच्या आयुष्याचे नुकसान व्हायचे ते होतेच. कोणतेही पालक कधीही आपल्या मुलाचे अहित करीत/चिंतित नाहीत असे माझे मत आहे. आपल्या मुलाला एखाद्या विशिष्ट मार्गावर नेण्यामागे त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव, भोवतालची परिस्थिती, ते स्वतः ज्या परिस्थितीत वाढले होते त्याचा प्रभाव अशा अनेक गोष्टी असतात. मुलाला चित्रकलेची किंवा गायनाची आवड असली तरी त्याला अभियांत्रिकी शाखेकडे पाठविणे यामागे अशीच कारणे असू शकतात. त्यांच्या निर्णयामुळे कदाचित मुलांचे व्यावसायिक नुकसानही होऊ शकते किंवा फायदाही होऊ शकतो, परंतु मुलाचे अहित करावे असा हेतू कधीही त्यामागे नसतात. शेवटी प्रत्येकाला त्याच्या/तिच्या कृतीमागच्या हेतूनुसार बरीवाईट फळे मिळतातच.

In reply to by श्रीगुरुजी

हा प्रकार अजिबात पटला नाही.
मनातील हेतू व दाखवण्यात येत असलेला हेतू हे कायम समान असतीलच असे नाही.
जपानमध्ये ओम शिनरी क्यो नावाचा एक पंथ होता. त्या पंथाच्या लोकांनी टोकियोमध्ये ट्रेनमध्ये विषारी वायू सोडून १०-१२ लोकांना ठार मारले होते. असे केल्याने त्या लोकांचे कल्याण होईल अशीच त्या पंथाच्या अनुयायांची पक्की खात्री होती. किंबहुना त्यांचे कल्याण व्हावे म्हणूनच आपण हे कृत्य करत आहोत असे त्यांना वाटत होते. म्हणजे हा हेतू त्यांच्या मते चांगलाच होता. म्हणजे मनातील हेतू आणि दाखविण्यात येणारा हेतू हे समान असतील तर माणसाला ठार मारायच्या भयानक प्रकाराचेही दुष्कर्म लागायला नको. ही गोष्ट काही हजम झाली नाही.
त्यांच्या निर्णयामुळे कदाचित मुलांचे व्यावसायिक नुकसानही होऊ शकते किंवा फायदाही होऊ शकतो, परंतु मुलाचे अहित करावे असा हेतू कधीही त्यामागे नसतात.
आता दुसरे उदाहरण बघू. रस्त्यावरून गाडी चालवताना कोणी पादचार्‍याच्या अंगावर गाडी घातली आणि त्याला जखमी केले/ ठार मारले तरीही त्या माणसाला काही इजा पोहोचवायचा मुळात हेतू नसल्यामुळे त्याचेही दुष्कर्म लागायला नको, नाही का?

In reply to by गॅरी ट्रुमन

+१११११ अगदी हेच म्हणणार होतो. ओम शिनरी क्यो ची आठवण करुन देणारी कहाणी पिपल्स टेम्पल या पंथाच्या जीम जोन्सची ३०० मुलांचा खुन व ९०० शिष्यांची सामुदायिक आत्महत्या हे चक्रावून सोडणारे प्रकरण वाचल्याचे आठवते. यावर मी एक मराठी कादंबरी (बहुधा अनुवाद) वाचली होती. जीम जोन्सची कहाणी सामुदायिक आत्महत्या

In reply to by गॅरी ट्रुमन

जपानमध्ये ओम शिनरी क्यो नावाचा एक पंथ होता. त्या पंथाच्या लोकांनी टोकियोमध्ये ट्रेनमध्ये विषारी वायू सोडून १०-१२ लोकांना ठार मारले होते. असे केल्याने त्या लोकांचे कल्याण होईल अशीच त्या पंथाच्या अनुयायांची पक्की खात्री होती. किंबहुना त्यांचे कल्याण व्हावे म्हणूनच आपण हे कृत्य करत आहोत असे त्यांना वाटत होते. म्हणजे हा हेतू त्यांच्या मते चांगलाच होता. म्हणजे मनातील हेतू आणि दाखविण्यात येणारा हेतू हे समान असतील तर माणसाला ठार मारायच्या भयानक प्रकाराचेही दुष्कर्म लागायला नको. मनातील मूळ हेतू त्यांनी खरोखर उघड केला असेलच असे नाही. पकडले गेल्यानंतर कायद्याच्या कचाट्यातून सुटावे किंवा आपण मनोरूग्ण असल्याचे भासवून कमीतकमी शिक्षा व्हावी हा हेतू असे सांगण्यामागे असू शकतो. एखाद्या कृतीमागील खरा हेतू त्या व्यक्तीलाच माहिती असू शकतो. सांगितला जाणारा हेतू आणि प्रत्यक्षातील हेतू वेगळा असू शकतो. आता दुसरे उदाहरण बघू. रस्त्यावरून गाडी चालवताना कोणी पादचार्‍याच्या अंगावर गाडी घातली आणि त्याला जखमी केले/ ठार मारले तरीही त्या माणसाला काही इजा पोहोचवायचा मुळात हेतू नसल्यामुळे त्याचेही दुष्कर्म लागायला नको, नाही का? नक्की कोणत्या कारणामुळे पादचार्‍याच्या अंगावर गाडी गेली या कारणावर पुढील गोष्टी अवलंबून असतील.

माझ्या गुरुदेवांनी अतिशय सोप्या शब्दांत "कर्म" ह्या चा अर्थ सांगितलं होता. पाश्चात्य देशांनी ह्या शब्दांना विपर्यस्त केला आहे. "Actions Have Consequences" हा "कर्म" संकल्पनेचा मूळ अर्थ आहे. ह्यांत अगम्य असे काहीच नाही. अर्थ सोपा वाटला तरी विज्ञानाच्या अनेक शाखांनी विविध दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला आहे. "All Progress is result of human action but not planning" - Adam Ferguson ह्या शब्दात संपूर्ण मानवजातीच्या प्रगतीचे गूढ लपलेले आहे.

In reply to by साहना

Actions Have Consequences साहना जी, हे तर खरे आहेच परंतु खोलवर विचार करता एकाच action चे दोन वेगवेगळे consequences असू शकतात का हा खरा प्रश्न आहे.

लेख आवडला आणि त्यातही, आणि मी परत एकदा या जगात आलो म्हणून जन्म झाल्यावर रडता. हे वाक्य सर्वात आवडले. जगातल्या एका तरी रहस्याचा उलगडा झाला.

The game of life is a game of boomerangs. Our thoughts, deeds and words return to us sooner or later with astounding accuracy. - by unknown

मला वाटलं होतं कर्मा नावाच्या मास्टर पीस वर लेख आहे. वाचून निराशा झाली. ह. घ्या.

In reply to by चामुंडराय

:-))) कट्ट्यावर छाट्छूट गप्पा मारणार्‍या आमच्या सारख्या बंडु-गुंडूं साठी ह्यो इषय लय जड वो ! आमाला आप्लं पिक्चरच आठव्त्यात बगा.

In reply to by चामुंडराय

हा ... बरोबर पिच्चरच ! स्वॉरी, टायपो मिश्टेकचुक झाली :-( मागं टेम्परवारी अन ट्रॉफिक या शब्दांचा चुकीचाआह उच्चार केल्या बद्दल कट्टर मराठी भाषा प्रेमीनं झापलं होतं त्याची याद आली :-)

In reply to by अभिदेश

>>> कर्मा नावाच्या मास्टर पीस वर लेख आहे. कर्मा नावाचा मास्टर पीस काय आहे हे तर कळू देत म्हणजे ह-घ्या-कि-ना-हे-ठ.

१) तुमच्या कर्मांचा रेकॉर्ड कोण ठेवतो?
ऋग्वेदानुसार वरूण ही देवता हे काम करते. बाकी, लेख आवडला. प्रारब्ध ही संकल्पना आपल्या अधोगतीला बर्‍याच अंशी जबाबदार आहे असे माझे वैयक्तिक मत.

In reply to by पुंबा

पुम्बा साहेब, लोकसत्ता मधील लेख वाचला. फारसे काही हाती लागले नाही. उलट वाचून गोंधळच उडाला. मला असे वाटते कि कोणा एका देवतेला हे काम देण्यापेक्षा, प्रत्यक्ष मेंदूलाच हे डेटा कलेक्शनचे काम दिले असावे आणि भविष्यात आधुनिक विज्ञानाच्या मार्फत याचा उलगडा होईल असे वाटते आणि तोपर्यंत तरी DSLR व्हिडीओ कॅमेऱ्याला पर्याय नाही :)

कर्मामुळे बरे वाईट फळ मिळत नाही, कर्मामागील हेतूमुळे फळ मिळते. माझ्या मते अत्यंत सोपं उदाहरण मांसाहाराचे होऊ शकतं. म्हणजे वाघ प्राण्याला मारून खातो ते केवळ त्याची भूक भागवण्यासाठी . पॉट भरलेले असल्यास जवळ असणाऱ्या हरणाच्या पाडसाकडे ढुंकूनही पाहत नाही . इथे हत्येचा हेतू अत्यंत नैसर्गिक आहे . माणसे मांसाहार करतात ती जिभेचे चोचले पुरवण्यासाठी . इथे हत्येचा हेतू अत्यंत अनैसर्गिक आहे . कर्म एकच. हत्या . पण हेतू वेगवेगळा . त्यामुळे मांसाहाराचे कर्म हा वाघासाठी धर्म आहे तर आपल्यासाठी हेच कर्म अधर्म होते . दुसरं उदाहरण लुटालुटीसाठी , विनाकारण लोकांना त्रास देण्यासाठी केलेली हत्या आणि मातृभूमीच्या , लोकांच्या रक्षणासाठी अथवा स्वसंरक्षणासाठी केलेली हत्या . दोघांचे कर्म एकच . पण हेतू वेगळा . त्यामुळे दोघांची कर्मफळे वेगळी . तुमच्या कर्मांचा रेकॉर्ड कोण ठेवतो. हि सगळी कर्मे आपल्याच unconcious माईंड मध्ये रेकॉर्ड होतात . आणि जन्मोजन्मी आपल्याच सोबत येतात . असा रेफेरन्स काही पुस्तकांतून मिळाला आहे

In reply to by तुडतुडी

>>> हि सगळी कर्मे आपल्याच unconscious माईंड मध्ये रेकॉर्ड होतात. आणि जन्मोजन्मी आपल्याच सोबत येतात. असा रेफेरन्स काही पुस्तकांतून मिळाला आहे तुडतुडी जी, मलाही अगदी हाच प्रश्न पडलेला आहे. मेंदू या सगळ्या कर्माचा डेटा पंचेंद्रियांमार्फत गोळा करतो का? आणि मृत्यू समयी हा सगळा डेटा दुसरीकडे कोठेतरी ट्रान्स्फर होतो का? तुम्हाला ज्या पुस्तकांमधून हा रेफरन्स मिळाला आहे त्या पुस्तकांची माहिती मिळेल काय?

In reply to by तुडतुडी

माणसे मांसाहार करतात ती जिभेचे चोचले पुरवण्यासाठी . इथे हत्येचा हेतू अत्यंत अनैसर्गिक आहे . जिभेचे चोचले पुरवणे हे अनैसर्गिक कसे? हे कोणी ठरवले? ती सुध्दा एक नैसर्गिक प्रेरणाच आहे ना? मग वाघ करतो ते बरोबर आणि माणुस करतो ते चूक असे कसे? (कोणती गोष्ट चूक अणि कोणती बरोबर हे कसे ठरवायचे हे न समजलेला.) पैजारबुवा,

आणि मेंदूकडे ३०० वर्षांची माहिती साठवायची क्षमता आहे असा प्रवाद आहे.
३०० काय ४०० वर्षे असेल. अलिकडेच बाबा रामदेवचं एक विधान वाचलं की मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी आहे. मला वाटतं मेंदूच्या क्षमतेवरुनच त्यांनी हे म्हंटलं असेल :)

अलिकडेच बाबा रामदेवचं एक विधान वाचलं की मानवी शरीर हे ४०० वर्षे जगण्यासाठी आहे. दुसरं तिसरं कशाला, खुद्द रामदेवबाबा ३०० वर्षांचे आहेत, असं ऐकलं आहे.

मक आणि तिम्मा शेठ, तसं नाहीय्ये. रादे बाबांचं म्हणणं असं आहे कि तुम्ही जर योग केला तर तुमचं ३०० वर्षांचं आयुष्य ४०० वर्षांपर्यंत वाढवू शकता. मात्र त्या कायप्पा फॉरवर्ड मधला वृद्ध जेव्हा ९० व्या वर्षी स्वर्गात पोहोचतो आणि तिथल्या अप्सरा बघून म्हणतो उगीच त्या रादे बाबाच्या नादी लागलो नाहीतर ३० वर्षे आधीच इथे आलो असतो त्याप्रमाणे ४०० वर्षातले ३५० वर्षे वृद्ध होऊन जगायचं कि नाही हे तुमचे तुम्हीच ठरवा.

*न मे कर्म फले स्पृहा:* कर्म करा. फलेच्छा धरू नका कारण फलेच्छा ही कर्माचे पाप आणि पुण्य असे स्वमनातच वर्गीकरण करते आणि तिथूनच हा पेंड्युलम सुरू होतो. चोराला चोरी करताना आपण पाप करीत आहोत हे मनात येते व नोंद होते. परंतु कावळा पोळीचा तुकडा उचलून नेतो त्याला चोरी ही कन्सेप्ट माहीत नसल्यामुळे पापाची नोंद होत नाही. माणूस मटण खाताना त्याच्या मनात बोकड हत्येचे पाप डोकावते आणि नोंद होते. वाघ क्रूरतेनी शेळी मारतो पण ते पाप आहे असे त्याला वाटत नाही तर ती जीवनपद्धती म्हणून तो करतो. पाप पुण्याचा काऊंटर आपल्याच मनात बसवलेला आहे आणि प्रायश्चित्त घेऊन तो अॅडजस्ट होतो असेही आपल्यालाच वाटते आणि हे सर्व फलेच्छेतून येते जी अपरिहार्य आहे. निर्ढावलेले लोक सुखी असतात त्याचे हेच कारण असू शकते. निर्लज्जं सदा सुखी.

>>> चोराला चोरी करताना आपण पाप करीत आहोत हे मनात येते व नोंद होते. >>> माणूस मटण खाताना त्याच्या मनात बोकड हत्येचे पाप डोकावते आणि नोंद होते. केअशु जी, प्रश्न असा आहे हि नोंद कुठे होते? ती नोंद किती काळ टिकते? त्या माहितीचे विश्लेषण कोण आणि कसे करतो? आणि त्याचे फळ कसे मिळते? निर्लज्जं सदा सुखी हे तर खरेच आणि आत्ता जरी ते खुश दिसत असले तरी त्यांना देखील कर्माचे फळ मिळणारच. त्यापासून सुटका नाही किंबहुना कोणाचीच नाही.