मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुसरा बाजीराव: २११६

संदीप डांगे · · काथ्याकूट
गेल्या आठवड्यात झालेल्या गडकरी पुतळा प्रकरणी बरीच चर्चा, धूमधाम झाली. गडकर्‍यांनी संभाजीमहाराजांचे जाणिवपूर्वक चारित्र्यहनन केल्याचा पुतळेउखाडसमितीचा आरोप आहे. पुतळाबचावसमितीचा खुलासा असा की तात्कालिक उपलब्ध किंवा ऐकिव माहितीमधे ज्या पद्धतीची प्रतिमा शंभू राजांची होती त्याचा कल्पनाविलास करुन गडकर्‍यांनी नाटक लिहिले. आता शंभर वर्षांनी बरीच संशोधने होऊन महाराजांचे चारित्र्य जसे पूर्वी सांगितले जात होते तसे नव्हते हे समोर आले आहे. तो काही कपटी लोकांनी त्यांच्यावर राग धरुन मुद्दाम केलेला बनाव होता असे समजले जाते. इथवर मी काथ्याकूटाची पार्श्वभूमी म्हणून सदर गडकरी-संभाजी प्रकरण घेतले आहे. पुढे वाचतांना कृपया कोणताही गैरसमज करुन घेऊ नये. आता मला असा प्रश्न पडलाय की आता सांप्रत काळात ज्या ज्या ऐतिहासिक व्यक्तिंबद्दल नकारात्मक लेखन झालेले आहे, होत आहे, किंवा होणार आहे, अशा ऐतिहासिक व्यक्तिंबद्दल पुढे शंभर वर्षांनी काही पुरावे आले की बुवा हे लोक निष्कलंक होते आणि भलत्याच गैरसमजामुळे ह्यांची आजवर मानहानी होत आली, तर या परिस्थितीचे आकलन कसे करावे? उदाहरणार्थः दुसरे बाजीराव पेशवे, ह्यांनी पेशवाई बुडवली असे सामान्यपणे समजले जाते, इतिहासअभ्यासक व तज्ञांची काही वेगळी सुधारित मते त्यांच्या अभ्यासानुसार असू शकतात. तर समजा शंभर वर्षांनी काही पुरावे-कागदे मिळाली ज्यांने असे सिद्ध झाले की दुसरे बाजीराव हेही पहिल्या बाजीरावासारखे आक्रमक, दमदार होते, त्यांनी अमुक ह्या कारणामुळे राज्य सोडले किंवा जे काही ते. तर आतापर्यंत कोणत्याही साहित्यात त्यांचे काही पात्र रंगवलेले असल्यास काय करावे? म्हणजे आताच २०१७ मधे काय करावे? २११६ पर्यंत समजा हे कलंक मिटवणारे कागद मिळतील असे समजून. अगदी औरंगजेब, अफझलखान इत्यादींबद्दलही पूर्ण संशोधन झाले असून आता परिस्थिती १८० अंशात फिरवणारे कोणतेही पुरावे पुढे येणार नाहीत असे समजावे काय? ------------------------------------------------------------ अजून काही प्रश्नः इतिहासात 'व्हिलन पात्रे' बरीच आहेत. ऐतिहासिक व्यक्ति न म्हणता मी व्हिलन पात्रे म्हणत आहे. कारण सामान्य जनता इतिहासाकडे चित्रपटाची, कादंबरीची कथा व ऐतिहासिक व्यक्तिंना हिरो-विरुद्ध-व्हिलन अशा अ‍ॅन्गलने पाहते तेही आजचे संदर्भ लावून. अशाच समजूतींमुळे जाती-जातींत चारशे वर्षांआधी घडून गेलेल्या अशा घटनांच्या बद्दल असलेल्या भावनिक आवेगामुळे अनेक वाद घडतात. हे घडतच राहतील. यावर उपाय काय करावा? जेव्हा मी बी.ए. ला इतिहास विषय घेतला त्याच्या दुसर्‍या वर्षाला मराठा साम्राज्य अभ्यासाला होते, त्यावेळेला म्हणजे सन २००० साली वयाच्या वीसाव्या वर्षी मला संभाजींविरुद्ध झालेल्या बदनामीच्या कटाची माहिती मिळाली. तोवर संभाजी महाराज गडकर्‍यांच्या लेखनात दिसल्याप्रमाणेच माहित होते. खरोखर हे प्रकरण २००० सालाच्या आसपास निकालात निघाले का? जर हे खूप आधी निघाले तर जनसामान्यांना ह्या संशोधनांची स्पष्ट आणि जाहीर माहिती का मिळत नव्हती? शालेय अभ्यासक्रमात वीस वर्षांआधी मी जे शिकलो ते बदलल्याचे मला मोठे झाल्यावर कळले. हे शालेय अभ्यासक्रम आता अद्ययावत, खरा व अभिनिवेशशून्य इतिहास शिकवतात काय की अजूनही वीस वर्षांआधीचा मसाला चालू आहे.? माझ्यामते इतिहासाकडे बघण्याची, इतिहास शिकण्याची, त्याबद्दल चर्चा करण्याची एकूण पद्धतच आमूलाग्र बदलणे आवश्यक आहे. ही एक मोठी जबाबदारी आपल्या पिढीवर आलेली आहे. ही पद्धत कशी विकसित करता येईल ह्याबद्दल चर्चा अपेक्षित आहे.

वाचने 11060 वाचनखूण प्रतिक्रिया 44

वरुण मोहिते 08/01/2017 - 16:35
आजवर पहिल्या बाजीराव पेशव्यांना आणि माधवराव पेशव्यांना कधी टीका नाही झाली . पहिल्या बाजीरावांबद्दल कोणी टीका केली हे माहित आहे सगळ्यांना . आजवर माधवरावांवर टीका झाली नाहीये .पानिपत आणि विश्वासराव किंवा सदाशिव भाऊ किंवा राघोबा दादा हा वेगळा विषय आहे . आता विषय दुसऱ्या बाजीरावांचा नुसता साम्राज्य गेलं म्हणून अनेक आरोप झाले पण तितकेही ते जेवढा निषेध केला तसे नव्हते . त्यावेळची परिस्थिती वेगळी होती पण लोकांना बोलायला कारण लागत नाही

In reply to by हेमंत लाटकर

काय खोटं बोलताय लाटकर, त्यांनी मेल्यावर स्वतःच्या पत्नीला चितेवर जाळून नाही का मारलं आणि तिचा आक्रोश ढोल ताशामधे बुडवून टाकला. कुठे फेडाल ही पापे ? त्यासाठी खरेतर तृप्ती देसाईंनी थेऊरवर आक्रमण करून ते उजाड केले पाहिजे. त्यांना मार्गदर्शन करण्यास अनेक संघटना आहेत ते त्यांना इतिहासाचे पुनर्लेखन करुन देतीलच. नवीन इतिहासात, माधवराव हे चारित्र्यहीन, दुष्ट, क्रूर, व एकही लढाई (१ केली पण ....) न केलेले असल्यामुळे पराक्रम कशाशी खातात हे त्यांना माहीत असणे शक्यच नाही. काहीही लिहून इतिहासाला फालतू वळण देऊ नका.

काही मुद्द्यांबाबत माझे घोर अज्ञान निवारण करण्याची नम्र विनन्ती मी स्वयंघोषित इतिहासतज्ज्ञाना करीत आहे... १. गेल्या १०० वर्षात असे कोणते नवीन संशोधन कुणी केले की ज्यामुळे सम्भाजी हा महापराक्रमी शूरवीर राजा बनला ? २. जर तो एवढा शूरवीर महापराक्रमी राजा होता तर फन्दफितुरीने का मारला गेला? त्याच्याविषयी इतके लोकापवाद का निर्माण झाले? आग असल्याशिवाय धूर येत नाही ...यास्तव मोहित्यान्ची मन्जुळा किम्वा थोरातान्ची कमळा सारख्या कथाअ / आख्यायिका काअ निर्माण झाल्या? थोरल्या छत्रपतीन्बद्दल असे लोकापवाद कधी का पसरले नाहीत ? छत्रपती शिवराय हे चक्क औरंगजेबाच्याही कैदेतून शिताफीने सुटून आलेले होते... मग सम्भाजीराजांच्या विचारसरणीत / वागण्यात किंवा निर्णयपद्धतीत काही दोष /चुका होत्या म्हणूनच ते औरंग्याच्या हाती पडले असा अर्थ होत नाही का? ३. आज पिवळी पुस्तके लिहून इतिहासतज्ज्ञ असल्याचा आव आणणार्‍या लोकानी सम्भाजीला "आमचा बाप" वगैरे म्हणणे किंवा शिवाजीपेक्षा मोठा असल्याचे भासवणे हे फुकटचे उद्योगधन्दे सोडून सम्भाजीचा खरा इतिहास शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न कुणी करतय का?

In reply to by झपाटलेला फिलॉसॉफर

मलाही एक प्रश्र्न अनेक वर्षे सतावतोय. संभाजीराजे दिलेरखानाला खरेच जाऊन मिळाले होते का? असल्यास का? घरघुती कारणांमुळे तसे झाले असल्यास स्वतः राजे, त्यांचा राणीवसा, त्यांचे सल्लागार यांची ती जबाबदारी नव्हती का ? हा एक प्रकारचा शिवाजीमहारांजाच्या प्रतिमेला काळिमा लागला नाही का ? हे प्रश्न मला खरंच पडले आहेत. बरीच पुस्तके वाचली. :-) पण सत्य व स्पष्ट लिहिण्याचे धाडस कोणातही नसावे. अर्थात त्यासाठी मी त्यांना दोष देत नाही. वातावरणच इतिहासाच्या अभ्यासाला योग्य नाही. कोणाला काही माहिती असेल तर कृपया लिहावे किंवा मला व्यनि करावा.

In reply to by जयंत कुलकर्णी

विश्वास पाटील यांनी एका मुलाखतीत असे सांगितले होते की संभाजी राजांची अकारण बदनामी झाली हे खरे आहे पण ते मुघलांना काही काळासाठी का होईना जाउन मिळाले हे कोणत्याही कारणाने समर्थन करण्यासारखे नाही. नंतर त्यांना चूक उमगली हे खरे पण तो राजद्रोहच आहे. या मुलाखतीनंतर विश्वास पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचे किंवा धमक्या मिळाल्याचे ऐकले नाही आजवर.

In reply to by जयंत कुलकर्णी

गामा पैलवान 11/01/2017 - 17:55
नमस्कार जयंतराव, यासंबंधी माझा अंदाज सांगतो. जिजाऊ वारल्यानंतर शंभूराजांना आवरणारं कोणीच उरलं नाही. शिवाजीमहाराज स्वत: अतिशय व्यग्र असंत. पुत्राकडे लक्ष द्यायला वेळ मिळंत नसे. अशात शंभूराजांचा हूडपणा वाढला होता. त्याच त्वेषात एके दिवशी दिलेरखानास जाऊन मिळाले. खुद्द दिलेरखानाला मात्र ही पितापुत्रांची खेळी वाटंत असावी. भूपाळगडावर दिलेरने हल्ला केला होता. फिरंगोजी नरसाळ्याने किल्ला शर्थीने झुंजवला. पण शंभूराजे आघाडीवर येताच सपशेल शरणागती पत्करली. त्याने आपल्या ७०० शिपायांस धर्मवाट द्यावी म्हणून याचनाही केली. मात्र दिलेरने मावळ्यांचा एक हात तोडविला. शंभूराजे खरोखरीचे मित्र आहेत का याची बहुधा चाचपणी करायची होती. आपली विनंती धुत्कारली गेल्याचं पाहून शंभूराजे चिडले. दिलेरची अथणीची छावणी मारून काढली आणि थेट पन्हाळ्यावर शिवचरणी रुजू झाले. तत्पूर्वी महाराजांनी फिरंगोजी नरसाळ्यास शरणागती कोणांस विचारून पत्करली म्हणून रागे भरले. खुद्द युवराज जरी चालून आले तरी गड भांडते ठेवावेत म्हणून सर्वत्र आज्ञा जारी केल्या. मात्र युवराज परत आल्यावर त्यांना स्वीकारले. अर्थात, काही दिवस सज्जनगडावर समर्थ रामदासांच्या सहवासात ठेववून चित्तशुद्धी करविण्याचा हेतू होता. परंतु शंभूराजे खरोखरीच समर्थांच्या सहवासास गेले होते का याबद्दल संभ्रम आहे. आ.न., -गा.पै.

जानु 08/01/2017 - 18:23
ज्या काळात ज्यांच्या हाती सत्ता असते ते त्यांच्या फायद्यासाठी सत्तेचा वापर करतात हे सार्वकालीक सत्य आहे. मग ते कोणत्या जातीचे आणि धर्माचे याला महत्व नसते. यासोबत सत्तेच्या सोबत राहुन त्यापासुन मिळणारे फायदे जे उपटत असतात ते सत्तेचीच आरती गातात. आपले ते खरे सांगतात. आपण सारासार विचार केला पाहिजे. आपण ज्यांना आदर्श मानतो ती माणसेच असतात, मानवी भाव भावना, राग, लोभ आदि सर्व भावना त्यांच्याठायी असतात. काही त्यांचा वापर जनहितासाठी करतात, पण काही चुकाही होतात. त्या काळात त्यांना ते बरोबर वाटतही असेल कदाचित, भविष्यात एखादा निर्णय चुक ठरला तर तो क्षम्य ठरवावा की नाही हे त्याचे परिणाम पाहुन ठरवले जाईल. जरा मोकळे होउन विचार करावा एवढीच ईच्छा..

छत्रपती शिवराय हे चक्क औरंगजेबाच्याही कैदेतून शिताफीने सुटून आलेले होते... मग सम्भाजीराजांच्या विचारसरणीत / वागण्यात किंवा निर्णयपद्धतीत काही दोष /चुका होत्या म्हणूनच ते औरंग्याच्या हाती पडले असा अर्थ होत नाही का?
हो,दोष/चुका होत्याच.
जर तो एवढा शूरवीर महापराक्रमी राजा होता तर फन्दफितुरीने का मारला गेला? त्याच्याविषयी इतके लोकापवाद का निर्माण झाले? आग असल्याशिवाय धूर येत नाही .
आग असल्याशिवाय धूर येत नाही हे बरोबर आहे,संभाजी छंदी,रसिक होते,जसे ऑलमोस्ट सगळे राजेमहाराजे असतातच.शूर पराक्रम असा कि मरणाला घाबरले नाहीत,झुकले नाहीत.
संभाजीराजे दिलेरखानाला खरेच जाऊन मिळाले होते का? असल्यास का?
हो,मॅच्युरिटी नव्हती वय 18/19 असावे बहुधा. वडील मनासारखे वागू देत नव्हते,किंबहुना सत्ता देत नव्हते म्हणूनच.
घरघुती कारणांमुळे तसे झाले असल्यास स्वतः राजे, त्यांचा राणीवसा, त्यांचे सल्लागार यांची ती जबाबदारी नव्हती का ?
शिवाजींनीच संभाजीला पन्हाळ्यावर एक प्रकारे नजरकैदेत ठेवले होते.समजावून सांगण्याचा प्रश्नच नाही.
हा एक प्रकारचा शिवाजीमहारांजाच्या प्रतिमेला काळिमा लागला नाही का ?
हे असले प्रकार सर्रास होत असतात. पोरगं बंड वगैरे करत असतं,बापाला जुमानत नसतं. काळिमा वगैरे काय नसतो राव! आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनावर असतं सगळं, दैवत्व देवून भावनिक विचार केला कि भावना दुखावतात.

//हे असले प्रकार सर्रास होत असतात. पोरगं बंड वगैरे करत असतं,बापाला जुमानत नसतं. काळिमा वगैरे काय नसतो राव! आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनावर असतं सगळं, दैवत्व देवून भावनिक विचार केला कि भावना दुखावता///// अगदी बरोबर ! इतिहासात भावनांचा प्रश्र्न येत नाही. :-)

Ranapratap 08/01/2017 - 20:18
आज काल जे चाललेले आहे ते निव्वळ राजकीय आहे. इतकी वर्ष यांच्याकडे सत्ता होती त्यावेळी हे याना आठवले नाही. सगळी कार्ड वापरून झाली आता मराठा कार्ड. 100 वर्षा पेक्षा जुन्या राजकीय पक्षाने दलित मुस्लिम कार्ड वापरले. काही पक्षांनी मुस्लिम विरोधी कार्ड वापरले. मराठा आंदोलनातील चेहेरे पहिले तर यांची राजकीय पार्श्वभूमी लक्षात येते.

वरुण मोहिते 08/01/2017 - 20:38
आणि वाटेल ते बोलणं .. तृप्ती देसाई आणि माधवराव पेशवे तुलना तरी आहे का ?? इतिहास वाचलंय का रामाबाईंचं स्वखुशीने गेल्या परंपरा कित्येक वर्ष पुढे चालू होती . त्यावर देशद्रोही वैग्रे मतं..छान . यासाठीच बोलो नको धागे असे विषय वेगळा होता . माहित आहे का वाचला नाही मला नाही माहित आपण पण लक्षात घ्या पानिपत ला हरल्यावर मराठा सैन्याची पुनर्बांधणी ,निजामाशी लढणं हे माधवराव पेशव्यांनी केलाय .

In reply to by वरुण मोहिते

अहो ते उपरोधाने लिहिलय. एवढे तरी समजून घ्या. तृप्ती देसाईचा उल्लेख एवढ्यासाठी केला की त्या काळातील घटनांचा उपयोग आत्ता स्कोअर सेटलिंगसाठी केला की कसे हास्यास्पद होते हे समजण्यासाठी. आता गडकरींचा पुतळा फोडला आणि देसाईबाईंनी जर थेऊरवर चाल केली तर दोन्हीचा अर्थ तोच होतो ""मूर्खपणा'' :-)

संदीप डांगे 08/01/2017 - 20:46
धागा विषयासंबंधी प्रतिसाद द्यावे ही सन्माननीय सदस्यांना विनंती. धाग्याचा मूळ विषय इतिहास कसा उकरावा, उगाळावा हा नसून सामान्य लोकांपर्यंत अद्ययावत इतिहास कसा पोचवावा हा आहे. आताच पलिकडच्या धाग्यावर शिवाजींच्या गुरु प्रकरणाबद्दल दोघांनी दोन-दोन वेगवेगळ्या लोकांची नावे देऊन परस्पर विरोधी दावे केलेत. असेच चालत राहिले तर ह्यात मजसारख्या सामान्य माणसाने कोणाचे खरे मानायचे? धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

माझे मिपावरच एका लेखात लिहिलेले प्रसिद्ध वाक्य आहे. बहुतेक तुम्ही तेव्हा नव्हतात. ""भारतीय इतिहासात माणसे नाही देव वावरतात.'' आता बघा उत्तरे पाहिजेत का नको. मी तर उत्तरे देण्याचे सोडून दिले आहे. इतिहासाचा अभ्यास करुन मला तर पश्चत्ताप झालाय. म्हणून मी एका लेखात लिहिले होते ""History is a Dangerous Past.'' आज येथेच डांगे तुमच्या धाग्यावर मी प्रतिज्ञा करतो की "यापुढे कधीही मिपावर मी इतिहासावर बोलणार नाही ना चर्चा करेन, !'' सिरियसली. अर्थात हे येथे न लिहिताही मी करु शकलो असतो पण झालेला पश्चत्ताप जाहीर करावा व इतरांना या विषयावर वेळ घालवू नये हे कळावे म्हणून जाहिरपणे लिहित आहे. :-)

In reply to by संदीप डांगे

आपल्या देशात इतिहासावरील प्रश्र्न विचारायला परवानगी नाही आणि जेथे प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत तेथे खरा इतिहास कधीच समोर येऊ शकत नाही... पण ठीक आहे. कधी ना कधी लोकं प्रश्न विचारण्यास शिकतील व विचारतील. :-)

हेमंत लाटकर 08/01/2017 - 23:08
थोरले माधवराव पेशवे १६ व्या वर्षी पेशवे झाले. राक्षसभुवणच्या लढाईत निजामाला हरवून ६० लाखाचा मुलुख मिळविला. ११ वर्षाच्या कारकीर्दित पानिपत मध्ये आलेले अपयश धुऊन काढले. राघोबादादाच्या कारस्थानामुळे खुप मनस्ताप व निजाम, हैदरशी तह करावे लागले. उपरोधाने लिहताना काही लिहू नये.

खग्या 10/01/2017 - 01:36
कोणी पुतळा फोडत तर कोणी नवा पुतळा उभारतय, कोणी फोटोला फुलं वाहतंय तर कोणी चपलांचे हार घालतंय. हे सगळं करताना आपल्या तरुण पिढीची ताकद, पैसा आणि बुद्धी वाया जातेय असा विचार कोणीच का करत नाही? अर्थात पुढारी हे करणार नाहीतच कारण एकतर निम्म्याहून अधिक नेते लोकांना आपण काय करतोय आणि किती खालच्या पातळीला उतरतोय याचं भान नाही. आणि उरलेल्या चांगल्या जाणत्या लोकांना आपण निवडून देत नाही. पण वृत्तपत्र आणि इतर प्रसारमाध्यमांची सो कॉल्ड पत्रकारिता पण हे करू शकते. त्यांना तारस्वरात ओरडून वाद घालण्यापलीकडे काही काम नसतं का? आणि आपण (जनता) अशा फालतू लोकांना का डोक्यावर घेतो?

Ram ram 10/01/2017 - 19:31
खग्या यांच्याशी सहमत. आपला इतिहास हा पराजितांचा इतिहास आहे व हे शल्य मराठी मनाला सतत कुरतडत असतं. त्यातून बाहेर पडण्यासाठी गौरवास्पद घटना, व्यक्तिंचा आधार घ्यावा लागतो. आजही मुस्लिमांना समान नागरी कायदा लावण्याची हिंमत नाही यामागे इतिहासात त्यांची बसलेली भिती हेच खरे कारण आहे. औरंगजेबाचा उल्लेख बादशहा, पातशहा करतात औरंग्या म्हणण्याची हिंमत सुद्धा नाही. हिंदू ह्रदय सम्राट सुद्धा कुठल्या तरी सिक्युरिटी मध्ये राहात होते असे वाचल्याचे आठवते.

In reply to by Ram ram

संदीप डांगे 10/01/2017 - 20:28
साहेब, आपण इतिहासाकडे कोणत्या दृष्टीने पाहता तसे त्यात दिसते. मला तरी माझ्या भारताचा सर्वच इतिहास गौरवशाली वाटतो. जरी मुस्लिमांची आक्रमणे झाली, जरी त्यांनी अखंड भारतावर राज्य केले तरी शेवटी माझ्या मराठ्यांनीच परत अख्खा देश हिंदूच्याच तालावर नाचवला आहे. इंग्रजासही मराठ्यांना हरवल्याशिवाय संपूर्ण देश जिंकता आला नाही, त्याही इंग्रजांना अवघ्या दिडशे वर्षात घालवले आपण. तरीही आपल्याला हा दैदिप्यमान इतिहास पराभूतांचा वाटत असेल तर कुठेतरी चुकतंय बघा. मुस्लिमांबद्दल राग ठेवू नका, आपला इतिहास विजेत्यांचा दिसेल. आताही आपण त्यांना घाबरत नाही तर पोकळ पुरोगामी खुर्चीवंतांमुळे व मतांसाठी जी-हुजूरी करणार्‍यांमुळे समान नागरी कायद्याला अडथळा आहे. नजर बदलो, नजारे बदल जायेंगे.

In reply to by संदीप डांगे

अखंड जाउंदे पण ७५% भूभागावर मुस्लिमांचे राज्य आहे असा कालावधी संपूर्ण इतिहासात मिळून २५ वर्षांचा देखील नाही. त्यामानाने इंग्रजांची १५० वर्षे पुष्कळच आहेत.

In reply to by Ram ram

आपला इतिहास हा पराजितांचा इतिहास आहे व हे शल्य मराठी मनाला सतत कुरतडत असतं. हॅ हॅ हॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य ढापले का ? त्यांनी पण 'हिंदूइजम इज नथिंग बट द हिस्टरी ऑफ लॉस्ट जनरेशन्स' असे काहीसे निरर्थक विधान कुठेशी लिहिले आहे बहुधा.

खरे लिहिणे किंवा खोटे लिहिणे हा मुद्दा गैरलागू आहे. एखाद्याला खोटे लिहायचे असेल किंवा मूर्ख कल्पनाविलास करायचा असेल तरी त्याला तसे करण्याचा अधिकार असला पाहिजे. त्या खोट्या लिखाणाला किती किंमत द्यायची हे लोकांनी आपापल्या वकुबानुसार ठरवावे. पण आवडले नाही की लगेच तोडफोड करायची म्हणजे अगदीच गर्दभ राशीचे वागणे आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाळ सप्रे 11/01/2017 - 13:27
गर्दभ राशीचे वागणे आहे
भावना दुखावल्या म्हणून गाढव लाथा मारत नाही.. उगा का त्याला बदनाम करा.. ;-)

चिनार 11/01/2017 - 15:36
ऐतिहासिक पात्रांना देवत्व देऊ नये. इतिहास वाचावा, चांगले ते घ्यावे अन वाईट ते सोडून द्यावे. (चांगलं काय अन वाईट काय ते आपलं आपण ठरवावे !) एखादा राजा शूरवीर होता म्हणजे बारा महिने चोवीस तास तो नंग्या तलवारी घेऊन फिरायचा असं नव्हे.

साला आपुन इंडियन पोरेलोक हिस्टरी दिल मंदी घेते, ते हाफ फिट अबव दिमाग मध्ये कोनीच घेते नाय, बेसिकाली वी ऑल लव्ह अवर मदरलँड, पर आपुनच्या समाजमंदी लै जात ने पात ने language ने कल्चर राहते ना, मंग आपुन सारे आपले पेट्रीऑटिझम प्रुव्ह करायला पर्व्हर्ट होते. आपुनच्या समाजाचा/जातीचा/प्रांताचा पेट्रीऑटिझम बिज्या समद्या पेक्षा सुपरलेटिव्ह हाय हे प्रुव्ह करायला आपुन एक एक हिस्टोरीकल फिगर उधार घेऊन एक बिजा मंदीच फाईट करते, तू साला फलना कास्ट तुझ्या फोरफादर ने असा केला त्याच्या ग्रँडपा ने तसा केला, समदा हेच्यातच बरबाद होते पोरे लोक. फ्युचर मंदी सगळे पोरेलोक म्हणतील साला आपुन आपल्या समद्यांच्या फादर लोक मुले कॉमनली बरबाद झाला हाय.

In reply to by फेदरवेट साहेब

आनंदयात्री 11/01/2017 - 20:08
फ्युचर मंदी सगळे पोरेलोक म्हणतील साला आपुन आपल्या समद्यांच्या फादर लोक मुले कॉमनली बरबाद झाला हाय.
किंवा पोरेलोक पण हिस्टरी दिल मंदी घेणारे असतील आणि त्यांचेत्यांचे फादर कसे सुपरलेटिव्ह हायेत ते प्रुव्ह करायला भांडतील. थोडक्यात काय आजचे पोरेलोक, उद्याचे पोरेलोक आणि मातीत गेलेले पोरेलोक सगळेच एकंदरीत हिस्टरी दिल मंदी घेणारे दिमाग मध्ये नाही.

In reply to by आनंदयात्री

ए भावसाहेब , साला आपुन आपल्या फ्युचर रिलेटेड तरी पोजिटीव्ह बोलायचे हा, नाऊ बी अ गुड बॉय मिस्टर जॉय रायडर (आनंदयात्री)

In reply to by बाळ सप्रे

हायच, ते आपुन मागल्या येळीच क्लियर केला ना भावसाहेब, साला आपुन विंग्रज होते ना, त्ये तुमचा समदा टाट्या कुलकर्णी, ने बाबुराव ने सुब्रह्मण्यम पोरे लोक आपुनला एनेमी समजत असे , व्हाय? आय डोन्ट नो, मग आपुन पारसी कॉलनी मदल्या पोरेलोक सोबत हँगआऊट करीत असे, साला स्लोली स्लोली आपुनच्या भासा अन ऍक्सेन्ट बी तोच झ्याला नी भावसाहेब.

arunjoshi123 24/01/2017 - 17:37
हे शालेय अभ्यासक्रम आता अद्ययावत, खरा व अभिनिवेशशून्य इतिहास शिकवतात काय की अजूनही वीस वर्षांआधीचा मसाला चालू आहे.?
इतिहास अभिनिवेशशून्य का शिकवावा?