Skip to main content

विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे फार कठीण

लेखक तिमा यांनी गुरुवार, 04/08/2016 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या भ्रष्टाचारात बुडालेल्या देशांत, विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे, हे फार कठीण आहे. उदाहरणे देऊनच ह्या वाक्याचे स्पष्टीकरण देतो. समजा, तुम्हाला तातडीने दुसर्‍या गांवी जायचे आहे. वाटेत अनेक पूल आहेत. ते सरकारी यंत्रणांनी तपासून वाहतुकीला खुले ठेवले आहेत. सामान्यतः तुम्ही ठरवल्याप्रमाणे इच्छित स्थळी पोचणारच. पण भ्रष्टाचारी देशात अनेक प्रश्न उदभवतात. आता ते तपासणार्‍या यंत्रणांमधील इंजिनियर्स हे खरोखरच ज्ञानी आहेत की कुठल्यातरी कोट्यातून अ‍ॅडमिशन मिळून पास झालेले आहेत ? तसेच ते ज्ञानी असले तरी कामाशी प्रामाणिक आहेत का नाही ? त्यांच्यावर वरुन दबाव आला आहे का ? या सर्व शक्यतांवर तुमचा प्रवास सुरक्षित आहे का नाही हे ठरते. पावलोपावली भ्र्ष्टाचाराचा अनुभव असल्यामुळे, तुम्ही जास्तीतजास्त काय काळजी घेणार ? म्हणजे शेवटी देवावर्/दैवावर भरवसा ठेवूनच तुम्ही प्रवासाला निघणार! हाच प्रवास रेल्वेने करायचा झाला तरी वरीलप्रमाणेच प्रश्न उदभवतात. आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खावी असे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही आहारात बदल केलेत. तुमच्या खाण्यात शुद्धच भाज्या फळे येतील की रंगवलेली, मेण लावलेली येतील याची काय खात्री ? म्हणजे पुन्हा देवावर, नशिबावर भरवसा ठेवणे आले. तुम्हाला चर्चगेटहून बांद्रयाला जायचे आहे, वेळ कमी आहे म्हणून तुम्ही विरार फास्ट पकडली आहे. पण दरवाज्यातल्या टोळक्याने तुम्हाला उतरुनच दिले नाही किंवा वाद घातल्याबद्दल चालत्या गाडीतून ढकलून दिले तर तुम्ही इच्छित स्थळी, वेळेत पोचाल याची खात्री काय ? पुन्हा नशिबावर भरवसा. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?

वाचने 26829
प्रतिक्रिया 169

प्रतिक्रिया

In reply to by सुमेरिअन

वरील प्रतिसाद हा मुवि काकांच्या प्रतिसादासाठी होता.

मुक्त विहारी, >> पण, आज भारतातील जपानची आणि द.कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स आणि गाड्यांची बाजारपेठ जवळपास सारखीच आहे. गंमत बघा की आज भारत अवकाश क्षेत्रात प्रचंड अग्रेसर आहे. भारतात ग्राह्कोन्मुख (कन्झ्युमर) उत्पादने सुमार दर्जाची, तर अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) उत्पादने जागतिक दर्जाची का आहेत? माझ्या मते याचं कारण म्हणजे मानके (स्टँडर्ड्स) आहेत. जागतिक स्पर्धेत अभियांत्रिकी उत्पादने खपवायची असतील तर उच्च दर्जाच्या मानकांनुसार उच्च गुणवत्तेची उत्पादने बनवावी लागतात. याउलट ग्राहकोन्मुख उत्पादने कशीही बनवलेली चालतात, कारण मानके सरकारी आहेत ना! बाबूशाहीचा नि:पात केल्याविना गत्यंतर नाही. आ.न., -गा.पै.

अशाच प्रकारच्या मुद्द्यांमुळे सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते, की 'माणूस अंधश्रद्ध असतो; कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते.’

तिमा, मिपावर यनावाला नामे एक प्राध्यापक होते. त्यांच्या लेखनावरून ते स्वत:ला विज्ञानवादी (अथवा विज्ञाननिष्ठ) समजत असावेत. श्रद्धाबिद्धा त्यांना मंजूर नसे. जेव्हा त्यांच्या लेखातून अधोरेखित होणारी श्रद्धेची बैठक मिपावाचकांनी दाखवून दिली, तेव्हापासनं हे सद्गृहस्थ पार गायब झालेत. बाकी काही म्हणा मिपावर विज्ञाननिष्ठ राहणे कठीण नव्हे तर अशक्यच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

यनावाला वेळ मिळाला की येथे लिहितीलच. डोंटवरी. -दिलीप बिरुटे

पण डेट्रोइटमधे समृद्धी भोगलेल्या आजोबांच्या नातवाला त्याच शहरात जन्म घेणे म्हणजे घोर पाप वाटते... त्याने कुठल्या देशात जावे बरे?

In reply to by संदीप डांगे

संदीप शेठ , जर का दोनचं दिवसाची वस्ती आहे हे माहित आहे तर चांगल्या ठिकाणी का करू नये? थोडाचं काळ तर काढायचाय म्हणून काढला कुठे तरी असे करणे बरोबर वाटत नाही.

In reply to by गणामास्तर

समर्थ सांगून गेलेत हो... आणि वस्ती चांगल्या ठिकाणी करावी म्हणून आम्ही मुंबई सोडून नाशिक ला शिफ्ट झालो... मोठे चांगले रस्ते, नागरी सुविधा, कर्तव्यदक्ष नगरसेवक, पुढाकार घेऊन शहर उत्तम ठेवण्याची पराकाष्ठा करणारे नागरिक इथे लाभले, स्वतःचे शहर म्हणून लोक जीव ओततात शहराच्या जडणघडणीत असा अनुभव आहे, बाकी जी शहरे बकाल होत आहेत त्याला बाहेरून येणाऱ्या नागरिकानची अनास्था कारणीभूत असते, ही संख्या जिथे मूळ निवासीपेक्षा जास्त तिथे समस्या वाढतात,

In reply to by संदीप डांगे

स्वतःचे शहर म्हणून लोक जीव ओततात शहराच्या जडणघडणीत असा अनुभव आहे, बाकी जी शहरे बकाल होत आहेत त्याला बाहेरून येणाऱ्या नागरिकानची अनास्था कारणीभूत असते, ही संख्या जिथे मूळ निवासीपेक्षा जास्त तिथे समस्या वाढतात,
असं म्हणून तुम्ही असहिष्णु आहात असे म्हणायची सोय केली. तसंही वरील विधानाला ऊभा छेद देणारी व्य्वस्था पिंची मध्ये आहे.

स्थानीक गाववालेच बकालपणा आणि गुंडगिरी करून बाहेरून आलेल्यांना (गुंडाना-राजकारण्यांना यथोचीत साथ देत आहेत) त्यांच्यात कोण जास्ती नियोजनशून्य आणि गावगुंड याची स्पर्धा चालू आहे.

गणामास्तरांसाठी नम्र विनंती : चाफेकर चौकातील पूल हे राजकारण्यांच्या नियोजन शून्य बिनडोकपणाचे स्मारक आहे हे तुम्हीच साम्गू शकाल. वल्ली शेठ: हा पूल सद्यकालीन असल्याने तसेच (त्यांच्या घरासमोरील पूलाचा त्यांना १ पैसाही उपयोग होणार नाही,पण त्रास नक्कीच होणार आहे) तरी लिहिणार नाहीत. दोन्ही पुलांचा अनुभव असलेला नाखु

In reply to by संदीप डांगे

बाकी जी शहरे बकाल होत आहेत त्याला बाहेरून येणाऱ्या नागरिकानची अनास्था कारणीभूत असते, ही संख्या जिथे मूळ निवासीपेक्षा जास्त तिथे समस्या वाढतात,
फक्त याबद्दल असहमत. बाकी पिंचिं काही बकाल म्हणावे असे नाही, पण जो काय बकालपणा चालवलाय तो 100% मूळनिवासी आणि स्थानिक गावगुंडांनीच. या कधी तरी दाखवीन मजा :)

In reply to by गणामास्तर

आम्ही तेच म्हणून राहिलो डांगे सरांशी असहमती दाखवून.. प्रतिसाद पुन्हा नजरेखालून घाला महाराजा. स्थानीक गाववालेच बकालपणा आणि गुंडगिरी करून बाहेरून आलेल्यांना (गुंडाना-राजकारण्यांना यथोचीत साथ देत आहेत) त्यांच्यात कोण जास्ती नियोजनशून्य आणि गावगुंड याची स्पर्धा चालू आहे. यादगार नाखु

फुटपाथ फेरीवाल्यांनी भरले आहेत? - त्यांच्याकडुन कुणीही एकही वस्तु खरेदी करु नका, ८ दीवरात सर्व फुटपाथ आपोआप मोकळे होतील. अनधीकृत बांधकामे वाढली आहेत? - फक्त अधीकृत ईमारतीत घर खरेदी करा. वाहतुकीची शीस्त सर्वांनी पाळा - ट्राफीक ज्याम होणार नाही, पोलिसांना कामाचा बो़आ कमी होईल. राजकारणी चोर आहेत - पुढच्या निवडणुकीत मतदान करा व त्यांना घरी बसवा आपल्याला जर एवढ्या बेसीक गोष्टी करायच्या नसतील तर आहे त्या परीस्तीतीला आपलेच वागणे कारणीभुत आहे हे समजुन गप्प बसावे.

In reply to by नेत्रेश

मागच्याच निवडणुकीत मोदी , भाजपा सेना निवडुन दिले ना ? अनधिकृत बांधकामे नव्या सरकारनेही अधिकृत केली आहेत. आता अजुन नवे सरकार कुठुन आणायचे ? की शक हूण ग्रीक म्लेंच्छ यवन इ ना पुन्हा चान्स द्यायचा ?

ज्या देशात जन्म घेतला तो आवडलाच पाहिजे असे नाही. मुक्त विहारी ह्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याच्याशी सहमत. दिवसेंदिवस सामाजिक प्रगती होण्याऐवजी आपण माजोरडेपणा, उद्दामपणा, बेशिस्त ह्या दिशेने झुकत आहोत असे वाटत आहे.

भारतात असलेल्या प्रॉब्लेम्स विषयी बरीच चर्चा झालीये. माझ्या दृष्टीने भारतीय मनोवृत्ती अथवा मानसिकता हा प्रगतीसाठी एक मोठा अडथळा आहे. कुठेही कचरा न टाकणे, जिथेतिथे न थुंकणे, नियम पाळणे, प्रामाणिकपणे वागणे ई. स्वतः करता येणाऱ्या गोष्टी पण किती टक्के लोक्स करतात? सुधारणा स्वतःपासून करावी हे नुसतं तत्वज्ञान दुसऱ्याला सांगतात पण स्वतःचं काय? भारतातून पहिल्यांदा परदेशात (विशेषतः अमेरिका, युरोप) गेल्यावर आश्चर्याचे बरेच धक्के बसतात. सामान्य माणूस किती काटेकोरपणे नियम पाळतो, स्वच्छता पाळतो हे बघून थक्क व्हायला होतं. सार्वजनिक जीवनात पण हे लोक खूपच प्रामाणिक असतात. जमल्यास माझे काही अनुभव लिहीन वेगळ्या लेखात. बाकी काही प्रतिक्रियांत म्हणल्याप्रमाणे परदेशातही प्रॉब्लेम्स आहे जसे की गन कंट्रोल नसणे ईई. पण रोजचा त्रास नाही.... जगाल तर सुखाने नाहीतर परस्पर सद्गती. पण दुर्दैवाने अश्या एखाद्या हल्यात कोणी मारला गेलाच तर सरकार आणि विमा कंपन्यांकडून चांगली वागणूक मिळते. परदेशात काही वर्ष राहून भारतात परत आलं की संमिश्र भावना होतात. आपले लोक भेटतात म्हणून बरंही वाटतं पण बाकी अस्वच्छता आणि अनास्था बघून उद्विग्नता पण येते. त्यामुळे तिमा आणि मुवींशी बऱ्याच अंशी सहमत.

भारतात खुप प्रॉब्लेम्स आहेत हे खरेच, पण म्हणुन ते जगातल्या इतर देशात नाहीत असं थोडीच आहे? अमेरिकेतले लोक काय स्वर्गात थोडीच रहातात? इथेही डोक्याला शॉट खुप गोष्टी आहेत. फक्त इथले लोक तुलनेने आपल्या देशाला कमी शिव्या घालताना दिसतात असं माझं निरीक्षण. आपण मुळातच "मी देशापेक्षा एक वेगळी व्यक्ति आहे" असं समजुन देशाला शिव्या घालतो. पण आपण म्हणजेच देश आहोत ना? भारत निश्चितच एक खुप चांगला देश आहे, वादच नाही. आपली आई कितीही कशीही असली तरी आई असते. तिचा तिरस्कार करुच शकत नाही. बाकी आया कितीही सुंदर आणि प्रेमळ वाटल्या तरी आपल्या आई सारखा हक्क बाकी कुणावर नसतो.

In reply to by संदीप डांगे

टेढा है पर मेरा है। हे नक्की, पण... "और इसको सिधा करने के लिये खुद मुझे सिधा होना पडेगा और दुसरोंको सिधा बनानेमे योगदान भी देना पडेगा।"... या पुढच्या मुद्द्यात आपण कमी पडतो. ...आणि हाच मुख्य मुद्दा एखादा देश विकसित आहे/होईल की अजून बराच काळ अविकसित (किंवा जीवाला बरं वाटावं म्हणून वापरला जाणारा शब्द... विकसनशील) राहील ते ठरवतो. :) :(

"भारतात प्रॉब्लेम्स आहेत; पण ते जगात कुठे नाहीत?" असं म्हणणे ही स्वतःची फसवणूक होईल. असं म्हणणार्‍या लोकांना एकतर सुदैवाने भारतात काहीही त्रास झालेला नसतो किंवा विकसित देशात राहणे कसे असते त्याचा अनुभव नसतो. रस्त्यावर कितीही साधा अपघात झाला तरी अक्षरशः पाव्ह मिनीटात पोलिस हजर होतात. नुकतीच दिल्लीत घडलेली घटना पाहा. तो माणूस जखमी होऊन पडून राहिला आणि मेलप; पण त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. आणि ही फक्त उघडकीला आलेली एक घटना आहे. विकसित देशांमध्ये असा माणूसच काय कुत्रा-मांजरसुद्धा जखमी अवस्थेत पडून राहणार नाही. हे आपलं काम आहे आणि ते आपण प्रामाणिकपणे करणे ह्यात आपला आत्मसन्मान आहे हे तर तिथल्या लोकांना कळतंच शिवाय दुसर्‍यांशी संवेदनशीकतेने कसं राहावं हेही कळतं. भारतात चांगल्या सुखवस्तु माणसालाही बाहेर गेल्यावर जिवंत घरी येऊ की नाही ह्याची खात्री नसते. अठराव्या शतकात टीबीने मेलेल्या माणसाच्या जागी आपण नाही ह्या आनंदापेक्षा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या माणसाच्या जागी मी किंवा माझा आप्त असेल तर काय होईल ह्याची धास्ती कैकपटीने जास्त आहे. बाकी सुधारणा होण्यासाठी प्रॉब्लेम आहे हे मान्य करावं लागतं. इथे तर "संतुलित" राहण्याची स्पर्धा चालू आहे.

ननि, थोडी गल्लत होतेय, इथे कोणीही "भारतात अजिबात समस्या नाहीत" असे म्हणत नाही आहे, पण गेल्या तीस वर्षांपासून आम्हाला फक्त समस्याबद्दल कुरकुरायला शिकवले गेले आहे, पुढे होऊन दोन हात करायचे म्हटले तर हजार कारणं तयार असतात, एकटा काय करू शकतो पासून व्यवस्था बदलणे शक्यच नाही इत्यादी.. तसेच आजकाल कुरकुऱ्यांवर टीका केली की टिपिकल उत्तर मिळते ते हेच की सुधारणा होण्यास समस्या मान्य कराव्या लागतात, हो, समस्या मान्यच आहेत आम्हाला पण उपाय कोणी शोधायचे /करायचे? त्या आघाडीवर कुरकुरे बंधू नक्की काय करतात हे विचारायचे नसते! निव्वळ माजघरात देशाला नावे ठेवली कि यांचे कर्तृत्व सिद्ध होते ना! या वर्षीच्या मॅगेसेसे चे विजेते आणि त्यांची कामे बघावी, भारतात काहीच चांगले होऊ शकत नाही ह्याची जपमाळ ओढणार्यांना कदाचित हि नावे ठाऊक नसतील किंवा असली तरी त्यांच्या कुरकुर चळवळीला सूट होत नसल्यामुळे जाणवत नसतील!