Skip to main content

एक वर्षानंतर . . .

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 25/05/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

वाचने 311863
प्रतिक्रिया 1265

प्रतिक्रिया

मेक इन इंडिया कार्यक्रमात आग

सध्या आआपच्या एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आणि त्यांनी "दिल्लीच्या" जनतेच्या आयुष्यात आमुलाग्र बदल केले असल्याच्या चार पाच पानी मोठ्या मोठ्या जाहिराती "मुंबईच्या" वृत्तपत्रात येत आहेत. याचे पैसे कोण देणार आहे याचे कुतूहल लागून राहिले आहे.

In reply to by सुबोध खरे

दिल्लीच्या वार्षिक अंदाजपत्रकात आआप सरकारच्या जाहिरातीसाठी अंदाजे ५२५ कोटी रूपयांची तरतूद केलेली होती. त्याच पैशातून जाहिराती होत असणार. दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवर सुद्धा मोठमोठ्या लांबलचक जाहिराती येत आहेत. जाहिरातींसाठी इतके पैसे वापरल्यावर कचरा खात्यातील कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनासाठी पैसे न उरणे अगदी स्वाभाविक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणायला तर बीजेपी न पण १० हजार कोटी खर्च केलेत इलेक्शन वर! सरकारी यंत्रणा वापरुन मन की बात च्या टाइम स्लॉट साठी पैसा देते का सरकार? का होऊ दे खर्च चॅनल आहे घरचं प्रकार आहे? (माहीती नाहीये म्हणून विचारतोय गैरसमज नको)

In reply to by सुबोध खरे

पण स्वतः तेच करत आहेत. मग हा सोवळेपणाचा डांगोरा कशासाठी ?
"पार्टी विथ डिफरन्स" हा नारा कुणाचा होता बरे?

In reply to by सुबोध खरे

सध्या आआपच्या एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आणि त्यांनी "दिल्लीच्या" जनतेच्या आयुष्यात आमुलाग्र बदल केले असल्याच्या चार पाच पानी मोठ्या मोठ्या जाहिराती "मुंबईच्या" वृत्तपत्रात येत आहेत. याचे पैसे कोण देणार आहे याचे कुतूहल लागून राहिले आहे.
आआप जाहिरातीत सुद्धा असत्य माहिती पुरवित आहेत. इंडियन एक्सप्रेस मध्ये १७ फेब्रुवारीच्या अंकात आआपची २ पूर्ण पाने जाहिरात आहे. आआपने वर्षभर काय केले याचे वर्णन आहे. एका कॉलमचा मथळा "Delhi gov scraps management quota in private schools" असा असून त्यात खालील वाक्ये आहेत. Much to the respite of parents running for nursery admission, the Delhi government has scrapped the management quota in the private schools. त्या जाहिरातीत आपल्या सरकारने नर्सरी प्रवेशातील व्यवस्थापन कोटा स्क्रॅप केल्याबद्दल केजरीवालांनी स्वतःची पाठ थोपटून घेतल्याचे सविस्तर वर्णन आहे. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती खालीलप्रमाणे आहे. http://indiatoday.intoday.in/story/delhi-high-court-stays-delhi-governm… The Delhi High Court today has put a stay on Delhi Government's circular that scrapped many criteria for nursery admissions, including management quota. The high court today ruled that management quota will continue this year for nursery admissions. ही बातमी ४ फेब्रुवारीची असून सुद्धा १७ फेब्रुवारीच्या जाहिरातील आआप सरकार पूर्णपणे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. इंडियन एक्सप्रेसच्याच १५ फेब्रुवारीच्या आवृत्तीत आआपच्या अजून एका जाहिरातीचा मथळा आहे "Kejariwal proven right: CAG audit confirms scam of crores in private power distribution companies". प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे हे ऑडिट झालेलेच नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने कॅगला हे ऑडिट करण्याचा दिल्ली सरकारचा आदेश रद्द केला आहे. जर ऑडिट झालेलेच नाही आणि रद्द झालेले आहे तर कॅग ऑडिटने वीज वितरण कंपन्यांमध्ये कोट्यावधी रूपयांचा घोटाळा केला आहे असे केजरीवाल कशाच्या जोरावर म्हणतात. इथेही जनतेची पूर्ण दिशाभूल केली जात आहे. http://www.ndtv.com/delhi-news/cag-cannot-audit-discoms-accounts-high-c… The Delhi High Court today cancelled the AAP government's decision to get the accounts of three private power distribution companies audited by the Comptroller and Auditor General (CAG). न्यायालयाचा हा निर्णय ऑक्टोबर २०१५ मध्ये दिलेला आहे. परंतु १५ फेब्रुवारी २०१६ च्या जाहिरातील केजरीवाल त्याविषयी असत्य माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. यात आश्चर्य काहीच नाही. असत्यकथन, खोटे आरोप, कांगावा, जनतेची दिशाभूल, भ्रष्टाचार्‍यांना पाठिंबा हीच आआपवाल्यांची व्यवच्छेदक लक्षणे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

बापरे इतके धडधडीत खोटं? मला वाटलं होतं कि निदान वीज कंपन्यांचे ऑडिट करून सामान्य जनतेला स्वस्तात वीज पुरवायचे ( एक तरी) महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. इतकी धूळफेक? एके काळी केजरीवाल साहेबांबद्दल माझ्या बर्याच अपेक्षा होत्या. सनदी सेवेतील हुशार माणूस आहे भ्रष्टाचारा बद्दल व्यवस्थित माहिती असलेला त्यामुळे या विषवल्लीच्या मुळापर्यंत जाण्याचे ज्ञान असलेला आहे. पण गेल्या काही वर्षात ज्या तर्हेने आआप मध्ये त्यांनी सवता सुभा निर्माण केला त्यामुळे त्यांचा आलेख खाली उतरत गेला. आत्तापर्यंत तरी तो अधिक मध्ये होता या नंतर तो उणे मध्ये गेला असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

SC issues notice to three Delhi discoms over CAG audit row A Supreme Court bench led by Justice J. Chelameswar listed the matter for final hearing on 2 March http://www.livemint.com/Politics/eeMuPO39br2iOmDEpQFlaP/SC-issues-notic… हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलेला असताना स्वच्छ खोटं?

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, ऐकिव माहीती ही पण आहे की केजरीवाल ह्यांची पत्नी ही स्वतः एक भारतीय राजस्व सेवा (IRS) अधिकारी असुन वर्षोंवर्षे दिल्लीत ठाण मांडून बसलेली आहे (खरे खोटे देव अन केजरीवाल साहेब जाणोत) तसेच ह्या महाशयांनी सनदी सेवे मधुन राजीनामा द्यायचे एक कारण म्हणजे रॅमन मॅगसेसे पुरस्काराची रक्कम (जी बरीच घसघशीत असते) मिळाल्यावर ती पुर्णपणे आपल्या गैरसरकारी स्वयंसेवी गट (NGO) मधे कर न भरता वळती करणे ह्यासाठी असल्याचे सुद्धा ऐकून आहोत. अर्थात ह्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत म्हणून साध्यातरी ही सांगोवांगी म्हणतो आहे आम्ही, तरीही ह्यांचे मोदी विरोधी अन एंटी एस्टेब्लिशमेंट पराक्रम पाहता त्यात किमान एक टक्का सत्यांश असण्याची संभावना बरीच वाटते

In reply to by नाना स्कॉच

असू द्या हो नानासाहेब. प्रामाणिक अधिकारी आहेत कुठे दिल्लीत? India Against Corruption (IAC) activist Arvind Kejriwal, while accepting that he and his wife Sunita Kejriwal (both belong to the Indian Revenues Services-IRS) were never transferred out of Delhi, said that this happened due to shortage of honest and competent officers with technical skills.While Kejriwal forgot to take note of Ashok Khemka (the IAS officer from Haryana, who cancelled the mutation of the over three-acre plot that Robert Vadra's company allegedly sold to DLF last month, has been transferred for 43 times during his 20 years service), he pointed a finger towards IAS officer Pulok Chatterjee, who shares good relations with the first family of the Congress party. http://www.moneylife.in/article/kejriwal-wife-never-transferred-out-of-…

In reply to by सुबोध खरे

बापरे इतके धडधडीत खोटं?
अजून एक. त्याच जाहिरात मालिकेत एका जाहिरातीत असे वाक्य आहे.
"दिल्लीच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण वर्षभर वीज दर वाढले नाहीत."
आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की Delhi Electricity Regulatory Commission (DERC) या कंपनीने ९ जुलै २०१५ ला वीज दरात ६% वाढ केलेली आहे.
DERC hikes power tariff by 6%
- http://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-power-tariff-hiked-…

महिला आआपची आहे असे ती घटना घडल्यावर सर्व वृत्तपत्रातून आले होते.
याचाच पुरावा मागत आहे . मी एक तरी पुरावा दिला तुम्ही आम आदमी सेना आणि आप एकच आहे याचा पुरावा द्या. निसंदिग्ध , थर्ड पार्टी पुरावा द्या . बाकी एखाद्या पक्षाची अधिकृत भूमिका नाकारुन स्वत:चा खरे करणारा झोपलेला नसतो सोंग घेत असतो. इथे माझ्या म्हणण्याची दखल मिपाकरांनी घेतली आणि खोटेपणा उघडा पाडला याबद्दल आभार

In reply to by कपिलमुनी

इथे माझ्या म्हणण्याची दखल मिपाकरांनी घेतली १०० %. तुम्ही देऊ शकत असलेला सगळ्यात चांगला पुरावा दिला आहे आणि त्यानंतरचे श्रीगुरूजिंचे प्रतिसाद ते एखादी गोष्ट किती अ‍ॅक्सेप्ट करतात याचा पुरावा देणारे आहेत :) एखादी गोष्ट खोटी असेल तरी रेटून सांगायची आणि खरं असल्याचं भासवायची राजकारण्यांची कला काय असेल याचा थोडा अंदाज आला :)

In reply to by कपिलमुनी

याचाच पुरावा मागत आहे . मी एक तरी पुरावा दिला
हहपुवा. आआपकडून आलेले स्टेटमेंट म्हणजे पुरावा कधीपासून झाला? उद्या तुम्ही काँग्रेसच्या अधिकृत ईमेल आयडीवर ईमेल पाठवून विचाराल की २-जी तरंगलहरी वाटपात घोटाळा झाला होता का किंवा कोळसा खाण वाटप करताना भ्रष्टाचार झाला होता का? आणि त्यांचे उत्तर पुरावा म्हणून वापराल.
तुम्ही आम आदमी सेना आणि आप एकच आहे याचा पुरावा द्या. निसंदिग्ध , थर्ड पार्टी पुरावा द्या
. आम आदमी सेना व आआप हे एक नसून आम आदमी सेना ही आआपमधील लोकांनीच सुरु केलेली संघटना आहे हे मी सुरवातीपासूनच सांगत आहे. एक संघटना आहे व एक राजकीय पक्ष आहे. परंतु त्या राजकीय पक्षातीलच मंडळी या संघटनेत आहेत. भावना अरोरा ही एकाच वेळी आआपची सदस्य असून आम आदमी सेनेची सुद्धा सदस्य आहे. अशी 'दुहेरी निष्ठा' असलेले नेते सर्व पक्षात असतात. इथेही तसेच आहे. तरीही शंका असेल तर खालील वृत्त वाचा. http://www.indiasamvad.co.in/Special-Stories/INSIDE-STORY-Who-is-Bhawna… त्याच वृत्तातून, According to information, Bhawna Arora is the in-charge and member of Aam Aadmi Party's (AAP) rebel group Aam Aadmi Sena. Also, Aam Aadmi Sena's Punjab wing had sent Bhawna to launch an ink attack on Kejriwal. The woman claimed to be a member of AAP's Punjab wing and mentioned that the party has betrayed her.
बाकी एखाद्या पक्षाची अधिकृत भूमिका नाकारुन स्वत:चा खरे करणारा झोपलेला नसतो सोंग घेत असतो.
पुन्हा एकदा हहपुवा. २-जी तरंगलहरी घोटाळा बाहेर आल्यावर काँग्रेसची कपिल सिब्बलांनी त्यात घोटाळा झालाच नाही. झिरो लॉस झाला अशी काँग्रेसची अधिकृत भूमिका मांडली होती. ती भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याने न्यायालयाने स्वीकारली असती तर? एखाद्या पक्षाने मांडलेली भूमिका हे कोणीच पुरावा म्हणून विश्वास ठेवत नाहीत कारण कोणताही पक्ष नेहमी स्वतःचाच बचाव करतो व त्यासाठी संपूर्ण असत्य विधाने सुद्धा सांगितली जातात. झोपेचे सोंग तुम्हीच घेतले आहे. मुळात ज्या पक्षाचा अध्यक्ष वारंवार असत्यकथन करीत असतो त्या पक्षाची अधिकृत भूमिका कधीच विश्वासार्ह नसते.

In reply to by श्रीगुरुजी

http://www.indiasamvad.co.in/ च्या बातमीनुसार according to sources , according to information असे म्हणले आहे ते सोर्स काय आहे , कोण आहे याची खातरजमा नाही. आणि आख्खा नेट शोधून काय आणलीत तर http://www.indiasamvad.co.in/ यांची बातमी रिलायबल आणि आप ने सांगितलेले खोटे. आप ला फक्त आम आदमी सेना त्याचा अधिकृत भाग आहे का नाही तेच विचारला .त्यानी आम आदमी सेनाचा कार्यकर्ता आपचा अधिकृत सदस्य नाही हे सांगितला आहे हेआता तुम्हाला न्यायालयात जायचा असेल तर जा बॉ !

In reply to by कपिलमुनी

तुम्हाला थर्ड पार्टी पुरावा हवा होता तो मी दिला. तुम्ही मात्र थर्ड पार्टी पुरावा न देता आआपवाल्यांचे स्टेटमेंट हे पुरावा समजून त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत आहात. आआप पक्ष व त्यांच्या अध्यक्षासकट त्यांचे नेते हे असत्यकथन, बनावट चित्रफिती तयार करणे, खोटे आरोप करणे इ. साठी प्रसिद्ध आहेत. ते जे सांगत आहेत त्यावर कणभरही विश्वास ठेवता येणार नाही. भावना अरोरा ही आआपचीच सदस्य आहे याचा थर्ड पार्टी पुरावा मी दिला आहे. आता तुम्ही ती आआपची सदस्य नाही याचा थर्ड पार्टी पुरावा द्यावा ही नम्र विनंती.

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनींनी पुरावे देण्यासाठी श्रीगुरुजींचा केवढा पाठपुरावा केला. आत्ताचा शाई हल्ला झाल्याझाल्या केजरीवालांनी आरोप केला या हल्ल्यामागे भाजप आहे. तेव्हा ही बाई भाजपशी कशी संबंधीत आहे याचे पुरावे कपिलमुनींनी दिले तर श्रीगुरुजींचा मुद्दा लगेच बाद होईल. महामहीम केजरीवालांनी आत्तापर्यंत जेवढे जवढे आरोप केले, मग ते शाई/ चप्पल फेकणे, कानाखाली मारणे असो वा केंद्र सरकार काम करू देत नाही असा आरोप असो, शिबिआयनी टाकलेली धाड असो, त्या प्रत्येक वेळी कपिलमुनींनी एवढा पाठपुरावा करून पुरावे मागितले का केजरीवालांकडे? असतील तर ते पण इथे सदर करावेत.

In reply to by ट्रेड मार्क

छे छे! असल्या गोष्टींचे पुरावे ते कसे देतील? त्यांच्या दृष्टीने केजरीवाल म्हणतील तेच वैश्विक सत्य. मग ते कितीही असत्य का असेना. जर केजरीवाल म्हणत असतील की त्यांना थोबाडीत मारणारा भाजपचा होता, तर मग तो भाजपचाच होता. पिरियड. ते जर म्हणत असतील की त्यांच्यावर शाई फेकणारे व त्यांना थोबाडीत मारणारे भाजपचे होते, तर मग ते भाजपचेच होते. पिरियड.

In reply to by श्रीगुरुजी

दम काढा गुरुजी ! मी आप नै की भक्त नाही मी केजरीवालला पण चुकीचे म्हणतो. माझ्या खांद्यावर झेंडा नाही

In reply to by ट्रेड मार्क

ती महिला भाजपची आहे हा आरोप केजरीवालन् केलाय मी नाही . . त्यांचे आरोप मी का सिद्ध करु ? त्यांची धुणी त्यांनी धुवावी . केजरीवाल यांचा आरोप चुकीचा आहे कारण ती महिला भाजपची नाही .आम आदमी सेनाची आहे. केजरीवाल खोटा बोलत असतील तर तुम्ही पुरावे मागा.मला का मागताय ? बादवे त्यांनी मिपावर खोटा लिहीला तर त्यानाही मागेन माझा आक्षेप खोटे आरोप करण्यावर आहे.

In reply to by कपिलमुनी

भारी पळवाट आहे. म्हणजे पुरावे मागणे वगैरे तुम्ही फक्त मिपावरच करता तर. मला वाटला जसं आआप च्या अधिकृत इमेल आयडी वर विचारणा केलीत आत्ता तशी इतर वेळी पण केली असेल. असो। जाऊ दे तर मग.

In reply to by ट्रेड मार्क

मी पोलीटीकल कार्यकर्ता नाही. गुर्जींनी मागितला म्हणून मेलवर माहिती मागवली. बादवे तुम्ही मागा पुरावे कोणी थांबवला आहे ?

In reply to by कपिलमुनी

मुनीवर्य, तुम्ही आआपच्या ज्या अधिकृत ईमेल आयडीला ईमेल पाठवून माहिती विचारली होती तो इथे द्याल का? जाहिरातीत ते खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल का करीत आहेत ते विचारीन म्हणतो.

In reply to by श्रीगुरुजी

त्या इमेलवरून दिलेली माहिती खोटीच आहे असं तुमचं मत असतांना त्या इमेल आयडीचा काय उपयोग? त्यापेक्षा माहितीचा अधिकार वापरणं हा सोपा आणि खात्रीशीर उपाय होइल. बरोबर ना?

In reply to by नाव आडनाव

मी माहिती मागणारच नाही. जी वस्तुस्थिती आहे ती वरील लिंक्समध्ये दिलेलीच आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की दिशाभूल करणारी माहिती का देता असे विचारल्यावर ही मंडळी कशी सारवासारव करतात ते.

In reply to by मोदक

धन्यवाद! नर्सरीतील मॅनेजमेंट कोटा व कॅग ऑडिट हे दिल्ली सरकारचे दोन निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केलेले असताना व सर्वोच्च न्यायालयात याबाबतीतील खटला प्रलंबित असताना, दिल्ली सरकार वर्षपूर्तीच्या जाहिरातींमध्ये आम्ही हे केलं असे सांगून लोकांची दिशाभूल करणारे दावे का करीत आहेत असे मी वरील ईमेल आयडीवर ईमेल पाठवून विचारल्यावर खालील उत्तर आले.
There is nothing false published in ad provided by Delhi government. 1. AAP Government had taken a decision and published it as a government order. This decision has not ruled out by court. A stay has been brought to this decision for current academic year after some challenges to it by oppositions. This came after considering the delay in a process of courts final decision on completely scrapping the management quota. We have put our stand on the same and very much confident to win this case. 2: We request you to read the decision of Hon. Supreme court issued on 18th January 2016 about the CAG Audit of Delhi discoms. That will clarify the validity of our advertisement.
पहिला निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला असून नर्सरीसाठी मॅनेजमेंट कोटा या वर्षासाठी सुरूच राहील असा निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात आआपने अपील केले असून ते प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत "नर्सरीतील मॅनेजमेंट कोटा आमच्या सरकारने रद्द केला" हा जाहिरातीतील दावा चुकीचा ठरतो. आआप सरकारला सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागण्याचा कितीही आत्मविश्वास असला तरी जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत स्वतःची पाठ थोपटून घेण्यात अर्थ नाही. समजा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला तर आआप सरकार पुन्हा एकदा पूर्ण पान जाहिरात देऊन आपण जाहिरातीत चुकीची माहिती दिली अशी कबुली देणार आहे काय? दुसरा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यासंबंधी आपले म्हणणे मांडण्यास सर्वोच्च न्यायालयाने १८ जानेवारी २०१६ ला दिल्लीतील ३ वीज वितरण कंपन्यांना नोटिस पाठविली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ मार्चला आहे. उच्च न्यायालयाने कॅगने ऑडिट करण्याचा निर्णय रद्द केल्याने हे ऑडिट होऊ शकले नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने कॅगच्या ऑडिटला हिरवा कंदिल दाखविला तरच त्यानंतरच ते सुरु होईल. परंतु त्याबाबतीत आताच "वीज वितरण कंपन्यांमध्ये प्रचंड घोटाळा असून या ऑडिटच्या अहवालामुळे ते सिद्ध झाले आहे" असा आआपचा जाहिरातीत केलेला दावा चुकीचा ठरतो. जर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला तर आआप सरकार पुन्हा एकदा पूर्ण पान जाहिरात देऊन आपण जाहिरातीत चुकीची माहिती दिली अशी कबुली देणार आहे काय?

In reply to by श्रीगुरुजी

पहिला निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला असून नर्सरीसाठी मॅनेजमेंट
रद्द
अन
स्थिगिती
मधले अंतर आता आम्हाला तुम्हांस सांगावे लागेल काय गुरूजी??

In reply to by नाना स्कॉच

दोन्हीत फरक आहेच. परंतु नर्सरीतील प्रवेशासाठी मॅनेजमेंट कोटा रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने स्थगित केला असला तरी २०१६-१७ या वर्षासाठी मॅनेजमेंट कोटा सुरूच राहील असा आदेश दिलेला आहे. एक तर हा कोटा पुढील शैक्षणिक वर्षासाठी सुरूच राहणार आहे आणि तो रद्द होणे किंवा आहे तसा सुरू राहणे या दोन्ही शक्यता आहेत. अशा परिस्थितीत आपल्या वर्षपूर्तीच्या जाहिरातीत "आमच्या सरकारने नर्सरी प्रवेशातील मॅनेजमेंट कोटा रद्द केला" हे वाक्य दिशाभूल करणार आहे. वीज वितरण कंपन्यांचे कॅगकडून होणारे ऑडिट उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. बातमीत तसा स्पष्ट उल्लेख आहे. The Delhi High Court today cancelled the AAP government's decision to get the accounts of three private power distribution companies audited by the Comptroller and Auditor General (CAG). मुळात ते ऑडिट पूर्ण झालेलेच नव्हते व त्यामुळे त्याचा अहवालही कॅगने पूर्ण केलेला नाही. अशा अपूर्ण अवस्थेत असतानाच ती प्रकियाच रद्द झाली. त्यामुळे ऑडिट संबंधात जेवढे काम झालेले होते ते देखील रद्द झाले आहे. या निर्णयाविरूद्ध दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले असून तिथे ते प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत "Kejariwal proven right: CAG audit confirms scam of crores in private power distribution companies" हा जाहिरातीचा मथळा दिशाभूल करणारा आहे. या प्रकरणात देखील ऑडिटला मान्यता देणे किंवा ऑडिटला परवानगी नाकारणे हे दोन्ही निर्णय होऊ शकतात. समजा सर्वोच्च न्यायालयाने ऑडिटला परवानगी दिली तर कॅगला संपूर्ण ऑडिट पुन्हा एकदा पहिल्यापासून करावे लागेल. त्यामुळे पूर्वीचे अर्धवट काम आपोआपच निरूपयोगी ठरते. जर सर्वोच्च न्यायालयाने ऑडिटला परवानगी नाकारली तर वरील संपूर्ण जाहिरात खोटी ठरते.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपचा असा माहिती विचारण्यासाठी अधिकॄत इमेल आयडी आहे का? असेल तर तो देता का?

९९३

सध्या मिपावर दोनच विषय सगळ्या धाग्यांवर कुटल्या जातेत. स्त्रियांचा ओरगॅजम आणि केजरीवालचे शाईप्रकरण. दोन्ही चा लागल का निक्काल कदी... पुचता हूं उबा रै के चौकामदी. - तर्राट आठवले.

:)

:)

:)) १००० झालेत

१०००!

१७ फेब्रुवारी या दिवशी मिपावर इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र मिपाच्या ८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी धाग्याने स्पष्ट १००० प्रतिसाद मिळविले. 1

In reply to by होबासराव

ते धाग्याचीच पहिली २-३ वाक्ये चोप्य पस्ते केली ना.. म्हणून बाकी शब्दांबरोबर तो शब्द राहून गेला. माझ्या प्रतिसादात तो अनावश्यक आहे, हे खरे.

आगामी पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आणि २०१७ च्या उ.प्र. निवडणुकांवर डोळा ठेवुन कुमार विश्वास आप सोडणार आहे आणि भाजपा मधे प्रवेश करणार आहे अशा वावड्या उठत आहेत. जर असे झाले तर आपसाठी मोठा धक्का असेल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बीजेपी शाहणी असल्यास हे वासु पात्र दुरच ठेवलेले बरे! कारण ते आत येता धक्का आप पेक्षा आपल्यालाच बसण्याचा धोका जास्त आहे

केजरीवालच्या वर्षपुर्तीचा दुसरा धागा काढा. इथे भाजपच्याच प्रॉमिसेस्चं काय झलं त्याबद्दल चर्चा होऊ द्या. 'आपलं ठेवा झाकून दुसर्याचं पाहा वाकून' हे वागणं सोडा आता.

अरेवा गुरुजींचा धागा म्हणे आआप बद्दल असेल असे वाटले होते पण चक्क भाजपा बद्दल आहे की ! आणि एकुण मिपा प्रतिसाद संख्येत सध्या दोन नंबरवर आहे चार-सहा महिन्यात हा धागा पयला माझा नंबर म्हणेल तर नवल नाही. तेव्हा श्रीगुरुजींचा मिपाकर विवीध भेटवस्तुंनी सत्कार करतीलच. जाता जाता मे महीणा तसा अद्याप लांब आहे तरीपण मे महिण्यात धागा लेखाचे शिर्षक बदलण्याची आठवण संपादकांनी ठेवावी.

In reply to by कपिलमुनी

धागा मोदी सरकारबद्दल होता. परंतु एका प्रतिसादात आआपच्या वर्षपूर्तीच्या जाहिरातींबद्दल लिहिले गेल्याने विषय आपोआपच तिकडे वळला.

हरयानातील जाटांना राखीव जागा देण्यासाठी अचानक आंदोलन सुरू झाले आहे. अचानक सुरू झालेल्या आंदोलनाचे टायमिंग संशयास्पद आहे. युपीए सरकारने मे २०१४ मध्ये पायउतार होण्यापूर्वी व आचारसंहिता लागू होण्यापूर्वी २०१४ च्या सुरवातीला घाईघाईत अचानक जाटांसाठी राखीव जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यामागे मतांची बेगमी करणे हा एकमेव उद्देश होता. त्याविरूद्ध उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला. त्याविरूद्ध रालोआ सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर मे २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जाटांचा समावेश इतर मागासवर्गियात करण्याच निर्णय रद्द केला व जाटांसाठी असलेल्या राखीव जागांचा निर्णयही रद्द केला. एकदा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेऊन निर्णय घेतल्यावर फेब्रुवारी २०१६ मध्ये अचानक पुन्हा एकदा जाटांसाठी राखीव जागा मागण्याचे आंदोलन सुरू होणे आश्चर्यकारक आहे. राखीव जागांचा निर्णय न्यायालयात टिकणार नाही हे स्पष्ट दिसत असताना आंदोलन करून हिंसाचार करण्याचे कारणच काय? याच महिन्यात संसदेचे अंदाजपत्रकीय अधिवेशन सुरु होत आहे. या आंदोलनाचे निमित्त करून हेही अधिवेशन उधळून लावण्याची योजना यामागे असावी का? किंवा नुकत्याच यशस्वी झालेल्या मेक इन इंडिया उपक्रमामध्ये खोडा घालण्याचा हा प्रयत्न असावा का? अजून एक वेगळी शक्यता आहे. हरयानाच्या इतिहासात प्रथमच मनोहरलाल खट्टर हे जाट नसलेले मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे जाटांच्या अस्मिता दुखावल्या गेल्या असाव्यात. यापूर्वी सातत्याने देवीलाल, भजनलाल, बन्सीलाल, भूपिंदरसिंह हूडा, चौताला इ. जाट असलेले मुख्यमंत्री हरयानाला मिळाले. अचानक जाट नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या मार्गात अडथळे आणण्यासाठी हे आंदोलन असावे का? न्यायालयाने यापूर्वी आंध्र प्रदेशातील मुस्लिम आरक्षण, महाराष्ट्रातील मराठा आरक्षण, उत्तरेतील जाट आरक्षण इ. राजकीय निर्णय रद्द केले आहेत. तरीसुद्धा पुन्हापुन्हा तोच खेळ करून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, हिंसाचार, अशांतता पसरविणे इ. करणे सुरू आहे.

In reply to by कपिलमुनी

http://indianexpress.com/article/india/india-news-india/jat-reservation… कोणत्याही जातीने राखीव जागा मागितल्या की तसे करणे हे कायदेशीर व घटनात्मकरित्या अशक्य आहे हे माहित असूनसुद्धा कोणताही पक्ष त्याला विरोध करू शकत नाही. जर एखाद्या पक्षाने एखाद्या विशिष्ट जातीला राखीव जागा द्यायला विरोध केला तर ती राजकीय आत्महत्या ठरते. त्यामुळेच राखीव जागांचा निर्णय न्यायालयात टिकणार नाही याची पूर्ण जाणीव असतानासुद्धा राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेऊन तात्पुरता तोडगा काढला जातो. यथावकाश कोण तरी न्यायालयात जाऊन तो निर्णय रद्द करून आणतो. राजकीय फायद्यासाठी हा खेळ पुन्हापुन्हा खेळला जातो व त्यात अगदी ठरलेल्या चाली होऊन खेळाचा शेवट नेहमीच न्यायालयात होऊन खेळ संपतो. कालांतराने हा खेळ पुन्हा सुरू होतो व अपेक्षित शेवट होऊनच खेळ संपतो. आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजात अशांतता माजविणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, हिंसाचार, एखाद्या विशिष्ट जातीला/धर्माला भडकाविणे हे प्रकार सर्व राजकीय पक्ष बंद करतील तो सुदिन.

In reply to by श्रीगुरुजी

आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजात अशांतता माजविणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, हिंसाचार, एखाद्या विशिष्ट जातीला/धर्माला भडकाविणे हे प्रकार सर्व राजकीय पक्ष बंद करतील तो सुदिन. >> ह्या सर्व मध्ये भाजप आहे ना?

In reply to by तर्राट जोकर

भाजप एकंदरीत प्रतिक्रियावादी पक्ष आहे. भाजप यात प्रतिक्रिया मोड मध्ये असतो. म्हणजे मुस्लिमांना राखीव जागा द्यायचा प्रयत्न केला तर भाजप त्याला विरोध करतो. एम एफ हुसेन सारख्यांनी हिंदू देवदेवतांची आक्षेपार्ह चित्रे काढल्यावर भाजप त्याला विरोध करतो. परंतु भाजपच्या विरोधामुळे, भाजपचे विरोधक मूळ प्रश्न आपोआपच हिंदू वि. मुस्लिम असा करून टाकतात व त्यातूनच अशांतता माजते . वास्तविक भाजपचा फक्त एम एफ हुसेनच्या आक्षेपार्ह चित्रांना विरोध होता. परंतु असे चित्र रंगविले गेले की भाजप हा अभिव्यक्ती, कलाकाराचे स्वातंत्र्य इ. च्या ठाम विरोधात आहे. धर्माच्या आधारावर सवलती देण्याला भाजपचा विरोध आहे. परंतु हा विरोध फक्त सवलती देण्याला असला तरी भाजप हा त्या धर्माच्या संपूर्ण विरोधात आहे अशी हूल उठवून वातावरण तापविले जाते व त्यातून समाजात अशांतता माजविणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, हिंसाचार, एखाद्या विशिष्ट जातीला/धर्माला भडकाविणे हे प्रकार आपोआपच सुरू होतात. त्यामुळे रूढार्थाने भाजप यात नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बघा बरं गुरुजी. आता ह्या विषयावर मी धागा काढवे, तुम्ही तिथे चर्चेला याल अशी अपेक्षा करतो. त्याआधी हे फक्त प्रतिक्रियावादी म्हणजे काय त्याबद्दल थोडं विस्ताराने सांगा.

In reply to by तर्राट जोकर

प्रतिक्रियावादी म्हणजे काय हे आधीच्या प्रतिसादात ३-४ उदाहरणे देऊन लिहिले आहे. तुम्ही धागा काढा, तिथे सविस्तर लिहितो.

In reply to by श्रीगुरुजी

प्रतिक्रियावादीचे उदाहरण ... बाबराने १४ व्या शतकात बांधलेली मशीद भाजपाप्रेमीनी २१ व्या शतकात पाडणे. बरोबर ना गुरुजी ?

In reply to by श्रीगुरुजी

फडणवीस यांनी आज मराठा समाजाला २५% पर्यंत देण्याचा आश्वासन दिलाय. राजनाथ सिंगांनी सुद्धा आरक्षण देणार असे कबूल केले आहे भाजपा नेत्यांची भूमिका काय आहे? आरक्षण शक्य नाही तर खोटी आश्वासन का ?

In reply to by कपिलमुनी

जाट, मराठा, पटेल इ. जातींना आरक्षण देता येणे शक्य नाही हे सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे. आरक्षण मागणार्‍यांनासुद्धा ते माहिती आहे. आरक्षण आंदोलन हे एक राजकीय आंदोलन आहे व त्यावर राजकीय तोडगा हेच उत्तर आहे. आरक्षणाचे निमित्त करून स्वतःचे महत्त्व वाढविणे व सत्ताधारी पक्षाला पेचात पकडणे या राजकीय खेळाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणे व आंदोलन थंड करणे हेच योग्य राजकीय उत्तर आहे. आपण आरक्षण देऊ शकणार नाही हे सत्ताधारी पक्षाला पक्के माहित असते व सत्ताधारी पक्षाला आरक्षण देता येणे शक्य नाही हे आरक्षण मागणार्‍यांना पक्के माहित असते. हा एक राजकीय खेळ असल्याने त्यावर उत्तर हे राजकीयच असते.

In reply to by कपिलमुनी

मुनिवर आताच झालेल्या बिहारच्या निवडणुका पूर्वी रा स्व संघाचे श्री मोहन भागवत इतर मागासवर्गीयांच्या राखीव जागांचा पुनर्विचार करायला पाहिजे म्हणाले तर त्यांच्या वर आणि सगळ्या भाजप नेत्यांवर डावे, हिरवे. निळे, आडवे, तिडवे असे समस्त लोक मध्माशांसारखे तुटून पडले आणि बिह्हार मधील भाजपच्या पराभवाला ते एक कारण आहे असे म्हणतात. असे असताना कोणता पक्ष साधन शुचीतेसाठी आत्महत्या करेल? मुळात हरयाणात "जाट आरक्षण" आणि महाराष्ट्रात "मराठा आरक्षण" हे कॉंग्रेसने आपल्या मावळत्या काळात न्यायालयाकडून मान्यता मिळणार नाही हे स्पष्ट दिसत असूनहि "मतांवर डोळा" ठेवूनच दिले होते. टी एन सेशन स्पष्टपणे म्हणाले होते कि एकदा तुम्ही आरक्षण दिले कि ते काढून घेणे तुमच्या हयातीत शक्य होणार नाही. भाजपने "उगाच वास्तववादी" होऊन आत्महत्या करावी अशी आपली अपेक्षा आहे का? राजकारणात करावी लागणारी हि स्पष्ट तडजोड आहे.