Skip to main content

बाबासाहेब पुरन्दरे यान्ना "महाराष्ट्रभूषण" पुरस्कार

गुरुवार, 14/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ख्यातनाम इतिहासतज्ज्ञ श्री. ब.मो. ऊर्फ बाबासाहेब पुरन्दरे यान्ना महाराष्ट्र सरकारने "महाराष्ट्रभूषण" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे जाहीर केले आहे.९३ वर्षीय बाबासाहेबान्नी आपले जीवन शिवचरीत्राला वाहून घेतले आहे.वर्षानुवर्षे अनेक गावातून्,शहरातून्,गडान्वर अहोरात्र भ्रमन्ती करुन त्यान्नी असन्ख्य ऐतिहासिक पुरावे गोळा करून अस्सल शिवचरीत्र लिहिले.अत्यन्त ओघवत्या शैलीत लिहिलेल्या प्रभावी भाषेमुळे हे शिवचरीत्र घराघरात पोचले. बाबासाहेबान्न्नी मराठी माणसान्ना शिवचरीत्राचे वेड लावले.नुसते शिवचरीत्र लिहून ते थाम्बले नाहीत तर आजवर शिवचरित्रावर असन्ख्य व्याख्याने देऊन त्यान्नी श्रोत्यान्ना मन्त्रमुग्ध करून सोडले.शिवचरीत्रावर आधारीत जाणता राजा हे महानाट्य लिहून हेच शिवचरीत्र दैदीप्यमान स्वरूपात स्टेजवर आणले. बाबासाहेबान्नी १९५३ साली झालेल्या दादरा,नगर,हवेली भागान्च्या स्वातन्त्र्यसन्ग्रामात भाग घेतला होता.सुधीर फडके,बाबासाहेब अशा सव्वाशे जणान्नी या भागावर सशस्त्र हल्ला करून तिथून पोर्तुगीज सैनिकान्ना पिटाळून लावून हे भाग पोर्तुगिजान्च्या तावडीतून मुक्त केले आहेत. काही टपोरी फॅसिस्ट सन्घटना हा पुरस्कार बाबासाहेबान्ना देण्यास विरोध करत आहेत्.परन्तु यातुन त्यान्चा कोतेपणा,जातीय वृत्ती व अज्ञानच दिसत आहे.अशा थोर इतिहासकाराला महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिल्याने या पुरस्काराचीच शान उन्चावली आहे हे नक्की.या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र सरकारचे व बाबासाहेबान्चे अभिनन्दन व बाबासाहेबांना विनम्र अभिवादन.

वाचने 6823
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

बाबासाहेबांचे अभिनंदन. इतका थोर आणि विद्वान माणूस महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्रीयन लोकांचे भाग्यच.

बाबासाहेब पुरंदरे यांचा कार्याचा गौरव महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्काने होणे ही खूपच चांगली गोष्ट आहे. शेवटच्या परिच्छेदातला उल्लेख टाळून काही प्रवृत्तींना अनुल्लेखाने मारले असते तर अधिक बरे झाले असते असे मला वाटते.

शिवचरित्र हा विषय महाराष्ट्रात नेहमीच अगदी पॉप्युलर होता. पण बाबासाहेबांमुळे त्याची पॉप्युलॅरिटी एकदम गगनाला भिडली हे नाकारता येणार नाही. मूळ कागदपत्रे उजेडात आणून त्यांआधारे इतिहासाची मांडणी करणे जितके आवश्यक तितकेच पुरंदरेस्टाईल इतिहासाचे कथाकथन हेही आवश्यक आहे. इतिहासाची आवड लागण्यासाठी पुरंदर्‍यांसारख्यांचे महत्त्व अफाट आहे. त्यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार जाहीर होणे अगदी सुयोग्य आहे. त्यांना भेटायला मी एकदा एकटाच त्यांच्या घरी गेलो होतो, २००७ साली १७/१८ मार्च रोजी. सकाळी १० ते १०:३० या वेळेत भेटलो त्यांच्या त्या हॉलमध्ये. अगदी व्यवस्थित बोलले, शुभेच्छा दिल्या. एक पेढा खायला दिला, स्वाक्षरीही दिली आणि "पुन्हा या, अवश्य या, वारंवार या" अशा शब्दांनी निरोप दिला. त्यांची सही तारखेनिशी जपून ठेवली आहे. दुसर्‍यांदा काही मित्रांबरोबर गेलो होतो तो २००८ रोजी ऑगस्ट महिन्यात, नागपंचमीच्या दिवशी. तेव्हाच त्यांचा वाढदिवस होता, विश्रामबागवाडा आणि मग पुरंदरेवाडा असे भेटलो. तेव्हाही अगदी छान बोलले, गर्दी असूनही आम्हांला थोडा वेळ दिला हे महत्त्वाचे! त्या प्रसंगीचा फोटोही आहे. कसलीच ओळखदेख नसताना आमच्यासारख्या फडतुसांना वेळ देणार्‍या आणि चार चांगले शब्द बोलून प्रोत्साहन देणार्‍या या माणसाचा मी मोठा चाहता आहे. त्यांना लंबी उमर लाभो.

In reply to by बॅटमॅन

बाबासाहेब पुरंदरे यांचे अभिनंदन.
मूळ कागदपत्रे उजेडात आणून त्यांआधारे इतिहासाची मांडणी करणे जितके आवश्यक तितकेच पुरंदरेस्टाईल इतिहासाचे कथाकथन हेही आवश्यक आहे
सहमत. परंतु, पुरंदरे सोडाच पण ऐतिहासिक कादंबर्‍यांनाच इतिहास मानणारा समाज, हा भेद ध्यानात घेईल?
इतिहासाची आवड लागण्यासाठी पुरंदर्‍यांसारख्यांचे महत्त्व अफाट आहे
सहमत. इतिहासाची आवड लागण्यासाठी आणि तेवढ्यापुरतेच, हेही लक्षात घेणे जरूरीचे.

In reply to by सुनील

इतिहासाची आवड लागण्यासाठी आणि तेवढ्यापुरतेच, असहमत. पुरंदर्‍यांनी लेखन कश्याप्रकारचे केले आहे हे मह्त्वाचे आहे हे मान्य पण ते लेखन केवळ गृहितकांवर आणि गावगप्पांवर आधारित नाही हे देखील मान्यच करावे लागेल. त्यामागे सखोल अभ्यास आहे आणि निर्विवाद विश्लेषण आहे त्यानंतर त्यांनी ते कथाकथन स्वरुपात लोकांसमोर आणले म्हणुन त्या अभ्यासाला उणेपण येत नाही. त्यामुळे "तेवढ्यापुरतेच" या शब्दाल आक्षेप आणि असहमती.

In reply to by मृत्युन्जय

गावगप्पांवर आधारित नसले तरी लेखनावरून एकदम भक्तीचाच वास येतो. ती खरेतर पुरंदरे बखरच म्हणावयास हवी. तिच्यात सटल बायस आहेत, नाही असे नाही. उदा. देवगिरीची लूट इ. चे जे वर्णन आहे ते पूर्ण सांगोवांगीवर लिहिलेल्या फारसी साधनांवर विसंबून लिहिले आहे. त्यातील विसंगती ब्रह्मानंद देशपांड्यांनी सप्रमाण दाखवून दिलेली आहे. शिवाय भाषेच्या फुलोर्‍याच्या नादात ब्रिगेडींच्या हाती उगीच कोलीत मिळेल असेही शब्द वापरल्या गेले आहेत. ते एक असोच. इफ आयॅम नॉट राँग, संभाजीराजांच्या बंडाचाही तितका समाचार घेतलेला नाहीये. ते चेकवले पाहिजे जरा. त्यामुळे इतिहासाची गोडी लागण्यासाठी पुरंदरे द बेस्ट. पण पुढे जाऊन ज्यांना 'नेमके सत्य' जाणायचे आहे त्यांच्याकरिता ते उपयोगी नाही. मेहेंदळ्यांचे शिवचरित्र वाचल्यावर कल्पना येते की पुरंदर्‍यांचा शिवाजी आणि समकालीन कागदपत्रांमधून उभा राहणारा शिवाजी हे एक नव्हेत. पुरंदर्‍यांचा शिवाजी म्हणजे जणू शून्यातून विश्व निर्माण करणारा विश्वामित्र आहे. ते चित्र किती मिसलीडिंग आहे, आणि शिवाजीराजांच्या उपक्रमांचे नीट आकलन होण्याकरिता त्यांच्या अगोदरचे आणि त्यांच्या वेळचे राजकारण समजण्याकरिता किती गरजेचे आहे ते मेहेंदळे आणि इतर संशोधकांचे लेखन वाचून समजते. शिवाजीला त्या चौकटीत बसवायला ती चौकट अगोदर नीट समजली पाहिजे. ते पुरंदर्‍यांच्या चरित्रावरून नीट आजिबात समजत नाही. अर्थात, पुरंदरे आणि मेहेंदळे या दोघांचे उद्देश वेगळे, त्याप्रमाणे लेखनपद्धतीही वेगळी. शिवाय बहुसंख्य जनतेला जे पाहिजे ते देण्यात पुरंदरे यशस्वी झालेत आणि त्या विषयाची पॉप्युलॅरिटी अखंड ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे यात शंका नाही. बाकी, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून कुणी बोलायचं काम नाही. मृत्युंजय स्वतः असे बोलतील असे नाही पण तसे बोलणारे लोक आहेत कैक. त्यांना एकच सांगायचे आहे की एकेरी बोलणे म्हणजे आदर नसणे हा जावईशोध लावलात कुठून? आईला, मामाला, अगदी रामकृष्णांसारख्या देवांनाही एकेरीच संबोधले जाते. मग तो शिवाजी वगैरे म्हटले तर काय बिघडले? मेहेंदळे सरांनी ही भूमिका आपल्या शिवचरित्राच्या प्रस्तावनेत अगोदरच स्पष्ट केलेली आहे.

In reply to by बॅटमॅन

शिवाय भाषेच्या फुलोर्‍याच्या नादात ब्रिगेडींच्या हाती उगीच कोलीत मिळेल असेही शब्द वापरल्या गेले आहेत. एवढे सोडुन बाकी सग्ळ्याशी सहमत. बी ग्रेडी अक्कल्शून्य आहेतच शिवाय घातकी सापासारखे आहेत. बाबासाहेबांनी काहिही शब्द वापरले असते तरी हे लोक मुद्दाम वाकड्यात शिरलेच असते. काही नाही तर "दादोजींची शिवरायांवर वडिलासारखी माया होती " असल्या वाक्यांवर घसरले असते. सध्या बी ग्रेडींनी ज्या वाक्य्रचनेवर आक्षेप घेतला आहे ते बघता तर हसावे की रडावे हेच कळत नाही आहे. जगात कोणी इतकी बाष्कळ आणि बिनडोक आर्ग्युमेंट करु शकते यावरच आधी विश्वास बसला नाही. गरळच ओकयची म्हटल्यावर कशीही ओकया येते रे वाघुळा.

In reply to by बॅटमॅन

सहमत. + तर काय बिघडले? नक्कीच बिघडत काही नाही, पण इतिहासातले काही उल्लेख एकेरी आले तर वेगळं मात्र नक्की वाटतं - उदा. संभाजी लढला, सावरकर म्हणाला, अंबेडकर आला, फुले गेला ई. माझ्या सारख्या सामान्य माणसाने एकेरी उल्लेख केला / नाही केला म्हणून या लोकांनी केलेलं काम मात्र नक्कीच कमी होत नाही.

In reply to by बॅटमॅन

शिवाजी ह्या नावात "जी" आल्याने आधीच ते आदरार्थी होत नाही का? म्हण्जे हा एकेरी उल्लेख तसाही कसा असु शकतो? बाकी प्रतिसाद उत्तम!

In reply to by पिलीयन रायडर

अम्म, नॉट एग्झॅक्टलि. त्यावेळची -जी प्रत्ययांत नावे एकेरी वापरण्याची लकबही होती. ओरिजिनली मुद्दा बरोबर आहे, पण तशी लकब असल्याने ती नावे एकेरी वापरलि जात. तत्कालीन मराठी व फारसी कागदपत्रांत याची उदा. आहेत. स्पेसिफिक उदा. जरा शोधून पाहिले पाहिजे.

बाबा साहेबांचे अभिनन्दन. महाराष्ट्रात काही राजनेता ब्राह्मण द्वेष आधारित राजनीती करतात. आपली राजनितिक पोळी भाजण्यासाठी पुरंदरे यांना पुरस्कार देण्याचा विरोध करीत आहेत. पुरंदरे यांना पुरस्कार म्हणजे शिवाजी राजेंच्या गौरवच.

In reply to by विवेकपटाईत

पुरंदरे यांना पुरस्कार म्हणजे शिवाजी राजेंच्या गौरवच. --हे जरा चुकतय

हे अन असे लोक चुकीच्या देशात जन्माला आले ... शिवचरित्र आणि इतिहास ह्या विषयावर आयुष्य वेचलेल्या ह्या माणसाला ह्या वयात काय काय बघायला ऐकायला लागते आहे ...आणि ते हि अशा विषयात कि जो त्याचा श्वास आहे ..आणि अशा लोकांकडून ज्यांनी हातात कधी पाटी पेन्सिल धरली आहे का नाही माहिती नाही ... ..असो ..

बाबासाहेब पुरंदर्‍यांनी शिवाजी महाराजांची भक्ती केली. आपले अमोघ वक्तृत्व त्यांनी शिवशाहीर ह्या भूमिकेतून मांडले. इतिहास, गडकोट ह्याविषयीचे त्यांचे ज्ञान अफाट आहे. एक तटस्थ इतिहासतज्ञ नव्हे तर एक शिवभक्त ह्या भूमिकेतून त्यांनी इतिहास मांडला आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आणि जगात अन्य जागी जाऊन त्यांनी आपले शिवशाहिरी गायली आहे. एका थोर व्यक्तीमत्वाचा इतिहास इतक्या लोकांपर्यंत पोचवल्याबद्दल सर्व शिवभक्त त्यांचे ऋणी असतील ह्यात शंकाच नाही. अलीकडे अनेक बाबतीत त्यांना संभाजी ब्रिगेडसारख्या जात्यंध, उन्मत्त, हिंसक संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे ब्राह्मण आहेत हे त्यामागचे एक मोठे कारण आहे हे येर्‍यागबाळ्यालाही कळेल. पण ह्या आगलावू संघटनांनी घेतलेल्या आक्षेपांना ताबडतोब उत्तर का दिले जात नाही? उदा. दादोजी कोंडदेव. ह्यांचे इतिहासातील नक्की स्थान काय? महाराजांचे गुरु नाही तर मार्गदर्शक तरी होते का? पुरंदर्‍यांनी त्यांच्या पुस्तकात दादोजींचे इतके गुणगान केले आहे तर मग त्याचे ऐतिहासिक पुरावे का नाही देत? तीच गोष्ट रामदासांची. रामदास आणि शिवाजीं ह्यांचा काहीही संबंध नाही. उलट रामदास हा औरंगजेबाचा हेर होता अशी ब्रिगेडची विचारसारणी आहे. शिवाजीमहाराजांचा खरा गुरू हा तुकाराम. अर्थातच ह्यामागचा छुपा जातीय कावा समजणे अवघड नाही. त्याचेही खंडन केले जात नाही. अशी मिठाची गुळणी धरून बसणे संशयास्पद वाटते. जर हा चुकीचा इतिहास असेल तर निदान ते मान्य करावे. पण तेही नाही. इतिहासाची खडान खडा माहिती असणार्‍या जाणकाराने असे गप्प का बसावे?

In reply to by हुप्प्या

याचे खंडन अनेकांनी केले आहे. इथे मिपावरही. मीही करायचो. पण मला त्यातील फोलपणा कळला असल्यामुळे मी ते आता करीत नाही. ब्रिगेडींना त्यांच्या नशिबावर सोडणे हा उत्तम मार्ग आहे...... जेथे मराठीजनच महाराष्ट्रात कासवाच्या वेगाने अल्पसंख्यांक होत चालले आहेत (या बद्दल तक्रार नाही. ज्या समाजाने फालतू लोकांच्या नादी लागून आपले धंदे, कौशल्ये संपविली तेथे हाच न्याय लागू होणार) तेथे यांना कोण किंमत देतय........

In reply to by हुप्प्या

त्याचेही खंडन केले जात नाही. अशी मिठाची गुळणी धरून बसणे संशयास्पद वाटते. जर हा चुकीचा इतिहास असेल तर निदान ते मान्य करावे. पण तेही नाही. इतिहासाची खडान खडा माहिती असणार्‍या जाणकाराने असे गप्प का बसावे?
काय गरज आहे? कुणाला गरज आहे? शिवाजी हा मराठ्यांचा, तुकाराम हे मराठ्यांचे, रामदास ब्राम्हणांचे, दादोजी ब्राम्हणांचे वगैरे वाटणी करून टाकल्यावर शिवाजी महाराजांचे गुरू तुकाराम होते की आणखी कुणी मराठा गुरू होते ते मराठा जातीचे लोक पाहून घेतील. आता तर गोष्ट अशी आहे, की शिवाजी महाराज प्रातःवंदनीय वाटत असूनही या वादामुळे त्यांचा एक फोटो घरात लावायचा तर तितकासा उत्साह वाटत नाही. मराठ्यांना या वादातून नक्की काय साधायचं आहे हे माहित नाही कारण शिवाजीचा गुरू कोण हा वाद पोटाला देत नाही. पण बरेच ब्राम्हण आता थोरल्या बाजीराव पेशव्यांचा फोटो लावतील तर आश्चर्य वाटणार नाही. आणि मग शिवाजी महाराजांबद्दल संशोधन करणारे इतिहास संशोधक बाकी बाबतीत संशोधन करायकडे वळतील तर त्या क्षेत्राची जी हानी होईल ती कशी सुधारायची हे मराठा पहातीलच.

In reply to by काळा पहाड

आता तर गोष्ट अशी आहे, की शिवाजी महाराज प्रातःवंदनीय वाटत असूनही या वादामुळे त्यांचा एक फोटो घरात लावायचा तर तितकासा उत्साह वाटत नाही.
अगदी असेच म्हणतो. :( या ब्रिगेडी स्युडो-इतिहासकारांची जमात नष्ट होईल तो सुदिन.

In reply to by हुप्प्या

पुरंदरे मेहेंदळे, बेडेकर, बलकवडे, इ. अनेक संशोधकांनी या ब्रिगेडींचा कायम विरोधच केलेला आहे. जेम्स लेन प्रकरणी जे पत्र ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडिया यांना पाठवण्यात आले त्यात पुरंदर्‍यांचीही सही होती. तरी स्पेसिफिक पुरंदर्‍यांनी हे एक उदा. सोडून बाकी जास्त विरोध केलेला दिसत नाही हेही खरेच. ती धुरा बाकीच्यांनीच जास्त सांभाळलेली आहे. काही उदाहरणे माझ्या नजरेतून निसटली असतील तर नजरेस आणून द्यावीत ही विनंती.

वयाच्या ९३ व्या वर्षी का होइना पण मिळणार्‍या योग्य पुरस्काराचे खरच कौतुक!!! हार्दीक अभिनंदन!

मूळ कागदपत्रे उजेडात आणून त्यांआधारे इतिहासाची मांडणी करणे जितके आवश्यक तितकेच पुरंदरेस्टाईल इतिहासाचे कथाकथन हेही आवश्यक आहे. इतिहासाची आवड लागण्यासाठी पुरंदर्‍यांसारख्यांचे महत्त्व अफाट आहे. त्यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार जाहीर होणे अगदी सुयोग्य आहे. +१०० माननिय बाबासाहेब पुरंदरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! ======== @ लॉर्ड फॉकलन्ड : त्यांनी = tyAMnI श्रोत्यांना = shrotyAMnA

माननिय बाबासाहेब पुरंदरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! @बॅटू बाबासाहेबांना भेटण्याचे भाग्य तुला लाभले ही फार मोलाची गोष्ट आहे ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आरटीओ दलालांकडून वर्षांला ८०० कोटींपेक्षा जास्त फस्त! मुंबईत ‘पंधरावं वरीस धोक्याचं', १५ वर्षांखालील १८५ मुलींचा गर्भपात

मी खुप भीत भीत हा धागा उघडला.. चेपुवर हा पुरस्कार जाहीर झाल्यापासुन जे काही माकडचाळे चालु आहेत ते पाहुन संताप संताप होत होता.. म्हणलं असलाच धागा इथेही आला की काय.. पण हुश्श्श्श्श... बाबासाहेबाना हा पुरस्कार आधीच मिळायला हवा होता खरं तर... पण असो.. महाराष्ट्राचे मनःपुर्वक अभिनंदन की बाबासाहेबांसारखा मोठा माणुस आपल्याला लाभला!