Skip to main content

देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?

लेखक ग्रेटगणेश यांनी गुरुवार, 30/04/2015 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ? (सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.) आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण ते मुलं ज्या वातावरणाचा भाग असतं, त्या वातावरणाचे प्रतिबींब त्याला मातृभाषेत, तीच्या शब्दांत दिसत असतं. ते मुल त्याचा अनुभव घेऊ शकतं, त्यातील साम्य किंवा विरोधाभास त्याला जाणवत राहातो व त्यातूनच पुढे ते मुल 'असं का?' हा विचार करायला लागतं. हे इंग्रजी भाषेतील शिक्षणात अभावानेच होताना आढळतं. ‘A’ म्हणजे Apple हे ते मुल शिकते ते घोकंपट्टीने पण ते ‘अॅपल’ त्याला आपल्या वातावरणात पुस्तक आणि ते विकणारा भय्या यांच्या व्यतिरीक्त कुठेच आढळत नाही. या उलट आंबा ते झाडावर पाहू शकतं. मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते. या पार्श्नभूमीवर नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या मराठी चित्रपटातील एक प्रसंग विचार करण्यास लावणारा आहे. चित्रपटात डॉ. आमटेंचे सहकारी आदीवासी मुलांना शिकवायचा प्रयत्न करतात असे दृष्य आहे. मुल त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार एकमेकांत मजा करण्यात गुंतली आहेत. शिक्षक काय शिकवतायत आणि ते काय बोलतायत याकडे मुलांच अजिबात लक्ष नाहीय कारण त्यांच्या दृष्टीने काहीतरी अगम्य असे शिक्षक बोलत आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते त्यांनी कधीच पाहिलेलं वा अनुभवलेलं नाहीय. शेवटी कंटाळून ती मुल शाळेतून सुंबाल्या करण्याची सुरुवात करतात तेंव्हा डॉ. आमटे शिक्षकांना सांगतात की अरे त्या मुलांना त्यांच्या शब्दांत, त्यांना समजेल अशा भाषेत शिकव. या प्रसंगाला थिएटर मध्ये मोठा हशा (लाफ्टर) मिळतो व हा प्रसंग विनोदी प्रसंग म्हणून जमा होतो. उद्या हा प्रसंग एखाद्या पुरस्कारासाठी 'सर्वात चांगले विनोदी दृष्य' म्हणून नॉमिनेट झाले तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही कारण आपण आता या विनोदी प्रसंगाचे अविभाज्य भाग झालो आहोत. इंग्रजी वा इतर कोणतीही भाषा व्यक्तीनत्व विकासासाठी हातभार लावते यात कोणतीही शंका नाही. पण ती श्रेष्ठ आणि आपली भाषा मागासलेली हा विचार मात्र कोतेपणाचा आहे. इंग्रजी भाषेत महान ग्रंथसंपदा निर्माण झाली, निरनिराळे शोध लागले, औद्यागीक क्रांती झाली याचं श्रेय नि:संशय त्या भाषेचंच आहे. पण हे सर्व लेखक, कवी वा शास्त्रज्ञ यांची 'मातृभाषा' इंग्रजी किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे आपण लक्षात घेत नाही. परकीय भाषेत संपूर्ण शिक्षण घेऊन एखाद्याने एखादा मोठा शोध लावला व तत्वज्ञान मांडले असे माझ्या अद्याप वाचनात व ऐकण्यात आलेले नाही. त्याच्याही अगोदर आपल्या देशात शुन्याचा क्रांतिकारी शोध लागला, ग्रह-तारे यांच्याविषयी माहिती आपल्याला व अरबांना पाश्चात्यांच्या खूप पुर्वीपासून होती, आयुर्वेदासारखं शास्त्र आपल्या देशात फारच पुर्वी विकसीत झालेले होते. कालीदासाचे मेघदूत, रामायण, महाभारत ही महाकाव्ये ही जगभर मान्यता पावलेली होती आणि ही सर्व त्याकाळी प्रचलीत असलेल्या संस्कृत या समृद्ध 'देशी' भाषेतच आहेत. भाग्वाद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झाली व भगवद्गीता तत्वाज्ञानावरचा जगातला एक जुना व अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे तो संस्कृत भाषेतच आहे. आपले सहीत्य, कलाकृती, शास्त्र इंग्रजी भाषेतल्यापेक्षा पुर्वीचे व काकणभर सरसच आहेत. इथे भाषांची तुलना करण्याचा प्रयत्न मी करत नाही तर प्रतयेक भाषा ही परिपूर्ण असतेच तर मला एवढेच म्हणायचे आहे कि ज्ञान्साधानेसाठी मातृभाषा हि इतर कोणत्याही भाषेसाठी अधिक योग्यच नव्हे तर एकमेव असते. आपल्या देशात प्रथम मोंगल व नंतर इंग्रजांच्या राजवटीत आपल्या देशातील भारतीय भाषांची पीछेहाट झपाट्याने होऊ लागली. इंग्रजांना तर त्यांचे साम्राज्य शाबूत ठेवण्यासाठी बंदूकीपेक्षा भाषेने आधार दिला. इंग्लीश शिक्षणतज्ञ मेकॅले याच्या सुपीक डोक्यातून जन्मलेली शिक्षण पद्धती इंग्रज सरकारने देशात लागु केली. ही शिक्षण पद्धती आपली म्हणजे स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढु नये, किंबहूना त्यांनी विचारच करू नये अशा पद्धतीने आखलेली होती. इंग्रजांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा 'रोबो' नोकरवर्ग हवा होता तो त्यांचा हेतू त्यांनी भाषेच्या माध्यमातून साध्य केला. इंग्रजी भाषेनुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणं सोप्पं झालं असं म्हणताना इंग्रजी ही ‘त्यांची’ मातृभाषा होती हे आपण लक्षातच घेत नाही. इंग्रजांनी इथ इंग्रजी शिक्षण देण्यास सुरूवात केली ती त्यांची भाषा समजणारा नोकरवर्ग त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून! कारण त्यांना त्यांच्या भाषेत कारभार करायचा होता. इंग्रज अर्ध्यापेक्षा अधिक जगावर राज्य करू शकले यात त्यांच्या दरा-यापेक्षा त्यांच्या भाषेचा वाटा मोठा होता. त्यांनी कोणत्याही देशावर राज्य करताना ‘त्यांच्या’ मातृभाषेचाच आधार घेतला हे विसरून चालणार नाही. जेत्यांनी जीतांवर आपली भाषा व संस्कृती लादण्याचा प्रघात पहिल्यापासूनच आहे मात्र जे जे देश परकीय सत्तेपासून स्वतंत्र झाले त्यांनी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या भाषेची संस्कृतीची पुनर्स्थापना केली. सोव्हिएत रशियातील संघराज्य अनेक वर्ष एकसंघ राहून महाशक्ती बनू शकला यात दडपशाही एवढाच त्यांच्या देशभर लागु केलेल्या 'रशीयन भाषेचा' जुलमी आग्रहही कारणीभूत होता. भाषा हा समाजाला ताब्यात ठेवण्याचं वा एकसंघ ठेवण्याचं प्रभावी माध्यम आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६७ वर्ष उलटून गेलियावरही आपण मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत फार बदल केलेला नाही. आजही आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रेत्साहन देऊन 'फाड फाड इंग्लीश' बोलणारा मात्र विचारशक्ती पुरेश्या प्रमाणात विकसीत न झालेला असा उच्चशिक्षीत नोकरवर्गच तयार करीत आहोत असं म्हणण्यास जागा आहे. इंग्रजी ही जागतीक संपर्काची भाषा आहे हे खरंच ! परंतू संपर्काची भाषा असणे व ज्ञान भाषा असणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. केवळ उत्तम(?) इंग्रजी बोलता येणे यात अभ्यासापेक्षाही सवयीचा भाग जास्त आहे. माझे एक परिचित केवळ १० वी पास. तेही गावाकडच्या शाळेत शिकलेले. परंतू इंग्रजी संभाषण चांगल्यापैकी करायचे कारण एका इंग्लीश कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात अनेक वर्ष शिपाई म्हणून काम केलेलं..! कोणतीही भाषा संपर्काचे माध्यम म्हणून वापरणे वा बोलता येणे हा शिक्षणापेक्षा त्या भाषेच्या सहवासात राहाणे याचा भाग आहे असे मला वाटते. मुंबई सारख्या शहरात अनेकजण गुजराती वा मारवाडी भाषा उत्तम रित्या बोलु शकतात वा वाचु शकतात यात विशेष असे काहीच नाही कारण ते त्या समाजाच्या सहवासात राहत असतात. परंतू अशी माणसे काही गंभीर विचार करताना वा सुख-दु:खाच्या भावना व्यक्त करताना मातृभाषेचाच विचार करतात हे खरं आहे. जगातील मुख्य विकसित देशांचे उदाहरण घेतले तरी हेच दिसून येते कि त्यांच्या देशात त्यांच्याच भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्वाच्या देशात शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे आपण नजरेआड करून चालणार नाही. या देशांमध्ये इंग्रजी व इतर परकीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते ते केवळ संपर्काचे साधन असावे म्हणून, मात्र मुख्य शिक्षण त्या त्या देशांच्या मातृभाषेतूनच दिले जाते. नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात या अर्थाचे विधान केले. खरतर बंदी घालून काहीही साध्य होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याउलट देशी भाषांच्या शाळांना प्रोत्साहन, देशी भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य, कलाकृती कशा निर्माण होतील याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षणाचं मुख्य मध्यम मातृभाषाच असावी. ती सोप्पी, मुलांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. मुलांना आपल्या भाषेची रुची उत्पन्न होईल अशी तिची मांडणी व्हायला हवी. ज्यावेळी व्यवहारात देशी भाषांचे महत्व वाढेल, देशी भाषांना प्राधान्य दिले जाईल तेंव्हाच इंग्रजी भाषेचं महत्व कमी होत जाईल. प्रशासनाची भाषा, न्यायदानाची भाषा देशीच असावी असा आग्रहच नव्हे तर हट्ट असावा. त्यासाठी आंदोलने देखील करण्याची तयारी ठेवावी लागेल तरच देशी भाषांचं महत्व वाढेल. मी कित्येकदा उच्च न्यायालयात कामानिमित्त जात असतो. तेथे कोर्टासमोर फर्ड्या इंग्रजीत वादविवाद चालू असतात. त्या उच्चशिक्षित वकिलांचा अशील जो माझ्यासारखा असतो किंवा ब-याचदा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतो त्याचा एखादा खटला चाललेला असते. हे सर्व पहाताना एक गमतीचा विचार मनात येतो की ज्याच्या भवितव्यासाठी वा ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे विद्वान वकील न्यायाधीशांसमोर वादविवाद करीत आहेत त्या अशिलाला त्यांचे काय चालले आहे हे काहीच कळत नसते. तो भांबावल्या सारखा एकदा या वकिलाकडे तर एकदा त्या वकिलाकडे पाहत असतो. माझीही बऱ्याचदा अशी परिस्थिती होते हा माझा अनुभव आहे. सरकारी मराठी भाषा तर एखाद्या मराठीचा बऱ्यापैकी जाणकार माणसाला देखील कळणे अवघड जाते तर एखादा ग्रामीण भागातील मनुष्य ती काय समजणार? त्यातील मराठी(?) शब्दप्रयोग तर अनेकदा अनाकलनीय असतात. त्या शब्दांना मराठी का म्हणावे असा प्रश्न पडतो. केवळ याच कारणांमुळे शासनाच्या अनेक चांगल्या योजना सामन्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हा अनुभव आहे. सरकारी खात्यांचा पत्रानुभव तर हसावं की रडावं या प्रश्नाच्याही पलिकडचा आहे व असतो. मी बॅंकेत नोकरी करत असताना रिझर्व बॅंकेकडून आम्हाला कामकाजाच्या निमित्ताने पत्र यायची. पत्रं अगदी उच्चस्तरीय अस्खलित इंग्रजी भाषेत लिहीलेली असायची पण शेवटी मात्र जाड ठशांत छपाई केलेलं एक वाक्य असायचं ' हम हिन्दी मे पत्र व्यवहार का स्वागत करते है'. म्हणजे काय? मग तुम्ही का नाही हिन्दीत पत्र पाठवले? भाषेच्या या अशा माकडचेष्टा आपल्या देशांत सुरू आहेत आणि महाराष्ट्र त्यातही 'नं. १' वर आहे. मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा असली तरी ती डोक्यावर राजमुकुट घालून फाटक्या कपड्यात मंत्रालायासमोरच्या फुटपाथवर उभी आहे असे काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी सांगितले होते..आता इतक्या वर्षानंतर तिची अवस्था आणखीनच दयनीय झालेली दिसत आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद व्हाव्यात या दृष्टीने सर्व बाजून पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. यातला सर्वात मोठा वाट आपल्या मराठी लोकांचाच आहे हे त्यात आणखी दुर्दैव आहे. सुशिक्षीत असोत वा अशिक्षित आई बाप मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात धन्यता मनात आहेत. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालणे म्हणजे काहीतरी मोठा अपराध आहे अशी आपली मानसिक धारणा झालेली आहे. मुलगा वा मुलगी convent मध्ये शिकतो हे सांगणे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले आहे. मराठी बोलणे आज मागासलेपणाचे लक्षण मानले जात आहे. मराठी आई-बाप आपल्या पाल्याने इंग्रजीच बोलावे असा दुराग्रह करत आहेत. यात त्या मुलाचे काय हाल होतात या कडे कोणीही लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही. समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरचे आई-बाप देखील माहागड्या फिया भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी काय वाटेल ते करत आहेत. अस का करता, हे बहुतेकांना विचारलं असता उत्तर एकच मिळतं, इंग्लीश छान बोलता येतं म्हणून. पुन्हा इंग्लीश छान बोलता येण्यानं काय होणार असं विचारता, चांगली नोकरी मिळते हे उत्तर मिळतं. म्हणजे आयुष्याचा पाया असलेली वय वर्ष पाच ते पंधरा अशी महत्वाची १० वर्ष केवळ इंग्रजी बोलता येण्यासाठी आणि तीही नोकरी मिळावी म्हणून खर्च करायची हे असं काहीतरी विचित्र चाललंय..!!मुल दिवसभर स्कूल मध्ये काढून घरी येतो तो मम्मी त्याला ‘स्नॅकस’ आणि ‘मिल्क’ देते. तीच मम्मी मिल्क ला दुध म्हणताना तो ऐकतो व दुध म्हणतो त्याला मम्मी हरकत घेते व म्हणते, ‘नो बेटा डोन्ट से दुध, से मिल्क..’. आता पोर गोंधळात, की मग ही का दुध म्हणते..मग ती सांगते कि दुधवाला अशिक्षित आहे आणि त्याला इंग्लिश कळत नाही म्हणून त्याला मराठीत सांगितले. यावर ते पोरग आपल्याशी समीकरण बांधते की मराठी ही अशिक्षित लोकांची भाषा आहे हळूहळू त्याच्या मनात आपली भाषा मागासलेली आहे असा समज पक्का व्हायला लागतो. ते पोरग ज्या समाजात वावरते तेथील शब्द संपदा व तो जे शिकतो त्या पुस्तकातील शब्दसंपदा यात त्याला काहीच साम्य दिसत नाही. वर उल्लेख केलेला ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातील प्रसंग या पार्श्वभूमीवर आठवून पहावा. भाषा म्हणजे केवळ शब्द आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी नसते तर त्या त्या भाषेतून, त्या भाषेच्या शब्द संपत्तीतून त्या त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे आपोआप पोचवला जात असतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे एखाद मुल सुसंस्कृत होण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. शिक्षणाची भाषा मातृभाषाच असावी हे जगभरातील तज्ञ ओरडून सांगत आहेत. मातृभाषेत शिक्षण व जोडीला किमान एकतरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञान कशा रुंदावतात. मनुष्य जेवढ्या भाषा शिकतो तेवढा तो जगाविषयी सजग होतो पण या सर्वांचा पाया मात्र नि: संशय मातृभाषा असावी. थोडेसे भाषेच्या शुद्धतेविषयी.. आज जगातील कोणतीही भाषा तिच्या मूळ स्वरुपात नाही हे सत्य आहे. ज्या भाषा जिवंत आहेत त्या भाषांमध्ये शब्दांची देव-घेव सतत चालू असते किंबहुना ती तशी चालू असेल तर आणि तरच ती भासह जिवंत आहे असे समजण्यास काहीच अह्रकत नाही. आज आपण जी शुद्ध (?) मराठी बोलतो वा वापरतो ती तिच्या मूळ स्वरूपापासून खूप वेगळी आहे तरी ती आपली वाटते यात दुमत नसावे. आजच्या आपल्या प्रमाण मराठी भाषेत फारसी, अरबी वा दक्षिण भारतीय भाषांतील अनेक शब्द बेमालून मिसळून गेले आहेत. आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे ‘फडणवीस’ हे आडनाव चक्क फारसी ‘फर्द्नवीस’चा अपभ्रंश आहे हे वाचून आपल्यालाही आश्चर्य वाटेल एवढे ते आपले होऊन गेले आहे. मस्करी, मस्ती, महिरप, मातब्बर, शंकरपाळं ह्या शब्दांचं मुळ अरबी/फारसी आहे हे कोण सांगायला गेले तर आपण त्याला वेड्यात काढू पण ते खर आहे. पटाईत, निरोप, मुलगा या अस्सल मराठी वाटणाऱ्या शब्दांचं मूळ कानडी आहे. टेबल, स्टेशन, सीम-कार्ड, इंजिनीअर असे इंग्रजी शब्द आता ग्रामीण माणसालाही सहज समजतात व ते तसेच लिहिण्यास व बोलण्यास काहीच हरकत नाही. उलट त्यास मराठी/भारतीय भाषेतील मेज, स्थानक, अभियंता असे प्रतिशब्द दिल्याने त्याचा काहीच बोध होत नाही हि वस्तुस्थिती आहे. भाषा शुद्धीचा अतिरेकी आग्रह शेवटी त्या भाषेच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. इंग्रजी भाषेतील देखील काही शब्द अपभ्रंशीत होऊन समाविष्ट झाले आहेत. अवतार, जंगल, बंगला, गुरु, लुट, महाराज, मंत्र, रोटी असे कितीतरी भारतीय शब्द इंग्रजी भाषेत मोठ्या सन्मानाने विराजमान झालेले आहेत. प्रतिष्ठित इंग्लिश ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ७०० हून अधिक भारतीय शब्द स्वीकारले गेले आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल-नसेल पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या दोन किंवा अधिक भाषा कोणत्याही कारणाने एकमेकींच्या संपर्कात येतात तेंव्हा त्यात शब्दांची अदलाबदली होणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे भाषा अशुद्ध झाली किंवा बाटली म्हणण्याचे काहीच कारण नाही. उलट अशा आदान-प्रदानामुळे भाषा समृद्धच होत असतात. हे दोन नद्यांच्या संगमासारखे आहे. नद्यांच्या संगमाला तीर्थक्षेत्राचा मान देणारी आपली संस्कृती या भाषा रुपी नद्यांच्या संगमाला नक्कीच सन्मान देईल परंतु त्याची सुरुवात वा त्यतील मोठेपणा आपल्या जनतेला कोणीतरी समजावून देणे गरजेचे आहे. - गणेश साळुंखे ९३२१८ ११०९१

वाचने 66739
प्रतिक्रिया 240

प्रतिक्रिया

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पण मुंबई बोर्डात मात्र मराठी आणि इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास सारखीच आहे. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या थोडी जास्त आहे.
यातील दुसरे वाक्य ---मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या थोडीच (सुमारे १०% ने) जास्त आहे--- असे हवे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

सोडा हो सगळं... गुजराती घ्या. ९५.६६%!! इंग्रजीपेक्षाही जास्त! दोन तीन टक्क्यांच्या पास पर्सेंटेज मधल्या फरकावरून मराठी भाषेतील शिक्षणावर टीप्पणी करण्याचा प्रयत्न अफाट धाडशी आहे! आपल्या धाडसाला सलाम!!

In reply to by असंका

दोन तीन टक्क्यांच्या पास पर्सेंटेज मधल्या फरकावरून मराठी भाषेतील शिक्षणावर टीप्पणी करण्याचा प्रयत्न अफाट धाडशी आहे! आपल्या धाडसाला सलाम!!
हा हा हा.मुद्दा हा की इथली काही मंडळी म्हणत आहेत की इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे आकलनावर परिणाम होतो. तसे असेल तर इंग्रजी शाळांचा निकाल बराच कमी लागायला हवा. इथे तसे होताना दिसत नाही तर इंग्रजी शाळांचा निकाल जास्तच आहे (इंग्रजी या पहिल्या भाषेत). हा गुंता कसा सोडविणार ते सांगा. आणि हो माझ्या दृष्टीने मुलांचे शिक्षण हा फारसा गांभीर्याने घ्यायचा विषय नाही असे काहीसे खाली बरळला आहात ते कशावरून या प्रश्नाचे पण उत्तर द्या की. बाकीचे नंतर बघू.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

इंग्रजी भाषेत शिकल्यामुळे आकलनावर परीणाम होतो, असे मी कुठे म्हणालो आहे ते दाखवताल का? मी शोधले पण मला सापडले नाही. मुळात तसे माझे मत नाहीच. पण कधी कधी शब्द इकडचा तिकडे झाल्यामुळे तसा अर्थ निघणारे एखादे वाक्य मी लिहिले असू शकते. आपण माझे नाव घेऊन मला विचारता आहात, याचा अर्थ आपण तर माझे तसे वाक्य वाचलेले आहेच. कृपया दाखवता का? शालांत परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे असलेले मार्क मिळवणारे मुल, कुठला भाषा विषय प्रथम म्हणून निवडते, यावर आधारीत आकडेवारीवरून जर आपण शिक्षणासाठी कुठले माध्यम योग्य ह्याविषयी निष्कर्श काढू इच्छिता तर आपण या विषयावर गंभीर नाही असेच म्हणावे लागेल.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मि. एम.एस.सी स्टॅटिस्टिक्स, स्वत:च्या मताच्या सोयीने आकडेवारीची एकतर्फी मांडणी करून एकूण मुलांपैकी फक्त १ टक्का मुलांच्या निकालावरून तुम्ही 'शिक्षणाचे भाषा माध्यम' हा विषयच बाद करत आहात. तेव्हा तुमच्या सांख्यिकीच्या अभ्यासाबद्दल मनापासून दाद द्याविशी वाटत आहे. तुमच्या ह्या लॉजिकने तर पहिलेछूट पूर्ण शिक्षणव्यवस्थाच नापास होत आहे. कारण जर ७-६ टक्के मुलं नापास होतात तर ती शिक्षणव्यवस्थाच कुचकामी आहे. नाही? भाषा माध्यम ते तर फार लांब राहिलं. भले शाब्बास! तुम्ही जिंकले, आम्ही हरलो! धन्यवाद! (दहावी गणितः ५४/१५०) संदीप डांगे

In reply to by संदीप डांगे

इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे आकलनावर परिणाम होतो आणि मराठी शाळेत शिकल्यामुळे आकलन चांगले होते हा इथल्या काहींचा मुद्दा आणि प्रत्यक्षातली आकडेवारी सुसंगत नाही एवढेच दाखवून द्यायचे आहे. जर इंग्रजी शाळेत शिकून आकलन चांगले होत नसेल तर निकाल बराच कमी लागायला हवा.पण तसे होताना दिसत नाही.त्याविषयी काय?
तुमच्या ह्या लॉजिकने तर पहिलेछूट पूर्ण शिक्षणव्यवस्थाच नापास होत आहे. कारण जर ७-६ टक्के मुलं नापास होतात तर ती शिक्षणव्यवस्थाच कुचकामी आहे.
मी जे काही लिहिले आहे त्याविषयीच उत्तरे देण्यास बांधिल आहे. इतर तर्क तुम्ही लढवत असाल तर त्याविषयी उत्तरे देण्यास मी बांधील नाही.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी तुम्ही दिलेली सांख्यिकीची मांडणी एकतर्फी आणि बालिश आहे हेच जर तुम्हाला कळत नसेल तर चर्चा करून उपयोग नाही. दोन्ही भाषेतील नापासांमधला एक-दोन टक्का फरक हा तुमच्या सांख्यिकी दृष्टीने आकलनाच्या मोजमापासाठी कसा महत्त्वाचा आहे हे मला तरी कळले नाही. त्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही. तुमचे तर्क ज्या आधारावर मांडले आहेत ते असे असावे बहुधा: १. आकलनक्षमतेचे मोजमाप मार्क्सवरून सिद्ध होते. २. रट्टा मारून मिळवलेले मार्क्स म्हणजे गुणवत्ता असते. ३. इंग्रजी व मराठी शाळेत शिक्षण घेणार्‍या यच्चयावत मुलांची आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, कौटुंबिक पातळी समान असते. म्हणूनच म्हटले, जिवंत माणसांना स्टॅटीस्टीक्सचे आकडे करून तुम्ही जिंकलात. काँग्रॅचुलेशन्स!!!

In reply to by संदीप डांगे

दोन्ही भाषेतील नापासांमधला एक-दोन टक्का फरक हा तुमच्या सांख्यिकी दृष्टीने आकलनाच्या मोजमापासाठी कसा महत्त्वाचा आहे हे मला तरी कळले नाही.
याचे कारण मुळातल्या चर्चेत आणि प्रतिसादांमध्येही म्हटले आहे की इंग्रजी शाळेत शिकले की आकलन चांगले होत नाही आणि मराठी शाळेत शिकले की आकलन चांगले होते. तसे असेल तर इंग्रजी शाळांचा निकाल मराठी शाळांपेक्षा बराच कमी लागायला हवा होता.पण तसे न होता तो उलट मराठी शाळांपेक्षाही जास्त लागत आहे.तसे असेल तर मुळातले गृहितक--- इंग्रजी शाळांमध्ये आकलन चांगले होत नाही हे चुकीचे आहे असे का म्हणू नये?
१. आकलनक्षमतेचे मोजमाप मार्क्सवरून सिद्ध होते.
२. रट्टा मारून मिळवलेले मार्क्स म्हणजे गुणवत्ता असते.
ठिक आहे. म्हणजे मराठी शाळांमधले विद्यार्थी रट्टा मारत नाहीत आणि केवळ इंग्लिश शाळांमधलेच विद्यार्थी रट्टा मारतात असे थोडीच आहे?
३. इंग्रजी व मराठी शाळेत शिक्षण घेणार्‍या यच्चयावत मुलांची आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, कौटुंबिक पातळी समान असते.
म्हणजे मराठी शाळेत शिकल्यावर आकलन चांगले होते आणि इंग्रजी शाळेत होत नाही हा दावा करताना हा प्रश्न पडत नाही. पण हे मुळातले गृहितक चुकीचे आहे हे दाखवणारी आकडेवारी दिल्यावर मात्र असे प्रश्न पडतात. मजाच म्हणायची.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मुळात ही मार्कांची, पास-नापासांची आकडेवारी 'आकलन' सिद्ध करते असं तुम्हाला कसं काय वाटतं बुवा? माझ्या या प्रश्नाला तुम्ही अजूनही उत्तर दिले नाही. मी तरी माझे मुद्दे मांडतांना मार्क्स हा आधारभूत मुद्दा मांडलेला नाही. चर्चेत जो मुद्दाच नाही त्याच्या अनुषंगाने तिरपागडं गणित मांडून काहीही निष्कर्ष काढायची तुम्हाला मुभा आहे पण त्याने काही सिद्ध होते असे नाही. तुम्हालाच मूळ धागा आणि चर्चेचा मुद्दा कळलेला नाही असे दिसत आहे. संपूर्ण चर्चेत दोन्ही बाजूपैकी कुणीही मार्क्स हा मुद्दा ग्राह्य धरलेला दिसत नाही. माझी विनंती आहे की पुढे काही लिहण्याआधी लेख आणि चर्चा एकदा नीट वाचून घ्या.

In reply to by संदीप डांगे

बरं मग आकलन नक्की कुठल्या आधारावर सिध्द करता येते? कारण मराठी शाळेचा इतका हिरीरीने पुरस्कार तुम्ही करत आहात त्याला नक्की आधार काय? माझी दोनही मुले इंग्रजी शाळेत आहेत. ते नक्की काय मिस करत आहेत असे तुम्हाला वाटते?

In reply to by संदीप डांगे

ते टक्केवारी वगैरे ठीक आहे. त्या आधी होतंय ते महत्वाचं आहे. असंख्य हुशार मुलं आपल्या अतिहुशार पालकांच्या इंग्रजीबद्दलच्या पोकळ कल्पनांमुळे इंग्रजी शाळांमधे ढकलली जातात. या हुशार मुलांमुळे इंग्रजी शाळातला निकालाचा टक्का वाढतो. त्यांना मराठी शाळात घातलं तर ते ९३ चे ९९ पण होतील. मुद्दा काय आहे? माध्यम कुठलं हवं की माध्यमातला निकालाचा टक्का?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

सांगू तर शक्तो, पण जो खोडसाळ सूर लावला आहे प्रश्न विचारताना, त्यामुळे उत्तर देण्याची इच्छा नाहिशी झाली आहे. धन्यवाद. (पुन्हा कधी इच्छा झाली, तर परत येऊन नक्कीच सांगेन.)

In reply to by असंका

सांगू तर शक्तो, पण जो खोडसाळ सूर लावला आहे प्रश्न विचारताना, त्यामुळे उत्तर देण्याची इच्छा नाहिशी झाली आहे.
हा हा हा. अहो उत्तर द्यायचे नसेल तर देऊ नका.पण असले काहीतरी पुचाट कारण देऊ नका हो. धन्यवाद

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मुलांचे शिक्षण हा आपल्या दृष्टीने वेळ घालवायचा विषय आणि प्रश्न असला तरी मला तो एवढ्या हलकेपणे घेता येणार नाही. आत्ता तरी नाही. वेळ मिळाल्यावर आपल्या खोडसाळपणाला उत्तर द्यायचा प्रयत्न करणारच आहे. सध्या वर संदीप डांगे जे विचारत आहेत, त्याचेही उत्तर द्यायचा विचार करा, जमल्यास.

In reply to by असंका

मुलांचे शिक्षण हा आपल्या दृष्टीने वेळ घालवायचा विषय आणि प्रश्न असला तरी....
हे अनुमान नक्की कशावरून बांधलेत? कळफलक हातात आहे म्हणून उगीच काहीच्या काही कळा बडवू नका.
मला तो एवढ्या हलकेपणे घेता येणार नाही. आत्ता तरी नाही....
तो तुमचा प्रश्न झाला. तुम्ही कुठलीही गोष्ट हलकेपणे घ्या किंवा जडपणे घ्या त्यामुळे इतरांना काहीच फरक पडणार नाही.
वेळ मिळाल्यावर आपल्या खोडसाळपणाला उत्तर द्यायचा प्रयत्न करणारच आहे.
म्हणजे तुम्ही इतरांवर "मुलांचे शिक्षण हा वेळ घालवायचा विषय असल्याचा" बिनबुडाचा आरोप करणार आणि वर इतरांनी काही प्रश्न विचारला तर तो खोडसाळपणा म्हणणार? बहोत अच्छे.
सध्या वर संदीप डांगे जे विचारत आहेत, त्याचेही उत्तर द्यायचा विचार करा, जमल्यास.
तुम्ही हे बडवायच्या दोन मिनिटे आधीच ते उत्तर दिले आहे. तेही वाचायचा विचार करा, जमल्यास.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

वैयक्तिक चर्चेपेक्षा संयुक्तिक चर्चा झाल्या तर बरं. बाकी सगळ्या माध्यमांपेक्षा हे माध्यम महत्वाचं असतं नेहमी.

In reply to by वेल्लाभट

वैयक्तिक चर्चेपेक्षा संयुक्तिक चर्चा झाल्या तर बरं.
मान्य. पण वैयक्तिक चर्चेवर सुरवातीला कोण गेले? मी नाही तर अकाऊंटंट गेले. तेव्हा जे काही सांगायचे असेल ते त्यांना सांगितलेले बरे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

बरं. :) व्यापक सल्ला होता तो. कुणा एकाला उद्देशून नव्हे.

In reply to by वेल्लाभट

समजांपेक्षा गैरसमज अधिक पटकन पसरतात आणि पक्के होतात.
हो ना. इंग्रजी शाळेत शिकले की आकलन होत नाही आणि मराठी शाळेत शिकले की आकलन चांगले होते हा पण असाच एक गैरसमज.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

बर. हा 'गैर' आता वाटतोय काही लोकांना. मुळात हा समज नाही. हे वास्तव आहे. आणि दोन पिढ्यांपूर्वी हे सर्वमान्य होतं. मग इंग्रजी चा अतिरिक्त उदो उदो पद्धतशीरपणे केला गेला. मग लोकं भुलली. पण असो. लॉजिकली बघू. युनेस्को ने पब्लिश केलेल्या रिसर्च नुसार मातृभाषेतील शिक्षण हे आकलनशक्तीच्या सशक्ततेसाठी पूरक असतं. जिओग्राफिकली, जपान, जर्मनी, फ्रान्स अशा इंग्रज्येतर भाषिक देशांमधेही मातृभाषेतूनच शिक्षण दिलं जातं. आग्रहाने. तिथे हा गैरसमज नाही हं वाटत कुणाला. हिस्टॉरिकली आपण मातृभाषेतूनच शिकत आलोत. आणि तसं शिकलेल्या पिढ्यांनीच आज इंग्रजी श्रेष्ठ आणि मराठी कनिष्ठ वाटणारी ही पिढी जन्माला घातली आहे. त्यामुळे, गैरसमज काय आणि कुणाचा हे उघड आहे.

वरचा प्रतिसाद पुण्याचे वटवाघूळ यांच्या सोयीसाठी पुन्हा इथे देत आहे.
इथली काही मंडळी म्हणत आहेत की इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे आकलनावर परिणाम होतो.
इंग्रजी भाषेत शिकल्यामुळे आकलनावर परीणाम होतो, असे मी कुठे म्हणालो आहे ते दाखवताल का? मी शोधले पण मला सापडले नाही. मुळात तसे माझे मत नाहीच. पण कधी कधी शब्द इकडचा तिकडे झाल्यामुळे तसा अर्थ निघणारे एखादे वाक्य मी लिहिले असू शकते. आपण माझे नाव घेऊन मला विचारता आहात, याचा अर्थ आपण तर माझे तसे वाक्य वाचलेले आहेच. कृपया दाखवता का?
आणि हो माझ्या दृष्टीने मुलांचे शिक्षण हा फारसा गांभीर्याने घ्यायचा विषय नाही असे काहीसे खाली बरळला आहात ते कशावरून या प्रश्नाचे पण उत्तर द्या की. बाकीचे नंतर बघू.
शालांत परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे असलेले मार्क मिळवणारे मुल, कुठला भाषा विषय प्रथम म्हणून निवडते, यावर आधारीत आकडेवारीवरून जर आपण शिक्षणासाठी कुठले माध्यम योग्य ह्याविषयी निष्कर्श काढू इच्छिता तर आपण या विषयावर गंभीर नाही असेच म्हणावे लागेल.

प्रत्यक्षात इथे जो वाद व दावा चाललाय तो आग सोमेश्‍वरी.............वाटला. मुळात जे पास ज़अलेत त्यांचा आकळनाचा पडताला का? बरे जो पास आहे तो नक्की किती गुणधरक आहे की 35 च्या वरचा. जो विध्यर्थी नापास आहे त्याचे आकलन पडताळण्याची गरज आहे म्हणजे तो नेमका त्या गुन्स्पर्धक मुलाच्या (मराठी ) तुलनेत कुठे आकलनात कमी पडला आणि पुढे जर का त्या संदर्भात कुणाला आपल्या सांखिकी कौशल्याचा काही जरूर लाभ होईल. जर का युनेसको ला प्रतिवाद करयकचा असेल तर आपला आभ्यास तगडा हवा , पथदर्शक प्रयत्नाचे स्वागत.

"व्यथा खेड्यातिल मुलांचि" खेड्या पाड्याच्या शाळेत दिसे, विद्यार्थ्याचा रुसवा अ आ इ ई नको मास्तर, ABCD शिकवा ! मराठी आमची मातृभाषा, त्याचा आम्हालाही अभिमान पण द्या हो मास्तर थोडं इंग्लिश स्पीकिंगचे ही ज्ञान ! बापुला आम्ही भेटलो, आता अब्राहम लिंकनला भेटवा अ आ इ ई नको मास्तर ABCD शिकवा ! रामायण महाभारत आम्ही, आजीकडेच शिकलो रावण कुंभकर्णचा विचार करीत, रोजच आम्ही पकलो राम कृष्ण बघितले आता, थॉमस एडिसन ही दाखवा अ आ इ ई नको मास्तर ABCD शिकवा ! बाप आमचा शेतकरी, पिकवतो जमीन काळी इंग्रजीच्या अभावामुळे, जातो रोजच त्याचा बळी काळ्या आईच्या पोटी मास्तर, बिल गेट्सची टेक्नॉलॉजी शिकवा अ आ इ ई नको मास्तर, ABCD शिकवा ! चुलता माझा आर्ट बी. कॉम, त्याच्या काहीच नाही म्होरं करतो शेती, काढतो शेण, रोजच वळतो ढोरं ! गावाबाहेर पडण्या मास्तर, आम्हांला तरी इंग्लिश शिकवा अ आ इ ई नको मास्तर, ABCD शिकवा ! इंग्लिश मीडियम आमच्या खेड्यात, करा कुणीतरी खुलं शिकून सवरून मोठं होईल, शेतकऱ्यांचही मुलं कळकळ आमच्या जीवाची मास्तर, तुम्ही सरकारला दाखवा अ आ इ ई नको मास्तर, ABCD शिकवा ! झाले क्रांतिकारक अनेक झाले नेते हो अनेक जो वर्गा बाहेर राहुन झाला भारत देशाचा घटणाकारं त्या डॉ.भिमराव आंबेडकरांचा खरा इतिहास आम्हा दाखवा अ आ इ ई नको मास्तर, ABCD शिकवा !

In reply to by dadadarekar

कवीला थॉमस एडीसन शाळेत गेला नव्हता हे माहित नै बहुतेक ;-) आणि बर्‍याच चुका आहेत. पण जौ दे, काय ते नेमी नेमी शक्ती अन् वेळ वाया घालवायचा.

In reply to by संदीप डांगे

एडिसनबद्दल शिकवा असे ते म्हणत आहेत. एडिसन शाळेत गेला होता का ? याच्याशी त्याचा संबंध नाही.