Skip to main content

पुराणातील दशावतार आणि डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत; एक साम्य -

शुक्रवार, 24/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पुराणातील दशावतार आणि डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत; एक साम्य - थोर शास्त्रज्ञ डार्विनने या पृथ्वीतलावरचा पहिला ‘जीव’ पाण्यात निर्माण झाला असा सिद्धांत साधारणत: १५० वर्षांपूर्वी मांडला.. ‘सर्व्हायवल आॅफ द फिटेस्ट’ या डार्विनच्या तत्वावूसार त्या पाण्यातल्या पहिल्या सजीवापासून लाखो वर्षांपासून अनेक जीवजाती उत्क्रांत होत होत आजचा प्रगत मानव बनला व यापुढेही ही उत्क्रांती सुरूच राहाणार आहे..अर्थात एखादा छोटा बदल घडायलाही हजारो वर्षं लागतात.. डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे परंतू आपल्या पुराणातून हजारो वर्षांपुर्वी सांगितलेली आणि हिंदू जनमानसाचा अतिव विश्वास असणारी दशावताराची कहाणी डार्विनच्या तत्वाशी आश्चर्यकारकरीत्या मिळती-जुळती आहे. पुराणातील भगवान विष्णूचे ‘दहा अवतार’ डार्विनचाच सिद्धांत मांडतात मात्र चमत्कार आणि कथेचा आधार घेऊन, तेही हजारो वर्षांपूर्वी..! गोव्याचे विद्यमान आमदार व कोंकणी-मराठीतील एक नामवंत कवी-गीतकार माझे मित्र श्री. विष्णू सुर्या वाघ यांचे या विषयावरील व्याख्यान मी काही वर्षांपूर्वी ऐकले होते, ते आता विस्तारीत स्वरुपात माझ्या शब्दांत आपल्यासमोर ठेवत आहे. पुराणकर्त्यांची कल्पनाशक्ती आणि आधुनिक विज्ञानाची पुराव्यासहीत मांडण्याची सिद्धशक्ती यातील श्रेष्ठ कोण, या वादात न पडता आपणं दोघांमधल्या साम्याचा आस्वाद घेऊ.. ‘आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म..’ ही दशावताराची आरती आपणांपैकी बहुतेकांना येत असेल. या आरतीमध्ये भगवान विष्णूचे ‘मत्स्य’ ते ‘कल्की’ अशा दहाही अवतारांचे कथारुपी वर्णन केले आहे.. भगवान विष्णूचा प्रथम ‘मत्स्य’ अवतार प्रथम मानला गेला आहे..’मत्स्यरुपी नारायण, सप्तही सागर धुडीसी..’ असं पहिल्या अवताराचं आरतीत वर्णन केलं आहे. पृथ्वीवरचा प्रथम सजीव पाण्यात निर्माण झाला हेच डार्विनही सांगतो..म्हणजे आपल्या पुराणांतून हजारो वर्षांपुर्वी सांगीतलेल्या कथा आणि दिड-दोनशे वर्षांपूर्वी आधुनिक विज्ञानाद्वारे सिद्ध झालेल्या बाबी या दोघांनध्ये आश्चर्यकारक समानता आहे..! दशावतारातील दुसरा अवतार ‘कूर्म’ अवतार आहे..कूर्म म्हणजे ‘कासव’..डार्विन सांगतो जीव की एका अवस्थेतून पुढील प्रगत अवस्थेकडे उत्क्रांत होत असताना त्याच्यात परिस्थिती अनुरूप बदल घडत जातात.. कासवाचा विचार केला कि आपल्याला सहज लक्षात येईल की कासव हा प्राणी पाण्यात व जमीन अशा दोनीही जागी राहू शकतो.. मासा, कासव किंवा दशावतारात वर्णन केलेले दहाही अवतार ही केवळ प्रतिकं आहेत हे कृपया लक्षात घ्यावे…माशापासून कासव उत्क्रांत झाला याचा अर्थ एवढाच की पाण्यात राहणारे जीव अस्तित्वात असतानाच त्यांच्यापासून कासव व त्याच्यासारखे पाणी आणि जमीन अशा दोनही ठिकाणी सहज वावरू शकणारे अनेक उभयचर जीव उत्क्रांत झाले.. परमेश्वराचा पुढील अवतार ‘वराह’..म्हणजे डुक्कर! डुक्कर हा प्राणी जंगलात वावरणारा असतो..त्याकाळी निश्चितच पृथ्वीवर घनदाट जंगल होतं..जमीन दलदलीची..’दाढे धरूनी पृथ्वी नेता, वराह रुप घेसी..’ असे आरतीत म्हटले आहे आणि याचा अर्थ असा काढता येईल की त्याकाळी अस्तित्वात असलेल्या जमिनीवरील हिमयुगातील बर्फ वितळायला हळुहळु जमिन तयार व्हायला लागली होती..सहाजीकच जमिन दलदलीची होती..आता असे प्राणी अस्तित्वात यायला सुरुवात झाली ज्यांना पाणी मिश्रीत दलदलीची जमीन त्प्रिय होती ( डुकरांना चिखल आजही प्रिय आहे). अश्याप्रकारचे अनेक जीव तयार झाले.. पाण्यात राहाणारे, पाणी आणि जमिन अशा दोन्ही ठिकाणी वावरू शकणारे, आणि डुकरासारखे जंगली प्राणी निर्माण होऊन आता हजारो, लाखो वर्ष उलटली होती..सजीव पुढील पायरीकडे उत्क्रांत होत होता.. आणि पुढचा सजीव ‘नृसिंह’ अवतारात उत्क्रांत झाला..उत्क्रांतीने आणखी एक पाऊल पुढे टाकले…आता असे प्राणी निर्माण व्हायला सुरुवात झाली की ते प्राणी नव्हेत परंतु धड माणूसही नाहीत..नृसिंहाने ‘उंबरठ्यावर’ हिरण्यकशपुला ठार मारले ही कथा या दृष्टीने खूप महत्वाची आहे..चतुष्पाद जंगली प्रण्यांपासून द्विपाद प्राणी उत्क्रांत व्हायच्या ‘उंबरठ्यावर’ आता उत्क्रांती उभी होती याचे सांकेतीक दर्शन ही कथा देते..नृसिंह, हिरण्यकशपू ही नांवेदेखील खुप काही सुचवतात..हिरण्यकशपूमधील ‘हिरण्य’ या शब्दाचा अर्थ सोनं किंवा संपत्ती असा असला तरी ‘हिरण्य’ शब्द ‘अरण्य’च्या खुप जवळचा आहे आणि उर्वरीत ‘कशपू’ या शब्दातील शेवटचे दोन शब्द ‘पशू’ कडे निर्देश करणारे आहेत..हिरण्यकशपूचा नृसिंहाने उंबरठ्यावर केलेला वध हा संकेत आहे की अरण्यातील पशुंकडून उत्क्रांतीची वाटचाल मनुष्यरुपाकडे सुरु होत आहे..!! पुन्हा हजारो वर्ष गेली आणि पुढे अवतरला ‘वामन’ अवतार..ज्याला मनुष्य म्हणता येईल असा हा प्राणी! वामन याचा शब्दशः अर्थ ‘बुटका’. मानववंश शास्त्र हेच सांगते की पृथ्वी वरचा प्रथम मनुष्य उंचीने बुटका म्हणजे जेमतेम ४-४.५ फुट उंची असलेला होता..’Homo Erectus’ हे त्याच शास्त्रीय नाव..या शब्दाचा अर्थ चार पायावर चालणारा प्राणी आता हळूहळू दोन पायावर उभे राहायला शिकला होता.. Homo म्हणजे माणूस आणि Erectus म्हणजे उभा असलेला असा त्याचा साधारण अर्थ..जंगलात राहाणारा,मेंदू आकाराने लहान असल्याने, शिकार करुन खाणं, गुहेत राहाणं असे सर्व व्यवहार आणि बुद्धीमत्ताही प्राण्याप्रमाणेच असणारा असणारा केवळ नांवाला ‘मनुष्य’ असा प्राणी आता जंगलात वावरू लागला होता..उत्क्रांतीचं कार्य गुमानपणे चालुच होतं.. प्राण्यांसारखे असलेले व्यवहारांनी संथ गतीने मनुष्याची अंधूक छटा दाखवायला सुरुवात केली..अशातच अनेक वर्षांचा कालावधी पार पडला..’भिक्षेस्थळे मागुनी बळीला पातला नेसी….वामनरूप धरोनी बळीच्या द्वारी तिष्ठसी..’..’ वामनाने बळीला पाताळात नेलं या आरतीतल्या शब्दांचा अर्थ, वामनाने बळीला जमिनीच्या खाली जाण्याचा म्हणजे जमिन नांगरण्याचा निर्देश केला, असाही घेता येतो..बळी म्हणजे शेतकरी आणि यातुनच पुढे शेतीचा शोध लागला आणि उत्क्राती पुढे सरकली.. आता ज्याला ख-या अर्थाने मनुष्य म्हणता येईल असा ‘परशुराम’ प्रगटला..! परशुरामाला अन्थ्रोपोलॉजीतील Neanderthal आणि Homo Sepian हि शास्त्रीय नावे लागू पडतील..परशुरामावर जंगल साफ करुन मनुष्यवस्ती व शेतीयोग्य जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आली. परशुरामाने शरीरावर धारण केलेली आयुधं याची साक्ष देतात..परशुरामाचा परशु जंगल तोडण्यासाठी आणि त्याचे धनुष्य जंगली श्वापदांपासून रक्षण करण्यासाठी धारण केले असे म्हणता येईल..परशुरामाने कोकण वसवलं याची सांगड आपल्याला इथे घालता येते..परशुराम उघडा दाखवतात, याचा अर्थ अद्याप वस्त्राचा शोध लागायचा होता असा होऊ शकतो…मनुष्य वस्ती स्थिरस्थावर झाली..माणुस ‘कल्चर्ड’ व्हयला सुरुवात झाली..आता गरज भासू लागली ती शेती, संपत्तीचे संरक्षण करण्याची..राज्यपद्धती हळुहळु आकार घेऊ लागली.. उत्क्रांतीने आणखी पुढे झेप घेतली..आणि ‘रामराज्याची’ संकल्पना साकारणारा ‘पूर्ण’ पुरुष ‘राम’ अवतारला..Homo Sepian Sepian हे शास्त्रीय नाव धारण करणारी मनुष्य जमात निर्माण झाली..या शास्त्रीय नावाचा अर्थ ‘ज्याला जाणीव असल्याची जाणीव आहे असा मनुष्य’..परशुरामासारखी जंगलापासून जमिन तयार करण्यासाठी रामाला आता परशुची गरज नव्हती..त्याने परशुचा त्याग केला आणि शत्रुनिःपातासाठी धनुष्य धारण केलं. सत्यवचनी रामासारखी प्रजा पृथ्वीतलावर सुखाने नांदू लागली..सत्ययुगाचा जन्म झाला..अशा अनेक वर्षांच्या कालावधीनंतर ‘सत्या’चे अपचन झाले आणि कोणत्याही परिस्थीतीत ‘सत्या’ला धरून राहावे या ‘रामनिती’ कडून मनुष्य परिस्थीतीनुरूप वागावे या ‘कृ़ष्णनिती’च्या दिशेने माणूस उत्क्रांत झाला.. यापुढच्या काळात उत्क्रांतीची शारिरीक दृष्य चिन्हे कमी होत गेली मात्र माणसाची बौधिक उत्क्रांती सुरूच राहिली.. रामावताराच्या नंतर व ‘कृष्ण’ अवताराच्या अगोदरच्या काळात मनुष्य पुन्हा प्राणी होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता..युद्ध, असत्य, कुट-कपट याची चलती होती. मनुष्याला ख-या-खोट्याची जाणिव करून देण्याची गरज निर्माण झाली होती आणि ती करून देण्यासाठी ‘कृष्ण’ अवतरला..’देवकी वसुदेव बंदी मोचन त्वा केले..’ या आरतीतल्या ओळींचा अर्थ, अनागोंदी, अत्याचार या मुळे समस्त स्त्री-पुरुषांचं आयुष्य बंदीखान्यासारखं झाला होता..पृथ्वीवरचं आयुष्य ‘अंधकार’मय झालं होत..आणि अशा ‘अंधारात’ मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला असा याचा अर्थ हा असू शकतो..सत्याचा आग्रह न धरता परिस्थितीनुरूप वागावे हे कृष्णाने दाखवून दिले…कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले या गोष्टीला खूप अर्थ आहे..सारथी म्हणजे चालक..वाहन चालवून इच्छित स्थळी नेणारा..कृष्णाने अंधकारात गाडल्या गेलेल्या मानव जातीला उजेडाचा रस्ता दाखवला असा याचा अर्थ काढता येईल..त्याचबरोबर असत्याचा नाश करायला प्रसंगी असत्याचे शास्त्र वापरायला हरकत नाही असेही कृष्ण सुचवतो.. जयद्रथाच्या वधाचा प्रसंग आपल्याला खूप काही सांगून जातो.. कृष्ण प्ृथ्वीतलावरच्या ‘लोकशाही’चा प्रणेता आहे. कृष्णाने आपल्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला व बाकीच्यानी आपल्या काठ्या आधारासाठी लावाव्यात असे सर्वांना आवाहन केलं ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहित आहे. ही घटना आपण एक चमत्कार म्हणून बघतो व सोडून देतो. परंतू ही कथा खुप मोठा आणि महत्वाचा संदेश देते. गोवर्धन पर्वत हे भुमीचं प्रतिक, तो उचलण्यासाठी कृष्णाची करमगळी व बाकीच्यानी लावलेल्या काठ्या असे सांगतात की या भुमीवर सर्व जनतेचा हक्क आहे, केवळ राजाचा नाही. सोकशाहीच् हे तत्व आहे, ते सर्वप्रथम कृष्णाने कृतीने दाखवलं. या पुढची उत्क्रांती अर्थात अवतार होता बुद्धाचा..राम, कृष्ण यांच्या अवतारा नंतर माणसाची वृत्ती विरक्तीकडे झुकू लागली हा ‘बुद्ध’ या प्रतीकाचा अर्थ..मस्तकी मुकुट नको आणि हाती शस्त्रही नको..जगाला शांतीचा, त्यागाचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा प्रसार सुरुवातीला खूप जोमाने झाला..पुढचे आपल्या सर्वाना माहिती असेलच…सध्या आपण जगतोय ते ‘कल्की’च्या दहाव्या अवताराच्या काळात…कल्कीचा अर्थ ‘कली ’..कलियुग म्हणतात ते हेच..माणसा-माणसातला विश्वास लयाला गेला आहे..आपापसात युद्ध, लढाया सुरु आहेत..मनुष्य संपत्तीच्या मागे धावत सुटला आहे..आणि पुन्हा एकदा मनुष्य पुढील उत्क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे, पुढील अवताराची वात पाहत आहे..उत्क्रांतीचे चक्र सुरूच आहे आणि सुरूच राहणार आहे.. वरील लेख हा एक कल्पनाविलास आहे..तरीही चार्ल्स डार्विनने मांडलेली उत्क्रांतीची थिअरी आणि आपला दशावतार यांतील साम्य ही कल्पना मनात भरून राहिली आणि ती कागदावर मांडल्याशिवाय मला राहवले नाही..ही कल्पना नसून कदाचित सत्यही असू शकेल कोणजाणे..!! तो विषय यातील अधिकारी व्यक्तींचा..तो पर्यंत आपण केवळ याचा आनंद घेऊ..!! -गणेश साळुंखे 9321811091

वाचने 14316
प्रतिक्रिया 63

प्रतिक्रिया

चार्ल्स डार्विनने मांडलेली उत्क्रांतीची थिअरी
थेअरी ह्या शब्दाला आक्षेप. कंजेक्चर म्ह्णू शकतो. कारण त्याचं फुलप्रूफ मॉडेल अजूनही तयार नाही.

आणि पुन्हा एकदा मनुष्य पुढील उत्क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे, पुढील अवताराची वात पाहत आहे..उत्क्रांतीचे चक्र सुरूच आहे आणि सुरूच राहणार आहे..
मोदी का ? ;)

In reply to by आदूबाळ

पुराणांतील वर्णनांवरुन कल्की हा अवतार शुभ्र घोड्यावरुन येईल असे वाटते. मात्र आज सुपरसॉनिक विमानांच्या काळात घोडयावरुन येण्याचे दिवस राहिले नाहीत. पांढरा शुभ्र घोडा आणि स्वनातीत विमाने यांच्यात काहीच साम्य नाही त्यामुळे ही संगती कशी लावावी यावर लेखकाने प्रकाश टाकावा असे वाटते.

In reply to by सतिश गावडे

युनिकॉर्न की काय त्योबी ढवळा घोडाच असतुया ना पंखवाला, त्योबी उडतुया नी ढवळं इमान बी उडतया दोन दोन पंखावरी हाय की नाय ?

वरील लेख हा एक कल्पनाविलास आहे..
या प्रांजळ कबुलीसाठी धन्यवाद. अशा कल्पनाविलासात जरुर रममाण व्हावं माणसानं. तेव्हढंच माणसाच्या अंगावर मुठभर मास चढतं.
‘सर्व्हायवल आॅफ द फिटेस्ट’ या डार्विनच्या तत्वावूसार त्या पाण्यातल्या पहिल्या सजीवापासून लाखो वर्षांपासून अनेक जीवजाती उत्क्रांत होत होत आजचा प्रगत मानव बनला व यापुढेही ही उत्क्रांती सुरूच राहाणार आहे..अर्थात एखादा छोटा बदल घडायलाही हजारो वर्षं लागतात..
"सर्व्हायवल ऑफ दी फिटेस्ट" ही संज्ञा हर्बर्ट स्पेन्सर याने डार्विनचे "ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसीज" वाचल्यावर त्याचे सार लिहिताना वापरली आहे. डार्विनने नाही. डार्विनचा शब्द वेगळा आहे. तुम्ही डार्विनचे "ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसीज" वाचले आहे का?

कल्पनाविलास मानला तरी अतिशय पद्धतशीर पणे मांडणी केली आहे, खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला यावर इस्पिकचा ऎक्का साहेबांचे मत वाचायला आवडेल.

अतिशय ग्रेट धागा. ह्या अवतारांबद्दल फारशी माहिती नव्हती. तुम्ही डार्विनचा सिद्धांत आणि ह्या अवतारांची सुरेखरित्या सांगड घातली आहे.

डार्विनचा उत्क्रांतिवाद आणि दशावतार ह्यांचा संबंध जोडण्याचा चांगला प्रयत्न.

In reply to by सौन्दर्य

पण तो कल्पनाविलास आहे असं लेखकाने म्हटलंय हे ही लक्षात असू दया. :) अर्थात ज्याने डार्विनचे "ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसिज" हे पुस्तक तसंच उत्क्रांतीवरील इतर लेखकांची पुस्तके वाचली आहेत त्यांच्या हे ही लक्षात येईल की तसा काही संबंध नाही.

In reply to by सतिश गावडे

त्याचबरोबर, डार्विनिझम हे ही पूर्णपने बरोबर असल्याचं अजून सिद्ध झालं नाही हे ही लक्षात असू द्या ;)

In reply to by पॉइंट ब्लँक

ते नाकारत नाहीच. :) मात्र पाश्चिमात्यांनी एखादा शोध लावला किंवा काही सिद्धांत मांडला की "आमच्या पुर्वजांनी हे आधीच लिहून/सांगून ठेवलंय" किंवा "हे आमच्याकडे आधीपासूनच होतं असं म्हणणार्‍या आपल्या देशबांधवांची अंमळ मौज वाटते.

In reply to by आदूबाळ

@ तुम्ही असं म्हणणार हेही आधीच म्हणून ठेवलं होतं ;) …>> :-D टनाटन फ्राय वाल्यांचं मार्केटयार्ड उठवणारा प्रतिसाद! :-D

In reply to by सतिश गावडे

खरं आहे. आणि "असं आमच्याकडे नव्हतंच" असं ठामपणे म्हणणार्‍यांचीही तेवढीच मौज वाटते. दोन्ही आंधळेपणाच, नाही का?

In reply to by रामपुरी

हो. आपल्याकडे एखादी गोष्ट आधीपासून असेल तर ते तसं म्हणण्यात काहीच गैर नाही. पण "त्या आधीपासून असण्याचा" आज काडीचाही उपयोग नसेल तर ते असणे हे नसण्यासारखेच आहे.

In reply to by सतिश गावडे

पूर्णपणे असहमत. "माझ्या दृष्टीने" असं लिहीलं असतं तर ठिक होतं. काय उपयोगी आणि काय निरूपयोगी याचं सरसकटीकरण केलं जाऊ शकत नाही.

भगवान विष्णूचा प्रथम ‘मत्स्य’ अवतार प्रथम मानला गेला आहे डायरेक्ट मासा ? एकपेशीय जीव ते अपृष्टवंशीय जीवांवर हा अन्याय आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

फारच छिद्रान्वेशी बुवा तुम्ही. दोन्हीकडे पाणी कॉमन आहे एव्हढंच पहा ना.

ते कुठे गेले? Everything should be made as simple as possible, but not simpler - Albert Einstein

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ही देखील डायनासॉरचीच एक प्रजाती असावी. शूर्पणखा भर जंगलात वायफाय कनेक्शन मागण्यासाठी रामाकडे आली आणि अपमानित होऊन परत गेली. त्याचा बदला म्हणून रावणाने मारीचाला जंगलातील सर्व मोबाईल टावर तोडून टाकायला सांगितले. त्याच्या पाठी धावण्याच्या नादात रामाची मोबाईल रेंज गेली. लक्ष्मणाच्या मोबाईलची ब्याटरी संपुष्टात आल्याने तो सीतेला रेंजबाहेर न जाण्याचा दम देऊन रामाला पिंग करायला निघाला. त्याचवेळी दुष्ट रावणाने सीतेला फ्रेंड रिक्वेस्टचे आमिष दाखवून रेंजबाहेर नेले आणि पळवले. त्याकाळी देखील मिपा नामे अतिप्राचीन संस्थळ अस्तित्वात होतेच. सीतेच्या मनात एक धागा काढून मदत मागण्याचा विचार होताच. पण सीतेच्या मोबाईलमध्ये RAM कमी पडल्याने तो ह्यांग झाला. तेव्हापासून मोबाईलमध्ये RAM हा अत्यंत महत्वाचा मानला जाऊ लागला. एक, दोन करत करत आता चार पर्यंत हा येउन पोचला आहे. रावणाला मारून राम त्याच पुष्पक विमानाने परत आला. तेव्हा हा हिंसक डायनासॉर बराच माणसाळला असावा. त्याची आठवण म्हणून लोक आजही चैत्र शुद्ध प्रतिपदा ह्या दिवशी घरोघरी प्रतीकात्मक मोबाईल टावर उभारतात. ह्यालाच म्हणतात उत्क्रांती.

In reply to by अवतार

==) बादवे, तुम्ही कुणाचा आणि कितवा अवतार? तुमच्या "अवतार" आयडीवरुन आठवलं, सॅम हॅरिसने त्याच्या Waking Up: A Guide to Spirituality Without Religion या पुस्तकात एक भारी उल्लेख केला आहे. The polytheism of Hinduism allows it to digest parts of many other faiths: If Christians insist that Jesus Christ is the son of God, for instance, Hindus can make him yet another avatar of Vishnu without losing any sleep. आणि हे खरंही आहे. गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार मानणारे अनेक प्रतिसाद मिपावरच वाचले आहेत.

In reply to by सतिश गावडे

आणि हे खरंही आहे. गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार मानणारे अनेक प्रतिसाद मिपावरच वाचले आहेत.
काही मंदिरामध्ये विषणुचा अवतारांपैकी एक म्हणुन गौतम बुद्धाची मूर्ती आहे अस ऐकण्यात आहे. मंदिराचं नाव आठवत नाही आता.

In reply to by पॉइंट ब्लँक

बर्याचशा मध्ययुगीन मंदिरांमधे विष्णू अवतार मूर्तींमधे बुद्धाची मूर्ती समाविष्ट केलेली आहे. खिद्रापूर चा कोपेश्वर, पिंपरीदुमालाचा सोमेश्वर, कायगाव टोके इथला सिद्धेश्वर ह्या मंदिरांत मी बुद्धमूर्ती पाहिल्या आहेत. अवतार मूर्तीमध्ये समाविष्ट असल्याने बुद्धाची मूर्ती नेहमी चतुर्भुज दाखवलेली असते.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद. भारी माहिती दिली आहे. ह्यापैकी फक्त खिद्रापुर पाहिले आहे, पण त्यात बुद्धाची मूर्ती पाहिल्याचे आठवत नाही. :( परत एकदा भेट द्यायला हवी.

In reply to by सतिश गावडे

मी स्वत:चाच एकमेव अवतार आहे. आमची शाखा कुठेही नाही. :)

In reply to by टवाळ कार्टा

आम्ही पुणेकर नाय ! पण रामाच्या पदस्पर्शाने जशी अहिल्या (किंवा अहल्या) पावन झाली तसेच पुणेकरांच्या दुचाकींच्या स्पर्शाने आम्हीही पावन झालो आहोत. :)

In reply to by अवतार

त्याच्या पाठी धावण्याच्या नादात रामाची मोबाईल रेंज गेली. लक्ष्मणाच्या मोबाईलची ब्याटरी संपुष्टात आल्याने तो सीतेला रेंजबाहेर न जाण्याचा दम देऊन रामाला पिंग करायला निघाला. त्याचवेळी दुष्ट रावणाने सीतेला फ्रेंड रिक्वेस्टचे आमिष दाखवून रेंजबाहेर नेले आणि पळवले.
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif
त्याकाळी देखील मिपा नामे अतिप्राचीन संस्थळ अस्तित्वात होतेच. सीतेच्या मनात एक धागा काढून मदत मागण्याचा विचार होताच. पण सीतेच्या मोबाईलमध्ये RAM कमी पडल्याने तो ह्यांग झाला. तेव्हापासून मोबाईलमध्ये RAM हा अत्यंत महत्वाचा मानला जाऊ लागला. एक, दोन करत करत आता चार पर्यंत हा येउन पोचला आहे. रावणाला मारून राम त्याच पुष्पक विमानाने परत आला. तेव्हा हा हिंसक डायनासॉर बराच माणसाळला असावा. त्याची आठवण म्हणून लोक आजही चैत्र शुद्ध प्रतिपदा ह्या दिवशी घरोघरी प्रतीकात्मक मोबाईल टावर उभारतात. ह्यालाच म्हणतात उत्क्रांती.
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif भयंकर मारलय! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यातला रायफलधारी होमो सेपियन सेपियन असावा. पुढ्चे दोघे होमो ढेरपोटियन आणि होमो सुअरौलादियन का?

In reply to by सतिश गावडे

यालाच म्हणतात जीवनचक्र... एका थियरीप्रमाणे चिंपॅंझी आणि डुकराच्या संकराने माणूस जन्मला, आता तो परत डुकराकडे परत वाटचाल करू लागलाय म्हणजे जीवनचक्राचा एक फेरा संपून दुसरा सुरु व्हायला सुरुवात झाली असावी ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अगदी साध्या सोप्या शब्दांत लिहिले आहे तुम्ही. Genes Don't Lie :P बाकी तिथला हा पहिलाच प्रतिसाद काळजाला भिडला.
उत्तम लेख व विचार! आयुर्हित - Sun, 26/01/2014 - 17:39 उत्तम लेख व विचार आहेत आपले! आपल्या वेदात व पुराणात याचे उत्तम रीतीने वर्णन केलेले आहे, फक्त ते रूपकाच्या रुपात असल्याने बर्याच वेळेला,बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. ओळखा पाहू काय आहेत ते!
आपले लोक तिकडे काही शोध लागण्याचे किंवा सिद्धांत मांडला जाण्याची वाट पाहत असतात. ते झाले की इकडे आम्ही लगेच "आमच्या वेदात व पुराणात याचे उत्तम रीतीने वर्णन केलेले आहे" म्हणतो. म्हणजे तसं असूही शकतं. मात्र त्या माहितीचं आम्ही काय केलं हा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे. नेहमीचंच उदाहरण घ्यायचे झाले तर विमानविद्येचे घेता येईल. अगदी रामायणातील पुष्पक विमानापासून तळपदेंच्या चौपाटीवरील विमानोड्डानाच्या गोष्टी सांगून आपण आपलीच पाठ थोपटून घेतो. मात्र या विद्येचा आम्ही व्यवहारात किती उपयोग केला? माधव ज्युलियनांच्या कवितेतील ओळ आठवतातः पुर्वजांची थोरवी लाभे पुन्हा बोलून का

हिरण्यकश्यपु पशु नरासिंह. अर्धपशु प्रल्हाद मनुष्य ! सगळे एकत्र!

एव्हढ्या सगळ्या विनोदी प्रतिसादांनंतर प्रतिवादासाठी काही लिहिणे म्हणजे कुरकुरीत पॉप्-कॉर्नवर भिजकी कांबळ पसरणे. पण हा विषय नेट्वर आणि काही लोकांच्या बोलण्यातून इतक्यावेळा येत असतो की हे सर्व विनोद म्हणून न घेता थेट गंभीर प्रतिसाद लिहून हा विषय मिपापुरता तरी एकदाचा मिटवावा असे वाटले. अर्थात दोनतीन वर्षांनी जाललेखकांच्या नव्यानव्या पिढ्या तयार होतच राहाणार आणि असे विषय पुन्हा पुन्हा वर येतच राहाणार हेही खरेच. तर प्राणिजगताच्या सध्याच्या गटवारी पद्धतिनुसार सर्व प्राण्यांचे दोन मुख्य विभाग पडतात; १)अपृष्ठवंशीय २)पृष्ठवंशीय. (invertibrates, vertibrates.) अपृष्ठवंशीयांमध्ये सुमारे आठ फाय्ला (उपविभाग) आहेत आणि त्यात एकपेशीय प्राण्यापासून ते कवचधारी आणि कीटकांपर्यंत कोट्यवधी प्राणी आहेत. यांचा आपल्या दशावतारांमध्ये कोणताही उल्लेख नाही. पृष्ठवंशरज्जु म्हणजे मणक्यांची माळ असणार्‍या प्राण्यांतही मत्स्यापासून ते सस्तन प्राण्यांपर्यंत लाखो प्राणी आहेत. दशावतारांतले फक्त मत्स्य, कूर्म हेच शास्त्रीय वर्गीकरणानुसार उत्क्रांतीच्या टप्प्यावर एकापाठोपाठ येतात असे म्हणता येऊ शकेल. बाकी सर्व अवतार हे 'मॅमाल्स' या एकाच टप्प्यातले आहेत. त्यातूनही शेवटचे सहा हे मानवच आहेत. त्यामुळे दशावतार आणि उत्क्रांतिवाद यांची सांगड घालणे योग्य नाही.

In reply to by राही

बहूधा शेवटचा परिच्छेद तुमच्या नजरेतून सुटला असावा.
वरील लेख हा एक कल्पनाविलास आहे..तरीही चार्ल्स डार्विनने मांडलेली उत्क्रांतीची थिअरी आणि आपला दशावतार यांतील साम्य ही कल्पना मनात भरून राहिली आणि ती कागदावर मांडल्याशिवाय मला राहवले नाही..ही कल्पना नसून कदाचित सत्यही असू शकेल कोणजाणे..!! तो विषय यातील अधिकारी व्यक्तींचा..तो पर्यंत आपण केवळ याचा आनंद घेऊ..!!
कल्पनाविलास आहे म्हटल्यावर त्याला योग्य-अयोग्याची फुटपट्टी कशी लावणार. :)

या धाग्याची यथायोग्य पिसे काढण्यात आली असल्याने अजून लिहिणे न लगे. बरं ते जाऊ द्या, या दशावतारांचा पहिला उल्लेख कोठल्या पुराणात सापडतो बुवा? आणि त्यात बुद्धांचा समावेश कधी करण्यात आला? की ती बौद्ध धम्माचा वाढता प्रसार रोखण्यासाठी काही सुपिक डोक्यांतून निघालेली आयडिया होती? या विषयावर धागाकर्त्यांनी अधिक प्रकाश टाकल्यास बरे होईल.

दशावताराच्या कथेत वनस्पतींबद्दल काहीच का लिहेलेले नाही हो? त्या बहुधा उत्क्रांत झालेल्या नसाव्यात.

In reply to by सतीश कुडतरकर

सतीश भाऊ, आमच्या कल्याणात डुकरे नाहीत हो. (पण डुकरा अंच पेक्षा महाभयंकर कुत्री मात्र आहेत. रात्री ११ नंतर राश्या वरून चालू शकत नाहीत कुणी. )

In reply to by सिद्धार्थ ४

सिद्धार्थ ते कुत्रे माझे चांगले मित्र होते. खूप जुनी ओळख आहे. रात्री सगळीकडे निजानीज झाल्यावर आम्ही रस्त्याची मापे घेत घरी जाताना तेच आम्हाला साथसोबत करायचे. काय बिशाद होती एखाद्या क्षुल्लक मानवाची आमच्यावर हाथ टाकण्याची.

In reply to by टवाळ कार्टा

"केतकी पिवळी पडली" चे लेखक स. त. कुडचेडकर "आत्मोन्नतीचे सहा सोपान" चे लेखक चौखुरे गुरुजि

In reply to by hitesh

हितेश भाऊ ते कुडतरकर नाहीत. वेगळच नाव आहे. पुलंनी आपल्या पुस्तकात कुडतरकरांचा उल्लेख करावा अस कोणतही महान कार्य केलेलं नाही.