Skip to main content

प्रतिशब्द

लेखक आकाश खोत
शुक्रवार, 13/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"मंडेला ऑफिसला जायला खूप बोर होतं यार…" "यावेळेस दिवाळी कोणत्या डेटला येतेय?" "अक्खा विक मला ऑफिसमध्ये खूप उशीर झाला… इतका लोड आहे कामाचा. वर्क प्रेशर आहे. सगळेच टेन्शनमध्ये आहेत. " हि आपल्या रोजच्या बोलण्यातली अगदी साधीसुधी वाक्ये. ऑर डेली लाईफमधली युज्युअल सेंटेंसेस. ह्यात मराठी किती आणि इंग्लिश किती ते पहा. आपल्या कळत नकळत आपण आपल्याच भाषेतले साधे सोपे शब्द बाद करत चाललो आहोत. हे मराठीचं रडगाणं ऐकवायला मी सांगत नाहीये. पण एवढंच सांगायचा प्रयत्न आहे कि आपली भाषा एवढी अवघड आणि दरिद्री नाही कि आपण आपल्या हाताने (तोंडाने) तिचा नाश करावा. आज हे लिहावसं वाटलं कारण एक पुस्तक वाचता वाचता सावरकरांचा एक किस्सा वाचला. पुस्तक आहे प्रभाकर पेंढारकर यांचं "एका स्टुडीओचे आत्मवृत्त". या पुस्तकात मराठीतले मोठे दिग्दर्शक भालजी पेंढारकर (लेखकाचे वडील) यांनी कोल्हापुरात उभारलेल्या जयप्रभा स्टुडीओची कहाणी सांगितली आहे. त्याच्या सुरुवातीपासून घडलेल्या घडामोडी, तिथे बनलेले चित्रपट, किस्से, तिथली माणसं, तिथलं राजकारण अशा गोष्टींवर हे पुस्तक आहे. Savarkar त्यातला एक किस्सा असा. सावरकर हा स्टुडीओ पाहायला आले होते. पूर्ण स्टुडीओ बारकाईने पाहून झाल्यावर त्यांनी त्याचं कौतुक तर केलंच, पण तिथल्या विभागांच्या पाट्या "एडिटिंग डीपार्टमेंट", "रेकॉर्डींग डीपार्टमेंट" अशी इंग्लिशमध्ये का आहेत असं विचारलं. त्यावर तिथल्या लोकांनी चित्रपट हि गोष्टच मुळात बाहेरून आलेली आहे आणि त्यातल्या संकल्पना सगळ्या बाहेरच्या आहेत असं स्पष्टीकरण दिलं. सावरकरांनी ताबडतोब त्यांनी पाहिलेल्या सर्व विभागांना "मुद्रण विभाग", "चित्रण विभाग", "संकलन विभाग", "दिग्दर्शन विभाग" असे प्रतिशब्द सुचवले. यातले बरेच शब्द आज प्रचलित आहेत, आणि आपल्या रोजच्या बोलण्यात जरी नसले, तरी चित्रपटातली नामावली, वर्तमानपत्रातल्या बातम्या, भाषणे, अशा ठिकाणी तरी यांचा वापर होतो. सावरकरांचं मराठी भाषेतलं योगदान प्रचंड आहे. मुळात त्यांचे ऐतिहासिक, राजकीय विषयावर ग्रंथ, महाकाव्य पाहिले तर तीच कामगिरी खूप मोठी आहे. पण एवढ्यावर थांबतील ते सावरकर कसले? भाषा हि शेवटी संवादाचं मध्यम असते. आणि ज्याचं राज्य त्याची भाषा प्रभावी ठरते. भारतात काही शतके मुगलांचा सुलतानांचा अंमल होता. त्यामुळे हिंदी मराठी या भाषांमध्ये उर्दू फारसी या सत्ता गाजवणाऱ्या लोकांच्या भाषांचा शिरकाव झाला होता. शिवाजी महाराजांच्या काळातली मराठी पहिली तरी तो प्रभाव लक्षात येतो. पुढे इंग्रज आले तेव्हा इंग्लिश भाषेने आपली छाप आपल्या भाषांवर सोडली. पण यामुळे मुळात सुंदर असलेली, "अमृतातेही पैजा जिंके" अशी आपली मराठी काही अंशी भ्रष्ट झाली. सावरकर मोठे विद्वान आणि पंडित होते. त्यांची साहित्यातली आणि काव्यातली भाषासुद्धा (जयोस्तुते हे गीत आठवा) संस्कृतप्रचुर होती. सावरकरांनी मराठी शुद्ध करण्याचा विडा उचलून असे फारसी इंग्लिश शब्दांचे कितीतरी मराठी प्रतिशब्द सुचवले, वापरात आणले. मोठ्या माणसांच्या छोट्या गोष्टींचाही प्रभाव मोठा असतो. सावरकर यांना स्वातंत्र्यवीर म्हणून पहिल्यांदा संबोधलं ते एका जाहीर सभेत आचार्य अत्रे यांनी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असं नाव रूढ झालं. प्रल्हाद केशव अत्रे यांनासुद्धा आचार्य अत्रे म्हणून संबोधलं ते सावरकर यांनी. जशी हि सहज म्हणून वापरलेली संबोधने रूढ झाली. तसेच त्यांनी दिलेले प्रतिशब्द सुद्धा रूढ झाले. इतके कि ते त्यांनी योजलेले शब्द होते हे हि आपल्याला माहित नसतं. एका माणसाचं आपल्या मातृभाषेवर किती प्रेम असू शकतं ते पहा. त्यांचा आपली भाषा शुद्ध बोलण्यावर वापरण्यावर कटाक्ष तर होताच पण ती आणखी प्रवाही कशी करता येईल, आणखी संकल्पना मराठीत कशा आणता येतील, बोलता येतील यासाठी सुद्धा प्रयत्न होता. आज आपल्यावर आपल्याच लोकांचं राज्य आहे. तरी आपण इंग्लिशचेच गुलाम आहोत. इंग्लिश मिडीयम, इंग्लिश बोलणं, इंग्लिश वाचन यावर आपला इतका भर असतो. पण आपण हेच विसरतो कि आपण मराठी आहोत. आपण आपली भाषा कशी बोलतो, आपल्या भाषेतलं साहित्य आपल्याला माहित आहे का याची आपल्याला पर्वा नाही. दुसऱ्या भाषा शिकुन त्यात प्राविण्य मिळवण्याला कोणाचीही हरकत नाही. पण आपल्या भाषेला तिच्या सौंदर्याला विसरायला नको. इथे मराठीच्या राजकारणाचा विषय नाही. मराठीच्या नावावर आंदोलन आणि तोडफोड करणाऱ्या किती तरी "कार्यकर्त्यां"चं मराठी किती चांगलं असतं? असे आंदोलन करून "SUREKHA GENERAL STORES" हि पाटी "सुरेखा जनरल स्टोर्स" अशी लावता येते. पण हि मराठी पाटी आहे कि मराठी लिपीतली पाटी आहे? मी बोलताना आणि माझे मराठी लेख लिहताना जमेल तितके मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करतो. पण ते शब्द काही मराठी लोकांनाच समजायला जड जातात. मग असं जड का बोलतो किंवा लिहितो अशा हावभावांना किंवा थेट प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आज काल मला जाणवायला लागलंय कि बोलताना मलासुद्धा मराठी शब्द लवकर सुचत नाहीत. तुम्हाला वाटेल याचा एवढा बाऊ का करावा? नवीन काळेच्या एका लेखात या विषयावर लिहिलं होतं कि आपण ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी आज बोलतो का? भाषा हा प्रवाह असतो आणि तो काळानुसार बदलत राहतो. मराठी सुद्धा वाहत राहील आणि कोणत्या न कोणत्या स्वरुपात तिचं अस्तित्व टिकून राहील. पटण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर किंवा शिवाजी महाराजांच्या काळातलीच काय आपण आपल्या वडलांच्या काळातली मराठीसुद्धा बोलत नाही. भाषा बदलते, ढंग बदलतो, पण शब्द बदलत नाहीत. ते वापरात राहतात किंवा वापरातून जातात. आई तेव्हासुद्धा आईच होती आणि उद्यासुद्धा आईच राहील. पण तिला आई म्हणणारे राहतील का? माहित नाही. शंभर टक्के शुद्ध मराठीचा वापर खूप अवघड आहे. पण आपण मराठीचं प्रमाण तरी कायम राखुयात. मराठीत नसलेल्या संकल्पना, नवे शोध, याबद्दल मराठीत लिहून मराठीला ज्ञानभाषा करण्याचा प्रयत्न अच्युत गोडबोले सारखे लेखक करत आहेत, त्यांना प्रतिसाद देऊयात. इंग्लिश भाषेत दरवर्षी नव्या शब्दांची भर पडते आहे. त्यात बाकीच्या भाषेतले शब्दसुद्धा स्वीकारले जातात. हि लवचिकताच त्यांची शक्ती आहे. आपणहि अशी लवचिकता दाखवूयात. आपण आजही नकळत अनेक इंग्लिश शब्द वापरतोच. जिथे पर्याय नाही तिथे इंग्लिश शब्द वापरायला काहीच हरकत नाही. पण जिथे सुंदर मराठी शब्द उपलब्ध आहेत, तिथे ते वापरले जावेत एवढीच अपेक्षा आहे. नव्या शब्दांचे सृजन करून भाषेला देणगी देण्याची प्रतिभा सावरकरांसारख्या मोजक्याच लोकांकडे असते. पण आहेत ते शब्द वापरण्याची काळजी आपण घेऊयात. आपणच मराठी शब्द सोडून दिले तर काही वर्षांनी बोलली जाणारी जी भाषा असेल, तिची बांधणी आणि व्याकरण मराठी असू शकेल पण शब्द मराठी असणार नाहीत. संवादाचं माध्यम एवढंच भाषेचं अस्तित्व नसतं. भाषेत त्या समाजाची सगळी संस्कृती, इतिहास सामावलेला असतो. आज काही आदिवासी भाषा लोप पावत आहेत. ती भाषा बोलणारे लोक दहा, काही ठिकाणी एक एवढेच लोक शिल्लक आहेत. आपल्या भाषेत कोणाशी न बोलता येण्याचं दुःख तेच सांगू शकतील. पण तेही त्यांच्या भाषेत नाही. आज आपल्याला हे समजणार नाही. हा म्हटलं तर महत्वाचा सोडलं तर बिनकामाचा विषय आहे. भावना पोचल्या ना बास…. म्हणून सोडून देता येईल. एवढंच सांगतो… नदी जेव्हा स्वतंत्रपणे वाहते तेव्हाच तिला वेगळं नाव आणि आपली ओळख असते. ती एकदा का मोठ्या नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळाली, तर त्या पाण्यात तिचं अस्तित्व तर असतं पण वेगळी ओळख नसते.

वाचने 11916
प्रतिक्रिया 65

प्रतिक्रिया

आजही आम्हाला अलिकडले नव्या पिढीतले लोक उगाच इंग्रजी शब्द का वापरतात याचं कोडं आहे.... उदा. गणवेशाला युनिफॉर्म पोषाखाला ड्रेस वगैरे.... बाकी सावरकर झाले म्हणून त्यांनी सुचवलेले सगळेच शब्द प्रॅक्टिकल होते असे नव्हे... सावरकर हे थोर देशभक्त होते यात काडीमात्र संशय नाही पण त्यानी सुचवलेले सिग्नलला 'अग्निरथविश्रामधाम' वगैरे शब्द अगदीच 'हे' होते.... आता नव्या पिढीने ते सुधारून त्या जागी नवे मराठी शब्द आणले पाहिजेत. आणि जर ते मिळत नसतील तर इंग्रजी शब्दांचा अंगिकार केला पाहिजे.... तिथे मुक्तविचार (मराठीतः ओपन माईन्ड) वापरलं पाहिजे... कसं म्हणता?

In reply to by पिवळा डांबिस

बरोबर… मला पण हेच म्हणायचय. लवचिकता हवी. अति अवघड शब्द योजून आपण उलट लोकांना परावृत्त करू. काही वैज्ञानिक अथवा तांत्रिक गोष्टी मराठीत किंवा भारतात नव्हत्याच त्यांना काही ठिकाणी चांगले प्रतिशब्द मिळाले तर काही ठिकाणी अवघड शब्द मिळाले. सोय महत्वाची. इथे सावरकरांचाच एक ऐकीव किस्सा आठवतोय. त्यांनी रेनकोट ला पाणकोट हा शब्द सुचवला होता. त्यावर अत्रेंनी त्यातला कोट तर इंग्रजीच आहे ना, त्याला काय पर्याय असा प्रश्न विचारला होता. हे झालं नसलेल्या संकल्पना मराठीत आणण्याचं. अगदी अट्टाहासाने सगळं मराठीत आणि तेही अवघड करून आणण्याची गरज नाही. त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा हा आहे कि जे सुंदर शब्द मराठीत आधिपासून आहेत, त्यांना बाद करून इंग्रजी शब्द आणू नयेत.

In reply to by आकाश खोत

काँबो शब्द तर अरबीफार्सीकरिताही वापरतात. सबब पाणकोट हा शब्द एक नंबर आहे.

In reply to by पिवळा डांबिस

पण त्यानी सुचवलेले सिग्नलला 'अग्निरथविश्रामधाम' वगैरे शब्द
'अग्निरथविश्रामधाम' हा प्रतिशब्द सिग्नलसाठी नसून स्टेशनसाठी आहे.

In reply to by कपिलमुनी

पूर्णतः मान्य! मी माफी मागतो आणि तुमच्या दयेची याचना करतो. सिग्नलला त्यांनी 'अग्निरथगमनागमनमार्गनिदर्शक पट्टिका' हे सुचवलं होतं. हे तर जास्तीच 'हे' आहे....

In reply to by कपिलमुनी

आता तुम्ही कशाला पाया पडताय? तुम्ही आणि त्या ताईंनी लिहिलेलं बरोबरच आहे. चूक आम्ही केली होती, कपिलमुनि! :) आणि केलेल्या चुकीबद्दल विनाशर्त माफी मागण्यात आम्ही कमीपणा मानत नाही.

In reply to by पिवळा डांबिस

माफी ठीक, पण 'दयेची याचना' वैग्रे का ब्रं ..?

In reply to by पिवळा डांबिस

हे शब्द खरोखरच सावरकरांनी सांगितले होते की उगीच त्यांच्या नावावर खपवले जातात? तो आईस्क्रीमवाला "आम्रदुग्धशर्करावगुंठितगोलगट्टू" शब्दही तसाच ट्रोलछाप वाट्टोय कुणा टवाळाने उगीच खपवलेला. ;) मला विचाराल तर जे सावरकर वेतन, दिनांक, मुद्रण, इ. सुटसुटीत शब्द सुचवू शकतात ते याच एका केसमध्ये इतके वाईट गंडतील असं आजिबात वाटत नाही.

In reply to by पिवळा डांबिस

@'अग्निरथगमनागमनमार्गनिदर्शक पट्टिका'>>> नोहे आचार्य ..नोहे..! त्यासी - आरक्तपीतहरीतदीपवाहनगमनागमननिर्णायकनिदर्शकपट्टीका ऐसे म्हणणे अधिक उचित नोहे का??? :D

In reply to by पिवळा डांबिस

सिग्नलला 'अग्निरथ आगमन निर्गमन सुचक लोह ताम्र पत्तिका असा शब्द ऐकला होता. अग्निरथविश्रामधाम स्टेशन साठी असावा.

महत्वाचा मुद्दा हा आहे कि जे सुंदर शब्द मराठीत आधिपासून आहेत, त्यांना बाद करून इंग्रजी शब्द आणू नयेत.
पूर्णतः सहमत आहे.... विशेषतः ज्यासाठी मराठीत आधीच शब्द उपलब्ध आहेत (उदा. थॅन्क्यू वा थॅन्क्स साठी आभार वा धन्यवाद) त्यासाठी तरी इंग्रजी वा धेडगुजरी शब्द आणू नयेत...

In reply to by पिवळा डांबिस

आभार, धन्यवाद, इ. शब्द हे इंग्लिशसाठी पर्याय म्हणून 'पाडण्यात' आलेले आहेत असे वाटते. तसाच तो संस्कृती नामक शब्दही रीसेंटलि पाडण्यात आलेला आहे. कल्चरसाठी पाडल्या गेला आहे. त्याचा किस्सा असा, की कल्चरसाठी रवींद्रनाथ टागोरांनी पहिल्यांदा कृष्टी हा शब्द सुचवला, तो शब्द इतिहासाचार्य राजवाड्यांना समजला. मग त्यांनी संस्कृती हा शब्द सुचवला तोच टागोरांनाही पसंत पडला अन अख्ख्या भारतभर रुळला.

साधे साधे मराठी शब्द इंग्रजीला पर्याय म्हणून कटाक्षाने वापरावे याच्याशी सहमत. पण टेबल, ग्लास यासारखे इंग्रजी शब्दही मराठीत सामावून घेण्यास हरकत नसावी.

In reply to by बॅटमॅन

फारसी की अरबी (की फारसी मार्गे अरबी)? कारण स्पॅनिशमध्ये टेबलासाठी मेसा असा शब्द आहे, त्याचे मूळ मेजात असण्याची शक्यता आहे. मूरकालीन स्पॅनिशात असे बरेच अरबी शब्द आले होते.

संपादक महोदय, याबाबत इथे एक चिकट धागा तयार करता येईल का? जिथे फक्त इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी प्रतिशब्द असतील. बाकीच्या संवादिकांना (पोस्ट?) तिथे पूर्ण मज्जाव असेल. बर्‍याच वेळा असं लक्षात येतं की मला मराठी तर लिहायचंय पण त्यासाठी मराठी प्रतिशब्द मला माहिती नाही. असे लोक तिथे जावून प्रतिशब्द माहीत करून घेवू शकतील.

अतिशय भ्रष्ट अशी मराठी ( इंग्लिश / पंजाबी मिश्रित ) वापरण्यात म टा पुढे आहे. अशी भाषा वापरली म्हणजे आपला खप जास्त होईल असे तिथे बसलेल्या रेम्याडोक्यांना वाटते

इंग्रजीचं सोडा . हिन्दी भाषा मराठीला आणि इतर प्रादेशीक भाषाना अक्षरशः गिळंकृत करत चालली आहे त्याचे काय. हिन्दीचे आक्रमण हे मराठीला मारकच आहे. आपण अजून जागे झालेलो नाहिय्ये.

In reply to by विजुभाऊ

विजू काही हिंदीचा दुस्वास सोडत नाही. विजू,अरे ह्याला आपणच जबाबदार नाही का?त्या सुधीर गाडगीळच्या एक दशांशही मराठी माहित नसलेले लोक सध्या टी.व्ही.चॅनेलसवर बातम्या सांगत आहेत...चर्चा करीत आहेत.मराठी म्हणून जन्माला येउन उभे आयुष्य हिंदी गाणी गाण्यात, गाण्यांना चाली लावण्यात गेलेले अनेक कलाकार होते,आहेत.. जाब ह्या लोकांना विचारायचा असे ह्यांचे मत.

चला आता भराभर शब्ध द्या बरं slang पडशब्द , बरणी jar, चटपटीत tangy चुरचुरीत Crunchy समज समजुतदारmature वयस्क adult बोजा load ताण tension बळकावणे encroachment खूण signal इशारा signal a person वानगी पाककृती recepe नडणे bother रीत method अपरिचित unknown पती Mister नवरा नवरोबा हे misses पत्नी बायको श्रीमती ही tryप्रयत्न

In reply to by सस्नेह

'बटन'ला मराठी प्रतिशब्द काय असावा ब्र ?
तुम्हाला बटनाची पडल्येय, आम्हाला 'मटन' ला प्रतिशब्द काय असावा ह्याची चिंता पडल्येय! ते मांस वगैरे अगदीच पुस्तकी वाटतं... :)

अरे रागाला कशाला येतोस ? त्याने माझ्या गाडीला कट मारला मग मी त्याला फुल्ल राग दिला .. करायला मागत नाही अशी भयंकर मराठी सर्व वाहिन्यांवरून चालू असते

भाषा भ्रष्ट होत नसते कधीच. भाषा, संस्कृती ह्या गोष्टी प्रवाही आहेत हे ज्यांना समजत नाही ते मागे पडतात. मलातरी सर्व भाषा आवडतात, जगाव्याश्या वाटतात. मग ती इंग्रजी असो, मराठी असो किंवा सेंटिनलीज्. आणि भाषाशुद्धीबिद्धी ह्या आग्रहाशी मी सहमत नाही.

In reply to by एस

भाषा प्रवाही असेल तरच तिचा विकास होतो आणि ती तगते. प्रमाण भाषा अशी काही नसते. पुण्याची मराठी चांगली आणि विदर्भ/ मराठवाड्यातील चु़कीची असे म्हणणे निरर्थक आहे. माझा एक मित्र, जो तामिळनाडुतला मराठी होता तो असे बोलायचा ' वडलांचा काळ झाला तेव्हाची गोष्ट " हे काय फार दिवस चालणार नाही. भाषेत भर ही पडतच जाते.

In reply to by एस

अगदीच पटलंय … एखादा विचार व्यवस्थित व्यक्त करता येणं महत्त्वाचं. एखाद्या विशिष्ट शब्दासाठी मारामारी करत बसलं तर हळू हळू व्यक्त होणंच कमी होत जाईल.

मराठी भाषेला आज नाही तर उद्या चांगले दिवस आल्याशिवाय ( शिवाय हा फारसी शब्द) राहणार नाही, असे लेख वाचले की परत मराठी शब्द वापरण्याची प्रेरणा जागृत होत असते. आपण आपला प्रयत्न करीत राहणे हीच खरी उपासना आहे असे मला वाटते.

मराठी बद्दल प्रेम जरूर आहे ( आणि वापर पण ) पण प्रतिशब्द शोधणे/ वापरणे म्हणजेच प्रेम आहे असा अर्थ होत नाही . आणि जबरदस्तीने प्रतिशब्द शोधणे तर जास्तच रटाळ काम आहे .जसे कि मोबाइल = भ्रमणध्वनी / भ्रमणसंच. काय हरकत आहे मोबाइल हा शब्द मराठी मध्ये घ्यायला . प्रतिशब्द सोपे असतील तर माझ्या सारखे सामान्य लोक वापरतीलच पण जर अवघड असतील तर अजिबात वापरणार नाहीत आणि मराठी मध्ये अजून एका इंग्लिश शब्दाची भर पडेल . मराठी प्रतिशब्द जबरदस्ती ने असले कि ती सरकारी मराठी असते . सर्वसामान्य लोक ती वापरत नाहीत . त्यामुळे तसल्या भाषेला सरकारी मराठी मरण नक्की आहे पण मराठी मरणार नाही. मराठी बुडणार / कोण मराठी बोलणार नाही पुढच्या १० वर्षात अशी वाक्य तर फारच मजेशीर असतात . १० कोटी लोक मराठी बोलतात . पेपर आहेत , चोवीस तास बातम्या देणारे चानेल आहेत , नाटके आहेत , सध्या मराठी पिक्चर न पण चांगले दिवस आले आहेत . मिसळपाव सारखी ठिकाणे तर मराठी जास्त ग्लोबल होत असल्याचेच पुरावे आहेत . आणि मुख्य म्हणजे मराठी घरात अजून मराठी मधेच संवाद होतो . कशाला उगाच मराठी बुडेल . बदल तर सर्व भाषा मध्ये होतात . ज्ञानेश्वरी काळा मधली मराठी , शिवाजी महाराजांच्या काळामधील मराठी , टिळकांच्या काळा मधील मराठी आणि आजची मराठी . इंग्लिश चे आक्रमण मराठी नाही तर सगळ्याच भाषा वर होत आहे सो जस्ट चिल ( काय करावे मराठी भाषांतर . थंड घ्या :-) )

लेख खूप पटला. मला वाटत, केवळ योग्य शब्दच नव्हे तर भाषेचा वापर देखिल शुद्ध असावा असे वाटते. उदाहरणार्थ: गेलेलो/आलेलो=गेलो होतो/आलो होतो. किंवा ती बोलली= ती म्हणाली. अलीकडे हा फरक कोणालाही लक्षात येत नाही; ही दुःखाची गोष्ट आहे.

लेख खूपच आवडला. मी ही व्यवहारात जास्तीत जास्त मराठी शब्द वापरते. याबद्दल आमच्याही घरात चर्चा होते. सामान्यत: वेगवेगळ्या अनोळखी लोकांचे संशयास्पद दूरध्वनी जेव्हा येतात आणि ते हिन्दी मध्ये जेव्हा माहिती विचारतात तेव्हा मी नक्कीच मराठीत उत्तराची अपेक्षा करते आणि समोरील व्यक्ती वैतागून यन्त्र बन्द करते तेव्हा मजा वाटते.

हाफ शेंच्युरी निमीत्त श्री. आकाश खोत आणी समस्त मिपाकरांचा सत्कार " दुमदुमले पाताळ उठला प्रतिशब्द| थरथरली धरणीधर मानिला खेद||" या ओळी गाऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते

भाषेत रूढ झालेल्या परकीय शब्दांना प्रतिशब्द सुचवणे आणि ते समाजाच्या गळी उतरवणे हे येर्यागबाळ्याचे काम नव्हे. त्याकरता भाषेवर प्रभुत्त्व असावे लागते. प्रतिभा असावी लागते. ती असली तरी त्या व्यक्तीने सुचवलेले सगळेच शब्द यशस्वी होतील असे नाही. जसे चांगल्या कलाकाराचे सगळे सिनेमे, कादंबर्‍या, नाटके, गाणी यशस्वी होत नाहीत तसेच हेही आहे. नव्या शब्दांना प्रस्थापित वा अन्य पर्यायी शब्दांशी स्पर्धा करावी लागते. त्यात जे जिंकतील तेच भाषा स्वीकारेल. पण म्हणून नवे शब्द निर्माण करण्याची प्रक्रिया थांबवू नये. जिवंत भाषेत नवनवीन शब्द रोज प्रवेश करत असतात.

लेखनाच्या आशयाशी सहमत. मराठी प्रतिशब्दांचा अतिरेकी आग्रह टाळून जिथेही शक्य असेल तिथे मराठी प्रतिशब्द वापरण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. स्मार्टफोनसाठी चतुरभ्रमणध्वनी हा असाच एक प्रयत्न. यानिमित्ताने विदर्भात वापरले जाणारे काही मराठमोळे शब्द लिहितो
  • दालचिनी = कलमी
  • फ्लॉवर = फुलकोबी (तिची बहीण पानकोबी)
  • मटार = वाटाणे
  • टोमॅटो = टमाटे

मराठी मधे लघुरूप हा प्रकार कमी आहे त्यामुळे शब्द बोजड वाटतात. कॉम्पक्ट डीस्क साठी सीडी या सारखी लघुरूपे मराठीमध्ये कमी आढळतात