Skip to main content

PMPL ने प्रवास का करावा?

गुरुवार, 12/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
PMPL चे वाढते दर आणि खालावत /जाणारा सेवेचा दर्जा ह्या कडे बघता असा प्रश्न मनात येतो. तसेही पुण्यातील बहुतांश लोक PMPL च्या वाटेला जात नाहीतच . तरीही एक गणित मनात आले ते येथे मांडत आहे : १. उदाहरण दाखल धायरी ते राजाराम पूल / स्वारगेट / पुणे स्टेशन / हे तीन दर बघू २. हे तीन दर अनुक्रमे १०/ २० / २५ असे आहेत. अंतर अनुक्रमे (साधारण ) ५/१०/१२ किमी आहे. म्हणजे प्रती किमी २ रुपये दर पडतो आता हेच जर स्वतःच्या दुचाकीने जायचे असेल तर गणित काहीसे असे येईल : १. बजाज डिस्कवर सारखी चांगले मायलेज देणारी गाडी साधारण ५०००० रुपयांना पडते २. पेट्रोल cost : ६५ च्या मायलेज ने १ रुपया प्रती किमी ३. देखभाल खर्च: साधारण ०. ३ रुपये प्रती किमी (३००० किमी नंतर servicing गृहीत धरून ) ४. वाहन विमा ०. १ रुपये प्रती किमी (वार्षिक ८०० रुपये ) ५. वाहनाची किंमत : ५ वर्षे साधारण ४०,००० किमी चालविल्या नंतर येणारी पुनर्विक्री किंमत २००००. म्हणजे ४०,००० किमी साठी रुपये ३०००० खर्च . व्याज गृहीत धरत हा खर्च किमी ला १ रुपया असा गृहीत धरायला हरकत नाही . एकूण प्रती किमी खर्च (१+२+३+४+५): २.४ प्रती किमी म्हणजे PMPL च्या सेवे साठी प्रती किमी २ रुपये तर स्वतःची दुचाकी वापरल्यास २.४ रुपये असे गणित आहे. म्हणजे दुचाकी वापरण्याचा खर्च PMPL च्या तुलनेत २०% जास्त आहे. त्यातून दोघांनी प्रवास केल्यास तो PMPL च्या तुलनेत स्वस्तच आहे. त्यातून वेळेची बचत, flexiblity हे इतर फायदे आहेतच. तसेच PMPL हि काही घराच्या दारात मिळत नाही म्हणजे ते चालणे अधिक वेळेवर न धावणाऱ्या स्वछ नसलेल्या कुठेही बंद पडू शकणाऱ्या गाड्या हे मुद्दे गृहीत धरता PMPL ने प्रवास का करावा ? असेच प्रश्न चिन्ह उभे राहते . ह्यात जेष्ठ नागरिक, लहान मुले, किंवा दुचाकी विकत घेणे न परवडणारे लोक ह्यांची अवस्था बिकट होते. त्यांना PMPML वापरण्या वाचून दुसरा पर्याय नाही आणि PMPL चा दर्जा आणि खर्च ह्याचे कधीच न जुळणारे गणित, ह्या कात्रीत सापडायला होते. टीप : ह्यातील गणित ढोबळ मानाने सध्याचे इंधन भाव लक्षात घेऊन मांडले आहे. गाडी चा प्रकार, नवीन / जुनी , वापर ह्यानुसार ह्यात थोडेफार फरक शकतात .

वाचने 9957
प्रतिक्रिया 56

प्रतिक्रिया

ह्याच अनुषंघाने पुणे शहरात एशियात सर्वाधिक दुचाक्या आहेत असे वाचल्याचे स्मरले, असो! तुमचा प्रश्न आहे पीएम्पीएम्एल ने प्रवास का करावा? आईच्यान आमचे पुण्यात आलो होतो तेव्हाच प्रथम दिवशी चं गावठी रड़वे ते वदन ध्यान आले एकदम ध्यानी, एका हाती एयरबॅग दुसऱ्या हाती बिसलेरी ची बाटली (घरचेच पाणी भरुन आणलेली) पाठी वर रकसैक अंन एका मुठीत चुरगळलेला मित्राच्या खोली चा पत्ता! नमनाला ह्या घड़ा भर आठवणी ओतल्या बद्दल क्षमस्व पण तुमचे बाइक चे गणित तेव्हा नव्हते हो बसत! बापाच्या पेंशन मधुन २०℅ फंड वर डल्ला मारुन उरी स्वप्ने बाळगुन पुण्यात बाइक चैन वाटे, सहारा फ़क्त पीएम्टीचाच असे!! नाही तर ११ नंबर गाडी! आजही असे नमुने पुण्यात येतात! झगड़तात त्यांस पर्याय नसतो! म्हणुन पीएम्टी ने प्रवास परवडतो

धायरी ते पुणे स्टेशन बसने प्रवास... २५ रुपये धायरी ते पुणे स्टेशन रिक्षाचा एलाईट प्रवास... १०० रुपये ... ... ... ... गर्रम गर्रम उकाड्यात पुरणाच्या करंजी सारख्या गच्च भरलेल्या बसजवळून सुर्रर्रर्रर्र करून जाताना आपण सोडलेला निश्वास... प्राईसलेस. अवांतरः स्कूटर घ्या. दळणाचा डबा पण आणता येतो.

आपण बस व दुचाकी अशी तुलना केली आहे. दोघे गेले तर दुचाकी स्वस्त आहे हे ही बरोबर ! काही सोयी बसमधे आहेत .उदा. पाउस , कडक उन, कडक थंडी या वेळी बसच सोयीची. बस मधे पाठ टेकता येत असल्याने आराम. आता दुचाकीची बाजू दुचाकी चालवणे ही माझ्या सारख्याला वासनापूर्ची सारखे समाधान देते. ड्रायव्हिग ही एक प्रकारची वासना आहे असा माझा तरी अनुभव आहे. हे सुख दुसर्‍याने वाहन हाकारून आपण त्यात बसण्यात नाही. दुचाकीने घर ते घर जाता येत असल्याने वेळ वाचतो. हा मोठा फायदा. वेटिंंग टाईम हा तोटा दुचाकीत नाही. अपरात्री सुद्धा घरी परतता येते. पहाटे लवकर निघता येते. सबब १०० किमी पर्यंत महाग पडली तरी दुचाकीच चांगली. चार चाकी असेल पेट्रोल शेअर होण्याची शक्यता असेल तर तो पर्याय सर्वात मस्त.

करु नका.. पण दुसरं काही नसेल हातशी तर काय करणार? कात्रज - निगडी (४३) बासचे तिकीट आता दिडपट महाग झाले आहे.. २० चे एकदम ३० झालय तिकिट.. आणि इकडे तर डिझेल स्वस्त झालय.. सध्या तरी सार्वजनिक वाहनांपेक्षा खाजगी वाहनाने जाणे स्वस्त आणि सोयीचे आहे.. (पण असं अजिबात असु नये..)

पुणे PMPLबसने प्रवास करण्यापेक्षा मागून धावत गेल्यास स्वस्त पडेल. नाहीतरी हळूच जाते ना? माझ्याकडे काही किस्से(प्रवासाचे हो धावण्याचे नाही)आहेत.

पण माझ्या कंपनी सहकार्‍याला मात्र त्याची "जीवन-जोडीदारीण" PMPL मध्ये भेटली (आणि पटलीही) त्यामुळे तरी....काहींनी प्रवास करायला हरकत नाही. (तेव्ढाच अतिरीक्त लाभ) २९८ चा सुरवातीचा॑ प्रवासी.

सगळे लोक बसमधे चढले/उतरले का नाही हे न बघता बशी चालू करतात सरळ! हुंबैच्या लोकल ट्रेनमधे आपोआप चढता उतरता येते तरी! मग ती लोकल ट्रेन परवडली!

In reply to by बॅटमॅन

नया है वह!!! कंडक्टर नी दोन-चार वेळा उद्धार केला, प्रवासात ४-६ हाडं हरवली की मग मत बदलेल. बाकी वाट पाहिन पण एस.टी. नी जाईन हे धोरण मात्र मी लांबच्या प्रवासाला पाळतो.

मी सर्वप्रथम पुण्याला आलो तेव्हा मनपा (कांग्रेस भवन) समोरून मित्राला फोन केला कॉइन बॉक्स वरुन (आमच्या विदर्भातुन येणाऱ्या समद्या प्राइवेट बसेस पहाटे पोचतात आजही पुण्यात), "पिठ्ठया मी आलोय बे तू कुठे राहतो ते कोथरूड नाही मालुम मले येतं का घ्यायले?" "अबे भाड़खाऊच्या मी माझ्या झोपेपुढे मैकेनिक्स चे लेक्चर सोडले, अंन आता तुला घ्यायले येऊ का? कोथरूड डिपो पकड़ अन ये" ह्या रामपारी प्रेमळ संवादा नंतर आम्ही शिव्या खात खात को डेपो लिहिलेली एक बस पकडली ड्राईवर च्या डाव्या हाती असतो त्या मोठ्या बॉक्स पाशी उभा होतो जीव सोडल्यागत थरथरणाऱ्या गियर च्या दांडया कड़े पाहता पाहता त्याच्या जवळ ठेवलेल्या एका दगडावर नजर पडली! "मामा हे ईथे काहाले ठेवले हो?" "कळेल हम्म बाळ" इति आमचे लेटेस्ट मामा उर्फ़ ड्राईवर मामा बस सुटायच्या वेळी मामानी गियर टाकायचा प्रयत्न शिस्तीत केला, जमना तेव्हा सरळ तो धोंड़ा उचलून त्या थरथरत्या गियर दांडया च्या टकुर्यात घातला अंन एक "भो**ची" अशी बस स्तुती केली!अंन आम्ही पुण्यात घुसते झालो!!!!

In reply to by काळा पहाड

ते आता नव्या पंचवीस उंबर्या च्या गावातुन आलेल्या एका गावठी पोरांस कैसे कळावे? तुमचे ३८°पैरेलल कोणते अंन मॅकमोहन लाइन कुठली!!! आम्हांस तर वाघोली ते कात्रज अंन फुरसुंगी ते धायरी पुणेच!!!

In reply to by काळा पहाड

मनपा, डेक्कन, कोथरूड हा परिसर खर्‍या पुण्यात धरला जात नाही.
हा प्रतिसाद अस्सल पुणेकराने दिलेला दिसतोय . ह्यांच्या लेखी येरवड्याच्या पलीकडे मराठवाडा सुरु होतो आणि हडपसरच्या पुढे दक्षिण भारत !!! *biggrin* :-D :D +D =D :biggrin: *biggrin* :-D :D +D =D :biggrin:

In reply to by काळा पहाड

>>> मनपा, डेक्कन, कोथरूड हा परिसर खर्‍या पुण्यात धरला जात नाही. +१ अलका चित्रपटगृहाचा चौक, स्वारगेट आणि शनिवारवाडा हे ३ शिरोबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो तेच खरे पुणे. या त्रिकोणाच्या संदर्भात पुण्याच्या सीमारेषा म्हणजे मुठा नदी, लकडी पूल, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता. मुठा नदीवरील कोणत्याची पुलाच्या पलिकडील उत्तरेकडील भाग, शिवाजी रस्त्याच्या पूर्वेकडील भाग, पश्चिमेला लकडी पुलाच्या पलिकडील भाग आणि टिळक रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग हा मूळ पुण्याचा समजला जात नाही.

In reply to by श्रीगुरुजी

या हिशोबानी पुणे महानगर पालिका भवन सुद्धा पुण्यात येत नाही हो गुरुजी ! मग पुण्याला खेडेगाव म्हणून घोषित करून टाका ना

In reply to by श्रीगुरुजी

शिवाजी रस्त्याच्या पूर्वेकडील भाग मूळ पुण्याचा समजला जात नाही.
अच्छा, म्हणजे कसबा गणपतीसुद्धा मूळ पुण्यात धरला जात नाही तर =)) अहो गुर्जी, त्या भागात वस्ती शिवपूर्वकाळापासून असल्याचे पुरावे आहेत. वैसे तो मग नारायण आणि सदाशिव पेठादेखील मूळ पुण्यात नव्हत्याच, नै? कारण त्या वसल्याच मुळात पेशवाईत. त्याअगोदर नव्हत्याच.

In reply to by बॅटमॅन

वैसे तो मग नारायण आणि सदाशिव पेठादेखील मूळ पुण्यात नव्हत्याच, नै?
कानामागनं आले आणि तिखट झाले!!

In reply to by सूड

त्यांचं काही का असेना, पण शिवाजी रस्त्याच्या पूर्वेकडील भाग पुण्यात नव्हता असं म्हणणं हे महा लोल आहे. शहाजीराजांच्या वेळचं पुणं मुख्यत्वेकरून त्याच भागात होतं. पेशवाईकेंद्रित व्याख्येमुळे असा सत्याचा विपर्यास होणे बरोबर नाही. -(गौतमहळ्ळीकर) आम्ही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कोथरुड ला "लिटल विदर्भ" घोषित करावे, ही आमची लय जुनी मागणी आहे... एक दगड फेकुन मारला तर "मेलो गे माय "असे किमान पाच तरी आवाज येतीलच... :)

In reply to by ब़जरबट्टू

हाव लेक!!! हे तर आहेच!!! एस्टेब्लिशड प्रोफेशनल्स ते खकाने फुकत फिरणारे पोट्टे सोट्टे सारे सापड़तात तटी आम्ही तर एक वर्हाड़ी मेस बी शोधली होती तटीसा

चर्चाविषय आवडला आणि प्रतिक्रियाही वाचनीय आहेत. पण बस मध्ये (किंवा लोकल ट्रेन मध्ये) (अर्थात् जागा मिळाली तर) बसून झोपता येतं हो! :-) दुचाकी (किंवा इतर कुठलंही आपल्यालाच चालवायला लागणारं वाहन) चालवतांना झोप आली की वाट लागते! शिवाय बस किंवा ट्रेनने जातांना वाचन करता येतं हवं असलं तर. (दुचाकी/चारचाकी चालवतांना ऑडिओ बुक्स हा पर्याय आहे हे मान्य, पण तोही वाहनं चालवतांना texting करणं, फोन वरच्या इमेल्स वाचणं यांइतकाच लक्ष विचलित करणारा आणि म्हणून धोकादायक ठरू शकतो.) इतकं सगळं लिहितोय कारण, गेले कित्येक महिने घर-ते-कार्यालय अशा प्रत्येक दिशेने १-१ तासभराचं ड्रायव्हिंग बंपर-टू-बंपर ट्रॅफिकमध्ये मानेवर खडा ठेवून, काळजीपूर्वक करणं हे stressful वाटायला लागलंय, आणि हेच १५ किमी चं अंतर रोज आरामात २०-२०च मिनिटांत (झोप काढत/ पुस्तक वाचत) करणार्‍या सहकार्‍यांचा हेवा वाटायला लागला आहे! तेंव्हा आपण फक्त per km भाडं किती देतो आहे एवढाच विचार न करता यापलिकडे जाऊन वाहन सुरक्षित चालवण्याची जबाबदारी घेणारा चालक आपण सोडून दुसरी व्यक्ति आहे हाही फायदा लक्षात घेतला पाहिजे असं वाटतं.

सह्य मित्र यांनी "डोकेफोड " करुन एक अप्रतिम लेख लिहिलेला आहे यात वादच नाही पण या आकडेमोडीच्या नादात ते बरेच काही विसरलेत. त्यातला एक विसराळु मुद्दा " बहुगुणी " यांनी लिहिलेला आहे माझ्या मते सर्वांनी " PMPL " ची " काळी " बाजु दाखवायचा प्रयत्न केला पण खालील मुद्दे वाचले तर " PMPL " एकदम झकास वाटेल १) एखादी बस बंद पडली तर कर्मचारी दुसर्या बसने आपल्याला पाठवतात. " दुचाकी " पन्क्चर झाली किंवा तिचे पोट रिकामे झाले तर आपल्याला आपलाच " उध्दार " करुन घ्यावा लागतो. २) पुण्यातील गल्ली बोळात लिलया संचार करणारी बस पाहिलीत का ? कोणाला ही धक्का न लावता बस हाकणार्या " प्राण्याला " कधी धन्यवाददिलेय्त का ? ३) जीव मुठीत धरुन " चारही " पाय जखडलेल्या अवस्थेत चालणारी मोटारसायकल चाललेली पाहिली की बसचे महत्व जाणवायला लागते. हे कधी जानवले का ? ४) रात्री अपरात्री हिच्यासारखा भरवशाचा " सोबती " नाही. ५) बसची सुरक्षितता इतर कुठल्याही वाहनात नाही. भले ती बस मोडकी , काचा निघालेली , रेकत चढ चढणारी असो .

In reply to by हरकाम्या

बस चा प्रवास हा सुरक्षित नक्कीच आहे. तसेच निवांत बसून जाता येणे, उन, पाऊस वारा ह्याचा त्रास न होणे हे नक्कीच फायदे आहेत. पण PMPL ह्या अगाध संस्थेच्या संदर्भात विचार करता ह्या फायद्या पेक्षा असलेले तोटे फारच मोठे आहेत. उदा: १. अतिशय बेभरवशाची वहतुक. क्वचितच वेळापत्रक पाळणाऱ्या गाड्या. तास तास भर एकही बस नाही आणि त्या नंतर ३-३ बस लागोपाठ हा अनुभव बऱ्याचदा आलेला आहे. २. सौजन्याचा पूर्ण अभाव. बस STOP वर न थांबविणे, वृद्ध, लहान मुले महिला ह्यांना देखील सौजन्य न दाखविणे हे नित्याचे आहे. ३. बस ची देखभाल हा तर न करायचाच विषय आहे. जवळपास ४०% बस नादुरुस्त असतात आणि ज्या रस्त्यावर धावत असतात त्या कधी बंद पडतील ह्याचा भरवसाच नाही. ४. स्वच्छ PMPL मिळणे हा तर चैनीचा भाग झाला आहे. ह्या पार्श्वभूमी वर असलेला अवास्तव तिकीट दर बघितला तर खरोखरच PMPL ने प्रवास का करावा ? असेच वाटते. त्यातून बसायला मिळणे सोडाच बहुतेक वेळा गर्दीतून आत शिरायला मिळाले तरी मुश्किल अशी परिस्थिती असते. अशावेळी जीव मुठीत घेऊन दरवाजातून धक्के खात प्रवास करण्या पेक्षा स्वतःची दुचाकी काळजी पूर्वक हाकत जाने हे कधीही जास्त सुरक्षित आणि सुखकर आहे. टीप : मी स्वतः सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करण्यास उत्सुक असतो. मुंबईतील BEST चा अनुभव अतिशय चांगला आहे. इतकेच काय कोल्हापूर ची KMT देखील बरीच बरी आहे. तसेच ST महामंडळाची सेवा देखील PMPL च्या तुलनेत चांगली आहे.

या भारतवारीत मुद्दाम पिमपिएलने फिरले. एक दोन ठिकाणी वाईट, तर बाकी सगळ्यावेळेस चांगले अनुभव आले. एकदा पुणे संपतय की काय असे 'भासावे' इतक्या लांब म्हणजे मनपापासून दीड ते दोन तास (वाहतुकीवर वेळ अवलंबून) लांब जायचे होते. जाताना ठीक होते. येताना पहिल्याच स्टॉपला चढले आणि ड्रायव्हरबाबाने पान खाण्यासाठी पाच मिनिटे घेतली. त्याबद्दल तक्रार नाही पण तेवढ्यात खुनशी दिसणारं पाच सात पंचविशीच्या मुलांचं टोळकं चढलं. आजूबाजूला कोणी मनुष्य नाही. ही मुलं, मी, नवरा, मुलगा व ७ वर्षांचा भाचा! टोळक्याने गाणी म्हणाण्यास सुरुवात केली. मी अस्वस्थ! आजकाल कोणावरही विश्वास राहिला नाहीये. आपण बस सुरु होईपर्यंत खाली उतरून थांबू असे मी नवर्‍यास सुचवले. काही होत नाही असे मोठ्याने म्हणून तो उभा राहिला. पब्लिक गप्प बसले. तेवढ्यात चालक, वाहक आले व दुसर्‍या स्टॉपपासून बस भरायला सुरुवात झाली. कोणी काही म्हणो मला इतका आधार वाटला. पुढे ससूनपाशी बसचे टायर पंक्चर झाले. भाचा माझ्या खांद्यावर डोके टेकवून झोपलेला. आता या दोन्ही मुलांना घेऊन व सामान घेऊन आम्ही रिक्षापर्यंत जावे असा विचार करत होतो तेवढ्यात ड्रायव्हर्बाबा म्हणाले की कोणी उतरू नका आम्ही बस तशीच नेणार आहोत. आम्ही बारा पंधराजण होतो. त्याने मनपापर्यंत आणखी कोणी प्यासेंजर्स घेतले नाहीत. आजेसासूबाईंना भेटायला इतक्या लांब रिक्षाने जाणे काही खरे नव्हते. पिएमपिएल बरी वाटली......निदान त्यावेळी तरी!

पी.एम.पी.एम.एल. नी प्रवास करतानाचे फायदे तोटे माझ्या दृष्टीकोनातुन. फायदे: १. बसच्या बसायच्या किंवा उभ्या रहायच्या जागेतुन प्रवास करत असाल तर सुरक्षित प्रवास. २. झोपुन प्रवास करता येतं (मला कंट्रोल डिसॉर्डर आहे बहुतेक, मला गाडीमधे किंवा गाडीवर कधीचं झोप लागतं नाही.), पुस्तकं वाचता येतात. काही नोकरी करणार्‍या गृहदेवता भाज्या निवडतात. तोटे: १. कर्मचार्‍यांची वय वगैरे नं लक्षात घेता चाललेला उर्मटपणा (सन्मानिय अपवाद आहेत ह्याला). २. सुट्ट्या पैशांची बोंब. (आगारातुन मिळालेले, प्रवाशांकडुन गोळा झालेले सुट्टे पैसे शेट्टीच्या हॉटेलात विकुन टाकतात हे लोकं. सुट्ट्या ९० रुपयांमागे १०० रुपये घेतात.) ३. खुळखुळा अवस्थेतील बस. शिवाय माझ्या सारख्या उंच व्यक्तीला दोन सीटच्या मधे बसायला किती अडचण येते. गुढघे हलवायला सुद्धा जागा नसते. मला बसण्यापेक्षा उभं राहुन प्रवास करणं जास्त आरामदायक वाटतं त्यामुळे. त्यातुन त्या बी.आर.टी. च्या नावाखाली आणलेल्या नव्या बस मुर्खपणाचा उत्तम नमुना आहेत. प्रचंड मोठ्या दरवाज्यांमुळे बसायच्या जागा कमी झाल्यात. आहेत त्यातही डावी रांग स्त्रियांसाठी राखीव आणि उजवीकडच्या ड्रायव्हरच्यामागच्या चार सीटस अनुक्रमे अपंग आणि वृद्ध व्यक्तींसाठी राखीव. जेमतेम १२ पुरुष आणि १४ स्त्रिया बसु शकतात बाकीच्यांनी उब। रहायचं. एवढे पैसे देउन उभं राहुन जाण्यात काय अर्थ आहे? डिझेल चे भाव कमी होउनसुद्धा ह्यांनी भाव अवास्तव वाढवलेत. ४. बस वेळेवर कधीचं नसणं. एक निगडी-कात्रज आणि निगडी-हडपसर सोडलं तर दुसर्‍या जवळपास सगळ्या मार्गांवर बसेस वेळेवर धावत नाहीत. आपण वेळेत कामाच्या जागी पोहोचु असा भरवसा मी पी.एम.पी.एम.एल.च्या भरवश्यावर देउ शकत नाही. ५. गर्दी. मला स्वतःला गर्दीमुळे काही फरक पडत नाही. वृद्ध व्यक्ती, अपंग, अशक्त लोकं ह्यांनी बसमधे कसं चढावं? फक्त मनपा भवनला आणि स्वारगेट धायरी मार्गावरच्या बसमधे रांगेनी आत सोडतात. बाकी सगळीकडे बळी तो कान पिळी असचं असतं. ज्यांना हे खरं वाटतं नाहीये ना त्यांनी कधीतर निगडी बसस्टॉपवर येउन बघा. सकाळच्या वेळेस बसमधे चढायला काय झुंबड असते ते बघा. मुंबईच्या लोकलमधे चढल्या-उतरल्याचा अनुभव येईल. ६. प्रवाश्यांची अरेरावी. मला स्वतःहुन हाणामार्‍या करायला किंवा शिव्या द्यायला आवडतं नाहीत. पण ह्याचं पी.एम.पी.एम.एल. च्या गर्दी धोरणामुळे २-३ वेळा मारामारीपर्यंत प्रसंग आलेत. २ वेळा मी हात उचललेतं आणि एकदा मागुन टप्पलही खाल्लीये. कोणी मारली ते शेवटपर्यंत समजलं नाही एवढी गर्दी होती. ७. स्त्रिवर्गाची वृद्धांना / अपंगांना मिळणारी वागणुक. कितीतरी वेळा धडधाकट कॉलेजच्या मुलींनी अगदी ७०-७५ वर्षं म्हातार्‍या लोकांना आरक्षणाच्या नावाखाली भांडण करुन उठवल्याचं पाहिलयं. पुरुषांच्या रांगेतही पुढच्या बाजुस वृद्ध लोकचं बसली होती त्यामुळे त्यांनी ह्या अजोबांना जागा द्यायचा काहीचं प्रश्ण नव्हता. असो. मला स्वतःला तरी माझी बाईक जास्त भरवशाची वाटते. (युनिकॉर्नप्रेमी) -अनिरुद्ध-

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पी एम टी( पी एम पी एम एल) बेभरवशी आहे. तुम्हाला वेळेत जायचे असेल तर तिचा भरवसा नाही. पण वेळच वेळ असेल( वरिष्ठ नागरिक/ सेवानिवृत्त/ निवृत्तीवेतन धारक) तर गोष्ट वेगळी. माझी बाईक जास्त भरवशाची वाटते.(युनिकॉर्नप्रेमी). +१००

पी एम पी एल ही देशातील सगळ्यात महाग सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी कंपनी आहे असे मागे वाचनात आले होते ......

मराठी माणसावर नेहमीच अन्याय होतो. त्यांना रोजच्या प्रवासासाठी जास्त पैसा द्यावा लागतो. दिल्लीत मी रोज एसी (डीटीसी) १७ km दूर जातो केवळ २५ रुपयात. सामान्य बसचे दर ४ स्टेन्ड पर्यंत ५ रु एसी १० रु १० स्टेन्ड पर्यंत १० रु एसी ७-१५, १०- २०रु १० स्टेन्ड पुढे १५ रू एसी २५ रु शिवाय प्रत्येक बसचा शेवटचा स्टेन्ड २५-३५ किलोमीटर दूर ही असू शकतो. संध्याकाळी बहुतेक चार्टर बस (निजी) येतो, ती केवळ २० रु (१७ किमी) घेते. (सेना भवन ते उत्तम नगर) बस मधून सामान्य माणूस प्रवास करतो, भाडे निश्चित कमी करायला पाहिजे. जागे व्हा.

In reply to by विवेकपटाईत

दिल्लीबरोबर कुठल्याच शहराची तुलना होऊ शकत नाही. राष्ट्रीय राजधानीचे शहर असल्याने तेथे बर्‍याच सोईंना खूप सबसिड्या आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चार्टर वीस रुपये घेते ती निजी व्यक्तीची असते. तो २० रु km च्या हिशोबानी बस भाड्यावर घेतो, दिवसातून बस ३५+३५ (७० km). ९०-१०० प्रवासी रोज धरले तरी. ५००० रुपयाच्या वर तरी बचत करतोच. २० km पेक्षा जास्त अंतर असेल तर २५ रुपये घेतात. सरकारी बसेस भरलेल्या असतात. सरकारी बसचा खर्च प्रती प्रवासी प्रती km १ रुपया धरला आणि बस मध्ये केवळ 4० प्रवासी असतील असे गृहीत धरले तरी प्रती km ४० रुपये मिळतात. (खर्च पेक्षा दुप्पट). (वास्तविक प्रवासाची संख्या या पेक्षा जास्त असते) अर्थात १ रुपया प्रती km प्रती प्रवासी पेक्षा जास्त घेणे ही शुध्द लूट आहे. सरकारी सेवा नुकसानीत असण्याचे कारण एका बस वर भरमसाट कर्मचारी असतात. एका बस वर ५ चालक आणि कंडक्टर (१६ तास बस चालत असेल तर) व २ अतिरिक्त अर्थात ७-८ च्या वर कर्मचारी नको. पण सरकारी बस सेवेत १०-१४ कर्मचारी राहतात. त्या मुळे नुकसान होते. दिल्लीत ही DTCचे नुकसान जवळपास २००० कोटी प्रती वर्ष आहे (५५०० बसेस) कारण एका बस वर १४ कर्मचारी त्यात १००० वर अधिकारी वर्ग. मग बसने १०,००० रुपये (१५० किमी) कमविले तरी नुकसान होणारच.

In reply to by विवेकपटाईत

थोडक्यात काय DTC चे दरवर्षीचे रु २००० कोटी नुकसान सरकारी सबसिडीने भरून काढले जाते... आणि त्या सबसिडिचा नागरिकांना उपयोग शुन्य... सबसिडी अनावश्यक (आणि जनतेशी अरेरावी करणार्‍या) कर्मचार्‍यांचा पगार व सवलती देण्यात आणि राजकारण्यांचे व अधिकार्‍यांचे (भ्रष्टाचारी मार्गांने) खिसे भरण्यात खर्च होतो. या आणि इतर धाग्यांवर "सबसिडी म्हणजे सरकारने गरीबांची केलेली मदत" ही व्याख्या गैरसमजूतीने अथवा कांगावाखोरपणे वापरणार्‍यांसाठी हे उदाहरण बोलके आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ही परिस्थिती बुडीत चालणार्‍या बहुतेक सर्व सरकारी योजना / संस्थांमध्ये आहे. एक बुडीत जाणारी सबसिडीयुक्त योजना भ्रष्टाचारमुक्त करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी ती तशीच चालू ठेऊन तिला समांतर दुसरी सबसिडीयुक्त योजना बनवली जाते आणि दुप्पट मलिद्याची सोय केली जाते. याचे नुकतेच घडलेले उत्तम उदाहरण म्हणजे शिधापत्रिका योजनेतला सर्वांना माहीत असलेला उघड भ्रष्टाचार निपटायला कोणतेही मोठे प्रयत्न केल्याचे दिसले नाहीत; पण त्याऐवजी गाजावाजासह प्रचंड सबसिडीसह अन्नसुरक्षा कायदा जीवतोड करून आणला गेला. जे आर डी टाटा अध्यक्ष असेपर्यंत जगातल्या ५ उत्तम विमानकंपन्यांत असलेली आणि सतत फायद्यात असलेली एअर इंडिया त्यांना राजकीय जबरदस्तीने बाहेरचा रस्ता दाखवल्यावर जगातल्या सर्वात वाईट विमानकंपन्यांपैकी एक आणि दरवर्षी शेकडो/हजारो कोटी रुपयांच्या सरकारी मदतीची गरज पडणारी संस्था झाली आहे.

In reply to by विवेकपटाईत

चार्टर वीस रुपये घेते ती निजी व्यक्तीची असते. तो २० रु km च्या हिशोबानी बस भाड्यावर घेतो
जर ५० सीटर बस २० रु. प्रति किमी येत असेल तर इकडे नक्कीच ब्येक्कार लुटतायत. नुकत्याच झालेल्या गप्पांमध्ये असं कळलं की पीएमपी बसेस ५४ रु. प्रति किमी या रेटने भाड्यावर घेतल्या जातात. आता २० कुठे आणि ५४ कुठे? कितीही भाडी वाढवली तरी कधीच फायद्यात यायची चिन्हे दिसणार नाहीत.

In reply to by अन्या दातार

ह्या "भाड्यां"चं गणित खरच कळत नाही रे. त्यातुन अजुन एक माहिती सांगतो. बसच्या किंमतीच्या आकडेवारीवर एक नजर टाक. जवळपास आरामगाड्यांच्या किंमती मधे आमगाड्या घेतल्यात. स्पेअर पार्टस्च्या आणि स्क्रॅपच्या व्यवहारात केवढे झोलं करतात. एस.टी. बसेस आणि पी.एम.टी. असं गृहित धरु की टाटा १५१० ची चासी आहे. म्हणजे चासीचे स्पेअर पार्ट्स पण एकाच किंमतीमधे हवेत की नाही? फार फार तर एस.टी. मोठ्या प्रमाणात विकत घेते म्हणुन क्वांटीटी डिस्काउंट गृहित धरु. तरीपण किंमतीमधला फरक पाहिला की अशिक्षित माणुसही सांगेल काय चाल्लयं ते. साधं उदाहरणं बसमधली घंटा वाजवायच्या दोरीची आणि अडकवायच्या हुकची किंमत १२५० रुपये असु शकेल? =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बसमधली घंटा वाजवायच्या दोरीची आणि अडकवायच्या हुकची किंमत १२५० रुपये
काय सांगता काय? नक्कीच तुम्ही टोर्टूगामधून विकली असेल त्यांना. (ह.घ्या.)

डॉ. श्रीकर परदेशी नक्कीच हि परिस्थिती बदलवून दाखवतील असा विश्वास वाटतो. बाकी इथल्या प्रतिक्रिया लय भारी! समस्त मिसळपाव मंडळींना आमच्या प्रवासी कट्ट्याला भेट देण्याचे निमंत्रण. www(dot)facebook(dot)com(slash)groups(slash)pmpml Ab Bus Hi Karo! Help improve Pune's only bus service Call PMPML Helpline No. 020 24503355 (get routes , can suggest, compliment or complain) or mail pmpcomplaint@gmail.com

दुसरा चांगला पर्याय नाही पण पूर्वीपेक्षा आताच्या गाड्या तकलादू आहेत. सीटे तुटलेली असतात. वरती धरायचा बार प्रचंड वर असतो.

मुंबईच्या बेस्टच्या व्यवस्थापनाशी (६० ,७० दशकातील हो) तुलना केल्याशिवाय राहवत नाही. कर्मचाऱ्यांस कामं नेमून दिल्यावर निर्णयाचे अधिकारही दिले होते आणि त्यात कोणाही वरिष्ठांस ढवळाढवळ करता येत नसे. त्यामुळे चांगली सेवा दिली जात होती. घंटेची दोरी ओढल्यावर तुटली अथवा कोणी वमन केले की वाहक त्याच ठिकाणी बसफेरी रद्द करत असे आणि प्रवाशांना मागच्या बसमध्ये बसवून दिले जायचे. एक दुरुस्ती करणारी गाडी येऊन त्या बसला डेपोत नेले जायचे. चिंध्या, सुतळ्या (Recycle)जोडून घंटा तात्पुरती चालू करत नसत. डेपोत बस पाण्याने धुतली जायची.

डॉ श्रीकर परदेशी उत्तम प्रशासक आहेत. सध्या ते इनचार्ज असताना त्यांनी अनेक बिघडलेल्या बस रस्त्यावर दुरुस्त करुन आणल्या आहेत. बेशीस्त कर्मचारी त्यांचा पगार थांबवुन ताळ्यावर आणले आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मते तांत्रिक बाजु पहाता किमान अजुन एक वर्ष डॉ परदेशी पी एम पी एम एल चा कारभार सांभाळुन काही काळ प्रवाशांना सुख देऊ शकतात. पुढे ..... पुणेकरांच नशीब. राज ठाकरे यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकात एकदा आरोप केला होता की सार्वजनीक वहातुक दुचाकी / चारचाकीची विक्री वाढवण्यासाठी मुद्दाम खराब ठेवली जाते. पुण्यात याचा प्रत्यय अनेक वर्ष येत आहे.