Skip to main content

डॉक्युमेंटेशन आणि आपण

शनिवार, 07/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वरंग मध्ये जपानी बुजुर्ग नटांचे आवाज /अभिनय रेकोर्ड करून ठेवले आहेत आणि आपल्या कडे तसे नाही म्हणून पुलंनी हळहळ व्यक्त केली ... सहज गम्मत म्हणून स्वत:च्या जन्मदिवसाचा केसरी वाचायला मागितला तर अमेरिकेतल्या त्या ग्रंथपालिकेने काही मिनिटात तो मायक्रोफिल्मवर वाचायला उपलब्ध करून दिला ... हे असे काही अनुभव घेतल्यानंतर खुद्द पु लंनी मात्र स्वत:चे एकपात्री पुरेसे रेकॉर्ड योग्यप्रकारे करून ठेवले नाहीत बालगंधर्वांची रुक्मिणी / भामिनी , बखलेबुवा/ केशवराव भोसले आदि अनेक दिग्गजांचे गायन हे आणि असे आणखीन कितीतरी दृकश्राव्य डॉक्युमेंटेशन करून ठेवायला हवे होते पण आता ते शक्य नाही ... थोडे आणखीन मागे जायचे तर शिवबांचे / शंभूराजांचे / पेशव्यांचे मुबलक चित्रीकरण व्हायला हरकत नव्हती ..किरकोळ एखाद दुसरे योगायोगाने काढलेले / उपलब्ध असलेले चित्र एवढेच काय ते कितीतरी मौलिक ज्ञानठेवे डॉक्युमेंटेशन नसल्याने कालौघात नष्ट झाले असतील हा एक विसरून जायचा विषय आहे ... सध्याच्या विकिपीडिया / इंटरनेत / क्लौड कम्प्युटिंग वगैरे मध्ये हा धोका पुरेसा टळला आहे एवढेच नव्हे तर 'अति' माहिती आणि त्याचे सुयोग्य व्यवस्थापन आणि वापर हि एक नवीनच संधी उपलब्ध झालीये ..अर्थात त्याविषयी पुन्हा कधीतरी ...

वाचने 2782
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

महाराजांचे ओरिजिनल चित्र पण एका "पोर्तुगीज"माणसाने काढलेले आहे!!! ते पण ब्रिटिश म्यूजियम मधे ठेवलेले!!! :/

खरं आहे तुमचं म्हणणं. एकूणच आपण भारतीयांमध्ये 'अर्कायव्हिंग'बाबत सार्वत्रिक अनास्था दिसते, असा माझाही अनुभव आहेच. त्यातही एखाद्या गोष्टीचं कुणी असं डॉक्युमेंटेशन केलेलं असलंच, तर ते दुसर्‍याला न दाखवण्याकडेच कल असतो.. गव्हाणीतल्या कुत्र्यासारखं. मी स्वतः एका अतिशय 'इंटरेस्टिंग' गोष्टीचं चित्रीकरण करायचा प्रयत्न करतोय. सफल झालं, तर एक मस्त धागा यथावकाश येईलच.

भक्ती बर्वे यांचं काम असलेले ती फुलराणी उपलब्ध नाही

In reply to by hitesh

+१ मूळ संचातलं घाशीराम कोतवालही नाही. सुदैवाने मूळ ऑडियो तरी आहे.

अवांतर- तंजावरच्या व्यंकोजीने ललितामहालात बरीच हस्तलिखिते जतन केली आहेत .मुळात पर्यटनाच्या यादीत तामिळनाडू नसतोच आणि असला तर उतारवयातले रामेश्वर अथवा कांचिपुरम. यांच्या देवळात बरेच संस्कृत ग्रंथ आहेत परंतू ते आम्हाला कशाला दाखवतील ? आणखी काय लिहिणार ? आपल्याकडचा कोणी तिथे जाऊन ऋग्वेद वगैरेतील श्लोक दणाणा म्हणू लागला तर बघा कसे धावत येऊन त्याचा आदर करतात ते .

खरंय. आपल्या संस्कृतीत मौखिक ज्ञानावर भर असल्यामुळे अशी अनास्था आली असावी. अवांतर- एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी चेन्नईला एका ब्रिटीश माणसाने सार्वजनिक ग्रंथालय उभारलं. या Connemara Public Library मध्ये आज लाखो पुस्तकं आहेत. भारतातल्या सर्व भाषांमध्ये प्रसिद्ध होणारं जवळजवळ प्रत्येक पुस्तक, मासिक, इत्यादी साहित्य तिथे आता ठेवलं जात. http://www.connemarapubliclibrarychennai.com/ काही पुस्तके internet archive section मध्ये आहेत.

अनेक ठिकाणी विस्कळित आणि वैयक्तिक स्वरूपात दस्तऐवजीकरण होत आहे, झाले आहे. ते एकत्र करून किंवा त्याची सूचि होऊन ती सर्वांना उपलब्ध होण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे नुसते दस्तऐवजीकरण होऊन भागत नाही. ते व्यवस्थितपणे संग्रहित होणे/राहाणे गरजेचे असते. काही वर्षांपूर्वी अशोकजी रानडे यांनी (आणि पु.ल.देशपांडे यांनीही) एन. सी.पी.ए.तर्फे पुष्कळसे ध्वनिमुद्रण करून ठेवले आहे. शंभर वर्षांपूर्वीचे ध्वनिमुद्रणही आज उपलब्ध आहे परंतु ते नवीन तंत्रज्ञानानिशी अद्ययावत करण्याची गरज आहे. यासाठी मनुष्यबळाची आणि पैशाची गरज आहेच. पण तळमळीचीही जास्त गरज आहे. नोकरपेशाच्या भाडोत्री माणसांकडून अशी कामे बहुधा घिसाडघाईने आणि पाट्या टाकण्याच्या वृत्तीने होतात आणि आहे ते मुद्रणही विकृत होते. पूर्वी मेणाच्या आणि वृत्तचितीच्या आकारातल्या ध्वनिमुद्रिका असत. नंतर कचकड्याच्या आल्या. नंतर फिती आल्या, सी.डी. आल्या. या सर्वांचे नवीन तंत्रात सतत रूपांतर करीत राहाणे गरजेचे असते कारण तंत्रज्ञान सतत बदलत आणि विकसित होत राहाणारे असते. आज हजारो लाखो हस्तलिखिते, भूर्जपत्रे भारतातल्या अनेक संग्रहालयांत अभ्यासकांची वाट पाहात पडून आहेत. मुंबई विद्यापीठाचा, सेंट्रल लाय्ब्ररीचा, भारत इतिहास संशोधक मंडळाचाही फार मोठा संग्रह आहे. कलकत्त्यामध्येही चांगले संग्रह आहेत. याचा उपयोग झाला पाहिजे. दस्तऐवज नुसते कपाटात असून उपयोगाचे नाहीत. आणि हे काम निव्वळ सरकारचे असे नाही. इतिहास केवळ दस्त ऐवजातून कपाटांत पडून राहाणे हे महत्त्वाचे नाही, तो निदान काही थोड्या लोकांच्या स्मरणात, संज्ञाप्रवाहात राहाणे अधिक महत्त्वाचे आहे.

In reply to by राही

बरोबर आहे आपले ... तथापि सामान्य माणसांना हे उपलब्ध आहे किंवा कसे ? परंतु
आणि हे काम निव्वळ सरकारचे असे नाही
अहो संदीप वास्लेकारंनी थेट सांगून झाले आहे, पण निव्वळ वैयक्तिक नफा होत असल्या खेरीज एक छदाम खर्च करण्याची मानसिकता नसलेले आपले उद्योगपती (काही सन्माननीय अपवाद वगळता) असो ...

थिएतर अकॅडेमीने पडघम नावाचे फार सुंदर नाटक सदर केले होते. मी पाच वेळा पहिले पण मन नाही भरले. गेली काही वर्षे शोधतो आहे पण सापडत नाही. पडघम मध्ये काम केलेल्या कलाकारांकडे पण नाही.