Skip to main content

शंका: बेळगाव महाराष्ट्रातच हवे ही मागणी नक्की कशासाठी?

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 25/01/2015 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, बेळगाव प्रश्न या विषयावर इथे पूर्वी चर्चा झालेली असणार यात तिळमात्र संदेह नाही. परंतु मला या भांडणाचा उलगडा अद्याप झालेला नाही, म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा मांडतो. बहुतांश आयुष्य महाराष्ट्राबाहेर (जरी भारतातच) काढलेले असल्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न हा मला एक निरुद्योगी (किंवा मतलबी) लोकानी जाणूनबुजून धुमसत ठेवलेला मुद्दा वाटतो. याची कारणे खालीलप्रमाणे: १. आजच्या भ्रमणध्वनी, उपग्रह वाहिन्या, आंतरजाल या सुविधांनी युक्त अशा जीवनाने भौगोलिक सीमा हा प्रकार (निदान देशांतर्गत तरी) रद्दबातल ठरवलेला आहे. बेळगाव (सामील निपाणी, कारवार, हुबळी, विजापूर इ.) जरी कर्नाटकात असले तरी तेथील मराठीभाषिक जनतेला आपली संस्कृती जपणे अशक्य आहे असे मुळीच नाही. महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या राहणारे अमराठी लोक आपली ओळख सांभाळून असतात (नोंदः यात त्यांच्यावर टीका करण्याचा जराही हेतू नाही), तर कर्नाटकातील मराठी लोकांनाही हे करता येईल. आणि ते करत असणारच. २. बेळगाव हे काही मराठी वस्ती असलेले महाराष्ट्राबाहेरील एकमेव शहर नव्हे. इंदूर, बडोदा, सुरत, गोवा, रायपूर, जबलपूर भोपाळ, हैदराबाद, बंगलोर अशा अनेक ठिकाणी मराठी जनता बहुसंख्येने राहते. ग्वाल्हेर, झांसी, जयपूर, कोटा, वाराणसी अशा अनेक उत्तर भारतीय शहरांतही मराठीजन स्थायिक होऊन राहिलेले आढळतात. केवळ या एका कारणावरून ही शहरे महाराष्ट्राला जोडावी ही मागणी करणे हास्यास्पद आहे. ३. "कर्नाटक सरकारने केले मराठी जनतेवर अमानुष अत्याचार", "कर्नाटकातील मराठी जनतेचा वाली कोण?" किंवा "कर्नाटक पोलिसांकडून मराठी जनतेची मुस्कटदाबी" असे मथळे काही (कोणत्या ते सांगणे नलगे!) वर्तमानपत्रांतून दिसत असतात. ते शुद्ध अतिरंजन असते हे खालील मजकूर वाचताच उमगते. ४. बेळगाव महाराष्ट्रात आलेच पाहिजे अशी साम्राज्यवादी मागणी करण्यापेक्षा कर्नाटकाला आपल्या मर्‍हाटी रंगात रंगवून टाकणे हाच मराठी संस्कृतीचा खरा विजय ठरेल अशी माझी समजूत आहे. यामागेही कानडी जनतेचा दुस्वास मुळीच नाही हे पुन्हा एकदा नमूद करतो. ५. बेळगाव महानगरपालिकेवर महाराष्ट्रवादी पक्षांचा वरचश्मा असतो. तिथे मराठी फलक लावणे, मराठीतून कारभार चालवणे अशा मुद्द्यांवरून वाद होत असतात. हे कर्नाटक राज्याचे अंतर्गत मुद्दे आहेत आणि ते चर्चेने सोडवणे मुळीच कठीण नाही असे मला वाटते. ---- वरील विवेचनात काही चुका असू शकतात. नव्हे, असणारच. कारण मी अनिवासी मराठी आहे. या मुद्द्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी मी मुद्दामच बाजूला ठेवलेली आहे. पूर्वी, भूतकाळात, मराठी जनांवर तिथे अन्याय झाला असेलही. पण त्या जखमा किती दिवस गोंजारत बसणार, असे मला प्रामाणिकपणे वाटते. "इथले लोक बाहेर पळायची संधी शोधतायत आणि तुम्हाला कशाला महाराष्ट्रात यायचंय? लाईट नाही, पाणी नाही, नोकर्‍या नाहीत, नेते सगळे चोर......." इ. निराशावादी आणि आततायी विचार मी अर्थातच मांडू इच्छित नाही, कारण मी त्यांच्याशी अजिबात सहमत नाही. तरी जाणकारांनी सदर वादावर अन्य अंगांनी प्रकाश टाकावा ही विनंती. धन्यवाद.

वाचने 46371
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

संचारबंदीला वैतागलेले मिपाकर या लेखावर त्वेषाने तुटून पडतील व प्रतिसादांचे घमासान होईल या निखळ प्रामाणिक आशेने धागा वर काढत आहे. लोभ असावा. :-)

महाराष्ट्र एसटीचे पगार काढायला पैसे नाहीत. मुंबइची बेस्ट मरणपंथाला. रस्ते - गोवा रस्ता बनवता येत नाही. त्यावर संबंधितांची एक पिढी मोठी झाली तरी पनवेल पेण होत नाही. एसटी डेपो पाहा. यावर आणखी कोस्टल रोड, टोलनाके नावाचे कामधेनू चानेल. शाळेच्या ग्रांट/अनुदान उडले आहे. कर्नाटकात खाजगी बस वाहतूक असूनही सरकारी रेड् बस जोरात. डेपो पाहा. रस्ते पाहा. कुठे भ्रष्टाचार असला तरी चार पैसे खर्च केलेले दिसत आहेत. यातून मला बेळगाव प्रश्न पुढे रेटणाऱ्या नेत्यांची कीव येते. काय देणार तुम्ही त्यांना? एक साहित्य संमेलन?

गेले आठ-दहा दिवस चालू झालेले तेच ते जुने सीमावादाचे राजकारण पाहता हा धागा वर काढणे महत्वाचे वाटले. येऊ द्या प्रतिसाद :-)