Skip to main content

अल्लाल शेती

लेखक दादा पेंगट यांनी रविवार, 25/01/2015 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी झाडीपट्टीत राहतो. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरचे चार जिल्हे म्हणजे झाडीपट्टी. कोकणानंतर सर्वाधिक पाऊस इकडेच पडतो म्हणतात. तसेच तलावांची साखळीच आहे आमच्याकडे. त्यामुळे धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. आमच्याकडे मोठे उद्योगधंदे वगैरे नाहीत. मोठी शहरे नाहीत.(आमचे चंद्रपूर त्यातल्या त्यात थोडे मोठे म्हणता येईल.) शेतीवरच सगळी भिस्त आहे. आमची फार शेती नाही. शेतीवर आता पोट नसले तरी कधीकाळी शेतीचा मोठा आधार होता. यंदा माझ्या घरी पावसाळी धानाचे 2 एकरात 16 हजार एकूण खर्चात 57 हज़ार एकूण उत्पन्न मिळाले. म्हणजे 41 हज़ार निव्वळ नफ़ा. एकरी 20.5 हज़ार फक्त. जमीन ओलिताखाली( वरच्या अंगाला तळे+ शेतात विहीर) आहे, म्हणजे फ़क्त अतिवृष्टिची किंवा अवकाळी ढगाळ वातावरणाची( कीड पडते) फ़क्त भीती आहे, दुष्काळाची नाही. अधिक, धुर्‍यावर(बांधावर) तूर लावली ती घरी खायला पुरेसी दाळ देते.धान कापणीनंतर शेतातल्या ओलावरच थोड़ी मोहरी, लाखोळी, तीळ नि जवस पण होते. ही घरीच वापरली जाते सहसा. जास्त उत्पन्न झाले असेल तर विकून पै-पावली मिळते. जी जमीन ओलिताखाली नाही तिथे कधी धान पिकतो तर कधी पिकत नाही. थोडक्यात रामभरोसे. नफा शून्यावर येतो पण अजूनतरी उणे गेलेला नाही कारण विकण्यापुरते नाही तरी खाण्यापुरते धान येतेच. इतर दुय्यम पिके, जी विनाखर्च निव्वळ जमीनीच्या ओलावर घेतो, ती बेरजेचाच व्यवहार असते. आमच्या झाडीपट्टीत शेतकरी आत्महत्या का करत नाही ह्याचे कारण लक्षात येईल.(२-३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत पण त्यावर 'चर्चा' करता येईल.) ओलित नसले तरी पोटापुरते धान आणि बाकी पोटउत्पन्न होते. गरीब असला तरी कर्जबाजारी नसतो.बचत म्हणून एक पैसा नसेल कदाचित. 2 वेळ पोट भरते आणि तेवढ्यात तो खुश असतो. जास्त मेहनत करत नाही. सिंचनाची सोय असली तरी दोन-तीन पिके घेईलच ह्याची खात्री नाही.(पाण्याची सोय असली तरी आम्ही पण नाही घेत उन्हाळी धान.) जास्त टेंशन पण घेत नाही. आमचा शेतकरी महागडे प्रयोग सहसा करत नाही. नगदी पीके घेण्याचा धोका घेत नाही. काही 'प्रगतिशील शेतकरी' तेवढे नगदी पिके घेणे, प्रयोग करणे वगैरे छंद करत असतात. बहुतेक शेतकर्‍यांचे जोडधंदे असतात. एखादी म्हैस तर नक्कीच असते. माझ्या गावात प्रत्येक शेतकर्‍याचा छोटामोठा कसलातरी जोडधंदा आहे. धानाची शेती करून आपण कधी श्रीमंत होणार नाही ह्याची त्याला स्पष्ट कल्पना आहे, पण आपल्या डोक्यावर मोठे कर्ज नि विकतचे टेन्शन नसणार हेपण त्याला माहीत आहे. 'चलरा वैसा चलने दो. खेतीबाडी में ज्यादा पैसा डालनेका नइ' ही त्याची मानसिकता आहे. त्यामुळे किमान माझ्या गावातला कोणीही शेतकरी स्वत:च्या अवस्थेला शासनाला जबाबदार धरत नाही. 'सरकारने ये करनेको होना और वो करनेको होना' अशी काही मागणीही कधी केल्याचे माझ्या लक्षात नाही. त्याला पश्चिम महाराष्ट्राच्या बागायतीची कल्पना आहे, नाही असे नाही. 'पर उसके लिए दिनरात खेत मेंच रहना पडता, वो लोग वोही पे घर बनाके रहते, इत्ती मरमर कौन करेगा?' हे उत्तर आमची आईच देते.धानाच्या शेतीत भागत नसले तर जोडधंदा करतात, त्याने भागत नसले तर उन्हाळ्यात शहरात कामावर जातात, पण बागायतीकडे वळत नाही किंवा नगदी पिकांकडे वळत नाही. त्याऐवजी शिकून , गेलाबाजार डिएड करून एखाद्या शाळेत शिक्षक बनणे त्याला जास्त सोयीचे वाटते. आमच्याकडे बव्हंशी सगळेच नोकरदार आपली नोकरी सांभाळत शेती करत असतात. सगळ्या घरी नोकरदार झाले म्हणून 'आता शेती कोण करणार?'हा प्रश्न आलेला नाही. शेतमजूरांची टंचाई आली तसे यांत्रिकीकरण वाढले. ट्रॅक्टर, थ्रेशर वगैरे यंत्रे 'भाड्याने' घेणे सुरु झाले. मार्ग सापडत राहतात. परिस्थितीशी जुळवून घेणे सुरु असते. पण शेतीशी नाळ तुटत नाही. आपल्याला पश्चिम महाराष्ट्रासारखी बागायत शक्य नाही हे स्वतःलाच पटवून दिले की,अपने अभावों का रोना औरों के पास न रोते हुए, डोक्याला जास्त ताप न देता आपली पारंपारिक धानाची शेती मजेत सुरु असते. झाडीपट्टीतले जिल्हे अतिमागास म्हणून ओळखले जातात. असतील अतिमागास, असतील शेतकरी गरीब, पण डोक्याला जास्त ताप नाही. खुश रहो, आबाद रहो, बर्बाद मत होवो. ह्या शेतीला आम्ही गमतीने अल्लाल(आळशी/अतिनिवांत) शेती म्हणतो. मी हा असा अल्लाल प्राणी असल्याने कधीकधी माझ्या डोक्यात मजेदार प्रश्न येतात. १) आमच्या ह्या मानसिकतेमागचे काय कारण असावे? असंच काहीसं कोकणाचं आहे असे ऐकून आहे. तिकडे पण धानाची शेती होते. शेती/पीक पद्धतीचा आणि मानसिकतेचा काही परस्परसंबंध असू शकतो का कोकणातले शेतकरी शेतीबद्दल कशा पद्धतीने विचार करतात? २) वर्‍हाडात सातत्याने कपाशीला कमी दर मिळाल्याने आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या अशी परिस्थीती होती. कमी दरामागची काही कारणे आंतरराष्ट्रीय आणि काही महाराष्ट्रीय होती. तेव्हा ते शेतकरी पारंपारिक पिकांकडे (अन्नधान्यांकडे) का वळले नाहीत? नगदी पिकांसाठी वारंवार कर्ज काढण्याचे धाडस कुठून येते?(कर्जाच्या बाबतीत आम्ही पराकोटीचे घाबरट!) मुळात वर्‍हाडात पाऊस तुलनेने कमी. जमीनीतही खूप पाणी नाही. शेती जास्त बेभरवशाची. त्यात कपाशी म्हणजे खर्चिक, जास्त मनुष्यबळ लागणारी. तरीही कपाशीच का? कपाशीला पर्याय शोधला तोदेखील नगदी पिकाचाच, सोयाबीनचा. यंदा सोयाबीनचेही दर पडले. नगदी पिकांचा असा वाईट अनुभव सातत्याने गेली दहा वर्षे तरी येत असताना नगदी पिकांचाच अट्टाहास कशापायी? कारण आपल्या दुरावस्थेचे खरे कारण नगदी पिके आहेत हे तर एव्हाना भेज्यात आले असेलच. चांगले दर मिळण्याच्या आशेवरती किती ताणून लावायचे माणसाने? थोडे व्यावहारिक व्हावे ना?कशाला कर्जावर कर्ज काढत बसावे? आणि आकड्यांचेच सांगायचे तर कपाशीचे दर हेकटर उत्पादन महाराष्ट्राचे सर्वात कमी आहे, गुजरातचे सर्वाधिक. म्हणजे सर्वाधिक उत्पादनखर्चात सर्वात कमी उत्पादन होते आपल्या राज्यात. म्ह्णजे फार नफ्याची अपेक्षा करणेही चुकीचेच. जर नगदी पिके घ्यायचीच आहेत तर किमान उत्पादनक्षमता तरी वाढवायला पाहिजे. त्या दृष्टीने तसे विशेष प्रयत्न होत आहेत का? त्याची इथे कोणाला कल्पना आहे का? ३) मराठवाड्याने ऊसाचा स्वप्नातही विचार करू नये. नाहीतर कायमचे वाळवंट होईल तिकडे. पण तरीही तिकडे नवे साखर कारखाने येत असल्याची बातमी वाचली. मला कोणी ऊसाचे अर्थशास्त्र समजावून सांगेल? फार जुने कुतूहल आहे. गन्ने में ऐसा क्या है के सारे किसान चींटी की तरह गन्ने को चिपक जाते है? ४) शेती आणि शेतकरी ह्यांच्याबद्दल प्रसार माध्यमांत किंवा सोशल साइट्सवर टोकाचीच मते का दिसून येतात? एकतर हे टोक किंवा ते टोक. जर ह्यामागचे कारण एका बाजूचे शेतीविषयक अज्ञान आणि दुसर्‍या बाजूचे शेतकर्‍यांना भगवान का धरती पे प्रतिरुप समजणे असेल तर ते गैरसमज दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जावेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रकारच्या, प्रत्येक भागातल्या शेतीचे अर्थशास्त्र प्रामाणिकपणे जनतेपुढे आणायला पाहिजे. तसा प्रयत्न कोणी केला आहे का? त्याचप्रमाणे काही शेतकरी जे 'उपद्व्याप' करतात तेपण रोखठोकपणे जनतेपुढे आणले पाहिजे. सरसकट उदात्तीकरण थांबवण्याचा तोच एक मार्ग आहे असे वाटते. ह्याला प्रखर विरोध होईल ह्याचीपण कल्पना आहे कारण हर कोई अपना उल्लू सीधा करना चाहता है! पण नेटाने हे काम रेटले तर यश मिळेलच. शेती हा देखील एक उद्योग आहे, व्यवसाय आहे.( आमच्या सीमेपलीकडच्या तेलुगु बांधवांनी शेतीला 'व्यवसायम' हेच नाव दिले आहे.) तर, शेती हा देखील एक व्यवसाय आहे हे मान्य केले तर व्यावसायिकता आपोआप येते. नफा-तोटा ह्यांचा विचार करूनच गुंतवणूक केली जाते. मग एखादा शेतकरी धोका टाळून सुरक्षित व्यवसाय करतो तर कुठे शेतकरी थोडी जोखीम घेऊन जास्त नफा कसा कमावता येईल हे बघतो. मग एका शुद्ध व्यावसायिकाकडे आपण 'तारणहार' म्हणून का बघतो? असो, पेंगायची वेळ झाली. काथ्या कूटून दमलो..

वाचने 22054
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

In reply to by सोत्रि

माझ्या घरी एसी नाही. हिवाळा असल्याने पंखाही बंदच अस्तो. त्यामुळे हा लेख एसीत बसून खरडला आहे हा आरोप सरासर झूठ आहे.

In reply to by बाबा पाटील

साहेब, तुमचा शेतीशी कितपत संबंध आहे मला माहीत नाही. पण माझा आहे. मी फक्त माझे अनुभवकथन केले आहे. तुमचे अनुभव वेगळे असू शकतात. भारताच्या प्रत्येक भागातल्या शेतकर्‍यांचे अनुभव वेगळे असू शकतात. सरसकटीकरण करता येत नाही. म्हणून मी माझ्या भागापुरते बोललो आणि इतर क्षेत्रांविषयीचे जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली. आपण आपले अनुभव लिहावेत ही विनंती.

In reply to by बाबा पाटील

डॉ. साहेब त्यांनी त्यांचा अनुभव लिहिला आहे. केवळ त्यांचा अनुभव तुमच्या अनुभवाशी मिळता जुळता नाही म्हणून लेखकाची आणि लेखाची "फेक" अशी संभावना करुन कशी चालेल? कोकणातील शेती आणि शेतकर्‍यांची मानसिकता या लेखातील वर्णनापेक्षा फार वेगळी नाही. आज जरी मी आयटीत असलो तरी मी वयाची पहिली बावीस वर्ष ते अनुभवलं आहे. आपला देश इतका अवाढव्य आहे, ऋतूमानात इतकी विविधता आहे की एका जागेचे किंवा हवामानाचे ठोकताळे दुसर्‍या ठिकाणी लागू होत नाही. सोत्रींच्या प्रयोगशीलतेच्या मुद्याबद्दल बोलायचे झाले तर वर्षानूवर्षे हात पोळणारी, हताश शेतकर्‍याचा जीव घेणारी प्रयोगशीलता काय कामाची?

In reply to by सतिश गावडे

काही लोकांना कोकणात शेतकरी आहेत हे सुद्धा माहीत नाही असे दीसतेय. महाराष्ट्रातील शेती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील शेती असे एक समीकरण झाले आहे.

सोत्रि आणि चेतन यांच्या प्रश्नांची उत्तरे मीही देऊ शकतो. प्रथम प्रयोगशील आणि पारंपारिक शेतीतला फरक जाणून घ्यावा लागतो. आता हे सगळं थोडक्यात पाच दहा ओळीत नाही सांगता येणार. केरळ, कर्नाटकचे अथवा जर्मनी, जपान, इस्राइलचे उदाहरण घेऊन लगेच इकडे तसे केले असं होत नाही याला बरीच कारणे आहेत. काही एकर ते फक्त वीस गुंठे जमीनीचा तुकडा असणाऱ्यांचे प्रश्न वेगळे असतात.

In reply to by कंजूस

प्रथम प्रयोगशील आणि पारंपारिक शेतीतला फरक जाणून घ्यावा लागतो
ह्यावर लिहा, प्लीज! मनापासून वाचायला आवडेल. ह्या विषयावर काहीही माहिती नसताना लेखाला 'चान चान' म्हणणार्‍यांनाही खरे काय ते कळावी ही इच्छा आहेच! - (प्रयोगशील) सोकाजी

In reply to by सोत्रि

प्रगतिशील शेतकऱ्याकडे भांडवल, पाण्याची स्वत:ची व्यवस्था आणि रस्त्याकडे जाण्याचा मार्ग असणे गरजेचे आहे तर तो काही वेगळे पीक घेण्याचा विचार करू शकतो. हे शेतकरी बहुधा बाजारपद्धती चांगली अवगत असणारे असतात. कोणत्या वेळेस कोणत्या बाजारात काय विकायला आणायचे हे अचूकपणे करून भाव मिळवण्यात यशस्वी होतात. उदा लाल गुलाबाची फुले व्हलेंटाइन डेला आणणे. परंपरागत शेतीमध्ये सर्व गाव जे पीक लावेल ते घ्यावे लागते. पाणी पाटाचे अथवा विहिरीचे पाळीने मिळते. पंचक्रोशीतले पीक तयार झाल्यावरच गाडीवाट मिळते. अगदी बांधापर्यंत रान असते. बैलगाडी आतल्या शेतात नेता येत नाही. मिरची, वांगी वगैरे आठवड्याला तोडून बाहेर आणता येत नाही. पिकातलेच काही दाणे ठेवून पुढच्या वर्षीचे बियाणे होते. वेगळे महागडे वांझोटे बियाणे खरेदी करावे लागत नाही. धान्य कडधान्याच्या भावात फार चढ उतार होऊन नुकसान होत नाही. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. शिवाय धान्य उत्पादन टाळून सर्वच फुलशेती करू लागले तर काय होईल ? हे थोडेफार मुद्दे शेतीचे कार्यक्रम घरी कोचावर बसून पाहून लिहिले आहेत त्यामुळे चुका संभवतात.

ह्या विशयावर झी न्यूजवर सगुणा बागच्या मालकान्ची मुलाखत होती परवा. त्यानी भात शेती कमी खर्चात करण्याचे तन्त्र विकसीत केले आहे. तचेच इतर जोडधन्दे करुन उत्पन्न कसे वाढवले तेही चान्गले वाटले. ज्याना रस असेल त्यानी यूनळीवर बघावा.

उत्तम लेख ,आवडला .तसेच पैसा ताईंचा प्रतिसादही मस्त !

आजवर किती प्रधानमंत्री आपल्या "जंबो डेलीगेशन" मधे शेतकरी प्रतिनिधि घेऊन गेलेत? नाही म्हणजे शेतकरी पोशिंदा वैग्रे वैग्रे सगळे सोडा! आपण असे धरून चालू की शेती हा एक व्यवसायच आहे! (आहेच!) पण मग किती शेतकरी प्रतिनिधि ह्या डेलीगेशन मधे नेले गेले? न नेल्यास का नाही? भारत कृषिप्रधानदेश आहे न ? मग? बरं अगदी व्हाईट हाउस च्या ऑफिसियल डिनर मधे मुंडासे हवे असा अट्टहास नाही पण कमीत कमी , डब्ल्यु टी ओ राउंड्स मधे तरी किती कास्तकार (शेतकरी) नेले जातात? एकंदरीत शेतकरी लोकांस इंटरनेशनल किंमत निर्धारण प्रक्रियेत ? ज्याला धंदा करायचा आहे त्यालाच बारगेनिंग मधे स्थान नाही मग हा व्यवसाय इतर व्यवसाया सोबत लेवल प्लेयिंग ग्राउंड वर आहे अन तमाम शेतकरी हे ऐतखाऊ आळशी असल्याचे बोलणे कितपत संयुक्तिक?? हे पेंगट ब्वा त्यांच्या जिल्ह्यातले सांगत आहेत! तिथल्या भौगोलिक परिस्थिति नुसार तेथील शेतकरी त्याची मानसिकता लाइफस्टाइल बेतलेली आहे ! जनारालायाझेशन न व्हावे ही मनापासून इच्छा!!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आपले मुद्दे रास्तच आहेत. मी फक्त माझ्याच भागातले माझेच अनुभवकथन केले आहे हे स्पष्ट केले आहेच. जनरलायझेशन करण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक भागातला शेतकरी वेगळा असतो. डेलिगेशन, शेतकर्‍यांना प्रतिनिधित्व देण्याचे बोलाल तर मला वाटते की तुमचे पवार साहेब सुद्धा एका अर्थाने शेतकरीच आहेत.तुलनेत थोडे सधन शेतकरी आहेत, पण आहेत तर शेतकरीच. ते कृषिमंत्रीसुद्धा होते. आणि त्यांच्या हाती निर्णय अधिकार होतेच. म्हणजे यशस्वी व्यावसायिकाला प्रतिनिधित्व मिळतेच. शासन जेव्हा उद्योगपतींचे डेलिगेशन नेते तेव्हा कोपर्‍यातल्या पानठेलेवाल्याला किंवा गावातल्या बंदर छाप लाल दंतमंजन बनवणार्‍याला नेत नाही, तर मोठ्या, यशस्वी उद्योगपतींनाच नेते. तसाच प्रकार शेतीतही घडत असेल, काय माहीत? ह्याबद्दल अर्थातच जाणकार लोक जास्त योग्य माहिती देऊ शकतील.

अर्थातच! मी काही "यष्टी" भरुन शेतकरी न्या म्हणालो नाही!! पण अल्पभुधारक, कोरडवाहू शेती ची जाण , अनुभव अन अर्थकारण ह्याचे ज्ञान असलेला शेतकरी न्यायला काय हरकत आहे! ?? कोरडवाहू शेती चा अनुभव नसणे ह्या पाई पवार "आमचे" नाही!! (अर्थात ते कोणाचेच नाहीत) अन बाय शेतकरी आय मीन "प्रतिनिधी" ! नाहीतर परत म्हणाल गलाटा कायले न्याव!!!, बव्हंशी भारतीय शेती ही कोरडवाहू असल्याने हा प्रतिनिधी त्यांचा असावा! उगा डुबुक शेती करून गब्बर झालेला, पैनल ची कारखान्याची राजकारणे करून शेतकरी लोकांची बाजु घेतल्याचे भासवुन आपलीच पोळी शेकुन घेणारा कुठल्या संघटनेचा "नेता" "राजकारणी" "धरतीपुत्र" इत्यादी नसावेत! शेती वर कर नसल्याचा अति गैरफायदा घेणारे अन तदानुषंघाने बागायतदार ओलित धारी खादी धारी नक्कीच नसावेत!!! (बाणेदार वर्हाडी) बाप्या

विदर्भातल्या शेतकर्‍यांची किंबहुना सर्वसाधारण लोकांची मानसिकताच वेगळी आहे असे आम्हां प.महाराष्ट्र आणि मुंबईवाल्यांना जाणवत राहाते. एक तर भाषेवर हिंदीची छाप. मुंबईपेक्षा नागपूरचे आणि त्याहीपेक्षा हैद्राबादचे जास्त आकर्षण. चंद्रपूर-मूळ रोडचा खूपसा ट्रॅफिक हैद्राबादचा असतो. सीपी अँड बेरार म्हटले की मालगुजार आणि सरंजामदार लोकच डोळ्यांपुढे उभे राहातात. सेंट्रल प्रॉविन्शिअल मानसिकता. खंडांतर्गत भाग त्यामुळे वेगळे हवामान. मध्यप्रदेश,छत्तीसगढ, आन्ध्र यांच्याशी सीमा जुळलेल्या. उडीशाही फार दूर नाही.या सर्वांच्या वेगवेगळ्या प्रकृती झाडीपट्टीमध्ये दिसतात.गावांची नावेसुद्धा नागेपळ्ळी, ईटापळ्ळी अशी. शिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा मूळचा आदिवासी कोअर भाग. आदिवासी हे जंगलाचे राजे. त्यांची मूल्ये, जगण्याचे नियम नागरी संस्कृतीपेक्षा अगदी वेगळे. आजची भूक भागली की झाले. उद्याची भ्रांत नाही आणि उद्यासाठी साठा करून ठेवायचा नाही.एका अर्थी ही आदिम मूल्ये चांगलीच. इथे अधाशीपणा, ग्रीड, हरबक याला स्थान नाही. खरे तर या वृत्ती म्हणजे नागरी संस्कृतीची 'देणगी'. पण काळाच्या ओघात कोणतीही संस्कृती शुद्ध स्वरूपात टिकत नाही. बदल आणि सरमिसळ अटळ असतात. तेच झाडीपट्टीत दिसते.

लेख. पैसा व राहीचे प्रतिसाद आवडले.

लेख आणि 'अल्लाल' दृष्टीकोन आवडला. दृष्टीकोन शेतीविषयी नसून जीवनातल्या वास्तवाविषयी आहे असे वाटते. तसेच सोत्री म्हणतात तसे प्रायोगिक किंवा व्यावसायिक शेती करूच नये किंवा वाईट असे काही लेखात लिहिलेले नाही. प्रायोगिक आणि व्यावसायिक शेतीबद्दल स्वानुभवाचे लेखन वाचणे, सोत्रींप्रमाणेच, आवडेल.

लेख, पैसातै आणि राहितै चे प्रतिसाद आवडले, एकंदर कर्ज काढुन सण करु नये तशीच कर्ज काढुन शेती करण्यापुर्वी हजारदा विचार करावा हे पटलं.

एक नंबर लेख. लय आवडला. तदुपरि मते न जुळल्याने फेकूगिरी आरोपिणारे प्रतिसादही तितकेच रोचक वाटले.

लेख आवडला,काही मुद्दे निश्चित विचारणीय आहेत (मीही नौकरीची १५-१६ वर्षे कृषी भवन मध्ये व्यतीत केली आहे), तिथे ही अधिकार्यांना कित्येक गोष्टींची चिंता होती १. जमिनीतून पाणी काढून उस लावणे म्हणजे भविष्यात वाळवंट तैयार करणे. नागपूर जिल्ह्यातील काही भागात पाण्याची पातळी संत्र्याच्या शेतीमुळे १००-१५० पेक्षा ही खाली गेली आहे. भविष्यात पिण्याचे पाणी ही दुर्मिळ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत आहे. आणि कुणाला ही चिंता नाही. २. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेती करणे, काळाची गरज आहे. विदर्भात ही पारंपारिक शेती करणारा शेतकऱ्या वर आत्महत्येची पाळी येत नाही. . गोंदिया, भंडारा, गढचिरोळी या मागासलेल्या जिल्ह्यांत आत्महत्या कमी आहेत. दुसरी कडे अकोला, अमरावती, येवतमाळ, बुलढाणा या ठिकाणी जास्त. (BT जास्त जिम्मेदार)].

भारतात आय आय टी काढायची कल्पना नेहरूंची , अर्थात त्यावेळच्या शहरी मध्यमवर्ग तेथे शिकणार होता त्याबद्दल त्यांचे कौतुक , अगदी रशिया व अमेरिकेच्या सहाय्याने ह्या आय आय टी भारत भर बनल्या पण त्यावेळी ७० हून कदाचित जास्त भारतीय गावात राहणारे शेतीवर अवलंबून होते , त्यांच्या साठी जागतिक दर्जाचे कृषी महाविद्यालये देशभरात का झाली नाहीत , देशात हरित क्रांती एकाचवेळी का झाली नाही , कम्युनिस्ट लोकांना व समाजवादी लोकांना खाजगी उद्योग धंद्याचे वावडे होते पण शेतीत प्रगत व व्यवसायिक दृष्ट्या ह्या देशात शेतकऱ्यांना कशी करावी हे का त्यांना शिकवता आले नाही.

  • मी शेतकरी नाही.
  • मी शेतकरी नाही आणि शेतीही कसत्/करीत नाही
  • मी शहरातील नोकरदार असल्याने मी नक्की शेतकर्यांचा शोषणंकर्ता का पोषणकर्ता हेच अजून सिद्ध झाले नाही/सिद्ध केलेले नाही *SCRATCH*
  • शेतकर्यांनी स्वतःवर "प्रयोग्/अधांनुकरण" आणि पर्यायाने समाजावर "परंपरवादी अनुकरण" करावे का नाही हे समजण्याची "समज" मला आहे का नाही हेच मला समजले नाही. *UNKNOWN* :HZ: :hz:
  • सबब या सर्व परिस्थीतीत "निवांत बोलू (आयुष्यावर) नंतर काही " हेच फक्त अनुभवत आहे. *YES*
सातवी "फ" जीवन शिक्षण मंदीर ता:पारनेर जि.अहमदनगर

गडे हो, पत्याची बात बोललात. प्रश्न पुसलेत. १. शेती का करायची? तर थोड्या वेळात उपजीविका साधून उरलेला वेळ काव्य-शास्त्र-विनोदात घालवून आनंदाने जीवन जगता यावे म्हणून. झाडीपट्टीत हे सहजच साधले जाते आहे. म्हणूनच तुम्ही 'ठेविले अनंते तसेच' म्हणजे आनंदात राहत आहात. कव्वालीचे मुकाबले करत आहात, हाडपाक्यात नाचत आहात, मारबती काढत आहात, रामलीला भरवत आहात. काय कमी आहे हो. सुख आहे. २. नगदी पिके कार्यक्षमतेने उत्पादित व्हावीत ह्या दृष्टीने तसे विशेष प्रयत्न होत आहेत का? खरे तर नाही! ३. मराठवाड्याने ऊसाचा स्वप्नातही विचार करू नये. नाहीतर कायमचे वाळवंट होईल तिकडे. >>> सत्यवचन! इतरही भागांत गरज नसता साखरपेरणी हवीच कशाला. ज्याची गरज आहे तेच पेरावे. ४. दादा, व्यवसायम करायला हवा आहे. बरे झाले तुम्हीच कान टोचलेत. मी तुमच्याशी सहमत आहे. मात्र तुम्ही म्हणता इथे अल्लाल शेती करतात. प्रत्यक्षात, गुटखा, गुडाखू, तमाखू, गुटका, मावा, खर्रा हेही खातात. मोहाची दारू पेतात. ह्यातले काय काय चांगले म्हणायचे हो? आत्महत्या करणारे आपले प्रश्न आपण सोडवोत. मात्र झाडीपट्टीतल्या लोकाईनी बी आजूबाजूच्या विकासाची दखल घ्यावी. थे लोक कुठ चाल्ले, आपुन कुठे!

In reply to by नरेंद्र गोळे

प्रत्यक्षात, गुटखा, गुडाखू, तमाखू, गुटका, मावा, खर्रा हेही खातात. मोहाची दारू पेतात.
बरोबर आहे साहेब. मी बी ह्याचे समर्थन नाही करत. मोहाची दारू पेवाच्या बदली मोहाची राब खा, मोहाच्या फुलाची भाजी खा..
मात्र झाडीपट्टीतल्या लोकाईनी बी आजूबाजूच्या विकासाची दखल घ्यावी. थे लोक कुठ चाल्ले, आपुन कुठे!
विकासाबद्दल माहेवाले मत जरा अलग आहे. विकासाच्या मांगे लंगलंग फिरुन जर का रात्रिचि झोप उळत असल, शुद्ध हवा नाकात जात नसल तं का फायदा? माले वाट्टे का आपल्या गरजा पुर्‍या होत असतील, सुखशांतींनं राहानं जमतं असनं तं तेवळाच विकास पाहिजे. झाडिपट्टीचा थोडा विकास जरूरी आहे, पर झाडीपट्टी झाडीपट्टीच राह्यली पाह्यजे. तिचा पुणेमुंबई झाल्या नाही पाह्यजे.

ठेविले अनंते... असे जगले तर धोके कमी होतात. म्हणून तसेच जगावे? कधी एकाच पिकाचे उत्पन्न सगल्यांचेच अमाप झाले तर? आलशिपना हा गुण की दुर्गुण?

In reply to by प्रसन्न केसकर

ठेविले अनंते... असे जगले तर धोके कमी होतात. म्हणून तसेच जगावे?
तो इस में बुरा क्या है?
कधी एकाच पिकाचे उत्पन्न सगल्यांचेच अमाप झाले तर?
धान जास्त झाला तरी आम्ही ढोलीत जमा करून ठेवतो. पुढच्या वर्षी कामात येते. बाजारात नाही आणत त्या वर्षी.
आलशिपना हा गुण की दुर्गुण?
कधी गुण कधी दुर्गुण.

वाचत आहे । लेख आणि लेखावारचे प्रतिसाद पण चांगले आणि विचार करायला लावणारे आहेत पारंपारिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालून ती सर्व शेतकर्यान पर्यंत पोहचली तर काह्रेच खूप कुटुंबांची वाताहत थांबेल

In reply to by विलासराव

लिंकसाठी धन्यवाद! पण तिथे लिहिलेले खरेच कोणी वाचतात का?

In reply to by पैसा

माहीत नाही. नवीनच लाँच केलीय फडणवीस सरकारने. मंत्रालयातील काही तक्रारीही करु शकता. प्रयत्न करायला काय हरकत आहे? मला तरी वाटते काही उपयोग होईल.

लेख आवड्ला पण त्याही पेक्षा त्यामागची भूमिका आवडली. वरती कुणीतरी म्ह्टळे आहे की हे सारे खरे तर फक्त शेतीलाच नव्हे तर संपूर्ण जगण्याला लागू होते. मुटेंच्या धग्यावर प्रतिक्रिया देताना मीलिहले होते की , आत्माह्त्या का होतात त्याच्या पाठी मागची मान्सिकता ध्यानी घ्यायला हवी. ती परिस्थिती सापेक्श नसते, पूर्वी शेतीत नुकसान होत नव्हते का ? दुष्काळ / अतिवृष्टी नव्हती का ?लोक आत्महत्या का करत नव्हते ?? त्याचे उत्तर मनोवृत्तीत आहे. अधिकाधिक मिळवण्याची हाव हे त्या पाठीमागचे कारण आहे. अधिक परतावा मिळावा म्ह्नून अधिक धोका पत्करणे आणि धोका झाल्यावर सरकारच्या नावाने खडे फोडणे / आत्महत्या झाल्यावर त्याचेही भांड्वल करणे ही ती वृत्ती आहे.

माझ्या मते हे पेंगट ब्वा, सरकार ने ह्यावर केलेला "शेतकरी बन्धुंसाठी आर्ट ऑफ़ लिविंग कोर्स" ह्या अस्सल इलाजाच्या समर्थानात असावेत!!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मला ह्या 'आर्त ऑफ लिविंग' बद्दल काही माहीत नाही बापु. पण जर का ह्याच्याने शेतकरी आत्महत्या करणार नसेल आणि व्यवस्थित शेती करू शकत असेल तर माझे समर्थन असणार.

कोर्सेरा वर एक नविन कोर्स सुरू होतोय - https://www.coursera.org/course/postharvestloss जे शेती करतात किंवा ज्यांना शेती या विषयात रस आहे त्यांनी जरून 'Global Postharvest Loss Prevention: Fundamentals, Technologies, and Actors' या कोर्सला एन्रोल करा, कोर्स फ्री आहे.