Skip to main content

कल्पनेतल्या डोक्याच्या दह्याने ... - भाषेची दौर्बल्ये

लेखक arunjoshi123 यांनी सोमवार, 17/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मौजमजा
कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे? -- पु.ल.
---------------------------- हे वाक्य दिडेक वर्षापासून ऋषिकेशच्या सहीत रोज दिसते. या वाक्याचा साहित्यिक अर्थ तज्ञांना स्पष्ट आहेच. पण इथे ते उदाहरण घेऊन भाषेची दौर्बल्ये मांडत आहे. (माझ्या स्वतःच्या लेखनातही भाषेची अनेक दौर्बल्ये आहेत/असणारच. पण विषय तो नाही.) --------------------------- पायरी १: "कल्पनेतल्या" म्हणणे चूक आहे. कल्पना एक संकल्पना आहे नि तिला मिती (म्हणून आत / बाहेर असे प्रकार )नसतात. परंतु रिलेशन असते. तेव्हा कल्पनेच्या असे म्हणायला पाहिजे. (भाषेत षष्ठी विभक्ती फक्त संबंध दाखवते म्हणून ती अचूकपणे बिनधोक वापरता येते. कारण आपल्याला वस्तूंमधे कोणता तरी एक संबंध आहे इतकेच सांगायचे आहे तेव्हा ही विभक्ती सेफ आहे.) पायरी २: धूपदीप हा धूप आणि दीप असा द्वंद्व समास आहे. पण धूपदीपांनी म्हणतात १. धूपाने नि दीपाने कि २. धूपाने नि दीपांनी कि ३. धूपांनी नि दीपाने कि ४. धूपांनी नि दीपांनी पैकी नक्की काय हे ठामपणे सांगता येत नाही. म्हणून ते वेगवेगळे लिहिलेले बरे. पायरी ३: आता "कल्पनेच्या धूपांनी आणि दीपांनी" (समजा दोहोंचे अनेकवचन असे अपेक्षित आहे) म्हटले. पण इथे दीप हे कल्पनेतले आहेत कि कोठले तरी वेगळे, बाहेरचे, कल्पनेचा संबंध असलेले कि नसलेले हे कळत नाही. म्हणून कल्पनेच्या शब्द दोनदा लिहायला लागेल. आता "कल्पनेच्या धूपांनी आणि कल्पनेच्या दीपांनी" असे म्हणू. पायरी ४: १. कल्पनेच्या धूपांनी आणि २. कल्पनेच्या दीपांनी मधे "आणि" चा वापर संदिग्ध आहे. देव नक्की केव्हा खुष होतो? दोहोंनी सवत्यासवत्याने कि दोघे एकत्र असताना यापैकी एक ठाम अर्थ काढता येत नाही. म्हणून सुधारून "कल्पनेच्या धूपांनी आणि कल्पनेच्या दीपांनी या दोहोंनी एकत्र" असे करू. पायरी ५: पुलंचे हे वाक्य वाचताना सबब "खुष होण्याची कल्पना (प्रक्रिया नव्हे)" देवाचीच का, त्याच्याच स्वतःच्या डोक्यातली का असे मधे मधे वाटते. त्यामुळे तिथे "मनुष्याची कल्पना" असे लिहिणे गरजेचे आहे. मग ते "मनुष्याच्या कल्पनेच्या धूपांनी आणि मनुष्याच्या कल्पनेच्या दीपांनी या दोहोंनी एकत्र" असे होईल. पण "मनुष्याच्या कल्पनेचा धूप" कि "मनुष्याच्या धूपाची कल्पना"? बहुतेक "मनुष्याच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना" याचा अर्थ व्यवस्थित होतो. पायरी ६: "कल्पनेतल्या धूपदीपांनी" म्हणताना १. देवाला धूपदीप प्राप्त झाल्यावर किंवा २. माणसाच्या मनात केवळ त्यांची कल्पना आहे म्हणून असे दोन अर्थ होतात. नक्की काय ते शेवटपर्यंत कळत नाही. आपण प्राप्त होणे गृहित धरू. ती कल्पना पोरगी आहे कि संकल्पना हे देखिल नीट स्पष्ट व्हायला हवे. म्हणून आपण "मनाचे" हा शब्द घालू. (पुलंना मनोबा माहित असायची शक्यता न के बराबर.).मग ते वाक्य असे दिसते:
जर मनुष्याच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना आहे तसे धूप आणि मनुष्याच्या मनाची दीपांबद्दलची कल्पना जशी आहे तसे दीप हे दोन्ही एकत्र प्राप्त झाल्याने देव खुष होतो तर ...
किंबहुना मूळ वाक्यातील कल्पना हा शब्द, जो त्या वाक्याचे क्रक्स/सौंदर्य आहे, तो रिडंडंट वाटत आहे. कारण त्याचा काही अर्थ निघत नाहीय. "धूप आणि दीप हे दोन्ही एकत्र प्राप्त झाल्याने देव खुष होतो तर ..." इतकेच अर्थपूर्ण आहे. पायरी ७: पुढे "कल्पनेतील सज्जनपणा"बद्दल. आतापर्यंत येथल्या सार्‍या कल्पना ज्या मनुष्याच्या संदर्भात हे वाक्य आहे त्या मनुष्याच्या आहेत. पण तो सज्जनपणा हा मोठा लोचा आहे. १. इतरांच्या कल्पनेतील मनुष्याचा सज्जनपणा २. मनुष्याच्या कल्पनेतील इतरांचा सज्जनपणा ३. कोणाच्याही कल्पनेतला कोणाचाही कोणताही सज्जनपणा असे त्याचे तीन अर्थ निघू शकतात. मग ते वाक्य असे दिसते:
जर मनुष्याच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना आहे तसे धूप आणि मनुष्याच्या मनाची दीपांबद्दलची कल्पना जशी आहे तसे दीप हे दोन्ही एकत्र प्राप्त झाल्याने देव खुष होतो तर अशा मनुष्याच्या मनाच्या इतरांच्या सज्जनपणाच्या कल्पनेमुळे त्याने तृप्त राहायला काय हरकत आहे?
पायरी ८: प्रक्रिया अ (धूपदीप मिळणे) मुळे ब (देव) स्थिती क (खूष) मधे जात असेल तर प्रक्रिया ड (इतरांचा काल्पनिक सज्जनपणा) मुळे ई (मनुष्य) स्थित फ (तृप्तता) मधे जायला पाहिजे असे अजब लॉजिक इथे आहे. कशाचा कशाला अर्थाअर्थी संबंध नाही. पण त्याचा नी भाषेचा संबंध नाही. पायरी ९: हा प्रश्न आहे कि हरकत नसावी असा विचार आहे हे कळत नाही. पायरी १०: यात मनुष्य शब्द तीनदा आणि कल्पना हा शब्द पुन्हा तीनदा आला आहे. इथे तिन्ही ठिकाणी तोच मनुष्य अभिप्रेत आहे, जेव्हा कि तिन्ही ठिकाणी कल्पना हा शब्द वेगवेगळ्या कल्पनांना आहे. प्रत्येक वेळी आलेला हा मनुष्य तोच आहे हे निसंदिग्धपणे कसे सांगावे? या पायर्‍या बर्‍याच पुढे नेता येतील पण सध्याला असो. ------------------------- तर (या सगळ्या पायर्‍या टाळून, इफ अप्लिकेबल) तुम्ही इथे आलेले आहातच तर खालचे दोन गंमतशीर खेळ खेळू: १. पुलंचे वाक्य तोच आणि एकच आशय देत अचूक शब्दांत मांडणे. त्याचे दोन किंवा जास्त अर्थ निघाले नाही पाहिजेत. २. मूळ वाक्याचे (नको ते) शक्य तितके अर्थ काढणे.

वाचने 14216
प्रतिक्रिया 52

प्रतिक्रिया

मुद्दलात गफलत आहे.. त्याचा अर्थ असा आहे, की "धूप आणि दीप देवाला दिल्याची केवळ कल्पना केल्याने" सबब पास.

काय राव? देवाला धूप दीप दिल्याची कल्पना केल्याने माणसाच्या डोक्यात देव खुष झाल्याची कल्पना येते कि खराखुरा देव खुष होतो? आता पुलं कोणत्या थराचे आस्तिक होते माहित नाही पण मी तरी "माणूस खुष" मानून चालतोय.

In reply to by arunjoshi123

जर मनुष्याच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना आहे तसे धूप आणि मनुष्याच्या मनाची दीपांबद्दलची कल्पना जशी आहे तसे दीप हे दोन्ही एकत्र दिलेल्याची त्या मानवाने कल्पना केल्यावर ते प्राप्त झाल्याची कल्पना केल्याने देव खुष होतो तर अशा देवाला मानणार्‍या मनुष्यांनी इतरजणांनी ते सज्जन असल्याची कल्पना केल्यावर इतरांच्या सज्जनपणाच्या कल्पनेमुळे देवाप्रमाणे त्याने तृप्त होण्यास काय हरकत आहे?

In reply to by आनन्दा

बाकी ठिक आहे. दोन गोष्टी - १. पुन्हा देव खुष होतो असे निघत आहे. पुलंना ते म्हणायचं नसावं. २. काही हरकत नाही

In reply to by arunjoshi123

ह्म्म.. हे पहा जर मनुष्याच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना आहे तसे धूप आणि मनुष्याच्या मनाची दीपांबद्दलची कल्पना जशी आहे तसे दीप हे दोन्ही एकत्र दिलेल्याची त्या मानवाने कल्पना केल्यावर ते प्राप्त झाल्याची कल्पना केल्याने देव खुष होतो असे जर मनुष्याला वाटते, तर अशा देवाला मानणार्‍या त्याच मनुष्याला इतरेजनांनी ते सज्जन असल्याची कल्पना केल्यावर इतरांच्या सज्जनपणाच्या कल्पनेमुळे त्याच्या कल्पनेतील देवाप्रमाणे तृप्त होण्यास काय हरकत आहे?

असा अनुभव आहे. अर्थात, भाषा हा निर्देश आहे., अर्थ पोहोचला की काम झालं. त्यापलिकडे भाषेला फारसं महत्त्व नाही.

In reply to by arunjoshi123

मग हे जे काय लिहिलंय त्याला काही अर्थच नाही! भाषा अर्थ (नीट?) पोहोचवत नसेल तर बोलणं, लिहिणं, कायदे, नियम, झालंच तर देशाची घटना (Constitution), कशालाच काही अर्थ राहाणार नाही.

भाषिक दौर्बल्याचा मुद्दा स्पष्ट करणारा लेख ;-)

किती तो कीस! जरा थांबा, डॉक्याचं दही झालंय त्याचं ताक झालं की परतून येते. तोपर्यंत याच्या जवळच्या अर्थाची म्हण घ्या. "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात!"

In reply to by पैसा

ताक पण परतावं लागतं? का ताकाचं दही झाल्याशिवाय परतता येत नाही?

भाषा तिचे तुकडे तुकडे होईपर्यंत लेखात दाखवल्याप्रमाणे अनेक प्रकारे वाकवता आणि तोडता येते हेच तिचे सर्वात मोठे दौर्बल्य नव्हे काय ?! नसल्यास का नाही ? :)

In reply to by आनन्दा

सहसा भाषेच्या लवचिकतेचे कौतुक होते तेव्हा ही लवचिकता दुधारी तलवार आहे हे विसरले जाते. बराच आशय पोचवण्यासोबत बरीच "युद्धसामग्री" संवादकांत भाषा फुकटात वाटते.

In reply to by arunjoshi123

व्यक्तिशः मला भाषा वापरताना अत्यंत काळजीपूर्वक वापरावी असे वाटते. भाषांमधले वाक्प्रचार आणि म्हणी कितीही आकर्षक असल्या, तरी चपखल बसल्याशिवाय त्यांचा वापर करू नये, कारण त्यातून अनेक अर्थ निघतात, आणि युद्धसामग्रीदेखील तयार होते असे माझे मत आहे.

करा टवाळी आणि होऊ द्या रेजीमेंटेशन ... उल्तीनोव्ह सुल्तीनोव्ह, पार्तु द वार्तु ला हेच सहन करावे लागते... परवाच्या टोकियोच्या फ्रीडम फ्रोम बोट्म च्या परिषदेत शिन्कीबोका हेच हेच बोंबलत होता ...

In reply to by अत्रन्गि पाउस

हा हा हा =)) वस्कन ओरड्लास्की, उभाकाबस्की, हे हुंग ते हुंग या विचारवंतांना वगळल्याचा कट्टर निषेध.

In reply to by बॅटमॅन

"मिशी कापा चि का" ह्यांना विसरल्या बद्दल त्रिवार निषेढ... अर्थात ही सगळीच माणसे "नका शिंकू" ह्याच शाळेतले मणी आहेत, ह्याचा उल्लेख पण टाळला. कसे होणार?

In reply to by मुक्त विहारि

"फुंकुन पी" अमृततुल्यचा उल्लेख न केल्याबद्दल दुबार हा शब्द "दुबार पेरणी" या संदर्भाने घ्यावा.(बंदुकीच्या नाही!!!)

आम्ही "बोलतो तेच लिहितो" याच पन्थातले आहोत ..... त्यामुळे दौर्बल्य भाषेचे नसून माणसांचे असते असे आमचे अनुभवाअंती ठाम मत झाले आहे .. समजल का ?

In reply to by विटेकर

पण वाक्य असं हवं, `आम्ही आत-बाहेर एक असल्यानं, भाषेतून नेमकाच अर्थ व्यक्त होतो'!

In reply to by शोधा म्हन्जे सापडेल

ते शेविंग क्रीम अंमळ दही वा लोण्यासारखे दिसतेय का हो? लोणीप्रेमी लोकांनी यावर प्रकाश टाकावा.

हा लेख भारत-पाकिस्तान सीमारेषेवर ('सीमे'वर नव्हे) वाचण्यात यावा असे सुचवतो आणि लेखकानेच तो वाचावा. म्हणजे एकतर पाकिस्तानला शिक्षा मिळेल किंवा मग लेख लिहून डोक्याचे दही केल्याबद्दल लेखकाला. ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

In reply to by स्वप्नज

पण त्यासाठी पाकड्यांना हे समजावं तर लागेल. त्यांना समजायचं तर उर्दूत या लेखाचे भाषांतर केले पाहिजे. त्याकरिता डबल टीम बसवावी लागेल. अन त्यामध्ये हा लेख समजावून सांगताना, आणि तो भाषांतरित करताना दोघांच्याही डोक्याचे दही होईल त्याची काय वाट? दोघांच्याही डोक्याचे दही झाले की ते सांडेल आणि दोघेही ते साठवायला म्हणून भांडे शोधतील. नै सापडले की दोघांचा एकच आर्त टाहो आसमंत व्यापून उरेलः "भांडे का लपविता????????????" पण हा मराठी माणसाचा टाहो झाला. चीख़-ए-उस्ताद-ए-उर्दू खालीलप्रमाणे. "क्यूँ छुपाते हो देग़-ए-बुज़ुर्ग रूह-ए-नाराज़ से, ख़ौफ़-ए-जिगर होता जिसके आग़ाज़-ए-आवाज़ से".

डोक्याच्या दह्याने आता त्याचा चक्का झाल्याचे कबुल केले आहे ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

पुलं नक्की काय म्हणत आहेत ते एकाच वाक्यात सांगणे क्लिष्ट आहे. मी वेगवेगळी वाक्ये वापरायचा प्रयत्न करतो. १. माणसाच्या मनाची धूपांबद्दलची कल्पना असते. २. माणसाच्या मनाची दीपांबद्दलची कल्पना असते. ३. असे धूप आणि असे दीप एकत्र प्राप्त झाल्याने देव खुश होतो अशी माणूस कल्पना करतो. ४. इतर जन सबब माणसाच्या सज्जनपणाबद्दलची कल्पना करतात. ५. अशा स्वतःबद्द्लच्या सज्जनपणाच्या कल्पनेमुळे सबब माणसाने वर देव जसा खुष होतो आहे त्या धर्तीवर तृप्त राहायला हरकत नसावी. ============== प्रश्न १ - पुलंना हेच म्हणायचे आहे का? प्रश्न २ - हे (दुसर्‍या) एका वाक्यात कसे मांडावे? प्रश्न ३ - पुलंना दुसरे काही म्हणायचे आहे? ============= पुलंच्या या वाक्यात, स्टँडालोन पाहिलं तर, लॉजिक नाही, असं वाटत नाही का?

In reply to by arunjoshi123

धूप-दीप कल्पनेतला, देव कल्पनेतला, त्याचे खूश होणे कल्पनेतले. म्हणजेच सगळा प्रकार "बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेवोनिया तृप्त, कोण झाला" अशातला आहे. तसेच एखाद्याच्या सज्जनपणाबद्दलची कल्पना दुसर्‍याने केली आहे. मानसपूजेने देव खूश होतो, तसा दुसर्‍याने आपल्याला चांगले म्हटल्याने एखादा खूश झाला तर त्यात काय हरकत, प्रत्यक्षात चांगले असण्याची गरज नाही. असा वरवर अर्थ दिसतो. पुलंना हेच म्हणायचे आहे का दुसरे काही ते कळण्यासाठी हे वाक्य कोणत्या पुस्तकात आणि कोणत्या संदर्भात आले आहे ते बघावे लागेल.

In reply to by पैसा

धूप-दीप कल्पनेतला, देव कल्पनेतला, त्याचे खूश होणे कल्पनेतले.
हे निरर्थक आहे. काही तरी एक रीयल असलं पाहिजे मग वाक्याला अर्थ आहे. बाकी कोण्या पुस्तकात ते ऋषिकेशला माहित आहे.

अजो, एक गरीब प्रश्न तुम्ही चहापत्ती, साखर, आलं, दूध हे वेगवेगळं पोटात रिचवून गॅसवर बसता का हो?

In reply to by आदूबाळ

तुम्ही चहापत्ती, साखर, आलं, दूध हे वेगवेगळं पोटात रिचवून गॅसवर बसता का हो?
यावरुन अजुन १ वात्रट प्रतिसाद टाकला असता ;)

In reply to by आदूबाळ

वेल, १. चहापत्ती ओली गोडसर असल्यास लहानपणी २. साखर आजही ३. दूध आजही पोटात वेगवेगळं रिचवतो मी कधीकधी. अर्थात या नंतर मी उभा राहिलो काय, बसलो काय, झोपलो काय - वायू सर्वत्र - त्या जागा निर्वात थोडीच असणारेत?

४. इतर जन सबब माणसाच्या सज्जनपणाबद्दलची कल्पना करतात. ५. अशा स्वतःबद्द्लच्या सज्जनपणाच्या कल्पनेमुळे सबब माणसाने वर देव जसा खुष होतो आहे त्या धर्तीवर तृप्त राहायला हरकत नसावी.
इथे सज्जनपणा सबब माणसाचा आहे का दुसरा कोणी आपण सज्जन असल्याचे दाखवतो ते पाहून सबब माणूस खूश होतो, याबद्दल शंका. म्हणजे एक उदाहरण देते. जोशीबुवा मला म्हणाले, तुला माझा मोबाईल देतो. जोशीबुवा कित्ती चांगले, मला मोबाईल देणार, खरे सज्जन आहेत हो; म्हणून मी खूश होते. आता जोशीबुवा खरे सज्जन/चांगले असतील किंवा नसतील, ते मला मोबाईल देतील किंवा नाही देणार. कदाचित त्यांना नकोसा झालेला मोबाईल माझ्या गळ्यात घालतील. ते सगळं आत्ता लागू नाही. सध्या जोशीबुवांच्या चांगुलपणाबद्दल मी खूश व्हायला काय हरकत आहे?