मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सार्वजनिक स्वच्छता: आधी स्वतःकडे बघा

मंदार दिलीप जोशी · · काथ्याकूट
आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या पुढाकाराने 'स्वच्छ भारत अभियान' सुरु झाले. साक्षात पंतप्रधानांनी हातात झाडू घेउन रस्ता झाडला आणि इतरांना उदाहरण घालून दिले. पंतप्रधान झाल्यापासून अनेक बाबतीत जनता मोदीजींचा आदर्श ठेवत आहे आणि मोदी कुर्त्यापासून अनेक गोष्टींचे अनुकरणही होत आहे. मग या बाबतीत ते न झाल्यासच आश्चर्य होते. प्रत्यक्ष पंतप्रधान मोदीजींनी हातात झाडू घेतल्यामुळे आलेल्या देशात एक प्रकारची झाडलाट आली आणि त्यात इतर राजकीय नेत्यांपासून ते सरकारी व खाजगी आस्थापनांतले अधिकारी, सिनेनट, नट्या आणि नटव्या, आणि अगदी ऑफिसातले शिपाई इथपर्यंत सगळे अक्षरशः झाडून सामील झाले आणि रस्त्यांवरचा आणि परिसरातला कचरा साफ करु लागले. इथे एक घटना आठवली. नक्की कधी ते आठवत नाही पण साधारण वर्षभरापूर्वी एका चीनी संकेतस्थळांवर भारतातल्या अनेक धार्मिक स्थळांवर कसा उकिरडा माजला आहे त्याची अनेक निवडक छायाचित्रे झळकली. चीनी संकेतस्थळ आहे म्हटल्यावर अनेकांनी देशभक्ती आणि चीनद्वेषातून 'चीन भारतावर कसे कसे हल्ले करत आहे आणि हे सुद्धा भारताचे पर्यटनातून मिळणारे उत्पन्न बुडवायचे कारस्थान कसे आहे' यावर तावातावाने त्यावर चर्चा करायला सुरवात केली. हे खरं आहे, मात्र अशी चर्चा करत असताना एक देश म्हणून गेली काही वर्षे आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेचे वावडेच निर्माण झालेले आहे हे मात्र सोयिस्कररित्या विसरले गेले. भेळ खाल्ली, टाक कागद तिथेच. चणे-दाणे खाल्ले, टाक कागद तिथेच. प्लॅस्टीकच्या कपातून चहा प्यायला, टाक तो कप खाली तिथेच. पान, गुटखा, पानमसाला खाऊन यत्र तत्र सर्वत्र घातलेले ते मंगलाचे सडे हे तर प्रत्येक कोपर्याचे व्यवच्छेदक लक्षणच झालेले आहे. चालत्या गाडीतून विविध प्रकारचा कचरा बाहेर टाकणे याचा एक सुशिक्षित नमूना नुकताच बघितला. गाडीतून शहाळ्याचे पाणी पिऊन झाल्यावर शहाळे सरळ रस्त्यावर फेकून देण्यात आले. हे असंच सुरू राहिलं तर सगळा देश जरी झाडू घेऊन उभा ठाकला तरी कमी पडेल. तेव्हा या अभियाना अंतर्गत म्हणा किंवा स्वयंप्रेरणेने म्हणा, आपला परिसर जरूर स्वच्छ करा पण मुळात आपण वरील मार्गांनी कचरा करण्यास कारणीभूत ठरत नाही ना, याचा विचार करुन आधी अशा प्रकारच्या कचरानिर्मितीला पायबंद घाला. सुधारणा करायची असेल तर समोरच्याकडे बोट न दाखवता आणि यंत्रणांना दोष न देता स्वतःपासून सुरवात करा. तरच आपला देश स्वच्छ होऊ आणि राहू शकेल. चला तर, आपणच आपला भारत स्वच्छ राखूया!

वाचने 18018 वाचनखूण प्रतिक्रिया 24

In reply to by कपिलमुनी

सतिश गावडे 31/10/2014 - 19:32
निबंध? अहो किती कळकळीने लिहिलंय त्यांनी. ते एक असो. (असं बॅटमन नावाचा आयडी खुप वेळा लिहितो.) मी दुसरा.

धाग्यात मांडलेल्या विचारांशी सहमत. कळायला लागल्यापासून मी स्वतः सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे थांबवले ते आजही कटाक्षाने पाळतो. या मोहिमेतून सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेबाबत कायमस्वरूपी जागरूकता येईल अशी आशा करुया.

भृशुंडी 01/11/2014 - 02:51
कित्येक वर्षं बरेच लोक स्वच्छता पाळतच आले आहेत. एवढं साधं कळायला मोदी लागतात का? नागरिकशास्त्र इयत्ता चौथीचे धडे जर पंतप्रधानांना द्यावे लागत असतील तर प्रश्नच मिटला.

In reply to by भृशुंडी

hitesh 01/11/2014 - 03:43
नरुकाका असे अनेक कार्यक्रम गुज्रातेत राबवत आहेत. खेल दिन ... सर्व सर्कारी कर्मचार्‍यानी दोन तास मैदानी खेळ खेळणे. शिक्षक दिन .. सार्व सर्कारी कर्मचार्‍यानी शाळेत जाऊन एक तास लेक्चर घेणे. ई इ ..

In reply to by hitesh

hitesh 01/11/2014 - 03:45
भ्रुषुंडी म्हणजे कोण ? रामायण : जसे आहे तसे .. असे काहीतरी लिवले आहे, तेच का ?

In reply to by भृशुंडी

काळा पहाड 01/11/2014 - 12:52
असं नाही करायचं हां, मग आमी वाद कशावरून घालणार? बाकी शूभ्रूंडी आणि भृशुंडी यांच्यातल्या तौलनिक फरकावर कुणी पुण्यनगरीकर प्रकाश टाकू शकेल काय?

वडापाव 01/11/2014 - 23:30
आजच जाहिरात पाहिली. रस्त्यावर कचरा करताना कोणी दिसेल त्याचं टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं. मस्त कल्पना वाटली मला. संधी मिळताच आजमावणार आहे

नरेण्द्र उपक्रम चांगले राबतोय ह्यात शंका नाही.पण आपला प्रॉब्लेम हा की हे आपण कोणीतरि सांगितले आहे म्हणून करतोय. परवाच तुमचे ते अमिताभ बच्चन्ही झाडू मारत होते.आता हे गृहस्थ खरोखरच रोज झाडू मारणार आहेत का? असो. आणीबाणीच्या काळात ट्रेन्स वेळेवर धावत्,सरकारी कामे वेगाने होत.मध्यम वर्ग अगदी खुष होता.बाई पडल्या व सगळे पूर्ववत!!

कंजूस 02/11/2014 - 06:05
१)कचरा करणारे वाचत नाहीत. २)कोणत्याही गावात /शहरात येणाऱ्या उपऱ्यांना स्वच्छतेशी देणेघेणे नसते. त्यांना फक्त हिरवे आणि गुलाबी गांधी आवडतात. ३)रेल्वेच्या डब्यांना बंद टॉइलट जोडत आहेत ते चांगले आहे. एसी स्लीपरच्या डब्याच्या काचा बंद असतात. कचरा टाकायला एक कप्पा वॉशबेसनखाली असतो. अधूनमधून रे०कर्मचारी तो रिकामा करतात. सेकंड क्लासच्या डब्यातून ही सोय करायला हवी.

इथे अमेरिकेत रस्त्यांच्या शेजारचा कचरा ठराविक काळानंतर स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागाद्वारे अडॉप्ट अ हायवे हा उपक्रम राबवला जातो. महाराष्ट्रातही काही स्वयंसेवी संस्था गडकिल्ल्यांची स्वच्छता करत असतात असे वाचले आहे.

पैसा 02/11/2014 - 11:01
मात्र आपल्या लोकांना काहीतरी प्रलोभन किंवा शिक्षेची भीती असेल तरच ते असली खरी तर आवश्यक पण आता ऐच्छिक झालेली कामे करतात साधारण असे निरीक्षण आहे.

hitesh 06/11/2014 - 20:19
व्वा मोदीजी व्वा ! http://www.maayboli.com/node/51468

In reply to by hitesh

hitesh 06/11/2014 - 20:26
http://aajtak.intoday.in/gallery/swachh-bharat-abhiyan-weep-india-weep-1-7692.html#photo1

hitesh 06/11/2014 - 20:42
व्वा जोशीजी व्वा ! तिकडे कोकणस्थ इकडे जोशी ! http://www.maayboli.com/node/51469