मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(व्हॅलेंटाईन डे म्हणलं की निसर्गातील सर्व घटकांना त्रास द्यायला हवा का?)

विकास · · काथ्याकूट
लेखाची प्रेरणा ही आणि इतर अनेक. :) बरेच दिवस लिहायचे डोक्यात होते पण राहून जात होते. आता फेब्रुवारी महीना उजाडला म्हणल्यावर जगभर व्हॅलेंटाईन डे चे वारे वाहू लागतात त्यामुळे ही वेळ, या संदर्भातील विचार व्यक्त करण्यास आणि विचारांचे आदानप्रदान करण्यास योग्य आहे; असे वाटत असल्याने आता लिहीत आहे. मिपाकरांनो, कृपया गैरसमज नसुंदेत, पण "आक्षेप हा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भात नसून, साजरे करण्याच्या पद्धतीबद्दल आहे". कारण चुकीच्या पद्धतीमुळे निसर्गातील सर्व घटकांना त्रास होतो. यात मानव, त्यातही "पुरूषमाणूस" हा देखील निसर्गाचा घटक असल्याचे विशेष करून लक्षात ठेवलेले आहे. या दिवसाच्या निमित्ताने गुलाबांच्या फुलांची अक्षरशः कत्तल होते. दुसर्‍या दिवशी नुसती सुकलेली फुलेच रहातात. आता हे कोणी देवाला वाहीलेल्या फुलांच्या आणि नंतर त्याचे होणार्‍या निर्माल्याच्या बाबतीत पण होते, मग येथे झाले म्हणून काय बिघडले असे देखील म्हणू शकतात. थोडक्यात काय आम्ही पण आमचा खारीचा वाटा उचलणार असे म्हणायचे झाले! या दिनाचा अजून एक आक्षेपार्ह भाग असतो, तो म्हणजे चॉकलेट्सचा. किती ती चॉकलेट्स आणि किती त्यांचे ते प्रकार! बरं त्यात नको इतकी साखर असते, नको इतके अधिक स्निग्धांशाचे दूध असते. त्याचे परीणाम हे पूर्वपश्चिम वृद्धीसाठी शरीरावर होतात. त्या व्यतिरीक्त चॉकलेट्च्या चांद्या, चकचकीत कागदांनी केलेले त्यांचे खोटे खोटे गुच्छ वगैरे मुळे सर्व कागदांचा कचरा होतो ज्याने आधीच कमी पडत असलेल्या जागेवर कचरा झाल्याने वाढ होते. तुम्ही म्हणाल आता एका चांदीने काय फरक पडतो? पण असा विचार करा की व्हॅलेंटाईन दिन हा विशेष करून तरूणाईमधे प्रिय आहे. (कालांतराने काय होते माहीत नाही, पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे). आता भारतात आजमितीस मला वाटते साधारण ४३-४४ कोटी तरूण जनता भारतात आहे. आता इतक्या जनतेने एक चॉकलेट खाल्ले, एक गुलाब वापरला, तर किती कचरा होणार याचा विचार करा! त्यात अजून बाहेरचा खाण्याचा आणि पिण्याचा खर्च गृहीत धरा... आता अजून एक महत्वाचा मुद्दा: व्हॅलेंटाईन डे चे निमित्त करून केवळ सभोवतालच्या हरीत निसर्गालाच त्रास सहन करावा लागतो असे नाही तर या दिनाचे निमित्त होऊन निसर्गातील पुरूषप्राणी अधिकच दीन होतो. असा निसर्गाला त्रास देण्याचे काम हे त्याच्या माथीच येते. का? तर त्यावरून प्रेमाची किंमत ठरणार असते? पण ज्या गोष्टींचा दुसर्‍या दिवशी कचरा होतो अथवा प्रेमापेक्षा शरीरच पूर्व-पश्चिम वृद्धींगत होऊ शकते त्यातून प्रेमाची किंमत कशी बरं ठरवता येते? पण अशी नुसतीच टिका करत बसण्याऐवजी, काही गोष्टी या निमित्ताने एकमेकांना सुचवाव्यात असे वाटते. अजून १० पेक्षा अधिक दिवस व्हॅलेंटाईन दिनास राहीले आहेत. तो पर्यत या जुनाट पद्धतीत बदल करण्याचा खोक्याबाहेर विचार करता येईल असे वाटते... सर्व प्रथम, प्रेम हे एका दिवसासाठी निव्वळ शोऑफ अर्थात दाखवायची वस्तू नाही हे ध्यानात घ्या. आपल्या सहचारी व्यक्तीस तसे ते नुसते दाखवत न बसता ते दिवसेंदिवस वृद्धींगत कसे होत आहे हे देखील समजूंदेत. त्यासाठी निसर्गाची हानी करणार नाही अशी प्रत्येकाने प्रतिज्ञा घेतली पाहीजे. समाजात वजन वाढणे महत्वाचे असते, पण त्यासाठी चॉकलेट्स आणि बाहेरचे अरबटचरबट खाणे-पिणे योग्य आहे का ह्याचा देखील विचार करा. त्या ऐवजी आपल्या सहचारी व्यक्तीस घरीच साधा स्वैपांक करायची गळ घालून त्याचे मनमोकळेपणाने कौतुक करा. त्यातून प्रेम पण कळेल, गुलाब पण द्यावे लागणार नाहीत आणि चॉकलेट्स आदींचे परीणाम पण भोवणार नाहीत. बघा विचार करा आणि अजून देखील काही सुचवता आले तर या धाग्यात अवश्य सुचवावेत ही विनंती

वाचने 8430 वाचनखूण प्रतिक्रिया 37

कंजूस Mon, 02/03/2014 - 06:38
विडंबन कुठे आहे ? विरुध्द मत प्रदर्शन आहे फक्त . कोणत्याही धार्मिक स्थानाविषयी अथवा कल्पनेविषयी फारच आदरभाव फुलं ,पेढे ,अगरबत्ती विकणारे आणि रिक्षावाल्यांना असतो . परदेशात कधी गेलात तर तिथल्या इच्छापूर्ती कारंज्यात युअरोचे नाणे टाकू नका फक्त पाण्यात भिजवून (उलटे वाकून खांदयावरून करावे लागेल) परत आणा . प्रत्येका भारतीयाने असे केल्यास दरवर्षी एक लाख युअरो परकी चलन वाचेल .

मदनबाण Mon, 02/03/2014 - 10:35
हा तर इंपोर्टेड फेस्टीव्हल आहे ! रक्षा-बंधन सारखा सण साजरा करणारा आपला देश या इंपोर्टेड फेस्टीव्हलच्या मागे धावताना दिसतो आहे.आपल्या सारखी इतकी मोठी बाजार पेठ असताना या तथाकथित प्रेम दिवसाचे व्यापारी फायदेच पाहिले जातात ! इथे नुसता साबण जरी विकला तरी खरेदी करणारे कोट्यावधी आहेत, तिथे गुलाब आणि चॉकलेटची काय कथा ? ;) तसेही आपल्या जवळपास सर्वच सणांचे बाजारीकरण झाले असुन अनेक विकॄत गोष्टींची त्यात भर पडली आहे.सण फक्त नावालाच राहिले असुन त्यांचा आनंद देखील हल्ली होइनासा झाला आहे का ? तेच मुळी कळेनासे झाले आहे. व्हॅलेंटाइनचाच दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठी काय ट्रेडमार्क करुन ठेवला आहे का ? प्रेम आणि आकर्षण यातला फरक न समजणारी मंडळी देखील, आज के दिन तो अपुन प्रपोज मारकेइच रहेगा असे म्हणताना सर्रास आठळते. तरुणाईचा जोश, आनंद असे लेबल लावत आपण ज्या प्रकारे या इंपोर्टेड फेस्टीव्हल वाहत चाललो आहोत त्याचे भान कोणाला राहिले आहे का ? असा प्रश्न स्वतःला देखील विचारावासा वाटत नसावा. असो... जाता जाता :- आपला रक्षा-बंधन सण कोणत्या देशाने इंपोर्ट केला आहे का ? अवांतर :- या धाग्यात मूळ लेखाचा दुवा दिला आहे तो लेख वाचला आणि जवळपास माझी बरीचशी मते तशीच आहेत, हे जाणवले.

In reply to by मदनबाण

सुनील Mon, 02/03/2014 - 10:53
हा तर इंपोर्टेड फेस्टीव्हल आहे ! रक्षा-बंधन सारखा सण साजरा करणारा आपला देश या इंपोर्टेड फेस्टीव्हलच्या मागे धावताना दिसतो आहे
इंपोर्टेड आहे हे मान्यच! पण आपल्या संस्कृतीत भावा-बहिणींसाठी रक्षाबंधन, भाऊबीज आहे. नवरा-बायकोसाठी पाडवा, वटपौर्णिमा आहे. पण प्रेमी युगुलांसाठी कुठला सण आहे? का त्यांनी चोरून-मारूनच प्रेम व्यक्त करायचे? आधी पर्याय द्या आणि मग इम्पोर्टेड म्हणून हिणवा!

In reply to by सुनील

मदनबाण Mon, 02/03/2014 - 11:58
पण प्रेमी युगुलांसाठी कुठला सण आहे? हॅहॅहॅ...वर्षात ३६५ दिवस असताना,प्रेम व्यक्त करण्यासाठी सण लागावा !याची गम्मत वाटली. ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण Mon, 02/03/2014 - 12:21
मग हेच रक्षा बंधन, भाऊबीज, पाडवा इत्यादींबाबतदेखिल म्हणता येईलच की! कशाला हवेत ते तरी सण. हैतच की ३६५ दिवस!! तो आपल्या संस्कॄतीचा भाग आहे. ;) जगाच्या नाही. ;) नशीब श्राद्ध रोज का घालु नये असा प्रश्न अजुन आला नाही ! नाहीतर आहेतच मदर्स डे आणि फादर्स डे ! ;) काय आहे... हल्ली हे डे फॅड पसरत चाललय ! त्यामुळे नक्की आपलं काय आणि कशासाठी आहे,हेच खरं तर संशोधाचा विषय ठरावा. ;)

In reply to by मदनबाण

जगभर या एका नव्या संस्कृतीची रुजुवात झाली आहे, होत आहे आपल्या अनेक गोष्टी ज्या संस्कृतिचा भाग आहे, पण समाज रुढी परंपरा आणि यव नी तेव कारणाने इच्छा नसतांना पाळतो. नवं येतं असतं आणि कालाबरोबर कालबाह्य ते सोडावं लागतं. ही जगरहाटी आहे. उद्या श्राद्ध रोज घालू लागला तरी त्याला घालू दया. ज्याच्या त्याच्या आनंदाचा प्रश्न आहे. बाकी, हे फ्याड वगैरे आहेत असे मला अजिबात वाटत नाही. धावपळी च्या काळात निमित्तानं व्यक्त होण्याचा, आनंद साजरा करण्याचा, माणूस क्षण शोधतोय जगणा-यांना आपल्या मनाप्रमाणे जगू दया इतकेच आपले म्हणने आहे त्यात उगं संशोधन करीत बसू नये.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण Mon, 02/03/2014 - 13:33
धावपळी च्या काळात निमित्तानं व्यक्त होण्याचा, आनंद साजरा करण्याचा, माणूस क्षण शोधतोय जगणा-यांना आपल्या मनाप्रमाणे जगू दया इतकेच आपले म्हणने आहे त्यात उगं संशोधन करीत बसू नये. हेच तर ! मग त्यासाठी अमूकच दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठी का हवा ? न जाणो तो व्यक्त करण्यासाठी परत वेळ मिळेल-न-मिळेल.ती व्यक्ती राहिल किंवा नाही.खर्‍या प्रेमासाठी व्यक्त करणे महत्वाचे !

In reply to by मदनबाण

असू दया ना यार.... का नसू नये. व्यक्त होणारे कधीही व्यक्त होत असतात. पण काहींना निमित्त लागतं राजा...! -दिलीप बिरुटे

तरी म्हटलं मी अजून कोणी कसं आनंदावर विरजण टाकणारा धागा नै काढला. ( ह.घ्या. हं) :) >>>>> या दिवसाच्या निमित्ताने गुलाबांच्या फुलांची अक्षरशः कत्तल होते. अजिबात मान्य नाही. गुलाब योग्य वेळी काढले नाहीतर ती झाडावर सुकणारच आहेत तेव्हा फुलांच्या ठिकाणी समर्पणाची, त्यागाची भावना असते आणि त्यातच त्यांनाही आनंद होत असतो. (गुलाबाचं मनोगत ऐकल्यावर त्या भावना मला समजल्या आहेत म्हणून म्हणतो हं) आमच्याकडे अजून चॉकलेटच फ्याड दिसत नाही. पण हॉटेलं गच्च असतात. चॉकलेट आरोग्याला अपायकारक असतील तरी ती खाऊ नये बॉ...! दुसरं काही गोडधोड होऊ द्याव. घरुन पुरणाची पोळी डब्यात घेऊन कुठेतरी शेतात बसून एक घास चिऊचा एक माऊचा करत करत एकमेकांना तो भरवावा. >>>> व्हॅलेंटाईन डे चे निमित्त करून केवळ सभोवतालच्या हरीत निसर्गालाच त्रास सहन करावा लागतो असे नाही तर या दिनाचे निमित्त होऊन निसर्गातील पुरूषप्राणी अधिकच दीन होतो. =)) हाहाहा सहमत आहे. कचरा करु नये याच्याशी सहमत. प्रेम व्यक्त करतांना निसर्गाचं भान ठेवावं याच्याशी सहमत. आपल्या धाग्यावरुन आमचं तरी ठरलं. तेच स्वप्न लोचनांत रोज रोज अंकुरे, पाहतो नभात मी धुंद दोन पाखरे हे गाणं तिला म्हणायला लावून व्हेलेंटाईन डे साजरा करायचा. :) -दिलीप बिरुटे

इरसाल Mon, 02/03/2014 - 10:54
व्हॅलेंटाईन डे म्हणलं की निसर्गातील सर्व घटकांना त्रास द्यायला हवा का? होच्च मुळी, त्याशिवाय का लोकांना कळणारेय की संत व्हॅलेंटाईन यांचा जन्मदिन आहे ते.

पैसा Mon, 02/03/2014 - 11:01
मेले हसून! बिरुटे सर पण अल्टिमेट रोमँटिक आहेत! बाकी या "इंपोर्टेड" सणासाठी निसर्गाला वेठीला धरू नये याच्याशी सहमत. कॅलरीज वाढवण्याऐवजी जाळल्या पाहिजेत. वेल्लाभटाचे २/३ धागे त्वरित वाचून काढा. कोणत्याही किंमतीवर आपल्या थॉर सौस्कृतीचं सौरक्षण झालंच्च पायजे. दुसर्‍या टोकाला जायचं असेल तर तात्पुरते श्रीरामसेना बजरंगदल वगैरेंचे सदस्यत्व घ्यायलाही हरकत नै. ते भटजी आणि मंगळसूत्र घेऊन मागे लागले की सगळ्या टिनपाट प्रेमवीरांना पळता भुई थोडी होईल. त्यांचा उपाय नामी आहे यात काय सौंशय. एकदा लगनच लावून टाकलं की सगळ्या पुर्शांना व्हॅलेंटाईन वगैरेंचा आपॉप विसर पडतो. "इ लोवे योउ" म्हणण्यापेक्षा मिपाकरांनी शुद्ध देसी मराठीत "मज्याशी मय्यत्री कर्नारं कं?" असे विचारत खवमधून फिरावे. त्या सगळ्यांची सं मं तर्फे नोंद घेतली जाईल आणि योग्य ते बक्षीस नंतर देण्यात येईल असे आत्ताच झाईर करत आहे. तोपर्यंत "जै श्रीराम!!" =))

In reply to by पैसा

विकास Mon, 02/03/2014 - 18:16
एकदा लगनच लावून टाकलं की सगळ्या पुर्शांना व्हॅलेंटाईन वगैरेंचा आपॉप विसर पडतो. या वरून एक महत्वाचा प्रश्न पडतो, व्हॅलेंटाईन डे चालू करणे ही स्त्री पार्टीची कॉन्स्पिरसी असावी का? कदाचीत दिवाळी (म्हणजे पाडवा) करणे वगैरे आता जुनाट/कर्मठ आहेत असे सतत कानीकपाळी ओरडल्याने कमी झाले आहेत. तसे कमी होणे सोयिस्कर असल्याने, सुधारकी वर्तन पुरूषांनी अंगिकारल्यामुळे प्रॉब्लेमच झाला... मग काहीतरी हक्काचे असावे म्हणून पहील्या का अशाच कुठल्यातरी शतकातल्या संत व्हॅलेंटाईनचा मॉडर्न सण आपल्याकडे आला नसेल ना? प्रा.डाँ.बरोबर एक शोध निबंध लिहीत येईल या विषयावर. ;)

In reply to by विकास

व्हॅलेंटाईनडे च्या बाबतीत स्त्री पार्टीची स्त्री पार्टीची कॉन्स्पिरसी असावी का ? असे काही वाटत नाही. कारण लग्न केल्याने पुरूषांची शक्‍ती आणि बुद्धी कमी होते, असे रोमन सम्राटाला वाटत होते म्हणून त्याने सैनिकांना एक तर लग्न करु नये किंवा केले असेल तर बायकांना भेटायला जायचे नाही, असा फ़तवा काढला. इथपर्यंत तरी स्त्री पार्टीची काही कॉन्स्पिरसी असावी असे काही दिसत नाही. व्हेलेंटाईनला ही पुरुषांची दु:खं काही बघवल्या गेली नाहीत म्हणून त्याने सम्राटाच्या या फ़तव्याला विरोध करुन सैनिक आणि त्यांच्या बायकांना भेटीसाठी मदत केली यातही स्त्री पार्टीचा विचार केला असे दिसत नाही, शक्यतो पुरुषपार्टीचाच विचार केलेला दिसतो. ऐकीव कथा अशीही आहे की व्हेलेंटाईन स्वत: तुरुंगात असतांना जेलरच्या मुलीला थेट काही बोलू शकला नाही, स्वत:च ग्रीटींग लिहिले की तू माझी व्हेलेंटाईन होशील का ? तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली असे म्हणतात. वरील कथानकांना काही आधार नाही, तेव्हा सारांश असा की संपूर्ण साठा उत्तराच्या कहानीत स्त्री पार्टीची कोणतीही कॉन्स्पिरसी कुठे दिसत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा Tue, 02/04/2014 - 19:24
महिलांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे न केल्याबद्दल धन्स! या गोष्टींवरनं हा पुरुषांनी पुरुषांसाठी सुरू केलेला सण आहे असं दिसतंय!
कारण लग्न केल्याने पुरूषांची शक्‍ती आणि बुद्धी कमी होते, असे रोमन सम्राटाला वाटत होते
हे पुन्हा एका पुरुषाचंच मत आहे बरं. हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है! =))

In reply to by पैसा

>>>>>>> पुरुषांनी पुरुषांसाठी सुरू केलेला सण आहे असं दिसतंय! जवळ जवळ सर्वच सण उत्सव पुरुषांनी सुरु केले आहेत, लोक म्हणतात की स्रियानी शेती केली आणि शेतीत काम करता करता गाणी सुचली वगैरे आधुनिक स्री यांनी हा विचार पुढे रेटला आहे. पुरुषांनी पुरुषाच्या आनंदासाठी सुरु केलेला उत्सव म्हणजे व्हेलेंताइन डे ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Tue, 02/04/2014 - 19:41
असे काही वाटत नाही. असे म्हणल्याने, इतर कुठल्या उपसंस्थळावर सभासदत्व मिळेल असे वाटले असेल, तर ते होणे नाही. ;) स्वत:च ग्रीटींग लिहिले की तू माझी व्हेलेंटाईन होशील का ? तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली असे म्हणतात. बरोब्बर! म्हणजे यात व्हॅलेंटाईनकडून कुठलिही कमिटमेंट दिसत नाही की भेटवस्तू दिसत नाहीत. मग त्या प्रथा का तयार झाल्या? म्हणून म्हणतो की तमाम दुकानदार आणि स्त्री पार्टीने मिळून केलेला हा कट आहे.

In reply to by विकास

यशोधरा Tue, 02/04/2014 - 20:49
व्हॅलेंटाईनकडून कुठलिही कमिटमेंट दिसत नाही > पुर्शच तो! कमिटमेंटफोबिया नस्णार का त्याला? म्हंजे अस्णार असे त्या प्रश्नाचे उत्तर अहे असे नम्रपणे नमूद करु इच्छिते! :D

वडापाव Mon, 02/03/2014 - 11:57
विडंबनच समजू की थोडं शिरीअशली घेऊ या संभ्रमात. जे काय आहे ते आवडेश. :) वैयक्तिक पातळीवर बोलायचं तर हा व्हॅलेंटाईन्स डे कधीच आवडला नाही. नेमक्या ह्याच दिवशी मला टायफॉईड झाला होता. त्यामुळे माझी व्हॅलेंटाईन्स डेशी कट्टर दुश्मनी आहे. अवांतर : या व्हॅलेंटाईन्स डे निमित्त ब-याच मुलींना 'आज/उद्या मुलींचा आवडता/माझा आवडता प्रेम-दिवस आहे' या वाक्याचं शब्दांचे अनुक्रम न बदलता जसंच्या तसं इंग्रजीत भाषांतर करायला सांगायचो आणि त्यांनी भोळसटपणे तसं भाषांतर केल्यावर, आपण काय म्हटलं हे कळेपर्यंत त्यांना पुन्हा पुन्हा म्हणायला सांगायचो. त्यांची पेटल्याचं त्यांच्या चेह-यावर दिसून आलं की तिथून हसत हसत धूम ठोकायची. जवळची मैत्रीण असली तर आनंदाने मार खायचा.

In reply to by वडापाव

माहितगार Mon, 02/03/2014 - 13:49
वैयक्तिक पातळीवर बोलायचं तर हा व्हॅलेंटाईन्स डे कधीच आवडला नाही. नेमक्या ह्याच दिवशी मला टायफॉईड झाला होता. त्यामुळे माझी व्हॅलेंटाईन्स डेशी कट्टर दुश्मनी आहे.
टायफॉईड झाला होता. का टॉयफॅड झाला होता ? (ह. घ्या) टॉयफॅड वाढला तर लई. छळ या गटात मोडू शकतो हे (ल. घ्या= ल़क्षात घ्या) . अवांतर: ह्या लई छळास वैतागून या सणाला विरोध होत असेल तर ठिक पण या लई छळातल डोकं भारतीय असत तेव्हा सण विदेशी असण्याशी संबंध नसावा. हा सण नसता तरी भारतीय (पुरषी) डोकी इतर वेळीही वाह्यातलीच असती नाही का ? आमचा हा प्रतिसाद वगळण्यास मिपा संपादकांना अंमळ संमती आहे.

In reply to by वडापाव

विकास Mon, 02/03/2014 - 17:47
शिरिअशली घेऊ नका. विडंबन वाटले नाही तर टाईमपास समजा! :) शिरिअसली लिहायचेच असते तर ते व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने होणार्‍या मार्केटींगबद्दल लिहीले असते. भारतात, ते देखील शहरांमधे किती होते माहीत नाही पण किमान अमेरीकेत त्याचा किती अतिरेक होतो हे पाहीले तर जे हा सण स्वतःचाच समजतात त्यांचा पण त्रागा होताना पाहीला आहे. पण तो वेगळा मुद्दा आहे.

सुहास.. Mon, 02/03/2014 - 12:14
हा हा हा हा अवांतर : ते विलेक्षण मॅनिया मधुन बाहेर आल्याबद्दल श्री केजरीवालांचे पत्र आले असेलच ;)

कवितानागेश Mon, 02/03/2014 - 13:08
इथे यात मानव, त्यातही "पुरूषमाणूस" हा देखील निसर्गाचा घटक असल्याचे विशेष करून लक्षात ठेवलेले आहे. > हा मुद्दा फार महत्वाचा आहे. त्यावर चर्चा होउ दे. :P

In reply to by कवितानागेश

विकास Mon, 02/03/2014 - 17:49
हा मुद्दा फार महत्वाचा आहे. त्यावर चर्चा होउ दे. बघा नं! या दिवसाचा अघोषित victim असूनही निसर्गाचा हाच घटक हिरीरिने या दिनाच्या बाजून बोलत बसलाय! जगबुडी का काय म्हणतात ते अजून वेगळे काय असणार! :(

वेल्लाभट Mon, 02/03/2014 - 15:16
फिरून फिरून चॉकलेट्स चा उल्लेख केलात त्यामुळे कळलं नाही की व्हॅलेंटाईन - प्रेम - व्यक्त करणं - वृद्धिंगत करणं... असा विचार जातोय की व्हॅलेंटाईन - चॉकलेट्स - वजन - समाज असा विचार जातोय. बाकी मुद्द्यांवर प्रतिक्रीया सविस्तर देईन म्हणतो...

>>>>केवळ सभोवतालच्या हरीत निसर्गालाच त्रास सहन करावा लागतो >>> हो त्यांना (म्हणजे प्रेमीयुगलांना)सांगायलाच हवं की झाडावर प्रेम करा झाडाखाली नको.

In reply to by प्रमोद देर्देकर

थॉर माणूस Mon, 02/03/2014 - 17:51
>>>त्यांना (म्हणजे प्रेमीयुगलांना)सांगायलाच हवं की झाडावर प्रेम करा झाडाखाली नको. सगळ्या झाडांच्या फांद्या मजबूत नसतात आणि सगळी प्रेमीयुगले नाजुकसाजुक नसतात. त्यामुळे झाडे वाचवायची असतील तर प्रेम हे झाडाखालीच ठीक आहे. ;)

कंजूस Mon, 02/03/2014 - 17:38
आमच्या डोंबिवलीतल्या गरीबांच्या आंबोलीत अर्थात भोपरच्या टेकडीवरची पाटी 'येथे प्रेमी युगुलांस चाळे करताना दिसल्यास पोकल बांबूचे फटके पडतील .' आणि टिळकनगरांतील बाकड्या बाकड़यावर 'येथे प्रेमी युगुलांस बसण्यास मनाई आहे ' मात्र नववर्षाच्या सकाळी तरुणांनी फडकेरोड फुलुन जातो .त्याची कॉपि ठाणे ,पुणे ,मुंबई येथे झाली आहे . पाहा दिला का नाही पर्याय !