Skip to main content

गणपतीला जानवे कोणी घातले ?

लेखक शरद यांनी गुरुवार, 14/03/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीला जानवे कोणी घातले ? आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू. महाभारतातील गोष्ट आहे. एका राजा;ला वाटले की आपण यज्ञ करतो, इतरही करतात. मग आपले वैशिष्ट्य ते काय ? आपला यज्ञ इतरांहून वेगळा, एकमेवाद्वितीय, पाहिजे. त्याने शंकराची तपश्चर्या केली व तो प्रसन्न झाल्यावर त्याच्याकडे वर मागितला कीं "माझ्या यज्ञातील अध्वर्यु तू हो." शंकर म्हणाला " नाही बाबा, तो माझा अधिकारच नाही. ते जमणार नाही, पण माझा अंश असलेला दुर्वास ते काम करेल." लक्षात घ्या, शंकर सांगत आहेत, "देवांना हा अधिकारच नाही". मनुष्य, त्रैवर्णिक समाजच, मुंज, यज्ञ आदि करू शकतात. मुंजच नाही तर जानवे कुठले ? ही गोष्ट फार पुरातन झाली. इतर देवांकडे बघू. विष्णु, शंकर, विठ्ठल, तिरुपती ब्रह्मदेव, यांची चित्रे, मूर्ती पहा. जानवे नाही. मला सोळाव्या शतकांपूर्वीच्या कुठल्याही शिल्पांत, चित्रांत आढळले नाही. राम, कृष्ण हे देव, पण मानवी अवतार, त्यांना अधिकार आहे, पण तेथेही नन्नाच. अपवाद फक्त परशुरामाचा. व दत्ताचा. दोघेही ऋषीपुत्र. जानवे आढळते. तरीही कुणाला तीन-चारशे वर्षांपूर्वीची एकमुखी दत्ताची मुर्ती वा चित्र माहीत असेल तर त्यात जानवे आढळते का ते पाहून अवष्य कळवावे. मी पाहिलेल्या तीनशे वर्षांपूर्वीच्या गणपतीच्या, चित्रात, शिल्पात जानवे दिसत नाही. फार काय हल्लीच्या काळातील दक्षिणेकडील धातूशिल्पातही जानवे दिसत नाही. कोणी बन्गलुरु-चेन्नायीवासी जास्त माहिती देऊं शकेल काय? शरद .

वाचने 71587
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

In reply to by अर्धवटराव

वल्लीदादा एकेका स्वतंत्र शिल्पाकॄतीचे रसग्रहणाची सुरुवात महाबलीपुरमच्या या "गंगावतरणा" नेच कर. इतक्या आकृती आहेत त्यात आणि प्रत्येक आकृती अभ्यासाचा विषय आहे.

In reply to by अभ्या..

आता या लेखमालेची वाट बघणं आलं. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

चामुंडा ही सप्तमातृकांमधली एक देवता. या देवतांचे आर्यीकरण होतांना यातल्या वाराही, ऐंद्री, वामनी(ब्राह्मणी), नारसिंही इत्यादी देवता मूळच्या वैदिक अंशाच्या राहिल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या पूर्णपणे त्यांच्या अनार्य रूपांतच स्थापिल्या गेल्या. अस्थीपंजर, गळ्यातला विंचू, नरमुंडमाला, आणि प्रेतावर उभी असलेली चामुंडा ही सगळी पूर्वीची अनार्य प्रतिके. चामुंडेचेच अधिक सोज्ज्वळ प्रतिक म्हणाजे काली असे मला वाटते. चामुंडा सप्तमातृकांबरोबरच शाक्तउपासनेत पण उचलली गेली ती तिच्या भयप्रद स्वरूपामुळेच बहुधा. त्यामुळेच चामुंडेची शिल्पे सप्तमातृकापटाव्यतिरिक्त इतर ठिकाणीही स्वतंत्रपणे कोरलेली आढळतात (मुख्यतः प्राचीन शिवमंदिरांत तर हमखास दिसतातच)