Skip to main content

आधारकार्डाचा आधार सर्वांपर्यंत पोहोचलाय?

लेखक अनन्न्या यांनी गुरुवार, 07/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने आधार कार्ड सर्वच महत्त्वाच्या गोष्टींसाठी अनिवार्य केले आहे. शाळेच्या प्रवेशापासून ते गॅस कनेक्शन पर्यंत प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड अत्यावश्यक आहे. परंतु ते देशाच्या सर्व भागात उपलब्ध झाले आहे का? शहरी भागात उपलब्ध असेलही परंतु अनेक खेडेगावात अजूनही आधार कार्ड उपलब्ध नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी जेथे आधार कार्ड दिले जाते तिथेही योग्य सुविधा नाहीत. संपूर्ण दिवस घालवून नंबर लागतो. बरं, एवढा वेळ घालवून सर्व खटाटोप केला तर ते आपल्या पर्यंत वेळेत पोहोचते का? माझे आधारकार्ड मिळायला दीड वर्ष लागले. अर्थात ते मिळाले हे ही नसे थोडके!! गॅस एजन्सीत मी ते वेळेवर देऊ शकले नाही. बय्राच शहरांतून हा गोंधळ आहे. घरातील सर्व सदस्यानी एकाचवेळी अर्ज करूनही काही जणांची कार्ड मिळाली आहेत तर काहींची अजूनही आलेली नाहीत. बाकी शहरांमध्ये काय स्थिती आहे? ही योजना सुध्दा सरकारचे खायचे कुरण आहे असेच समजायचे का? शाळा प्रवेशासाठी आधारकार्डाची सक्ती नाही असे सरकारने घोषित केले आहे. परंतु शाळांपर्यंत हे पोहोचलेले नाही. सर्व मह्त्त्वाच्या शासकीय कामकाजात आधारकार्ड ग्राह्य धरले जाईल की हे सरकार उलथले की संपले सारे? हा विषय येथे लिहिण्याचे कारण माझ्या माहितीतील अनेकांना आधारकार्ड नसल्याचा चांगलाच फट्का बसला आहे. मि.पा.चे सदस्य अनेक भागांचे प्रतिनिधीत्व करतात, त्या भागांतील परिस्थिती जाणून घ्यायला आवडेल.

वाचने 10086
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

हे आधारकार्ड लै वैंतागवाडी काम हाय ! हल्लीच मी आणि घरच्या मंडळींनी सुद्धा याची नोंदणी केली. या सर्वात त्रास दायक प्रकार म्हणजे बोटाचे ठसे स्कॅन करणे... माझ्या मातोश्रींचे आणि माझ्या बायडीचे ठसे ओळखण्यासाठी स्कॅनर ने नकार दिला,तिथले कर्मचारी सांगायचे हाताला व्हॅसलिन चोळुन घ्या...सध्या थंडीचे दिवस आहेत ! अजुनही बरेच तारे तोडले ते इथे सांगत बसत नाही.माझ्या आणि माझ्या तिर्थरुपांवर हे स्कॅनिंग मशिन उदार झाले आणि चक्क एकाच झटक्यात बोटांचे ठसे त्याला कसे काय समजले ते त्या स्कॅनिंग मशिनलाच ठावुक ! ४-५ चक्कर टाकल्यावर मातोश्री आणि बायडीच्या हातांचे ठसे त्यांच्या मशिनला समजले आणि गंगेत घोडे न्हाले. या आधारकार्डा बद्धल बर्‍याच तक्रारी आहेत म्हणे,अशी कार्ड सुद्धा वाटली आहेत ज्यात नाव एकाचे अन् फोटो दुसर्‍याचा,किंवा पत्ता वेगळा ! हे कार्ड आता पासपोर्टसाठी अर्ज करताना सुद्धा पुरावा म्हणुन चालणार आहे ! सगळा आनंद आहे...

१० महिने झाले सगळे सोपस्कार करुन. कोणाचचं कार्ड अजुन आलं नाही. ज्या केंद्रात हे सोपस्कार पुर्ण केले ते केव्हाच बंद झालयं.
ही योजना सुध्दा सरकारचे खायचे कुरण आहे असेच समजायचे का?
:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D हा हा...अजुन एक म्हणायचं आहे का तुम्हाला?

हो..बर्‍याच सरकारी कामात आधार compulsory करणार आहेत म्हणे.. बनवुन घ्यावं लागेल.. कार्डात RFID असतं तर बर झालं असतं.. नाहीतर काळाबाजार होईलच.. यसवायजी. (x टिमकी- maaz paN baarasM zaalM)

ज्या कुणाची या प्रकल्पाच्या सर्वोच्चपदी निवड झाली. तो माणूस आपल्या कामाशी एकनिष्ठ नाही हे दिसून आले आहे.

अहो दोन वेळा कुठे कुठे जाऊन ठशे देउन आलोय. तरी पण नाय आलं. आता माय बाप सरकारवर केस टाकायचा विचार हय, आता नाय आलं तर.

आंतर: कोपि हेतू ह्या ओळखपत्र योजनेचा मुख्य फायदा सध्याच्या सरकारला होणार आहे. गरिबी रेषेखाली असलेल्या प्रत्येक नागरीकाला आधार कार्ड मिळाल्यावर बँकेत खाते उघडता येईल. त्याच्या खात्यात एक ठराविक रक्कम दर महिन्याला सरकारतर्फे भरली जाईल. त्यामुळे गरीब आणि बहुधा अशिक्षित मतदारांना ही मायबाप सरकारची मेहेरबानी वाटेल आणि म्हणून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत सरकारला फायदा होईल या कल्पनेने हि योजना घाई घाईने राबवण्याच प्रयत्न आहे. काही नागरिकांकडून आयकर व इतर कर गोळा करून जमवलेल्या पैशातून या पद्धतीने इतर नागरिकांना पैसे देण्यासाठी हि योजना आहे. प्रत्येक नागरीकाजवळ ओळखपत्र असणे हि चांगली गोष्ट आहे, परंतु या योजनेचा समाजातील खास वर्गामध्ये, रोकड पैसे वाटण्या साठी उपयोग करणे हे संविधानाच्या दृष्टीने अवैध ठरेल असे वाटते.याबाबतीची शहा निशा करण्यासाठी ngo संस्थांनी सुप्रीम कोर्टात जावयास हवे. अनुदानाची रक्कम काला बरोबर वाढतच जाइल. स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन देण्याची योजना सध्या राबवली जात आहे. या योजनेत अनुदान मिळणार्या सैनिकांची संख्या गेल्या ६५ वर्षात कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चालली आहे हे आश्चर्यजनक आहे. आधार कार्डामुळे फायदा होणार्यांची संख्या अशीच वाढत जाइल आणि ही योजना बंद करणे कोणत्याही लोकशाही सरकारला शक्य होणार नाही. http://en.wikipedia.org/wiki/Unique_Identification_Authority_of_India#S…

In reply to by रमेश आठवले

अनुदान मिळणार्या सैनिकांची संख्या गेल्या ६५ वर्षात कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चालली आहे
हे बाकी खरे आहे .. आमच्या गावात एक महाभाग आहेत.. स्वातंन्त्र्य्पूर्व काळात त्यांच्या मातोश्री तुरुंगात असताना हे पोटात होतें म्हणे ! सरकारने त्यांनाही पेन्शन आणि सवलती देऊ केल्या आहेत !

माझी स्वाक्षरी आधारशीच संबंधित आहे. "Aadhar" is like dropping a car by helicopter in a village where there is no road and hope every villager can reach wherever they may want to go.

हम्म. फायदेतोटे माहिती नाहीत, कार्ड मात्र काढलेय. मिरजेत केल्याने लै गर्दी नव्हती, लगेच झाले काम. मी अन घरच्या सर्वांचे लगेच झाले.

पहिल्यांदा जेंव्हा नोंदणी सुरू झाली तेंव्हा दोन तीन वेळा त्या केंद्रावर जाऊन गर्दी पाहून परत आलो. गर्दी कमी होण्याची वाट पहात असतांना ते केंद्र बंद झाले. आता नव्याने ती केंद्रे उघडल्यानंतर दोन केंद्रांमध्ये मिळून चार वेळा जाऊन आलो. तिथला जनसागर पाहता लाइनीत उभे राहण्याची हिम्मत झाली नाही.

एकंदर जेव्हा ही योजना जाहीर झाली, तिचा मुख्य वगैरे जाहीर झाला तेव्हाच हे असलं काहीतरी होणार हे आम्ही भाकित केलं होत.

आधार कार्ड हे अमेरिकेच्या सोशल सिक्युरिटी नुंबर वर आधारित आहे , जर योजना व्यास्थित पूर्ण झाली तर खूप फायदे आहेत. जसे कि एखाद्याने कोणताही गुन्हा केला, वाहनाची नोंदणी केली तर ती माहिती आधार क्रमाकाशी जोडली जायील आणि सर्व राज्यातील सरकारी यंत्रणांना ती माहिती उपलब्ध होयील, आणखी बरेच काही. म्हणजे एखादा माणूस कोणताही गुन्हा करून बाकीच्या राज्यात पळून जावून मजेत राहू शकणार नाही, कारण त्याला सगळ्या ठिकाणी आधार क्रमांक वापरावा लागेल.किव्हा चोरी झालेल्या गाडीच्या क्रमांकावरून आधार क्रमांक मिळेल आणि गाडीचा मालक हि. बाकी मला आधार कार्ड २-३ महिन्यात मिळाले. एकदा जाऊन नोंदणी केली ती पण एका फेरीत आणि २-३ महिन्यात कार्ड घरी :-)

मी आणि माझ्या कुटुंबियांनी "सेंट्रल बैंक" मध्ये डिंसे-११ ला आधार नोंदणी केली आणि लगेच फेब्रु-१२ मध्ये सर्वांची कार्ड्स मिळाले. पण कुठलेही जुनी कागदपत्रे म्ह्णजे पासपोर्ट, रेशन कार्ड, इ. न पाहता नोंदणी करुन घेतल्यामुळे मला अशी वारंवार मनात शंका येते कि ह्या योजनेमध्ये कितीतरी बांगलादेशी आणि पाकिस्तानी जनतेने आपले ऊखळ पांढरे करुन घेतले असणारं? कठिण आहे सगळे. :(

भारत गॅसकडून आलेल्या संदेशाप्रमाणे यापुढे गॅस सिलेंडर ९००+ किंमतीला मिळेल आणि ४१८ रुपये सबसिडी आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक रजिस्टर केल्यास थेट खात्यात जमा होईल. अर्थात आपल्या मायबाप सरकारला नेहमीच पैशांची चणचण असते त्यामुळे ही सबसिडी कंपन्यांकडून खात्यात जमा होणार असेल तर ठीक. सरकारकडून येणार असेल तर त्या रकमेवर आताच पाणी सोडले आहे. इन्कम टेक्स रिफंड जसे केव्हाचे केव्हा तरी मिळतात आणि बरेचदा मिळत नाहीत त्यातला प्रकार होण्याची शक्यता बरीच वाटते. गरीबांना पेन्शन वगैरे आधार कार्डावरून देणे ठीक आहे पण हा सबसिडीचा परतावा कशासाठी ते स्पष्ट होत नाही. परतावा मिळण्यात बर्‍याच अडचणी असतात. आपण दिलेले बँक खाते क्रमांक तिकडे नोंद करताना चुकीचे नोंद होतात वगैरे वगैरे गृहीत धरून चालत आहे. परिणामी निदान गॅस तरी आता सबसिडीने मिळणार नाही असे समजून इंडक्शन स्टोव्हवर वर बराचसा स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. आधार कार्डे आमची तरी व्यवस्थित एका महिन्यात मिळाली. त्यावरचे फोटो नीट दिसत नाहीत पण तरी नावे पत्ते बरोबर आहेत. मुलगा अज्ञान असल्याने त्याचे आधार कार्ड सुरुवातीला केले नव्हते, कारण ते दर ३ वर्षांनी रिन्यु करावे लागेल असे सांगितले होते. पण बहुतेक ठिकाणी आधार कार्ड आवश्यक होईल असे लक्षात येताच त्याचेही करून घेतले. आमच्या इथे फोंडा मामलेदार कचेरीत एक आधार कार्डासाठी कायम केंद्र उघडले आहे. त्यामुळे फेर्‍या माराव्या लागल्या नाहीत. गोव्यातले बहुतेक लोक सुशिक्षित आणि जागरुक असल्यामुळे आधार कार्डाचे काम बरेच शिस्तीत आणि नीटपणे पार पडल्याचे दिसते. अजून कोणाकडून तक्रारी कानावर आलेल्या नाहीत. भाचीच्या शाळेत आधार कार्ड मागितल्यामुळे (सांगली इथे) ती आता फेर्‍या मारत आहे. तिथे ठराविक दिवशी ठराविक फॉर्म्स येतात त्यामुळे शाळा प्रवेशासारख्या लायनी लावाव्या लागतील असे दिसते आहे. बँकांनी मात्र खाते उघडायला किंवा आहेत त्या खात्याचे नवे पासबुक द्यायला आधार कार्ड आवश्यक केले आहे. तुम्ही दिलेले आधार कार्ड सिस्टीममधे अपडेट लगेच केले जाईल याची काही गॅरेंटी मात्र नाही. कारण ही असली दुष्काळी कामे बँकांच्या प्रायॉरिटी लिस्टात अगदी शेवटच्या नंबरांवर असतात. मुंबईतल्या काही खाजगी बँकांनी आधार कार्डाचे नंबर घेऊन लोकांना खाते उघडण्यासाठी एसेमेस पाठवले असे ऐकले. आमची बँक सरकारी असल्याने हेड ऑफिसने फक्त एक आदेश पाठवला होता की जवळपासच्या सर्व्हिस एरियात जाऊन ज्या लोकांनी आधार कार्डे केली आहेत त्यांची बँकेत खाती आहेत का याची चौकशी करा आणि नसल्यास नवी खाती उघडून द्या. आधार कार्डासाठी दिलेली माहिती (आधार कार्ड नंबरासकट) अशी खाजगी बँकांकडे कशी पोचली याचा अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आधार कार्डाच्या पोर्टल वर ही माहिती कोणालाही दिली जाणार नाही असं स्वच्छ म्हटलं आहे.

बरं झालं आठवण करून दिली . मला देखिल आधार कार्ड घ्यायचे आहे.. व्यवस्थित इंप्लिमेंट केली तर अतिशय उपयुक्त योजना आहे ही.

पैसाताई म्हणतात त्याप्रमाणे बँकेत मी दोन वेळा आधारची झेरॉक्स देऊन आले. आता तरी ते अपडेट केले का, माहित नाही!! सविस्तर प्रतिसादासाठी आभार!!

७ महिने झालेत आधारासाठी रांगेत उभे राहुन... बहुतेक त्यासाठी पण ९ महिने वाट बघावी लागेल..... तोपर्यंत विनाआधार पूर्ण उद्धार....

पन आमच्यासारख्या गरीबानं काय करायचं? मायबाप सरकारनं कामासाठी जिथं धाडलाय तिथं "आधार" नाही अजून, आणि गावी गेल्यावर रांगेत उभं राहून आधार घ्यायला वेळ नाहीय जवळ.. म्हंजी आम्ही निराधारच की, सध्यातरी..

आर्र्र्र्र्र्र! हे लक्षातच आलं नव्हतं. बरेच दिवसांपूर्वी वाचलं होतं की या योजनेसाठी नंदन निलेकणींनी काम केले आहे वगैरे, नीटसे माहित नाही. असो, ज्यांना कार्ड मिळाले नाहिये त्यांचे काम लवकर, अचूक होऊ दे असे म्हणते, काहीजणांच्या कार्डात चुका केल्याबद्दल सरकारला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे कार्ड आपल्या जवळच्या केंद्रात करवून घेणे सक्तीचे नसेल तर कमी गर्दीवाल्या ठिकाणी जावे म्हण्जे वेळ वाचेल.

च्यायला माणूस एक आणि आय.डी. चार अशी अवस्था झालेय राव.(मिपाचा आयडी नाय, नुस्ताच आयडी).रेशनकार्ड, पासपोर्ट, पॅन नं., इलेक्शन कार्ड सगळं असून अजून एक आयडी हवाय कशाला? जर अमेरिकेच्या सोशल सेक्युरिटी नंबरसारखं असेल तर पॅन पण चालेल की? इतकं सगळं असून आयत्यावेळी यातलं काहीही चालत नाहीच. मधे एकदा कुठेतरी असाच आयडी मागितला.. पासपोर्ट चालणार नाही म्हणाला. सरळ ऑफिसच्या जीमचं आयडीकार्ड दाखवलं तर चाललं! सोशल सेक्युरिटी नंबरवरनं अमेरिकेत आल्यानंतर पैल्यांदा त्या ऑफिसला गेलेलो ते आठवलं. थोडीबहुत गर्दी होती पण इथे २०-२५ माणंसांना 'गर्दी' म्हणतात. माझा नंबर आला तेव्हा बारीवर गेलो. तिकडच्या काकूला सगळी कागदपत्रं दिली. मग तिने रीतसर अ‍ॅक्नॉलेजमेंट वगैरे दिली, आणि मी "परत हॉटेलवर कसा जाणार आहे? टॅक्सी मागवू का?" वगैरे विचारलं!! मला तिथे अगदी भडभडून आलं हो!

In reply to by मराठे

पासपोर्ट चालणार नाही म्हणाला. सरळ ऑफिसच्या जीमचं आयडीकार्ड दाखवलं तर चाललं! हा हा हा. कमाल आहे. इथे २०-२५ माणंसांना 'गर्दी' म्हणतात खिक् काही वर्षांपूर्वी मुलाच्या कागदपत्रांसाठी एका सर्कारी हापिसात गेल्यावर मोजून पंध्रा लोक रांगेत असतील, तेही नंबर घेऊन खुर्च्यावर बसलेले. दहाव्या मिंटाला आमचा क्र. आला तर तिथल्या काकून माफी मागितली. गर्दी असल्याने वाट पहावी लागली म्हणून! हसू आले हे नक्की. :)

In reply to by मराठे

सोशल सेक्युरिटी नंबरवरनं अमेरिकेत आल्यानंतर पैल्यांदा त्या ऑफिसला गेलेलो ते आठवलं. थोडीबहुत गर्दी होती पण इथे २०-२५ माणंसांना 'गर्दी' म्हणतात. माझा नंबर आला तेव्हा बारीवर गेलो. तिकडच्या काकूला सगळी कागदपत्रं दिली. मग तिने रीतसर अ‍ॅक्नॉलेजमेंट वगैरे दिली, आणि मी "परत हॉटेलवर कसा जाणार आहे? टॅक्सी मागवू का?" वगैरे विचारलं!! मला तिथे अगदी भडभडून आलं हो!
खरं आहे. पण सौजन्याच्या दृष्टीने हे देश खूप पुढे असले तरीही दुसर्‍या देशातली लोकं दिसली की त्यांचं आपल्यादेशाबद्दल चांगलं मत व्हावं याबद्दल ती जरा जास्तच जागरुक असतात. मागे सकाळमध्ये की इथेच कुणाच्यातरी प्रतिक्रियेत वाचलं होतं. अमेरिकेतून आलेल्या एका सहकार्‍याला बरोबर खास पुणेरीरिक्षातून सफर करायला निघालेला एकजण रिक्षावाल्यांच्या उद्धटपणाला रागावून म्हणाला की, "अरे, ही लोकं परत तिकडे जाउन तुमच्याबद्द्ल काय सांगतील?" तर तो शांत पणे तंबाखू थुंकत म्हणाला की, "सांगुदेकी आम्हाला थोडंच तिकडे जायचय?' :) बाकी आम्हीपण अजून निराधारच आहोत. जो पर्यंत ते काढल्याशिवाय पर्यायच नाही तो पर्यंत काढणार नाही.

In reply to by दादा कोंडके

जो पर्यंत ते काढल्याशिवाय पर्यायच नाही तो पर्यंत काढणार नाही.
;) sorry पण आपल्या आयडीचा परिणाम.. द्वयार्थ मनात आल्यावाचून राहिला नाही. :)

In reply to by दादा कोंडके

>>> रेशनकार्ड, पासपोर्ट, पॅन नं., इलेक्शन कार्ड सगळं असून अजून एक आयडी हवाय कशाला? खरं आहे. मी तर म्हणतो की सगळ्यांचा मोबाईल नंबरच हा आयडी नंबर ठेवा ना? काय करायचे ते सांगतो: १) आताचा आधार क्रमांक १२ आकडी आहे. त्याचे कॉम्बीनेशन 8916100448256 इतके होते. वाटल्यास आणखी वाढवून तो क्रमांक १६ आकडी करावा. २) भारतातील सगळे मोबाईल क्रमांक १२ किंवा १६ आकडी करावेत. (तसेही मोबाईल क्रमांक कोणी लक्षात ठेवत नाही.) ३) जो व्यक्ती जिवंत आहे किंवा आता जन्माला आला त्याला कंपल्सरी मोबाईल नंबर द्यावा.(मग भले तो मोबाईल वापरो न वापरो.) ४) तोच मोबाईल नंबर मग आधार कार्ड किंवा आयडी, सिक्यूरीटी, पॅन आदींसाठी वापरावा. ५) मोबाईल क्रमांकावर जे फालतू कॉल येतील त्यांना गुन्हा म्हणून डिक्लेअर करावे. ठिक आहे मोबाईल नंबर नसेल द्यायचा तर दुसरा असाही विचार येतो: सगळ्यांना IPV6 चे क्रमांक देवून टाका. कटकट नाही. तोच आयपी मग त्याच्या सिस्टीमला/ घराला, आयडी ला द्या. IPv6 addresses – how many is that in numbers? The very large IPv6 address space supports a total of 2128 (about 3.4×1038) addresses – or approximately 5×1028 (roughly 295) addresses for each of the roughly 6.5 billion (6.5×109) people alive today. In a different perspective, this is 252 addresses for every observable star in the known universe. साला हे एका आयटी कंपनीच्या डायरेक्टरला समजावून द्यावं लागतंय हा विनोद आहे.

भारतात परत जायचे झाले तर काय काय डॉक्युमेंट्स ची जुळवाजुळव करावी लागणार आहे? :( बाप रे इथे अर्ध आयुष्य या देशातल्या डॉक्युमेंट्स जुळवता गेलं उर्वरीत तिथले जुळवण्यात जायचे :(

माझ्या कुटुंबातील सर्वांचे आधाकार्ड मिळाले. टप्प्या-टप्प्याने मिळाले तो भाग वेगळा. आधारकार्डाचा अजून उपयोग झाल्याचे दिसले नाही. मात्र, महाराष्ट्र शासनाने कर्मचार्‍यांसाठी तातडीने ऑनलाईन एक माहिती भरुन घ्यायची ठरवली होती त्यात नाव,गाव,पत्ता, कुठे काम करता, सॅलरी किती, कामाचे तास, वगैरे असे काही तरी होती. ऑनलाइन माहितीत योग्य पर्याय नसल्यामुळे माहिती भरुन देण्याची योजना पुढे बारगळली. आधारकार्ड भविष्यात उपयोगाचे असेलच. आधारकार्ड ज्यांना मिळाले नसतील त्यांनी आपल्या आधार कार्डाचे स्टेट्स इथे तपासावे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही दिलेल्या दुव्या वर जावून तपासून बघितले; मला आधार कार्ड मिळाले असुनसुद्धा तिथे "EID Provid by you is still not abailable with us. please check back after few days." असे दाखवत आहे मला कार्ड मिळून ३-४ महिने तरीझालेत , बहुतेक तिथे माहिती update होत नसावी, कुणाली पडली आहे जनतेची ........

मला आधार कार्ड ५ महिन्यांत मिळाले. सप्टेंबर २०११ ला नोंदणी केली होती. फेब्रु २०१२ ला आधार कार्ड घरी आले.

यावेळी गॅस सिलेंडरची ऑर्डर पाठवल्यावर एसएमएस आला की तुमचा आधार क्र. पाठवा. कारण आता सिलेंडरची संपूर्ण किंमत चुकवावी लागेल व नंतर सरकार सबसिडीची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करेल. माझा आधार क्र अस्तित्वात नसल्याने सबसिडीची रक्कम मिळणार नाही. परंतु ज्या लोकांचा आधार क्र प्रलंबित आहे त्यांना भविष्यात सरकार मागील काळातील सबसिडीची भरपाई देईल अशी आशा वाटते.

मित्रांनो, ज्यांना आधार कार्ड मिळाले आहे त्यांनी कार्डावर जन्मतारीख नोंदलेली आहे का याची तपासणी केली का? सरकारी यंत्रणा प्रचंड प्रमाणात वापरून व करोडो रुपयांचा खर्च करून मग मिळाले काय? जर आधार कार्ड जन्म तारीखेचा दाखला म्हणून वापरता येत नसेल तर ते कार्ड निराधार म्हणावे लागेल? पोच पावतीत जन्म दिनांक असतो. पण नंतर मिळालेल्या कार्डावर फक्त जन्म वर्ष आहे. पुर्ण जन्मदिनांक नाही! का? माहित नाही!

ज्यांना ज्यांना आधारकार्ड मिळाले नाही त्या कुंटुबातील मतदार मतदान करणार नाही फक्त येवढा निरोप राजकरण्यांपर्यत पोहचवा म्हणजे बघा एका महिना तुम्हाला तुमच आधारकार्ड घरपोच मिळते की नाही.

चार जणांची नोंदणी करुन ३ जणांचं मिळालं, आता काय करु ?

In reply to by ५० फक्त

काय नका करु गप्प बसा,डोळे मिटा,ध्यान धरा,मनातल्या मनात बाबा अंतर्यामींचा धावा करा. सगळ कस ठीक होइल

माझ्या एका मित्राने आणि त्याच्या पत्नीने आधार कार्डासाठी अर्ज केला होता. त्यांची कार्डे त्यांच्या घरच्या पत्त्यावर पोहोचली तेंवा ते उभयीक विदेशी गेले होते. त्यामुळे ती कार्डे sender कडे परत गेली. त्या मित्राने परत घरी आल्यावर चोकशी केली तर त्याला खालील लिखित उत्तर मिळाले. सरकारने पुन्हा त्याच पत्त्यावर कार्डे पाठविण्या बाबतचे धोरण अजून निश्चित केले नसल्याने आपण वाट बघावी . मित्राने टपाल खर्च देण्याची तयारी पण दर्शविली होती.

सर्वांचे अनुभव पाहता, मोठ्या शहरांत लोड जास्त आणि माणसे कमी असल्याने चित्रविचित्र अनुभव जास्त येताहेत असे दिसतेय. तुलनेने लहान शहरांत प्रॉब्लेम दिसत नाही. हे बदलले पाहिजे. बाकी सुधारणा पाहिजेत हेवेसांनल.

Feb 17, 2013, 05.23am IST म. टा. प्रतिनिधी , पुणे गॅस सिलिंडरच्या सबसिडीपासून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड अत्यावश्यक आहे , असा फतवा केंद्र सरकारची विविध खाती , मंत्रालये जारी करत असतानाच , दुसरीकडे ‘ आधार ’ सक्तीचे नव्हे , तर ऐच्छिक असल्याचा जाहीर खुलासाच ‘ आधार ’ च्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आला आहे. यामुळे ‘ आधार ’ काढणे गरजेचे आहे की नाही , याबाबतच शंका निर्माण झाल्या आहेत. मतदानासाठी आता सरकारी चिठ्ठी http://uidai.gov.in या वेबसाइटवरील उजव्या बाजूला असलेल्या ‘ व्हॉट इज आधार ’ या लिंकवर या कार्डाबद्दल माहिती आहे. त्यात स्वच्छ शब्दांत लिहिले आहे की , ‘ हे कार्ड ऐच्छिकच आहे! ’ प्रत्येक सरकारी अनुदान व कागदपत्रांसाठी ‘ आधार ’ ची सक्ती करणाऱ्या व नागरिकांना लांबलचक रांगेत उभे करणाऱ्या सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे , असा सवाल यामुळे निर्माण झाला आहे. मग ही सक्ती कशाला ? शिष्यवृत्ती सरकारी कल्याणकारी योजना गॅस सिलिंडरवर अनुदान खतांवरील अनुदान सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन

गॅस सिलिंडरवर अनुदान मिळवण्यासाठी आधार कार्ड क्रमांक नोंदविण्याची मुदत १५ मार्चपर्यंत होती, पण काही कारणांमुळे आधार कार्ड क्रमांक डिलरकडे ह्या मुदतीत नोंदवता आला नाही. आता डिलर गॅस सिलिंडरचे बुकिंग करून घेत नाहीये. जर मुदतीनंतर क्रमांक नोंदवायचा असेल, तर काय करावे लागेल?

शेवटीच माझं आधार कार्ड मिळालचं... म्हणजे मिळुन तसे बरेच दिवस होउन गेले पण काल परवाच त्यांचा एसएमएस आला की तुमचे कार्ड पाठवले गेले आहे.;) असो मूळ मुद्दा असा की या आधार कार्ड नावाच्या पातळ कागदावर जन्म तारिख नाही ! जन्म वर्ष आहे पण जन्म तारिख नाही ! मग असल्या कार्डाचा काय घंटा उपयो? (मुळात याला कार्ड का म्हणतात तेच कळाले नाही मला,कारण पातळ कागदी तुकड्याला कार्ड कसे म्हणायचे ? त्या पेक्षा ते पॅन कार्ड जास्त ठीक वाटले होते.) याच बाबत अविनाश प्रभुणे यांनी पाठपुरावा केला...त्या बद्धल अधिक माहिती इथे :- 'आधार'कार्डचे 2 हजार कोटी पाण्यात? जाता जाता :--- हिंदीत एक म्हण आहे म्हणे...गई भैस पानी में ! ;)