Skip to main content

सहकार क्षेत्राविषयी पुनर्विचार करायची वेळ आली आहे का?

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 29/10/2011 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
मा. श्री. धनंजयराव गाडग़ीळ, श्री वैकुंठभाई मेहता आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातुन उद्योग क्षेत्राचा पाय रचला. १९४९साली प्रवरा सहकारी साखर कारखान्याची सुरवात झाली. दुष्काळी भागातील लौकीकार्थानी अशिक्षीत शेतक-याने महाराष्ट्राला नव्हे देशाला वेगळी दिशा दाखवीली. अनेक वर्षे या सहकाराच्यामाध्यमातुन ग्रामीण भागाचा कायापालट व्हायला सुरवात झाली. सहकाराच्या माध्यमातुन जोडव्यवसाय असलेल्या दुधाच्या धंद्याला महेसाणाच्या सहकारी डेअरीने वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवले. तीचा पाठपुरावा सहकाराचा पाया घालणा-या महाराष्ट्राने करून "सफेद क्रांती" करून दुधाचा महापुर आणला. कुक्कुट पालन या जोड धंद्याला बरकत आली आणि तो एक प्रमुख व्यवसाय झाला. अंडी आणि चिकनच्या माध्यमातुन करोडोंची उलाढाल होउ लागली. सहकारी पतपेढ्या आणि कालांतरने सहकारी बॅँका स्थापन होउ लावल्या. या माध्यमातुन अनेक छोट्या उद्योगांना भांडवल मिळायची सोय होउन अनेक व्यवसाय भरभराटीला आले. समाजातील दलित , उपेक्षित , दुर्लक्षित , समाजही या विकासाची फळे चाखू लागला. परिणामी शेतीची सुधारणा , उत्पादनात वाढ , दरडोई उत्पन्नात वाढ , आवश्यक गरजांची पूर्तता , स्वभांडवल निमिर्ती , तसेच रोजगार , शिक्षणाच्या सुविधा निर्माण होऊ शकल्या. परिसराच्या विकासाचे केंद साखर कारखाना ठरला. परिणामी विखे पाटलांच्या सहकार्याने नगर जिल्हा , महाराष्ट्र राज्य व देशातील अनेक भागात सहकारी साखर कारखानदारी उभी राहिली. ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम झाल्याने विकासापासून वंचित राहिलेला हा भाग मोठी प्रगती करण्यात यशस्वी ठरला. देशाच्या सामाजिक , राजकीय , आथिर्क , शैक्षणिक व इतर क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे अनेक सुपुत्र ग्रामीण भागातून निर्माण झाले. पद्मश्री विखे पाटलांच्या कर्तृत्वाने देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली , हे कुणीही नाकारू शकत नाही. सहकार क्षेत्राचे "स्वाहाकार" क्षेत्र झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या. गेले काही वर्षे सहकार क्षेत्राची घसरण चालली आहे. अनेक साखर कारखाने कर्जाच्या ओझ्यामुळे बंद पडले आहेत. त्याना मदत (?) म्हणून मग राज्य शासनाने कर्ज द्यायचे. आणि मग त्याची पुर्तता झाली नाही की लिलावात काढायचे. कर्जाच्या बोज्याखालचे (कर्जाच्या बोज्याखाली का गेले हे अधीक सांगायची गरज नाही) सहकारी साखर कारखाने कमी किमंतीत खाजगी उत्पादकांना विकले गेले. (ही गोष्ट का झाली व कशी झाली याबद्दल तज्ञांनी लिहावे). बाजारत मागणी असून अनेक पोल्ट्र्या बंद पडल्या आहेत. दूधाबद्दल न बोलणे हेच उत्तम. अनेक सहकारी बँकावर प्रशासक नेमले गेले आणि कालांतराने खाजगी बँकात त्यांचे विलीनीकरण झाले. हे सगळे लिहीण्याचे मुळ कारण म्हणजे काल (काही) वर्तमानपत्रात आलेली एक बातमी. बातमी पुढील प्रमाणे- विद्यार्थ्यांच्या खात्याचे बनावट तपशील देत असल्याच्या कारणावरून ब्रिटनच्या इमिग्रेशन विभागाने भारतातील १९४० बँकांची काळी यादी तयार केली आहे. भविष्यात या यादीतील बँकांची स्टेटमेंट ब्रिटनच्या व्हिसा प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याने राज्यातील अनेक प्रतिथयश बँकावरही ब्रिटनची 'व्हिसा पॉवर' कोसळली आहे. (सवीस्तर बातमी येथे वाचा.) या यादीत अनेक नामवंत सहकारी बँकांचा समावेश आहे. यामधे महाराष्ट्रातील आणि विषेशत: पुणे जिल्ह्यातील बँकांचा समावेश आहे. सहकार क्षेत्राला घरघर लागली असताना ही अजून एक बातमी आली. सहकार क्षेत्राला शासन अनेक सवलती देत असूनसुद्धा सध्या बिकट अवस्था आहे. राजकीय नेत्याकडुन या परिस्थीत बदल होणे अशक्य आहे. कारण सहकार क्षेत्राची आर्थीक ताकद वापरुन अनेक नेते मोठे झाले आहेत. या क्षेत्राला असल्या परिस्थीतीतुन बाहेर कोण काढणार? पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटिलांसारखे दृष्टे नेतृत्व आणि मा. श्री. धनंजयराव गाडगीळ व श्री वैकुंठ मेहता यांच्यासारखे मार्गदर्शक मिळणार का? शासन सहकार क्षेत्र सुधारण्यासाठी काय पाउले उचलेल? सहकार क्षेत्र राजकारणमुक्त होउ शकेल काय? सहकाराच्या माध्यमातुन होणारा भ्रष्टाचार बंद कसा होइल?

वाचने 3411
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

उत्तम चर्चा प्रस्ताव. सहकार क्षेत्राला आता घरघर लागलेली आहे. सहकार क्षेत्रात ज्या दिग्गजांनी मोठमोठे साखरकारखाने उभारले त्यांचा उद्देश सफल झालेला होता. ती पिढी आता काळाच्या पडद्याआड गेली. त्यांचे विचार समाजासाठीचे होते. आता त्यांचे तेच साखरकारखाने (दुग्दव्यवसाय व ईतर सहकारी व्यवसाय नंतरचे आहेत.) आता त्याच सहकारधुरीणांच्या नव्या पिढीतल्या नात्यांमध्ये खाजगीरित्या ताब्यात जात आहेत ही मोठी शोकांतीकाच आहे. सहकार हा स्वाहाकाराकडे झुकतो आहे. पुर्वी सहकारी आस्थापनाच्या ज्या मिटींगा व्ह्यायच्या त्यांचा चहापाण्याचा खर्च संचालक मंडळ स्वःताच्या खिशातून द्यायचा असा उल्लेख मी वाचलेला आहे. आताच्या मिटींगा, गाड्या घोड्यांवर होणारा खर्च, संचालक मंडळाची राजेशाही वागणूक, राजकारण, नोकरभरतीतले पैसे आदी अनेक नतद्रष्ट गोष्टी सहकार क्षेत्रात पहायला मिळतात. ज्या दिवशी सहकारी संस्था पुन्हा जुने दिवस आठवतील व त्याप्रमाणे त्यांची वाटचाल होईल तेव्हा पुन्हा महाराष्ट्र सहकार क्षेत्रात आघाडीवर असेल. (पण असे होणे नाही).

In reply to by पाषाणभेद

सहकार क्षेत्राला आता घरघर लागलेली आहे. सहकार क्षेत्रात ज्या दिग्गजांनी मोठमोठे साखरकारखाने उभारले त्यांचा उद्देश सफल झालेला होता. ती पिढी आता काळाच्या पडद्याआड गेली. सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी साखरकारखाने सुरु केले होते त्याचीही राजकारणी लोकांनी वाट लावून टाकली. माझ्या तालूक्यात सहकारी साखर कारखाना भंगारात काढला गेला. कोणी कारखाना चालवायला घेतला की तो बंद कसा पडेल यासाठीचे राजकारण सुरु झाले. एखाद्या कारखान्याने अमुक अमुक भाव दिला की दुस-या कारखान्याने त्यापेक्षा वरचढ भावाची घोषणा करायची. उस पळवा पळवी सुरु व्हायची. कधी शेतक-याचा उस तसाच पडून राहात असायचा. कधी शेतकरीच ऊसाला पेटवून द्यायचा. खरं तर याच्या मुळाशी काय कारणं आहेत हे जाणकारच सांगतील पण मला सहकार क्षेत्राची वाट कोण लावत आहे तर मी केवळ काही स्वार्थी राजकारणी लोकांकडेच बोट दाखवेन. बाकी, प्रतिक्रियातून अधिक साधक-बाधक चर्चा होईलच. -दिलीप बिरुटे

महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवण्याच्या बाबतीत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचे परिश्रम आणि धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहतांचे मार्गदर्शन याला तोड नाही. 'प्रवरा' वरचा एक शोधनिबंध नुकताच हाताखालुन गेला... तेव्हा मला या क्षेत्राची तोंडओळख तरी झाली. विखे पाटलांनी कारखाना स्थापन करताना लोकांच्या घरी जाऊन, समजाऊन सांगुन भांडवल गोळा केले होते.. पण कारखाना उभा राहिना.. लोक पैशांचे काय झाले विचारु लागले.. फार काय काय झेलले त्यांनी.. तेव्हा विखे पाटील मुंबईला वैकुंठभाईंकडे जाऊन कारखान्याची मंजुरी द्या नाहीतर विष खातो म्हणाले.. ( भला १५० पानांचा शोधनिबंध आहे तो.. माझ्याकडे आहे हिंदीत.. कुणाला पाहिजे असेल तर सांगा) शिवाजी सावंतांनी पद्मश्री विखे पाटलांवर 'लढत' नावानं खंड लिहीलेत असं ऐकून आहे.. एरव्ही वैराण अहवालांपेक्षा जास्त काही न छापणार्‍या सहकारी कारखाना क्षेत्राबद्दल एका लेखकानं केलेलं लिखाण वाचायची इच्छा आहे..

In reply to by यकु

अच्छा! वेबदुनियेत एका पुर्णविरामानंतर आणखी एक दिवाळीचा बोनस पुर्णविराम देण्याची पद्धत आहे वाटतं. अन डॉ. साहेब, दिव्य मराठी काही त्यांचा राहीला नाही आता. त्यांनी दिव्य मराठी सोडल्यानंतर खर्‍या अर्थाने तो 'दिव्य' झालाय.

In reply to by पाषाणभेद

यकुच्या पेपरातलं काम या धाग्यात प्रतिसाद टाकायचा होता काय ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरेरे, गलती झाली साहेब. घ्या की तुमीच समजून. काय च्यापानी घ्येनार का?

सहकार क्ष्रेत्राचा राजकारणासाठी वापर होतो याचे मोठे उदाहरण. मुळा प्रवराची बँक खाती सील दोन हजार कोटींहून अधिक रुपयांच्या वीज बिलाच्या थकबाकीने मोडीत निघालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेला केंदीय इन्कम टॅक्स विभागानेही शुक्रवारी झटका दिला. इन्कम टॅक्सच्या थकीत वसुलीसाठी मुळा-प्रवराची बँक खाती गोठविण्याची कारवाई आयकर विभागाने शुक्रवारी केली. यामागे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकारण आडवे आल्याची चर्चा आहे. (ही बातमी सवीस्तर येथे वाचा.)