Skip to main content

कोकणातील पिकनीक स्पॉट हवेत

लेखक टारझन यांनी मंगळवार, 05/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , पुण्यापासुन ३०० ते ३५० किलोमिटर च्या रेंज मधे कोकणातले स्पॉट सुचवा. १ रात्री मुक्काम आणि दोन दिवस अशा प्रकारच्या दुचाकी प्रवासाचे प्रयोजन आहे. पिकनिक च्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट बरोबर शांत आणि मोकळे स्वच्छ समुद्रकिणारे असावेत आणि झक्कास समुद्री जेवण चापता यावं ह्या बरोबर रहाण्याची वगैरे सोय कशी आहे ते सांगावे. डायरेक्ट मोकळ्या हाताने मदत मागतोय असंही नाही. मी उकरुन काढलेली ठिकाणं १. वेळणेश्वर बिच २. अंबोली ३. श्रीवर्धन ४. सिंधुदुर्ग / विजयदुर्ग अगदीच ४०० किमी पर्यंत जाते पण ओक्के .. ह्यांवरही जाणकारांनी प्रकाश टाकल्यास चालेल. माहितीबद्दल आगाऊ धन्यवाद

वाचने 40869
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

टारुशेठ, भटकंती मासिकाचा चालू महिन्याचा अंक 'कोकण पर्यटन' विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला आहे. त्यात बरीच माहिती आहे. शिवाय आयडियल प्रकाशनने कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातील लहानमोठ्या पर्यटनस्थळांची माहिती देणार्‍या पुस्तिका काढल्या आहेत. शांत आणि स्वच्छ बीचसाठी तारकर्ली, देवबाग चांगले. सुंदर सागरी जेवणासाठी मालवण, सावंतवाडी चांगले. शक्यतो भंडारी खानावळे बघा. झणझणीत स्वादिष्ट जेवण मिळेल.

In reply to by योगप्रभू

तारकर्ली सर्वात बेस्ट ऑप्शन होता . परंतु तो जवळपास गोव्याच्या जवळंच जातोय . एवढा लांब नाही .. आणि देवबाग तर कर्नाटकात गेला :) टू फार :(

In reply to by टारझन

कर्नाटकातले देवबाग वेगळे आणि मालवणजवळचे देवबाग वेगळे. कर्नाटकातल्या रेसॉर्ट मधे गावचा फील नाही.थोडेसे शाही आहे. मालवणचे देवबाग छोटेसे टुमदार खेडे आहे.अत्यंत निसर्गरम्य,बेटसदृश.तीन बाजूंना खाडी वगैरे.

वेंगुर्ला आणि सावंतवाडी. सावंतवाडीला गेल्यास कोणत्याही परिस्थीतीत न चुकता, भालेराव खानावळ येथे जावे.. अतिशय जबरदस्त चवदार आणि ताजे समुद्री जेवण मिळेल. तुम्ही माझी आठवण काढाल. भालेराव खानावळ सावंतवाडी एस ती स्टंड पासुन १ किमी अंतरावर आहे.

In reply to by इंटरनेटस्नेही

>>. तुम्ही माझी आठवण काढाल. टार्‍याला कोकणात जाउन तुमची आठवण काढायची वेळ येईल म्हणजे अगदीच ##&##$#

आरे वारे बीच आहे .. गणपतीपुळे कडे जाताना.. नेवरे मार्गे.. रहायची सोय रत्नागिरी .. समुद्री खायला चिक्कार ठिकाण :).. बाकि जवळ्पास बरेच आहे फिरायला.. सुर्य नारायण मंदिर बघितले आहे का?

१. वेळणेश्वर बरोबर गुहागर्/हेदवी २. आंबोलीला समुद्र नाही. पिण्याची सोय भरपूर. ३. श्रीवर्धन : माहिती नाही ४. रत्नागिरी आणि गणपतीपुळे ५. सिंधुदुर्ग बरोबर मालवण तारकर्ली

हेदवी सुरेख ठिकाण आहे एकदम. शिवाय तिथून वेळणेश्वर, गुहागर अगदी जवळ. हेदवीचा किनारा स्वच्छ, सुंदर असून जास्त गर्दी नसते. पालशेतचा सुंदर बीचही जवळच आहे. हेदवीला सुरुची कॉर्नेर म्हणून अगदी किनार्‍यापासून १० पावलं असणार्‍या ठिकाणाच्या कॉटेजमध्ये राहण्याची सोय आहे. कोकणी पद्धतीचे उत्तम शाकाहारी, मांसाहारी जेवण मिळते. वेळणेश्वरलाही राहण्याची सोय आहेच. हेदवीचे सुरुची कॉर्नर- अभय भाटकर फोन नं: ०२३५९- २४३२०९,२४३६१६ वेळणेश्वरचे एमटीडीसी मान्यताप्राप्त ठि़काण- प.पू. गगनगिरी कृपा विश्रामगृह-९४२०९०६६९३, हॉटेल-०२३५९-२४३६६४ , निवास- २४३२५४ एमटीडीसीचा पर्यटक निवास- ०२३५९-२४३२८२

In reply to by प्रचेतस

हेदवीचा दशभुज लक्ष्मी-गणेश अत्यंत रम्य मंदिर आहे. शिवाय मंदिराच्या कट्ट्यावरुन आजूबाजूचे हिरवेगार डोंगर बघणे सुखावह. गुहागरचा बीच धोकादायक आहे. त्यापेक्षा वेळणेश्वरला जावे. स्वच्छ किनारा आहे. राहाण्याच्या सोयी उत्तम इकडे श्रीवर्धनकडे गेले तर श्रीवर्धन स्किप करुन सरळ दिवेआगरला जावे. राहाण्या जेवण्याची उत्तम सोय. बीचपण सुरक्षित. हरिहरेश्वरला मंदिर छान पण बीच धोकादायक. कोकणात उन्हाळ्यात गेल्यास दमट हवेमुळे घाम निघतो आणि सारखे पाणी-पाणी होते. लोडशेडिंग असले तर बघायलाच नको. असे असले तरी आंबे-फणस-जांभळे-करवंदे-काजू यांची मजा लुटायची असेल तर या सीझनमध्ये जाण्याखेरीज पर्याय नाही.

In reply to by प्रचेतस

हेदवी मस्तच, बीचही नीवांत, स्वछ्च व ऊत्कृश्ट आहे. जेवण वगैरे मस्त सोयी अहेत.

टारझन कोकणांत जातासां? मगे कोकणातल्या कोंबड्यांचे दिवस भरले म्हणूचे!!!!! ;)

या आपले कोकणात स्वागत आहे.सावंतवाडीला आलात की वेळागर्,शिरोडा आहे.तिथे रहायला नारळाच्या झावळाचे बनवलेले टेंटस मिळतात्.खाली उतरलात कि समुद्र किनारा.एक दोन दिवसाच्या पिकनिकसाठी मस्त स्पोट आहे. तिथून जवळच तेरेखोल फोर्ट्,रेडीचा द्वीभुज गणपती,वेंगुर्ला,सागरेश्वर्,सारंगपाणी अशी बरीच ठीकाणे बघता येतात. तसेच सावंतवाडीत भालेराव खानावळ नव्हे तर राजू भालेकर यांची खानावळ प्रसिध्द आहे.मी सावंतवाडीतील असल्याने वरिल चुकीची दुरुस्ती केली.आणखी काही मदत लागल्यास कळविणे.

In reply to by ज्योति प्रकाश

>>मी सावंतवाडीतील असल्याने.... अहो ती माधवाश्रम खानावळ आहे का हो अजून? एस्टी स्टॅन्डपासून जरा खाली उतरलं की जवळच होती बघा...

+ १ टु वल्ली पुणे - गुहागर - हेदवी - पालशेत , पाटणच्या पुढचा घाट लई भारी आहे गाडी चालवायला, हँडल सरळ करायची बातच नाही, जाम मजा येते. नाहीतर दापोली - कर्दे - लाटघर - कड्यावरचा गणपती - केशवराज, विष्णुचं देऊळ आहे आणि मस्त ट्रेक आहे २ तासाच, तसेच हर्णे ला मासे लई भारी, बिचवरच घेउन बिचवरच भाजुन खायचे. लाटघरला बिचच्या बाजुला राहायची सोय पण मस्त आहे आणि एकदम आडवळणाचा बिच आहे. एवढा की मुख्य रस्त्यावरुन आत जाणारा रस्ता एकच आणि तो चुकला की १२-१३ किमिचा फट्का आहे. वाळुत गाद्या फिरवायला पण मस्त आहे तो बिच.

In reply to by ५० फक्त

दापोली - कर्दे - लाटघर - कड्यावरचा गणपती - केशवराज, विष्णुचं देऊळ
हा मस्त ट्रॅक आहे. पण उन्हाळ्यात सकाळी सकाळीच सुरुवात करायला हवी नाहितर घामाचे लोट निघायचे! व्याघ्रेश्वरचे मंदिर पण छान आहे. ह्याच भागात गरम पाण्याचे कुंड असल्याचे ऐकिवात आहे.

In reply to by ५० फक्त

वाळुत गाद्या फिरवायला पण मस्त आहे तो बिच. वॉव काय मज्जा येईल ना आधीच मऊ मऊ वाळू त्यावर अजून मऊ गादी. :)

टारझन शेट, सर्वात पहिले म्हणजे उन्हाळ्यात तिकडे जाऊ नकोस असा सल्ला देईन.. उन्हाने बेचैन होशील आणि मजा घेता येणार नाही. हिवाळ्यात बेस्ट.. तरी जायचे ठरतच असेल तर २ दिवस आणि १ रात्र यामधे सगळी ठिकाणे पाहुन होतील असे मला वाटत नाही.. मी एकदा असाच प्लॅन केला होता.. पहाटे निघालो आणि हरिहरेश्वरला पोहोचलो. श्रीवर्धन तिथुन जास्त लांब नाही, एक पेशवेकालीन मंदीर आहे. हरीहरेश्वरला खडकाळ बीच आहे.. तिथुन सरळ माणगावात आलो आणि होटेल मधे रुम बुक केली.. बॅग तिथेच टाकली आणि दिवे आगरच्या बीचवर गाडी नेली... बराच वेळ तिथेच होतो.. संध्याकाळी मनसोक्त समुद्री जेवण करुन रात्री फुल्ल टाईमपास केला.. दिवेआगरला राहण्याची सोय आहे पण मग रात्री ९ नंतर काही मिळणे थोडे अवघड असते. सकाळी पुन्हा डायरेक्ट काशिद बीच गाठला. इथे फारच प्रेक्षणीय स्थळे सापडली.. मग रस्त्यात हवे तिथे थांबा.. हवी तशी मस्ती. फोटुग्राफी करा.. आणि परतीच्या परवासाला लागा.. २ दिवसात खुप ठिकाणे पहाता येतील पण मग तिथली मजा घेता येणार नाही. :) आणि हो.. ग्रुप मोठा हवा.. ;) ऑल द बेस्ट..

In reply to by मराठमोळा

आम्ही तीन दिवसात हा ट्रॅक कव्हर केला होता - पुणे - रायगड - हरीहरेश्वर (मुक्काम) - श्रीवर्धन - दिवेआगर - जंजिर्‍याचा किल्ला - काशीद - अलिबाग(मुक्काम) - महड - पाली - पुणे

In reply to by पांथस्थ

यातील अलिबाग येथील मुक्काम वगळता पुण्याला फाट्यावर मारुन मुंबै लिहा अन मग तसा ट्रॅक आम्ही पाहुन आलो... म्हंजे.. मुंबै-हरिहरेश्वर-दिवेआगर-जंजिरा किल्ला-मुंबै

In reply to by मराठमोळा

सर्वात पहिले म्हणजे उन्हाळ्यात तिकडे जाऊ नकोस असा सल्ला देईन.. उन्हाने बेचैन होशील आणि मजा घेता येणार नाही. दमट हवेमुळे घाम येइल. पण उन्हाची तीव्रता कमी असते. मागच्याच आठवड्यात जाउन आलो कोकणात. अजून मस्त हिरवेगार आहे. या सिझनलाच जाण्यात मजा असते. आंबे, काजू, रातांबे (याला मराठीत "कोकम"), करवंदे आणि समुद्री खाद्य. टारूशेठ- कुठलेही ठिकाण निवडा आणि मस्त Enjoy करा. (मागच्या आठवड्यातील कोकण दौ-याचे फोटो येथे बघा)

टारूशेठ, दिवे आगारापासून सुरु करू शकता. अलिबाग, नागाव बीच ठिक आहेत पण अति गर्दीची , टुरिस्ट स्पॉट शक्यतो टाळा. श्रीवर्धन, हरिहरेश्वर , मुरुड जंजिरा जवळ आहेत पुण्याच्या. गुहागर छान आहे. हेदवी , वेळणेश्वर जवळच आहे. हेदवीवरुन राइ-भातगाव पुलावरुन पुळ्याला पण जाउ शकता. तिथून रत्नागिरी, पावस .... तिथे गेलात तर चिकन सोडा .... मच्छीचा चांगला सीझन आहे आत्ता.

तुम्ही सध्या बाकी सर्व सोडा. रत्नागिरी, गणपतीपुळे एवढा दोन ठिकाणांचा अजेंडा ठेवा टारुभाऊ. सगळे कोकणच सुंदर आहे पण जास्त जास्त भाग कव्हर करण्यात दमछाक होईल आणि निवांतपणा जराही लाभणार नाही. रत्नागिरीला किल्ला (रत्नदुर्ग पहा) सुरुवातीचे आलेले आंबे खरेदी करा (बाईकला सोसत असतील तर.) पूर्वी गणपतीपुळे नीट पाहिले नसेल तर पुढील माहिती: थेट गणपतीपुळे गाठा. तिथले एम टी डी सी हे नितांतसुंदर ठिकाणी आहे. भारीभारी रिझॉर्ट्सनाही असली मोक्याची जागा लाभलेली नाहीये. बुकिंग ऑनलाईन ताबडतोब मिळते (प्रिंटआउट) तिथे आवारातच एमटीडीसीचेच तरंग म्हणून हॉटेल आहे. एरव्ही बाहेर अनेक गुरुजी आहेत ते आवडत असल्यास मोदकांचे जेवण घालतात करुन (सकाळी सांगावे लागेल). रात्री एमटीडीसीच्या कॉटेजच्या व्हरांड्यात आरामखुर्च्या टाकून बसा.. काजू अन झिंगेबिंगे थाळीत ठेवून. समोर अथांग समुद्र. बियर (माईल्ड) तरंगमधेच मिळते. स्ट्राँग बियर आणि बाकी सर्व मद्ये तिथे एका बाईंच्या दुकानात मिळतात. स्वतः फ्रीझमधे हात घालून शोधून घ्या. अधिक माहिती (बाईंच्या दुकानाचा पत्ता वगैरेसाठी) इच्छा असल्यास व्यनी करावा. स्टॉक मिळण्याचे तेच एक ठिकाण त्या गावात आहे. समुद्र अफलातून. दिवसभर डुंबत रहा. याद करोगे. बादवे गणपतीलाही दर्शन दिलेत तरी चालेल. गणपतीच्या दारातच काही साधी मिसळीची हॉटेले आहेत. त्यातल्या पहिल्याच (दाराजवळच्या) हाटेलीत बसून मिसळ चापा आणि कळवा. आहा. (कोकणातला) गवि.

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद . ह्यातुनंच एखादा स्पॉट निवडल्या जाईल . पोरं बाईक वर जास्त लांब जायला तयार नसल्याने पुण्यापासुन लांबचे स्पॉट निवडता येणार नाहीत. गर्मी ची चिंता नाही .. आम्ही थंड थंड पावडर णेनार आहोत :) अलिबाग - मुंबै सारखे घाणेरडे आणि गर्दी फुल असणारे बिच नको आहेत . बिच वर एक बार्बेक्यु टाकुन मासे बिसे भाजता येण्याची सोय हवी. .. कोणणात जाऊन कोंबडी खाणे म्हणजे दळभद्री लक्षण आहे . त्यामुळे मासे मासे अन फक्त मासे चापल्या जातील :) मागेपुढे सर्व मिपाकरांसोबत ( शेयरींग बेस वर ) सहल ही काढली जाईल :)

टार्‍या, गर्दीचे समुद्रकिनारे नको असतील तर भोगवे, निवती हे शांत, स्वच्छ समुद्रकिनारे आवर्जून पहा. रेडीचा समुद्रकिनारा त्यामानाने गजबजलेला आहे. चिपळूण च्या आसपासही एक असाच शांत समुद्रकिनारा आहे - नाव विसरले :( मात्र तिथली शांतता, स्वच्छता तशीच जपा, हीदेखील विनंती :) लांबून दिसणारा भोगवेचा किनारा.

तार्कलीक गेलास तर "अतिथी बांबू" हाटेलात जेवान बघ. ते लाम वाटला तर गणपतीपुळे असाच. नायतर दापोली ब्येस्ट.. मोबायलची ची रेंज पन नाय थयसर.. मागच्याच महिन्यात तार्कली आणि पुळे करुन इलय. :-)

बुकमार्क पब्लि.चे 'साद सागराची' पुस्तकाचे अलिबाग, श्रीवर्धन, दापोली, गुहागर, रत्नागिरी, मालवण असे वेगवेगळे भाग आहेत. त्यांत संपुर्ण परिसर, नकाशे, अंतरे, रहाण्या-खाण्याच्या सोयी व त्यांचे फोन नं. अशी सगळी व्यवस्थित माहिती आहे. किंमतीही ४० ते ५० रु. प्र.भाग आहेत. नक्की उपयोगी पडेल.

यंदाच्या हिवाळ्यात मुंबईत चुलतीच्या लग्नानिमित्त मी माझ्या समस्त जर्मन परिवारासह येणार आहे . तेव्हा भारत भ्रमण करूच पण मुंबईतून कोकण दौरा करावासा वाटत आहे .( ह्या लेखाच्या आधी विदेशी पर्यटकांचे आकर्षण गोवा माझ्या डोक्यात होते ) पण आता मिशन कोकण नक्की लेख अक्षर खुण म्हणून साठवत आहे . मिपाकरांचे मनापासून आभार अवांतर ह्या निमित्ताने मिपाकारांचा कोकण कट्टा केला तर ?

In reply to by निनाद मुक्काम …

यंदाच्या हिवाळ्यात मुंबईत चुलतीच्या लग्नानिमित्त मी माझ्या समस्त जर्मन परिवारासह येणार आहे .
'चुलती' या शब्दाचा मराठीतील अर्थ (माझ्या माहितीप्रमाणे) 'चुलत्याची (पक्षी: काकाची) पत्नी', अर्थात 'काकू' अथवा 'काकी' असा होतो. (दुवा.) आपल्याला बहुधा 'चुलतबहीण' असे म्हणावयाचे असावे. अर्थाचा अनर्थ होत आहे, सबब संपादकांच्या मदतीने योग्य ती सुधारणा करावी, अन्यथा (जमल्यास) शुद्धीपत्र प्रसिद्ध करावे, ही सुचवणवजा विनंती.

धन्यवाद मित्रांनो... आत्ताच मुरुड-हर्णे च्या सहलीवरुन परतलोय .. अति बाईक चालवल्या मुळे ढोपर आणि कमरेची वाट लागली आहे :) पण लै मजा आली .. रोड चांगले बनवल्यामुळे गाडी पिदडण्याचा आणंद त्रिगुणीत झाला :)