Skip to main content

दैव जाणिले कुणी |

लेखक यनावाला यांनी मंगळवार, 22/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
दैव जाणिले कुणी? "सुदैव असते,दुर्दैव असते असे तुम्ही मानता का?" .. "मानतो म्हणजे? दैव हा शब्द मराठी भाषेत आहे.त्याचा अर्थ : भाग्य,नशीब असा आहे. ’सु’आणि’दु’ हे अनुक्रमे चांगले आणि वाईट या अर्थाचे उपसर्ग आहेत.सुदैव, दुर्दैव हे मराठी भाषेत रूढ झालेले शब्द आहेत.ते न मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." .. "मला म्हणायचे होते तुमचा या संकल्पनांवर विश्वास आहे का?" .. "तुम्हाला काय म्हणायचे आहे ते आले माझ्या ध्यानात. दैव संकल्पनेचा काय अर्थ घ्यायचा,काय व्याख्या करायची यावर ते मानणे न मानणे अवलंबून आहे. दैव म्हणजे विधिलिखित,प्राक्तन,संचित,प्रारब्ध. ते ब्रह्मदेवाने माणसाच्या कपाळी लिहिलेले असते. असे मुळीच मानत नाही.असले काही खरे नसते." .. "मग दैव शब्दाचा दुसरा कोणता अर्थ घ्यायचा?" .. "समजा अनंत हा मुलगा श्रीमंत कुटुंबातील आहे तर बबन गरीब कुटुंबात जन्मला आहे.अशा स्थितीत जन्माच्या बाबतीत अनंत सुदैवी तर बबन दुर्दैवी आहे असे म्हणणे योग्य होईल." .. "पण अनंताचा जन्म श्रीमंताघरी तर बबनचा गरीबाघरी झाला याचे कारण काय?" .. "हे पाहा, धनवंताना मुले होतात तशी गरिबांना सुद्धा होतात.धनवंत आई वडिलांनी आपल्या मुलाचे नाव अनंत ठेवले. म्हणून अनंत श्रीमंत कुटुंबात जन्माला आला असे म्हणायचे, अन्य कोणतेही कारण नाही.पूर्वपुणाई,पूर्वसंचित असे काही नसतेच.काही कुटुंबे श्रीमंत तर काही गरीब असतात हे सामाजिक वास्तव आहे.तसे का हा प्रस्तुत चर्चेचा विषय नाही." .. "अनंत आणि बबन यांच्या जन्मपत्रिका एकरूप(आयडेंटिकल)असू शकतील का?" .. "हो! शंभर टक्के!महाराष्ट्रात एकाच वेळी एकाच रेखांशावर अनेक मुले जन्मतात.त्यांतील काही जन्मत: श्रीमंत (अनंत) तर काही गरीब कुटुंबातील(बबन) असणारच.त्या सर्वांची जन्मरास एकच. तसेच जन्मकुंडल्या एकरूप (आयडेंटिकल) असू शकतीलच.पण तो विषय सध्या सोडा.आपण दैवाविषयी बोलतो आहोत." .. "दैवाविषयी आणखी काय सांगता येईल?" .. "मघाचाच मुद्दा अधिक स्पष्ट करतो.समजा एका दालनात एक मोठे टेबल आहे.त्या भोवती तीस जण बसले आहेत.टेबलावर एक साधारण मोठा आणि एक लहान असे दोन डबे आहेत. आता तिसांपैकी प्रत्येक जण पाचशे रुपयांची एक नोट मोठ्या डब्यात टाकतो आणि एका चिठ्ठीवर आपले नाव लिहून ती दुमडून छोट्या डब्यात टाकतो." .. "ठीक आहे.समजले.शेवटी मोठ्या डब्यात पंधरा हजार रुपये तर लहान डब्यात तीस चिठ्ठ्या आहेत.प्रत्येक चिठ्ठीवर एक नाव आहे." .. "आता एका मुलाला बोलावले.त्याने लहान डबा हालवून,डोळे मिटून त्यातील एक चिठ्ठी काढली.चिठ्ठीवर महेश माने असे नाव आले.महेशला पंधरा हजार रुपये मिळाले.महेशला असे पैसे का मिळाले?" .. "काढलेल्या चिठ्ठीवर त्याचे नाव होते म्हणून." .. "ते तर झालेच.पण कोणाचेही नाव येण्याची संभवनीयता तिसांत एक म्हणजे ३.३३% च आहे." .. "पण काढलेल्या चिठ्ठीवर कोणाचे तरी नाव असणारच ना?" .. "आता कसे? अगदी बरोबर!तिसांतील कुणा एकाचे नाव असणारच.ते महेश मानेचे निघाले एवढेच.अन्य कोणतेही कारण नाही." . " आले लक्षात.अशा वेळी महेश लकी ठरला,सुदैवी ठरला असे आपण म्हणतो." . "अरे वा! तुम्हाला सगळे समजलेच की! तो सुदैवी ठरला त्याला त्याची पत्रिका, ग्रहयोग,अचानक धनलाभयोग असे कोणतेही कारण नाही.अशा गोष्टींना कोणतेही कारण नसतेच.इथे कोणताही प्रसिद्ध ज्योतिषी,वाचासिद्धयोगी आला असता तर कोण जिंकणार याचे भाकीत करू शकला नसता.काढलेल्या चिठ्ठीवर कोणते तरी एक नाव असणारच. ते महेश माने निघाले एवढेच.हे यदृच्छेने घडते." . "यदृच्छा म्हणजे कोणाची इच्छा? देवाची का?" . "छे! छे! यदृच्छा या संस्कृत शब्दाचा अर्थ सहजता,आपोआपता,रॅंडमनेस असा आहे. इथे इच्छेचा काही संबंध नाही.देवाचा सुद्धा नाही.एक सत्य गोष्ट सांगतो.माझ्या परिचयाचे एक गृहस्थ आहेत.त्यांच्या तरुण मुलाला एक दुर्धर आजार झाला आहे.त्यावर उपाय नाही. वीस हजार माणसांतील एखाद्याला हा रोग होतो.तो आनुवंशिक नाही. असे डॉक्टर सांगतात.ते गृहस्थ म्हणतात:-- वीस हजारांत एखाद्यालाच होतो तो आमच्या वाट्याला का आला? आम्ही कोणाचे कधी काही वाईट केले नाही.कुणाला फसवले नाही.नाडले नाही.मुलगा निर्व्यसनी आहे.सद्गुणी आहे.मग आम्हाला असे दु:ख का?" . "असा प्रश्न त्याच्या आई वडिलांना पडणारच.मग ते पत्रिका, ज्योतिषी,पूर्वसंचित, नारायण नागबळी अशा गोष्टींच्या मागे लागणारच." . "म्हणून यदृच्छेचे तत्त्व (लॉ ऑफ़ रॅंडमनेस्) समजून घेतले पाहिजे. हा विशिष्ट आजार वीस हजारांत एखाद्याला होतो.शहराची लोकसंख्या तीस लाख असेल तर तिथे साधारणपणे दिडशे लोक या आजाराने बाधित असणार.(समजा १००ते २००).त्या दिडशेमध्ये या मुलाचा अंतर्भाव झाला हे त्या मुलाचे आणि त्याच्या माता पित्यांचे दुर्दैव म्हणायचे.त्याला अन्य कोणते कारण दिसत नाही.हे समजून घ्यायला हवे आणि आलेल्या प्रसंगाला धीराने सामोरे जायला हवे.दुसरा उपाय नाही.इथे कोणताही दैवी उपाय निरर्थक ठरतो.त्याने अंतत: अधिक नैराश्य येते." . "खरे आहे तुमचे म्हणणे.एखाद्या कुटुंबात मतिमंद मूल जन्माला येते.आपल्यावरच असा प्रसंग का?असे आई वडिलांना वाटणे स्वाभाविक आहे.पण त्या मुलाच्या प्रवेशासाठी ते जेव्हा एखाद्या अशा संस्थेत जातात तेव्हा लक्षात येते की हा प्रसंग आपल्या एकट्यावरच नाही.अशी अनेक कुटुंबे आहेत.म्हणून दैवी उपायांच्या मागे न लागता आलेल्या प्रसंगाला तोंड देत योग्य तो मार्ग शोधला पाहिजे.असेच ना?" . "अगदी बरोबर." **************************************************************

वाचने 15651
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

१००% पटले. चिरुत्सु-

"माझ्याच माथी हे भोग का?" असं कुणाला म्हणताना ऐकलं की तंतोतंत असेच संवाद माझ्या मनात झालेले आहेत! :) आर्थर अ‍ॅशची प्रसिद्ध "व्हाय मी?" गोष्ट आठवली.

स्टॅटिस्टिकल प्रॉबॅबिलिटी आहे की दुर्दैव आहे ते घटना कोणाच्या बाबतीत घडली त्यावर अवलंबून आहे. मला कॅन्सर झाला तर दुर्दैव, दैव वगैरे. मित्राला झाला तर ती स्टॅटिस्टिकल प्रॉबॅबिलिटी. फ्रेम ऑफ रेफरन्स बदलते त्यावर घटनेकडे (इव्हेन्ट) पाहण्याचा कोन बदलतो. कोणाच्या बाबतीत घटना घडेल हे रँडम असले तरी "मलाच का?" हा स्पेसिफिक प्रश्न रँडमनेसने बाधित झालेला "प्रत्येक"जण विचारणार, हा रोचक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

In reply to by गवि

फ्रेम ऑफ रेफरन्स बदलते त्यावर घटनेकडे (इव्हेन्ट) पाहण्याचा कोन बदलतो. थोडे मूळ विषयाला अवांतर पण वरील वाक्यासंदर्भात: रिसेशन आणि डिप्रेशन (आर्थिक मंदी) मधला फरक काय? : शेजार्‍याचा जॉब गेला तर रिसेशन आणि स्वतःचा जॉब गेला तर डिप्रेशन.

सहमत गगनविहारी च्या मताशी शेवटी फ्रेम ऑफ रेफरन्स बदलले की घटनेकडे (इव्हेन्ट) पाहण्याचा कोन बदलतो

छान. ("लॉ" ऑफ रँडमनेस ही अलंकारिक भाषा वापरली नसती तर चालले असते."लॉ-नाही म्हणजे सुद्धा कुठलासा लॉच झाला ना?" वगैरे शाब्दिक गटांगळ्या होत.) समोरील घटना नियत करणार्‍या पूर्वघटनांची ("कारणां"ची) संख्या फार मोठी असली, तरी परिस्थिती रँडमशी समसमान होऊ शकते - याला कदाचित "लॉ ऑफ रँडमनेस" म्हणता येईल. (उदाहरणार्थ टेबलाभोवतीच्या लॉटरीचे उदाहरण : यातील कुठली चिठ्ठी निघेल ते नियत करणार्‍या आदल्या तपशीलवार घटनांची संख्या प्रचंड मोठी आहे, त्यांचे गणित करणे व्यवहार्य नव्हे. प्रस्तुत घटना रँडम-यादृच्छिकसारखी मानण्यास हरकत नाही.) परंतु या छोटेखानी लेखात अशी ही गुंतागुंत अपेक्षित नाही. त्यापेक्षा गोंधळ नको, तर "लॉ" म्हणायचे टाळलेलेच बरे.)

In reply to by धनंजय

श्री.धनंजय लिहितातः"लॉ" ऑफ रँडमनेस ही अलंकारिक भाषा वापरली नसती तर चालले असते." त्यांची ही सूचना एकदम पटली. खरे तर जिथे रॅण्डमनेस आहे तिथे नियम कसा असेल? लॉ" ऑफ रँडमनेस " हा वदतो व्याघात:"चा प्रकार ठरतो.प्रिन्सिपल ऑफ रॅण्डमनेस म्हणणे योग्य ठरले असते.कुठेतरी हा शब्दप्रयोग वाचला.तो लक्षात राहिला.अर्थाचा सम्यक विचार केला नाही.

यदृच्छेने घडणाऱ्या घटनांना मागे वळून बघताना सुदैव व दुर्दैव हे शब्द वापरले जातात. 'अनपेक्षितपणे घडलेली चांगली घटना' चं वर्णन सुदैव या शब्दाने होतं. तिथपर्यंत ठीक आहे. पण त्या वर्णनापलिकडे जाऊन तो शब्द कारणपरंपरा म्हणून वापरला जातो, हे आपलं दुर्दैव.

दैव जाणिले कुणी?
अर्थातच जाण्कारांनी (इथे फक्त मीपा जाणकार असे गृहीत धरू नये :) ) असो बकवास वीसरूया, आणी कीती सहजपणे लेखकाने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास (अभ्यासाचा प्रयत्न व घडलेल्या गोष्टीचा त्रागा अथवा आनंद मानणे/व्यक्त) करणे ही माणसाची कशी वाइट खोड आहे हे स्वतःला सामजावले आहे(होय स्वतःलाच कारण लेखात दोन व्यक्ती संवाद साधत आहेत असे दीसत नाही तर एकच मन दोन माणसांच्या कल्पनेतून वीचार करतय असा भास झाला), मात्र खरोखर ऊत्क्रूश्ट तत्वज्ञान _/\_. तसेच त्यापेक्षा ज्या गोश्टी आपल्या हातात आहेत त्याचा वापर करून आलेल्या प्रसंगाला तोंड देत/अथवा उपभोग घेत योग्य तो मार्ग शोधला पाहिजे,असेही बजवायला माननीय वीसरले नाहीयेत, _/\_ _/\_ _/\_, फक्त आपल्यावर कोसळणार्‍या अपघातांचा (म्हणजे केवळ दुर्दैवी प्रसंग न्हवे तर आनंददायीसूध्दा, जसेकी लॉटरी लागणे वगैरेचा) अभ्यास करणे मात्र प्रत्येकाने वीसरले पाहीजे हा अंधळा हट्ट(जर असेल तर) जरा अवाजवी वाटतो...... - इडीयट इन्साइड.

अशा स्थितीत जन्माच्या बाबतीत अनंत सुदैवी तर बबन दुर्दैवी आहे असे म्हणणे योग्य होईल. (आठवणीतून) कर्णाचे वाक्यः सुतोवासूतपुत्रोवा योवाकोवाभव्यामहम, दैवायत्तं कुले जन्मं मदा यत्तं तू पौरूषम " आले लक्षात.अशा वेळी महेश लकी ठरला,सुदैवी ठरला असे आपण म्हणतो." शिवराळ भाषेत त्याला सुदैवी म्हणत नाहीत तर मटका लागला असे म्हणतात.. :-) "ते तर झालेच.पण कोणाचेही नाव येण्याची संभवनीयता तिसांत एक म्हणजे ३.३३% च आहे." या विशिष्ठ उदाहरणात इतरांच्या तुलनेत ही शक्यता बरोबरच आहे. पण व्यक्तीगत आयुष्यात आपली ध्येयानुसार कर्मे करत असताना, या संबंधीत जे गीतेत म्हणलेले आहे ते मला भावते:
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् । विविधाश्च पृथक्चेष्टाः दैवम् चैवात्र पञ्चमम् ॥गीता १८-१४॥ शरीरवाङ्नोभिर्यत्कर्म प्रारभते नर: । न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतव: ॥गीता १८-१५॥ अथवा त्याचेच मराठीकरण अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने । वेगळाल्या क्रिया नाना दैव ते येथ पांचवे ॥ गीताई १८- १४ ॥ काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी । धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे ॥ गीताई १८- १५ ॥
यात कुठेही दैववाद आहे असे मला वाटत नाही. फक्त दैव म्हणजे शक्यता इतकाच अर्थ आहे. मात्र ती स्वत:च्या हाताबाहेरील शक्यता ठरवण्याच्या आधी चार गोष्टी या स्वतःलाच कराव्या लागतात... असे अनुभव व्यक्तीगत आयुष्यात स्वतःला येतात आणि पाचव्या शक्यतेचे काही झाले तरी परत परत "वेगळाल्या क्रिया नाना" करत बसावे लागतात. रामायणातला राम हा गीतरामायणात भले (गदीमांच्या लेखणीतून) "खेळ चाललासे माझ्या, पूर्वसंचीतांचा" असे म्हणाला असेल. पण प्रत्यक्ष (वाल्मिकी) रामायणात नुसता अयोध्येच्या बॉर्डरवर वनवास म्हणत बसून राहीला नाही, की सीतेला पळवले तर माझ्या नशिबी का म्हणत बसला नाही... तेच कृष्णाचे, पांडवांचे, शिवाजीचे आणि तमाम स्वातंत्र्यसैनिकांचे/नेत्यांचे देखील.... "दुर्दैवाने" अनेकांना स्वतः कष्ट न करता सर्व पाहीजे असते आणि इतरांशी तुलना करत स्वतःची प्रगती हवी असते... मग ते मिळाले नाही की, "तकदीर अपना...." म्हणत बसतात. मग कधी भविष्य बघायचे तर कधी अँटीडिप्रेशनच्या गोळ्यात उत्तर शोधायचे.... थोडक्यात हे तत्वज्ञान नसून मानवी स्वभावाचा भाग आहे आणि तो सर्वत्र दिसतो. असो.

In reply to by विकास

श्री. विलास लिहितातः"यात कुठेही दैववाद आहे असे मला वाटत नाही. फक्त दैव म्हणजे शक्यता इतकाच लिहितातः"" . यात दैववाद नाही हे खरेच आहे. योग्य ते सर्व प्रयत्न करूनही एखादे काम यशस्वी होणे न होणे हे दैव या पाचव्या कारणावर अवलंबून असते असे म्हणणे योग्य आहे. मात्र इथे दैव म्हणजे विधिलिखित नव्हे. इथे दैव म्हणजे यदृच्छेचे तत्त्व असे म्हणावे. .. अवांतरः कर्णाचे उद्गार : दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम|( इथे म चा पाय मोडायला हवा. पण जमत नाही.) ...............(मम) जन्म दैवायत्ते कुले(अभवत्).पौरुषं तु मदायत्तं (अस्ति) ............माझा जन्म यदृच्छेने लाभलेल्या कुळांत झाला. परंतु कर्तृत्व माझ्या हाती आहे.

In reply to by यनावाला

मात्र इथे दैव म्हणजे विधिलिखित नव्हे. इथे दैव म्हणजे यदृच्छेचे तत्त्व असे म्हणावे. असेच म्हणायचे असेल. तेच कर्णाच्या उद्गाराबाबत... (सवयीने कदाचीत मी विरोधात लिहीतो आहे असे वाटले असावे. :-) )

In reply to by विकास

दैवायत्तं कुले जन्मं मदा यत्तं तू पौरूषम .. यांत किंचित् व्याकरण दोष आहेत म्हणून शुद्धरूप लिहिले एवढेच.तुम्ही(श्री.विकास यांनी) दिलेले उद्धरण(कर्णाचे उद्गार) विषयाला अनुरूपच आहे.

In reply to by यनावाला

तुम्ही(श्री.विकास यांनी) दिलेले उद्धरण विषयाला अनुरूपच आहे..> आपल्याला उद्धृत,उदाहरण,अवतरण यांपैकी कुठला तरी एक शब्द वापरायचा होता असे वाटते. चू.भू.दे.घे. लेख उत्तमच असून मानवी मनोवृत्तीचा एक पैलू दाखवणारा आहे.

In reply to by यनावाला

> अवांतरः कर्णाचे उद्गार : दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम|( इथे म चा पाय मोडायला हवा. पण जमत नाही.) पौरुषम् एखाद्या अक्षराचा पाय मोडायचा कसा हे मला देखिल माहीत नाही. पण मी एक युक्ती शोधली आहे: ज्या अक्षराचा पाय मोडातचा ते अक्षर टाईप करुन त्यापुढे दुसरे अक्षर टाईप करायचे. म्हणजे एखादे जोडाक्षर झाले पाहीजे. मग ते दुसरे अक्षर बॅकस्पेसने डीलीट करायचे, की पहील्या अक्षराचा पाय मोडतो. उदा. - म चा पाय मोडण्यासाठी ms + Backspace = म् इथे m आणी s नंतर बॅकस्पेसने s डीलीट केला की म् मिळतो.

In reply to by नारयन लेले

दैव म्हणजेच योगायोग (मराठीत चान्स) हेच तर ते म्हणत आहेत. आता योगायोगालाही दोष द्यायचा नाही म्हणजे काय?

In reply to by नारयन लेले

पण आपल्यावर पाळी आल्यावर बरयाच वेळा आपण दैवालाच दोश देतो . मला वाटते श्री. यनावालांचा मुद्दा हा त्या संदर्भात नसावा. तर, "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी..." मधील निष्क्रीय दैववादासंदर्भात असावा. (निष्काम नाही!)

मनुष्याचा सहज स्वभाव आहे. दुसरे काय ? ३ तर्हेचे लोक दैवाला मानत नाहीत. १- ज्याना आयुष्याचे दान मनासारखे पडले आहेत ते. बुद्धीवादाच्या नावाआडून सुप्त अहंकार प्रकट होत असतो. २- ज्यांना नशीबाला दोष द्यावा इतकेही त्यांच्या नशीबात नाही असे. आपण नशीबवानच नाही याचा पराकोटीचा संताप त्यांना दैव झूट आहे या थराला आणतो. ३- ढुढ्ढाचार्य जमात. जगातला सगळा बुद्धीवाद आपणच कोळून प्यायलो आहोत आणि आपल्याला आज जे माहिती आहे त्याच्यापलिकडे ज्ञान असूच शकत नाही अशी ज्ञानाची परिसीमा मानणारे असामान्य महामहीम. बाकीचे उरलेले बहुसंख्य सामान्य ज्यांना शब्दच्छलाशी घेणे देणे नसते. रोजचे आयुष्यच महत्वाचे असते त्यांच्यासाठी.

In reply to by विनायक बेलापुरे

बाण बरोब्बर "बैलाच्या डोळ्यावर" मारलात. दैवावर हवाला ठेवून प्रयत्न न करणे चूक आहे, पण एखादा माणूस आपल्या नियंत्रणाबाहेरील घडलेल्या गोष्टींमुळे प्रचंड दुख: सहन करत असताना, दैवाला दोष देऊन ते सहन करू शकत असेल तर बुद्धीवादापेक्षा मला ते मान्य आहे. >>बाकीचे उरलेले बहुसंख्य सामान्य ज्यांना शब्दच्छलाशी घेणे देणे नसते. रोजचे आयुष्यच महत्वाचे असते त्यांच्यासाठी. कुणी दैव म्हणते कुणी यदृच्छा. सामान्यांसाठी फार फरक पडत नाही. शब्दच्छल हा योग्य शब्द नेमलात इथे.

In reply to by विनायक बेलापुरे

श्री. बेलापुरे ह्यांच्या तिन्ही मुद्दयांशी पूर्णपणे सहमत. मी स्वतः अशी अनेक माणसे पाहिली आहेत कि जी अक्षरशः २४*७*३६५ कष्ट उपसत असतात पण उभ्या आयुष्यात एकही साधीशी गोष्टसुद्धा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही. त्याचबरोबर असे महाभाग देखील पाहिले आहेत कि विशेष काहीच न करता सुद्धा ज्यांच्या सर्व इच्छा अगदी भरभरून पूर्ण होत असतात अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत .... उलट नशीब म्हणा वा दैव का काय ते म्हणा तेच उलट ह्या महाभागांपुढे हात जोडून उभे असते की मला आपलंसं कर आणि माझं कल्याण कर .... :) :) :) वर केवळ नशीबाने सुखात लोळणारे हे महाभाग त्या कष्टकर्‍यांना उलट उपदेश करताना सुद्धा पाहिलंय .... आता बोला.

In reply to by sagarparadkar

विनायक बेलापुरे यांच्या मते 'शुद्ध बुद्धीवादी'- (म्हणजे समजून उमजून दैववाद नाकारलेले आणि प्रयत्नवादी झालेले लोक) ही जमात असतच नाही की काय? म्हणजे प्रत्येक बुद्धीवादी माणूस हा गर्भश्रीमंत/ नाडलेला/ किंवा घमेंडीच असतो काय? श्री. विनायक बेलापुरे यांच्याकडून 'दैव मानणार्‍या लोकांचे प्रकार'ही समजून घेण्यास उत्सुक आहे. ;)

In reply to by ज्ञानेश...

लेख आवडला, मेघवेडा, धनंजय, राजेश घासकडवी यांचे प्रतिसादही आवडले.

In reply to by ज्ञानेश...

बरोबर. चौथा प्रकार राहिलाय. जिथे कणाच मोडेल आणि तर्कबुद्धीच्या ठिकर्‍या होतील असं अवजड दु:ख ज्यांनी कधी पाहिलेलं नाही किंवा तर्कशुद्ध विचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या बळकट मनाची मशागत होण्याची ज्यांची पहिल्यापासूनच परिस्थिती आहे असे लोक आहेत कितीतरी जगात.