Skip to main content

मागचा जन्म

Published on गुरुवार, 17/02/2011
मागचा वा पुनरजन्म ह्या कल्पना खर्या असतील काय? reincarnation of peter proud हा सिनेमा मी अलका ला पाहिला ज्या वरून ऋषी कपूर टीना मुनीम ला घेवून सुभाष घाई नि त्याची भ्रष्ट नक्कल केली होती..त्या मध्ये हि मागच्या जन्माचा सूड घेण्या साठी नायकाने जन्म घेतला असतो.. एका वाहिनी वर हि एका मुलीची मुलाखत पाहीली ..ज्या मध्ये तिला मागच्या जन्माचे सारे आठवत होते..एक ना अनेक ....आपण हि अश्या गोष्टी ऐकल्या असतील.... मागच्या जन्मात आपण कोण होतो हे साम्गानार्याच्या बर्याच कथा कहाण्या आहेत....आपल्या कडे हि आजी वा आजोबांचा मृत्य झाला व वर्षाच्या आत घरात आपत्याचे आगमन झाले कि मृत व्यक्ती नवीन स्वरूपात आल्याचे समजले जाते.. परदेशात हि Life after death वर बरीच पुस्तके आहेत.. आपला एखादा वा आपल्या परिचयातल्या एखाद्याचा अनुभव मत..विचार..वाचलेले माहित असल्यास शेअर करणार का?

वाचन संख्या 10231
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

शास्त्रीय दृष्ट्या आधार काही नाही. पण शास्त्रीय दृष्ट्या जगात तसा कशालाच काही आधार नाही. :) मी फार लहानपणी सांगायचो की माझी आई देवळात उभी असताना गोल फिरून चक्कर येऊन खाली पडली आणि बहुधा निधन पावली. ही आठवण अजूनही एका धूसर दृश्यासारखी मला आहे. धूसर पण निश्चित दृश्य आहे. आमच्या मातोश्रींना ही कथा ऐकून विचित्र वाटायचे. आता हे काही लहानपणचे स्वप्न म्हणावे तर ज्या वयात मी हे सांगायचो त्या वयात इतके व्हर्सटाईल स्वप्न पडण्याइतपत फिरणे आणि जग पाहणे सुरुही झाले नव्हते. पण मुळात काहीतरी स्वप्न-कम-रिइन्फोर्स्ड मेमरी (आईकडून पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या वयात ऐकलेली आणि त्यामुळे अधिक लक्षात राहिलेली) असं त्याचं स्वरुप असावं. एकूण आपण जा जन्मी अस्तित्वात आहोत हेही इतकं अचाट गूढ आहे की पुढचा मागचा जन्म आहे असं कळलं तरी फार नवीन आणि जास्त आश्चर्यकारक काही उलगडलं असं वाटू नये.

माझा भाऊ हा माझ्या आईच्या वडिलांच्या म्रुत्युनंतर जन्मला! आईला ते सांगत असत 'कि मी मेल्यानंतर तुझ्या पोटी जन्म घेइन.' आणि आश्चर्य म्हणजे, खरेच अजोबांच्या म्रुत्युनंतर जन्म्ललेल्या माझ्या भावाचे वागणे बोलणे जन्मखुणा अगदी आजोबांसार्ख्याच आहेत! त्यामुळे माझा आहे थोडा फार विश्वास पुनर्जन्मावर.

१००+ नक्की ... :) ह्या जन्मीची निष्कारण भोगायला लागणारी दु:खं पाहू जाता पुनर्जन्मावर विश्वास ठेवायला हरकत नाही ... --------

असे अनेक अनुभव सांगितले जातात, पण बरेचदा त्याला पुरावा सापडत नाही. हे आपल्याकडे, पाश्चात्य देशांमध्ये, किंबहुना जवळ जवळ प्रत्येक समाजामध्ये/संस्कृतीमध्ये असे अनुभव किंवा, त्यांचा अभ्यास करणारी शास्त्रं आहेत. काही दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचलं होतं. एका ब्रिटिश (किंवा कदाचित अमेरिकन) डॉक्टरने लिहिलेलं आणि मराठीत अनुवादित केलं गेलेलं. तो एक psychiatric (मानसचिकीत्सक) आहे आणि त्याच्याकडे आलेल्या एका रूग्णाच्या अनुभवांवरून ते पुस्तक लिहिलेलं आहे, जवळ जवळ केसस्टडी रूपात. त्याच्याकडे आलेल्या एका मुलीला अनेकदा स्वप्नं पडायची, डोकं दुखणं इ. त्रास व्हायचा. तिला त्याने निरीक्षणाखाली ठेवून आणि तिला मंद संमोहनात नेऊन मग ती जे बोलायची, त्याचे रिपोर्ट्स बनवले. मग त्याच्या लक्षात आलं, की ही जे सांगते आहे ते पूर्वजन्मातलं आहे. तिला अशा अनेक जन्मातल्या स्मृती होत्या. त्या तिच्या या शरीरात स्मरणात असल्यामुळे तिला हे त्रास होत होते. अशा अनेक संमोहनाच्या बैठका झाल्यावर ती बरी झाली. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे, तिच्या जुन्या जन्मातील काही व्यक्ती या जन्मातही तिच्याबरोबर होत्या. आणि त्या जन्मात तिला त्त्यांच्याबद्दल ज्या चांगल्या/वाईट भावना जाणवल्या होत्या, तशाच या जन्मातही. मला पुस्तकाचं नाव आठवत नाहीये. आठवलं की सांगेन.

In reply to by अमित देवधर

many masters many lives - मेनी लाइव्हज मेनी मास्टर्स -सुंदर पुस्तक! लेखकाचा तथाकथित शास्त्रीय मनोवृत्तीतून चिकित्सक अध्यात्माकडे जाणारा प्रवास मला फार आवडला. विकी - Reincarnation - येथे अधिक माहिती. ब्रायन वेस हा लेखक- त्याच्या विषयी येथे आहेच.

In reply to by गवि

गवि, तुम्हाला मुळात विज्ञानवादी म्हणजे काय तेच कळले नाही हो. वर तुम्ही म्हणता "पण शास्त्रीय दृष्ट्या जगात तसा कशालाच काही आधार नाही." खरा विज्ञानवादी जीव गेला तरी जालावर असे म्हणत नाही हो. विज्ञानवादी म्हणजे जालावर जो विज्ञानाबाह्य गोष्टीच्या विरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतो पण स्वतः लग्न मुहूर्त काढून करतो तो. दासबोधाच्या धर्तीवर अशी लक्षणांची अजून एक लिस्ट करण्याचा मनोदय आहे. बघू कसे जमते ते ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विज्ञानवादी म्हणजे जालावर जो विज्ञानाबाह्य गोष्टीच्या विरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतो पण स्वतः लग्न मुहूर्त काढून करतो तो.
'लग्न करतो' या दाव्याला आधार काय?

In reply to by पंगा

जालावर दावे करायला आधाराची गरज कधीपासून लागायला लागली? असा बदल झाल्याचे कुणी सांगितले नाही मला :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विज्ञानवादी म्हणजे जालावर जो विज्ञानाबाह्य गोष्टीच्या विरुद्ध एकदम टोकाची भूमिका घेतो पण स्वतः लग्न मुहूर्त काढून करतो तो. हा हा !!! विमे जोरात !!!!! :) :) दासबोधाच्या धर्तीवर अशी लक्षणांची अजून एक लिस्ट करण्याचा मनोदय आहे. बघू कसे जमते ते. जमवा जमवा राव. जोरदार लिखाण येउद्या. वाट पाहतोय.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अवैज्ञानिक ऐवजी विज्ञानबाह्य हा शब्द अत्यंत आवडला. यापुढे हा वापरत जाईन..

माझा सुद्धा पुनर्जन्मावर विष्वास आहे ... मी गेल्या जन्मी एक लेखक नव्हतो .. मला काहीच लिहीता येत नव्हते ... बघा .. त्यामुळे मला ह्या जन्मातही लिहीता येत नाही .. :) आहे की नाही गम्मत :) शिवाय मला त्या जन्मात खुप चिकन आवडायचे , आणि आमच्या एरियातल्या सगळ्या कोंबड्या खुडुक झाल्या होत्या. आता ही तसेच होते आहे :) कंप्युटर इंजिनियर तर मी गेल्याच जन्मी झालो होतो .. .डिग्री फक्त ह्या जन्मी घेतली ... तेंव्हा गेला जन्म ते हा जन्म हा प्रवास मला फारंच रोचक वाटत आला आहे असा माझा कयास आहे :)

इथं आम्हाला प्रतिसाद ल्ह्यायला लावून तुम्ही पळून जाता. मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून इतके प्रतिसाद तुम्हाला मिळतात. आता मी तरी तुमच्या धाग्याला फसणार नाही.;)

तुम्हाला जर माहिती हवी असेल कि तुम्ही मागच्या जन्मी कोण होता ? तर एन. डी. टि. व्ही. इमॅजिन च्या 'राज पिछले जनम का ' या 'रिअ‍ॅलिटी शो ' मधे जा तुम्हाला लगेच कळेल .. (लोकांना हे कशाला कळायला हवं असतं ? देव जाणे ! ) मी गेले नाही आणि जाणार नाही कारण अज्ञानात सुख असतं.

In reply to by नरेशकुमार

मग आता काय फरक आहे? मागच्या जन्मी तुम्ही बायको म्हणुन तर आता नवरा म्हणुन घाबरता हा फरक सोडला तर!!

होय आहे. जास्त वाचन करायचे असल्यास दुवे १. मृत्युनंतरचे जीवन Author: अ. कृ. देशपांडे(वाचले आहे) [२. MRUTYUNANTER मृत्युनंतर by कारंत के. शिवराम ३. इतर वाचनीय (दिघे मधुकर) वरील पैकी एका लेखकाला जे की अतिंद्रिय शक्तीचे विविध प्रयोग करीत व शिकवीत, माझा मित्र भेटला होता. मरण्याआधी मित्राच्या वडीलांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण काहिच स्पष्ट कळू शकले नाहि. दैवयोगे त्यांच्याशी जेव्हा मित्राचा भेटण्याचा योग आला. तेव्हा मरण्या आधी मित्राच्या वडिलांनी काय सांगायचा प्रयत्न केला होता हे त्यांनी (ट्रांस/ध्यान मध्ये वगैरे जाऊन) अचूक सांगितले. शिवाय मित्राच्या पुर्वजन्माविषयीहि सांगितले. पुर्वीच्या जन्मातील मित्राची आवड-निवड, छंद ज्यापैकी कि एक ज्योतिष शास्त्र अभ्यास व इतर तंतोतंत होते. वाचाल त वाचाल नाहितर वाचवा!

In reply to by रोमना

विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिस सोल.. मरण्याआधी मित्राच्या वडीलांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण काहिच स्पष्ट कळू शकले नाहि. दैवयोगे त्यांच्याशी जेव्हा मित्राचा भेटण्याचा योग आला. तेव्हा मरण्या आधी मित्राच्या वडिलांनी काय सांगायचा प्रयत्न केला होता हे त्यांनी (ट्रांस/ध्यान मध्ये वगैरे जाऊन) अचूक सांगितले. जे मुळात स्पष्ट कळलेच नव्हते ते नंतर कळल्यावर अचूक आहे हे कसे कळले ? काही शब्द ऐकू आले असतील आणि बाकी कळले नसेल. पण नेमका तोच संदर्भ घेऊन ते बोलत होते आणी "तेच, त्याच अर्थाने" बोलत होते हे मानणे केवळ विश्वास म्हणूनच शक्य आहे. अचूक असे म्हणता येणार नाही. कारण "अचूक"मधे लॉजिकल कसोटी / कंडिशन येते. शब्दच्छल वाटत असेल तर जाऊ दे. पण विज्ञानबाह्य आहे म्हणून पटेलच असे नाही.

In reply to by रोमना

मी पण मृत्यूनंतरचे जीवन नावाचे एक पुस्तक वाचले आहे.अ.कृ.देशपांडे यांचेच की अन्य कोणा लेखकाचे हे लक्षात नाही.पण त्यात लेखकाने वेळोवेळी त्याला पिशाच्च दिसल्याचा दावा केला आहे.उदाहरणार्थ लेखक ५ वर्षाचा असताना शेजारच्या घरातील आजींचे निधन झाले.त्या आजींचे पिशाच्च लेखकाला गच्चीवर दिसले, तसेच गावाला गेले असताना ओढ्याकाठी पिशाच्च दिसले असेही उल्लेख त्यात आहेत.ते वाचताना एकच प्रश्न पडला होता की लेखकाला बरी पिशाच्च दिसतात.माझ्यासारख्या बहुसंख्य सामान्यांना तर कधीच पिशाच्च वगैरे काही दिसलेली नाहीत! असो. बाकी पुनर्जन्म आहे का याविषयी उत्सुकता आहेच.

In reply to by क्लिंटन

मुळात पिशाच्च कसे असते तेच माहीत नसल्याने एखादे पिशाच्च दिसले तरी तेच पिशाच्च आहे याची पुरेशी कल्पना नसल्याने असा छातीठोक दावा करणे अवघड आहे असे वाटते.

शोषितांनी बंड करू नये म्हणून शोषणकर्त्यांनी तयार केलेल्या बाजारगप्पा आहेत या पुनर्जन्म आणि पूर्वसंचित वगैरे.

In reply to by अवलिया

जे पाहिलंय आणि पाहतो त्यावरून तरी असेच वाटते. पुनर्जन्म आहे हे कोणी निर्विवादपणे पटवून देईपर्यंततरी हेच मत. न पाहिलेल्या गोष्टींबद्दल छातीठोकपणे सांगायला मी काय कोणी परमेश्वराचा अवतार किंवा प्रेषित थोडीच आहे? ;-)

In reply to by नगरीनिरंजन

>>>जे पाहिलंय आणि पाहतो त्यावरून तरी असेच वाटते. ओके. >>>पुनर्जन्म आहे हे कोणी निर्विवादपणे पटवून देईपर्यंततरी हेच मत. आमचे मत - http://misalpav.com/node/16827#comment-289390 >>>न पाहिलेल्या गोष्टींबद्दल छातीठोकपणे सांगायला मी काय कोणी परमेश्वराचा अवतार किंवा प्रेषित थोडीच आहे? म्हणजे परमेश्वराचे अवतार (मानले गेलेले) आणि प्रेषित न पाहिलेल्या गोष्टींबद्दल ठाम पणे सांगतात असे तुम्ही म्हणता का? असे असेल तर ज्ञानेश्वर तुकारामांचे फोटो काढुन टाकायला हवे असे सांगायला पाहिजे मालकांना.

In reply to by अवलिया

>>असे असेल तर ज्ञानेश्वर तुकारामांचे फोटो काढुन टाकायला हवे असे सांगायला पाहिजे मालकांना. का? मला वाटले ते त्यांच्या मनुष्यजातीबद्दलच्या कणवेमुळे, एकंदर भूतदयेमुळे आणि धर्ममार्तंडांच्या अन्यायाविरूद्धच्या भूमिकांमुळे वंदनीय आहेत. माझा निर्देश "मला शरण या", "मीच अमुक करतो, मीच तमुक करतो आणि अमुक आहे, तमुक आहे, मेल्यावर अमुक होते आणि तुझी अवस्था अमुक कारणामुळे अशी आहे आणि त्याला तूझेच पुर्वीचे तू न पाहिलेले कर्म जबाबदार आहे" या छापाच्या बोलण्याकडे होता.

In reply to by नगरीनिरंजन

आता तुम्ही बोलण्याचा उल्लेख करत आहात, पहिल्या प्रतिसाद शोषित शोषक असा संदर्भ होता. असे बोलणारा दरवेळेस शोषक असेलच असे नाही आणि शोषक दरवेळेस असे बोलेलच असे नाही. त्यामुळे पहिला प्रतिसाद आता गैरलागु दिसत आहे.

In reply to by अवलिया

बोलणारा शोषक नसेल तरी बोलविता असतोच. किंबहुना देवतुल्य व्यक्तीच्या मुखी असलं तत्वज्ञान घालणं हेच आवश्यक असतं शोषकांना. छातीठोकपणे बोलून अशा कल्पना दुर्बळ लोकांच्या गळी उतरवल्या की मग त्यांची स्वतःच्या परिस्थितीत सुधारणा घडवायची इच्छा, स्वतःच्या हक्कांबद्दलची जाणीव वगैरे सगळं मरतं. पूर्वसंचित म्हणून आहेत ते भोग माणसं भोगत राहतात. मग वापरा अशी माणसं कशीही. क्रांतीची धमकच संपल्यावर सहिष्णु होणे एवढंच हातात उरतं अशा लोकांच्या. मग मागच्या जन्माचं फळ म्हणून आणि पुढच्या जन्मी चांगलं होईल म्हणून या जन्मात परमेश्वराच्या ठेकेदारांकडून हसतमुखाने लुबाडून घेतलं जातं.

In reply to by नगरीनिरंजन

इथे मी आपल्याशी साफ असहमत आहे. अशा प्रकारचे तत्वज्ञान ज्यांनी सांगितले ते कुणाच्या सांगण्यावरुन लुबाडण्यासाठी सांगितले असेल असे म्हणणे आततायी आहे. असे म्हणणे म्हणजे केवळ आणि केवळ माणसे मारण्यासाठी विज्ञानात शोध लावले असे म्हणणे आहे. असो. यावर सध्या तुमचे म्हणणे अमान्य आहे असे म्हणून आपली रजा घेतो. धन्यवाद.

In reply to by अवलिया

खरं आहे आपलं म्हणणं. जरा आततायीपणा झाला माझ्याकडून. तत्वज्ञान सांगणार्‍याचा हेतू शुद्ध असतो खरा पण ते तत्वज्ञान आणि तो हेतू त्याच्या नंतर एका पिढीपर्यंत तरी शुद्ध रूपात टिकवला जातो की नाही ही शंकाच आहे. बहुतेकवेळा त्याचा वापर करून काही लोक धार्मिक आणि सामाजिक सत्ताच मिळवताना दिसतात.

ज्या गोष्टी याजन्मात करायच्या राहून गेल्या त्या करण्यासाठी पुढचा जन्म आहे आपल्याला ,मृत्यू हाच सगळ्याचा शेवट नाही असे वाटणे यात गैर काय आहे ? प्रत्येकाला एक प्रश्न आयुष्यात कधी ना कधी विचारला जात असतो - पुन्हा दुसरा जन्म मिळाला तर कोण व्हायला आवडेल किंवा काय काय करायला आवडेल ? आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येकाकडे काय काय करायचे आहे याची यादीच तयार असते. या जन्मात कसेही वागावे , कुठे यायचे आहे इथे फिरुन परत ? ही भावना ही योग्य आहे का ? उलट आप्ण या जन्मात जे केले आहे त्याचे बरे वाईट फळ आपल्याला भोगावेच लागणार आहे, ते चुकणार नाही आहे. अश्या मुळे जर गैरकृत्याना काही प्रमाणात का होईना पण आळा बसणार असेल तर .... पुनर्जन्म या संकल्पनेत वाईट काहीच नाही.

पुनर्जन्मावर माझा विश्वास मागच्या जन्मीही नव्हता, ह्या जन्मीही नाही आणि पुढच्या जन्मीही असणार नाही :bigsmile:

मी विज्ञानवादी आहे की अंधश्रद्ध (की आणखी काही मधले) हे आपल्याला ठाऊक नाही, पण हां आपल्याला लै प्रश्न पडतात राव. त्यातले काही प्रश्न. १. मागल्या जन्मातले आठवते त्यांना आपला मागचा जनावराचा जन्म का आठवत नाही. की ज्या 'गिफ्टेड' लोकांना हे आठवते त्यांना 'लक्ष-चौर्‍यांशीच्या फेर्‍यातून न जाण्याची किंवा किमान दोन मनुष्यजन्म पाठोपाठ मिळ्ण्याची लॉटरी लागलेली असते. तसे नसेल तर मग मागल्या जन्मी मी लांडगा होतो नि ... जाऊ दे जनावराचे आयुष्य वर्णायचे म्हणजे श्लील-अश्लीलतेचे बीभत्सतेचे प्रश्न निर्माण होतील. २. नवरा नि बायकोचे सात-जन्मांचे कॉन्टॅक्ट असते ते सलग सात जन्मांचे की सलग सात (लक्ष-चौर्‍यांशीपैकी) 'मनुष्यजन्मांचे'? तसे असेल तर ते दोघेही एकाच वेळी मनुष्य म्हणून, विरुद्ध लिंगी, समवयस्क, एकाच भूभागावर, पत्रिका जुळावी अशा मुहूर्तावर.... वगैरे निकष पुरे करत योग्य वयात लग्न करण्याची प्रोबॅबिलिटी किती, ती किमान ७ भागिले लक्ष-चौर्‍यांशी इतकी आहे काय? २.१ मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले दोघे या जन्मी विरूद्ध जेंडर घेऊन (मागल्या जन्मीची स्त्री पुरूष म्हणून नि पुरूष स्त्री म्हणून) जन्मले नि या जन्मी पती-पत्नी झाले तर हा जन्म सात जन्माच्या कॉंट्रॅक्टमधे धरला जातो की नाही? ३. एखादा पुरूष पुढल्या जन्मी स्त्री म्हणून जन्माला येऊ शकतो काय. तसे असेल तर मागला जन्म आठवत असल्याने तो आपल्या सध्याच्या - म्हणजे या जन्मीच्या - पत्नीशी अधिक संवेदनशीलतेने वागतो का? याच्या उलटा प्रश्न स्त्रियांबाबत देखील विचारतो. ४. मागल्या जन्मी आपण दरवडेखोर होतो वा गुन्हेगार होतो किंवा आपण काही घोर चुका केल्या होत्या असे कोणालाच कसे आठवत नाही. ५. मागल्या जन्मी केलेल्या पापांचे भोग या जन्मी भोगावे लागतात असे म्हणतात. मग मागच्या जन्मी मला जन्मठेप झाली होती नि चौदा ऐवजी दहा वर्षातच मी खपलो होतो, तर सरकार मला या जन्मी उरलेले चार वर्ष तुरुंगवास भोगायला भाग पाडू शकेल काय? याचे उत्तर ’नाही’ असे असेल तर मग मागल्या जन्मीची पापांची फळे या जन्मी भोगावी लागतात हा ’कर्मसिद्धांत’ही खोटा म्हणावा का? आणखी ही बरेच प्रश्न आहेत, तूर्तास एवढे पुरेत. (अजन्मा) रमताराम

In reply to by रमताराम

६) तीच जोडी दरजन्मी (सात तरी) मेंटेन केली तर आत्ता आहेत तेवढेच परत परत जन्मत आणि जोडया जमवत राहायला पाहिजेत. पण लोक तर वाढताहेत. म्हणजे आत्मा दुभागून वेगवेगळ्या दोन / तीन / अनेक शरीरात जातोय. ७) जन्म त्याच योनीत दुसर्‍यांदा मिळत नाही हे काही सत्य नसणार. निदान गतजन्मांच्या पापपुण्याचा हिशोब ठेवण्याच्या गृहीतकासोबत ते टिकू शकत नाही. कारण मी समजा गतजन्मी मुंगी होतो. तर मुंगीच्या हातून पाप असे काय घडू शकते याचे उत्तर देणं कठीण जाईल. पापे "करण्या"साठी तरी दर जन्म मनुष्याचाच हवा. भोगण्यासाठी इतर चालतील. एकदा लॉजिक लावायला गेलं की प्रश्न फार येतात. त्यापेक्षा आपल्या समजुतीच्या कक्षेपलीकडे काहीतरी आहे आणि मला ते माहीत नाही हे मान्य करुन काही संशोधन होत असेल त्याकडे आशेने बघावं. (संशोधन म्हटलं तरी परत गृहीतकं आलीच.. :) )

In reply to by गवि

आणखी मुद्यांची भर घातल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे. कारण मी समजा गतजन्मी मुंगी होतो. तर मुंगीच्या हातून पाप असे काय घडू शकते याचे उत्तर देणं कठीण जाईल. पापे "करण्या"साठी तरी दर जन्म मनुष्याचाच हवा. का बरं. इतर सर्व 'प्रिविलेजेस' जशी माणसासाठी राखून ठेवण्यात आली आहेत तसे हे पाप करण्याचे प्रिविलेजसुद्धा आहे असे कुठे लिवलेले आमच्या तरी वाचण्यात आले नाय हो (एखाद्या बहुश्रुताला विचारू या का?). तुम्ही कशावरून म्हणता हे? दुसर्‍या मुंगीच्या वाट्याची साखर खाणे हे पाप होऊ शकते काहो? पण दुसर्‍या मुंगीचा वाटा निश्चित होण्यासाठी मुंग्यांमधे समाजवाद... चुकलो कम्युनिजम असतो का हे कसे तपासायचे? विजुभाऊंना विचारू या का? (विजुभाऊ ह. घ्या हे वे. सां. न. ल.)