Skip to main content

भारतातील मंदिरे-३

भारतातील मंदिरे-३

Published on 17/01/2011 - 17:01 प्रकाशित मुखपृष्ठ
भारतातील मंदिरे-३ देवळांचा पहिल्यांदा नजरेत भरणारा भाग म्हणजे त्याचे शिखर किंवा छप्पर.सर्वसाधारणपणे हे कोनाकृती असते. आपण पाहिले आहे की सुरवातीच्या देवळांची छप्परे सपाट होती. त्या ऐवजी हा त्रिकोणी आकार कसा आला ? एक विचार असा की सुरवातीला देवळे ही गिरिशिल्पे होती. म्हणजे नैसर्गिक गुहा मोठी करून त्यात देऊळ तयार केले वा डोंगर खोदून, गुहा निर्माण करून,त्यात देऊळ निर्माण केले. कसेही असले तरी लांबून हे देऊळ पहातांना, तुम्हाला त्याचे छप्पर म्हणून डोंगरच दिसतो; बरेचदा निमुळता होत गेलेला त्रिकोणी डोंगर. आता तुम्ही मैदानात देऊळ बांधले तर हा डोंगराचा भास निर्माण करावयाला डोंगर कोठून आणणार? तर त्या ऐवजी छप्परच निमुळते केले गेले. पणहे एकदम झाले नाही. सपाट छप्पर करणे तसे सोपे. भिंती उभ्या करा, त्यांवर वासे टाका, वाश्यांवर फ़रशा टाका. काम खलास. जो पर्यंत आकार लहान होता तो पर्यंत हे लिहण्यासारखेच सोपे होते. ३०-४० फ़ूट लांबीच्या, इमारती लाकडाच्या तुळया आसेतूहिमालय सर्वत्र मिळत होत्या. देवळाचा आकार वाढल्यावर दगडी छप्परांचे वजन इतके वाढले की त्यांचा भार लाकडी तुळयांना झेपणे अशक्य झाले. दगडी तुळयांना भार झेपला असता पण एवढ्या लांब दगडी तुळया मिळणे शक्यच नव्हते.या करिता काय उपाय शोधले गेले ते पहाण्या आधी सपाट छपारातील एक बदल (Veriation) पाहू. या प्रकारच्या छप्पराला नाव आहे "गजपृष्ट". नाव मजेदार वाटते पण आहे मात्र एकदम चपखल. सपाट छपराचा एक मोठा तोटा म्हणजे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास जागा नसे. उपाय सोपा असल्याने लगेच अमलात आणला गेला. आयताकृती छप्पराच्या समोरासमोरच्या दोन बाजू उतरत्या केल्या म्हणजे पाणी साचत नाही. आणि असे छ्प्पर हुबेहुब हत्तीला मागून पाहिले तर त्याच्या दिसणाऱ्या पाठीसारखे दिसते. द्राविड शैलीच्या देवळांची बरीच छप्परे अशी असतात. महाबलीपुरम येतील मंदिराच्या चित्रावरून एकदम पटेल आता उपाय बघू. पहिला उपाय म्हणजे मधे खांब उभे करणे. हे "कॉलम" म्हणून काम करतात आणि "बीम"ची लांबी एकदम कमी होते. ४० फ़ूट X ४० फ़ूट च्या मोठ्या दालनात दहा दहा फ़ूटावर नऊ खांब उभे केलेत तर तुळईची लांबी दहा फ़ूटावर येते. आणि जर हे खांब सुशोभित केले तर ते कशाकरिता बांधले हे ही लक्षात येत नाही. उलट " या देवळाचे खांब मोजता येत नाहीत " अशीच प्रशंसा केली जाते!".अबब म्हणावयाचे आहे? श्रीरंगमच्या विष्णुमंदिरातील एका मंडपाचे नाव आहे "हजारीमंडप" लांबी १७५ मी. व रुंदी ५० मी. यात फक्त ९५३ खांब आहेत ! बाजूचे स्तंभ साडे तीन मीटर उंच आहेत, आतले त्याच्या दुप्पट.सगळे दगडी आणि बारकाईने कोरलेले ! आता बोला. पण स्थपतींना पूर्ण कल्पना होती की हे खांब अडचण आहेत. नृत्यमंडपात, कल्याणमंडपात त्यांना जागा नाही. त्यांनी कमानीची कल्पना छप्पर बांधण्याकरिता वापरली.छोटे दगड किंवा वीटा कमानी व तत्जन्य घुमट उभारण्याकरिता वापरले गेले. वापर वीटांचा आहे व उदाहरणेही फ़ार नाहीत. पण घुमट आहे म्हणून त्यांना Indo-sarsenik म्हणावयाचे कारण नाही. आणि एक मार्ग म्हणजे दगडांचे एकावर एक असे थर बसावयाचे की मधल्या उघड्या भागाचा आकार कमी कमी होत जाईल व शेवटी सर्वात वर एवढाच आकार राहील की तो एकाच दगडाने झाकता येईल. तंजावूर येथील बृहडेश्वर मंदिरातील हा शेवटचा दगड ८३ टन वजनाचा आहे ! पिरॅमिड्सची आठवण झाली की नाही ? बांधणीमुळे छपराला "पायऱ्या" किंवा "मजले" निर्माण होतात. अर्थातच अशा छप्परांचा भार प्रचंड असल्याने भिंती भक्कम, जाडजूड लागतात. वरच्या पायरीचा प्रत्येक दगड खालच्या पायरी़च्या थोडासा पुढे झुकलेला दिसतो. हे काम फ़रशा भिंतीला समांतर मांडून करता येईल वा चौकानाचे कोन छेदले जातील अशा प्रकारे फ़रशा मांडून करता येईल.उतरंडीच्या छप्पराच्या या पायऱ्या सलग एका रेषेत असतील तर ती नागरी शैली; मजले स्पष्ट दिसत असतील तर द्राविड शैली. पण हे मजले वेगळे आहेत याची जाणीव ठेवण्याकरिता त्यांना "भूमि" म्हणतात. मंदिरांच्या शैलींची माहिती आपण पुढे घेणार आहोतच; पण इथे नमुद करून ठेवावयास हरकत नाही की नागर व द्राविड शैलींमध्ये " भूमी"चे सुशोभन वेगवेगळ्या पद्धतीने करतात व हा दोहोंमधील एक महत्वाचा फरक आहे. भिंतींचे सुशोभन करण्यासाठी वापरावयाचे सर्व साधने येथेही वापरण्यात आली आहेत.कलष, मूर्ती, स्तंभ, कोनाडे, पाने-फ़ुले, मिथुने, रत्नहार इत्यादी सर्वांचा उपयोग केला गेला. सगळ्यात जास्त गमतीचा भाग म्हणजे ही शिखरे गाभारा-मंडप यांच्यावरून खाली उतरून देवळासमोर गोपुरे म्हणूनही आली. काही फ़ोटो बघू. (आणि देवळांच्या प्रयेक फ़ोटोत छप्परे दिसतातच की.) मजले कसे तयार करत याचे एक चित्र पहा. खालचा मोठा चौरस भाग फरश्या आत आत आणत वर लहान झाला आहे. Vimaan scetch (१) महाबलीपुरम ...गजपृष्ट छप्पर. शेजारी हत्ती असल्याने लगेच साम्य कळते. Gajaprusht- mahaabalipuram (२) पट्टडकलु-१ ... द्राविडी शैली. भूमीचे स्थर वेगवेगळे दिसतात. Pattadakalu-2 (३) पट्टडकलु-२ ... नागरी शैली. भूमींचे कोन एका रेघेत. Paattadakalu-1 सौजन्य : श्री. धनंजय. (४) सोमनाथपूर . भूमी एकदम निरनिराळ्या बघता येतात. somanaathapur-4 (गोपूरांची छायाचित्रे कोण देतो बरे ? ) पुढील भागात "गिरीशिल्पे" यांची माहिती घेऊ. शरद

याद्या 4223
प्रतिक्रिया 12

सध्या असे एकून आहे की मंदीर ऊभारणीसाठी जमीन संशोधन पण केले जायचे/ वीशेषतः मातीचा नमूना वगैरे घेउन. त्याबाबत थोडा प्रकाश टाकता येइल काय ?

In reply to by आत्मशून्य

श्री. आत्मशून्य व हर्शद यांनी मागितलेली माहिती शोधत अहे. पण गंमत म्हणून मित्राने कळवलेली बातमी बघा. स्पेनमध्ये एके ठिकाणी तेथील मुसलमान समाजाने मशीद बांधावयाचे ठरविले; स्थानिक लोकांचा विरोध डावलून. मग लोकांनी त्या जागेत एक मेलेले डुक्कर पुरले व त्याला भरपूर पब्लिशिटी दिली. आता मुसलमानांच्या धार्मिक रिवाजा प्रमाणे तेथे मशीद बांधता येत नाही ! प्रश्न मितला. शरद

श्री. शरद साहेब, वर आत्मशुन्य यांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे माझ्याही काही शंका आहेत, या एका तेलगु चित्रपटावरुन आलेल्या आहेत. १. दगडांमध्ये स्त्री , पुरुष व इतर असे प्रकार असतात काय ? २. देवांच्या व देवींच्या मुर्तीसाठी वापरण्यात येणा-या दगडांत फरक असतो काय ? ३. जो दगड मंदिराच्या बांधकामात वापरलो जातो तो मुर्तिसाठी वापरत नाहीत असे असते काय ? माझा एक जुना अनुभव आहे, एका मंदिरात काम करताना आम्ही देवाच्या आसनाच्या दुरुस्तीसाठी वेगळे सिमेंट, विटा व वाळु आणत होतो, ते बाहेर कुठेही वापरायची आम्हांला परवानगी नव्हती, उरलेला सगळा माल टाकुन द्यावा लागत असे. तसेच ते काम होते ८ दिवसांचे पण प्रत्येक दिवस आणि प्रत्येक दिवसाची विशिष्ट वेळ पाळणे या मुळे अडीच महिने केले होते. तो तेलगु चित्रपटाचे नाव किंवा युटुबची लिंक मिळाली की देतो लगेच. हा चित्रपट मुर्तिकार / मंदिरकार बाप लेकावर आधारित आहे. दोन पिढ्यातील संघर्ष मुर्तिकलेच्या / मंदिरकलेच्या माध्यमातुन दाखवला आहे. बाप आपल्या मुलाला मंदिराच्या शिखरावर काम करत असताना वरुन छिन्नी हातातुन सोडुन मारुन टाकतो असा शेवट आहे. इतर कोणाला माहित असेल तर मदत करावी.

In reply to by ५० फक्त

श्री. शरद साहेब,, हर्षद साहेबांप्रमाणे मला पण एक अनुभव आला आहे... ((एका मंदिरात काम करताना आम्ही देवाच्या आसनाच्या दुरुस्तीसाठी वेगळे सिमेंट, विटा व वाळु आणत होतो, ते बाहेर कुठेही वापरायची आम्हांला परवानगी नव्हती, उरलेला सगळा माल टाकुन द्यावा लागत असे. तसेच ते काम होते ८ दिवसांचे पण प्रत्येक दिवस आणि प्रत्येक दिवसाची विशिष्ट वेळ पाळणे या मुळे अडीच महिने केले होते. )) माझा अनुभव असा की : एका रात्रीत मंदीर बांधून काढायचे, जर झाले नाही तर आहे तसेच सोडायचे(सुर्योदया पूर्वि). मग त्या देवाचा कोप ई.ई. आमच्या येथे एक पुरातन मंदीर होते, त्या बाबत ही आख्यायिका सांगितली जाते. पण ते आता हल्लीच बांधून झाले एका रात्रीत. याबाबत आपण अधिक सांगू शकाल का??? अर्थातच ते सर्व वास्तूशैली झाल्यावर. एक "मंदीरांच्या आख्यायिका" अशी लेख्माल येवूदेत की...

अतिशय माहिती पुर्ण लेख. देवळाच बांधकाम अस वैशीष्ट्य पुर्ण असल्यानेच आपल्या मनात नतमस्तक व्हायची भावना अतिशय प्रबळ होत असावी. पुर्वी अंबाबाईच देउळ कस थंडगार अन भारित करणार वाटत असे, पण आत्त्ता तिथे कुण्या मुर्खान मार्बल घालुन एक तर ते उष्ण वाटत अन त्याचा देउळ पणा हरवल्या सारख वाटत. वर गर्दी तर मरणाची अन सारा बाजार!! पण बालाजी मात्र त्या काळ्याशार राउळात एव्हढा वेळ रांगेत उभा राहुन ही डोळ्याच पारण फेडतो नाही?

वाचत आहे. नवीन माहिती समजत आहे. एक विनंती: फोटू पिकासावर डकवा. फ्लिकर हापिसात ब्यान असल्याने फोटू पाहाता येत नाहीत.

वाचत आहे...बरीच नविन माहिती कळाली!