मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संचित

रणजित चितळे · · काथ्याकूट
आपल्याला रस्त्या मधून जाताना एखादा रोगाने त्रस्त असह्य भिकारी दिसतो, कोणाला जन्मताच असाध्य वेदना देणारा रोग असतो, कोणी अंबानीचा पोर असतो जो हजारो करोडोंचा मालक असतो कोणी राहुल गांधी जन्मताच एका साम्राज्याचा धनी असतो (पुढे ते टिकेल, नाही टिकणार तो मुद्दा सोडला तर) (अशी अजून टोकाची भरपूर उदाहरणे मिळतील). ह्या पार्श्वभूमीवर चर्चेचा प्रस्ताव मांडलेला आहे. १. संचित (हा जन्म व पुर्वजन्म) मानायचे का. नसेल तर वर वर्णन केलेली टोकाची परिस्थिती उपभोगण्याला कारणे कोणती. २. जे आस्तिक आहेत त्यांचे काय मत आहे (व काय उत्तर आहे ह्या टोकाच्या परिस्थितीवर). ३. जे धर्म पुर्वजन्म मानत नाहीत (क्रिस्त धर्म) त्यांचे काय उत्तर असेल. ४. अशी टोकाची परिस्थिती काहीच का उपभोगतात म्हणजे हे जर रँडमली (मराठी पर्यायी शब्द) होत असेल तर त्यांनाच का उपभोगायला लागते इतरांना का नाही. लॉटरी समजण्या सारखे सोपे आहे का इत्यादी. ५. शास्त्रीय समर्पक उत्तर आहे का ह्याला - की काहीच लोकांना का भोगायला लागतात हे भोग. काही शब्दांच्या परिभाषा दिल्या आहेत. संचित – मनुष्याने आजच्या क्षणा पर्यंत केलेले सर्व कर्म (त्या कर्मांच्या परिणामांचा साठा). त्याचे दोन भाग प्रारब्ध आणि अनारब्धकार्य. प्रारब्ध (किंवा प्रारब्धकार्य) – संचितापैकी जेवढ्या कर्माची फळे भोगण्यास सुरवात झाली त्याला म्हणतात. अनारब्धकार्य – ज्या कर्माची फळे भोगायला अद्याप सुरवात झाली नाहीत त्याला म्हणतात.

वाचने 2757 वाचनखूण प्रतिक्रिया 8

sagarparadkar 18/12/2010 - 12:50
हेच प्रश्न माझ्यापण मनात अनेकदा येतात. पण समर्पक उत्तरं काही मिळत नाहीत. कदाचित कधीच मिळणार पण नाहीत असं वाटतय. पण ही चर्चा फारच छान रंगेल असं वाटतंय, बरं झालं हा प्रश्न चर्चेला घेत्लात तो. इतर अनेकांची मतं आजमावता येतील ...

सूर्यपुत्र 18/12/2010 - 16:39
की आधीच्या जन्मातील मॄत्यूच्यावेळी जो संस्कार प्रबळ असतो, तदनुसार पुढील जन्मातील कर्मे ठरतात. नक्की माहित नाही. (अध्यात ना मध्यात)

पैसा 18/12/2010 - 19:56
एखाद्या माणसाच्या गरीब किंवा श्रीमंत असण्यात त्याच्या पूर्वजन्मीचा किती वाटा असेल कोण जाणे! कारण पूर्वजन्म आहे की नाही हा मोठाच वादाचा विषय आहे. आणि त्यावर काही भाष्य करण्याएवढा माझा अधिकार नाही किंवा अभ्यासही नाही. "आप मेला जग बुडाला" आणि "केलेलं सगळं याच जन्मी" अशा २ म्हणी नेहमी ऐकलेल्या आहेत. आपण केलेल्या कर्मांचे बरे वाईट परिणाम लवकर नाहीतर उशीरा बघायला मिळतातच. कोणाचं वाईट काही केलं तर लोकांचे शाप लागतात असंही बरेचजण मानतात. फक्त आपल्या देशापुरतं बोलायचं तर गरीब लोकांची संख्या श्रीमंतांपेक्षा प्रचंड प्रमाणात जास्त आहे. पूर्वजन्म आणि संचिताचा खेळ मानायचा तर या सगळ्या लोकानी पूर्वजन्मात खूप काहीतरी वाईट गोष्टी केल्या असाव्यात असा निष्कर्ष निघेल, जो मला तरी पटत नाही. कारण बहुसंख्य लोक हे शक्य तेवढं चांगलंच वागत असतात. तर श्रीमंत घरात जन्माला येणे हे प्रारब्ध असावे. "नशीब" हा एक घटक नक्कीच आहे. पण प्रचंड मेहनत करून आपली परिस्थिती बदलणारे लोक आहेत, तसेच सगळं चांगलं चाललेलं असताना काहीतरी करून आपल्या हाताने आपल्या आयुष्याची वाट लावणारेही आहेत. संचित असो, प्रारब्ध असो, त्याव्यतिरिक्त तुम्ही लिहिलेला तिसरा शब्द म्हणजे "अनारब्धकार्य". याचा सोयीसाठी अर्थ मी या जन्मातलं कर्म असा घेते. बरोबर की चूक माहिती नाही. पण माणसाच्या परिस्थितीला या जन्मातले कर्मही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असावे, असं मला वाटते.

In reply to by पैसा

रणजित चितळे 19/12/2010 - 10:45
पैसा ह्यांना तर श्रीमंत घरात जन्माला येणे हे प्रारब्ध असावे. "नशीब" हा एक घटक नक्कीच आहे. पण प्रचंड मेहनत करून आपली परिस्थिती बदलणारे लोक आहेत, तसेच सगळं चांगलं चाललेलं असताना काहीतरी करून आपल्या हाताने आपल्या आयुष्याची वाट लावणारेही आहेत. प्रचंड मेहनत करण्याने परिस्थिती बदलते का त्याला नशिबाची जोड असते. कधी कधी जन्म भर प्रचंड मेहनत करत राहुन सुद्धा परिस्थितीत फरक पडत नाही किंवा अजुन बिघडते.