मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फाशीपेक्षा काही अजून?

गवि · · काथ्याकूट
आधी नुसतीच माहिती..गायीची माहिती असते तशी.. अफगाणिस्तान,बांगलादेश, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, भारत, इराण, इराक, जपान, कुवेत, उत्तर कोरिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, सिंगापूर, अमेरिका, विएतनाम, येमेन हे सर्व देश मृत्युदंड देतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान या सर्व देशांनी मृत्युदंडाची शिक्षा कायद्यातून काढून टाकली आहे. सर्व प्रकारच्या गुन्ह्यांसाठी फाशी रद्द केली आहे असे एकूण देश : ब्याण्णव. फक्त स्पेशल गुन्ह्यांसाठी फाशी राखून ठेवली आहे असे देश: दहा.. (बाय द वे याला काही अर्थ आहे का च्यायला..?) फाशी देण्याची तरतूद आहे पण गेल्या दहा वर्षात वापरली नाही असे देश: बत्तीस फाशी चालू आहे आणि रेग्युलर देतातही असे देश: चौसष्ठ. कायदेशीर मारण्याच्या पद्धती: फासाला लटकावणं, विजेचा शॉक, विषारी इंजेक्शन,फायरिंग स्क्वाड, डोकं उडवणं, गॅस चेंबर. मोस्ट कॉमन ते अनकॉमन या क्रमानं दिलेत. इतिश्री विकिपीडिया प्रसन्न.. आता माहिती संपली. आता खोबरं घातलेल्या कांदे पोह्यांसारखा उहापोह. उगीच बॅकग्राउंड बनवत नाही.. एकूणात टर्मिनल किंवा कॅपिटल पनिशमेंट असावी का नाही हा "गे-लेस्बियन", "लिव्ह इन रिलेशन", "हिंदू-मुस्लीम" इतकाच चघळण्याचा चटकदार विषय. तो तसा राहू नये आणि एक नक्की, खात्रीचं कन्विन्सेबल मत आपल्या देशात तरी तयार व्हावं अशी दिल से इच्छा आहे. फाशी विरोधकांचे मुद्दे: -क्रूर आणि अमानवी..कायदेशीर खून. म्हणून तो नकोच. -चुकीचा निर्णय होण्याची शक्यता. (कोणतीही न्यायव्यवस्था फुलप्रूफ नसते हे गृहीतक) फाशी म्हणजे चुकीचा निर्णय बदलण्याची संधीच न ठेवणं.. -जगण्याचा मूलभूत अधिकार गुन्हेगारालाही आहेच. मग फाशी कशाला? -जन्मठेपही पुरेशी वचक बसवणारी असते मग फाशी कशाला.. ? -फाशीने गुन्ह्यांची संख्या कमी होत नाहीये. म्हणून ती इफेक्टीव्ह नाहीये. फाशीच्या बाजूनं असणा-यांचे मुद्दे: - सेन्स ऑफ जस्टीस. न्यायाचं समाधान. खून के बदले खून. आय फॉर आय. जिवासाठी जीव.. - जन्मठेपेपेक्षा कमी खर्चिक. - गुन्हेगाराला जिवंत ठेवलं तर नंतर सुटण्याची, पळून जाण्याची संधी राहते. फाशीने ही संधी मिळत नाही. - जन्मठेप ही जास्त त्रासदायक आहे. त्यापेक्षा फाशीने सुटका मिळते. -चुकीचा न्याय हा जसा फाशीच्या बाबतीत होऊ शकतो तसाच जन्मठेपेच्याही बाबतीत होऊ शकतोच. आता...... विमान अपहरणाच्या धमकीनं स्वहस्ते दहशतवाद्यांना गाडी घोडा करून सोडून यावं लागणं. अफझल गुरुजींची फाशी थांबून राहणं. शेकडो लोक फाशी होऊनही प्रत्यक्ष एक्झेक्युशन न झाल्यानं रोज मरणाची वाट पाहत बसलेले असणं. अशा खूप खूप मोठ्या पार्श्वभूमीच्या कॅनव्हासवर सरळसोट उत्तर मिळणं अशक्यच दिसतंय असे माझे प्रश्न: मृत्युदंड भयानक की जन्मठेप ?(सश्रम कारावासात मनुष्य "ऑक्युपाईड तरी राहतो..विनाश्रम कारावास दिला तर?, खोलीत चौदा वर्षं नुसतं बसून राहणं..हे नीट विचार केला तर मरणाहूनही भयानक वाटतं का?!!) मृत्युदंडाचा वचक, भीती खरंच बसते का? मृत्युदंड कायद्यातून काढून टाकावा का? कायद्याने शिक्षा देण्यात "सूडभावना" असण्यात गैर काय? सूड ही "लेजिटिमेट" विषयवस्तू नाहीये का?

वाचन 11127 प्रतिक्रिया 0