Skip to main content

दर्शने ४. अद्वैत दर्शन

दर्शने ४. अद्वैत दर्शन

Published on गुरुवार, 11/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
अद्वैत (वेदांत, शांकर) दर्शन वेदातील ज्ञानकांडावर निनिराळ्या ऋषीनी आपले विचार मांडले; ती झाली उपनिषदे.हे विचार वेगवेगळ्य़ा व्यक्तींचे असल्याने भिन्न भिन्न होते. इतकेच नव्हे तर काही वेळा विरोधीही होते. या गोंधळातून मार्ग काढून काही तरी सुसूत्र ठाम विचारप्रणाली समोर ठेवावी म्हणून बादरायण मुनींनी ५५० सूत्रांची "ब्रह्मसूत्रे" रचली.. ही झाली अद्वैताची गंगोत्री. अर्थात ही फार क्लिष्ट असल्याने त्यावर २४ आचार्यांनी टीका लिहल्या व त्यातून आपल्याला काय वाटले ते मांडले. शंकराचार्य आपल्या मताला म्हणतात अद्वैत, रामानुज विशिष्टाद्वैत व मध्वाचार्य शुद्धाद्वैत..जाऊ द्या. आपण फक्त अद्वैताची थोडी माहिती घेऊ. तसे हे तत्त्वज्ञान सोपे असावे. कारण शंकराचार्य एका ओळीत सार सांगतात : "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर: " मराठीत " ब्रह्म हे एकच खरे आहे, (दिसणारे) जग खोटे आहे; जीव व ब्रह्म एकच आहे " काय कळले ? खरे म्हणजे काहीच कळत नाही. कारण जग, जीव ब्रह्म म्हणजे काय हे तर कळले पाहिजे ना. या काही कल्पनांची ओळख पहिल्यांदी करून घेऊ. माझी गाडी, माझा हात असे आपण म्हणतो तेव्हा आपल्या लक्षात येते की मी म्हणजे गाडी नव्हे वा हात नव्हे.या मीला म्हणावयाचे आत्मा किंवा जीव. हा कोणी नाकारत नाही. मी नाही असे कोण म्हणणार हो ? हा जीव शरीरात असतो तो पर्यंत शरीर चेतनामय असते. तो शरीरात नसतो तेव्हा शरीर अचेतन किंवा जड होते. म्हणून जीव नसलेल्या वस्तूं उदा. दगड, घर, गाडी, कपडे हे जड पदार्थ. कार्यकारण संबंध. : माती घेऊन कुंभार निरनिराळ्या आकाराची मडकी, घट, पणत्या बनवतो. आकार निरनिराळे असले तरी शेवटी सर्वात मातीच आहे व फक्त मातीच आहे. तेव्हा माती हे कारण व घट हे कार्य. तेच सोनाराचे. सोन्यापासून बनवलेल्या अलंकारात खरे तर फक्त सोनेच असते. सोने हे कारण व अलंकार हे कार्य. जेथे कार्य आहे तेथे कारण पाहिजेच. तेव्हा आता सगळ्या जगाचा विचार केला तर हे पटते की या सर्वाला कारण पाहिजेच. पण माती, सोने वगैरे काही जगाचे कारण होऊ शकत नाहीत. सर्व जगाचे कारण असलेल्याला म्हणावयाचे ब्रह्म. आकार : आकाराला अस्तित्व नाही. असे बघा, वर्तुळ हा एक आकार झाला. तो कागदावर चित्ररुपाने दिसतो, सोन्याच्या कड्याच्या रुपाने दिसतो. पण कागद, सोने काढून टाका. वर्तुळ नाहिसे झाले. त्या वर्तुळाला अस्तित्वच नव्हते. आकाराला अस्तित्व नाही म्हटले की पुढची पायरी म्हणजे चेंडूला अस्तित्व नाही, झाडाला अस्तित्व नाही.... जगाला अस्तित्व नाही. पण मला तर चेंडू दिसतो, मी त्याने खेळतो. काय भानगड आहे ? पुढे बघू. आत्मसत्ता : आत्मसत्ता स्वयंसिद्ध आहे. "विज्ञातारं अरे केन विज्ञानियात (ब्रुहदा.उप.) जो स्वत: ज्ञाता आहे त्याला दुस्र्‍या कोणत्या उपायाने जाणावे ? सूर्याच्या प्रकाशाने सगळे जग प्रकाशित होते पण सूर्याला कोण प्रकाशित करणार ? अग्नीचा " जाळणे" हा स्वभाव आहे. तो इतरांना जाळू शकतो. अग्नीला कोण जाळणार ? जीव आणि जगत यात सत्ता जीवालाच असणार, जगताला नाही.सोनार दागिने बनवत असेल तर सत्ता सोनाराला, दागिन्यांना नाही. रज्जु - सर्प न्याय : अंधारात दोरी पडली असेल तर तो साप आहे असे वाटते. दिवा आणून पाहिले की कळते "ही दोरी, साप नाही ".वाळवंटात शिपीवर ऊन पडले की चांदीचा भास होतो,हातात शिंपी घेतली की कळते "ही शिंपी, चांदी नाही". दोरीच्या या काल्पनिक भासाला, परिवर्तनाला म्हणतात विवर्त. मायावाद : ब्रह्म, सर्व जगाचे आदिकारण, हे सत ,चित, व आनंदमय आहे. मग हे खोटे जग दिसते तरी का ? याला कारण माया किंवा अविद्या. माया ही ब्रह्माची शक्ती. या मायेच्या ठिकाणी दोन शक्ती आहेत. आवरणशक्ती व विक्षेपणशक्ती.पहिल्या शक्तीने ती ब्रह्माचे शुद्ध स्वरूप झाकून टाकते.(एखाद्या छोट्या ढगाने सूर्याला झाकून टाकावे तसे.) व दुसरीने हा ब्रह्मांडाचा खेळ उभारते ईश्वरविचार : ब्रह्म हे निर्विशेषच पण मायेने झाकाळल्यावर ते सविशेष किंवा सगुण रूप धारण करते. त्याला म्हणावयाचे ईश्वर. हा सर्वज्ञ, सर्वेश्वर, सर्वकाम,सर्वनियंता,सर्वांतरयामी जगत्कारण इ. आहे. सर्व जीवांना तोच प्रेरणा देत असतो.जगत्निर्माण त्याची लीला आहे. तो जगताचे निमित्तकारण व उपादानकरण आहे. म्हणजे या घटाच्या संदर्भात तो मातीही आहे व कुंभारही. जगद विचार : सत्य कोणाला म्हणावयाचे ? जे परिवर्तित होत नाही ते. जग तर सारखे बदलत असते. तेव्हा, या अर्थाने, जग सत्य नाही वेदांतात सत्ता तीन प्रकारची मानली आहे. (१) प्रातिभासिक.: रज्जुसर्प न्यायात सर्पाची सत्ता भासते पण नंतर नष्ट होते. (२) व्यावहारिक : नामरूपात्मक जगात ही आवश्यक आहे. (३)पारमार्थिक : ही खरी सत्ता. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने जगाकडे पाहिले असता ते असत्य दिसते. पण व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर जग मिथ्या नव्हे. जीवविचार : एक घडा आहे. त्यात आकाश आहे. घड्याबाहेरही आकाश आहे.दोन वेगळीवेगळी आहेत का ? नाही. दोनही एकच. घडा फुटला तर आतले आकाश कुठे बाहेर निघून जात नाही ते बाहेरच्या आकाशात मिसळत नाही. ते आहे तेथेच असते, फक्त आपणास ती एकरूप झालेली दिसतात. तसे जीव (आत्मा) व ब्रह्म यांचे आहे. घटाच्या आतल्या आकाशाला जीव म्हणा बाहेरच्याला ब्रह्म. दोन्ही एकच. उपनिषदातल्या "तत्त्वमसि" या महावाक्याचा अर्थ हाच. ते (ब्रह्म) तू (जीव) आहेस. मायेचा परिणाम : जर ब्रह्म व जीव एकच आहेत तर मी-तू हा भाव रहाताच कामा नये. कारण मी व तू हे दोघेही एका ब्रह्माचेच भाग आहेत. पण माया जीवावर आवरण घालून ह्या एकात्मतेचा त्याला विसर पाडते. जगातील सर्व सुखदु:खे,लोभ, भांडणे,मोह इत्यादींचे कारण हा पडदा. विवर्त पहा. तुम्हाला दोरीच्या ठिकाणी सर्प दिसू लागतो. ज्ञान : सुखादु:खाबद्दल वैराग्य, मनाची एकाग्रता, इंद्रियनिग्रह, उपरती, गुरूकृपा अशा कारणांनी माणसाच्या मनात ज्ञानाचा उगम होतो व मग तो हा पडदा दूर करू शकतो. वेदांतात ज्ञानाला फार महत्व आहे. भक्तीला नाही. मोक्ष : साधकाने श्रवण, मनन व निजिध्यास या गोष्टी साध्य करून परोक्षज्ञान अपरोक्षज्ञानात रुपांतरित केले की त्याला "अहं ब्रह्मास्मि" मीच ब्रह्म आहे, याचा अनुभव येतो. त्याला म्हणावयाचे मोक्ष. (१) ब्रह्म सत्य, (२) जग मिथ्या, (३) ब्रह्म व जीव एकच या तीन गोष्टी अद्वैत तत्त्वज्ञान या प्रकारे मांडते. मीमांसा व अद्वैत ही आस्तिक दर्शने आहेत. चार्वाकदर्शन हे नास्तिक. उपक्रमच्या दिवाळी अंकात ते दिले आहे. आपण ते तेथे पाहू शकता. दर्शने हा तसा किचकट विषय. पण सांख्यविचार हे जगातले पहिले तत्त्वज्ञान आहे. भारतातल्या या उज्वल परंपरेची ओळख (आमचे पूर्वज महान होते !), निदान तोंडओळख करून देण्याचा हा तोकडा प्रयत्न. शरद

याद्या 18269
प्रतिक्रिया 44

सर्वप्रथम तुमचे आभार. खुपच छान ओघवत्या आणि सोप्या भाषेत निरुपण केलत. आता हे सर्व कळलं असं म्हणणे धाडसाचे ठरेल पण समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय. बाकी सर्व मुद्दे एका लिंक मधे बसताहेत... पण हा ईश्वरविचार अजीबात कळला नाहि. या सर्व थेअरीमध्ये तो "ऑउट ऑफ सिंक " वाटतोय. थोडं आणखी समजुन सांगा ना. अर्धवटराव

मोक्ष : साधकाने श्रवण, मनन व निजिध्यास या गोष्टी साध्य करून परोक्षज्ञान अपरोक्षज्ञानात रुपांतरित केले की त्याला "अहं ब्रह्मास्मि" मीच ब्रह्म आहे, याचा अनुभव येतो. त्याला म्हणावयाचे मोक्ष हे बरोबर आहे का?कारण अह॑ ब्र्ह्मास्मि मध्ये थोडा अह॑ उरतोच. म्हणजे अह॑ ब्रम्हास्मि,तत्वमसि,सोह॑-ह॑सा,सर्व॑ खल्वि॑दम ब्रम्हा इत्यादि पायर्‍र्या चढून जायला नको का? दुसरे असे की,ज्ञानोत्तर भक्ती आहेच की.मग सरळ भक्तीमार्गाला का जाउ नये? क्रुपया खुलासा केला तर बरे.

In reply to by kamalakant samant

सामंत साहेब, युजी कृष्णमूर्तींनी सांगितलेला "अहं ब्रम्हास्मि" वरचा एक जोक आठवतो. कुठल्यातरी पागलखान्यात एक वेडा ओरडत होता - "आय अ‍ॅम दि सन ऑफ गॉड, आय अ‍ॅम दि सन ऑफ गॉड" दुसरा ओरडू लागला, "नो, यू आर नॉट सन ऑफ गॉड.. आय नो इट फॉर शुअर.." पहिला वेडा म्हणाला, "हाऊ डू यू नो दॅट?" दुसरा वेडा म्हणाला, "आय नो इट बिकॉज आय अ‍ॅम दि अलमायटी गॉड! आय हॅव नॉट क्रिएटेड यू!" पागलखान्यात ओरडणारे हे वेडे आणि कुठल्यातरी पर्वतातील गुहेत बसून "अहं ब्रम्हास्मि‌ऽऽऽ अहं ब्रम्हास्मिऽऽऽ " अशा आरोळ्या ठोकणारे ऋषि-मुनी यांच्यात काय फरक? हे लोक पण स्वत: इतर काही नाही तर थेट "ब्रम्ह" असल्याच्या आरोळ्या ठोकत असतात.

इतर साधना॑नी केवल ज्ञान झाल्यान॑तर , मन कशाच्या सहाय्याने ठेवावे? तेवढाच उच्च आन॑द भक्तीमध्येच मिळू शकतो. म्हणजे अगदी समाधी अवस्था प्राप्त झाली तरी त्यातून उतरल्यान॑तर तेवढाच उच्च आन॑द केवळ भक्तीतच आहे. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती.

(१) ईश्वरविचार : आपण एकदम बरोबर. इथेच काय, पण एकंदर अद्वैतात ईश्वर हा तसा उपराच. ब्रह्म म्हणजे ईश्वर नव्हे. मायेने झाकोळलेली ब्रह्माची प्रतिमा म्हणजे ईश्वर. ईश्वरात तरतम भाव लावावयाचा अवघडच पण निर्गुण ईश्वर हा सगुण ईश्वरापेक्षा लवमात्र वरचाच. पण त्याला नाही म्हणणेही सोपे नव्हते कारण मग तुम्ही नास्तिक ठरता व ते परवडणारे नव्हते. तसेच द्वैतवाद्यांशी भांडतांना हाताशी एक ईश्वर असलेला बरा. ईश्वराचा आणखी एक उपयोग म्हणजे माणसाच्या भलेवाईट कर्माची फले माया वा ब्रह्म देत नाही; त्या क्ररता ईश्वर ठीक. (१)अद्वैताला भक्ती मान्यच नाही. साधी नाही व ज्ञानोत्तरही नाही. भक्ती मानली की द्वैत आले, अद्वैताचा कणाच मोडला की. अद्वैत फक्त ज्ञान मानते. (३) "अहं ब्रह्मस्मि" ची पुढची पायरी "सर्वं खल्विदंब्रह्म " असे म्हणणे बरोबर नाही. एकदा ब्रह्मपदी पोचल्यावर तरतम नाही. काय होते एखादा माणुस ब्रह्मपदी पोचल्यावर जग विसरून जातो. त्याला काही मिळवण्यासारखे नसल्याने तो एकदम अलिप्त होतो. पण ज्ञानेश्वर, तुकाराम या सारख्यां महात्म्यांची विचारसरणी निराळी असते. त्यांना स्वत:ला काही मिळवावयाचे नसले तरी आजुबाजूच्या बुडणार्‍या जनांबद्दल त्याच्या मनात कणव असते. त्या त्यांच्या करुणेत सर्व खलु इदं ब्रह्म याचा साक्षात्कार झालेला दिसतो. तरीही ही एक शक्यताच. आपण कोण या बद्दल काही सांगू शकणारे ? शरद

In reply to by शरद

(१)अद्वैताला भक्ती मान्यच नाही. साधी नाही व ज्ञानोत्तरही नाही. भक्ती मानली की द्वैत आले, अद्वैताचा कणाच मोडला की. अद्वैत फक्त ज्ञान मानते. हे तितकेसे पटत नाही. अद्वैत साधना द्वैतातूनच सुरु होते.भक्तिचे एक साधन म्हणून नामस्मरणाचा विचार केला तर असे लक्षात येइल की नामस्मरण करता करता 'मी' चा लोप झाला/देहबुद्धी गेली कि॑वा स्वतःला विसरले तर द्वैत उरले कुठे? ज्ञान न॑तर विज्ञान न॑तर आणखी दोन पायर्र्या आहेत. श॑कराचार्य भजगोवि॑द म्हणतात,ज्ञानेश्वर हरी मुखे म्हणा म्हणतात ते उगाच कसे म्हणतील? तुकोबाराय म्हणतात भक्तीप्रेमाविण ज्ञान नको देवा हे कशाचे द्योतक आहे ?

केवळ सुंदर!!! इतकी अप्रतिम लेखमाला कशी काय वाचायची राहून गेली असा विचार करतोय. फारच छान आणि सुंदर समजावले आहे. फार फार आवडलं. शतशः धन्यवाद. एक अवांतरः
अद्वैताला भक्ती मान्यच नाही. साधी नाही व ज्ञानोत्तरही नाही. भक्ती मानली की द्वैत आले, अद्वैताचा कणाच मोडला की. अद्वैत फक्त ज्ञान मानते.
असे जेव्हा आहे, तेव्हा जे जे भक्तीमार्ग किंवा देव इत्यादींना काडीमात्र स्थान देत नाहीत आणि ज्ञानोपासना करतात...भले ते गणित असो, शास्त्र-विज्ञान असो, तत्वज्ञान असो की आणखी काही, ते ते सर्व ह्या अनुशंगाने अद्वैतवादी ठरतात असं मला वाटतं. :)

अद्वैत दर्शन
एवढं मोठं द्वैत असताना पुढं काही वाचावं वाटत नाही. सर्वप्रथम अद्वैत - आणि पुन्हा दर्शन - झाले दोन. माझा रोख तुमच्या लिखाणावर नाही; तुम्ही माहीती चांगली मांडलीत. पण अद्वैत या शब्दातच "दोन नव्हे, एकच!" अशी आरोळी आहे. एक आला की गोष्ट त्यावर थांबणे अशक्य -मग दोन आला, मग तीन आला, चार, पाच...शंभर..हजार.. अद्वैत उडालं कुठच्या कुठे.
बादरायण मुनींनी ५५० सूत्रांची "ब्रह्मसूत्रे" रचली.. ही झाली अद्वैताची गंगोत्री. अर्थात ही फार क्लिष्ट असल्याने त्यावर २४ आचार्यांनी टीका लिहल्या
दोन नव्हे एकच वर ५५० ब्रम्हसूत्रे?? आणि त्यावर पुन्हा २४ आचार्यांच्या टीका?? हा जोक वाटत नाही?? त्यामुळे हे सगळे खुद के साथ बातां करणारे आचार्य वाटतात. भगवदगीतेवर हजारो टीका उपलब्ध आहेत. तिचे तेवढे अर्थ असू शकतात? काही महाभाग तर गीतेतील अर्थ हा कांद्यावर असलेल्या पापुद्र्यासारखा आहे - आपण रोज एक पापुद्रा काढत जायचे म्हणतात आणि त्यातच एक दिवस आयुष्य खलास!! हे गीतेवर टीका लिहीणारेही वरच्या आचार्यांसारखेच - खुदके साथ बातां! त्यात टिळक आले, श्रील प्रभुपाद, विनोबा, गांधी लिस्ट फार लांबते.

In reply to by यकु

नक्की? आपला द्वैत-अद्वैतावरचा व्यासंग आहे असे वाटते. कृपया, सखोल माहिती द्याल काय ह्या विषयावर? :)

In reply to by धमाल मुलगा

मला आचार्य यशवंत होण्यात इंट्रेस्ट नाही धमालराव! शरद यांनी दिलेली माहीती या विषयाचा माईंड मॅप तयार होण्यासाठी पुरेशी आहे.

In reply to by यकु

बरं तुमची ही "टिका" समजुयात "टीका" नाही, तरीही तुम्ही तुमचे म्हणणे मांडताच आहात ना? मग त्या सर्व आचार्यांनी कोणते घोडे मारलेले आहे? त्यांनीही आपले मतच मांडलेले आहे ना? आपले मत मांडणारा कुणीही आधी खुद के साथ नव्हे तर कुणासोबत बोलणार हो? तुम्हाला एक मत पटले ते तुम्ही तावून सुलाखून घेतलेत. बाकीच्यांना दुसरे पटत असेल. त्यावर टिका कशाला? तुमच्या मर्मसथानी कुणी टोचून बोलला असेल म्हणून तुम्हीही तेच करणार का?

In reply to by राघव

बरं तुमची ही "टिका" समजुयात "टीका" नाही, तरीही तुम्ही तुमचे म्हणणे मांडताच आहात ना? मग त्या सर्व आचार्यांनी कोणते घोडे मारलेले आहे? त्यांनीही आपले मतच मांडलेले आहे ना? आपले मत मांडणारा कुणीही आधी खुद के साथ नव्हे तर कुणासोबत बोलणार हो? तुम्हाला एक मत पटले ते तुम्ही तावून सुलाखून घेतलेत. बाकीच्यांना दुसरे पटत असेल. त्यावर टिका कशाला? तुमच्या मर्मसथानी कुणी टोचून बोलला असेल म्हणून तुम्हीही तेच करणार का?
मी लिहीलं ते "टिका" म्हणून किंवा "टीका" म्हणूनही नाही. हे आचार्य घोडे मारायला तर कारणीभूत ठरलेच पण माणसासारखी माणसं पण खलास झाली यांच्यामुळं! आणि लक्षावधींच्या संख्येत! जितो वा प्राप्य्ससी स्वर्गं हतो वा भोक्ष्यसे महिम! हे सांगून कृष्णरावांनी एवढा मोठा रणसंग्राम करविला ना! हे कृष्णराव याच अद्वैत-सांख्य तत्वाचे प्रॉडक्ट होते. मूळ गोष्ट अशी की जो कुणी द्वैत-अद्वैत यापलीकडे जातो तो कुणाला मारूच शकत नाही- तो फिनीश झालेला असतो. पण ती खुद के साथ बातां टाईप बडबड फार भुलवून टाकणारी, आकर्षित करणारी असते. लोकांना मरायला/मारायला उद्युक्त करू शकते. माझ्या मर्मस्थानी कुणीही टोचून बोललेला नाही. लिहीणार्‍याला प्रतिसाद जावा यातून फक्त प्रतिसाद दिला.

In reply to by यकु

हतो वा प्राप्य्ससी स्वर्गं जितो वा भोक्ष्यसे महिम असे गीतावचन असावे असे अंधुक आठवते ! बाकी चालुद्या !!!

In reply to by यकु

एखाद्यानं सांगितलेले पटले नाही म्हणून ते मूळ तत्वज्ञानच चूक ठरते का? की ती त्या व्यक्तीची चूक ठरते? श्रीतोतापुरींनी श्रीठाकूरांना अद्वैतसाधनेची संथा दिली व त्यात श्रीठाकूरांनी पूर्णानुभव घेतला. तरीही ते आई म्हणून कालीमातेचे संतानभावाने भजन-पूजन करत असत. पण अद्वैतमत जेव्हा नरेंद्रनाथांना पटेना अन्‌ श्रीठाकूरांना ते पटवून देता येईना, तेव्हा त्यांनी नरेंद्रांना अनुभव घ्यायला लावला. त्यानंतर नरेद्रनाथ स्वत: म्हणतात की पटो किंवा न पटो, मी परत अद्वैताबद्दल शंका घेऊ शकलो नाही. हेही तुम्ही खोटेच मानणार का? ज्याला ज्या गोष्टीचा उपयोग होईल तेच संत सांगत असतात. तेही चूकच का मग?

In reply to by राघव

येस्स! निखालस चूक! या संतांना आधी गप्प बसवलं पाहिजे. प्रत्येक माणूस एवढा युनिक असताना त्याच्यातल्या शक्यतांचा खून करून त्याला युगानुयुगांपासून चालत आलेल्या आणि गंजून गेलेल्या जुनाट चौकटीत का बसवायचं?
त्यानंतर नरेद्रनाथ स्वत: म्हणतात की पटो किंवा न पटो, मी परत अद्वैताबद्दल शंका घेऊ शकलो नाही.
म्हणजे पटले असेल, नसेल तरीही शंका घेतली नाही आणि मिशनर्‍यांची भारतीय आवृत्ती काढली. जीवनभर तळमळत राहिले! अतोनात कष्ट सोसले आणि त्यातच गेले. आता तुम्ही यात काय वाईट झाले म्हणा, देशासाठी केले म्हणा.

In reply to by यकु

या संतांना आधी गप्प बसवलं पाहिजे. प्रत्येक माणूस एवढा युनिक असताना त्याच्यातल्या शक्यतांचा खून करून त्याला युगानुयुगांपासून चालत आलेल्या आणि गंजून गेलेल्या जुनाट चौकटीत का बसवायचं? बेस्ट. मार्मिक. अफलातून. क्लासिक. कितीही विशेषणं लावलीत तरी कमीच पडतील. असो. माझं इतकं उद्बोधन केल्याबद्दल धन्यवाद. कमीतकमी एवढं मी मान्य करायलाच हवं की मी तुम्हाला काहीही सांगण्याच्या पात्रतेचा नाही. थांबतो. :)

In reply to by प्रशु

समाधिस्थ झालेल्या संतांनंतरही* बरीच सन्त प्रजा फोफावलीय की.. *समाधिस्थ संतांबद्दल माहितीसाठी जिज्ञासूंनी व्य.नि.करून आजवरच्या समजूतीना सुरूंग लाऊन घ्यावा.. इथं मांडले तर लोकांच्या सुकोमल भावनांना धक्का लागायचा उगाच ;-)

In reply to by यकु

व्य नी कशाला होऊन जाउदेत एक लेख.. बाकि लोकांच्या भावनांबद्द्ल सोडा हो.. त्या तर तुम्ही तुमच्या प्रतिसादातुन सुद्दा दुखवताच ना...

In reply to by प्रशु

लेख?? त्रिवार अशक्य! कशाला उगाच धुरळा उडवायचा? आणि तुमच्या भावनांना माझ्या प्रतिसादामुळे धक्का बसला असेल तर स्वारी बर्का! तसा काही हेतू नाही.

In reply to by यकु

उडू द्या की धुरळा. तुम्ही धुरळ्याला घाबरणारे लेखक वाटत नाही आणि आम्हीही धुरळा झटकून वाचणारे वाचक आहोत. पिल्लू सोडले आहेच तर येऊ द्या लेख. बघू काय होतं ते!! संदर्भासहित सत्य असेल तर डर कशाची?

In reply to by प्रियाली

+१ सहमत, बाडिस. लिहाच. पण प्रियालीने म्हणले तसे संदर्भ पुराव्यासहित लिहा. उगाच मनोरूग्णालयातले विनोद नकोत. आम्ही बसलो आहोत धुरळा खाली बसवायला आणि नाकातोंडात जाऊ नये म्हणून रूमाल बांधलेले. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आमच्या येथे जानवी , कोहाळ्याचे सांडगे , माक्याचे तेल , वी गेम्स आणि धुरळा होलसेल मध्ये मिळेल. जमलीच आहेत लोकं तर करुन घेऊ जाहीरात. (गरूड छाप , गरूड छाप ,गरूड छाप - तपकीरीचा फिरता विक्रेता)अडगळ

In reply to by यकु

आता ऊडु द्याच धुराळा.. का ऊगाच भावनांची सबब सांगुन अर्ध्यातुन पळ काढताय??? ते वर म्हटलचं आहे ना काय ते हतो वा प्राप्यसी स्वर्ग...

In reply to by यकु

जितो वा प्राप्य्ससी स्वर्गं हतो वा भोक्ष्यसे महिम! हे सांगून कृष्णरावांनी एवढा मोठा रणसंग्राम करविला ना!
ठीक! पण ते भगवद्गितेमधील आहे ना? भगवदगीता हा अद्वैत दर्शनाची पुरवणी/ जोडणी/भाग म्हणून आहे का? नसेल तर गीतेचा आणि अद्वैताचा रणसंग्रामाशी कसा संबंध लागतो?
हे कृष्णराव याच अद्वैत-सांख्य तत्वाचे प्रॉडक्ट होते.
अणुचा शोध (म्हणजे, शोध म्हणायची पध्दत आहे म्हणून तसं, नाहीतर अणु आधीपासून होतेच की.) लावणार्‍यांना आणि अणुबॉम्ब बनवणार्‍यांना एकाच मापात मोजता येते का?
मूळ गोष्ट अशी की जो कुणी द्वैत-अद्वैत यापलीकडे जातो तो कुणाला मारूच शकत नाही- तो फिनीश झालेला असतो.
ते कसे? सविस्तर माहिती द्याल का? :)
पण ती खुद के साथ बातां टाईप बडबड फार भुलवून टाकणारी, आकर्षित करणारी असते. लोकांना मरायला/मारायला उद्युक्त करू शकते.
सहमत. अनेकदा सहमत. अशा बडबडीला चिथावणीखोर बोलणे/लिहिणे म्हणतात. सांख्यवाद, अद्वैतवाद ह्यापैकी कशामध्ये चिथावणी दिलेली आहे? कशाच्या विरोधात चिथावणी दिलेली आहे? चिथावणी देण्याची कोणती पध्दत वापरली आहे? च्छ्या:! विषयाची सखोल माहिती नसल्यानं फारच गोंधळ उडालाय माझा. फार प्रश्न पडलेत. कृपया माझ्या शंका दूर कराल का?

In reply to by धमाल मुलगा

कृपया माझ्या शंका दूर कराल का?
नो !! नाय !! नेव्हर!! ते शक्यच नाही. प्रत्येकाच्या मेंदूतील विचाराचे वर्तुळ काहीही केले तरी भंग पावत नसते. एक शंका, दुसरी शंका, तिसरी शंका, हजारावी, लाखावी - मग कधीतरी दोघेही खलास!
सहमत. अनेकदा सहमत. अशा बडबडीला चिथावणीखोर बोलणे/लिहिणे म्हणतात. सांख्यवाद, अद्वैतवाद ह्यापैकी कशामध्ये चिथावणी दिलेली आहे?
सांख्य/ अद्वैत/योग हे तत्वज्ञान ज्यांनी अनुभवलेय त्यांनी लिहीलेले नाही. कारण अनुभव घेणारे लिहूच शकत नाहीत. जे अनुभवत होते त्यांच्या आजूबाजूला जमलेल्या लोकांनी अनुभवत असलेल्या लोकांची निरिक्षणे केली आणि ती लिहून काढली. ते आपल्यासारखेच मर्त्य पामर,झंटलमन मानव. त्यांना का आचार्य/ऋषि म्हणायचं? फक्त शार्प विचार करू शकतात म्हणून? उदा. पातंजली हे सर्वात महानतम योग ऋषि मानले जातात. योग सुरू होतो माणसाच्या मृत्यूपासून (शवासन) - यांनी ते शवासन सगळ्यात शेवटची स्टेप करून टाकलीय ! जो कुणी जीवन्मुक्त पतंजलींनी पाहिला असेल, तो मरत असताना आणि पुन्हा जीवंत होत असतानाची ( जीवन्मुक्ताच्या बाबतीत हे घड्ते, हे एकविसाव्या शतकात घडत असल्याचे माझ्या वाचनात आलेय - संदर्भ: युजी कृष्णमूर्ती ) निरिक्षणे त्यांनी पातंजल योगात मांडलीत. आणि पातंजल योगातील शेवटचे सूत्र "आता काही करू नका, निवांत बसा, साधीसुधी कामे करा, निर्विकल्प समाधी लागायची तेव्हा आपोआप लागेल" अशा प्रकारचे आहे; म्हणजे पतंजलीना काहीच माहित नव्हते, तरिही त्यांनी असंख्य लोकांचे सुकाणू हाताळले! मी चिथावणी देत नाहीय; पण मला जसं दिसलं तसं मांडतोय. तुम्ही मला चुकीचाही ठरवू शकता.

In reply to by यकु

नो !! नाय !! नेव्हर!! ते शक्यच नाही.
हा हा! एकदम संतोष पवार :)
प्रत्येकाच्या मेंदूतील विचाराचे वर्तुळ काहीही केले तरी भंग पावत नसते. एक शंका, दुसरी शंका, तिसरी शंका, हजारावी, लाखावी - मग कधीतरी दोघेही खलास!
आयला! तुमचे आवडीचे लेखक कोण हो? शैली अंमळ ओळखीची वाटतेय.
सांख्य/ अद्वैत/योग हे तत्वज्ञान ज्यांनी अनुभवलेय त्यांनी लिहीलेले नाही. कारण अनुभव घेणारे लिहूच शकत नाहीत.
हे नाही कळालं. म्हणजे, असं का? नक्की काय होतं की ज्यामुळे अनुभव घेणार्‍यांना ते लिहीताच येत नाही किंवा गेल्या प्रतिसादात तुम्ही म्हणालात तसं ते फिनीश वगैरे होतात....म्हणजे नक्की काय होतं? आपले अनुभवही शब्दबध्द न करता येण्याची वेळ येणं हे चांगलं की वाईट? मग, स्वामी विवेकानंदांनी तो अनुभव ती अनुभूती घेतली होती तर ते कसे काय टिकले?
जे अनुभवत होते त्यांच्या आजूबाजूला जमलेल्या लोकांनी अनुभवत असलेल्या लोकांची निरिक्षणे केली आणि ती लिहून काढली.
निरिक्षणं होती म्हणजे ते बाह्यरुपावरचीच असणार ना? अंतर्मनात काय चाललंय ते निरिक्षणांनी कसं लिहिणार? मग ते अनुभव शब्दबध्द कसे केले गेले?
आणि पातंजल योगातील शेवटचे सूत्र "आता काही करू नका, निवांत बसा, साधीसुधी कामे करा, निर्विकल्प समाधी लागायची तेव्हा आपोआप लागेल" अशा प्रकारचे आहे; म्हणजे पतंजलीना काहीच माहित नव्हते, तरिही त्यांनी असंख्य लोकांचे सुकाणू हाताळले!
कदाचित तसे नसुही शकेल. माझ्या वाचनात आल्याप्रमाणे, 'निर्विकल्प समाधीची आस धरुन राहणे चूक. त्यातून निर्विकल्प मिळणे नाही. त्याचा पाठलाग केला तर ते पुढे पुढे पळत राहील...मनाचा खेळच तो. त्याउलट " समाधी लागायला हवी..समाधी लागायला हवी.." अशा विचारांच्या खेळात मुळ शून्यावस्थेशी फारकत होते. म्हणून त्याचा पाठपुरावा न करता, शरिर-मन-बुध्दी ह्यांची योग्य ती अवस्था प्राप्त झाली की आपोआप समाधी लागेल.' असा त्याचा अर्थ आहे. आता, मला फ्रेंच भाषेतलं काहीच ठाऊक नाही, तर मी असंख्य लोकांना उपयोगी पडेल अशी काही रचना करु शकेन का? तर नाही. त्यामुळे पातञ्जलमुनींना काहीच ठाऊक नव्हते असे विधान मलातरी तार्किकदृष्ट्या चुकीचे वाटते.

In reply to by धमाल मुलगा

आपले अनुभवही शब्दबध्द न करता येण्याची वेळ येणं हे चांगलं की वाईट?
अशी वेळ येईल तोच सुदिन! अनुभव शब्दबध्द करताकरता अनेकांची जीवनं खलास होताना पाहात नाही का आपण?? शो मस्ट गो ऑन! पण कुठपर्यंत?? मला वाटतं, अनुभव बिलकुलच शब्दबध्द करता आला नाही तेव्हाच तो परिपूर्ण होतो. तोपर्यंत सुंदर भाषेत केलेली फक्त इंटरप्रिटेशन्स! आणि माझ्या वाचनात तरी फक्त अशी सुंदर इंटरप्रिटेशन्स आलीत. मग ती विवेकानंदांची असो, ओशो/रजनीशांची असोत/ जेकेंची असोत.
मग, स्वामी विवेकानंदांनी तो अनुभव ती अनुभूती घेतली होती तर ते कसे काय टिकले?
ते टिकले, कारण त्यांनी अंतिम अनुभूती घेतलेली नव्हती. किरकोळ तंद्रावस्था, तुरिया, सविकल्प समाधी वगैरे तर कुणालाही अनुभवता येतात प्लस पांडित्य! झाले विवेकानंद महाज्ञानी.
निरिक्षणं होती म्हणजे ते बाह्यरुपावरचीच असणार ना? अंतर्मनात काय चाललंय ते निरिक्षणांनी कसं लिहिणार? मग ते अनुभव शब्दबध्द कसे केले गेले?
असे आंतरिक अनुभव शब्दबध्द केलेलेच नाहीत. इथं पुन्हा त्या जीवन्मुक्तांचं अंतर्मन/बाह्यमन वगैरे काही नाही. ते कायमचे मनोमुक्त. जे काय शब्दबध्द केले गेलेय ते शब्दांशी खेळण्यात निपुण असलेल्या लोकांकडून.
आता, मला फ्रेंच भाषेतलं काहीच ठाऊक नाही, तर मी असंख्य लोकांना उपयोगी पडेल अशी काही रचना करु शकेन का? तर नाही. त्यामुळे पातञ्जलमुनींना काहीच ठाऊक नव्हते असे विधान मलातरी तार्किकदृष्ट्या चुकीचे वाटते.
मला असे विधान करणे अनुभवदृष्ट्या अगदी अचूक वाटते. आज मी हे टाईप करताना माझ्या माकडहाडापासून मेंदूपर्यंत जाळ होत असताना, डोके हजार किलोचे झाले आहे अशा अवस्थेत करीत आहे. पातंजल मुनी काही सांगू शकत नाहीत या अवस्थेबद्दल ! ते म्हणतात मजा बघा आता.

In reply to by यकु

पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसव: कैवल्यं स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरिति !! कैवल्यपाद सूत्र ३४ भगवान पतंजलींच्या ग्रंथातील शेवटचे सूत्र. यशवंतजी, आपण उद्धृत केलेला अर्थ आपणास कोठे मिळाला, सांगू शकाल का ? वरील सूत्रात तसे काही दिसत नाही. शरद

माफ करा, तात्त्विक चर्चेत थोडा व्यत्यय आणतो...
शंकराचार्य आपल्या मताला म्हणतात अद्वैत, रामानुज विशिष्टाद्वैत व मध्वाचार्य शुद्धाद्वैत..जाऊ द्या.
शंकराचार्य - केवल अद्वैत. (अद्वैत नव्हे.) रामानुजाचार्य - बरोबर. मध्वाचार्य - द्वैत. तत्त्ववाद असेही म्हणतात. (शुद्धाद्वैत नव्हे.) वल्लभाचार्य - शुद्धाद्वैत. निंबर्काचार्य - द्वैताद्वैत. चैतन्य महाप्रभू - अचिंत्यभेदाभेदवाद. वेदांताची ही काही इंटरप्रिटेशन्स. महत्त्वाची. सर्वांनी भक्ती स्वीकारलेली आहे. अगदी केवलाद्वैत सांगणार्‍या आचार्य शंकरांनीदेखील. (भक्त)

In reply to by आळश्यांचा राजा

लिहण्याच्या गडबडीत चूक झाली. दुरुस्तीबद्दल धन्यवाद.

ब्रह्म सत्य, जग मिथ्या हा विचार गुरू अरण्यातील आपल्या आश्रमाच्या अंगणात पिंपळाच्या झाडाखाली बांधलेल्या पारावर बसून शिकवत होते. कशी कोण जाणे अचानक वाघाची डरकाळी अगदी जवळून ऐकू आली. गुरु दचकले, आणि आसनमांडी सोडून पारावरून उडी मारुन आश्रमात पळाले. थोड्यावेळाने धोका नाही असे पाहून खजील झालेले गुरुजी बाहेर आले. आता गप्प बसायचे सोडून एक टीनएजर टग्या शिष्य म्हणाला, गुरुजी, व्याघ्रो मिथ्या! गुरु सावरले होते. म्हणाले, बटो, पलायनोपि मिथ्या! (टीनएजर टग्या)

वर जो अवकाश आणि मडक्याचा उल्लेख आला त्याचा आणी ॐ पुर्णमद पुर्णमिदं पुर्णात पुर्ण मुदच्यते चा संबंध आहे क? कारण त्याचाहि अर्थ पुर्णातुन पुर्ण बाहेर काढले कि पुर्णच उरते असा कहिसाहोतो ना. कृपया माहितई द्यावी..

व्याघ्रो मिथ्या! पलायनोपि मिथ्या! =) ) = ) ) पहा, एकमेकांची एंटरटेन्मेंट करायचा प्रकार किती जुना आहे तो! ;-) ;-)

छोटेखानी वर्णन छान आहे. पण तसे त्रोटक आहे. एक विनंती : अनेक दर्शनांची अशी तोंडओळख करून दिल्यानंतर त्यांच्यातील साम्ये/फरक एकाशेजारी एक दिलेला एक लेख लिहावा. कधीकधी फरक कळल्यामुळे मूळ प्रकृती कळते. तशा प्रकारचा फायदा होईल.