Skip to main content

सकारात्मक की नकारात्मक...

लेखक एक अनामी यांनी मंगळवार, 21/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकांकडून आपल्याला सल्ला मिळतो... नेहमी सकारात्मक विचार करावा... पण एक प्रश्न पडलाय... जेव्हा बर्‍याचअंशी आपल्याला कदाचित नकारात्मकच पुढे घडणार, हे माहीत असतानाही सकारात्मक विचार कर असंच सांगतात... अर्थात ते योग्यही असतं... पण... "पुढे घडणार्‍या वाईट गोष्टीसाठी मनाची तयारी करणे (जेणेकरून पुढे कमी त्रास व्हावा यासाठी...) म्हणजे नकारात्मक विचार करणे...?" यावर मिपाकरांचं काय मतं...???

वाचने 4141
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

माझं मत : नाही, हा नकारात्मक विचार नक्कीच नाही. आपली तर हीच पॉलिसी आहे ब्वॉ. काही काही बाबतीत वर्स्ट केस साठी तयार राहिलेलं उत्तम! मग मनाजोगतं घडलं नाही तर अतीव दु:खही होत नाही आणि मनाजोगतं घडलं तर आनंद कैक पटीने अधिक मिळतो! :)

आम्ही तर घरी मांजर पाळले आहे. त्यामुळे इतराची मदत घेण्याचे काही कारणच नाही.

माझ्या मते, वाईट गोष्ट घडणारच आहे असे मानून त्याची वाट बघत आणि काळजी करत बसलात, तर तो नकारात्मक विचार म्हणता येईल. आणि 'वाईटात वाईट काय होऊ शकते याचा विचार करून, तसे काही झालेच तर काय याचाही विचार करून चांगले होण्याची इच्छा धरणे व त्यासाठी आपल्याकडून होता होईल तेवढे प्रयत्न करणे' म्हणजे 'सो कॉल्ड' सकारात्मक दृष्टीकोन असावा. बाकी नाव काहीही द्या, मुद्दलात घोळ नसला म्हणजे झालं. सकार, नकार सगळंच सापेक्ष आहे. काय म्हणता? बाकी जरा विस्तृत लिहीलं असतं तर तुमचे विचार ही समजायला मदत झाली असती. असो.

परिक्षेत माहीतेय ह्या एका विषयात खरं नाही आपलं... पण कदाचित तपासणारा चुकून चांगला निघाला तर आणि तरच काही होउ शकेल...

पुढे काहीतरी नकारात्मक होणार आहे हे कळालं तरी ती स्थिती कायमस्वरूपी नाही हे लक्षात ठेवणं महत्वाचं. अर्थातच हेच विधान पॉझिटिव्ह थिकिंग आणि भरभराटीच्या काळातही लक्षात ठेवावं म्हणजे पायही जमिनीवरच रहातात. जरा पडत्या काळात धीर धरावा पॉझिटिव्ह रिझल्ट्स्च्या दिशेनं आपल्यापरीनं प्रयत्न चालू ठेवावेत पण अतिअधिर होउ नये. काही वेळेस काहीही न करण हाच सर्वात उत्तम पर्याय असू शकतो. पॉझिटिव्ह थिकिंगला पेशन्सची जोड द्यावी.

परीक्षा झालेली असेल आणि पेपर अवघड गेलेला असेल्...अपेक्षेप्रमाणे उत्तरं लिहिता आलेली नसतील तर वाईटात वाईट काय होईल - परिक्षेत नापास व्हाल. कदाचित पास ही होऊ शकता. पण नापास झालाच तर काय पुढील सर्व दरवाजे बंद होतात की काय? फार फार काय होईल - तुमचे आइ वडील थोडेफार दु:खी होतील , बरोबरीचे मित्र पुढे जातील्..कदाचित तुमच्या आधी त्यांना नोकर्‍या लागतील. एखादा महिना तुम्हाला निराशा वाटेल. पण पुढचा / भविष्याचा विचार केलात तर हे फार किरकोळ आहे. आयुष्याच्या प्रवासात अनेक आव्हाने झेलायची असतात. नापास झालाच तर परत जोमाने अभ्यास करून पास होऊ शकता. आणि मित्रांचे काय ..कॉलेजातील मित्र नोकरी , लग्न , संसार चालू झाल्यावर तसेच टिकून रहातात असे काही नाही. जुन्यांशी संबंध कमी होऊन नविन मित्र मिळत जातात. आता माझ्या हातून चुक तर झालेली आहे (अभ्यास कमी केला किंवा इतर काही) आणि त्याचे परिणाम वाईट होणार आहेत हे मला समजत आहे (पुढे घडणार्‍या वाईट गोष्टीसाठी मनाची तयारी ) पण ती चूक मी नक्की सुधारीन आणि गमावलेले परत मिळवण्याचा प्रयत्न करीन हा सकारात्मक दृष्टीकोन.

उद्या काय होईल वा पुढे काय होईल हे सांगणे जरी कठीण असले तरी..उद्या काय व्हावे हा विचार तर तुम्हि नक्किच करु शकता....त्या बाबत सकारात्मक विचार व कृति करणे इष्ट.....कुठलीही घटना २ वेळा घडत असते..एक आधि आपल्या मनांत व नंतर प्रत्यक्षात...मनात जर नकारात्मक प्रतिमा ऊभी केली तर प्रत्यक्षात ति कशी असेल ?त्याचा अनुभव येणारच...मनात नकारात्मक विचार आले कि मनातली "डिलिट" की दाबा व विचार डिलिट करा...आनंदी रहा..Eat Drink and be Merry

कोणताच विचार पूर्ण नकारात्मक किंवा पूर्ण सकारात्मक नसतो. मानसशास्त्रात त्याचे प्रकार शिकले ते असे - १ + सकारात्मक - आनंद होणे, बरे वाटणे, आवडणे २ - सकारात्मक - हर्षवायू, व्यसन ३ + नकारात्मक - काळजी वाटणे, वाईट वाटणे, राग येणे ४ - नकारात्मक - आत्यंतिक दु:ख , चिंता , संताप यापैकी कोणत्याही २ आणि ४ मधील भावना काहीतरी चांगली कृती सुचवणार्‍या नसतात. उलट त्या माणसाला भावनिक रित्या दुर्बल करतात. नकारात्मक पुढे घडणार आहे हे माहीत आहे. अशा वेळी +नकारात्मक विचार उपयुक्त ठरतात. -नकारात्मक विचारांनी कृतीशुन्य नैराश्य येण्याची शक्यता असते. वेळ मिळाला की अधिक लिहीनच.

नाही. आपण जी गोष्ट करणार आहोत ती मनाजोगती 'होणारच नाहीये' असा विचार मनात आणून हातपाय गाळणे म्हणजे नकारात्मक विचार. मनाजोगती 'होणारही नाही कदाचित, नाही झाली तरी हरकत नाही. तसे झाले तर मी ही ही कृती करीन' हा सकारात्मक विचार. या सकारात्मक विचारात 'मनाजोगती होऊ शकते' हा आत्मविश्वास गृहीत आहे.

आवो परीक्षेचे काय घेऊन बसलायत आमच्याकडे बघा? आंम्हि १० वि नापास हाय पन रुबाबात तुमच्याशि ईंटरनेटवर गफ्फा झोडतोय कि राव जगात पुढे जान्या साठि शिक्षनच आवशक नसते जिवनात आनेक चांगले मार्ग यशश्वि होन्या साठि उपलब्ध आहेत चांगल्या मित्रांच्या संगतित रहा तुमचे आयुश्य आपोआप यशश्वि होईल

लेका तिकडे स्टेडिअम कोसळायला लागलीत तरी कलमाडी म्हणतात गेम्स यशस्वी होणार. असा दृर्दम्य विश्वास असणार्‍या भारताचा तु रहिवाशी आहेस. सकारात्मक विचार करत जा.सलमानचे वय ५० झाले तरी भारतातल्या पोरीना वाटते कि तो आपल्याशी लग्न करेल असा विश्वास पाहिजे.

In reply to by वेताळ

खो खो खो =)) स्साला पौर्णिमा अमावस्या जवळ आली की वेताळाच्या प्रतिभेला बहर येतो !!

धन्यवाद... प्रतिसादाबद्दल... अन दिलगिरी मी स्वत: धागा काढल्यानंतर उपलब्ध नाही होउ शकलो... धन्यवाद "मितान" मानसशास्त्रातील माहिती दिल्याबद्दल... मी एक सहज परिक्षेचे उदाहरण दिले... वास्तविक एका मित्राला समजावता समजावता मला हा प्रश्न पडला... आणि वेताळ साहेब अहो कलमाडीएवढ्या निगरगठ्ठ कातडीचे आपण नाही ना... "सलमानचे वय ५० झाले तरी भारतातल्या पोरीना वाटते कि तो आपल्याशी लग्न करेल असा विश्वास पाहिजे." आवाक्याबाहेरचे स्वप्न तुटणे अन हातातलं निसटणे यातही खूप फरक असतो...

सकारात्मक्/नकारात्मक हा दृष्टिकोन झाला, त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. बर्‍याचदा आपल्या हाताबाहेर अनेक गोष्टी असतात. आपल्याला हव्या असणार्‍या गोष्टीसाठी प्रयत्न करणे आपल्या हातात असते आणि त्यात कुठलीही कसूर होता कामा नये. थोडेसे अवांतर: न्यूटनप्रमाणेच मर्फी या महात्म्याचे नियम बहुतेकदा लागू होताना दिसतात. ज्यांना माहित नसतील त्यांनी वाचावेत http://en.wikipedia.org/wiki/Murphy's_law http://roso.epfl.ch/dm/murphy.html (my favourite: military laws)

असा विचार व विश्वास ठेवावा - आपण जगात सतत काहीतरी शिकण्यासाठी, आपल्या विचारात प्रगल्भता व सुधारणा करण्यासाठी आलोय. आपल्या आजुबाजुचं वातावरण हे ते शिकण्यासाठी पूरक आहे. काय शिकायचे आहे याचा धुंडाळा घेतल्यास मन अंतर्मुख होत जाईल. अशा अवस्थेतल्या विचारांनी, कोणत्याही अडचणींतून मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न करत राहण्याची विद्या आत्मसात करता येईल. ती झाली की सकारात्मक / नकारात्मक असा विचार करण्याचीही गरज भासणार नाही. उदा. एक वाक्य देतो. त्यावर नीट विचार करण्यास तुमच्या मित्राला मदत करावी - The first step towards solving a problem is to accept it. accept करणं सोपं नाही. त्यासाठी जे accept करायचे, त्याची लाज वाटणे सुटले पाहिजे अन् तेही निलाजरेपणा न येता. प्रभूमास्तर जास्त चांगले मार्गदर्शन करू शकतील असे वाटते. :)