मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मातोश्रीवरची कल्हई

सन्जोप राव · · काथ्याकूट
सांप्रत आम्हां फार म्हणजे फारच वाईट दिवस आले आहेत. छे, छे, मान्सून लांबण्याचा याच्याशी काही संबंध नाही. मान्सून काय, कितीही 'लैला' आणि 'फेट' येवोत नि जावोत, आज ना उद्या येईलच. त्यामुळे त्या बाबतीत आम्ही निश्चिंत आहोत.शरद पवारांवर त्यांच्या आयपीएलमधल्या संबंधाबाबतहोत असलेल्या चिखलफेकीबाबतही आम्हाला काळजी नाही. अहो, असले हजारो आरोप पचवलेला गडी आहे ( किती कोटी पचवलेला हे बाकी आम्हांसही सांगता येणार नाही!), असल्या फालतू आरोपांना काय भीक घालणार? नाही, भारतीय क्रिकेट संघाला झिंबाब्वेमध्ये झालेल्या सामुदायिक पचनाच्या त्रासानेही आमची झोप उडालेली नाही.तशी ती कुणाचीच उडालेली नाही म्हणा!या वेळी तर 'दुय्यम संघ पाठवलेला आहे, हरणारच!' असे खणखणीत कारण पाठीशी आहे. फिर डरना क्या! प्यार किया कोई चोरी नही की, छुप छुप आहे भरना क्या! आमच्या चिंतेचे कारण थोडे राजकीय आहे. त्याचे काय आहे, पहिल्यापासून आम्ही काँग्रेस पक्षाचे खंदे वगैरे समर्थक!काँग्रेसचे सगळे म्हणजे सगळे आम्हाला वंद्य. इंदिराबाईंच्या (वीस) कलमांपासून विलासरावांच्या (जुल्फ) कलपापर्यंत सगळे आम्ही खांद्यावर उचलून धरलेले.हसतमुख विलासरावांचे दिल्लीला अवजड प्रमोशन झाले आणि त्याजागी अतिहसतमुख अशोकाण्णा आले तेंव्हा तर आम्ही गरबा खेळत असल्याप्रमाणे शेजारच्या जोशीकाकांचे हात धरुन 'किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदीआनंद झाला' म्हणत अंमळसे नाचलोही होतो.सुश्री मायावतीजी काँग्रेसला 'कांग्रेस' म्हणतात या एकाच कारणासाठी आम्ही बसपाच्या डी एस कुलकर्णींच्या पुण्याच्या 'विश्व' मध्ये फ्लॅट घेण्याचा विचार बाजूला टाकला होता. (ब्यांकेने कर्ज देणे नाकारले होते तो भाग वेगळा.) फक्त त्यांना वाईट वाटू नये म्हणून (त्यांना म्हणजे डी एस कुलकर्णींना. मायावतींना वाईट कशासाठी वाटेल?) त्यांच्या मुलाच्या लग्नात (त्यांच्या म्हणजे पुन्हा डी एस कुलकर्णींच्या. मायावतींच्या मुलाचे कसे लग्न असेल? फारच शंकेखोर बोवा तुम्ही!) चाललेल्या जेवणावळीत तीन दिवस ओळीने जेवायला गेलो होतो. (अहो, ऐंशी प्रकारचे स्टार्टर्स होते!) तर अशी ही आमची काँग्रेसभक्ती.पण सध्या काँग्रेसला दिवस जरा बरे नाहीत. पत्रकार परिषदांमध्ये अशोकाण्णा नाना पाटेकरसारखे चष्म्याच्या वरुन बघत उसने हसत 'आल इज वेल' म्हणत असले तर त्यांच्या चेहर्‍यावरचा प्यांटीची शिवण उसवत चालल्यावर माणसाच्या चेहर्‍यावर येतो तसला चर्र न्यूनगंड आमच्या नजरेतून सुटत नाही. काय करावे म्हणजे आमच्या काँग्रेसला ते जुने बरे सोन्याचे दिवस येतील या काळजीने आमच्या तोंडचे एकसोबीस तीनसो पान झोंबेनासे झाले आहे. एकंदरीत राजकारणच मचूळ आणि मलूल झाले असताना अचानक मुंबादेवीच्या दिशेने 'रायगडावर बर्‍या बोलाने कार्यक्रमाला परवानगी द्या, नाहीतर उभा महाराष्ट्र पेटवून टाकू' अशी शिवसेना कार्यकारी अध्यक्ष श्री उद्धोजी बाळाजी यांनी खास ठाकरी भाषेत केलेली गर्जना ऐकू आली. त्यापाठोपाठ 'आमचा कडवट शिवसैनिक माहाराजांचा हा आपमाण कदापि सहण करनार नाही' अशा स्थानिक पातळीवरच्या शुभेच्छुक मिनी गर्जना आणि मायक्रो डरकाळ्या ऐकू आल्या. ('कडवट' आणि 'कडवा' यातला पोटभेद खुलासेवार सांगायचा तर तो थेट शिवसेनाप्रमुखांपासून आनंदनगर शिवसेना शाखाप्रमुख चंदू उबाळे (उर्फ 'सर्किट चंद्या' - पत्ता: मातोश्री पावभाजी आणि ज्यूसबार, मोफत पॅनकार्ड काडून मिळेल ) यापर्यंत सर्वांना समजावून सांगावा लागेल या विचाराने जोशीमास्तरांनी हा बेत रद्द केला आहे, असे ऐकतो. ''कडवा' काय आणि 'कडवट' काय, काय फरक पडतो?' हे मास्तरांचे नैराश्यपूर्ण स्वगत कुणीसे ऐकले म्हणे!) आता कॉंग्रेस हा प्रतिष्ठेचा मुद्दा करणार, की लगेच शिवसेना काँग्रेसची कल्हई करणार, की लगेचच काँग्रेसला परत सोन्याचे दिवस येणार या विचाराने आम्हाला उन्हाळ्यात दोन प्लेटी गुलकंद आईसक्रीम खाल्यासारखे वाटू लागले. अहो, असे कसे म्हणून काय विचारता? थांबा तुम्हाला बैजवारच सांगतो. हां, तर झाले काय, गेल्या आठवड्यात आम्ही दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षीच्या आधी डोळ्यासमोर धरायला म्हणून 'लोकप्रभा' चे जुने अंक काढले होते. (आमचे दिवस सध्या बरे नाहीत हे आम्ही आधी सांगितले आहेच. बरे नाहीत म्हणजे किती बरे नाहीत, ते वरील उदाहरणावरुन ध्यानात यावे. वाचायला 'लोकप्रभा' चे अंक आणि तेही जुने! मेजवानीत फुळकवणी कढीभात आणि तोही गारढोण! शांतारामबापू दिग्दर्शक आणि संध्या नायिका! वातड तेलकट पुर्‍या आणि त्यांबरोबर फसफसलेले श्रीखंड! असो.) मार्चच्या अंकात 'फुल्या फुल्या डॉट कॉम' या सदरात 'साहेब' या नावाने लिहिणारे ( हे दस्तुरखुद्द प्रवीण टोकेकरउर्फ ब्रिटीश नंदीच असावेत असा आमचा कयास आहे!) लिहितात, 'शिवसेनेकडून ज्यांची ज्यांची कल्हई होते, त्यांचा पुढे उत्कर्षच होतो. शिवसेनेचे सर्व विरोधक कायम यशस्वी का होतात हे आम्हालादेखील पडलेले कोडे आहे. दक्षिणात्यांविरुद्ध 'हटाव लुंगी' आंदोलन झाले, त्यानंतर दक्षिणात्यांनी मुंबई अक्षरशः पादाक्रांत केली. जागोजागी उडप्याची हॉटेले निघाली आणि मराठी माणूस इडली खाऊ लागला. भुजबळांचा लखोबा होऊन पुनश्च भुजबळसाहेब झाले आणि सत्तेच्या कोंदणात फिट्ट बसले. गणेश नाईकांचे तेच.नारायण राणे यांचाही उत्कर्षच उत्कर्षच.( त्यांनी तर दैनिकसुद्धा काढले!) राजसाहेबांच्या आंदोलनाला केंद्र सरकार घाबरते आणि रेल्वेमंत्री ममता बॅनर्जीही मान तुकवतात. शिवसेनेच्या काळ्या झेंड्यांकडे ढुंकूनदेखील न बघता राहूल गांधी लोकलने फिरुन मज्जा करतात. शाहरुख खानने तर आपल्या पडेल चित्रपटाची जबरी पब्लिसिटी साधत उत्तम व्यवसाय केवळ शिवसेनेच्या जोरावर केला!' आणि या सगळ्या उदाहरणांचा कळस म्हणून साहेब सचिन तेंडुलकरचे उदाहरण देतात.साहेब म्हणतात,' सचिनने 'मुंबई सर्वांचीच आहे' असे उद्गार काढले आणि आमचे परमदैवत व एकमेव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, कार्यकारी अध्यक्ष उध्दोजी बाळाजी तसेच संपादक लीडर पर्मणण्ट सामनावीर संजयजी राऊत यांनी सचिनला इतके मुर्दाबाद केले की ज्याचे नाव ते!' झाले! विक्रमवीर सचिनला एकदिवशीय सामन्यांत आजवर साधता आले नव्हते ते द्विशतक तात्काळ त्याचा गळ्यात अल्लदपणे येऊन पडले! ज्याच्या त्याच्या तोंडी सचिन सचिन सचिन! म्हणजे ईश्वराच्या (चुकून उद्धवाच्या लिहीत होतो!) दरबारी न्याव कसा आहे बघा! शिवसेनेच्या दरबारी तर देरही नाही आणि अंधेरही नाही! इकडे मातोश्रीवरुन कल्हई, की तिकडे तुमच्या नशिबाचे भांडे उजळलेच म्हणून समजा! या न्यायाने पुरातत्व विभागाच्या कारणाआडून अशोकाण्णा शिवसेनेच्या रायगडावरील कार्यक्रमाला परवानगी नाकारणार, की लगेच मातोश्रीवरुन काँग्रेसची कल्हई होणार, की मग आमच्या काँग्रेसला येती चार वर्षे तरी मरण नाही, या आमच्या राजकीय समिकरणावर आम्ही बेहद्द खूष झालो. 'चांगले पाव किलो धारवाडी पेढे घेऊन ये रे..' म्हणून आम्ही पांड्याच्या अंगावर पन्नास रुपयांची - हो चक्क पन्नास रुपयांची नोट भिरकावली. भाजक्या तंबाखूची मिश्री तळव्यावर घेऊन तर्जनीने मंजन करताना आमचा छान सूर लागला होता तेवढ्यात 'शिवसेनेच्या कार्यक्रमाला शासनाची परवानगी' असली शेपूटघालू बातमी कानी आली. थोत्तुमच्या जिंदगानीवर लेक्यो...बाकी अशोकाण्णांच्या दरबारी शेपूट घालणार्‍यांचीच भरती हो! चुक्या तुम्हारा अशोक बेटा! कितनी मोठी संधी वाया घालव्या तुम! लोकप्रभा पडनेका...कब समझेंगा तुम.. पांड्या पेढे घेऊन परत आला तोपर्यंत आमचा हा लेख लिहून पूर्ण झाला होता. आता आशा एकच. आमचा हा लेख वाचून कुणी 'कडवट' शिवसैनिक आमची कल्हई करेल आणि आमचे भाग्य उजळेल. आमचे भाग्य उजळले की 'सर्वदेवो नमस्कारा, केशवम प्रतिगच्छति' या न्यायाने आमच्या काँग्रेसचेही भाग्य उजळेल. किमान असे आम्हाला तरी वाटते. तुम्हाला?

वाचने 10433 वाचनखूण प्रतिक्रिया 32

लोक प्रभा असे बरेच काही लिहित असतो... सध्या तेही साप्ताहिक शिवसेनेच्या जोरावरच चालते असे म्हणतात हल्ली... साहेब ( हा लेख वाचल्यावर ते संजोप रावच आहेत अशी मला दाट शंका येत आहे ) आपले बरेचशे लेख शिवसेनेवरच लिहितात त्यामुळे सर्व शिवसैनिक ८ रुपायच्या वड्याऐवजी लोकप्रभा घेतात .. हे पुरे पडले नाही तर राजु परुळेकर नामक माणुस "हलकट मेस्त्री "(अल्केमिस्ट्री ) या सदरातुन बरेच काही बरळत असतो... असो... सध्या मात्र आम्ही लोकप्रभा ऑनलाइन च वाचतो.. आमच्या लेखी तेच कारण मी कट्टर आधुनिक शिवसैनिक आहे.( उद्धव सहेबाण्च्या कॉल सेंटर वाला ) बाकी लेख छान ... विनायक पाचलग वाँट टु टॉक

In reply to by विनायक पाचलग

तिमा 07/06/2010 - 18:47
हा लेख वाचल्यावर हमारा शक भी यकीनमें बदल गया है! फुल्या फुल्या चे लेखक हेच ते ! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by विनायक पाचलग

संजा 07/06/2010 - 19:33
>>>सर्व शिवसैनिक ८ रुपायच्या वड्याऐवजी लोकप्रभा घेतात .. पोटाची आग सोडुन साहित्याची खाज भागवणार्‍या शिवसैनिकांना कोटी कोटी प्रणाम. >>>राजु परुळेकर नामक माणुस "हलकट मेस्त्री "(अल्केमिस्ट्री ) या सदरातुन बरेच काही बरळत असतो... अल्केमिस्ट्री चा 'हलकट मेस्त्री' अगायायाया =)) =)) अगाध प्रतिभा म्हणतात ती हीच. संजा 'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'

In reply to by संजा

मध्यंतरी परुळेकर साहेबानी सचिन वर लेखणी चालवली तेव्हा काढलेल्या काही विडंबनापैकी एक... शिव सैनिक लोक्प्रभा घेतात असे निदान टोकेकराना तरी वाटत असावे .. नाहीतर त्यानी असे लेख छापले नसते विनायक पाचलग वाँट टु टॉक

अमोल केळकर 07/06/2010 - 09:50
सध्याच्या राजकीय घडामोडीची मिसळ आवडली. 'इकडे मातोश्रीवरुन कल्हई, की तिकडे तुमच्या नशिबाचे भांडे उजळलेच म्हणून समजा! ' --- हा हा हा :) हे मात्र एकदम मनापासून (मनसे?)खरे !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मागच्या दोन तीन महिन्यानंतर मिपावर काहीतरी दर्जेदार वाचायला मिळाले. शालजोडीतला विनोद अगदी शाल व जोडे न दाखवताही फक्कड जमला आहे. मस्त एकदम. शेवटची ओळ वाचे पर्यंत उत्कंठा होती. बेस एकदम.

In reply to by चन्द्रशेखर सातव

काय आठवण काढलीत राव तंबी दुराई इस तंबी दुराई पण हल्ली तोच श्रीकांत बोजेवार नावाने लिहुन लोकाना त्या दोघात तुलना करायला लावत आहे .. विनायक पाचलग वाँट टु टॉक

"....जागोजागी उडप्याची हॉटेले निघाली आणि मराठी माणूस इडली खाऊ लागला..... ..... आणि या इडल्या तयार करणार्‍या विठ्ठ्ल कामतांच्या "इडली..." या मराठी पुस्तकाच्या दणकेबात ३५ आवृत्या महाराष्ट्राच्या घराघरात गेल्या. --------------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

चिरोटा 07/06/2010 - 11:44
कल्हई आवडली.! सेना आणि काँग्रेसचे साटेलोटे पूर्वीपासुन आहे.ह्रुदयसम्राटांना तर कॉंग्रेस नेत्यांचे आकर्षण पूर्वीपासुन आहे.विलासराव असोत वा 'मैद्याचे पोते' वा इंदिरा गांधी,कार्यकर्त्याना झुंजवत ठेवून खाजगीत ह्या 'कट्टर शत्रुंना" टाळ्या द्यायचे त्यांचे धोरण केव्हातरी पक्षाच्या अंगलटी येणारच होते. P = NP

जिन्क्स 07/06/2010 - 16:45
रावसाहेब हे खरे कान्ग्रेसवासी आहेत. म्हणुन त्यानी हा लेख इतर कुठेही न टन्कता मिपा वर टन्कला. कारण शिवसेना विरोधात हा लेख असल्यामुळे ह्या लेखाची सर्वात जास्त कल्हई मिपा वरच होणार आणि सहाजिकच रावसाहेबान्चे भाग्य उजळणार.

रामदास 07/06/2010 - 19:41
भाऊ पाध्ये "पिचकारी " हे सदर लिहायचे .तसा हा लेख वाटला.आशय जोरदार आहे राव साहेब . कंसातली वाक्ये जास्त वेळा आली की चव थोडीशी उतरते. हा स्वानुभव आहे. टिका नाही.

शुचि 07/06/2010 - 23:26
ट्रान्झिटीव्हीटी चा लॉ भलताच आवडला. काय अफलातून सेट थिअरीचं लॉजीक लावलय. =D> जाम मजा आली. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

चिन्या१९८५ 08/06/2010 - 00:58
आचरट लेख आहे!!! पण बर्‍यापैकी जमलाय. जय महाराष्ट्र!!!(कडवट का कडवा ते तुम्हीच ठरवा) मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

In reply to by चिन्या१९८५

सन्जोप राव 08/06/2010 - 06:51
आचरट लेख आहे!!! पण बर्‍यापैकी जमलाय. एक काय ते ठरवा.बीअर पीत आणि सिगार ओढत इतरांच्या व्यसनांवर टीका करणार्‍या हिंदुहृदयसम्राटांप्रमाणे 'तळ्यात मळ्यात' नको... सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह

In reply to by सन्जोप राव

शुचि 08/06/2010 - 06:55
एक तर लेख इतका विनोदी. त्यात अशी उत्तरं देऊन हसवून मारणार आहात का? =)) =)) =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

टारझन 08/06/2010 - 08:44
ह्या प्रतिक्रियेत एवढं हसुन हसुन मरण्या सारखं काय होतं ? पुन्हा एकदा सन्जोप रावांचा चेहरा पहाण्याची इच्छा झाली =)) जियो शुचि ... =)) कशा गं सुचतात तुला अशा प्रतिक्रीया !! सन्जोपराव , आपल्या लेखाला कोदांनी सर्टिफिकेट दिलंय , तेंव्हा आमी पामर काय कमेंट करणार ? ;)

लेख मस्त जमला आहे. आवडला. बरा आपला लेख वाचत होतो आणि टारोबांचे तारे वाचून धम्यासारखे एकदम फिस्सकन हसू आले. ह्या प्राण्याला कशाचे म्हणून गांभीर्यच नाही; कुणाला हसू (कशाचेही का असेना) आलेलेसुद्धा चालत नाही त्याला. असो.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

टारझन 08/06/2010 - 22:11
ऑफिसात आमचं असं भजं होतं ... आपली मराठी संस्थळं आणि त्यावरचे काही आयडी हीच काय करमणुक ... तिकडेही असे बाप मेलेले चेहरे करुन बसण्यात काही पाईंट दिसत नाही बा ;) - जसपाल (भट्टी)

नम्रता राणे 09/06/2010 - 13:19
चिन्याशी सहमत.... लेख म्हणजे अचरटपणाचा कळसच ... strong>शिवसेनेचे सर्व विरोधक कायम यशस्वी का होतात हे आम्हालादेखील पडलेले कोडे आहे. आता हेच बघा ना... ह्या सेनाविरोधी लेखावर बर्‍याच प्रतिक्रिया मिळाल्या.. झाले ना सन्जोपराव यशस्वी... अनामिकाताई, वि_जय यांच्या या लेखावरच्या प्रतिकिया जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by नम्रता राणे

सन्जोप राव 11/06/2010 - 16:03
हा लेख सेनाविरोधी आहे ही नवीन माहिती पुरवल्याबद्दल आभार. कदाचित हे असले शिवसैनिक असल्यामुळेच शिवसेनेचे विरोधक यशस्वी होत असावेत. सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह

वेताळ 11/06/2010 - 19:10
विधानपरिषेदेची एक जागा ज्यादा जिंकुन अशोकरावानी कॉग्रेसचे भांडे परत एकदा चमकवले. वेताळ

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 11/06/2010 - 19:31
एक तर एवढा विनोदी लेख वाचला ... आता त्यावर एवढी विनोदी प्रतिक्रीया देऊन हसवुन हसवुन मारणार आहात का परा ? ;) - सृष्टी