Skip to main content

निसर्गाचे चिरंजीवित्व आणि आपण

लेखक chintamani1969 यांनी गुरुवार, 20/05/2010 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
(सर्व प्रथम मी मिपाच्या संपादक मंडळाला आणि सर्व वाचकांना हे सांगू इच्छितो कि सदरील लेखाचा लेखक मी स्वतः नसून कोणीतरी अद्यात व्यक्ती आहे .हा लेख मला किराणा सामानाच्या कागदावर लिहिलेला सापडला तो मला आवडला म्हणून त्या अद्यात लेखकाची क्षमा मागून मी हा लेख आपल्या समोर ठेवत आहे . मिपाच्या संपादक मंडळाला लेखा बद्दल काहीही अडचण वाटली तर त्यांनी तो काढून घ्यावा अशी माझी विनंती आहे .) आपल्या भोवती जे काही आहे निसर्गाचाच एक भाग आहे हे आपण बऱ्याचवेळा विसरतो.वाळवंट आणि अरण्य हे दोन्ही निसर्गाचाच भाग आहेत.त्यातले एक चांगले आणि एक वाईट असे काहीही नसते.हे लक्ष्यात न आल्याने आपण आतल्या आत कुढत बसतो.म्हणजे ,नदी ही गटार झाली असली तरी गटार हेही निसर्गाचाच एक भाग आहे हे विसरून चालणार नाही.अर्थात आपल्याला गटारापेक्षा स्वच्छ पाण्याची नदी आवडेल. आपल्या सोयीसाठी आपण निसर्गात अनेक बदल घडवून आणत असतो तसे सर्व प्राणी थोड्याफार प्रमाणात असे वागत असतात.हे करत असताना निसर्गाची कमीजास्त प्रमाणात नासधूस ही होतंच असते.अर्थात नासधूस ही आपली कल्पना आहे.निसर्गात फक्त बदल होत असतो.'नासधूस' होत नाही.म्हणजे झाडांवर रोग पडतात मग झाडे मरतात पण ज्यामुळे रोग पडतो ते कृमी , कीटक हे निसर्गाचाच एक भाग असतात.त्यांची प्रजा झाडे मेल्याने वाढते.आता आपल्याला हे पाहवत नाही आणि आपण हळहळतो. आपण मोठमोठ्या वसाहती उभारतो.त्या बांधत असताना बाभळी,वड वगेरे निरुपयोगी झाडे तोडून आपली आवडीची झाडे भलतीकडून आणून लावतो.आणि त्यांना जगवायचा आटोकाट प्रयत्न करतो.वस्तुतः निसर्गात निरुपयोगी झाड नाही.ह्या आपल्या कल्पना आहेत.ह्या कल्पनांच्या आहारी जाऊन अरण्याचे वाळवंट झाले कि काहीतरी वाईट झाले असे आपल्याला वाटते.निसर्गात म्हणाल तर फक्त एक बदल झाला.आता अरण्यात राहण्याऱ्या प्राण्यांच्या ऐवजी तिथे वाळवंटात राहणारे प्राणी राहायला येतील इतकेच .म्हणून आपल्या सोयीचा निसर्ग आपण 'निसर्ग 'मानतो आणि आपल्या गैरसोयीचा भाग नजरेआड करतो.एकदा निसर्गाचे हे अद्वेत आपल्या लक्षात आले कि आपल्यासमोर जो निसर्ग आहे तो आहे तसा आपल्याला समजू लागतो. निसर्ग चिरंतन आहे.तो दयाळूही नाही आणि दुष्टही नाही.या दोन्ही मानवी भावना आहेत.तो भावनाविरहीत आहे.त्याला प्राणी,पक्षी.झाडे,किडे फार काय मानवजात ही नष्ट झाली तरी काहीही फरक पडत नाही.आता आपल्याला हे मंजूर नाही.निसर्ग हा सदेव संतुलित असतो.हे संतुलन चल असते.म्हणजे इतकी झाडे, इतके पक्षी, इतके प्राणी असले म्हणजेच संतुलन असते असे नाही.आपला अहंकार एवढा जबरदस्त असतो की आपण निसर्गाचाच एक असताना निसर्गाला वाचवण्याची भाषा करतो .आपण काहीही वेगळे करत नाही.व्यक्तिगत स्वार्थापोटी आपण काहीही करायला मागेपुढे पाहत नाही.निसर्ग,पर्यावरण हे फक्त शब्द आहेत.आपला आपपरभाव विलक्षण आहे.आपल्याला एकमेकांना ठार मारायला काहीही वाटत नाही तर प्राणी,पक्षी,किडे,मुंग्या यांना मारताना कसे दुखः होईल. इतक्या वर्षात आपल्याला वाहनांनी सोडलेल्या धुरावर आपण काहीही मार्ग काढू शकलो नाही आणि आता किरणोत्सारी पदार्थ पासून मिळणाऱ्या अणुऊर्जाचे पाठीमागे लागलो आहोत. पर्यावरणवाद्यांचा धुडगुस आज काल वाढत चालला आहे.निसर्ग म्हणजे काय हे फक्त आम्हालाच कळते असं त्यांचा दावा असतो.'ग्लोबल वार्मिंग 'च्या नावाखाली आपली पोळी भाजून घेण्याची शर्यत विकसित देशात लागली आहे .आपण त्याचे बळी आहोत. आजवरच्या इतिहासात असंख्य वेळा गरम आणि गार युगे येऊन गेली आहेत.असे अनेक शास्त्रज्ञ जीव तोडून सांगत आहेत पण त्यांचे कोण ऐकतो? स्कायलाब नावाचा वाह्यातपणा झाल्याला फार दिवस झाले नाहीत.वायटूके हा संपूर्णपणे फसवणुकीचा प्रकार होता हे सर्वांना उशिरा कळले.'ग्लोबल वार्मिंग ' हे त्याच प्रकारातले आहे. पर्यावरण हे एक अस्त्र होत चालले आहे.ते धोकादायक अश्यासाठी की आम्ही हे काय स्वतः साठी करत नाही आम्ही हे निसर्गासाठी आणि मानव जातीच्या उद्धारासाठी करत आहोत हा त्यांचा दावा.हा कदाचित खराही असेल.जे खरच असे समजतात ते भाबडे आहेत. मानव जातीचे भवितव्य काहीही असले तरी निसर्गाला काहीही फरक पडत नाही .समजा पृथ्वीवरील सर्व माणसे अचानक नाहिशी झाली तरी सूर्योदय आणि सूर्यास्त तसेच होतील.डोंगर तसेच पाऊस झेलतील,झाडेझुडपे,प्राणी,पक्षी तसेच एकमेकाला खातील.निसर्गातील एक भाग कमी झाला म्हणून निसर्ग कमी होत नाही.निसर्गात एक भाग वाढला म्हणून तो वाढत नाही.तो तसाच राहतो. आपल्याला आता इथे भानावर येण्याची गरज आहे . आता ठेवलेली वीट जर नीट ठेवली तर त्यावर ठेवलेल्या वीटा नीटच राहतील.आता तोल गेला तर काही वेळाने विटा ठेवता ठेवता इमारत ढासळणारच.प्रयत्न आपल्या हाती आहेत. प्रारब्ध कुणाला उमगले आहे ?

वाचने 5424
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

अज्ञात लेखकाचे विचार रोचक वाटले. चूक की बरोबर यावर वाद-चर्चा होऊ शकेल. तेव्हा त्यावेळच्या प्रतिसादांसाठी ऊर्जा राखून ठेवतो. (वाचक)बेसनलाडू

मानव जातीचे भवितव्य काहीही असले तरी निसर्गाला काहीही फरक पडत नाही
१००% सहमत

>> वायटूके हा संपूर्णपणे फसवणुकीचा प्रकार होता हे सर्वांना उशिरा कळले. असं का म्हटलं असावं? वाय टू के हा प्रत्यक्ष घडलेला प्रॉब्लेम आहे ज्यासाठी संगणक क्षेत्रातल्या लोकांना अहोरात्र काम करावं लागलं होतं. 'स्काय लॅब' पडण्याचा बागुलबुवा केला गेला होता पण त्यावेळच्या दळणवळणाच्या मोजक्या सुविधांमुळे माहिती नीट न मिळता अफवा पसरल्या होत्या.

हा लेख मला किराणा सामानाच्या कागदावर लिहिलेला सापडला मला वाटते एखाद्या शिक्षकाने उत्तरपत्रिका रद्दीत विकल्या असतील आणि त्या रद्दीचा वापर किराणामालवाला पुड्या बांधायला करत असेल. त्यात हा निबंध मिळाला असावा. ;) पण त्यामुळे reduce, reuse आणि recycling असे सर्वच झाले असे वाटते. शिवाय असे झाले असेल अथवा तसे गृहीत धरले तर, अर्थव्यवस्थेलापण चालना मिळाली. कारण शिक्षकाने रद्दी विकून पैसे मिळवले, दुकानदाराने पुड्या बांधायला लागणारा कागद कमी पैशात मिळवून खर्च वाचवला आणि शिवाय तोच कागद वापरून स्वतःकडील माल देखील खपवला! :-) असो, यातील थट्टा सोडून देऊया (कृपया व्यक्तीगत घेऊ नका)! पृथ्वीला living planet असे म्हणतात. कारण भुकंप, ज्वालामुखी, इत्यादीपासून ते टोकाचे हवामान सर्व सहन करून, कालानुरूप स्वतःत बदल करत, पृथ्वी तग धरून आहे. शिवाय भूकंप-ज्वालामुखी आदी हे स्वतःमधील एका अर्थी संतुलन टिकवायला गरजेचे देखील आहे. असे म्हणतात की हिरोशिमा-नागासाकीवरील आण्विक हल्ल्यांनंतर, जेंव्हा काही विचार करू शकणारे आणि काळजीत असलेले विचारवंत तिथे भेट देयला गेले तेंव्हा त्यांना एक रोपटे (आण्विक उच्छादानंतरच्या पावसामुळे आलेले) दिसले आणि त्यांना हायसे वाटले. विंदांच्या प्रसिद्ध कवितेतील, "रक्तांमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावेत" या ओळी याच संदर्भात आहेत. पृथ्वी सृजनशील आहे यात काही वाद नाही. ती स्वतःची काळजी घेईल. पण मानवाने स्वतःला कसे सांभाळायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जे काही पर्यावरणापासून कशाच्याही संदर्भात आपण निसर्गासाठी करतो, ते स्वतःचे (मानवाचे आणि त्याला गरज असलेल्या चराचर सृष्टीचे) अस्तित्त्व आणि सातत्य टिकवण्यासाठी करतो हे वास्तव आहे. आज जी काही स्थलांतरे चालली आहेत त्यामागे हे असे बदल देखील आहेत, केवळ आर्थिक नाहीत. मात्र अशी स्थलांतरे जास्त होऊ नयेत म्हणून हळू हळू पाश्चिमात्य देश विचार करू लागले आहेत. स्वतःच्या सीमा बंद करणे अथवा शक्यतितक्या घट्ट करणे चालू आहेत. अशी भुमिका ही नविन वादाची आणि कदाचीत भविष्यातील युद्धाची ती नांदी ठरू शकेल... असो. बरेच काही लिहीता येईल. पण तुर्तास येथेच थांबतो. :) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

सहमत आहे... लेखाची सुरवात चांगली आहे पण शेवट तितकासा पटला नाही.... - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by विकास

मला वाटते एखाद्या शिक्षकाने उत्तरपत्रिका रद्दीत विकल्या असतील आणि त्या रद्दीचा वापर किराणामालवाला पुड्या बांधायला करत असेल. त्यात हा निबंध मिळाला असावा. Wink असू शकते. किंवा साधना मासिकाची रद्दी असावी. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

किंवा साधना मासिकाची रद्दी असावी.
=)) =)) =)) आमच्या क्लास मध्ये हीच शक्यता असेल असे शिकवले आहे ब्वॉ! -Nile

सर्व प्रथम chintamani1969 ह्यांचे एक उत्तम आणि वेगळा दृष्टीकोन दाखवणारे लिखाण रद्दीच्या गर्तेतून काढून मिपावर ठेवल्यासाठी आभार. विचार करायला लावणारा लेख. ह्यातील खुप विचारांशी सहमत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी आपण गोंडस नावे देऊन आपल्या कृत्यांचे समर्थन करून घेत असतो. आपण आपल्या फायद्यासाठी निसर्ग बिघडवला, आता आपल्याच फायद्यासाठी ठीक करण्याच्या गोष्टी करत आहोत.