आयुष्याचा 'अर्धा' प्याला..
आयुष्याचा प्याला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा? हे मानण्या न मानण्यावर असतं.
माझ्या दोन मैत्रिणींची लग्ने एकाच दिवशी एकाच मांडवात झाली. दोघींनाही प्रत्येकी पंधरा हजार प्रतिमाह कमावणारे नवरे लाभले होते. नव्याचे नऊ दिवस संपल्यावर संसाराची गणिते चुकू लागली, प्रपंचाची गाडी आर्थिक रूळावरून वेळोवेळी घसरू लागली. महागाईच्या वणवा झोडपायला नवऱ्याचा पगार अपुरा पडू लागल्यावर दोघीँनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला...
येथवर सर्व काही ठीक चाललं होतं, अगदी समसमान होतं. परंतु एकीचा पगार जास्तीत जास्त पाच हजारापर्यँतच पोचणारा, तर दुसरीला पंधरा हजारांची नोकरी. शिवाय पदोन्नतीची शक्यता. हा फरकच दोघींच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला...
एक दिसामाजी कोमेजू लागली तर दुसरी फुलारू लागली. एक चिडचिडी, तणावग्रस्त बनली तर दुसरी जीवनाचा हरेक आनंद द्विगुणीत करीत गेली. एक चिंतातूर, अतृप्त अन् मनोविकार ग्रस्त झाली तर दुसरी सुखी, समाधानी अन् निश्चिंत होती.
हा फरक आर्थिक स्तरामुळे झाला असावा अन् जास्त पगारावाली सुखी असेल असा अंदाज केला असेल तर तो पूर्ण चुकीचा आहे...
आपल्याला जास्त पगार आहे, तेव्हा जरा छानछोकीत राहिलं तर बिघडलं कुठे? मंडईतला भाजीपाला घेण्यापेक्षा मॉलमधून खरेदी केला तर बिघडलं कुठे? क्लासवन जीवनशैली अंगिकारणं आता आपल्या आवाक्यात आलं असतांना हात का म्हणून आखडता घ्यायचा? असा विचार आचरणात आणून मोठ्या पगाराची मैत्रीण जरा मोकळी ढाकळी जगू लागली. काही दिवस मौज मजेत गेल्यावर तो उच्च वर्गाचा आव आणणं म्हणजे एक नशाच बनली. त्यामुळे तशा बेगडी जगण्याच्या हव्यासापोटी तिचा पगारही तोकडा पडू लागला. मग ओव्हर टाईम, बॉसची मर्जी राखणं, प्रमोशनसाठी, पगारवाढीसाठी आवाक्याबाहेरची कामं स्विकारावी लागली. इन्क्रीमेंट झाली तरी तो आकडा कमीच भासू लागला. इतका खर्च तिला आवश्यक नव्हे गरजेचाच वाटत होता. त्यामुळेच जास्त व्यय करण्यासाठी जास्त कमावणं, त्याच त्या चिंतेत वावरणं, रात्र रात्र झोप न येणं अशा दुष्टचक्रात ती सापडली, वहावत गेली. त्याचसोबत तिचं सुख समाधानही वाहून गेलं...
याउलट कमी पेमेंटवाली मैत्रीण जरा विचार करूनच वागू लागली. आपल्या तुटपुंजा वेतनातही संसाराचा रथ कशा प्रकारे हाकता येईल याचे बजेट ती प्रतिमाह आखायची. किराणा, भाजीपाला गरजेपुरता अन् त्यातल्या त्यात परवडेल अशा किमतीचा, तोही चांगल्याच प्रतीचा घेत असे. दोन स्टॉप जाण्यासाठी विनाकारण रिक्षा करणे, बाहेरचं निकृष्ट दर्जाचं जेवण भरमसाट पैसे देऊन पोटात सारणे, जरूरी नसतांना फँशनेबल कपड्यांची खरेदी करणे इ. गोष्टी कटाक्षाने टाळून तिने आपला खर्च आटोक्यात ठेवला होता. वीजबचत, जरूर तितकेच अन्न तयार करणे, उष्टे उरणार नाही, पर्यायाने वाया जाणार नाही यावर तिचा कटाक्ष होता. मुळात जे आहे त्यातच समाधान मानणे, कुटुंबात मिळून-मिसळून आनंदात वेळ घालवणे अशा साध्या सोप्या गोष्टी आचरणात आणून ती आपल्या कमी वेतनाचा आकडा कुठल्या कुठे विसरून जायची. तिनं अमूक वस्तू घेतली मग आपणही घ्यावी अशा स्पर्धेचा विचारही मनात येत नसल्याने तिला सुखाची झोप लागत होती. समाधानी वृत्ती अंगवळणी पडल्याने तिचं आयुष्य खूपच यशस्वी ठरलं होतं...
पहिलीच्या मते आयुष्याचा प्याला अर्धा रिकामा असून तो काठोकाठ भरण्याच्या मागे ती धावत होती. तर दुसरीच्या मनात प्याला अर्धा भरलाय ना, रिकामा तर नाही ना? मग कसली काळजी? असा निश्चिंत दृष्टीकोन कायम असायचा...
सर्वच गोष्टी पैशात मोजाव्यात का?
वाचने
2751
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
किँवा
In reply to किँवा by डॉ.श्रीराम दिवटे
लेख छान!
In reply to किँवा by डॉ.श्रीराम दिवटे
किंवा ...
आपली संस्कृती
In reply to आपली संस्कृती by डॉ.श्रीराम दिवटे
+१
समाधान हे
In reply to समाधान हे by अरुंधती
अगदी उत्तम
महत्वाचा विषय
नक्कीच.
कुठल्याहि
सुवर्णमध्