Skip to main content

सुरक्षेचा घोळ

लेखक विनायक रानडे यांनी बुधवार, 17/02/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
सुरक्षा कोणाची, कशी, केव्हा, कोणाच्या पैशाने? सगळा घोळ. सध्या घडत असलेले सुरक्षेचे एक नाटक वाटते. बेजबाबदार मीडिया २४ तास बातमी ह्या नावाचा काय दुरुपयोग आणि घोळ घालते आहे ते बघताना सुरक्षा कशाला म्हणतात हे कळेनासे झाले आहे. वरळी सी लिंक किती व कशी असुरक्षित आहे, त्या करता किती दिवसात कोणती साधने बसवण्याचा प्रयत्न कसा सुरू आहे ..... ही बातमी म्हणून जगाला सांगणे. . . . बिनडोक, बेजबाबदार.... सगळे चीड आणणारे. ऐन वेळेवर मोठी किंमत देऊन सबस्टॅंडर्ड काहीतरी बसवून घोळ घालणे व खिसे भरणे .... हे किती वेळा घडले, घडणार? बुलेटप्रुफचा घोळ अजून निस्तरला नाही तोवर दुसरा घोळ सुरू झाला. आयपीएल खेळांना किती कंपन्या कशी सुरक्षा देणार हे जाहीर रित्या सांगण्यात काय शहाणपण व बुद्धीचा वापर केलात हो? नक्ष्ल वादी २५ सुरक्षा कर्मींचा जीव घेऊन पळून गेले हे पण बातमी म्हणून नुसती चर्चा दाखवणे सुरू आहे. बंगाल सरकार सुरक्षा कर्मीयांना योग्य हत्यारे देऊ शकत नाही म्हणून माध्यमातून कबुली देतात. मुख्यमंत्री कि संत्री राष्ट्रीय बातमी पत्रातून सांगतो व्वा क्या बात है! का ह्या सरकारी अधिकाऱ्याची राष्ट्रद्रोहाची कलमे लावून तुरुंग कोठीत रवानगी झाली नाही? हे मी विचारणे, ह्यावर भाष्य करणे माझा रक्तदोश आहे का हो? का मी स्वप्नात बरळतो आहे?

वाचने 2059
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

काका त्रागा करुन काय फायदा??? बॉंबस्फोट घडायचे काही थांबणार नाहीत !!! बॉंबस्फोट घडणे आणि त्यात लोक मरणपावणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे,कारण त्या बद्धल सरकार गंभीर आहे असं काही वाटत तर नाही.जर तस नसत तर बस मधे,ट्रेन मधे,हॉटेलवर आणि आता बेकरी मधे असे स्फोट घडलेच नसते... या मंत्री-संत्री लोकांना देण्यात येणारी झेड्,झेड प्लस सुरक्षा आधी काढुन टाकली पाहीजे.इथे जर सामान्य देशवासी सुरक्षित नाही तिथे या लोकांना का म्हणुन सुरक्षा दिली जाते हेच मला कळत नाही. देशातल्या देशात असणार्‍या नक्षलवाद्यांना हे लोक आवरु शकत नाहीत तर पाकिस्तानने चालवलेले हे अतिरेकी युद्ध हे लोक कसे सांभाळणार ? मदनबाण..... तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

अनागोंदी कारभार आहे सगळा. यावर लिहावे तेवढे थोडेच. मुख्य म्हणजे आपण सगळे सुद्धा निर्ढावलो आहोत हो, नुसता सरकारला काय दोष देणार? अशा बातम्या आपण थोडा वेळ वाचतो (अनेकजण तर तेही करत नाहीत), थोडेसे वाईट वाटते आणि परत रहाटगाडग्याला जुंपले जातो. असो. सुरक्षा यंत्रणेबद्दल न बोललेले बरे.

In reply to by चित्रा

सुरक्षा यंत्रणेबद्दल न बोललेले बरे.
म्हणजे अज्ञानात आनंद असे म्हणायचे कि काय? आमचे मते न बोलण्याचे कारण - असंतोषासमोर कुठलीही सुरक्षा व्यवस्था ही थिटी असते प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

असे म्हणायचे नव्हते. सुरक्षा व्यवस्थेला नावे ठेवण्याचा हेतू नव्हता. पोलिस किंवा इतर निमलष्करी दले, लष्कर हे कठीण परिस्थितीत काम करीत असतात ह्याची कल्पना आहे. पण त्यांना वापरणारे लोक जेव्हा नालायक आहेत, तेव्हा त्यांच्या कामाला मर्यादा आहेत. रानडे यांचा मूळ उद्देश मीडीयाबद्दल भाष्य करण्याचा होता. मीडियाबद्दल प्रश्न आहेतच. पण प्रश्न सरकारी लोक या गुप्त बातम्या मीडियापर्यंत का पोचवत आहेत याचा आहे. कदाचित आपण काही तरी करत आहोत हे दाखवायचे असेल. मीडियाला बातम्या मिळाल्या की ते छापणारच. ते कशाला मागे पडतील? शिवाय निमलष्करी दलांना कमी सुरक्षा आहे, हे नक्षलवाद्यांना माहिती असल्याशिवाय का त्यांनी धाडस केले? त्यामुळे ही बातमी जर लोकांपर्यंत गेली तर लाजेकाजेखातर का होईना काहीतरी फरक पडेल. असंतोषासमोर कुठचीही सुरक्षा व्यवस्था थिटी आहे. बरोबर पण म्हणून नक्षलवादी असंतोषातून जन्मले म्हणून ते करतात ते योग्य आहे असे म्हणायचे की काय? मला मीडियाला बेजबाबदार म्हणण्याआधी, एवढीच माहिती हवी आहे की नक्षलवाद्यांचा उगम जेव्हा झाला, त्याआधी मीडिया काय सांगत होती? तेव्हाचे पत्रकार नक्की काय सांगत होते? तेव्हा नक्षलवाद्यांचे स्वरूप लोकांपर्यंत कसे पोचवले जात होते? सरकारच्या धोरणांबद्दलची माहिती जनतेपर्यंत पोचत होती का? कशी पोचत होती?

मिडीया आणि जनता गुप्तता आणि गंभिरता कधी समजणार हा आहे. कोणत्याही विषयाची बातमी समजून सर्वात आधी त्या घटनेची, प्रसंगाची, गुप्ततेची, गांभिर्याची चिरफाड करण्यात हे मास कम्युनिकेशन वाले धन्य मानणारे सगळ्यात आधी दोषी आहेत. ह्याचे २६/११ कव्हरेज एक नमुना आहे. लोकसभेवरील हल्ला दुसरा नमुना. माध्यमाचा उपयोग सिएस्टिच्या श्री विष्णू झेंडे यांना खरा समजला. त्यांच्या कडून तरी या मिडीयावाल्यांना उमजायला हवे होते. पण नाही, सगळ्यात आधी घोळ माजवणे हाच ह्यांचा अभ्यासक्रम असावा अशी दाट शंका येते आहे. एखाद्या घटनेची कोणती बाजू गुप्तता पाळण्याची आहे व कोणती बाजू जनतेला जागे कारणारी आहे हे बहुदा शिकवले जात नसावे. प्रत्येक प्रसंग क्रिकेटचे धावते वृत्त दर्शन करून टाकण्याची वाईट सवय आहे ही. मला जरुर योग्य व्यक्तीना उपाय देता येतील. ते उपाय जाहिर करुन त्याचे गांभिर्य घालवणारा मी पण वेडा होऊ इच्छीत नाही. हा प्रकार चव्हाट्यावर चर्चा करण्याचा नाही हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे कां कळू नये?

In reply to by विनायक रानडे

मला जरुर योग्य व्यक्तीना उपाय देता येतील. ते उपाय जाहिर करुन त्याचे गांभिर्य घालवणारा मी पण वेडा होऊ इच्छीत नाही. हा प्रकार चव्हाट्यावर चर्चा करण्याचा नाही हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे कां कळू नये?
रानडे साहेब देशाला आता खरी गरज वेड्यामाणसांची आहे. शहाणे उदंड झाले. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.