मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साठी बुद्धी...

विकास · · काथ्याकूट
या मंगळवारी, २६ जानेवारी २०१० ला अधुनिक भारताचे प्रजासत्ताक झाले, त्याला ६० वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने सर्वप्रथम सर्व भारतीयांना तसेच भारतवंशीयांना शुभेच्छा! व्यक्तीच्या आयुष्यासंदर्भात, मराठीत एक मजेशीर वाक्प्रयोग आहे: "साठी बुद्धी नाठी". त्याचे एक कारण असे सांगितले जाते की, साठाव्या वर्षांनंतर माणूस म्हातारपणा कडे झुकायला लागल्यावर परत लहान मुलासारखा वागायला लागतो, वागणे बदलू लागते, इत्यादी...मात्र राष्ट्राच्या बाबतीत असे म्हणणे अवघड आहे. कारण आज जी साठ वर्षे होत आहेत ती एका अधुनिक व्यवस्थेला, राष्ट्राला नाही. ते तर हजारो वर्षे जुने आहे. (हजारो असे मोघम इतक्यासाठी की नक्की किती जुने हा तुर्तास वाद नको! :-) ). भारत हा असा एक प्राचीन देश आहे जिथे गोष्टी पटकन बदलत नाहीत असे म्हणले जाते.साम्यवाद हे सर्वास (सामाजीक) असे वाटणार्‍या आपल्या तत्कालीन साम्यवाद्यांपैकी कॉ. डांगेंना, स्टॅलीनने सांगितले होते की इतर सर्व जगात कम्युनिझम आणता येईल पण भारतात नाही... भारतास बदलणे सोपे नाही हा त्यातील मूळ मुद्दा. येथे क्रांती होत नाही, तर निव्वळ उत्क्रांती होते असे म्हणणारेपण स्वप्नाळू असतात. तसे म्हणले तर ते बरोबर पण आहे. पण ही उत्क्रांती म्हणजे निव्वळ वाढ आहे की विकास (प्रोग्रेस) आहे यावर त्यातील यश अथवा फोलपणा ठरू शकतो. स्वा. सावरकरांनी एक छान काव्यमय व्याख्या, क्रांती या शब्दाची केली आहे: "गतीशून्य माणसाच्या अथवा कुजू पाहणार्‍या राष्ट्राच्या, पायात बद्ध असलेल्या शृंखला, जेंव्हा प्रगतीच्या घणाखाली तुटू लागतात, तेंव्हा होणार्‍या आवाजाला, क्रांती असे म्हणतात". या चर्चेचा विषय हा काहीसा या व्याखेतील शब्दांसंदर्भातच आहे. आपण अधुनिक भारतात आणि भारतीयांत तसेच अनिवासी भारतीयांत काय चांगले नाही, काय वाईट होत आहे याबद्दल कायमच लिहीतो. त्यात कधी कधी कडवे वास्तव असते तर कधी कधी नुसतेच अवास्तव असते. पण गेल्या ६० वर्षात भारतात प्रत्येक मिनिटाला नसेल पण सातत्याने क्रांती होत आहे असे मात्र मला नक्की वाटते. तेंव्हा तुम्हाला प्रजासत्ताकाच्या वाढदिवसानिमित्ताने या संदर्भात काय (चांगले) आठवत आहे? अशा कुठल्या शृंखला कुठल्या प्रगतीच्या घणाखाली तुटल्या आणि आजही तुटत आहेत ज्यामुळे आपल्या आजी-आजोबांपेक्षा, आई-वडलांचे आणि त्यांच्यापेक्षा आपले जीवन हे बदलत आहे? सकारात्मक प्रतिसादांसाठी विनंती करतो. याचा अर्थ वाईट झाकायचे असा नाही, त्यावर परत कधी तरी...किमान चांगले किती झाले याचा मागोवा घेतला तर वाईटाल तोंड कसे देता येईल या संदर्भात वेगवेगळे मार्ग/विचार दिसू लागतील.

वाचने 4049 वाचनखूण प्रतिक्रिया 13

श्रावण मोडक Sun, 01/24/2010 - 21:08
भारतीय मध्यमवर्गाचा उदय! (यात नकारात्मकताही आहे, पण त्याविषयी धाग्याच्या हेतूनुसार बोलाणार नाही.) कशामुळे हा उदय झाला हे लिहिण्याचे कारण खरेच आहे का? आपण आपापल्याकडे थोडे बारकाईने पाहिले तरी अनेक कारणे गेल्या वीसेक वर्षातील जगण्यातून दिसतीलच!

भारतात आजही दलितांवर अन्याय होत असला तरीही या अन्यायांची तीव्रता कमी झाले आहे असे वाटते. माझ्या आजोबांच्या काळात दलितांना ठेवणीतल्या कपबशांतून (कान तुटलेले कप वगैरे) चहा दिला जात असे. माझ्या वडिलांच्या शालेय जीवनात त्यांचे अनेक दलित मित्र झाले आणि ते आजोबांच्या घरी आल्यानंतर सुरूवातीला जरी नाके मुरडली गेली तरी नंतर मांडीला मांडी लावून स्वत:चे घर असल्यासारखे वावरत असत. माझे आजोबा प्रगतीशील होते पण प्रथा मोडल्या नाहीत. वडिलांनी आग्रहाने त्या मोडल्या. (हे सर्व स्वातंत्र्योत्तर काळातील आहे.) .............................. I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

खैंरलांजीचं दाहक वास्तव लक्षात असल्याने अजून असं नाही म्हणवत, अक्षय भाऊ. हा धागा चांगल्या गोष्टींबद्द्ल असल्याने यापुढे काही लिहीत नाही.

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

कालिन्दीतै, आपण म्हटल्याप्रमाणे खैरलांजीची वास्तवता दाहक आहे. खैरलांजीत जे घडले ते अजुनही आपल्या समाजात घडत असलेल्या अन्यायाचे दर्शक आहे. खैरलांजीतील पाशवीपणा बोचणारा आहे. परंतु माझे म्हणणे हे एकूणात दलित आणि दलितेतर संबंधांमध्ये बदललेल्या समीकरणाविषयी आहे. खैरलांजीसारखी घटना सर्व राज्यात पसरते, त्यात घडलेल्या अन्यायाविरुद्ध तुम्हा-आम्हासारख्या अनेकांना संताप येतो हे साठीच्या दशकात घडले असते का? यासारख्या किती घटना घडल्या असत्या जर आपण (दलित आणि दलितेतर दोन्ही) बदललो नसतो. आपण या दृष्टिकोनातून पूर्णपणे सुधारले आहोत का? अजिबात नाही. पण आपण काही प्रमाणात सकारात्मक अर्थाने बदललो आहोत का? तर याचे उत्तर नि:संशय होय असे आहे. मागे बघून काही मिळवले आहे, त्याबद्दल बोलायचे होते म्हणून. अन्यथा काय मिळवू शकलो असतो किंवा काय गमावले आहे याबद्दल तर नेहमीच बोलत असतो. ...................................... I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.

सुनील Mon, 01/25/2010 - 17:20
भारताचे केवळ स्वातंत्र्यच नव्हे, तर प्रजासत्तकदेखिल सहाव्या दशकात आहे, ही बाबसुद्धा उल्लेखनीय नाही का? विशेषतः तिसर्‍या जगातील, बहुसांस्कृतिक, पूर्वी क्वचितच एक राष्ट्र म्हणून राहिलेला देश, हा आपले केवळ स्वातंत्र्यच नव्हे तर लोकशाहीदेखिल टिकवतो, हे प्रशंसनीयच आहे. आता अन्य बाबतीत म्हणाल तर, हाती धान्याचा कटोरा घेत स्वतंत्र झालेला भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत (बहुतांशी) स्वयंपूर्ण झालेला आहे, हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. बाकी सकारात्मकच प्रतिसादांची मागणी केलीत, हे आवडले. (उलट बाजूने कितिही लिहिता येतेच! आणि वेळप्रसंगी ते लिहूच!!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज Wed, 01/27/2010 - 08:00
चर्चा सुरु राहून अजुन सकारात्मक बाबी प्रकाशात आल्या तर वाचायला आवडतील. १) लोकशाही २) एक हरीत क्रांती ३) इस्त्रो सारख्या संस्था ४) १९९० नंतर उद्योगाला पूरक धोरण, कमी लालफितीचा कारभार ५) माहीती अधिकार अजुन काही विशेष उल्लेखनीय घटना आपल्याला वाटत असल्यास कृपया नोंदवा.

ज्ञानेश... Wed, 01/27/2010 - 13:22
साठ वर्षापुर्वीच्या तुलनेत आज महिलांची स्थिती नक्कीच खूप सुधारली आहे. निदान शहरी भागात तरी महिलेला मोकळे अवकाश, समान संधी, आदर आणि प्रतिष्ठा मिळते आहे. महिलांच्या समस्या संपलेल्या नसल्या, तरी काही सुखावह बदल नक्कीच झाले आहेत ! (आणि हो, पहिला फोटो फार फार आवडला.)

विकास Wed, 01/27/2010 - 22:56
सर्व प्रतिसाद आणि वाचकांना धन्यवाद... मध्यमवर्गाचा उदय झाला हे बर्‍याच अर्थी चांगले झाले आहे. पुर्वी देखील मध्यमवर्ग होता. मात्र तो, पुलंच्या भाषेत, "तोंडाळ दारीद्र्य आणि घुमी श्रीमंती, यांच्या मधला वर्ग " होता. आता शिक्षण आणि नवीन संध्यांमुळे मध्यमवर्गाची व्याख्याच बदलू लागली आहे. त्याचे म्हणून काही निश्चितच प्रश्न आहेत पण देशाच्या निर्णायत्मक शक्तीचा तो एक नक्की भाग होऊ लागला आहे असे वाटते. गावे जाऊन शहरे (अर्बनायझेशन) होऊ लागली, हे चांगले का वाईट माहीत नाही. पण बदलत्या संगणकीय आणि दूरसंचाराच्या युगात बर्‍याच प्रमाणात गावे ही उर्वरीत देशाच्या जवळ येऊ लागली आहेत. अर्थात हा पहीलाच टप्पा आहे. दिल्ली अजूनही दूरच आहे! दलीतांवर अन्याय कमी झालेत याच्याशी तसेच श्री. अक्षय यांच्या खैरलांजीवरील प्रतिक्रीयेशी सहमत आहे. जो पर्यंत जातीव्यवस्था ही कायद्याने मानली जात आहे तो पर्यंत दलीत हे दलीतच राहणार आणि इतर जातीचे त्यांच्या जातीचे.... ते बदलायचे असेल तर सर्वत्र जात नोंदणीच बंद केली पाहीजे. एकदम होणार नाही, पण हळूहळू, आजची उलट वाटचाल थांबवून. सुनील म्हणतात, तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. १९७५ साली जेंव्हा आणिबाणी जाहीर झाली तेंव्हा पाश्चात्य देशांतील माध्यमांनी अजून एक देश हा हुकूमशाहीकडे वळला म्हणून जाहीर केले. तेच वास्तव देखील होते. सुदैवाने ते टिकले नाही. जनतेने कधीनव्हे असा सहभाग घेतला आणि त्या फटकार्‍यात आधी क्षीण झाली असे वाटणारी लोकशाही परत बळकट झाली (भले त्यात काही तॄटी असल्या तरी). यावरून मार्क टलीचे पुस्तक आठवले. राजीव गांधींच्या हत्येनंतर (वास्तवीक तेंव्हा ते तर विरोधी पक्षातच होते) अनेक पाश्चात्य माध्यमांना आता गांधी घराणे नाही म्हणजे लोकशाही संपले असे वाटले :? पण पक्षांतर्गत लोकशाहीचा अभाव कायम राहीला असला तरी देशात लोकशाही आणि देशाचे प्रजासत्ताक कायमच टिकले. सहजरावांनी बर्‍याच गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्या सर्वच चांगल्या घडलेल्या गोष्टी आहेत. तेच ज्ञानेश यांच्या बद्दल भॄणहत्येसारखा निर्घॄण आणि अडाणी प्रकार आजही आपल्याकडे चालला असला तरी महीलांचे स्थान समाजात नक्कीच वाढत आहे. त्यात सर्व राजकीय पक्षातील महीला, राष्ट्रपती जशा आहेत तशाच विविध क्षेत्रातील महीलापण येतात. माझ्या दृष्टीने अजून एक महत्वाची गोष्ट झाली आहे. आजही आपण जरी जात-प्रांत-धर्म यात अडकलेला समाज असलो, तरी देखील "मनोरंजन" ही एकात्मतेसाठीची एक आश्चर्यकारक शक्ती ठरलेली आहे. लता-आशा-किशोर-रफी आदी आणि आताचे कलावंतांनी संगीत घराघरात पोचवले आणि त्याचा एक अतिशय नकळत परीणाम झाला असे वाटते. तेच चित्रपटातील कलावंतांच्या धर्माने केले. असे वाटते. म्हणूनच असे वाटत राहते की एकीकडे काळजी करण्यासारख्या, नैराश्य येण्यासारख्या अनेक गोष्टींनी कोणाही सुजाण नागरीकास पछाडले जाऊ शकत असले तरी विविध पद्धतीने आपली पाळेमुळे ही घट्टच होत आहेत, ज्याच्यावर आजचा आणि पुढचा विकास (डेव्हलपमेंट!) अवलंबून आहे. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

धनंजय गुरुवार, 01/28/2010 - 01:34
सकारात्मक बदलांबद्दल चर्चा चांगली आहे. सकारात्मक बदल बहुधा नकारात्मक बदलांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहेत असे मला वाटते. फारतर सकारात्मक बदलांची गती इच्छेपेक्षा कमी आहे याबद्दलच चुटपुट लागून राहाते. @सहजराव : प्रजासत्ताक टिकण्यात १९९०च्या आदली राज्यपद्धती जबाबदार होती. स्वातंत्र्यानंतर लगेच मुक्त बाजारपेठेत उतरलेल्या देशांमध्ये प्रजासत्ताके कोसळली (आणि मग फार प्रगती झाली नाही.) अपवाद थोडेच असावेत. (?तायवान?... द. कोरियामध्ये बहुतेक काळ हुकुमशाही होती.)

In reply to by धनंजय

विकास गुरुवार, 01/28/2010 - 02:08
प्रजासत्ताक टिकण्यात १९९०च्या आदली राज्यपद्धती जबाबदार होती. स्वातंत्र्यानंतर लगेच मुक्त बाजारपेठेत उतरलेल्या देशांमध्ये प्रजासत्ताके कोसळली (आणि मग फार प्रगती झाली नाही.) अपवाद थोडेच असावेत. सहमत -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)