Skip to main content

मराठीचा मुद्दा व साहित्यिकांची भुमीका

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 26/12/2009 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीचा मुद्दा व साहित्यिकांची भुमीका (लेखाचा हेतू केवळ मराठी अस्मितेचाच आहे. परप्रांतीय, नोकर्‍या, राजकारण असली गल्लत न करता वाचावा) मराठी अस्मितेच्या मुद्याला आत्ता राज ठाकरेंनी हातात घेतल्याने उभारी आली आहे. त्या आधी शिवसेनेने हे काम केले होते. नंतरच्या काळात शिवसेना आपल्या मुळ मुद्यांपासून भरकटली. त्यानंतर कोणीही मराठीचा मुद्दा हातात घेतलेला नव्हता. राजकारणी लोक केवळ वारा आला तशी पाठ फिरवणारे व सत्तेत येण्याची वाट पाहणारे असतात ही आताशा काळ्या दगडावरची रेख झालीय. त्यात मराठी अस्मितेचा अगदीच नेभळट होता. विदर्भात मराठीच बोलली जाते. असे असतांनादेखील ते वेगळे राज्य व्हावे हा राजकारणाचा मुद्दा राजकारण्यांनी आपल्या सोईसाठी केला. ( वेड्यांनो, वेगळा विदर्भ झाला तर तुम्ही जो भ्रष्टाचार कराल तो पण कमी किंमतीचा राहील, कारण विदर्भ हे महाराष्ट्रापेक्षा छोटे राज्य होईल व त्याला उत्पन्न कमी असेल, केंद्रातून कमी आर्थीक मदत येईल हे तुम्हाला कसे समजत नाही. त्या राज्याचा मुख्यमंत्री तर एकच होईल ना? बाकी आमदार खासदार होणे म्हणजे महाराष्ट्राचे आमदार खासदार होण्यासारखेच आहे.) वेगळा विदर्भ मागणे म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी जे लढले त्यांच्या स्वप्नाचा अपमानच आहे. (अर्थात मान अपमान ही नैतीक बाब सामान्य जनांसाठी (वेगळ्या अर्थाने OBC)राखीव आहे.) असो. तर मुद्दा असा की, मराठी अस्मितेच्या मुद्याला धरून वेळोवेळी होणार्‍या वेगवेगळ्या प्रश्नांबाबतीत मराठी साहित्यिक नेहमी मलूल, बोटचेपी भुमीका का घेतात? किंबहूना काहीतरी (आर या पार) एकाच मुद्द्याची भुमीका का घेत नाही? महाराष्ट्रातच मराठी बोलणारे जास्त आढळतात. (हे काही नविन संशोधन नाही.) पर्यायाने मराठी वाचक महाराष्ट्रातच सापडतात. म्हणजेच मराठी साहित्य महाराष्ट्रातच जास्त तयार होते (व खपते). महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांतली जनता मराठी साहित्य जे काही वाचत असेल त्यांना त्यांची आवड, अभ्यास म्हणून मराठी साहित्य वापरत लागत असेल. असे असतांना मराठीतुन लिहीणारे साहित्यिक राजकारणाचा आखाडा सोडल्यास एखाद्या वेगळ्या व्यासपिठावरून (आपले मिसळपाव.कॉम व इतर माध्यमांतले काही अपवाद सोडून. मिपाचा जन्मच केवळा मराठी अभिव्यक्तीसाठी झाला आहे. वेगळे व्यासपिठ म्हणजे केवळ संकेतस्थळे नव्हेत, तर विचार व्यक्त करण्याचे माध्यम; जसे- वर्तमानपत्रे, संसदिय प्रणाली, दुरदर्शन आदी. ) मराठी साहित्य संमेलने देखील आपली भुमीका व्यवस्थीत मांडत नाही. आपल्या मराठीचा मुद्दा का मांडत नाही? की हे साहित्यिक कोणी बडा लेखक, कवी काय मुद्दा मांडतो आहे त्याची वाट पाहत आहे? की ते मराठी अस्मितेच्या मुद्याला केवळ राजकीयच मुद्दा आहे असे समजतात? की त्यांना मिळणारे केंद्रीय पुरस्कार, आर्थीक अनुदान यांची लालूच मधे येते? की राजकारण्यांचा त्यांवर वरदहस्त आहे? की 'आम्ही आपले वेगळे' आहोत असे त्यांना दाखवायचे आहे? असे म्हणतात की साहित्यिक हे खरे बुद्धीवादी असतात. समाजाला ते वैचारीक विचारांची चालना देतात. बहुतेक प्राध्यापक, शिक्षक हे साहित्यिक असतात. भले ते फिजीक्स, केमीस्ट्री, बायोलॉजी या इंग्रजी विषयात शिकवत असले तरी त्यांनी एखादा ग्रंथ, कादंबरी , कवीता लिहीली तरी ते लेखकच असतात व पर्यायाने साहित्यिकच असतात. मराठी अस्मितेच्या मुद्याला धरून एकाही शिक्षक प्राध्यापकांनी मराठीसाठी आपली भुमिका उघड केली नाही, जाहिर केली नाही. (असे असेल का की, बहूतेक कॉलेजेस, शाळा या राजकारण्यांच्या हातात असतात व आपण नोकरी करतो त्या संस्थेच्या राजकारण्यांना कसे दुखवायचे असा विचार त्यांच्या मनात येत असेल? ) असे असतांना सर्व मराठी साहित्यिकांनी मराठी अस्मितेच्या मुद्याला उचलूनच धरले पाहिजे.

वाचने 2294
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

अस्मितेच्या मुद्द्या वरुन राजकारण होतेच. धार्मिक, प्रांतिक, भाषिक अस्मिता हे मुद्दे अनेकदा चघळुन झाले आहेत. पुढेही होत राहतील. यातुनच विचारप्रक्रिया तयार होत असते. अभिमान ,गर्व ,अस्मिता यातुन जर संकुचित विचार प्रसारित होत असतील तर ते वैश्विक विचारांना हानीकारक ठरतात. आता विश्वात्मके देवे ॥ ..वगैरे फक्त फक्त कर्मकांडासारख बनत! अवांतर- साहित्यिक =साहित्तिक असे वाचतो प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

".... यातुनच विचारप्रक्रिया तयार होत असते" तुमच्याशी सहमतच आहेच. जगात वैचारीक क्रांतीत साहित्यिकांची भुमीका महत्वाची ठरलेली आहे. तेच चांगल्या वाईट विचारांची पायाभरणी करत असतात. ईतर समाज मग त्यावर विचार करून अंमलबजावणी करतो. "अभिमान ,गर्व ,अस्मिता यातुन जर संकुचित विचार प्रसारित होत असतील तर ते वैश्विक विचारांना हानीकारक ठरतात." साहित्यिकांनी आपल्याच भाषेच्या प्रचार/ प्रसार केला हा मुद्दा गर्वाचा व संकुचित विचारांचा कसा काय ठरू शकतो? आणि वैश्विक विचार मराठीला अस्मितेला संकुचीत समजणार्‍यांनाही त्यांच्या भाषेपुरता सिमीत करत नाही काय? "साहित्यिक =साहित्तिक असे वाचतो" सुचनेबद्दल धन्यवाद. बदल केला आहे. अवांतर: (काका, तुमची नेहमीची भाषा आठवून माला वाटलं की कोनी दुसराच मान्सांन लिवलय की काय? कोन्या साहित्यिकानं परतिक्रिया द्येली की काय आस वाटून ग्येलं पगा.) :-) ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

मुत्तेल्वार म्हणतात..आम्हि हिंदि भाषी आहोत....विदर्भात हिंदि बोलतात...हि चळवळ बहुजन समाजापर्यंत पोहोचली आहे का?....तेलंगणाचा प्रश्ण काय वळण घेतो आहे त्यावर अखंड महाराष्ट्र्चे काय होणार हे अवलंबुन आहे...... व मराठी अस्मितेचे पण..असे वाटते..

In reply to by अविनाशकुलकर्णी

सहमत आहे. भाषा,संस्कृतीपेक्षा अर्थकारणाला जास्त महत्व आहे हे तेलंगण प्रकरणातून दिसत आहे.तेलुगु चॅनलवर बोलताना काही तरुणांनी 'तेलुगु अस्मिता गेली चुलीत्,आम्हाला नोकर्‍या द्या,आमच्या मतदारसंघाचा विकास करा' असे उद्गार काढले. अशोक चव्हाणांनी विदर्भासाठी कितीतरी हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे असे वाचले. P = NP

आपल्या मराठीचा मुद्दा का मांडत नाही? की हे साहित्यिक कोणी बडा लेखक, कवी काय मुद्दा मांडतो आहे त्याची वाट पाहत आहे?
मराठी साहित्यिकांनी नक्की काय मांडणे अभिप्रेत आहे? साहित्यिकांनी मराठीचा मुद्दा मांडायचा म्हणजे नक्की काय करायचे? ते मराठीत लिहितात्(बरेच लेखक्/कवी पूर्ण वेळ मराठीत लिहीत असतात) म्हणजे मराठीचा प्रसार करतातच की! भेंडी P = NP

सदर लेख म्हणजे उचलली बोटे बडवला कळफलक ह्याचा उत्तम नमुना आहे.
मराठी अस्मितेच्या मुद्याला धरून वेळोवेळी होणार्‍या वेगवेगळ्या प्रश्नांबाबतीत मराठी साहित्यिक नेहमी मलूल, बोटचेपी भुमीका का घेतात?
नेमके कुठले प्रश्न आहेत ? साहित्तिकांची भुमिका बोटचेपी कशी? जरा उदाहरण द्याल का?
मराठी साहित्य संमेलने देखील आपली भुमीका व्यवस्थीत मांडत नाही. आपल्या मराठीचा मुद्दा का मांडत नाही?
आपण किती साहित्य संमेलने उपस्थित राहून हा निश्कर्ष काढलात ? किमान पक्षी कार्यक्रम पत्रीका तरी चाळलीत काय ? तमाम मराठी साहित्तिकांवर आरोप करताना आपला ह्या विषयावर काय अभ्यास आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
सर्व मराठी साहित्यिकांनी मराठी अस्मितेच्या मुद्याला उचलूनच धरले पाहिजे.
म्हणजे नक्की काय केले पाहिजे? मनसेची तळी उचलून धरायला पाहिजे का? - अफाट जगातील एक अडाणि.

In reply to by अडाणि

सदर लेख म्हणजे उचलली बोटे बडवला कळफलक ह्याचा उत्तम नमुना आहे.
सहमत, अर्थात हीच बोटे ह्याच कळफलकाला अश्याच प्रकारे काही पहिल्यांदाच लागली नाही आहेत. असो.