Skip to main content

गूढ...थरारक....भीती वाटेल अशी भुताटकी

लेखक अनंत छंदी यांनी गुरुवार, 18/12/2008 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
व्यंकूचा भयकथेचा धागा पाहून मनात एक विचार आला. आपल्यापैकी कित्येकांचा भूते असण्यावर विश्वास नसेल तर कित्येकजण छातीठोकपणे त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना, परिचितांना भुताटकीचा अनुभव आल्याचे सांगतील. तर असे काही अनुभव असतील तर लिहा. काल्पनिक भयकथेपेक्षा हे अधिक रोमांचक वाटतील.

वाचने 20343
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

आता मात्र खरच भीती वाटायला लागली.. थट्टा सोडा. विषय चांगला आहे, पण खरोखरच आपली फाटली होति हे मान्य करण कठीण जातय बहुदा लोकांना.

मला स्वतःला अनुभव असा नाही. पण आमच्या अजोबांना भूत दिसले होते. आम्हाला ते गोष्टी सांगायचे. आम्ही लहान असताना आमच्या शेजारच्या एक काकू आम्हा मुलांना भुताच्या गोष्टी सांगत. ते ऐकताना मात्र फरच भीति वाटत असे. अगदी भर दुपारी सुद्धा आम्ही मुले घाबरत असू. पण भूताशी प्रत्यक्ष भेट अजून घडली नाही. आम्हाला पाहून त्याचीच फाटत असावी बहुधा. इतरांचे किंवा इतरांच्या इतरांचे अनुभव ऐकण्यास उत्सुक आहे. --(सुईदोर्‍याच्या शोधात) लिखाळ.

ऑर्कुट कम्युनिट्यांचे स्वरूप यायला लागलेय अशा विषयांमुळे. रोज उठून प्रत्येकाला कुठले तरी अनुभव सांगायला लावण्यात काय अर्थ आहे? असे हजार अनुभव असतात प्रत्येकाकडे!! भुताटकीचा, स्वयंपाकाचा, पहिल्या मुलाखतीचा, कॉलेजच्या पहिल्या दिवसाचा, पहिल्या प्रेमाचा... काहीतरी वेगळे हाती लागेल असे विषय चालू राहावेत, ही अपेक्षा. हे मत व्यक्त करण्यामागे टीकेचा, वैयक्तिक आकसाचा, पूर्वग्रहदूषिततेचा सूर नाही. क्रुपया समजून घ्या.

In reply to by आपला अभिजित

असे हजार अनुभव असतात प्रत्येकाकडे!! भुताटकीचा, स्वयंपाकाचा, पहिल्या मुलाखतीचा, कॉलेजच्या पहिल्या दिवसाचा, पहिल्या प्रेमाचा...
पहिल्या प्रेमाचे हजारो अनुभव??? प्रत्येकाकडे???

In reply to by आपला अभिजित

आपला अभिजितजी नमस्कार! भुताट़कीच्या अनुभवांबाबत मी सुरू केलेल्या धाग्यांबाबत आपला आक्षेप आहे. ऑर्कुटसारखे स्वरुप मिपाला येऊ नये असे आपण म्हणता, काही अंशी आपल्या या मुद्द्याशी मी सहमतही आहे. परंतु असे पहा अभिजितजी मुळात लेखन हा स्वतःला अभिव्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. मी काय लिहू, कसे लिहू, इतरांना ते आवडेल का? असे प्रश्न माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाला नेहमी पडतात.माझ्यासारख्या इतरांनाही ते पडत असतील असे वाटते. अशावेळी या समूहाला लिहिते करण्यासाठी त्यांचे, अथवा त्यांनी श्रवण केलेले अनुभव कथन करण्यास उद्युक्त करणे म्हणजे उत्तम मार्ग आहे. हा एक दृष्टीकोन हा धागा सुरू करण्यामागे होता, आहे. दुसरा मुद्दा असा की, येणारे लेखन जरा रंजकही हवे. आता मनापासून खरे सांगा की ,लहानपणी आजी, आजोबा, काका, काकूंनी रात्री अंगणात चांदण्यात बसल्यावर तुम्हाला सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी तुम्हाला आवडल्या होत्या की नव्हत्या? वरचे काही प्रतिसाद तुम्हाला हेच सांगतायत.म्हणजेच या लेखनाने काही अंशीतरी मनोरंजनही होणार आहे. मिपाला गंभीर चर्चांबरोबरच हलकेफुलके मनोरंजनही अभिप्रेत आहे. ते उद्दिष्ट या धाग्याने काही प्रमाणात साध्य होईल. सगळेच काही घनगंभीर चर्चा करणारे विचारवंत मिपावर नाहीत. आमच्यासारखे काही अतिसामान्य, क्षुद्र जीवही आहेत. आमच्या बौद्धीक कुवतीप्रमाणे आमचे मनोरंजन करून घेण्यासाठी मिपाचा एखादा कोपरा शिल्लक राहूद्या की! न जाणो उद्या यातून आत्मविश्वास गवसलेला एखादा लेखक मिपासाठी अभिमानास्पद ठरेल. प्रतिसाद आपणाला कदाचित कटू वाटला तर त्यासाठी आधीच आपली माफी मागतो. कळावे .

In reply to by अनंत छंदी

धागा वाचल्यावर भितीणं दातखिळी बसलेली .. प्रतिक्रीयावाचून मोकळी झाली! अवांतर : धागा लेखकाने किमान लेखापेक्षा प्रतिक्रीया मोठी लिहीलीये त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या हॉर्डीक शुभेच्छा ! अंमळ भितिदायक आणि थरारक ) टारझन

साधारण १९७२ सालातील ही गोष्ट आहे. माझ्या वडिलांना आलेला हा विचित्र अनुभव मी त्यांच्याच तोंडून ऐकला आहे. त्यावेळी आम्ही एका अत्यंत दुर्गम खेड्यात रहात होतो. गावात जायला त्या काळी एकही एस.टी. बस नव्हती. मुख्य रस्त्यापासून सुमारे चार मैल चालत गाव गाठावे लागे. ती वाटही घनदाट जंगलातून होती. खालच्या बाजूला पंचवीस तीस फूट खोलवर वाहणारी नदी आणि एका बाजूला सरळसोट कातळाचा डोंगरी कडा यामधून ती जेमतेम फूट दोन फुटाची पायवाट वाटसरूला गावात आणून सोडे. तर अशा या गावातून बदली झाल्यामुळे आमचे घरगुती सामान ट्रकने दुसर्‍या गावात न्यायचे होते. गावाच्या एका बाजूस असलेल्या त्यातल्या त्यात सपाट कातळावरून आम्ही त्यावेळी रहात असलेल्या घरापासून किलोमीटरभर अंतरावर ट्रक नेणे शक्य होते. वडिलांनी त्यावेळी तालुक्याच्या ठिकाणी राहणार्‍या व रेशनची वाहतूक करणार्‍या ओळखीच्या एका ट्रक मालकाला सामान वाहतुकीबाबत विचारले होते. दोन दिवसांनी नेमका त्याच रस्त्यावरून पुढील गावास रेशनचे धान्य घेऊन त्याचा ट्रक जाणार होता. तो रिकामा होऊन परत येताना आमचे सामान घेऊन निघणार होता. परंतु त्याला परत यायला रात्र होणार होती. व ड्रायव्हरला आमचे सामान कोठून उचलायचे आहे याचा पत्ता नव्हता म्हणून त्या ट्रक मालकाने वडिलांना हमरस्त्यावर थांबण्यास सांगितले होते. त्या प्रमाणे वडिलांनी सायंकाळी प्रकाशाचे साधन म्हणून बॅटरी व हातात काठी बरोबर घेऊन घर सोडले. ज्या ठिकाणी रस्त्यावर ते ट्रकची वाट पहात तांबणार होते तिथे ओसाड माळावर एक वारेबुवा या नावाने ओळखल्या जाणार्‍या देवाच्या लहानश्या देवळाव्यक्तिरिक्त काहीही नव्हते. ट्रकला यायला मध्यरात्र होणार याची खात्री असल्यामुळे वडिलांनी बरोबर नेलेली शाल पांघरून घेऊन देवळात असलेल्या एकुलत्या एक लाकडी बाकावर ताणून दिली. आजूबाजूला वस्ती नसल्यामुळे शांतता होती. वडिलांचा डोळा लागून घटकाभर झाला असेल. एवढ्यात त्यांना कसल्यातरी आवाजाने जाग आली. देवळात असलेल्या गोटासदृष्य मूर्तीभोवती जोरदार श्वासोच्छ्वास करीत, जमिनीवर पाय ओढत कोणीतरी चालत आहे हे त्यांना जाणवले. उशाशी असलेली बॅटरी हातात घेत त्यांनी पेटविली व सगळीकडे प्रकाश टाकून पाहिला देवळात कोणीही नव्हते. मात्र आवाज चालूच होता. तितक्यात दुरून ट्रकचा आवाज येऊ लागला व अवघ्या पाच मिनिटात ट्रक आला त्यातून ते घरी परतले. हा अनुभव त्यांनी दुसरे दिवशी आम्हाला सांगितला. विशेष म्हणजे एवढा अनुभव आलेला असूनही त्यांचा भुताखेतांवर फारसा विश्वास नव्हता. चर्चा करताना ते हा एक अतर्क्य अनुभव आहे हे मान्य करीत, पण ही भुताटकी आहे हे मान्य करीत नसत. नेहमीच त्यांचे म्हणणे देवळात भूत येईलच कसे हे असे.

In reply to by अनंत छंदी

भुत नास्तिक असेल किंवा ख्रिश्चन, मुसलमान, ज्यूचे असेल. त्याला आपल्या देवाची भीती वाटत नसेल.

In reply to by बट्टू

लै भारी मालक! हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नाही. मला कधी भूत भेटलच तर त्याला विचारीत जाईन, की बॉ तुही जात कंची? :))

मला स्वतःला तरी अजून या प्रकारचा काही अनुभव नाही. ( आला तरी फाटणार नाही अशी बतावणीही मी करणार नाही!! ;) ) बाकी या विषयावरून नेहमी "अ ब क ड ई" या दिवाळी अंकाच्या "चमत्कार" विशेषांकाची आठवण होते. असे कितीतरी अनुभव त्यात नमूद केलेले होतेत. त्यातल्या त्यात श्री. मल्हार कॄष्ण गोखले यांनी लिहिलेले तर खरेच अचंबित करणारे होतेत. "याविषयाबद्दल खरे खोटे माहित नाही बॉ आपल्याला" हे माझे प्रांजळ मत आहे :) मुमुक्षु

In reply to by राघव

तसा सत्यता या वार्षिकानेही १९८० साली या विषयावर दिवाळी अंक काढला होता. त्यात लोकांनी आपले अनुभव दिले होते. या खेरीज बरेच वर्षांपूर्वी १०१ भुतांच्या गोष्टी नांवाचे पुस्तक वाचल्याचे आठवते आहे. त्यात खासकरून सिंधुदुर्गातील भुताटकीच्या कथा होत्या. पुस्तक लायब्ररीतून आणले होते व जुने असल्याने त्याची लेखक/प्रकाशक आदि माहिती असणारी पाने फाटलेली होती त्यामुळे लेखक कळू शकला नाही.

In reply to by आपला अभिजित

हा अंक १९८८ साली काढण्यात आला होता. मी टाईप करताना चुकीचे केले. या अंकाची किंमत १८ रुपये होती. पाने १४४. का हो? काही विशेष?