गदर पर्वातील क्रांतिरत्न आणि हिरे-मोती
१६ नोह्वेंबर. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामतील एक महान दिवस. या दिवशी एकाच अभियोगात एकाच तुरुंगात एकाच वेळी गदर उत्थानातील सात क्रांतिकरकांना हौतात्म्य प्राप्त झाले! हुतात्मा ’क्रांतिरत्न’ विष्णु गणेश पिंगळे, हुतात्मा सरदार कर्तारसिंग सराबा, हुतात्मा सरदार बक्षिससिंग, हुतात्मा सरदार जगतसिंग, हुतात्मा सरदार सुरायनसिंग भुरसिंग, हुतात्मा सरदार सुरायनसिंग ईश्वरसिंग आणि हुतात्मा सरदार हरनमसिंग हे ते सात हुतात्मे. एकाच पर्वातील एकाच संघट्नेच्या सात क्रांतिकारकांनाएकाच अभियोगात एकत्रित फाशी सुनावली गेल्याचा एकमेवाद्वितिय ऐतिहासीक प्रसंग.
गदर संग्राम म्हणजे साक्षात दुसरे १८५७! हिंदुस्थानचे दुसरे स्वातंत्र्ययुद्ध! या युद्धाची बीजे रुजली होती अमेरिकेत. १९०८ ते १९१३ च्या दरम्यान गदर ची स्थापना, संघटन व सक्षमीकरण अमेरिकेत घडले व हिंदुस्थाना बाहेर राहुन हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक क्रांतिअध्वर्यु या संग्रामात सक्रिय सहभागी होते! क्रांतिपर्वातील मध्ययुगात उसळलेल्या या ज्वालामुखीमध्ये डॉ. खानखोजे, पंडित काशीराम, लाला हरदयाळ, क्रांतिरत्न हुतात्मा विष्णु गणेश पिंगळे, हुतात्मा सरदार कर्तारसिंग सराबा, डॉ. तारकनाथ दास, सरदार सोहनसिंग भकना, भाई परमानंद, सरदार हरनामसिंग ’तुंडा’, क्रांतिशिरोमणी राशबिहारी बोस, विनायकराव कपिले, बापुराव नांदेडकर, एम पी टी अचार्य असे महाभयंकर स्फोटक रसायन ठासुन भरलेले होते.
हुतात्मा क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे (पाश्चात्य पोशाखात)
हुतात्मा क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे (हिंदुस्थानातील गुप्तचरांकडे असलेले चित्र)
हुतात्मा कर्तारसिंग सराबा
क्रांतिशिरोमणी राशबिहारी बोस
लाला हरदयाळ
सरदार ज्वालासिंग
भाई परमानंद
सरदार सोहनसिंग भकना.jpg" width="287" height="313" alt="" />
डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे
गदर संघटना हा खरेतर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे आणि तो विशाल वृत्तांत या लेखातील एक उपभाग म्हणुन देणे उचित नाही, त्यासाठी मी एक स्वतंत्र लेख द्ययचा प्रयत्न करीन. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीची दुर्दम्य अभिलाषा छातीशी बाळगणाऱ्या क्रांतिकारकांना स्थान, साधने व सामग्री या कशाचेच बंधन नसते हे गदर ने साऱ्या जगाला दाखवुन दिले. गदर म्हणजे केवळ इच्छा वा दिवास्वप्न नव्हते तर त्यामागे ध्यासा बरोबरच जागतिक परिस्थितीचा आढावा, अभ्यास व त्याचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामाला लाभ कसा घेता येइल याचे परीपूर्ण नियोजन होते. हजारो मैल अंतरावरून हिंदुस्थानात सशस्त्र संग्राम उभा करण्याचे नियोजन, प्रशिक्षण, साधक असे राजकिय आंतरराष्ट्रिय संबंध संस्थापन व संगोपन, हिंदुस्थानातील सैन्यात क्रांतिची बीजे रुजवीणे व दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांचे लक्ष, सैन्य व सामग्री हे युरोपात अडकलेले असताना त्याचा अचूक फायदा उठवित संग्राम उभा करणे यात गदर चे कौशल्य, क्षमता व महनियता दिसुन येते.
’गदर’च्या १९१५ च्या संग्रामात सिंहाचा वाटा होता तो हुतात्मा क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे यांचा. आजचा दिवस हा गदर क्रांतिकारकांच्या सर्व हुतात्म्यांचा स्मृतिदिन असल्याने केवळ हुतात्मा क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे यांच्यावर न लिहिता या संग्रामाविषयी व हौतात्म्याविषयी लिहिणे अधिक समयोचित असले तरीही हुतात्मा क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे यांचा या पर्वातील कामगिरी विषयक उल्लेख अपरिहार्यच आहे. शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेला पण हिंदुस्थानातील विद्यार्थिदशेतच लो. टिळक, स्वा. स्वा. सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाने व कर्तृत्वाने प्रभावित झालेला हा क्रांतिकारक तिथेही आपल्या ध्येयाला विसरला नाही. हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे यांनी गदरच्या या प्रस्तावित संग्रामाला व्यापक स्वरुप देण्याचे व सुसूत्रता आणण्याचे मोलाचे कार्य केले. हिंदुस्थानातील युरोपिय देशातील काही विद्यार्थी जर्मनीत एकत्र आले व त्यांनी बर्लिन समितीची स्थापना केली. पुढे त्याचे रुपांतर हिंदुस्थान स्वातंत्र्य संघात झाले. याच सुमारास पिंगळे यांनी अमेरिकेते सॅन फ्रान्सिस्को येथील जर्मन परराष्ट्र कचेरीशी संपर्क साधला होता. या द्रष्ट्याने युद्धाचा सखोल विचार केला होता. त्यांनी अनेकांना युद्धशिक्षणासाठी प्रवृत्त केले. हुतात्मा सरदार अर्तारसिंग सराबा याना एका जर्मन कंपनीत विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले गेले. भाई उधमसिंग यांनी हॉंगकॉंग येथे तोफखान्यावर काम केले होते, त्यांनीअनेक सहकाऱ्यांना संतोकसिंग व ज्वालासिंग यांच्या शेतात अनेकांना त्याचे प्रशिक्षण दिले. स्वत: पिंगळे आणि हरनामसिंग हे स्फोटक उत्पादनाच्या मागे लागले. डॉ. खानखोजे हेही स्फोटकविद्येत पारंगत होते. एकदा स्फोटक निर्मितीचे प्रयोग करित असताना स्फोटकाने भरलेली लोखंडी नळी स्फोटाने फुटली व हरनामसिंग यांचा हात तुटला. पुढे ते हरनामसिंग तुंडा वा ’तुंडी लाट’ या नावाने प्रसिद्ध झाले.
सिंगापूरहून व्हॅंकुव्हर येथे शांघाय, योकोहामा, कोबे येथुन रोजगारासाठी शिख मजुरांना घेउन जाण्यासाठी सिंगापूरचे व्यापारी बाबा गुरुदत्तसिंग यांनी नानन्क स्टीम नॅव्हीगेशन या कंपनीची स्थापना करुन तिच्या वतीने कोमागाटा मारु हे जहाज हाकारले. या जहाजाला कॅनडा सरकारने प्रवेश परवाना नाकारला (२३ मे १९१४) आणि बोट खोल समुद्रात उभी करायला लावली गेली. सुमारे दोन महिने गुरुदत्त यांच्या सरकारशी वाटघाटी सुरू होत्या. उतारू संतप्त झाले. याच सुमारास डॉ. खानखोजे व हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे हे देखिल व्हॅंकुव्हर येथे उपस्थित होते. साहजिकच बोटीतील उतरुंवर गदरचा प्रभाव पडला. प्रवाशांनी बंड करुन जहाज ताब्यात घेतले. अखेर गुरुदत्त यांनी सरकारकडुन प्रवासखर्च व नुकसानभरपाई वसूल केली व मगच (४ ऑगस्ट १९१४) परतीचा प्रवास सुरू केला. या उतारुंच्या लढ्याचे कौतुक करणारा लेख ’अमेरिकान गॅलिक’ या अमेरिकन पत्राने प्रसिद्ध केला. आता महायुद्ध सुरु झाले होते. या बोटीला सिंगापूर येथे प्रवासी उतरविण्यास मनाई केली गेली.
याच बोटीने उतारुंमार्फत शस्त्रे व दारुगोळा हिंदुस्थानात पाठविण्याचा बेत गदर ने आखला. ही कामगिरी भाई भगवानसिंग व हुतात्मा कर्तारसिंग यांच्यावर सोपविण्यात आली होती. ऑक्टोबर १९१४ मध्ये धोक्याचे इषारे व मित्रांचा परावृत्त करण्याचा प्रयत्न दूर सारुन हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे हिंदुस्थानात येण्यास निघाले. महायुद्धात ब्रिटिश सरकार गुंतले असतानाच सिंगापूर ते हिंदुस्थान या पट्ट्यात लषकराच्या तुकड्यांमध्ये जागृती निर्माण करुन त्यांना सरकार विरुद्ध लढण्यास व सरकारचा हुकुम झुगारुन देण्यास प्रवृत्त करण्याची ’गदर’ ची योजना होती. या कामासाठी युद्धकाळात हिंदुस्थानात शिल्लक असलेले इंग्रजी सैन्य, तोफखाना वगैरेची माहिती ’गदर’ ने गोळा केली होती. ब्रिटिशांचे सर्व सैन्य, शस्त्रे व लक्ष युरोपात केंद्रीत होत असतानाच इकडे हिंदुस्थानात त्यांची पकड ढिली होईल व नेमक्या त्याच संधीचा फायदा घेत आतुन संग्रम उभारुन शिपायांना सरकारविरुद्ध शस्त्र उगारयला लावुन इंग्रजांना हा देश सोडायला लावायचा अशी ही ’गदर’ ची महत्वाकांक्षी व धाडसी योजना होती. हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे हिंदुस्थानात आले तेव्हा पोलिस मागावर होतेच. त्यांची गाठ इथे येताच राशबिहारी बाबुंशी पडली. आता कार्याला वेग येत होता. २१ फेब्रुवारी १९१५ हा दिवस सार्वत्रिक उठावासाठी निश्चित केला गेला. पंजाबात तर ’गदर’ ला प्रचंड प्रतिसाद लाभला. मोघ, छबा, फिरोजपूर येथे धनसंकलनार्थ दरोडे घातले गेले. पंजाबातले विद्यार्थी व शिख ठाणेदार ’गदर’ चा प्रसार कर्य लागले. सरकार ’गदर’ नेत्यांचा शोध घेत असतानाही हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे व क्रांतिमहर्षी राशबाबू वेष बदलुन सर्रास पंजाबात फिरत होते, या दोघांवर सरकारने इनाम लावले होते.
नेहेमीप्रमाणेच फितुरीने घात केला. कृपालसिंग नावाच्या शिपायाने प्रथम सामील होत नंतर फितुरीने सर्व माहिती सरकारला दिली व अटकसत्र सुरु झाले. तरीही हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे वेष पालटुन सर्वत्र फिरत पुन्हा नव्या बांधणीच्या प्रयत्नात जीवावर उदार होऊन फिरत होते. त्यांना मराठी व्यतिरिक्त पंजाबी, गुजराथी, बंगाली, हिंदी व इंग्रजी या भाषा उत्तम बोलता येत, त्यामुळे ते सफाइने सर्वत्र वावरत होते. क्रांतिमहर्षी राशबाबू तर हार्डिंग्ज हल्ला प्रकरणापासून सरकारला हवे होते. हुतात्म क्रांतिरत्न पिंगळे यांची तयारी इतकी जबरदस्त होती की त्यांनी पंजाबचे तत्कालिन गव्हर्नर मायकेल यांच्या शरिररक्षकांपैकी काही आपल्या कामगिरीसाठी फोडले होते. या कौशल्याची दाद नकळतच्ग ओडवायरही देउन गेला. एक प्रयत्न फसल्यावरही हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे खचले नाहीत. डोक्यावर टांगती तलवार मिरवत ते फिरत होते. त्यांनी नव्याने बॉंब जमा करुन मीरतच्या घोडदळाशी संपर्क साधला व पुन्हा हल्ला करायचे ठरविले. दिल्ली येथील राशबाबूंच्या परिचयाचे दोन क्रांतिकारक रामलाल व शंकरलाल यांच्याशी पिंगळे यांची गाठ पडली व त्यांच्या सहाय्याने त्यांनी १८ अत्यंत शक्तिशाली बॉंब मिळवीले. मात्र एका अफगाण दफेदारावर ईशारा असतानाही केवळ स्वातंत्र्याच्या ध्यासापायी वेडे झालेल्या पिंगळे यांनी विश्वास ठेवला आणि ते बॉंब त्याच्या स्वाधीन केले. त्याच्या फितुरीने हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे मीरतच्या बाराव्या घोडदळाच्या वसहतीत पकडले गेले.
गदर्चा धसका घेतलेल्या व त्या क्रांतिकातकांचा भयानक तिरस्कार करणाऱ्य पंजाब गव्हर्नर ओडवायरने स्वातंत्र्य संग्राम चिरडण्यासाठी पकडलेल्या सर्वांवर ’झटपट’ पद्धतिने, विनापंच व पुनर्न्याची मुभा न देता ’विशेष अधिकार न्यायालयात’ खटला चालवावा यासाठी सरकारला लकडा लावला. त्या नीच माणसाच्या प्रयत्नाला जुलमी ब्रिटिश शासनाने यश दिले आणि ’लाहोर कटाचा अभियोग’ उभा राहिला; भारत संरक्षण निर्बंधान्वये उभा राहीलेला हा पहिलाच अभियोग. हा अभियोग सर्वार्थाने अभूतपूर्व होता.
आरोपींची संख्या ८१
पैकी ६२ न्यायालयात उपस्थित केले गेले, अनेक फरारी होते; पुढे काही पक्डले गेले.
सर्वांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला
१९१५ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला अभियोग ऑगस्टच्या अखेरीस संपला
२४ जणांना फाशी तर सुमारे चाळीस जणांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली गेली
पुढे या २४ पैकी बलवंतसिंग, हरनामसिंग तुंडा, हिरदाराम, जगतराम, केसरसिंग, खुशालसिंग, निघनसिंग, भाई परमानंद, पृथीसिंग, रामशरणदास, रुल्लियासिंग, सावनसिंग, सोहनसीम्ग, वसावासिंग इत्यादींची फाशी माफ करण्यात आली आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली.
दिनांक १६ नोव्हेंबर १९१५ रोजी गदर चे सात क्रांतिकारक आपल्या ध्येयाखातर निडरपणे व ताठ मानेने फासवर गेले. फाशी जायच्या एक अधिकारी हुतात्मा क्रांतिरत्न पिंगळे यांना म्हणाला की आम्ही तुम्हाला शक्य तितके दिवस जीवंत ठेवले. त्यावर पिंगळे उत्तरले "हा तर तुम्ही माझ्यावर घोर अन्याय केलात. कारण यामुळे या आधीच्या हुतात्म्यांचा माझ्यावरील विश्वास डळमळीत झाला असेल. शिवाय मला आधीच स्वर्गात जाउन माझ्या सहकाऱ्यांची सोय करायची होती"
जरी १९१५ च्या गदर संग्रामाला दुर्दैवाने यश लाभले नाही, तरीही पुढ्च्या अनेक संग्रामांची बीजे त्यात दिसून येतात. गदर च्या त्या सात हुतात्म्यांना सादर प्रणाम.
प्रतिक्रिया
ओडवायर वर पुढे...
क्रांतिकारक उधमसिंग ह्यांनी गोळ्या झाडल्या (पण दुर्दैवाने तो वाचला) - बरोबर ना ?
========================================
http://kuthekay.fortunecity.com
प्रभावी
साक्षीजी नेहमीप्रमाणेच प्रभावी लेख. सर्व स्वातंत्र्यवीरांना वंदन!
आता एक लेख, प्रकटन देखील येउ दे की स्वातंत्रवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देउन आपल्याला स्वातंत्र मिळवुन दिले व ते स्वातंत्र्य आज आपण कसे उपभोगत आहोत. आपले मत वाचायला आवडेल.
अतिशय
अतिशय आवडला लेख.
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
खूप सुंदर
खूप सुंदर लेख.
क्रांतिकार्याच्या आठवणीनेसुद्धा मन फुलून येते. अतिशय स्फुर्तिदायी आहे ते. जरी अपयशी झालेत तरीही एका ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावणार्या क्रांतिवीरांचे जीवन स्फुर्तिदायीच.
साक्षीकाका, त्या फोटोज समवेत नावे पण द्या ना.
मुमुक्षु
नावे..
द्यायलाच विसरलो.
ती नावे अशी आहेत (वरपासून अनुक्रमे):
हुतात्मा क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे (पाश्चात्य पोशाखात)
हुतात्मा क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे (हिंदुस्थानातील गुप्तचरांकडे असलेले चित्र)
हुतात्मा कर्तारसिंग सराबा
क्रांतिशिरोमणी राशबिहारी बोस
लाला हरदयाळ
सरदार ज्वालासिंग
भाई परमानंद
सरदार सोहनसिंग भकना
डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे
धन्यवाद
साक्षी उत्तम लेख!
अशक्य होती ही माणसे!!! _/\_ त्रिवार प्रणाम!!!
(आजची देशाची अवस्था पहाता मला लाज वाटते आणि असेही वाटते की पुढच्या पिढ्यांना आपण चांगले दिवस कसे दाखवणार?)
(तुम्ही दिलेली सर्व नावे चित्राबरहुकूम टाकून मूळ लेख संपादित केलाय)
चतुरंग
साक्षीकाक
साक्षीकाका आणि चतुरंग, दोघांसही धन्यवाद!
हा लेख माझ्या मित्रपरिवारास पाठवला आहे.
मुमुक्षु
त्यावर
त्यावर पिंगळे उत्तरले "हा तर तुम्ही माझ्यावर घोर अन्याय केलात. कारण यामुळे या आधीच्या हुतात्म्यांचा माझ्यावरील विश्वास डळमळीत झाला असेल. शिवाय मला आधीच स्वर्गात जाउन माझ्या सहकाऱ्यांची सोय करायची होती"
सलाम..!
संग्राह्य लेख..
तात्या.
-- या आमच्या शिळोप्याच्या ओसरीवर.. बसा घटकाभर..!
सहमत
गदर संग्राम हा खर्या अर्थाने एनाराय स्वातंत्र्यसैनिकांनी मातृभूमीसाठी केलेला संग्राम !
ज्याकाळात निवासी भारतीय ब्रिटिशांची सेवा करण्यात , आणि प्राप्त परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न न करता ऍडजस्ट करण्यात धन्यता मानत होते, तेव्हा त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न ह्या एनाराय स्वातंत्र्यसैनिकांनी केला.
ह्या संग्रामातील कॅलिफोर्नियातील सैनिकांवर अमेरिकन लोकशाहीचा आणि अमेरिकेने ब्रिटिशांपासून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा खोल प्रभाव होता.
ह्या सैनिकांना अभिवादन.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
अतिशय सुंदर लेख...
अभिनंदन...नेहेमीप्रमाणेच...
अजुन एक माहिती म्हणजे हुतात्मा सरदार कर्तारसिंग सराबा हेच सरदार भगतसिंग यांचे प्रेरणास्थान होते. जवळजवळ गुरुशिष्यासारखे होते दोघे आणि दोघांनीही फासावर जाण्यापर्यंत देशसेवा सारखीच तोडीची केली आहे.
मुकुल...
कोटी-कोटी प्रणाम!!
या महान देशभक्तांना कोटी-कोटी प्रणाम!!
आपला,
(नतमस्तक) भास्कर
अतिशय
सुंदर लेख आणि या हुतात्मांना प्रणाम.
फारच सुरेख
फारच सुरेख लेख...
गदर च्या त्या सात हुतात्म्यांना सादर प्रणाम...खरचं ही भारतमातेची क्रांतिरत्नेच आहेत...
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
मदनबाण.....
Life is what happens while you are busy making other plans.
John Lennon
या क्रांतीवीरांना शतशः प्रमाण.
ह्या महान क्रांतीवीरांचे उपेक्षा करण्याच पातक ज्या काँग्रेसने इतकी वर्षे केल त्याच पाप कुठे फेडणार आहेत देव जाणो.
या क्रांतीवीरांना शतशः प्रमाण.
"अनामिका"
"अनामिका"
"सेक्युलर "असणे म्हणजे जर 'हिंदू' वा इथल्या भल्याबुर्या इतिहासाची लाज वाटणे असेल तर मी 'सेक्युलर' असण्याची मला लाज वाटेल, 'हिंदू' असण्याची नव्हे."
छान
खरच छान माहितीपूर्ण लेख.
सर्व हुतात्म्याना शतशः प्रणाम.
कर
तेथे कर माझे जुळती