हरवलेलं विश्व
लेखनविषय (Tags)
विमानाने उड्डाण केल आणि जयुने हलकेच निश्वास सोडून मान मागे टाकली आणि थोड़ी रिलॅक्स झाली. आज आयुष्यात पहिल्यांदाच ती एकटीच बाहेर पडली होती. त्यासाठी विजयशी तिने कितितरी वाद घातला होता.
***
विमानात बसल्या बसल्या तिच्या मनात काही दिवासांपूर्वीच्या घटनांच्या आठवाणींचे आवर्त फिरत होते...
".....अग पण मला इतक्या लांब आणि ते ही 10/12 दिवस कस जमेल? तू मुलांना घेऊन जा ना त्यांच्या सुट्टीमद्धे. सोबत ललिताबाईंना पण घे. हव तर अजयच्या बायकोला पण विचार. ती येईल. हा काय हट्ट आहे?" विजय वैतागुन बोलत होता.
"माझ्यावर आवाज चढवू नकोस विजय. मुलांना इजिप्त बघण्यात काय इंटरेस्ट असणार? दोघे फ़क्त आठ वर्षाचे आहेत. आणि तुझा भाऊ अजय आणि अंजली अजुन नवीन लग्न झालेले आहेत. त्यात अरेंज मॅरेज आहे त्याचं. हनीमूनला जाऊन आल्या दिवसापासून मामंजीनी अजयला ऑफिसला यायला लावलं आहे. मुळात त्याच्या नावाने नवीन कंपनी सुरु करण्याची घाई काय होती? वर्षभराने सुरवात केली असती तरी चालाल असत न? तो सध्या पुरता कामात बुडाला आहे नवीन कंपनीच्या. त्यामुळे त्यांना एकमेकांसाठी कमी वेळ मिळतो. त्यात मी तिला घेऊन जाऊ? असा कसा रे तू? सर्वात महत्वाच म्हणजे मला तुझ्याबरोबर जायचं आहे आणि तु आला नाहीस तर मी एकटीच जाईन. मला कोणाची सोबत नको आहे." शेवटी जयश्री वैतागुन म्हणाली.
वाद वाढतो आहे हे लक्षात येऊन विजय गप्प बसला आणि तेवढ्या पुरता विषय थांबला होता.
***
हवाईसुंदरीने कुठलीशी अनाउंसमेंट केली आणि जयूची तंद्रि तुटली; क्षणभर तिने आजूबाजूला बघितल. प्रत्येकजण स्वतःमध्ये रमलं होत.... आणि मग परत जयुच मन विचारांमध्ये गुंतलं.... तिच्या लग्ना अगोदरच्या आठवणीत रमल...
***
.....वीरेन्द्रराजे आणि त्यांचे मोठे बंधू नरेंद्रराजे जाधव मुळचे सरदार घराण्यातील.आजही ते संपूर्ण कुटुंबासोबत धुळ्याजवळील त्यांच्या पिढीजात वाड्यात राहात होते. दोन्ही बंधू हुशार आणि यशस्वी उद्योजक होते. त्यांच्या पुढील पिढीनेही वडिलांचा कित्ता गिरवाला होता. वीरेंद्रराजांनी लग्न केले नव्हते. नरेंद्रराजांना मात्र दोन मुलगे आणि एक मुलगी होती. जयश्री दोन भावांमधील एकटीच कन्यारत्न आणि त्यात शेंडेफळ असल्याने अत्यंत लाडकी होती.
अप्रतिम लावण्य घेऊन जयश्री जन्मली होती. निळसर डोळे, गोरिपान अंगकांति, उजव्या गालावर पड़णारी मोहक खळी, सुंदर लांबसडक पिंगट रंगाचे केस. शेलाटा मोहक बांधा.; अशी जयश्री केवळ सुंदर होती अस नाही तर अत्यंत हुशार होती. beauty with brain! तिला आर्कियोलॉजिची प्रचंड आवड होती... जुन्या इमारती आणि गुम्फा, sculptures, ऐतिहासिक कथा, काळ... याची खूप आवड होती. तिची ही आवड तिच्या काकांचा कौतुकाचा विषय होता. त्यामुळे ते तिला लाहानपणापासूनच भारतातल्या विविध लेणी गुंफा दाखवायला स्वतः घेऊन जायचे. त्यामुळे ही तिची आवड छान जोपासली गेली. या आवडीमुळेच 12वि नंतर तिने याच विषयाचा अभ्यास करण्याचे ठरवले होते. हुशार जयश्रीला शिक्षणासाठी कधीच अडवले गेले नव्हते.
पण मग एका लग्न समारंभामधे विजयने जयश्रीला बघितले. केवळ 20 वर्षाची होती जयश्री. कॉलेजच्या दुस-या वर्षात. परंतु अप्रतिम सुंदर दिसत होती. कंबरेपर्यंतचे लांब केस आणि एखाद्या अप्सरेचा कोरिव चेहरा. वागण्यातली लीनता. मोठ्यांचा आदर करणे. यामुळेच तिला पाहाताच विजय तिच्या प्रेमात पडला आणि त्याने तिला रितसर मागणी घातली.
विजय म्हणजे रणजीतराजे शिंदे यांचा मोठा मुलगा. राज्ये कधीच खालसा झाली असली तरी राजे शिंदे यांना आजही तोच मान दिला जायचा. शिंदे घराण्याने पहिल्यापासूनच राजकारणात रस घेतला. परंतु स्वार्थासाठी नाही. त्यांनी प्रामाणीकपणे पिढ्यांपिढ्या लोकांसाठी काम केले होते. त्यामुळे त्यांना पंचक्रोशित खूप मान होता. त्यांचा शब्द अखेरचा मानला जायचा. प्रचंड शेती, गोठे, साखर कारखाना नवीन टेक्नोलोजी वापरून वाढवले होते. विजयकुमारने स्वतः चार्टड एकाउंटेंसीचे शिक्षण घेतले होते. तो खूप हुशार होता. राजकारण आणि घरचा उद्योग दोन्हीमधे तो रस घेऊन काम करत होता.
अशा मोठ्या राजघराण्यातुन मागणी आल्याने वीरेंद्रराजे आणि नरेंद्रराजे खुश होते.
"पिताजी मला अजुन शिकायच आहे. मला काहीतरी वेगळं करायच आहे. फ़क्त 20 वय आहे माझ. तुम्हाला इतकी का जड़ झाले मी?" जयश्रीने हळूच आपली लग्नाबद्दलची नापसंती दर्शवली. तिला माहीत होते काकाजी आणि वडिलांनी एकदा ठरवल्यानंतर त्यात बदल होणे शक्य नाही. पण तरीही तिने क्षीणसा प्रयत्न केला.
"अग इतिहासाचा काय अभ्यास करायचा? आता भविष्याची स्वप्न बघ." हसत नरेंद्रराजे म्हणाले आणि त्यांनी होकार कळवून टाकला.
***
लग्न होऊन जयश्री शिंदेंच्या वाड्यात आली. मुळात स्वतः सरदार घराण्यातील असल्याने तिला शिंदेंच्या घरातल्या प्रथा-परंपरा शिकायला वेळ लागला नाही. विजयदेखिल खूप प्रेमळ आणि चांगल्या मनाचा होता. त्यामुळे लग्न करताना नाखुश असलेली जयश्री लग्नानंतर सहज संसारात रमली. त्यात विजयने जयश्रीला तिचे शिक्षण पूर्ण करायला फ़क्त प्रोत्साहन नाही तर मदत केली. त्यामुळे ती खुश होती. आर्कियोलॉजी हा तसा हटके विषय असला तरी जयुला त्यातच तिच शिक्षण घ्यायच होत. अभ्यासादरम्यान तिने इजिप्त आणि तेथिल जुनी पिरामिडस् याबद्दल खूप वाचलं होत. ती अगदी हरवून गेली होती इजिप्त विषयी वाचताना. एक वेगळीच ओढ जाणवली होती तिला ते सगळ वाचताना. तेव्हाच तिने ठरवलं होत की शिक्षण संपल की विजयच्या मागे लागून इजिप्तला जायच. पण शिक्षण संपता-संपता जयश्रीला दिवस राहिले आणि तिला जूळे मुलगे झाले. त्यानंतर मात्र ती संपूर्ण संसारात अडकली.
विजय राजकीय दृष्टीने खूपच कार्यरत असल्याने जयूला सामाजिक कार्यातही जावे लागत होते. ती पडणारी प्रत्येक जवाबदारी अत्यंत उत्तम प्रकारे सांभाळत होती. पण यासगळ्यामध्ये जयश्री स्वतःला हरवून बसली होती. तस बघितल तर तिच्या आयुष्यात तक्रार करण्यासारख काहीच नव्हतं. पण तरीही मनातून तिला काहीतरी अस्वस्थ करत असायचं. अर्थात हे ती कधी कोणाकडे बोलली नव्हती. बघता बघता लग्नाला 10 वर्ष झाली होती आणि जयश्री संसाराव्यातिरिक्त काही आयुष्य असू शकत हे विसरूनच गेली होती. विजयच तिच्यावर खूप प्रेम होत; पण तो अलीकडे जास्तच बिझी झाला होता आणि जुळे मुलगे असल्याने जयश्री तशी कायमच अडकली होती.
तिच्या धकटया दीराच-अजयच- लग्न असच ठरलं आणि झाल आणि अंजली घरात आली. ती आल्यावर मात्र जयश्रीला मैत्रीण मिळाल्याचा आनंद झाला. आता मनमोकळ्या गप्पा मारायला तिला एक छान सोबत मिळाली होती; आणि अंजलीमुळे तिच्या जवाबदा-या थोड्या अजुन कमी झाल्या होत्या. दोघींची खूप छान गट्टी झाली होती. तरीही जयश्रीला अलीकडे कधी कधी अस्वस्थ वाटायचं आणि आतल्याआत गुदमरल्या सारख व्हायच. एक विरंगुळा म्हणून तिच्या आवडीच्या विषयाच आर्कियोलॉजीच वाचन तिने अलिककडे वाढवाल होत. शिक्षण घेताना केवळ अभ्यासाच्या दृष्टिकोनातून वाचन झाल होत; पण आता ती आवड म्हणून वाचत होती; म्हणूनही असेल कदाचित पण ती अजूनच या विषयाच्या प्रेमात पडत चालली होती. त्यातही का कोण जाणे पण तीच पहिलं प्रेम इजिप्तच्या ऐतिहासिक माहितीवर होतं. इजिप्त आणि तेथिल जुन्या विविध वास्तु याविषयी वाचताना ती स्वतःत हरवून जायची.
एकदा ती आणि अंजली गप्पा मारत बसल्या होत्या आणि अंजलीने सहज म्हणून जयश्रीला सुचवल,"वहिनी एक सांगू? रागावणार तर नाही?" त्यावर हसत जयश्री म्हणाली,"बोल ग. असं परक्यांसारखं विचारतेस काय?" त्यावर अंजली म्हणाली,"वहिनी, तुम्ही आमच्यात असूनही अनेकदा अशा हरवल्या सारख्या वाटता हो. तुम्ही आणि भावजी दोघेच कुठेतरी फिरायला जा ना. मुलांना मी बघेन. आणि ललिता मावशी पण आहेत न मदतीला. खर सांगू? तुम्हाला थोड़ा चेंज होण आवश्यक आहे. मी बघितल आहे; सगळ छान चालु असूनही तुम्ही अनेकदा गप्प गप्प असता. भावजीसुद्धा कायम बिझी असतात. तुमच वय किती कमी आहे; आणि तरीही तुम्ही उगाच इतक्या पोक्त का झाला आहात?"
"खरय ग अंजली. पण अस उठून कुठे जाणार ग? आणि मुलं लहान आहेत अजुन. आत्ताच जरा शाळेला सरावली आहेत. मुख्य म्हणजे ह्यांनी वेळ काढला पाहिजे. तस ते कामासाठी कुठे गेले तर आम्हाला घेऊन जातात. मी खूप फिरले आहे त्यांच्या कामाच्या निमित्ताने." जयूने अंजलीच पटत असूनही थोड़ी बचावात्मक भूमिका घेतली.
"वहिनी उगाच वेड घेऊन पेडगावला जाऊ नका ह. कामासाठी गेल्यावर फिरण वेगळ आणि फ़क्त फिरायला म्हणून जाण वेगळ असत." अंजली हसत म्हणाली.
जयुसुद्धा हसली. "बर, कुठे जाऊ आम्ही? तूच सांग." तिने विषय थट्टेवारी नेत म्हंटल.
"वहिनी तुम्ही न इजिप्तला जा. मी बघितलं आहे, सारख इजिप्तबद्दल वाचत असता न; मग एकदा प्रत्यक्ष जाऊन बघा तर खर. तिथे तुम्हाला आवडेल असच आहे सगळ. तस तर आपल्या भारतात पण खूप काही आहे बघण्यासारख. पण भारताच्या कुठल्याही कोप-यात तुम्ही गेलात तरी भावजी कामाचा फोन आला तर अर्धी ट्रिप सोडून येतील. परदेशात निदान तस नाही करू शकणार ते." अंजलीने मात्र खूप मनापासून सांगितल.
त्या दिवशी तो विषय तिथेच संपला. पण इजिप्तच नाव एकल्यापासून मात्र जयूच्या मनात खरच इजिप्त बघण्याची इच्छा जागृत झाली. तिला कायमच इजिप्तबद्दल सुप्त आकर्षण होतच न ... अगदी लहांपणापासून.
असेच थोड़े दिवस गेले. एकदा विजय अचानक दुपारच्या जेवणासाठी घरी आला आणि नंतरही थोड़ा निवांत होता. अंजलीच्या ते लक्षात आल. ती जयुच्या मागे लागली की आत्ताच तिने इजिप्तचा विषय काढावा. अंजली एकत नाही म्हंटल्यावर जयु विजयला जवळ येऊन म्हणाली,"मागच्या बागेत नविन फुलझाड़ लावली आहेत. तुम्हाला वेळ असेल तर बघता का?" विजय 'हो' म्हणाला आणि ती त्याला मागच्या बागेत फेरी मारण्यासाठी घेऊन गेली.
तिथे जयूने विषय काढला. "विजय..." काहीतरी खोल मनातल सांगायच असल कीच फ़क्त जयु विजयला एकेरी नावाने हाक मारायची. त्यामुळे तिने विजय म्हणताच त्याने मिश्किल हसत तिच्याकडे वळून बघितल. जयु देखील हसली आणि म्हणाली,"आपण कुठेतरी फिरायला जाऊ या का? ब-याच महिन्यात कुठे गेलो नाही आहोत. या सगळ्या व्यापाचा कंटाळा आला आहे रे. अजय आणि अंजलीच्या लग्न सोहळ्यामुळेसुद्धा गेल वर्षभर खूप धावपळ आणि दगदग झाली आहे."
त्यालादेखिल कल्पना आवडली."ठिक आहे. पुढच्या महिन्यात मी मुंबईला जाणार आहे. दोन महत्वाची कामं आहेत. तू आणि मूलं पण चला. काम झाल की थोड़ फिरुया."
"अहं... अस कामात असताना फिरण नको. फ़क्त फिरायला म्हणून नाही जमणार?आणि ते ही फ़क्त तू आणि मी!" जयुंने पटकन मनातल सांगून टाकलं. त्याबरोबर विजय तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागला. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. कामाच्या संदर्भातला फोन असल्याने विजय लगेच निघाला आणि तो विषय तसाच राहिला.
त्यानंतर अजुन 2 दिवस गेले. पण विजय काहीच बोलला नाही.
शेवटी एका रात्रि जयूनेच परत तो विषय काढला... जयुच म्हणण होत की फ़क्त आपण दोघेच जाऊ या आणि ते ही इजिप्तला. विजय अवाक् झाला होता. एकवेळ दोघेच ठिक आहे. पण इथेच कुठेतरी 2 दिवस जाऊन येऊ अस तो म्हणत होता. पण जयु मात्र इजिप्तवरच अडून बसली होती. आणि मग दहा वर्षात पहिल्यांदाच त्यादिवशी त्यांचा वाद झाला.
....... मग म्हंटल्याप्रमाणे जयश्री एकटीच हट्टाने इजिप्तला जायला निघाली. ती निघायच्यावेळी अंजली तिच्या जवळ जाऊन म्हणाली,"वहिनी उगाच मी तुम्हाला भरीला पाडल नाही?" तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
तिला जवळ घेऊन जयु म्हणाली,"अग अस काय करतेस? उलट तुझ्यामुळेच मी असा विचार करू शकले.खरच मला आयुष्यात एकदा तरी इजिप्त बघायच होत ग. आणि आता जाते आहे ते ही तुझ्याच जीवावर. मुलांना आणि ह्यांना तुझ्यावर सोडते आहे न मी."
"वहिनी इथली अज्जिब्बात काळजी करु नका. मी खरच सगळ सांभाळीन." अंजली डोळे पुसत म्हणाली.
जयु एकटी ज़ात होती ते विजयला फारस पटल नव्हतं. एरवी त्याने नाही म्हंटल्यानंतर जयूनेही कधीच कुठलाच विषय परत काढला नव्हता. पण या वेळी का कोण जाणे जयुचा निर्धार पक्का होता.त्याला तिच्याबरोबर जाणं जमणार नव्हत. विजय खरच काही करु शकला नाही. तो स्वतः जयुला सोडायला मुंबईला आला होता. एअरपोर्टवर सोडताना त्याने तिला जवळ घेतल आणि म्हणाला,"जयु तू हट्टाने एकटी जाते आहेस. जा. स्वतःला सांभाळ. आपण संपर्कामधे असुच आपण." आणि मग पटकन तिच्या गालावर ओठ ठेवले आणि तिच्या कानात म्हणाला,"माझ खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर जयु. मी आणि मूलं तुझी वाट पाहतो आहोत इथे. तू तुला आवाडणा-या विषयाची रेलचेल असणा-या देशात जाते आहेस... हरवून नको जाउस ह." ती एकदम अवाक् झाली. तिने त्याला चक्क मिठी मारली आणि मग काही न बोलता मागे वळून आत गेली.
(क्रमशः)
- हरवलेलं विश्व (भाग २)
- हरवलेलं विश्व (भाग ३)
- हरवलेलं विश्व (भाग ४)
- हरवलेलं विश्व (भाग ५)
- हरवलेलं विश्व (भाग ६) शेवटचा
प्रतिक्रिया
खूप छान सुरुवात
वाह, मस्तं सुरूवात. वाचतेय.
छान लिहिलंय. पुभाप्र.
अरे वा.
छान..
छान सुरुवात
छान... पु.भा.प्र.
पुभाप्र
ज्योती ताई फॉर्मात! आधी भयकथा
वेगळा विषय,
छान सुरूवात