मिपा संपादकीय -होत्याचे नव्हते!
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
नौरु देशाचा व जगाच्या अर्थशास्त्राचा काय बरे संबध असावा? कदाचित बराच काही ; कारण आज जे तिथे घडते आहे ते कदाचित उद्याच्या भविष्याची नांदी असू शकेल.
नौरु एक जगातील छोटासा देश आहे. क्षेत्रफळ केवळ २१ चौरस कि.मी. साधारण भारतातल्या कुठल्याही एका लहानश्या उप-उपनगराएवढा. लोकसंख्या केवळ १४ हजार. त्यातुन पृथ्वीवर जरा अडगळीच्या जागी म्हणता येईल असा , बरीच शोधाशोध केल्यावर ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटे यांच्या दरम्यान कुठेतरी सापडेल असा.
फक्त एका गोष्टीबाबत जगात सर्वात संपन्न देश हा! ते म्हणजे फॉस्फेट खत.
शतकानुशतकांपासून , उत्तर गोलार्ध ते दक्षिण गोलार्ध असा प्रवास पॅसिफीक महासागरातून स्थलांतराच्या निमित्ताने पक्षी करत आलेले आहेत. या पक्षांच्या , अत्यंत दर्जेदार अशा शेणखताने ह्या देशाची जमीन घडली आहे. हे शेण, ( ज्याला ग्वानो असे म्हणतात) ह्या देशाच्या चुनखडीमधे शतकानुशतके मिसळून इथल्या फॉस्फेट खताचा दर्जा सर्वोत्तम झाला आहे. नौरु सारख्याच ख्रिसमस आयलंड्स नावाच्या देशामधे देखील हे शेणखत सापडते; पण नौरुमधे, त्या देशाच्या जमीनीतील लाईमस्टोन बरोबर मिसळल्याने हे खत जरा उच्च दर्जाचे.
गेल्या काही दशकातील ह्या खतखाणींमुळे २१ चौरस कि मि चा हा देश सगळाच खणला गेलाय. आज जवळजवळ ८०% देश खोदकामात गेला आहे व समुद्राचे पाणी ह्या खाणीत भरले आहे.
नव्वदीचे दशक हे नौरु साठी लाभदायक होते. शेणखतातुन मिळालेला सर्व पैसा त्या देशाच्या ट्रस्ट मधे जमला होता पण पैशाची/ गुंतवणुकीची योग्य काळजी न घेतल्याने, भ्रष्टाचार व चुकीचे निर्णय यामुळे बराचसा पैसा आता संपला आहे. आज नौरु देश दिवाळखोर आहे. त्या देशाची विमानसेवा एयर-नौरु - जिच्याकडे एकच विमान आहे - ते विमान देणेकर्यांनी जप्त केले आहे. इ.स. २००० सालानंतर नौरुची आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली. जवळजवळ सगळे फॉस्फेट संपत आले व समुद्राखाली गेले. देश दोन्ही अर्थानी बुडत आहे, काही दशकातील जमवलेला पैसा संपत आला आहे. काहीच वर्षांपुर्वी दरडोई उत्पन्नात [५००० डॉ] श्रीमंत देशात गणला जाणारा हा देश आज पुर्णता परकीय मदतीवर अवलंबून आहे.
देशाचा बेरोजगार दर आहे ९०%. १४००० नागरीकांनी आशा सोडली आहे व बहुसंख्य नागरिकांनी ऑस्ट्रेलीयन सरकार कडे आश्रय मागीतला आहे. एखाद्या देशातील सर्वच्या सर्व नागरीक स्थलांतर / आश्रय मागत आहेत हा एक भीषण विनोद म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलीयाचा थंडा प्रतिसाद व नौरुच्या नागरिकांचे ऑस्ट्रेलीयाच्या निर्वासीत छावण्यातील आयुष्य हा देखील एका वेगळ्या लेखाचा भाग आहे.
मोठे चित्र
नौरु देशा प्रमाणे आपली देखील अवस्था होणार आहे का? अंधांधुंद वापरामुळे आपली नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिज तेल, सुपीक जमीन, गोडे पाणी यातील किती गोष्टी आपण झपाट्याने खर्च करत आहोत. कुठलाच देश हे सर्व वाचवण्याचा नेटाने प्रयत्न करत नाही आहे. उलटपक्षी, सर्व देशांची भूमिका हीच आहे की उत्पादन क्षमता, उपभोग्यता वाढावी , अजून अजून व्यापार वाढावा. हेच तर आजचे अर्थशास्त्र आहे.
जादा खाणकाम, जादा बांधणी, जादा प्रवास, जादा अन्नधान्य उत्पादन ह्या सर्व गोष्टी जीडीपी वाढवतात व कुठलाही देश कधीच जीडीपी कमी व्हावे असा प्रयत्न करत नाही, कुठलाच देश स्व:ताला मंदीमधे टाकू इच्छीत नाही.
बरोबर आहे, कुठलेच सरकार आता आपण कमी काम करु, कमी उद्द्यिष्ट ठेवू, जरा गरीब होऊया असे म्हणून निवडून येउ शकत नाही. असो .सध्याच्या अथशास्त्रावर काहीच परिणाम होणार नाही. हं , जरा कमी वापर करुन पुढच्या १२ पिढ्यांऐवजी १५ पिढीपर्यंत रेटून नेउ शकू इतकेच!
कधीना कधी पृथीवरील नैसर्गीक साधनसंपत्ती मानवाने वापरुन संपवली असेल. यंत्राधारित आधुनिक जग जे आपण ओळखतो व गृहीत धरतो, त्याचा इतिहास खरे तर काही शतकांचा आहे - जरी पृथ्वी कित्येक करोड वर्षाची जुनी असली तरी.
आता यावर उपाय काय? तर काही विशेष नाही. जे आजवर करत आलो आहे तेच चालू ठेवणे, काही न काही क्लुप्त्या वापरुन आर्थिक मंदी टाळून, आहे ते चालवायचे. हां , उपलब्ध साधनसंपत्ती नक्कीच आपण झपाट्याने खर्च करत आहोत पण दुसरे काही करणे हे देखील सध्याच्या परिस्थीती जरा अनाकलनीयच आहे.
युरोपच्या उर्जावापरामुळे अफ्रिकेचे हवामान, जमिनीतुन उत्पादन बरेचसे घटले आहे. क्लायमेट चेंज [स्वतंत्र मोठा चर्चाविषय] व सध्याचे "वापर , केवळ वापर" अर्थशास्त्र अजुन किती काळ आहे तसे जगाचे व्यवहार चालु ठेवेल कोणास ठाऊक?
मोठी गाडी, बंगला/ले, जमीनजुमला, मौल्यवान वस्तू इतकेच श्रीमंतीचे निकष न ठरता स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सकस अन्न पुरेसे उपलब्ध असणे ही सुखाची व्याख्या खूप जुनी, अनाकर्षक वाटली तरी जेव्हा नौरु सारखी परिस्थीती येते तेव्हा तेच एक सत्य असे प्रकर्षाने जाणवते. गेल्या तीन वर्षात जगाने अन्नधान्य व खनिज तेल यात जी मागणी, पुरवठा व भाववाढ पाहीली आहे तो वेग निश्चितच भितीदायक आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती बाबत आपण सर्वांनी तारतम्याने भोग घेउन जितके काही वैयक्तिकरित्या जितक्या प्रामाणिकपणे व सातत्याने "खारीचा वाटा" म्हणून करता येईल तितके करुया. आपल्या मुलाबाळांच्या पृथ्वीवरील सुखकर वास्तव्याकरता तितके तरी आपल्याला केलेच पाहीजे. नाही?
पाहुणा संपादक : सहज.


संपादकीय आवडले.
एका वेगळयाच देशाची ओळख करुन देणारे व त्या अनुषंगाने सद्य आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणारे संपादकीय आवडले.
विस्तृत प्रतिक्रिया सवडिने देतो.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
लेख आवडला.
अगदी वेगळ्या प्रकारे केलेली मांडणी आवडली.
आपणही होत्याचं नव्हतं करतोय, सगळेचजण!
मला वाटते की सगळ्यांनी काहीतरी केले पाहीजे म्हणजे काय ते नविन धाग्यात ठरवूया व दर आठवड्याला रिड्यूस, रियूज, रिसायकल पैकी काय काय किंवा काहीतरी एक केले ते सांगूया, तरच असे लेख खर्या अर्थाने उपयोगी ठरतील.
रेवती
रेवती
लेख आवडला
खरोखर शंभरेक वर्षांत सगळ्या पृथ्वीची नौरू होईल अश्या वेगाने आपण साधनसंपत्ती वापरत सुटलो आहोत. तसे झाले तर आश्रय मागायला कुठे जायचे हा प्रश्नच आहे.
रेवती म्हणतात तसे आपणच काहीतरी हालचाल सुरू करायला हवी.
लेख आवडला.
लेख सामाजिक जाणीव करून देणारा आहे.
मोठी गाडी, बंगला/ले, जमीनजुमला, मौल्यवान वस्तू इतकेच श्रीमंतीचे निकष न ठरता स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सकस अन्न पुरेसे उपलब्ध असणे ही सुखाची व्याख्या खूप जुनी, अनाकर्षक वाटली तरी जेव्हा नौरु सारखी परिस्थीती येते तेव्हा तेच एक सत्य असे प्रकर्षाने जाणवते.
वरील विधान १०१% खरे आहे.
आपण जर इंधन बचत, प्लॅस्टीकचा वापर आणि पाणी ह्यावर जरी प्रत्येकाने स्वत: पुरती बंधने घातली तरी खुप चांगले होईल.
असेच म्हणतो
>>लेख सामाजिक जाणीव करून देणारा आहे.
आवडला.
सोन्याचे अंडे देणारी कोंबडी
सोन्याचे अंडे देणारी कोंबडी झटक्यात मारून टाकायची की त्यांची पैदास करायची हा प्रश्न सगळ्यांनाच सोडविता येतो असे नाही. नशीबाने सगळेच कोथळा बाहेर काढतात असेही नाही.
छोटेखानी आणि मुद्देसूद संपादकीय आवडले.
अंगठाबहाद्दर
सहमत!
सहमत! स॑पादकीय आवडले
लेख छान आहे.
प्रत्येकाने विचार करावा असा आहे. नौरू या देशाबद्दल काहीच माहिती नव्हती. आपल्या लेखामुळे बरीच माहीती समजली.
नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर हा जपूनच करायला हवा. आणि कितीही कटू असलं तरी हे सत्य आहे.
लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
अग्रलेख
आवडला. नौरू देशाबद्दल प्रथमच माहिती समजली. ते जात्यात असतील, तर आपण सुपात आहोत एवढी जाणीव जरी बाळगली; तरी त्यामुळे बराच फरक पडू शकेल.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अगदी..
नौरू देशाबद्दल प्रथमच माहिती समजली. ते जात्यात असतील, तर आपण सुपात आहोत एवढी जाणीव जरी बाळगली; तरी त्यामुळे बराच फरक पडू शकेल.
नंदनसारखेच म्हणते.
मुद्देसुद अग्रलेख आवडला हेवेसांनल.
स्वाती
हेच म्हणतो !!
नौरू देशाबद्दल प्रथमच माहिती समजली.
छोटेखानी आणि मुद्देसूद संपादकीय आवडले.
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
नौरू..
नौरू देशाच्या दिवाळखोरीतून आपण नक्कीच काही शिकण्यासारखे आहे. आपल्याकडे बेरोजगारी ९०% नाही किंवा आपली अर्थव्यवस्था फक्त एका मर्यादित व्यवस्थेवर अवलंबून नाही. तरी पण स्वयंशिस्त अत्यंत गरजेची आहे. आहेत ते नैसर्गिक स्रोत आधाशासारखे वापरू नये हे तितकेच खरे.
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
सहमत!
असेच म्हणतो!
नौरु
नौरु नावाचा देश जगाच्या पाठीवर आहे हे संपादकीयमुळे समजले.
नैसर्गिक साधनसंपत्ती बाबत आपण सर्वांनी तारतम्याने भोग घेउन जितके काही वैयक्तिकरित्या जितक्या प्रामाणिकपणे व सातत्याने "खारीचा वाटा" म्हणून करता येईल तितके करुया. आपल्या मुलाबाळांच्या पृथ्वीवरील सुखकर वास्तव्याकरता तितके तरी आपल्याला केलेच पाहीजे. नाही?
इथच वांदा हाय. तारतम्य म्हणजे जगण्यासाठी पुरेसा आणि आवश्यक [necessary & sufficient conditions] उपभोग ठरवणे. साधन संपत्तीचे न्याय्य वाटप हे आपली च सद्सद विवेक बुद्धी ठरवणार.
प्रकाश घाटपांडे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
नीड आणि ग्रीड
“Earth provides enough to satisfy every man's need, but not every man's greed” महात्मा गांधी
सहजरावांचा अग्रलेख वाचत असताना गांधीजींचे वरील वाक्य आठवले. बाकी अग्रलेख आवडला. वर इतरांनी म्हणल्याप्रमाणे नवीन देशाची माहीती झाली!
+१
विकासशी (आणि गांधीजींशीही) सहमत.
संपादकीय आवडलं. बरीच माहिती मिळाली.
माणसाला अजून बरंच काही शिकावं लागणार आहे.
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
अजिंक्य.
अग्रलेख
अग्रलेख आवडला. आणि वरच्या सर्व प्रतिक्रियांशी सहमत.
अदिती
उत्तम अग्रलेख
अतिशय महत्त्वाच्या विषयावरील उत्तम अग्रलेख! या निमित्ताने लिहिते झालात याचा आनंद आहेच
लेख वाचून , "कोणतेही काम करताना लागणारा कच्चा माल भोवतीच्या २० मैलाच्या परीसरात मिळणारा वापरणे हेच कुशलतेचे लक्षण आहे" असे गांधीजी म्हणायचे ते आठवले.
वीज, पाणी, इंधन, जमीन जे काहि मिळेल ते मनुष्यप्राणी दोन्ही हातांनी ओरबाडू लागला आहे. माणसाची ना राहणी साधी राहिली आहे ना विचाररणी उच्च. जळजळीत वास्तवाला सामोर्या जाणार्या अग्रलेखाबद्दल अभिनंदन
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
आशावाद
पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक साधन संपत्ती तयार होण्यास लाखो वर्षे लागली. आणि आम्ही ती गेल्या शे दिडशे वर्षात ती फस्त करण्याचा सपाटा लावला आहे. ही मर्यादित असलेली संपत्ती कधी ना कधी तरी संपणारच. मग ते नौरू सारख्या चिमुकल्या देशातील फॉस्फेट असो वा आखाती देशात मिळणारे तेल असो.
कमी प्रमाणात उपसा करून (म्हणजेच भाव वाढवून) फार तर आजचे उद्यावर ढकलता येईल, पण हा काही कायम स्वरूपी तोडगा नव्हे. खेरीज, कोणताही समाज वा सरकार स्वतःहून आपल्या जीवनमानाचा उंचावलेला स्तर कमी करायला तयार होणार नाही, हे वेगळे.
तेव्हा, ह्या नैसर्गिक साधन संपत्तीला पर्याय शोधणे हाच एकमेव पर्याय उरतो!
पंचमहाभूतांपैकी पृथ्वीचा उपभोग माणसाने पुरेपूर घेतला आहे. आता पुढचे तीन - आप, तेज आणि वायू यांचा वापर करण्याचा काळ आला आहे, असे वाटते.
जवळपास फुकटात मिळणारे पावसाचे पाणी किंवा समुद्राच्या लाटा, सुर्यप्रकाश आणि वारा यांचा यथायोग्य उपयोग करून पृथ्वीतील संपत्तीचा वापर मर्यादित केला तर, परिस्थिती वाटते तितकी भीषण होणार नाही.
मनुष्याचे सर्वायवल इन्स्टिक्ट जबरदस्त आहे आणि त्याला जोड आहे ती प्रगल्भ बुद्धीमत्तेची. येणारी पिढी यातून निश्चित मार्ग काढेल, असा विश्वास वाटतो.
एका महत्वाच्या विषयावर संपादकीय लिहिल्याबद्दल सहजरावांचे अभिनंदन!
अवातर - नौरू सारख्या खिजगणतीत नसलेल्या देशाची माहिती झाली हा अतिरिक्त फायदा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मार्मिक लेख, आश्वासक प्रतिक्रिया
सहजराव , लेख मार्मिक झालाय, या निमित्ताने कधी न लिहीणारे तुमच्यासारखे चांगले लोक लिहीते झाले
फार आनंद झाला.
>>>मनुष्याचे सर्वायवल इन्स्टिक्ट जबरदस्त आहे आणि त्याला जोड आहे ती प्रगल्भ बुद्धीमत्तेची. येणारी पिढी यातून निश्चित मार्ग काढेल, असा विश्वास वाटतो.
सुनीलरावांची ही प्रतिक्रिया वाचून सुद्धा बरे वाटले. अधाशीपणा, हाव , विधिनिषेधशून्यता आपण आजूबाजूला पाहतोच. त्यातूनच "नौरु" सारख्या गोष्टी घडतात. या सार्या परिस्थितीमधे , आपल्या विवेकावर विश्वास दाखवणारे कुणी लिहीले की थोडी आशा वाटते.
अगदी
अगदी वेगळ्या शैलीतला लेख. खूप आवडला.
- मेघना भुस्कुटे
संक्षिप्त लेखन पण महत्त्वाचा विषय
उत्तम विषय पण थोडा घाईघाईने गुंडाळल्यासारखा वाटला.
या विषयावर आणखी विस्ताराने लेखन अपेक्षित होते.
खरे सांगायचे तर या विषयावर लिहावे असे माझ्या मनात होते.
मोठ्या विस्तारात -
विविध धर्मांची शिकवण - साधी राहाणी , उच्च विचारसरणी - बचत आणि दानधर्म - समाजवाद, गांधीवाद (फायदे आणि तोटे) -
भांडवलशाही (फायदे तोटे) - ऋणं कृत्वा घृतं पीबेत - चंगळवाद आणि त्याची सर्व जगाला झालेली लागण - शोषण -
परिणाम - गोबल वॉर्मिंग -कृत्रिम ऊर्जानिर्मिती आणि परिणाम - आर्थिक गंडांतर - दिवाळखोरी - अन्नटंचाई - महागाई - प्रतिक्रिया - दहशतवाद - नक्षलवाद - अशांती -अनागोंदी - उपाय -मध्यममार्ग -आणि समारोप इ.इ.
असा काहीसा आराखडा होता. या विषयावर डॉ. अमर्त्य सेन यांच्यासारख्या अर्थशास्त्र्यांनी विचार व्यक्त केलेले आहेत. तेव्हा नवे सांगण्यासारखे काही नसले तरी नव्याने सांगण्यासारखे बरेच आहे.
उत्तम
विसुनानांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. नव्या जगाचा (अमेरिकेचा) शोध हाही यातला एक पॉईंट ठरू शकेल. चंगळवादामागे मानसिकतेतला बदलच सर्वात महत्त्वाचा आहे. या संदर्भात टी.ई.डी. वरचे पॅरॉडॉक्स ऑफ चॉईस हे भाषणही विचार करण्यासारखे आहे.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान अग्रलेख..
नौरु देशाचे नांव प्रथमच ऐकले बॉस! आता हा देश संपल्यात जमा आहे हे वाचून नौरुबद्दल आणि नौरुकरांबदल अंमळ वाईटही वाटले!
उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती सर्वांनीच अगदी जपून वापरली पाहिजे हा तर अगदी कळीचा मुद्दा आहे!
असो,
छान व वेगळ्या विषयावरचा अग्रलेख...
अभिनंदन सहजराव!
तात्या.
--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!
नौरू!
स्वतःचे चलनसुद्धा नसलेला (चलन: ऑस्ट्रेलियन डॉलर) प्रशांत महासागरातल्या एका अत्यंत छोट्या बेटावरचा देश.
या देशाला अधिकृतरीत्या राजधानीसुद्धा नाही आणि शहरे नाहीत अशी मनोरंजक माहिती विकीपीडियावरून मिळाली.
छान
छान संपादकीय. विषय महत्त्वाचा आहे.
लहान देशाचे उदाहरण देऊन, मग मोठ्या देशाची परिस्थिती वेग्ळी नाही हे चांगले समजावले आहे.
संपन्नतेच अर्थ नक्की काय हे लहानवयापासून मुलांना सांगावे असे वाटते. अर्थिक श्रीमंती आणि चांगली हवा, पाणी, सकस अन्न, निवांतपणा, चांगली प्रकृती हे संपन्नतेचे निकष आहेत असे मला वाटते.
यावर विस्तृत उहापोह झाला तर अजून चांगले होईल.
-- लिखाळ.
-- लिखाळ.
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.
व्वा, रे सहजा !!!
नौरु देशाची ओळख आणि त्यांची झालेली वाताहात हे पहिल्यांदाच कळले. अग्रलेखाबद्दल प्रथम सही दिलसे अभिनंदन !!!
बाकी मोठ्या चित्रातले विचार आणखी मोठे केले असते तरी चालले असते !!!
नैसर्गिक साधनसंपत्ती म्हटले की, अनेक विषय आहेत. सुदैवाने आपण भारतीय त्याबाबतीत नशिबवान आहोत की, भारतात साधन संपत्ती भरपूर आहे. प्रश्न आहे, व्यवस्थापनाचा. लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे तिचा उपयोग म्हणजे त्यांच्या कौशल्याचा योग्य रितीने वापर विकासाच्या व्यवस्थापनात झाला पाहिजे. खरा भारत खेड्यात आहे, आणि त्याचा अधिक संबंध शेतीशी आहे.तेव्हा रासायनिक खताऐवजी सेंद्रीय खते वापरणे हा पर्यावरणासाठी उपयोगाचा आहे. त्याबरोबर जमिनीचा योग्य वापर, निसर्गाचे जतन करण्यासाठी कडक कायदे, पाणी व्यवस्थापनाचे शिक्षण.....खरं म्हणजे पर्यावरण व्यवस्थापनामुळे साधनसंपत्तीचे रचनात्मक नियंत्रण समजते , उपभोगाच्या मर्यादा समजतात आणि मार्गही सुचत असतात. तेव्हा आपण म्हणता त्या प्रमाणे 'नैसर्गिक साधनसंपत्ती बाबत आपण सर्वांनी तारतम्याने भोग घेउन जितके काही वैयक्तिकरित्या जितक्या प्रामाणिकपणे व सातत्याने "खारीचा वाटा" म्हणून करता येईल तितके करुया.'' या बाबतीत आपल्या विचाराशी सहमत !!!
दृष्टांत (किंवा प्रत्यक्ष उदाहरणच म्हणा!) चपखल
"मानव आणि निसर्गाच्या युद्धात शेवटी निसर्गच जिंकतो" असे निराशावादी सार न काढता सहज यांनी धडा घेऊन निसर्गाशी समट करून मानवाने प्रगती करावी हे सार काढले आहे. हे पटण्यासारखे आहे.
पॅसिफिक महासागरातील बेटे ही विविध अर्थकारणाचे नमुने तपासून पाहायची प्रयोगशाळाच मानली पाहिजे. (अशा प्रकारचे विस्तृत विवेचन जॅरेड डायमंड या लेखकाने "कोलॅप्स" या लोकप्रिय पुस्तकात केलेले आहे. काही शतकांपूर्वी "ईस्टर आयलंड" येथील समृद्ध समाजाने नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट केली, समाज दिवाळखोर झाला, लयास पावला, हे एक उदाहरण. नाश होता होता स्वतःवर काबू मिळवलेल्या समाजांची, अशा बेटांचीही आशादायक ओळख आहे. [जॅरेड डायमंड यांच्या पुस्तकाचा दुवा])
नौरू
देश माहिती नव्हता, अग्रलेख विचार प्रवर्तक आहे. नौरू देशाच्या निमित्ताने सहज यांनी या अग्रलेखात मांडलेले प्रश्न आत्ताच भेडसावत आहेत. भविष्यात त्यांचे स्वरूप आणि त्यामुळे होणारे देशांमधील संघर्ष उग्र होऊ शकतील हे स्पष्टच आहे. पण त्यात परत आत्ताचे जे प्रगत समाज आहेत त्यांना त्यांच्या प्रगत स्थितीमुळे काही प्रमाणात "ऍडव्हान्टेज" (फायदा) मिळेल असे वाटते. आपण त्या स्थितीला जाण्यासाठी नक्की स्वतःत किंवा स्वतःच्या विचारसरणीत काय बदल केले पाहिजेत हे विचार करण्यासारखे आहे.
विचारप्रवर्तक
सहजराव,
अग्रलेख आवडला. जर प्रत्येकाने आपले विश्व थोडे रूंदावुन पाहिले आणि 'हे खर्चे केलेच पाहिजे' का असा विचार केला तर बराच फरक पडु शकेल.
लेख आवडला
नौरू देशाच्याच आकाराचा
पण आशयपूर्ण लेख आवडला. कमी शब्दांतही बरंच काही सांगून जातो लेख.
छान
महत्वाच्या विषयाला वाचा फोडलीत.
हे खरोखरच भीतीदायक आहे. खूप दिवसांपासून ह्याबाबत मनात विचार येत होते की पुढे काय?
२ महिन्यांपूर्वी औरंगाबाद व इतर शहरात पेट्रोल/डिझेल नसल्याने ज्या प्रकारे लोकांचे हाल झाले तेव्हा त्याची प्रचिती आली. लक्षात आले की ही फक्त त्याची एक झलक आहे. आत्ताच आपण काहीतरी केले पाहिजे.
विचार
विचार प्रवर्तक अग्रलेख. आवडला.
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
नौरु देशाची तुलना बिहारशी करता येईल...??
नौरु देशाची तुलना बिहारशी करता येईल...?? बिहार मधील खनीजांच्या
अती उत्पादनामुळे त्याची भवीष्यात नौरु सारखी गत होवु शकते.
मला तर स्वप्नातही भुक लागते....
मला तर स्वप्नातही भुक लागते....
आवडला
छोटेखानी लेख आवडला - नेहमीप्रमाणे आकडेवारीने सुरु न करता नौरु देशाच्या (मलाही हा देश पहिल्यांदाच कळला) उदाहरणाने केला म्हणून परिणामकारक झाला आहे असे वाटते.
त्या निमित्ताने 'अधिक वापर आणि अर्थव्यवस्था मजबूत होणे' ह्याविषयी ह्या निमित्ताने विचार करायला लावणारा लेख! सहज - तुमचे इतर लिखाणही येऊ द्यात -- वाचायला आवडेल.
नौरु
बद्दल वाचले आणि वाईट वाटले.
काही वर्षानी आपल्या देशाबद्दल लोकांना असंच वाईट वाटणार आहे.
जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती.
अवांतरः बाँडच्या कुठल्यातरी गोष्टीत ह्याच खताचा उल्लेख आहे.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
धन्यवाद
विसुनाना, तुम्ही म्हणता ते अगदी मान्य आहे. हा विषय महत्वाचा आहे पण लिहायला गेले तर ते खूप मोठे शिवधनुष्य आहे [म्हणजेच - माझ्या आवाक्याबाहेरचे] व जास्त खोलात लिखाण "कधी कधी" दुर्लक्षीत केले जाते. तरीही तुम्ही जास्त विस्ताराने लिहावे ही विनंती.
धनंजय, नंदन दुव्यांबद्दल धन्यवाद.
>>>मनुष्याचे सर्वायवल इन्स्टिक्ट जबरदस्त आहे आणि त्याला जोड आहे ती प्रगल्भ बुद्धीमत्तेची. येणारी पिढी यातून निश्चित मार्ग काढेल, असा विश्वास वाटतो. .
वर बर्याच जणांनी ते बरोबर ओळखले आहे हे प्रतिसादातुन कळले.
सुनीलराव म्हणतात ते पटते पण भविष्यात केवळ मुठभर शास्त्रज्ञ, एका बोटावर मोजता येतील इतके द्र्ष्टे नेते, समाजकारणी यांच्या जीवावर बाजी लावण्याबरोबरच आजच प्रत्येकाने गंभीर विचार करुन शक्य तेवढे [निदान खारीचा वाटा] करावे हाच लेखाचा उद्देश आहे.
सर्व वाचक, प्रतिसाद देणारे यांना धन्यवाद.
गेले १० दिवस बाहेरगावी सुटीवर होतो,म्हणुन प्रतिसादास उशीर. इंटरनेट, बातम्यांशिवाय राहू शकलो यावर विश्वास बसत नाही आहे.