कर्तृत्व किर्लोस्करांचे (महाराष्ट्रदिन लेखमाला)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in लेखमाला
3 May 2016 - 7:08 am

अर्थविश्व, व्यवसायविश्व आणि मराठी माणूस हा तसा पहायला गेला तर दशकानुदशके वादाचा मुद्दा आहे. बहुतांशवेळा ह्या चर्चेचा शेवट उसासे टाकून "मराठी माणूस म्हणजे ना, नोकरी करणार, सकाळी ९.०० ते ६.०० दुसर्‍यांच्या हाताखाली राबणार किंवा तिन्ही पाळ्यांमधे काम करुन दुसर्‍याचे खिसे भरणार" वगैरे छाप वाक्यांनी होत असतो. जितके वेळा ह्या काथ्याकुटामधे भाग घेतलाय तेवढ्या वेळा समोरच्याला खांद्याला धरुन गदागदा हलवून सांगावंसं वाटतं, "अरे मित्रा, तू खूपचं नकारात्मक आणि मराठी माणसाला कमी लेखणारं बोलतो आहेस. अनेक मराठी उद्योजक आहेत ज्यांनी शून्यातुन सुरु करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या नावाचा झेंडा उभा केलाय. कुठल्या जगात वावरतोयस बाबा तू?". समोरची असेल तर...असो.

मराठी उद्योगविश्वामधे डी.एस.के. चे दीपक कुलकर्णी, पर्सिस्टंट सिस्टिम्सचे आनंद देशपांडे, गरवारे इंडस्ट्रीजचे आबासाहेब गरवारे, चितळे बंधूंचे भास्कर गणेश चितळे, कोलते पाटील डेव्हलपर्सचे राजेश पाटील, सकाळ ग्रुपची सुरुवात करणारे ना.भि.परुळेकर, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, किर्लोस्कर ग्रुपचा पाया घालणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर, केसरी टूर्सचे केसरी पाटील, वीणाज वर्ल्डच्या वीणा पाटील, कामत रेस्टॉरंट्सची साखळी वाले विठ्ठल कामत, भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणारे दादासाहेब फाळके अशी किती नावं घेऊ आणि किती नको? सगळी आडनावं मराठीचं आहेत ना ही? ही यादी फक्तं प्रातिनिधिक स्वरुपाची आहे, ह्यापेक्षा कितीतरी जास्तं प्रमाणामधे मराठी लोकं यशस्वीपणे व्यवसायामधे आहेत.

कठोर परिश्रम, अपयश आलं तरी खचून न जाता त्यावर यशस्वीपणे मात करणार्‍या ह्या सगळ्या लोकांचा प्रवास हा सोपा नक्कीचं नव्हता. ह्यामधलं एकन एक नाव स्वतंत्र लेखच नव्हे तर स्वतंत्र लेखमालेचा भाग आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त असणार्‍या ह्या लेखमालेमधे आज किर्लोस्कर ग्रुपची सुरुवात करणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर, किर्लोस्करवाडीची उभारणी, ग्रुपची वाटचाल आणि अफाट कष्टांनी मिळवलेलं यश ह्यांची तोंडओळख करुन द्यायचा प्रयत्न करणार आहे.

.
आंतरजालावरून साभार

लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या सन्मानार्थ भारत सरकारने जाहीर केलेलं पोस्टाचं तिकीट

एल.के. किर्लोस्कर अर्थात लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ ला बेळगाव मध्ये झाला. सुरुवातीपासुन त्यांचा ओढा यांत्रिकी वस्तू (मेकॅनिझम्स), चित्रकला ह्यांच्याकडे होता. यांत्रिकी वस्तू सुट्ट्या भागांमधे उघडून (Dismantle करुन) ती वस्तू कशी काम करते ह्याविषयी ते सतत उद्योग करत असतं. अर्थात आधुनिक भाषेमधे रिव्हर्स इंजिनिअरिंग. चित्रकलेच्या प्रेमापोटी वडिलांचा विरोध पत्करुन त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स ला प्रवेशही घेतला होता. त्यासाठी त्यांचे वडील बंधू रामण्णा ह्यांनी मदत केली होती. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधे दोन वर्षं काढल्यानंतर त्यांना काही प्रमाणात रंगांधळेपणा (Partial Color blindness) असल्याची बाब लक्षात आली आणि दुर्दैवानी त्यांना जे.जे. मधलं चित्रकलेचं शिक्षण सोडावं लागलं. खचून न जाता त्यांनी तिथेचं मेकॅनिकल ड्राफ्ट्समनच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. मूळच्या यांत्रिकी वस्तूंच्या आवडीमुळे त्यांनी त्यामधे विशेष प्रावीण्यही मिळवलं. त्याचं सुमारास तत्कालीन व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्युट आणि आता वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात V.J.T.I. मध्ये मेकॅनिकल ड्रॉईंग शिक्षकाच्या जागेसाठी मुलाखती चालू होत्या. लक्ष्मणरावांनी मुलाखतीमधे यश मिळवून V.J.T.I मध्ये नोकरी मिळवली. अल्पावधीतचं ते विद्यार्थी आणि इतर शिक्षकवर्गामधे प्रोफेसर किर्लोस्कर ह्या नावाने प्रसिद्ध झाले.

प्रोफेसरसारखी मानाची नोकरी मिळवल्यानंतरही लक्ष्मणरावांची यांत्रिकीविषयी असणारी मूळची आवड अजिबात बदललेली नव्हती. V.J.T.I च्या यंत्रशाळेमधल्या तत्कालीन आधुनिक यंत्रसामुग्रीचं काम कसं चालतं, त्याची दुरुस्ती वगैरे लक्ष्मणरावांनी अल्पावधीमधेचं शिकून घेतली. अमेरिकन फाउंडरी सोसायटीच्या नियतकालिकांनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं. जमेल तेवढी माहिती त्यांनी त्या काळामधे शिकून घेतली. ह्याच वेळी त्यांच्यामधला उद्योजक गप्प होता का? अजिबात नाही. ह्या काळामधे त्यांनी मुंबईहून सायकली विकत घेऊन त्या बेळगावमधे वडील बंधू रामण्णा ह्यांच्या मदतीने विकायचा व्यवसाय चालू केला. नुसती सायकल ते विकत नसत तर ज्यांना सायकल चालवायला जमत नसे त्यांच्याकडुन अल्प मोबदल्याच्या बदल्यात त्यांना सायकल चालवायलाही शिकवत असत. Sell them tools first and get paid for teaching them how to use it. :) हे वाक्य इतर वेळी स्वार्थी माणसाच्या बाबतीत मी वापरतो. मात्र किर्लोस्करांच्या बाबतीत हे वाक्यं मी अतिशय शुद्ध हेतूने वापरतो आहे.

त्यांचा जसा ह्या सायकलविक्री आणि विक्रीपश्चात चालक शिकवणीचा व्यवसाय वाढत गेला तसं त्यांनी ह्या सायकलच्या मूळच्या इंग्लंडमधल्या कंपनीशी थेट करार केला. किर्लोस्कर ब्रदर्स ह्या नावाने स्वतःची सायकल एजन्सी बेळगावमधे स्थापन केली आणि त्याच नावाने स्वत:ची लेटरहेडही (मराठी शब्द सुचवा - उद्योगपत्रिका कसा वाटतो?) छापली. V.J.T.I मधल्या प्रोफेसरपदाच्या नोकरीत १८९६-१८९७ च्या सुमाराला अडथळे आले. भारतीय असल्याच्या नावाखाली गोरी चमडी मॅनेजमेंटने त्यांना बढती नाकारली गेली. बढती नाकारली गेल्याने लक्ष्मणराव दुखावले गेले आणि त्यांनी सरळ नोकरीचा राजीनामा दिला आणि ते बेळगावमधे परतले.

पुढची काही वर्ष त्यांनी मिळेल तो व्यवसाय केला. युरोपातून पवनचक्क्या विकत घेऊन त्या भारतामधे विकल्या, औंधच्या राजघराण्याच्या कुलदैवताच्या मुर्तीला इलेक्ट्रोप्लेटिंग करुन मुलामा चढवून दिला, लोखंडाच्या आणि लाकडाच्या खिडकीदरवाज्यांच्या चौकटी बनवून त्या गृहनिर्माण व्यावसायिकांना विकल्या. औंधचे राजेसाहेब (श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी) त्यांच्या इलेक्ट्रोप्लेटिंगच्या कामावर प्रचंड खुश झाले होते. त्यातून त्यांचे सुपुत्र श्री. बाळासाहेब पंतप्रतिनिधी किर्लोस्करांना मुंबईमधे असल्यापासून ओळखत होते. हा माणूस कामाचा आहे, दिलेलं काम हा माणूस जबाबदारीने पार पाडणार हे त्यांनी बरोबर हेरलं होतं.

आपला देश कृषीप्रधान आहे. इथे शेतीच्या उपकरणांची बाजारपेठ प्रचंड प्रमाणामधे उपलब्धं होऊ शकेल हा विचार लक्ष्मणरावांच्या मनामधे आला. बाहेरुन उपकरणं आणून इकडे विकण्यापेक्षा आपण स्वतःच त्यांची निर्मिती का करु नये ह्या विचाराने त्यांना पछाडलं. १९०१ च्या सुमारास त्यांनी छोट्या प्रमाणावर कडबा-कुट्टी कापायच्या यंत्रांची निर्मिती सुरु केली. त्याची योग्य प्रमाणात विक्री झाल्याने त्यांच्यासमोर नवीन लक्ष्यं उभं राहीलं ते म्हणजे ओतकाम (Casting) करुन बनवलेल्या लोखंडी नांगराच्या फाळांचं उत्पादन करण्याचं. उत्पादन सुरु करायचं म्हणलं की लाख अडचणी समोर आ वासून उभ्या रहातात आणि त्यातली सर्वात मोठी म्हणजे भां-ड-व-ल ही. सगळी सोंगं आणता येतात पण पैश्याचं आणता येतं नाही. किर्लोस्करांनी त्याकाळी बाँबे बँकिंग कॉर्पोरेशनकडे १०,००० रुपये भांडवली कर्जाची मागणी केली. पण त्यांच्याकडे पुरेसं तारण नसल्याने त्यांची मागणी बँकेने फेटाळून लावली. अश्या वेळी त्यांच्या मदतीला धावून आले ते साक्षात औंधचे महाराज आणि गिंडे आडनावाचे एक श्रीमंत गृहस्थं. गिंडेंनी किर्लोस्करांच्या कामावर विश्वास दाखवून त्यांना काही भांडवली मदत केली. औंधच्या महाराजांनी १०,००० रुपये भांडवल आणि ३२ एकर जमीन किर्लोस्करांच्या हवाली केली आणि किर्लोस्करांच्या पंखांमधे गरुडभरारी मारायचं सामर्थ्य आलं.

ह्या जमिनीमधे लक्ष्मणराव आणि रामण्णांनी किर्लोस्करवाडी वसवायसाठी अपार मेहेनत घेतली. फक्तं २५-३० कामगारांची घरं त्यांनी वाडीमधे वसवली. एका बाजूला फाउंडरीमधे ओतीव नांगरांच्या फाळांची निर्मिती चालू केली. उत्पादन तर चालू झालं, पण विक्रीच्या नावाने ठणठणाट होता. तत्कालीन शेतकरी हा अंधश्रद्धाळू असल्याने लोखंडी नांगर जमिनीमधे विष कालवेल पासून अनेक गैरसमजुतींमुळे नांगराचे फाळ काही विकले जाईनात. उत्पादनानंतर जवळ जवळ दोन वर्षं एकही नांगर विकला गेला नाही. नंतरच्या काळामधे मात्र वर्षभरात जवळजवळ २००-२५० नांगर विकले जाऊ लागले. मात्रं ह्या दोन वर्षांनी लक्ष्मणरावांची सत्वपरीक्षा पाहीली. ह्यानंतर मात्रं किर्लोस्करवाडी, किर्लोस्कर ब्रदर्स आणि लक्ष्मणरावांनी मागे वळून पाहीलचं नाही. व्यवसायावरची सगळी कर्जं बघता बघता फेडली.

.
आंतरजालावरून साभार

पहिला ओतकाम करुन बनवलेला किर्लोस्कर नांगर (आयसोमेट्रिक कन्सेप्ट ड्रॉईंग)

१९०३ मधे लक्ष्मणराव आणि राधाबाईंना पहिली अपत्यप्राप्ती झाली. शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर. शंतनुराव किर्लोस्करांचं पाचवी पर्यंतचं शिक्षण औंध संस्थानाच्या शाळेमधे झालं. मॅट्रिकच्या परिक्षेमधे सगळ्या विषयात त्यांना ९०% च्या पुढे गुण होते, पण जर्मनमधे मात्रं ते पास झाले नाहीत. त्यांना तर पुढे जाउन MIT (USA) मधून यंत्रअभियंत्याचं शिक्षण घ्यायची इच्छा होती. मॅट्रिक झाल्याशिवाय तिकडे प्रवेश मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे शंतनुराव किर्लोस्कर सरळ अमेरिकेमधे गेले आणि तिकडे जाउन Chauncy high school ह्या MIT च्या पहिली पायरी समजली जाणार्‍या हायस्कूलमधे प्रवेश मिळवला. परत अभ्यास करुन जर्मन व इतर विषयांमधे त्यांनी दैदिप्यमान यश मिळवलं आणि स्वतःचा MIT मधला B.Sc in Mechanical Engineering अभ्यासक्रमामधला प्रवेश निश्चित केला.

.
आंतरजालावरून साभार

शंतनुरावांच्या सन्मानार्थ भारत सरकारने जारी केलेलं पोस्टाचं तिकिट

१९२० च्या सुमाराला किर्लोस्कर ब्रदर्स ह्या कंपनीला लक्ष्मणराव किर्लोस्कर, शंतनुराव किर्लोस्कर (त्याकाळी ते शिक्षणासाठी अमेरिकेमधे होते. त्यांचे चुलत बंधु माधवराव किर्लोस्करही त्यांच्याबरोबर होते. माधवरावांचं अमेरिकेमधे असतानाचं दुर्धर आजाराने निधन झालं), शंकरभाऊ किर्लोस्कर, शंभुअण्णा जांभेकर वगैरे पार्टनर्सनी मिळून किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड ह्या नव्या नावाखाली खरेदी केली. हे सगळे पार्टनर्स कंपनीमधल्या वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडू लागले.

१९२६ च्या सुमाराला शंतनुराव मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि प्रचंड अनुभव घेउन भारतात परतले. शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी किर्लोस्करांच्या उद्योगाला नवी चालना दिली (ह्याकामी त्यांना त्यांच्या भावंडांची म्हणजे प्रभाकर, राजाराम आणि रवी किर्लोस्करांचीही मदत झाली असणार. त्यांच्या नक्की योगदानाविषयी माझ्याकडे माहिती उपलब्धं नाही. कोणाकडे असल्यास त्यांनी ती माहिती प्रतिसादामधे लिहावी. प्रतिसादकर्त्याच्या परवानगीने ती लेखामधे योग्य जागा शोधून लिहीन.) १९२८ च्या सुमारास फक्तं नांगरांच्या फाळ व कडबाकुट्टी यंत्रांवरुन किर्लोस्करांनी सुमारे ४० वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीपूरक यंत्रांची निर्मिती चालू केली, ज्यामधे २० वेगवेगळ्या प्रकारचे नांगर, १० हँडपंप्स ह्या उत्पादनांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्या नांगरांच्या डिझाईन्सनी शेतीच्या कामांमधे प्रचंड गतिमानता आली हे पूर्वी तेचं नांगर नाकारणार्‍या शेतकर्‍यांनी मान्यं केलं.

शंतनुरावांचा विवाह दरम्यानच्या काळामधे यमुताई फाटक ह्यांच्याशी झाला. यमुताई ह्या त्या काळच्या अत्यंत कर्तृत्ववान स्त्रियांमधे गणल्या जात असतं. पुढच्या काळामधे यमुताईंनी गरीब व असहाय्य महिलांसाठी महिला उद्योग लिमिटेड नावाखाली कारखाना चालू केला. संपुर्ण कारखाना महिलांच्याचं सहभागावरती चालवला गेला. १९४६ मधे दुसर्‍या महायुद्धा नंतरच्या औद्योगिक मंदीच्या काळामध्ये शंतनुरावांनी किर्लोस्करांच्या यशस्वी उद्योगांना डिझेल आणि इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीची ताकद दिली.

पुण्यामधे किर्लोस्कर ऑईल इंजिन्स आणि बंगळुरुला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीचे कारखाने त्यांनी सुरु केले. पुण्यामधला कारखाना चालू करताना त्यांना लाल फीत आणि भूसंपादनातील अडचणींचा बराचं त्रास सहन करावा लागला. पण शंतनुरावांनी जिद्दीने हाताशी घेतलेला प्रकल्प मार्गी लावला. ब्रिटिश ऑईल इंजिन्स लिमिटेड च्या सहकार्याने चालू झालेला हा कारखाना वर्षाला १०,००० डिझेल इंजिन्सची निर्मिती करायला लागला.

आधी म्हणल्याप्रमाणे हा विषय एका लेखाचा नसून एका मोठ्या लेखमालेचा आहे. त्यामुळे वरच्या लेखामधे फक्तं महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे. ह्याखेरीज किर्लोस्कर ब्रदर्सच्या अचिव्हमेंट्सचा गोषवारा खालच्या मुद्द्यांमधे वाचालच.

०१. एशिया मधे १९५० डिझेल इंजिनांची निर्मिती करणारा जपानखालोखालचा सर्वात मोठा कारखाना

०२. १९५८- १९६० प्रचंड मोठ्या आर्थिक संकटावर मात करुन ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आणि स्वीडन ह्या देशांशी भारतामधून इंजिन निर्यातीचे प्रचंड मोठे करार

०३. १९६० एका देशाच्या वापरासाठीची स्पेशल पर्पज प्रचंड मोठी २०० इंजिनांची मागणी यशस्वीपणे पूर्ण करुन, ती ऑर्डर एअरलिफ्ट करुन वेळेमधे पूर्ण करणारी देशातली सर्वात मोठी निर्यात कंपनी

०४. १९६२ मधे किर्लोस्कर कमिन्स लिमिटेडची पुण्यात स्थापना.

०५. १९६५, किर्लोस्कर गृपने ४०००० चं मनुष्यबळ १५ कंपन्यांमधे मिळून ओलांडलं. थोडक्यात ४०,००० घरं रोजगारात आणली.

०६. १९६९, सर वॉल्टर पकी प्राईझनी किर्लोस्कर ग्रुपला सन्मानित करण्यात आलं. (Most outstanding organization in field of Production Engineering)

०७. १९७० पुढच्या दशकामधे ड्युट्झ इंजिन्सबरोबर करार करुन भारतामधे ट्रॅक्टर्सची निर्मिती सुरु केली.

१९७०-२०१० च्या प्रगतीवर एक स्वतंत्र लेख टंकायचा विचार आता मनामधे आलाय. जमेल तसा टंकेनच.

एवढ्या प्रगतीच्या चढत्या आलेखामधे लक्ष्मणराव, शंतनुराव आणि यमुताईंनी आपलं सामाजिक भान कधीचं सोडलं नाही.

किर्लोस्करवाडीमधे लक्ष्मणरावांनी अस्पृश्यता निर्मुलन केलेलं होतं. शंतनुरावांनी दिव्यांगासाठी, मानसिकरीत्या दुबळ्या लोकांसाठी संस्था चालू केली. यमुताईंनी वर लिहिल्याप्रमाणे महिलांसाठी महिला उद्योग चालू केले. अशा अनेक उपक्रमांमधून किर्लोस्करांनी सामाजिक भान बाळगलं.

अश्या ह्या महान उद्योग घराण्यास, त्यांच्या कर्तृत्वास, त्यांच्या सामाजिक जाणिवेस मानाचा मुजरा. त्यांच्या उद्योगांची कारकीर्द अशीचं दैदिप्यमान राहो ही प्रार्थना.

प्रतिक्रिया

लेख आवडला. चांगले लिहिलेय.