Skip to main content

भारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा - IRNSS

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 28/04/2016 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागे GPS वर लिहिलेल्या लेखात संपूर्ण भारतीय बनावटीच्या ग्लोबल पोजीशानिंग सिस्टिमचा उल्लेख केला होता. त्यात म्हटलेल्या आयआरएनएसएस (IRNSS) प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीने आज एक मैलाचा दगड पार केला. ह्या प्रणालीत अंतर्भूत असलेल्या सात उपग्रहांमधला सातवा, शेवटचा, उपग्रह भारताने आज श्रीहरीकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून अवकाशात प्रक्षेपित केला. ह्या शिरपेचातल्या तुऱ्याने भारत आज अमेरिका, रशिया, युरोप आणि चीन ह्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. कारगिल युद्धाच्या वेळी स्वतंत्र आणि भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीची गरज अधोरेखित झाली होती. त्यावेळी अमेरिकेच्या GPS ह्या प्रणालीचा उपयोग भारताला करावा लागला होता. इस्रोने त्यानुसार आयआरएनएसएस (IRNSS) प्रणालीचे काम हाती घेतले होते आणि आज सर्व उपग्रह प्रक्षेपित करून भारताचा उपग्रह आणि अवकाश तंत्रज्ञानातली घेतलेली झेप किती यथार्थ आहे हे सिद्ध केले.
(चित्र: आंतरजालावरून साभार)
ह्या प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीची काही ठळक वैशिष्ट्ये:
  • भारतीय उपखंडातील भारताच्या आजूबाजूच्या सुमारे १५००  किमी प्रदेशात ह्या प्रणालीची सेवा अचूक, रिअल-टाइम स्थिती आणि वेळ दाखवू शकणार आहे.
  • ही प्रणाली दोन प्रकारच्या सेवा प्रदान करेल: १. Standard Positioning Service (SPS) - हे सेवा खुली असून नागरी उपयोगाकरिता वापरण्यात येईल. २. Restricted Service (RS) - ही सेवा फक्त अधिकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल आणि सुरक्षेसाठी ही सेवा एनक्रिप्टेड असेल.
  • ह्या प्रणाली अंतर्गत प्रक्षेपित केलेले IRNSS-1A, 1B, 1C, ID,1E, 1F and IG असे हे सात उपग्रह.
  • सर्व उपग्रहांची कार्यक्षमतेचा कालावधी १२ वर्षांचा आहे आणि आकस्मिक परिस्थिती हाताळण्यासाठी २ राखीव उपग्रह तैनात केलेले आहेत.
  • येत्या ३-४ महिन्यांमध्ये ह्या सातही उपग्रहांमध्ये समन्वय साधला जाऊन त्यांचे प्रणालीबरहुकूम काम चालू होईल.
२४ उपग्रहांची GPS आणि GLONASS, ३४ उपग्रहांची युरोपियन गॅलिलियो, ३५ उपग्रहांची चिनी बैदु ह्या पार्श्वभूमीवर ७ उपग्रहांची सुटसुटीत IRNSS हे भारताच्या तंत्रज्ञानाताल्या अफाट प्रगतीचे द्योतक आहे!

वाचने 6304
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

समस्त वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि इस्रोचं अभिनंदन. जीपीएससारख्या सुविधेवर परकीयांवर अवलंबून राहाणं ही राष्ट्रीय सुरक्षेत कमतरता होती. ती यामुळे भरून निघाली.

कारगिल युद्धाच्या वेळी स्वतंत्र आणि भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणालीची गरज अधोरेखित झाली होती. त्यावेळी अमेरिकेच्या GPS ह्या प्रणालीचा उपयोग भारताला करावा लागला होता यात एक सुधारणा मी सुचवेन. कारगिल युद्धाच्या वेळेस पाकिस्तानी ठाण्यांवर अचूक हल्ला करण्यासाठी आवश्यक असणारी GPS प्रणाली देण्यास अमेरिकेने नकार दिला होता. यामुळे स्वताचे तंत्रज्ञान विकसित करण्याची नितांत आवश्यकता भारताला जाणवू लागली त्याचे फलित म्हणजे हे सात उपग्रह पाठवून भारताने आपले उद्दिष्ट गाठले आहे. याबद्दल भारतीय शास्त्रज्ञांचे आणी भारत सरकारचे( कोणत्याही पक्षाचे असले तरीही) अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे http://timesofindia.indiatimes.com/home/science/How-Kargil-spurred-Indi…

१. Standard Positioning Service (SPS) - हे सेवा खुली असून नागरी उपयोगाकरिता वापरण्यात येईल.
आत्ताच्या स्मार्ट फोनांमध्ये हे वापरता येईल का? का ही सेवा वापरणारे वेगळे स्मार्टफोन्स/ किंवा इतर नॅविगेशन उपकरणं बनवायला लागतील?

इस्रोच्या शिरपेचात अजून एका मानाच्या तुर्‍याची भर पडली आहे ! अमेरिकेतील हितसंबधी संस्थांच्या भारत- व इस्रो- विरोधी हालचाली (लॉबियिंग) सुरु झाल्या आहेत. इस्रो उपग्रह अवकाशात पाठविण्याची उत्तम सेवा आंतरराष्ट्रिय स्तरावर तुलनेने फार कमी किमतीत विकते आहे. त्यांच्या मक्तेदारीला निर्माण झालेली ही स्पर्धा त्यांना खुपत आहे... USA & NASA Afraid of India & ISRO as the later rewrites "Space Economics" जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करण्याचे कष्ट घेऊ लागले की समजावे की आपले काही स्थान नक्की निर्माण झाले आहे ! :)

सिमेवरची घुसखोरी तसेच लपून बसलेले अतिरेक्यांवर कारवाई करणे सोपे होईल. आतिरेकी भारतात घुसविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याला आता सिमेवर तोफगोळ्यांचा मारा करणे खूप महागात पडेल, कारण पाकिस्तानी तोफांचे लोकेशन शोधून केलेला हल्ला खूपच अचूक असेल. यावर सोन्याबापूं सारख्या तज्ञांचे विचार ऐकायला आवडतील.